29 January, 2025

'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' आणि 'वीर बिरसा मुंडा' यांच्या कार्याला व्याख्यानातून उजाळा

• हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक - शिवाजी पवार हिंगोली (जिमाका), दि. 29 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि वीर बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला. येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि वीर बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य तसेच भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अशोक अर्धापूरकर उपस्थित होते. या व्याख्यानात अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर बोलताना प्रा. डॉ. सुनंदा भुसारे यांनी अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी देशभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढेच नव्हे तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात कितीही अडचणी, दुःख असले तरी त्याचे पडसाद सामाजिक जीवनात कधीच दिसून आले नाहीत. त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी काम केले. त्यांच्या राज्यातील प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले. प्रजाहितदक्ष अहिल्याबाई जीवनभर सतीचे आयुष्य जगल्या. त्यांनी शेतकरी, महिलांची सुरक्षा व विधवा महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रजेच्या सुखासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी अहिल्याबाई अखंड करत राहिल्या. त्याचे धैर्य, शौर्य, चातुर्य, वात्सल्य, माधुर्य, भक्ती आणि विरक्ती अशा सप्तरंगी गुणांनी युक्त असे त्यांचे जीवन हे कर्तृत्वाचा आदर्श दाखवणारे आहे. अहिल्याबाई होळकर या उत्कृष्ट समाज कार्य, राजकारण तसेच सुशासन निर्माण करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. सतीश ढाकरे यांनी वीर बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रकाश टाकला. यामध्ये त्यांनी वीर बिरसा मुंडा हे एक आदिवासी स्वातंत्र्यसेनानी आणि लोकनायक, क्रांतिकारक होते. त्यांनी ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध आदिवासींमध्ये उलगुलान चळवळ केली होती. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर, 1875 रोजी झारखंडमधील उलिहातू या गावी झाला होता. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसांचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले. बिरसांना आपल्या वडिलांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातूनच जंगलातील संपत्तीवर स्थानिक आदिम जमातीच्या लोकांना अधिकार मिळविण्यासाठी त्यांनी जंगल स्वराज्य मिळविण्यासाठी वनासाठी नानक ही संकल्पना स्थापन केली होती. या संघटनेतील सर्व सदस्यांना विविध शस्त्रे, हत्यारे तयार करण्याचे काम सोपविले होते. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून ब्रिटीश अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडा यांनी लढा उभारला होता. इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. आणि 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला, असे त्यांचे जीवन कार्य असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. अध्यक्षीय समारोपात माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयावर प्रकाश टाकताना म्हणाले, आपल्या देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी अथक परिश्रम घेतले. 1942 उठावानंतर राज्यघटना तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. 1946 मध्ये भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. तसेच या घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन ते तीन वर्षे विविध देशातील घटनांचा अभ्यास करुन सर्व समाजातील घटकातील लोकांना न्याय मिळण्यासाठी सर्वसमावेशक घटना तयार केली. आणि शेवटी 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारताची राज्यघटना अंमलात आली. लोकशाही पध्दतीची घटना तयार केली. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही या तत्वाचा अवलंब करुन धर्म, भाषा, लिंग याचा कुठलाही भेदभाव या घटनेत ठेवलेला नाही. या घटनेतून सर्वांना समान सामाजिक, आर्थिक न्याय मिळावा आणि गरीब व श्रीमंत यातील दरी कमी करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे ही घटना सर्वसमावेशक आहे. सरनामा हा या घटनेचा आत्मा आहे. या घटनेचा सरनामा उद्देशिकेच्या माध्यमातून थोडक्यात मांडला आहे. त्यामुळे हा सरनामा आपण स्वत: प्रती अर्पण करत आहोत. या घटनेची अंमलबजावणी करताना आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे सांगितले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कल्याण वसेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी केले. या व्याख्यान कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. **

No comments:

Post a Comment