30 April, 2025

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 15 : प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पाण्याच्या स्त्रोताचा नियमित वापर करताना विविध उपक्रम राबवून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन व जलपूजन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्ह्यातील पूर्णा, कयाधू व पैनगंगा या तीनही मुख्य नद्यांतील पाण्याचे जलपूजन करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे, कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, कार्यकारी अभियंता श्री. शेख, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, 'उगम'चे जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता पुढे म्हणाले, जिल्ह्यात दोन ते तीन टक्केच वनक्षेत्र आहे. ते वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी पाच झाडे लावावीत. पाण्याच्या स्त्रोत वाढविण्यासाठी घरामध्ये शोषखड्डा, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग यासारखे उपक्रम राबवावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पुनरुर्जीवन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाची बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून पुनरुर्जीवन करण्याचे काम करण्यात येईल, असे सांगून पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्व महत्वाच्या मुद्यांवर केवळ पंधरवाड्यातच जनजागृती मोहिम न राबविता सर्वांनी पाण्याचे महत्व ओळखून सतत पाण्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये जिरवण्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्याची गरज आहे. यासाठी जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले. प्रास्ताविकात पालक अभियंता सुधाकर कचकलवार यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा अभियानाच्या माध्यमातून गावागावात जाऊन पाणी वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून पाणी बचतीची सुरुवात करावी आणि कार्यक्रम पंधरवाड्यापुरता न राहता सतत राबविण्यात येईल, असे सांगितले. कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त दि. 15 ते 30 एप्रिल, 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती सादरीद्वारे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जल, कलश व वसुंधरेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पाण्याचे महत्व सागंणारे गीत गाण्यात आले. तसेच डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिंनी माही गिराम यांनी पाण्याचे महत्त्व सांगितले. तसेच तेथील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पाण्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पाणी वापराबाबत जनजागृती करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा तसेच उप अभियंता कृषक कांबळे यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोकरे यांनी केले, तर आभार उप अभियंता कृषक कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, जलसंपदा विभाग, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment