26 November, 2025
संविधान दिन व समता रॅली उत्साहात साजरी • “घर घर संविधान” उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
हिंगोली(जिमाका), दि. 26: भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी हिंगोली येथे संविधान दिन व समता रॅलीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळी 8 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून समता रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, विशेष अधिकारी (शानिशा) अमोल घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
या रॅलीत सरजुदेवी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहापर्यंत काढण्यात आली.
यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात संविधान दिन कार्यक्रम व संविधान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा उद्देशिकेची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी सरजुदेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून संविधान गीताचे सामूहिक सादरीकरण तसेच संविधान आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पठाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती वर्षा घुगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच बार्टी समतादूत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
******





No comments:
Post a Comment