03 May, 2025

चालू वर्षात जास्तीत जास्त पीक कर्जाचे वितरण करून वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 03 : सन 2024-25 या वर्षात पीक कर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे सर्व बँकांनी योग्य नियोजन करुन चालू वर्षात जास्तीत-जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन व बँकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेच्या बैठकीसाठी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमराज बनसोड, नाबार्डचे अविनाश लहाने, एसबीआय आरएसीसीच्या प्रमुख श्रध्दा जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण मोरे, विविध बँकेचे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर जलजीवन मिशनच्या बैठकीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, वॅपकॉस कंपनीचे जिल्हा समन्वयक जावेद मसूद उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, सन 2024-25 या वर्षात पीक कर्जाचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी सर्व बँकांनी चालू वर्षात जास्तीत जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पशुसवंर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगट यासह विविध योजनेतील उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावेत. तसेच आरसेटीने विविध विषयाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित कामगार तयार करावेत, असे निर्देश दिले. 'हर घर जल योजने'अंतर्गत महिनानिहाय घोषित करावयाच्या गावाची यादी तयार करा-जिल्हाधिकारी विंधन विहीर व पाण्याच्या टाकीसाठी ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने करावी. विहिरीला पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ वीज कनेक्शन घेऊन दहा दिवसात पाणी पुरवठा सुरु करावा. त्यासाठी महावितरण विभागाने आठ दिवसात तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही करावी. वैयक्तीक नळजोडणीचे काम ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण करावेत. जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. जलजीवन मिशन अंतर्गत 50 टक्क्यापर्यंत झालेली कामे ती तात्काळ पूर्ण करावेत. या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी दर 15 दिवसाला आढावा घ्यावा. सुधारित अंदाजपत्रक तयार केलेल्या गावांचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करावेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते पोलीस बंदोबस्त घेऊन कामे पूर्ण करावेत. तसेच हर घर जल योजनेअंतर्गत महिनानिहाय घोषित करावयाच्या गावाची यादी तयार करावे व त्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. ******

No comments:

Post a Comment