15 February, 2025

९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य सेवेचा आढावा - कलानंद जाधव हिंगोली मो. ९४०३८०१२७३

हिंगोली जिल्हा तरुण जरी असला तरी साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा नोंद घेण्यासारखा आहे. सांगायचेच झाले तर हिंगोलीची साहित्य परंपरा सुरू होते १२ व्या शतका पासून. अगदी हिंगोलीच्या जवळच असलेली नर्सी नामदेव ही संत शिरोमणी नामदेवांची जन्मभूमी. त्यावेळी त्यांनी शतकोटी अभंग रचनांचा संकल्प केला होता. संत नामदेवांना आद्य कीर्तनकार म्हणून ही संबोधल्या जाते. त्यांचे एकूण १४ कुटूंबिय. सर्वांच्या अभंग रचना आज ही पहावयास मिळतात. जवळच असलेल्या औंढा नागनाथचे प्रसिद्ध साधू विसोबा खेचरांच्या या रचना संग्रहीत आणि सुरक्षीत आहेत. मधल्या काळात ही साहित्य निर्मिती झाली असावी. पण प्रकाशात न आल्यामुळे ती सुप्त राहिली. पुढे मात्र हिंगोली तालुक्यातील नांदापूरचे डॉ. ना. गो. नांदापूरकर, वसमत तालुक्यातील कुरुंद्याचे प्राचार्य नरहर कुरुंदकर गुरुजी, कळमनुरी तालुक्यातील शेवाळ्याचे प्राचार्य राम शेवाळकर, हिंगोलीतील ज्येष्ठ कवी तथा प्रख्यात चित्रकार भ. मा. परसवाळे सर, प्रा. विलास वैद्य सर, अशोक अर्धापूरकर तरुणांना सतत मार्गदर्शन करत असतात. कळमनुरी तालुक्यातील रुपूरचे प्रा. फ. मुं. शिंदे, सेनगाव तालुक्यातील सुरजखेडचे ह. भ. प. माधव महाराज सुरजखेडकर यांचेही चार ग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच सेनगावमधील वरखेडचे रामचंद्र सावंत, मी कलानंद जाधव सेनगावचेच. असे दिग्गज, विचारवंत, वक्ते, समीक्षक कवी, कादंबरीकार हिंगोलीने मराठीला दिले. सर्वांचा नामोल्लेख विस्तार भयास्तव टाळत आहे. आता तर हिंगोलीमध्ये विविध साहित्य प्रकारात अधिकारवाणीने लिहिणाऱ्या मातब्बर साहित्यिकांचा मळा बहरात आहे. ज्यामधे कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, आत्मकथने, छंदोबद्ध, मुक्तछंदात कविता, गजल, हायकू, लावण्या, अभंग, पोवाडे अशा अनेक काव्य प्रकारातील हिंगोलीमधून दरवर्षी किमान २५ पुस्तकांची साहित्यात भर पडते असते. सन २०२५ मराठी आणि महाराष्ट्रासाठी फार महत्वाचे आहे. या वर्षी मुळातच समृद्ध असलेली मराठी, समृद्ध या अर्थाने म्हणतो की, इंग्रजीमध्ये एकच शब्द १० अर्थाने वापरला जातो, आणि मराठीमध्ये एका अर्थासाठी १० शब्द चपलख आहेत. यावरून मराठीची समृद्धी लक्षात येते. म्हणून तर संत ज्ञानेश्वर मराठी कशी आहे ते एका ओवीमध्ये सांगतात. साच आणि मवाळ । मिथिले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ।। अशी मराठी असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. या वर्षी केंद्रिय मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. त्याबद्दल समस्त मराठीजन उभय सरकारचे ऋणी आहे. त्यात अजून दग्ध शर्करा योग याच वर्षी ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होणार म्हणजे मराठीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवण्यात येणार आहे. आपण मराठी जन खुप आनंदी सुखी समाधानी आहोत. हेच समाधान भविष्यात मराठीला मारक न ठरो. कारण इंग्रजीचे अतिक्रमण भयावह आहे. सामान्यातला सामान्य जरी पाहिला तरी इंग्रजीचा शब्द न घेता एक वाक्यसुद्धा बोलू शकत नाही, ही मनोरुग्णता निश्चितच चिंताजनक आहे. कारण इंग्रजीचे शब्द बोलताना वापरणे ही एक मनोविकृती बळावत चालली आहे. इंग्रजी चलन भाषा, जगभर बोलली जाणारी ही आहे. ती आत्मसात ही करावी. पण मराठीचं काय? कवीवर्य कुसुमाग्रज त्यांच्या एका फटक्यात सांगतात. पर भाषेत ही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. मीच विनविते हात जोडूनीजी वाट वाकडी धरू नका (स्वातंत्र्यदेवीची विनवणी) म्हणून मराठीसाठी तळापासून रचनात्मक नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी मग शाळा, कार्यालय, न्यायालय, शासन दरबारी मराठीचा वापर करणे अनिवार्य करावा लागेल. पुनश्च केंद्रिय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळाला धन्यवाद देत थांबतो. कलानंद जाधव 'अनुराग' ४२, रामाकृष्णा सिटी, अकोला बायपास, हिंगोली पीन - ४३१५१३ मो.नं. ९४०३८०१२७३ Email- kalanandjadhav@gmail.com ****

No comments:

Post a Comment