हिंगोली, दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध स्वच्छता, जनजागृती व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक केंद्रेकर, सामान्य प्रशासन विभागाचे सम्राट दिवानी, पाणी व स्वच्छता विभागाचे अभियंता नरवाडे, महिला व बालकल्याण विभागाचे बोराटे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
अभियानांतर्गत गावस्तरावर परिसर स्वच्छता, अस्वच्छ ठिकाणांची निवड करून स्वच्छता लक्ष युनिट्स (CTUs) अंतर्गत मॅपिंग व साफसफाई, तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी विशेष स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रम घेण्यात येणार आहेत.
सफाईमित्रांसाठी विशेष शिबिरे
‘सफाईमित्र सुरक्षा शिबिरां’च्या माध्यमातून सफाईमित्रांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सफाईमित्रांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, तालुकास्तरावर ‘डिग्निटी कॅम्प’ घेऊन वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम
अभियानाच्या कालावधीत ‘क्लीन ग्रीन उत्सव’ अंतर्गत पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ सुजल गाव’, कचऱ्यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फूड, प्लास्टिक संकलन केंद्रांची उभारणी आदी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
1 ऑक्टोबर रोजी महास्वच्छता अभियान
‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमांतर्गत दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी देशव्यापी श्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात जिल्ह्यातील गावपातळीवरील सर्व घटकांना सहभागी करून मोठ्या स्वरूपात उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विशेष ग्रामसभेत गावांची घोषणा
‘हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव’ तसेच ‘स्वच्छ सुजल गाव’ म्हणून गावांची घोषणा करण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत जास्तीत जास्त गावे या उपक्रमांत सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे शासनस्तरावरून सनियंत्रण करण्यात येणार आहे. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनावी, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.





No comments:
Post a Comment