08 April, 2025

सामाजिक समता सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करणार सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

• उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन हिंगोली(जिमाका), दि. 08 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे देऊन भारतीय समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, यासाठी 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्त समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याची माहिती देण्यासाठी आज दि. 8 एप्रिल रोजी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी माहिती दिली. दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन आणि जनजागृती केली जाणार आहे. 9 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहांमध्ये वक्तृत्व, निबंध, लघुनाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातील. तसेच जिल्हा व विभागस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विविध योजनांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप केले जाणार आहे. दि. 10 एप्रिल रोजी समतादुतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य आणि लघुनाटिकांद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे व सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात येणार असून सामाजिक विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. 12 एप्रिल रोजी संविधान जागर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. 13 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर आणि मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. तसेच व्याख्याने, चर्चासत्रे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान तसेच ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वितरण आणि समता सप्ताहाचा समारोप होणार असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी यावेळी दिली. यावेळी सुरुवातीला उपस्थित मान्यवर पत्रकारांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, अधीक्षक आत्माराम वागतकर, चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment