30 January, 2025
दोन दिवशीय 'हिंगोली ग्रंथोत्सवा'चा उत्साहात समारोप
हिंगोली (जिमाका), दि. 30 : येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय 'हिंगोली ग्रंथोत्सवा'चा समारोप उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक हे होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, प्रा. जी. पी. मुपकलवार, नामदेव वाबळे, प्रा. जी.पी. मुपकलवार, राजकुमार दुबे, संतोष ससे, विश्वनाथ डोंगरे, विनोद कावडे, दिलीप माळवटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते.
प्रा.जी.पी. मुपकलवार यांनी ज्ञान प्राप्त करण्यासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. नवीन पिढी घडवायची असेल तर आपण वाचन करणे आवश्यक आहे. आपण जोपर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. स्वत:चा, राज्याचा, देशाचा, समाजाचा विकास करायचा असेल तर ग्रंथवाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देऊन ते टिकवण्याची गरज आहे. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, त्यामुळे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांनी बालकांमध्ये वाचन चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाने बालवाचन कक्ष समृद्ध केले पाहिजे, असे सांगून या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास खरात यांनी केले, तर आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. याप्रसंगी ग्रंथविक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्या निंबाळकर यांनी महाराष्ट्र गीत तर मधुरा सिसोदे यांनी खरा तो एकची धर्म हे गीत सादर केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment