05 June, 2025

शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी डीएपीचा आग्रह धरु नये

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाच्या जवळपास 72 टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाखाली येत असून त्या खालोखाल तूर, हळद व कापूस इत्यादी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यामध्ये मे 2025 अखेर 16 हजार 900 मेट्रिक टन खतांचे आवंटन शासनाकडून मंजूर असून आतापर्यंत 16 हजार 27 मेट्रिक टन खत जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. म्हणजे जवळपास 95 टक्के खत पुरवठा झालेला असून आगामी आठ दिवसात आणखी खत उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात एकूण खताचा विचार केल्यास खताचा तुटवडा नाही. तथापि, सोयाबीन पिकवणारे शेतकरी डीएपी खताचा आग्रह धरत आहेत. सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 30 किलो पालाश या व्यतिरिक्त 20 किलो गंधकाची आवश्यकता असते. परंतु डीएपी खतामधून 18 टक्के नत्र व 46 टक्के स्फुरद हे दोनच मूलद्रव्य उपलब्ध होतात. त्यामधून सोयाबीन या पिकाला लागणारी सर्व मूलद्रव्ये उपलब्ध होत नाहीत म्हणून त्याकरिता पर्यायी खताचा वापर करावा. त्यामध्ये विशेषत: 20:20:0:13 अधिक एमओपी 12 : 32 : 16, 14 : 35 : 14 इत्यादी खताचा उपयोग केल्यास सोयाबीन पिकाची मूलद्रव्याची गरज भागते. तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकासाठी डीएपी खत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीतील माती परीक्षण करुन खताचा वापर करावा. जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी डीएपी खताचा आग्रह धरु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment