02 June, 2025

फळबाग लागवड करा, शासकीय अनुदान मिळवा !

• भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : मागील वर्षात 205 हेक्टर क्षेत्रावर लागवड हिंगोली (जिमाका), दि. 02 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील वर्षात 205 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. ही योजना राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने कृषी विभागामार्फत राबविली जात असून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळत आहे. उत्पन्न वाढीचा शाश्वत मार्ग आणि टिकाऊ शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांचा या योजनेमुळे विश्वास वाढत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बहुवार्षिक फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे हा आहे. या योजनेंतर्गत आंबा, पेरु, संत्रा, डाळिंब, काजू, नारळ, सीताफळ, आवळा, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू, कागदी लिंबू, मोसंबी आणि चिंच अशा 16 प्रकारच्या फळपिकांची लागवड करता येते. योजनेचे निकष : अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे. सातबारा संयुक्त खातेदारांच्या नावावर असेल तर सर्व खातेदारांचे संमतीपत्र अनिवार्य आहे. सातबारांवर कुळाचे नाव असल्यास त्यांच्या संमतीसह अर्ज करता येतो. संस्थात्मक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरत नाहीत. अर्ज कसा करावा : सर्वप्रथम महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यानंतर कृषी विभाग या पर्यायांतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवडावी. आवश्यक कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबूक, संमतीपत्र यांचा समावेश असतो. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करुन पोर्टलवर अपलोड करावीत. नंतर अर्ज पूर्ण भरुन ऑनलाईन सादर करावा आणि त्याची प्रिंट घ्यावी. अर्ज मंजूर झाल्यानंतर लागवड करुन शासकीय अनुदानासाठी अंतिम प्रस्ताव सादर करावा. या वर्षापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील फळ लागवडीचे क्षेत्र : संत्रा : जिल्ह्यात संत्रा हे सर्वाधिक पसंतीचे फळपीक ठरत आहे. हवामान, जमीन आणि सिंचन व्यवस्था लक्षात घेता संत्रा लागवडीसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्रमाणात 65.9 हेक्टर क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड केली आहे. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतीत नवा पर्याय मिळाला आहे. पेरु : हे फळ कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि देखभालीला सोपे असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात 32.10 हेक्टर क्षेत्रावर पेरुची लागवड केली आहे. पाणीटंचाई असलेल्या भागातही पेरुचे पीक चांगले येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सीताफळ : या फळांची बाजारात वर्षभर मागणी असल्यामुळे शेतकरी मिश्र पध्दतीने लागवड करत आहेत. यामुळे उत्पादन वाढीसोबत जोखीमही कमी होते आणि उत्पादनातील वैविध्य टिकून राहते. जिल्ह्यात सध्या 24.73 हेक्टरवर लागवड केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करुन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment