11 March, 2025
बालकांचे शोषण होऊ नये यासाठी बालस्नेही गावे बनवावीत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 11 : बालकांचे हक्क व अधिकार, बालकांसाठी कार्यरत यंत्रणा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, ग्राम बाल संरक्षण समितीची रचना व भूमिका, अग्रभागी कर्मचारी यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, बालविवाह निर्मूलन कृती आराखडा, डेटा संकलन व अहवाल सादरीकरण, कम्युनिकेशन कीट इत्यादी विषयांवर प्रशिक्षण देवून गावात बालकांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे शोषणाचे प्रकार होवू नये, कुठलेही बालक त्यांच्या हक्कांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी व बालस्नेही गावे बनवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कार्यशाळेत दिल्या.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील मिशन सक्षम बालिका, "बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा" अंतर्गत अग्रभागी कर्मचाऱ्यांची एकदिवशीय कार्यशाळा दिनांक 10 मार्च 2025 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फोफसे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, साधन व्यक्ती नंदू जाधव, प्रकल्प अंमलबजवणी प्रमुख बालविवाह निर्मूलन प्रकल्प युनिसेफ & एस.बी.सी.3 मुंबई यांची उपस्थिती होती. तसेच वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, बालविवाह निर्मूलन प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक संदिप कोल्हे यांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, SBC3 व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध नाविन्य पूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविले जात आहे, याच उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील निवडक 50 हॉटस्पॉट गावांसाठी पंचायत विभाग, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व विभागाचा बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजवणी व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायत अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यांची बालविवाह निर्मूलन कृती आराखडा अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन संदीप कोल्हे यांनी केले तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालविवाह निर्मुलन बाबत प्रतिज्ञा घेऊन आभार व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098 यांनी अथक परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment