17 February, 2025

शिवजयंतीनिमित्त बुधवारी ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’; जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

• अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा हिंगोली, दि. १७ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथे ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज येथे केले. पदयात्रा पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उत्सव समितीचे मार्गदर्शक कल्याण देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, डॉ. बालाजी भाकरे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक सचिन हटकर आणि संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते. शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित उत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने योग्य ती पूर्वखबरदारी घ्यावी. नगर परिषदेने स्वयंसेवकांच्या माध्यमातून पाणीवाटप, स्वच्छता, अल्पोपहाराचे योग्य नियोजन करावे. शिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने सहभागी होणा-या विद्यार्थी व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा सहभाग वाढवावा, असे निर्देश त्यांनी दिले. नर्सी नामदेव येथून शिवज्योत आणली जाते. येथून मोठ्या प्रमाणावर वारकरी महिला येथे सहभागी होतील. आदिवासी, बंजारा, लाठी काठी तलवारबाजी, जवळपास १५ शालेय देखावे राहतील. १२ घोडदळ, लेझीम व झांजपथक, जवळपास २ हजार युवक सहभागी होतील. दरवर्षी प्रमाणे ४ हजारावर शिवप्रेमी सहभागी होतील, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सकाळी ९ वाजता ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ सुरु होणार आहे. त्यानंतर विविध उपक्रमांचे सादरीकरण, पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. *****

No comments:

Post a Comment