23 July, 2020

आता फक्त वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठीच ई-पास

आता फक्त वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठीच ई-पास

 

        हिंगोली, दि.23: जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून या अनुषंगाने उपाययोजना आवश्यक झाले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात विनाकारण  ये-जा करण्यासाठी ई-पासची मागणी होत असून काही नागरिक विनाकारण इतर जिल्ह्यात ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता केवळ वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठी इतर जिल्ह्यात  ये-जा  करण्यासाठीच यापूढे ई-पास देण्यात येणार आहे. याशिवाय इतर कारणांसाठी नागरिकांनी ई-पासची मागणी करु नये. कारण आता जिल्हा प्रशासनाकडून अशा मागण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

            वैद्यकीय कारणासाठी ई-पासची मागणीसाठी यापुढे आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय, रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय इतर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

            कोणत्याही व्यक्तीने या आदेशाची अवज्ञा केल्यास सबंधीतास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005, साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 आणि फौजदार प्रक्रिया संहिता 1973 नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****


No comments:

Post a Comment