09 March, 2025

शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी योग्य समन्वयाची गरज-जिल्हाधिकारी अभिनव गोयल

* अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी पशुपालन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन हिंगोली (जिमाका), दि. ०९ : शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी विज्ञान आणि व्यवसायाचा योग्य समन्वय साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. पशुपालन क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान, प्रशिक्षण व शिक्षण केंद्र, पुणे आणि पशुसंवर्धन विभाग, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. बी. खुने, शास्त्रज्ञ डॉ. संघरत्न बहिरे, डाॅ. अमोल भालेराव, परभणी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. तुकाराम भुक्तर, उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले, पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप नरवाडे, डॉ. शरद पवार, डॉ. अर्चना जाधव, डॉ. व्यंकटेश देवकते उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी उपस्थित महिला पशुपालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "शेतीतून धंदा करण्याचे आणि पशुपालनातून वैज्ञानिक पद्धतीने उत्पन्न मिळवण्याच्या संधी आपल्यासमोर खुल्या आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत प्रोत्साहन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी पशुपालकाच्या विकासात तांत्रिक प्रशिक्षण महत्वाचे असून सर्व पशुपालकांनी याचा अवलंब करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी तांत्रिक मार्गदर्शनामध्ये विविध सत्रांत प्रमुख अतिथींनी पशुपालनाचे महत्त्व, दुग्धव्यवसायातील अडचणी, जनावरांची निवड, जागेचे नियोजन, प्रजनन आणि शेवटी मार्केटिंगसह एकात्मिक पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डॉ. एस. बी. खुने यांनी दुग्धव्यवसायातील अन्न नियोजन, जनावरांच्या निवडी आणि सरकारी योजनांविषयी सखोल माहिती दिली, तर डॉ. संघरत्न बहिरे यांनी कुक्कुटपालन आणि शेळीपालन यांसारख्या उपक्षेत्रांवर प्रकाश टाकला. डॉ. अमोल भालेराव यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती व पशुपालनाद्वारे शाश्वत उत्पन्न मिळवण्याचे मार्ग सुचवले. तसेच डॉ. तुकाराम भुक्तर यांनी चारा व्यवस्थापन, बहुवार्षिक गवत, सायलेज निर्मिती आणि चारा पिकाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रशिक्षण सत्रास सुमारे 300 शेतकऱ्यांचा सहभाग होता. या कार्यशाळेत पशुपालन व्यवसायातील विविध संधी, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य व्यवस्थापन आणि विविध शासन योजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. प्रशिक्षण व शिक्षण केंद्र, आयसीएआर-आयव्हीआरआय, पुणे यांच्या वतीने शेतकऱ्यांना शेळीपालन मार्गदर्शिका, बॅकयार्ड पोल्ट्री पालन मार्गदर्शिका, पोल्ट्री जातींची माहिती आणि युरिया ट्रीटमेंट तंत्रज्ञानासंबंधी माहितीपत्रकाचे विमोचन करून पशुपालकांना वाटप करण्यात आले. *महिला दिनानिमित्त विशेष सत्कार* यावेळी पशुसंवर्धन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला पशुपालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप कार्यशाळेचे यशस्वी आयोजन आणि समन्वय हिंगोली तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. संदीप नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत कसा करता येईल याची सखोल माहिती मिळाली. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मनोबलाला नवी दिशा देत, त्यांच्या व्यवसायात वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्यास प्रोत्साहित करत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंगोली पंचायत समितीमधील सर्व कर्मचारीवृंद यांनी मेहनत घेतली. ******

No comments:

Post a Comment