15 December, 2023

 शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी

महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 15 : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तीक शेततळे ही योजना नोव्हेंबर, 2022 पासून राज्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. आज अखेर लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात या योजनेतून 200 शेततळे पूर्ण झाले आहेत. सध्याच्या मोठ्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके तसेच फळबागाच्या संरक्षित  सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. राज्याची सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचविण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विहीर व बोअरवेलचे तसेच परतीच्या पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपये पर्यंत व अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी एक लाख 15 हजार रुपयापर्यंत अनुदान जिल्हास्तरावर काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.

            ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी शेततळ्याचा लाभ घेतला नसेल अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिरित्या ऑनलाईन नोंद करुन योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागातर्फे सर्व फळबागधारक शेतकऱ्यांना केले आहे.

******

No comments:

Post a Comment