*एसआयआर पडताळणीची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, दि. 10 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतींची कार्यवाही सुरू आहे. एसआयआर अंतर्गत मॅपिंग न झालेल्या तसेच मतदारांच्या नावांमध्ये विसंगती आढळलेल्या नोंदींची दस्तऐवजांच्या आधारे पडताळणीची कार्यवाही निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावी. यासाठी सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी आपापसांत समन्वय ठेवून पडताळणीसाठी प्राप्त कागदपत्रांची तात्काळ तपासणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
एसआयआर अंतर्गत दस्तऐवज पडताळणीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रगती चौंडेकर, संबंधित नोडल अधिकारी तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
एसआयआर अंतर्गत मतदार यादीतील नोंदींचे मॅपिंग करण्यासाठी यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आता मॅपिंग न झालेल्या मतदारांना नोटीस बजावून आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे. संबंधित मतदारांनी मागणी करण्यात आलेले आवश्यक पुरावे सादर करणे अपेक्षित आहे. प्राप्त कागदपत्रांची संबंधित यंत्रणांनी तातडीने पडताळणी करून ती निवडणूक शाखेकडे सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
या कामासाठी संबंधित यंत्रणांनी आपल्या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच एसआयआर पडताळणीसाठी स्वतंत्र ई-मेल तयार करून त्या ई-मेलचा पत्ता आणि नियुक्त नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक निवडणूक शाखेच्या ई-मेलवर तात्काळ पाठवावा. पडताळणीची संपूर्ण कार्यवाही परस्पर समन्वयाने व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
हिंगोली जिल्ह्यात एसआयआर अंतर्गत सुमारे 36 हजार मतदारांच्या नोंदींची पडताळणी करावयाची आहे. या मतदारांना नोटिसा बजावून आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. प्राप्त कागदपत्रांची 48 तासांच्या आत पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे तसेच मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी जबाबदारीने व समन्वयाने कार्यवाही करावी. निर्धारित कालमर्यादेत पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
No comments:
Post a Comment