03 February, 2025

पिंपळदरी, चिंचोलीत बाल संरक्षणाबाबत जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 03 : उगम ग्रामीण विकास संस्था आणि देसाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत बाल हेल्थ मेला आणि चिंचोली येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात बालकांचे अधिकार, चांगला व वाईट स्पर्श व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी चांगला व वाईट स्पर्श आणि बालकांचे अधिकार याविषयी मार्गदर्शन करताना आपल्या बालकांना वयाच्या तीन ते चार वर्षापासूनच सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श कसा असतो व तसेच आपल्याला नको वाटणारा स्पर्श जर कोणी करत असेल तर त्याची तक्रार आपल्या आई-वडील, जवळचे नातेवाईक किंवा बालके शाळेत जात असल्यास शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्याकडे करावी. बालकांच्या अधिकारामध्ये जगण्याचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार, सहभागीतेचा अधिकार व विकासाचा अधिकार हे सर्व अधिकार बालकांच्या प्रमुख अधिकारापैकी महत्वाचे अधिकार आहेत. त्यामुळे प्रत्येक बालकांच्या अधिकाराचे आपण सर्वांनी पालन करावे. बालक हे राष्ट्राची संपत्ती व देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे बालकांची सुरक्षीतता, सहभागिता आणि बालकांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण मोठ्या माणसांनी देखील बालकांचे मत विचारात घेतले पाहिजे. तसेच सर्वांनी बालकांच्या सुरक्षिततेसाठी व सहभागीतेसाठी योगदान दिले पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 बाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये बाल विवाह म्हणजे काय, बालविवाहाची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठो बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या किंवा अडचणीत असलेल्या 18 वर्षाच्या आतील बालकांकरीता तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर कोणीही नागरिक संपर्क साधू शकतात, अशी माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली. बालकांसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणेबाबत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. बालकांसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणेबाबत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेची शपथ घेतली. तसेच युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यानी बाल विवाहाचे संपूर्ण उच्चाटन होण्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावरील यंत्रणेबाबत माहिती दिली व पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग याबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभागातून बाल विवाहाबाबत जनजागृती केली. चाईल्ड हेल्पलाईनचे समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बालक म्हणजे काय, दत्तक विधान व अनाथ प्रमाणपत्राबाबतची माहिती दिली. चिंचोली येथील कार्यक्रमासाठी आदर्श महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. सचिन हाटकर, प्रा. डॉ. टी. आर. हापगुंडे व इतर प्राध्यापक वृंद, सर्व स्वयंसेवक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तर पिंपळदरी येथील कार्यक्रमात चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव व जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment