21 January, 2025

आखाडा बाळापूर येथील ग्राम बाल संरक्षण समितीच्या बैठकीत बाल कायद्याविषयी मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे ग्राम बाल संरक्षण समितीची पुनर्गठन मार्गदर्शन बैठक दि. 20 जानेवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीत गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी व ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्या 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतींची बाल मित्र म्हणून निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 ची माहिती देण्यात आली. यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे 21असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात. अशा गुन्ह्यास एक लाख रुपय दंड व 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते, असे सांगत बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयीची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) जरीबखान पठाण व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोबर, 2022 रोजी दिलेल्या अधिसूचनेनुसार ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घ्यावी. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची नोंद करुन ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे माहिती देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे लग्न ठरलेले आहे, त्यांच्या वयाची पडताळणी करुन त्यापैकी कोणी अल्पवयीन आहे का ? याची शहानिशा करण्याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी पुनर्गठन समितीचा ठराव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस गावातील सरपंच भिमाबाई नरवाडे, ग्राम पंचायत सदस्य आशाताई उघडे, गावातील शाळांचे मुख्याध्यापक आर. एन. भुरके, ए. एच. सुरवसे, सुरेश पांचाळ, हाश्मी सय्यद फसीयोद्दीन, शालेय समिती अध्यक्ष एन.डी. कन्नावार, शेख नाजिल लतिफ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment