15 April, 2025
अंभेरी साठवण तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार - अनिल माचेवाड
* जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन व जलपूजन संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 15 : अंभेरी साठवण तलाव हा सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून पूर्ण केला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये या तलावाअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. आता मात्र अंभेरी तलावातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने त्यांच्याही उत्पन्नात वाढ होत हा तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी केले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने अंभेरी साठवण तलाव परिसरात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन व जलपूजन आज अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते जिल्ह्यातील तीनही मुख्य नद्यांतील (पूर्णा, कयाधू व पैनगंगा) पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे, कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, उगमचे जयाजी पाईकराव, खानापूर चित्ताच्या सरपंच श्रीमती सुनंदाबाई वाघमारे, अंभेरीचे सरपंच रामेश्वर ठोके, विठ्ठलराव चौतमल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अधीक्षक अभियंता श्री. कचकलवार यांनी 15 ते 30 एप्रिल, 2025 या पंधरवाड्यात दररोज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तर इतर उपस्थित मान्यवरांनी पाण्याचा योग्य वापर करून तलावातील पाणी जलसंपदा विभागामार्फत रितसर परवाना प्राप्त करूनच वापरण्यात यावे. तसेच सर्वांनी पाण्याचे महत्व ओळखून पाण्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमास परिसरातील शेतकरी तसेच जलसंपदा विभाग, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment