16 April, 2025

सस्ती अदालतीच्या माध्यमातून पाणंद व शिवरस्त्याचे प्रश्न सोडवा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

• विभागीय आयुक्तांनी साधला “संवाद मराठवाड्याशी” अभियानातून गरजू शेतकऱ्यांशी संवाद हिंगोली, दि.16 (जिमाका): जिल्ह्यातील सर्वच पाणंद आणि शिवसस्ते व शेतरस्त्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दर पंधरा दिवसाला तालुकास्तरावर सस्ती अदालतीचे आयोजन करुन नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित यंत्रणेला संवाद मराठवाड्याशी अभियानातील ऑनलाईन वेबिनारमध्ये दिले. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यायातील गरजू नागरिक आपल्या शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी गरजू नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त (महसूल) खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, शुभांगी आंधळे आणि मराठवाड्यातून निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाच्या माध्यमातून सुरु झालेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मराठवाड्यातील शेतकरी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 'संवाद मराठवाड्याशी' या वेबिनारमधून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सुरुवातीला या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. उपायुक्त (महसूल) खुशालसिंह परदेशी खुशालसिंह परदेशी यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून शिवरस्ते, पाणंदरस्त्याची प्रकरणे निकाली काढण्यासाठीच हा उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले. यावेळी हिंगोली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते मोकळे करुन देण्याची मागणी केली. त्यावर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विभागातील सर्व 75 तालुक्याच्या ठिकाणी सस्ती अदालतीचे आयोजन करुन शिवरस्ते, पाणंद रस्ते, शेतरत्याचे प्रश्न सोडवण्यात येतील. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सस्ती अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित व नव्याने आलेल्या प्रकरणावर तातडीने निर्णय घ्यावेत आणि रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी गती द्यावी, असे सांगितले. तसेच त्यांनी मोकळे करण्यात आलेले रस्ते पक्के करण्यासाठी आमदार, खासदारांच्या सहकार्याने रस्त्याच्या मजबुतीची कामे करण्यात येतील, असे सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार व सस्ती अदालतीचे आयोजन करुन शेतरस्ते, पाणंद रस्त्याची शेतकरी, नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, तहसीलदार अश्विन माने उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment