20 February, 2025

हळदीला बाजारात चांगले दर मिळण्यासाठी हळदीतील बलस्थानांवर लक्ष केंद्रित करावे - पालक सचिव रिचा बागला

* पालक सचिव रिचा बागला यांनी घेतला विविध विभागाचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 20: हळदीवर प्रक्रिया उद्योगात वाढ करून हळदीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रयत्न करता येतील. येथील हळदीला बाजारात चांगला दर मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने हळदीतील बलस्थानांवर लक्ष्य केंद्रित करावे, असे पालक सचिव रिचा बागला यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला यांनी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामाची सद्यस्थिती व कामावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, महेश सावंत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी श्रीमती बागला यांना उपविभागीय कृषि अधिका-यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, हळद आदी प्रमुख पिक लागवडीखालील क्षेत्र व होणारे उत्पन्न याची माहिती दिली. वसमत येथे स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रांतर्गंत प्रयोगशाळा आणि अनुषंगिक बाबींचे काम सुरू आहे. हळदीवरील प्रक्रिया उद्योगात वाढ करून हळदीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रयत्न करता येतील, असे श्रीमती बागला यांनी सांगितले. प्रधानमंत्री लघु, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थींना सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभागाने बँकेसोबत विशेष शिबिरांचे आयोजन करावे. शेतकरी सहायता गटांचा सहभाग वाढविण्यासाठी बँका आणि कृषि विभागाने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील शेतकरी सहायता गटांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सरासरी दूध उत्पन्न हे मध्यम स्वरुपात आहे. त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात 50 हजार 959 लिटर दुधाचे संकलन आहे. जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात वृद्धी करण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश पालक सचिव श्रीमती बागला यांनी दिले. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 11 प्रकल्पावर काम सुरू असून, 2 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 3 प्रकल्पाचे काम सुरू आहेत, उर्वरित कामाबाबत अधिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 'निपुण हिंगोली'वर पालक सचिवांकडून कौतुकाची थाप जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'निपुण हिंगोली'वर नोव्हेंबर 2024 पासून सुरू केलेल्या कामाबाबत पालक सचिवांना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी माहिती दिली. तसेच या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अनुकूल बदल दिसून येत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. त्यावर पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांनी शिक्षण विभागाने चांगला पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले व हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यासाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करुन वेळोवेळी शाळांना भेटी देऊन तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून 4 योजनांचे 2031 जणांना प्रशिक्षण दिले आहे. मागील तीन वर्षात प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी सध्या काय काम करत आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती देण्यास पालक सचिवांनी सांगितले. जल जीवन मिशनची पूर्ण झालेली कामे प्रमाणिकरण करुन हर घर नल से जल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. महाडीबीटी योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी व बँकेच्या सहकार्याने गावात शिबीरे घेऊन चांगले शेतकरी लाभार्थी निवडून त्यांना लाभ द्यावा. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्यस्तरावर प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात येईल. एनसीडी, तपासणी, हायपरटेंशन, डायबेटीस, कँन्सर अशी आजारनिहाय तपासणी केली जात असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील रुग्णांच्या सोईसाठी मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांनी विशेष स्वच्छता मोहिमेतून शहरी भाग परिसरात स्वच्छता ठेवावी. पुढील महिन्यात जिल्हा दौ-यावर येणार असून, त्यावेळी परिस्थितीत बदल दिसून आला पाहिजे, असे पालक सचिव श्रीमती बागला यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी पोलीस विभाग, प्रधानमंत्री पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय (स्मार्ट प्रकल्प), पशुसंवर्धन विभाग, सिंचन विभाग, जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र वीज वितरण मंडळांतर्गंत राबविण्यात येणाऱ्या योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन स्थळांचा विकास करणे, जिल्हा घनकचरा व्यवस्थापन यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच चालू वर्षाचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी, तसेच उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयातून काम करणारी लिगो देशातील तिसरी प्रयोगशाळा असून, यासाठी 2600 कोटी रुपयांचा खर्च निधी अपेक्षित आहे. ही इंग्रजीतील एल आकारात उभारण्यात येणार आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. यामध्ये 100 विद्यार्थ्यांची पहिली बँच सुरू झाली आहे. 403.89 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन वर्षात इमारत बांधकाम पूर्ण कऱण्यात येईल. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी 100 बेडचे स्त्री रुग्णालय बांधण्यात येणार असून, 4243.65 कोटीचा निधी अपेक्षित आहे. तर 50 बेडचे हार्ट सर्जरीसाठी रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्याचा सविस्तर आढावा सादरीकणाव्दारे दिला. यावेळी संबंधित विभाग प्रमुखांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती पालक सचिवांना दिली. या बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment