14 February, 2025
अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी अधिक वृद्धिंगत होण्यास मदत
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा येथे येत्या 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आहेत. तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते, तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच साहित्य संमेलन होत असून, राजधानी दिल्ली होत असल्यामुळे भाषेची थोरवी, महती, व्याप्ती, प्रचार-प्रसार व्यापक प्रमाणावर होण्यास मदतच मिळणार आहे. संत ज्ञानेश्वरांनीही या भाषेची महती सांगताना माझा मराठीची बोलु कौंतुके! परि अमृतातेहि पैजासी जिंके ! ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ! असे वर्णन केले आहे. तर कविवर्य सुरेश भट ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ अशा शब्दांमध्ये मराठी भाषेला आपली माय मानतात.
महाराष्ट्राची राजभाषा आणि मातृभाषाही मराठीच आहे. अगदी प्राचीन कालखंडापासून विविध ग्रंथात, शिलालेखात मराठीचा उल्लेख होतो आहे. सातवाहन साम्राज्याच्या कालखंडातून मराठी भाषेची साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली. सतरावा सातवाहन राजा हाल याच्या ‘गाथासप्तशती’ हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी भाषेला मोठी देणगी लाभली आहे.
आठ पुस्तके प्रकाशित असणारे ज्येष्ठ साहित्यिक कलानंद जाधव यांनी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून, समस्त मराठी भाषिकांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगून ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे हा दुग्ध-शर्करा योग असल्याचे श्री. जाधव मानतात. तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने तो दर्जा दिला आहे. त्यामुळे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मराठी भाषा मुळातच प्रगल्भ भाषा आहे. श्रीमंत भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती एका ओवीत सांगितली असल्याचे सांगून, ते म्हणतात की ‘साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे’ किती सुंदर, संत ज्ञानेश्वरांनी मराठीची तुलना अमृतासोबत केली असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक कलानंद जाधव सांगतात.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला थोडासा अवधी लागल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरीही मराठी भाषेची थोरवी आणि तिची महती जगभर पसरली. या अनुषंगाने मराठी भाषेचे बरेच संशोधक संशोधन करतील. त्यामध्ये नवनव्या संकल्पनांची भर घालतील. मराठी भाषेला अधिक वृद्धिंगत करताना मदत मिळणार आहे. त्यामुळे आम्ही मराठी भाषिक केंद्र आणि राज्य शासनाने आभारी असल्याचे श्री. जाधव सांगतात.
हिंगोलीतील ‘उमलत्या कळ्या’च्या लेखिका तथा कवयित्री जया करडेकर या सांगतात की, महाराष्ट्र ते मराठी असा मराठी भाषेचा किमान दोन हजार वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त असा प्रवास आणि तब्बल 10 ते 12 प्रचलित भाषांमध्ये गणली जाणारी मराठी भाषा आहे. महाराष्ट्रात राहणारे नागरिक मराठी भाषेतून व्यवहार करतात. मराठीतून बोलतात. मराठी भाषा हीच महाराष्ट्रीयन लोकांची ओळख आहे. अशी ही मराठी भाषा महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे. राज्यात वाढत चाललेल्या मराठी भाषेच्या प्रदेशात इंग्रजी भाषेच्या शाळांचे पेव फुटत चालले आहे. त्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मराठी भाषा लोप पावत चालली की काय, अशी शंका येत असतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केंद्र शासनाने केल्याचे सांगून श्रीमती करडेकर केंद्र व राज्य शासनाचे मन:पूर्वक आभार मानतात.
त्याच अनुषंगाने 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीच्या दत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा येथे 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल सरहद आणि राज्य शासनाचे त्या आभार मानतात. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे सांगून दिल्ली येथील साहित्य संमेलानात जास्तीत जास्त साहित्यिक, कवी कवयित्री, साहित्यप्रेमी, वाचकांनी सहभागी होण्याचे आवाहन कवयित्री जया करडेकर यांनी केले आहे.
- प्रभाकर बारहाते, जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
No comments:
Post a Comment