07 January, 2025
जवळा खंदारबन येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात केली बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 07 : वसमत तालुक्यातील मौजे जवळा खंदारबन येथील जिल्हा परिषद शाळेत वसमत येथील हुतात्मा बहीर्जी स्मारक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी महिला सबलीकरण व बाल विवाह एक समस्या या विषयावर एक सक्षम महिला म्हणजे काय, दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पाडतांना महिला ह्या समाजाच्या आधारस्तंभ बनले आहे. कधी प्रेमळ कन्या तर कधी वात्सल्यपूर्ण माता तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत. महिला ही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सबल होत असतांना आपल्याला दिसत आहेत. परंतु सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबित्व यातून स्त्रियांची सुटका होण्यासाठी महिलांनी आपण सक्षम असल्याची खात्री बाळगणे गरजेचे आहे. तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये सामर्थ्य असणे गरजेचे आहे. महिला सबलीकरण ही काळाजी गरज आहे. महिला सबल होत आहेत आणि सबल महिलेतूनच समाज सक्षम होत आहे. त्याचबरोबर बाल विवाह म्हणजे काय, बालविवाहाची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम,2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत याबाबत योग्यती खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बालक म्हणजे काय व बालकांकरिता तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते, असल्याचे सांगून जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी अशी माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली.
या कार्यक्रमासाठी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकांत एस. गावंडे, राष्ट्रीय सेवा योजना महिला सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. पाटील व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. एन. के. आकमार, विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत सोनटक्के, कु. प्रणाली कांबळे व सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्यार्थी, किशोर वयीन मुले-मुली व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment