13 February, 2025

अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलनाची स्थिती-गती

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात तिथे वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांनी केवळ मराठी वरची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी 2025 मध्ये हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 21, 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केले आहे. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी भाषा प्रेमिकांचे अभिनंदन केले पाहिजे, स्वागत केले पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होताच दिल्लीकरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. योगायोगाची
एक गोष्ट अशी की, यावेळी संमेलनाध्यक्ष श्रीमती डॉ. तारा भवाळकर आहेत, तर उद्घाटक म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पहिला प्रसंग असा की, 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांनी अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित केले होते. 1954 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाच-सहा वर्षानंतर संमेलन घेतले तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री संमेलन अध्यक्ष होते, तर तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू उद्घाटक या नात्याने उपस्थित होते. भाषेच्या गौरवार्थ उत्सव साजरा करण्याचे श्रेय महाराष्ट्रातील पण तिथे वास्तव्य करणाऱ्यांकडे जाते. इतर कोणत्याही भाषा प्रेमिकांनी असा भाषा गौरव आयोजित केल्याचे आठवत नाही, वाचनात नाही. 1960 मध्ये महाराष्ट्र मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. मराठी भाषेचा गौरव, उत्सव महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत असत. शेकडो वर्षांपासून हिंदी, इंग्रजी, फारशी, उर्दू इत्यादी भाषांची मराठी भाषेवर आक्रमणं होत राहिली. त्या त्या भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाली. अर्थात हे भाषेचे अवजारे आहेत. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यासाठी चळवळी उभ्या राहिल्या. अंदाजे 1954 ते पुढील तीन-चार वर्ष भाषा शुद्धीकरणाचा एक प्रयोग स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केला. मराठीत सहज आलेल्या 500 शब्दांना त्यांनी मराठीतील नावे दिली, जसे हेअर कटिंगसाठी केशकर्तनालय, मेयरसाठी महापौर इत्यादी. महाराष्ट्राने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले नाही. मागील अनेक शतकांपासून भाषा जोपासली. बाराव्या शतकात श्री चक्रधरांनी मराठीतून पंथ प्रसार केला. मराठीतून ग्रंथरचना केली. श्री संत ज्ञानेश्वर यांनी मराठीला प्रमाण मानले. शिवछत्रपतींनी राज्य व्यवहार कोश मराठीतून लिहिला. खरे तर आठव्या शतकापासूनचे पुरावे उपलब्ध आहेत. भाषा शुद्धी भाषा मूल्य भाषा संशोधकांच्या अनेक पिढ्या केवळ मराठी संबंधाने संशोधनात गुंतलेल्या आहेत. ही परंपरा श्री. म. माटे ते श्री गणेश देवी पर्यंत आहे. भाषेला अभिजात दर्जा देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आणि त्या-त्या प्रदेशातील भाषा तज्ञांनी भाषेच्या संबंधाने मौलिक पुरावे सादर केले. मराठी भाषेतील थोर विचारवंतांनी अविरत काम केले. केवळ तांत्रिक प्रतिशब्द न आढळल्याने वीस वर्षानंतर हा बहुमान प्राप्त झाला, सरकारला धन्यवाद दिलेच पाहिजे. यापुढे भाषा तज्ञ व भाषा विचारवंतांवर खूप नव्या जबाबदाऱ्या आल्या आहेत. प्रमाण भाषेबरोबरच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवण्याची व नामशेष शब्द वाक्प्रचार नामे संशोधन करावे लागणार आहेत. पौराणिक व ऐतिहासिक भाषा समृद्धी पुढील पिढ्यांना कळावी हा एक उद्देश आहे. बोलीचे शब्दकोश आणि व्याकरण तयार करावे लागेल. बालवाडी ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा अभ्यास अनिवार्य करणे, प्रमाण मराठी आणि बोलीभाषांचा अनुबंध अभ्यासावा लागेल. बोलीचे वाङग्मयीन व सांस्कृतिक महत्त्व आणि सामान्य ज्ञानात अभिरुची निर्माण करणे, विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्था चालकात मराठी भाषेसंबंधात जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणात सर्वच ठिकाणी भाषा व संस्कृतीवर विपरीत परिणाम झालेला आहे. भाषा जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी साहित्य परिषदा भाषा संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे मराठी साहित्य संमेलनाला 135 वर्षाची परंपरा आहे. त्याच्या साहित्य परिषदा, भाषा उत्सवासह भाषेसंबंधाने रचनात्मक कार्य करीत आहेत. मराठी भाषिक आणि वाङमयीन संस्कृती जपण्याचे त्या संस्थांचे कार्य आहे. कार्य सार्वजनिक स्वरुपाचे असल्यामुळे उद्दिष्ट कृतीस कमी अधिक वेळ लागतो. शिवाय परिषदांचे सदस्य उपक्रमशील असावे लागतात. विशेषतः मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य चांगलं आहे. वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करणे, दरवर्षी साहित्य संमेलने भरवणे, नव्या जुन्या साहित्यिकांना बोलवून भाषा संबंधाने मूलभूत बाबींवर विचार करणे व कृतिशील उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. भाषेकडे सर्व दिशातून प्रचंड उदासीनता आहे, असे मुळीच नाही. भाषेवर मराठी माणसाचे जीवापाड प्रेम आहे. इंग्रजीचे प्राबल्य ही उपजीविकेशी संबंधित बाब आहे. एक गोष्टी साधी आहे, जो समाज मातृ भाषेची उपेक्षा करतो तो समाज कधीही ज्ञान निर्माता होऊ शकत नाही. काही मार्ग खुंटले होते, हे खरे आहे. परंतु मराठी भाषेला आपल्या भाषेचा पूर्ण अभिमान आहे. अभिजात दर्जा तांत्रिक बाब असली तरी नवी चेतना भाषा रसिकात निर्माण झाली, हे नाकारता येत नाही. राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. मराठी भाषेसाठीची चळवळ नव्याने गतिमान होणे गरजेचे आहे. मराठी महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा आहे. ती आपला सांस्कृतिक चेहरा आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सर्वांना माहीत आहे. खरे तर ती सर्वात मोठी भाषा केंद्री चळवळ होती. 1946 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन संमेलनाध्यक्ष ग. त्र्य. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला होता. त्या वेळचा मुंबई भाग, मध्य प्रांत, हैदराबाद संस्थान या भागात विखुरलेल्या सर्व मराठी बांधवांना एकत्र आणण्याचा तो एक प्रभावी चेहरा होता, उद्देश त्यामागे होता. हे व्यापक जन आंदोलन 1950 ते 60 पर्यंत चालू होते. एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, माधवराव बागल, नाना पाटील आणि यांच्यासोबत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील अशी असंख्य कलावंत मंडळी होती. अनेकांना तुरुंगवास झाला. पुढे 1960मध्ये मराठी भाषिकांचा महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात आला. तेव्हाच मराठी राजभाषा झाली. इंग्रजी भाषेचा प्रभाव महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी मराठी शाळा बंद करण्यापर्यंत मजल गेली, हे दुर्दैव आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे व तो टिकवून ठेवण्यासाठी सामान्य माणसापासून ते राजकीय धुरंधरांना प्रयत्न करावा लागणार आहे. प्रत्येक जाणकाराने भाषाशास्त्र समजून घ्यायला हवे. अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अभिप्रेत असलेली भाषा शिकण्यास व सराव करण्यास शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाषा संदर्भात भाषेची गोडी लावण्यासाठी सुलेखन वर्ग, बालवाचक मिळावे, भाषण स्पर्धा, ग्रंथालयांची भूमिका नवी प्रेरणा देण्यात उपयुक्त ठरेल. निबंध लेखन, आवडलेल्या पुस्तकाचा सारांश, परिसंवाद, पुस्तक सहवास, व्याकरण, शुद्धलेखन यासारखे उपक्रम प्रत्येक म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळातून सुद्धा राबविले पाहिजे. प्रमाण भाषेचे सौंदर्य लेणं ठरणाऱ्या बोलीभाषांचे जतन आणि समर्थन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गरज आहे. सर्व स्तरावर जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले पाहिजे. खूप काही मुलांच्या सहज लक्ष देऊ शकते, प्रयत्न हवेत. शेवटी मराठी आपली माय मराठी आहे. मातृभाषा आहे. *- अशोक अर्धापूरकर, अध्यक्ष- मराठवाडा साहित्य परिषद- शाखा हिंगोली* अंतुले नगर, हिंगोली, मो.9689233324

No comments:

Post a Comment