09 July, 2026

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ९२ विद्यार्थ्यांची टुडी-इको तपासणी * १८ विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड





हिंगोली (जिमाका), दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे आज टुडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्यातील ९२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १८ विद्यार्थ्यांची मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.

हे शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. ही तपासणी ठाणे येथील केआयएमएस हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल., तसेच विजय खरात व उल्हास पाटील यांनी केली.

या शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील नवजात शिशु विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडुळे, डॉ. स्नेहल नगरे, सहाय्यक मेट्रन श्रीमती जोशी आदी उपस्थित होते.

हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील १०० संशयित विद्यार्थ्यांपैकी ९२ विद्यार्थ्यांची टुडी-इको तपासणी करण्यात आली. त्यामधून १८ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केआयएमएस हॉस्पिटल, ठाणे येथे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरजू बालरुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरबीएसकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अधिपरिसेविका, परिसेविका, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, डीईआयसी व्यवस्थापक डॉ. संतोष नांदूरकर, ज्ञानोबा चव्हाण, राजेंद्र खंदारे, ब्रदीनाथ शेळके तसेच आरबीएसके व डीईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, एएनएम, कार्यालयीन कर्मचारी आणि रुग्णालयातील परिचारिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास वेळेत टुडी-इको तपासणी करून आजाराचे लवकर निदान करून घ्यावे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

****

No comments:

Post a Comment