23 January, 2025

राष्ट्रीय मतदार दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुया !

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी झाली असून स्थापनेचा ‘25 जानेवारी’ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग नोंदवता यावा हा आहे. भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मूलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. भारतातील युवा मतदाराना सक्रिय राजनीतीमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने ‘25 जानेवारी’ हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार यावर्षी 15 वा राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाची यंदाची थीम ‘वोट जैसा कुच्छ नही, वोट जरुर डालेंगे हम’ ही आहे. त्यांना भविष्यात निवडणुकांच्या वेळी सक्रीय आणि सहभागी करुन घेणे हा आहे. देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मूलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरिता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवस'निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत आपले नाव नोंदविले नाही अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते. मतदार म्हणुन नाव नोंदवण्यासाठी जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला याप्रमाणे वर्षभरात 4 संधी असणार आहेत. जर तुम्ही 2025 च्या एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्षाचे होणार असाल तर निरंतर अद्यतन प्रक्रियेत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र. 6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकता. आज रोजी हिंगोली जिल्ह्यात तीन मतदार संघामध्ये एकूण 9 लाख 88 हजार 681 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार 4 लाख 76 हजार 445 तर पुरुष मतदार 5 लाख 12 हजार 223 आणि तृतीयपंथी 13 मतदार आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी मतदार यादीत नाव नोंदविले नाही त्यांनी आता या कार्यक्रमानिमित्त महिला मतदारांनी नावे नोंदविली पाहिजेत. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका इत्यादींच्या सहकार्यामुळे यावर्षी महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 930 इतके झाले आहे. आज रोजी 18 ते 19 या वयोगटामध्ये 27 हजार 791 मतदार, तर 20 ते 29 या वयोगटात 2 लाख 28 हजार 180 मतदार आहेत. यंदाच्या निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या बहु अर्हता तारखा ठेवण्यात आल्या आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन प्रक्रिया सुरु असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे. वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या अधिकाधिक तरुणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा निरंतर पुनरीक्षण कार्यक्रम- 2025 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/ संबंधित तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नवीन मतदारांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करुन प्रतिज्ञा दिली जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध, रांगोळी, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांचा मतदार दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आपल्या लोक प्रतिनीधीस मतदान करण्याची संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या…! चंद्रकांत कारभारी माहिती सहायक / उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ****

No comments:

Post a Comment