28 January, 2025
पुस्तके आयुष्यात दिशादर्शकाचे काम करतात -- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे
हिंगोली (जिमाका), दि. 28 : सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वाचे आहेत. ग्रंथोत्सवातून आचार-विचारांचे प्रदान झाले पाहिजे. त्यामुळे पुस्तके हे आयुष्याला, दिशा, गती आणि आकार देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप शिक्षणाधिकारी नितीन नेटके, प्रा. विलास वैद्य, प्रा.खंडेराव सरनाईक, गजेंद्र बियाणी, प्रा.जी. पी. मुपकलवार, श्रीमती सुमन दुबे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. लोमटे म्हणाले, पुस्तके आपणाला एकत्र आणण्याचे काम करतात. ग्रंथ वाचनातून ऊर्जा मिळते. जीवनात पुस्तके दृष्टी देतात. दृष्टी असेल तर अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करतात. कला, साहित्य, संस्कृती हे एकमेकास पूरक असून ते हातात हात घालून चालत असतात. कला आयुष्य उजळून टाकतात. पुस्तक हे आपले आयुष्य बदलते. संत ज्ञानेश्वरी, तुकारामाची अभंग गाथा ही मराठीची समृध्द परंपरा आहे. ज्ञानदीप लावू जगी या म्हणीप्रमाणे संत नामदेवांनी मराठी साहित्य समृध्द करण्याचे काम केले आहे. मराठी साहित्याला संत साहित्याची दिशा असल्यामुळे मराठी साहित्य समृध्द आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे खरे ज्ञान हे पुस्तकात आहे. पुस्तके आरपार दृष्टी देण्याचे काम करतात. शहीद भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पुस्तक वाचनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावरुन क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची ज्ञानावरची निष्ठा दिसून येते. ज्ञानावरची निष्ठा खरे आदर्श आहे. पुस्तके वाचली पाहिजेत. ज्ञान हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे ज्ञान हे कशानेही कमी होत नाही. त्यामुळे ग्रंथ हेच सगळ्यात मोठी संपत्ती असल्यामुळे सर्वांनी ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथाचे मंथन, चिंतन व्हावे, ग्रंथाविषयी प्रेम वाढावे, या हेतूने हा ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी आहे. संत नामदेव महाराजामुळे हिंगोलीची ओळख संपूर्ण देशात झाली आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही वापरापासून दूर ठेवले पाहिजे. तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे वळविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी वाचन संस्कृती रुजवा- पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
ग्रंथ हे आपल्याला दिशा देतात. त्यामुळे ग्रंथाचे वाचन करण्याची गरज आहे. ग्रंथ हे मनाला आनंद देण्याचे काम करतात. मुलांच्या आवडीनुसार मुलांना पुस्तके वाचायला देऊन त्यांच्यामध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करावी लागणार आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन चळवळ विकसित होईल व त्यातून व्यक्तीमत्व विकास साधता येईल. पालकांनी पुस्तके खरेदी करावीत व त्यांचे वाचन करावे आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी म्हणाले, सध्या समाज माध्यमाचा वापर वाढला आहे. त्यातूनही त्याला विविध पर्याय आहेत. त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी स्टोरी टेल यासारखे विविध व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. याचा वापर करुनही पुस्तके वाचता येतात. त्यामुळे ग्रंथ वाचने आवश्यक असून ही ग्रंथ चळवळ लोकापर्यंत पाेहोचविणेही तितकेच महत्वाचे आहे. विविध मान्यवर लेखकांची पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवले पाहिजेत. ज्ञानाचा गाभारा ग्रंथ आहेत. पुस्तके वाचल्याशिवाय संस्कृती समजत नाही. पुस्तकाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजेत, असे सांगितले.
यावेळी गजेंद्र बियाणी यांनी प्रत्येक घरात पुस्तके असली पाहिजेत. मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करावी. ग्रंथावर प्रेम करण्यासाठी आवड निर्माण करावी, ग्रंथ हे आपणाला प्रकाशाची वाट दाखवतात. असे सांगितले. तर अशोक अर्धापूरकर यांनी मराठी भाषा टिकविण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. मराठी भाषेची गळचेपी थांबविण्यासाठी ग्रंथ चळवळ पालक व मुलांमध्ये रुजली पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी लेखिका सुमनताई दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रंथांमध्ये पिढ्या घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे ग्रंथ चळवळीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव दळवी यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार गजानन शिंदे यांनी मानले. यावेळी सुमन दुबे लिखित ‘बैरंग लिफाफे’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गंगादेवी देवडा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद
ग्रंथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून ते जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, सत्यनारायण विद्या मंदीर, सिध्देश्वर वारकरी संस्था सापडगाव, शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, गुरुदास काम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे वेशभूषा, लेझीम नृत्य सादर केले.
या ग्रंथोत्सवामध्ये शासकीय ग्रंथागार छत्रपती संभाजीनगर, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य मासिकाचे स्टॉल, अभंग पुस्तकालय, श्री गणेश बुक डेपो, विद्याधन प्रकाशन, प्रगती बुक डेपो, सार्थक बुक सेल्स यासह विविध पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment