18 February, 2025
राजधानी दिल्लीत अभिजात मराठी भाषेचा जागर
मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. मराठी भाषेचा प्रवास हा केवळ काही शतकांचा नाही, तर तो संस्कृती, इतिहास, साहित्य, विचारधारा आणि चळवळी यांचा जाज्वल्य इतिहास आहे. शिवकालीन युद्धनीती असो, संतवाङ्मयातील अध्यात्म असो, की लोकमान्य टिळक, सावरकर यांच्या लेखणीतील क्रांतीचा हुंकार मराठीने प्रत्येक युगात आपली छाप सोडली आहे. आजही ही भाषा डिजिटल युगात नव्या वाटा शोधत व्यापक रूप धारण करत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेची नुसती प्रतिष्ठाच वाढत नाही, तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी अधिक चालना मिळते. केंद्र सरकारकडून त्या भाषेच्या विकासकार्यासाठी त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. यातून मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह प्रकाशित करणे, प्राचीन दुर्मीळ अभिजात ग्रंथ अनुवाद करणे, त्यांचे प्रकाशन करून प्रचार-प्रसार करणे, ग्रंथालयांना बळकट करणे, भाषेचा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव मदत करणे इत्यादी भाषा संवर्धनासाठीची कामे केली जातात.
अभिजाततेचा गौरव मिळविणाऱ्या मराठी भाषेचा आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा भव्य उत्सव म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांचे हृदयस्पंदन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. यापूर्वी दिल्ली येथे 1954 साली घेण्यात आले होते. तब्बल 72 वर्षानंतर पहिल्यांदाच हे 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा येथे येत्या 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे. 98 व्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास विशेष महत्व आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच साहित्य संमेलन होत असून, राजधानी दिल्ली होत असल्यामुळे भाषेची थोरवी, महती, व्याप्ती, प्रचार-प्रसार व्यापक प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे.
मराठी भाषेच्या समृध्दीचा पाया संतांनी घातला. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणत ज्ञानेश्वरी रचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठीची महती सांगताना अभिमानाने म्हटले “माझ्या मराठीचिया बोलू कवतुके, परि अमृतातेही पैजा जिंके !” . संत तुकारामांच्या अभंगांमध्ये समाजमन घडवण्याचे सामर्थ्य आहे, तर समर्थ रामदासांच्या लेखणीत राष्ट्रवादाची चेतना. या संतवाणीने केवळ धर्मप्रसार केला नाही, तर मराठी मनाच्या विचारसरणीला एक नवा आयाम दिला आहे.
महाराष्ट्राची शान मराठी, मनामनाचा अभिमान मराठी, झाडे, वेली, पशु-पाखरे अन् सह्याद्रीचा आवाज मराठी या ओळीतील मराठी भाषेची प्रगल्भता लक्षात येते. मराठी भाषा ही आपुलकीची, प्रेमाची भाषा आहे. याचा जागर करण्यासाठीच हा आखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे.
मराठी साहित्य हे केवळ संतवाणीपुरते सीमित राहिले नाही. सुरेश भटांच्या गझल, कीर्तनसंस्कृती, लोककथांपासून ऐतिहासिक चरित्रांपर्यंत, नाटकांपासून विज्ञान-तंत्रज्ञाना परंपरेपर्यंत मराठी साहित्याने विविध अंगांनी समृद्धी मिळवली आहे. लोकमान्य टिळक यांच्या अग्रलेखांनी स्वातंत्र्यलढ्याला धार दिली, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी साहित्याला नवचैतन्य दिले, तर पु. ल. देशपांडे यांनी आपल्या मिश्कील लेखणीतून मराठीला वेगळीच उंची दिली. आज, मराठी साहित्य नवनव्या वाटा शोधत आहे. सोशल मीडियावर चर्चिले जात आहे ही बाब उल्लेखनीय आहे.
मराठी भाषा ही केवळ भूतकाळाचा गौरव नसून, भविष्यासाठीची शिदोरी आहे. डिजिटल क्रांतीच्या युगातही मराठी साहित्य नवनवीन प्रयोगांमधून पुढे जात आहे. ब्लॉग, पॉडकास्ट, ऑडिओबुक्स, वेब सिरीज अशा माध्यमांतून मराठी भाषा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दि. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीच्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा येथे आयोजित केले आहे. दिल्ली येथील या साहित्य संमेलनात जास्तीत जास्त साहित्यिक, कवी कवयित्री, साहित्यप्रेमी, वाचकांनी सहभागी होऊन माय मराठीचा आणि साहित्याच्या भव्यतेचा हा सोहळा साजरा करूया !
- चंद्रकांत कारभारी,
माहिती सहायक/उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*******
No comments:
Post a Comment