03 August, 2026

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करावेत

 

·         शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 3 : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी या प्रणालीवर आवश्यक कार्यवाही करून शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

महाडीबीटी 2.0 प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध जागांवर आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी योजनांचे अर्ज ऑनलाइन भरता येणार आहेत.

 

विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही

 

महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम नवीन महाडीबीटी तयार करणे आवश्यक आहे. यासाठी मागील पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्डची आवश्यकता राहणार नाही. आधार क्रमांकात आवश्यकतेनुसार बदल असल्यास नवीन महाडीबीटी तयार करताना आधार क्रमांकाद्वारे नवीन महाडीबीटी तयार करावा.

विद्यार्थ्यांनी नवीन महाडीबीटी तयार करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करून पोर्टलवर स्वतःची माहिती, जसे की पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल तसेच बँक खात्याची माहिती अद्ययावत करावी. आवश्यक कागदपत्रे, जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रे यांची माहिती भरावी.

नवीन व नूतनीकरण अर्जासाठी नवीन महाडीबीटी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन करून अर्ज नूतनीकरण करणे ही विशिष्ट टप्प्यांची बाब असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

 

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा ?

 

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलचा वापर करून ऑनलाइन अर्ज करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस पोर्टलवर लॉगिन करून नोंदणीसाठी ‘नवीन महाडीबीटी नोंदणी’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर आधार संलग्नित मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे अद्ययावत केल्यानंतर लॉगिन करता येईल.

लॉगिननंतर पात्र योजनांची माहिती अद्ययावत केल्यानंतर विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होईल. त्यानंतर निवडलेल्या योजनेसमोरील ‘Apply’ टॅबवर क्लिक करून अर्ज भरावा. अर्जाची ऑनलाइन पडताळणी केल्यानंतर अर्जाची प्रत डाउनलोड करून प्रिंट जतन करून ठेवावी.

 

महाविद्यालयांचीही महत्त्वाची जबाबदारी

 

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या शिक्षण शुल्कापोटी कोणतेही शुल्क घेऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

महाविद्यालयाने आपल्या संस्थेचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमानिहाय प्रवेश क्षमता तसेच महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचे मान्यतेचे विविध आदेश, शुल्क रचना आदी माहिती महाडीबीटी पोर्टलवर भरण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणांकडून प्रमाणित करून घ्यावी.

तांत्रिक अथवा अभ्यासक्रमाशी संबंधित अडचणी असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देय असलेली निर्वाह भत्ता व इतर शिष्यवृत्ती योजनांची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

महाडीबीटी २.० प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

 

******

महसूल विभागाच्या कार्यक्षमतेमुळे प्रशासनात विश्वासार्हता निर्माण – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

  

·         आरटीएस व विशेष सखोल पुनरीक्षणात हिंगोली जिल्ह्याची राज्यात उल्लेखनीय कामगिरी

·         उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

 


हिंगोली (जिमाका), दि. 3 :
महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्त्वाचा कणा असून, विविध प्रश्न व जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता या विभागात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्येक जबाबदारी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा करून हिंगोली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतही जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजूषा मूथा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरवदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून येणाऱ्या अडचणींवर मात करावी. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांनी भविष्यातही हिंगोली जिल्ह्याची कामगिरी राज्यासाठी आदर्श ठरेल, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच महसूल कर्मचाऱ्यांसाठी महसूल वसाहत उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालये सुसज्ज व अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

 

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनामध्ये क्षेत्रीय स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या चांगल्या कामाचे श्रेय शासनाला मिळते. काम करताना अनेक संकटे व अडचणी येतात; मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या अडचणींवर मात केल्यास यश निश्चित मिळते. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले विचार प्रगल्भ ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्याने आरटीएस तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत केलेली उत्कृष्ट कामगिरी कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेनेही ‘सेवाकर्मी’ तसेच ‘आयगॉट’ अंतर्गत कर्मयोगी भारत पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

पुरस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढते – पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा

 

पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल महसूल दिनाच्या माध्यमातून घेतली जाते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन असून, त्यामुळे काम करण्याची ऊर्जा द्विगुणित होते. पुरस्कार प्राप्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवावी. तसेच पुरस्कार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी निराश न होता अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

महसूल विभागाने प्रतिष्ठा जपण्याचे काम केले – अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे

 

अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे म्हणाले की, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आरटीएस आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात अग्रक्रम मिळविला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनातून, प्रामाणिक पाठपुराव्यामुळे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे.

‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आलेली भरतीही पारदर्शक व निरपेक्ष पद्धतीने पार पाडण्यात आली. निष्काम भावनेने काम करणारा कर्मचारी हा खऱ्या अर्थाने महसूल रत्न ठरतो. महसूल विभागाने आपली प्रतिष्ठा जपण्याचे काम केले असून, हे यश संपूर्ण महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आहे. जनतेला न्याय देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल विभाग पार पाडत आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले, तर सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांनी केले.

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, लघुलेखक कैलास मठपती, सहायक महसूल अधिकारी अनिल पाथरकर, मंडळ अधिकारी आशा गिते, महसूल सहायक रविंद्रकुमार मस्के, ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे, वाहनचालक मारोती सिरसाट, शिपाई पवन यादव, महसूल सेवक केशव पलटनकर आणि पोलीस पाटील तरन्नूम शेख यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****** 






जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

 



हिंगोली (जिमाका), दि. 3 :  थोर स्वातंत्र्यसेनानी  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह  प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

******

शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये; कर्जमाफीचा लाभ मिळणारच – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तातडीने काढून घ्या; बँकेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. 3 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी. फार्मर आयडीशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तलाठ्याशी संपर्क साधून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

ॲग्रीस्टॅक नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात येईल. तसेच मयत खातेदारांच्या नातेवाईकांनी वारस नोंदीसाठी आवश्यक फेरफार नोंद करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून आपल्या कर्ज खात्याशी संबंधित तपशील तपासून खात्री करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नये. बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी शेतकऱ्यांनी सौजन्याने व सहकार्याने वागावे. बँक अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यास अथवा काही अडचण निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबतची आवश्यक माहिती, प्रक्रियेचे टप्पे तसेच संबंधित बँकांचे हेल्पलाईन क्रमांक बँक शाखांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.


सीबील स्कोअरबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये


कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही किंवा सीबील स्कोअरमध्ये लाभ मिळणार नाही, अशा स्वरूपाची कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्णयानुसारच कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करणारी माहिती देत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

तसेच दि. 30 सप्टेंबर 2021 पूर्वीची तसेच सन 30 सप्टेंबर, 2025 पर्यंतची कर्जमाफी संदर्भातील शासनाची भूमिका व स्पष्टीकरण स्पष्ट आहे. पात्रतेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शासनाकडून भरण्यात येणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जाची रक्कम असल्यास शासनाच्या नियमानुसार अतिरिक्त रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे किंवा अनावश्यकपणे बँकांमध्ये गर्दी करण्याचे कारण नाही.

कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार, अडचण किंवा शंका असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, शेतकऱ्यांनी संयम राखून शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

******



01 August, 2026

विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोलीच अव्वल

 


* मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात ८९.९७ टक्के काम पूर्ण



हिंगोली (जिमाका), दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात ८९.९७ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता वसमत मतदारसंघात ९०.२८ टक्के, कळमनुरी मतदारसंघात ९०.४४ टक्के आणि हिंगोली मतदारसंघात ८९.२२ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. या कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.

विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत मतदारांच्या नोंदींची पडताळणी करून त्यासंदर्भातील अर्जांचे संगणकीकरण करण्याचे काम जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. तहसील प्रशासन, निवडणूक शाखा, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

या प्रक्रियेत जिल्ह्यातील मतदारांनी दिलेल्या सहकार्याचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अर्जांच्या संगणकीकरणाचे काम वेगाने पूर्ण होत असून हिंगोली जिल्ह्याने राज्यातील आपली आघाडी कायम राखली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या मतदारांचे अभिनंदन केले आहे. उर्वरित कामही अचूकता, गुणवत्तेला प्राधान्य देत निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

*******

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन

 




हिंगोली (जिमाका), दि. 01 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****