01 April, 2026

 'दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत


मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. प्रशासन, विकास आणि लोकसहभाग यांचा समतोल साधत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी आणि नियोजनावर या मुलाखतीत सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.


'दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, दि. २ आणि शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ऐकण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. निवेदक संजय पाटोळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


मुलाखतीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची सकारात्मक व दूरदृष्टी मांडली. विविध शासकीय योजनांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्ह्यात महसूल अभियान, आरोग्यविषयक मोहिमा, सिंचन प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या कामांद्वारे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

याशिवाय पर्यटन विकास, शेती क्षेत्रातील नव्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती तसेच महिला स्वयंरोजगारासाठी स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

000 



31 March, 2026

विविध कृषी पुरस्काराचे अर्ज सादरीकरणास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि.31 : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात येतो.

यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो.

यापूर्वी हे पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र, प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेत होणारा विलंब तसेच शेतकऱ्यांना होणारा खर्च लक्षात घेता ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध करण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत.

प्रणालीद्वारे अर्ज सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून यामुळे कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढणार आहे.

सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीचे हे पहिले वर्ष असल्याने तसेच अर्जासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने काही अर्ज प्रलंबित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त मागण्यांचा विचार करून कृषी विभागाने अर्ज सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार, सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता दि. 15 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

*******

थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी ७ एप्रिल रोजी लॉटरी प्रक्रिया

 


हिंगोली (जिमाका), दि. 31: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय हिंगोली यांना सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेअंतर्गत ३० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

या योजनेअंतर्गत एकूण १११ अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी ७२ अर्ज पात्र तर ३९ अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र अर्जदारांमधून लाभार्थी निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) करण्यात येणार आहे.

यासाठी अपर जिल्हाधिकारी, हिंगोली तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

या लॉटरी प्रक्रियेदरम्यान संबंधित पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.

********

हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची ‘डिजिटल शेतीशाळा’ : 1 एप्रिल रोजी पहिले सत्र

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा हा अभिनव व तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे पहिले सत्र दि. 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती व मार्गदर्शन मोबाईलद्वारे थेट घरापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या गावातच मोबाईलच्या माध्यमातून या शेतीशाळेत सहभागी होऊ शकणार आहेत.

 

सत्र 1 चा विषय : पेरणीपूर्व तंत्रज्ञान

या पहिल्या सत्रात हवामान अनुकूल पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून  यामध्ये बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया आदी विषयांचा समावेश असणार आहे.

ही डिजिटल शेतीशाळा युट्यूब (YouTube) माध्यमातून थेट (LIVE) प्रक्षेपित केली जाणार असून शेतकरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग,  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा),  पाणी फाऊंडेशन,  उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान या अधिकृत चॅनेलवरून सहभागी होऊ शकतात.

राज्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, कृषीताई, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं सहाय्यता गट तसेच ग्रामीण महिला बचत गट यांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधितांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

 

*****

एप्रिलमध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ : सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली असून उत्पादन खर्चही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येत आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे व प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी यंत्रणांचा सक्रिय सहभाग आहे. या अभियानांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येत आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल 2026 महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून विविध पिक पद्धतींसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शेती शाळांमध्ये कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांमार्फत ज्ञानाचे आदान-प्रदान होणार आहे.

 

शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय पुढीलप्रमाणे :

* शेतीशाळा 1 (1 एप्रिल 2026) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे, बेडवर टोकण, शून्य/कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया.

* शेतीशाळा 2 (8 एप्रिल 2026) : जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे.

* शेतीशाळा 3 (15 एप्रिल 2026) : एकात्मिक कीड व्यवस्थापन – सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन, लिंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर.

* शेतीशाळा 4 (22 एप्रिल 2026) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र – थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत व यांत्रिकी लागवड पद्धती.

सर्व शेतीशाळा नमूद तारखांना सायंकाळी 7.30  वाजता सुरू होणार असून कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन व उमेद यांच्या युट्यूब (YouTube) चॅनेलवरून थेट प्रक्षेपण (LIVE) करण्यात येणार आहे.

शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बीज उत्पादक, तसेच फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी गट व वनपट्टाधारक यांनी मोठ्या संख्येने या डिजिटल शेती शाळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभाग व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे.

*******

30 March, 2026

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा

 

रोजगार निर्मितीत हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, स्थानिक रोजगार निर्मिती, आजारी उद्योग पुनर्वसन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत डीएलटीपीसी सभा तसेच निर्यात प्रचालन सभा आदींचा समावेश होता.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी तसेच उद्योजक संघटनेचे श्री. मामडे, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रवीण सोनी, अतुल बेरळीकर, नितीन काबरा, केशव काबरा आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सहकारी औद्योगिक वसाहती तसेच एमआयडीसीमधील पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1000 प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 838 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून या कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच जिल्हा उद्योग केंद्राला देण्यात आलेले 600 प्रकल्पांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांनी विविध योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. शेवटी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*******





मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सर्व विभागाकडून सत्कार.

 


हिंगोली (दि. 30 ) महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी '१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम' अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात आला असून, हिंगोली जिल्ह्याने यामध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद येथील सभागृहातील आयोजित एका बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार सर्व विभाग प्रमुखा मार्फत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) विजय बोराटे, उपशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के प्राथमिक शिक्षण अधिकारी आशावरी काळे आदी अधिकारी उपस्थित होते

******

बालमृत्यू रोखण्याला आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रतिपादन

 



​हिंगोली (दि. ३०): "जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचा जीव वाचविणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने आणि सूक्ष्म नियोजनाने काम करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

​हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित 'बालमृत्यू अन्वेषण'संदर्भात विशेष बैठकीत ते बोलत होते.

​सामाजिक व संस्था स्तरावरील मृत्यूंचे सखोल अन्वेषण

​जिल्ह्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ८८ बालमृत्यूंपैकी, सामाजिक स्तर आणि संस्था स्तरावरील ६ बालमृत्यूंच्या प्रकरणांचे सविस्तर अन्वेषण या बैठकीत करण्यात आले. त्यापैकी सामाजिक स्तरावरील ३ विशेष प्रकरणांवर बालमृत्यू समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली.

​यावेळी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक प्रकरणाचा तांत्रिक आणि सामाजिक आढावा घेतला. बालक दगावण्यामागील नेमकी कारणे, उपचारांतील उणीव, किंवा कुटुंबियांना वेळेत मार्गदर्शन मिळाल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

​भविष्यात असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात यावा 

​वेळेत उपचार: जोखमीच्या मातांची वेळेत ओळख पटवून त्यांना तातडीने योग्य संदर्भ सेवा देण्यात यावी.

​प्रत्येक मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून त्या-त्या भागात विशेष प्रतिबंधात्मक  उपाययोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने 'जीव वाचविण्याचे' आपले मूळ उद्दिष्ट समोर ठेवून काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. दि

दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलेजा कुप्पास्वामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, मनिषा वडकुते कार्यक्रम सहाय्यक मुनाफ शेख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका व आरोग्य सेविका उपस्थित होते.

**

जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांबाबत दोषी कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा परिषद हिंगोलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई प्रतिदिन 55 लिटर प्रमाणे शुद्ध व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने जिल्ह्यात एकूण 619 नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित योजनांची कामे कंत्राटदारांना ब-1 करारावर देण्यात आली असून कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मुदत संपूनही काही कंत्राटदारांकडून कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. वारंवार सूचना देऊनही कामे पूर्ण न करणाऱ्या अशा एकूण 68 कामांच्या कंत्राटदारांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये संबंधित कंत्राटदारांना 31 मार्च 2026 अखेरपर्यंत अपूर्ण कामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नोटीस प्राप्त होऊनही कामे पूर्ण न केल्यास ब-1 करारातील अटी व शर्तींनुसार संबंधित कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी दिला आहे.    

 

******

हिंगोली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सन 2022-2023 ते सन 2024-2025 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी  विवरणपत्र प्रणालीद्वारे तयार करण्यात आले आहे.

भविष्य निर्वाह निधी  विवरणपत्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुलभरित्या उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ते www.zphingoligpf.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

******

 

क्षयरोग मुक्त जिल्हा अभियानाला गती; 304 ग्रामपंचायतींचा गौरव, 100 टक्के उद्दिष्टाचा संकल्प

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या
क्षयरोग मुक्त जिल्हा अभियानाला गती देण्यासाठी सर्व ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो पूर्णपणे प्रतिबंधित व उपचारयोग्य आहे. शासनामार्फत यासाठी प्रभावी उपचार सुविधा उपलब्ध असून, वेळेत निदान व उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. जिल्ह्यातील 304 ग्रामपंचायतींनी क्षयरोग मुक्ततेची घोषणा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्रात तपासणी करणे, संशयित रुग्णांची लवकर ओळख करून त्यांना उपचाराशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णांनी किमान सहा महिन्यांचा उपचार पूर्ण करणे आवश्यक असून, उपचार अर्धवट सोडल्यास औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ग्रामपंचायती, आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

गावपातळीवर ग्रामसभांद्वारे जनजागृती, संशयित रुग्णांची माहिती तात्काळ आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविणे व रुग्णांना सामाजिक आधार देणे यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. क्षयरोग रुग्णांबाबत भेदभाव न करता त्यांना सहकार्य करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या जिल्ह्यातील 304 ग्रामपंचायतींपैकी सुमारे 40 ते 45 टक्के प्रगती क्षयरोग मुक्ततेकडे झाली असून, चालू वर्षात 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करून संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत ‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रभावी प्रतिबंध, लवकर निदान व नियमित उपचार यावर भर देणे आवश्यक आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेत जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवावा, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यस्तरावर 5 कोटी रुपयांच्या पारितोषिकाचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अभियानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान जिल्ह्यात 1 एप्रिल पासून राबविण्यात येणार आहे  आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

'माझां गाव, आरोग्य संपन्न गाव' जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या नियोजनानुसार, १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे. १ एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'विशेष आरोग्य ग्रामसभा' आयोजित  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली जाईल. आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल. लोकसहभागातून गाव 'आरोग्य संपन्न' करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाईल.

 

अभियानाचे स्वरूप व पुरस्कार

ग्रामपंचायत यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 5 कोटी रुपये, द्वितीय 3 कोटी रुपये, तृतीय 2 कोटी रुपये विभाग स्तरावर प्रथम 1 कोटी रुपये, द्वितीय 75 लाख रुपये, तृतीय 50 लाख रुपये आणि  जिल्हास्तर प्रथम 25 लाख रुपये द्वितीय 20 लाख रुपये तृतीय 15 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 25 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 5 लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 50 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 10 लाख रुपये ग्रामीण रुग्णालय राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 75 लाख रुपये असे असणार आहे.

            यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागाकडून दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा जिल्हा निर्देशांकात प्राविण्य मिळविल्याबद्दल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सेवाकर्मी पुरस्काराबद्दल सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास संबंधित गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्त्या तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अभिजित बांगर व बालाजी उबाळे यांनी तर आभार राजेश्वर पुंडगे यांनी मानले.

******* 






29 March, 2026

विशेष लेख - गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

 

     

  महाराष्ट्र शासनाने राबवलेला '१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम' राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासकीय कामाची पुनर्रचना, संपूर्ण डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर या त्रिसूत्रींवर आधारलेल्या या कार्यक्रमाने प्रशासनाचा चेहरामोहरा बदलून टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात काल (२८ मार्च) पार पडलेला गौरव सोहळा हा याच 'डिजिटल क्रांती'चा साक्षीदार होता. २४ तास उपलब्ध असणाऱ्या डिजिटल सुविधांमुळे आता सरकारी कार्यालयांमधील रांगा कमी होताना दिसतील, 'किमान शासन, कमाल सुशासन' सूत्र मराठवाड्याने खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवले आहे. 

लातूर: कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा वापर

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली लातूरने ई-प्रशासनात अभूतपूर्व झेप घेतली आहे. १७९.२५ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावणाऱ्या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'उत्कृष्ट जिल्हाधिकारी' म्हणून सन्मानित करण्यात आले. 

लातूरचे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नाही, तर त्यात संवेदनशीलतेचाही वाटा आहे. 'भाषिणी'चा वापर करत प्रशासनाने जिल्ह्याचे संकेतस्थळ तब्बल २३ भाषांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिले, ज्याचा लाभ गेल्या वर्षभरात ५.३१ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला. 'सेवा हक्क कायद्याची'  प्रभावी अंमलबजावणी करत ९७.९३% अर्जांचा मुदतीत निपटारा करण्यात आला. यासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय राबवत आहे. 

धाराशिव: ग्रामीण विकासाला तंत्रज्ञानाची जोड

लातूरप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यानेही तंत्रज्ञान आणि ग्रामीण प्रश्न यांची उत्तम सांगड घालत १८५.२५ गुणांसह राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवने स्मार्ट कार्यप्रणालीचा नवा आदर्श निर्माण केला.

नागरिकांना पुरवठा विभाग आणि संजय गांधी निराधार योजनेची माहिती घरबसल्या देण्यासाठी 'तुळजाई' चॅटबॉट वरदान ठरत आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'कल्पवृक्ष' ही स्मार्ट जीआर प्रणाली उपयुक्त ठरत असून, 'डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड'मुळे योजनांच्या प्रगतीवर अचूक लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. विशेषतः 'जीवनरेखा' या डिजिटल प्रणालीने शेतरस्ते आणि पांदण रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षांचे वाद कायमस्वरूपी मिटवले आहेत.

नांदेड पोलीस: आधुनिकीकरणातून सुरक्षिततेकडे

महसूल प्रशासनासोबतच मराठवाड्याच्या पोलीस दलानेही तंत्रज्ञानाच्या वापरात राज्याला दिशा दाखवली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली नांदेड परिक्षेत्राने १२१.२३ गुणांसह राज्यात थेट प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

तक्रारींच्या जलद चौकशीसाठी 'संवेदना' हे एआय आधारित मॉडेल, गुन्हे तपासाला गती देणारे 'Eagle Eye' आणि 'खबर हेल्पलाईन' या उपक्रमांमुळे गुन्हेगारीवर मोठा वचक बसण्यासाठी मदत होते आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या 'फीडबॅक प्रणाली'मुळे जनतेचा खाकी वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून फाईल्सचा निपटारा अत्यंत वेगाने होत आहे. 

विभागाचा दबदबा

मराठवाड्याचे यश सर्वंकष आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून प्रशासकीय उत्कृष्टतेचे दर्शन घडवले. या यशात छत्रपती संभाजी नगर, हिंगोलीनेही मोठी भर घातली असून, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली जिल्हा परिषदांना त्यांच्या प्रभावी व लोकाभिमुख उपक्रमांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

विशेष म्हणजे, तळागाळातील प्रशासनातही हा बदल झिरपला आहे. 'सेवाकर्मी प्लस' अंतर्गत १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या राज्यातील १७ नगरपरिषदांपैकी तब्बल ९ नगरपरिषदा एकट्या मराठवाड्यातील आहेत. यात लातूरमधील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा; धाराशिवमधील कळंब, तुळजापूर, लोहारा, नळदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड या नगरपरिषदांचा समावेश आहे.  तर राज्यातील आठ जिल्हा परिषदांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोली आहेत.  


मराठवाड्यातील जिल्हे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागाने मिळवलेले यश केवळ स्पर्धेपुरते मर्यादित नाही. तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांच्या त्रिवेणी संगमातून प्रशासनाने जनतेचा जो विश्वास संपादन केला आहे, तो 'विकसित महाराष्ट्र २०४७' चा भक्कम पाया आहे. मराठवाड्याने राज्यासमोर ठेवलेला हा गतिमान प्रशासनाचा 'पॅटर्न' आगामी काळात सर्वांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.

- डॉ. श्याम टरके ,

सहायक संचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय,

लातूर 







28 March, 2026

विशेष लेख- १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : जिल्हा परिषद यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांची राज्यस्तरीय पावती

 


मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला जिल्हा म्हणून हिंगोलीकडे पाहिले जाते. परंपरागत कार्यशैलीतून कार्यरत असलेली येथील जिल्हा परिषद. पण राज्यशकट हाकला जाणा-या मंत्रालयातून थेट हिंगोलीसारख्या तुलनेने मागास भागात एका आयएएस अधिका-याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली होते अन् मग प्रवास सुरु होतो एका नव्या सकारात्मक भावनेचा, आशेचा...! नागरिकांना ओळख होते जलद, गतिमान आणि कार्यक्षम बदलाची.... ते यंत्रणेकडून करून घेणा-या खमक्या अधिका-याची....!!!

त्या सकारात्मक भावना, आशा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण करतात ते येथील मुख्य कार्यकारी अधिकारी. ज्यांना देशाची आर्थिक राजधानी असणा-या आणि संपूर्ण राज्याचे आर्थिक नियोजन करण्याचा वित्त विभागातील अनुभव असतो, त्या  अधिका-याची बदली होते अन् मग लगेच प्रशासनात सकारात्मक बदल जाणवायला लागतात. मंत्रालयात कामाचा आणि उपस्थितीच्या वेळा पाळण्याची शिस्त असलेल्या प्रमुख अधिका-यामुळे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचा-यांनाही वेळ पाळण्याची शिस्त लागते. त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांत झालेल्या सकारात्मक बदलांकडे पाहिल्यास, एक सक्षम नेतृत्व, ठोस नियोजन आणि पारदर्शक प्रशासन यांचे प्रभावी उदाहरण दिसून येते. या बदलांच्या केंद्रस्थानी आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड. ज्यांनी आपल्या कार्यपद्धतीने संपूर्ण यंत्रणेलाच नवा चेहरा दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल विवेक गायकवाड यांचा आज‌ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याच्या कार्याची दखल नसून, हिंगोली जिल्हा परिषद यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांची राज्यस्तरीय पोचपावती आहे.

या १५० दिवसांच्या मोहिमेत प्रशासनातील गती, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रशासकीय कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा ध्यास घेण्यात आला. परिणामी, यंत्रणेमध्ये शिस्त, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व यांची नवी जाणीव निर्माण झाली.

सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करून त्या प्रसिद्ध करण्यात आल्या, ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरली. पदोन्नती प्रक्रियेला वेग देत पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आला. त्याचबरोबर सरळसेवेतील रिक्त पदे भरून मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यात आली. बिंदुनामावलीचे अद्ययावत प्रमाणिकरण केल्यामुळे आरक्षण व सेवा विषयक बाबींमध्ये पारदर्शकता अधिक दृढ झाली.

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्याही तत्परतेने पूर्ण करण्यात आल्या. यामुळे संबंधित कुटुंबांना तातडीचा आधार मिळाला, जे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे द्योतक आहे. या सर्व उपाययोजनांमुळे कर्मचारी व नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला.

केंद्र शासनाच्या I-GOT कर्मयोगी पोर्टलच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीवर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान पाच प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कामकाजात गुणवत्ता, शिस्त आणि सेवाभिमुखता वाढली. ही बाब प्रशासनाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

यासोबतच, सेवा पुस्तिकांचे अद्ययावत संगणकीकरण हा एक दूरदृष्टीचा निर्णय ठरला. यामुळे सेवा नोंदी अचूक, सुलभ आणि पारदर्शक झाल्या असून भविष्यातील निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होणार आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे प्रभावी नियोजन, विभागांतील समन्वय, वेळेचे काटेकोर पालन आणि उद्दिष्टपूर्ती यांचा संगम आहे. विवेक गायकवाड यांनीही हा गौरव संपूर्ण यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद करत सांघिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

आज हिंगोली जिल्हा परिषद प्रशासन हे पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक कार्यपद्धतीचे एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे येत आहे. या यशामुळे इतर जिल्ह्यांसाठी एक प्रेरणादायी मार्ग तयार झाला आहे. भविष्यातही नागरिकाभिमुख, दर्जेदार आणि उत्तरदायी सेवा देण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.

एकंदरीत, विवेक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हा परिषद यंत्रणेचा ‘आरसा’च बदलला असून, प्रशासनातील उत्कृष्टतेचा हा प्रवास पुढील काळातही असाच सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


- प्रभाकर बारहाते 

- प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

******

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाची दमदार कामगिरी; राज्यात द्वितीय क्रमांक

 

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान*




छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (विमाका):  महाराष्ट्र शासनाच्या ‘150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. डिजिटल रूपांतरणाच्या दिशेने ठोस पावले उचलत विभागाने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

आज मुंबई येथील सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे सात महत्त्वपूर्ण निकषांवर सखोल परीक्षण करण्यात आले. संकेतस्थळ व्यवस्थापन, ‘आपले सरकार’ सेवा, ई-ऑफिस प्रणाली, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांसारख्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करून छत्रपती संभाजीनगर विभागाने प्रशासन अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि गतिमान बनवले आहे.

ही मूल्यांकन प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडली असून अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्याकडून करण्यात आले. या स्पर्धात्मक प्रक्रियेत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधून द्वितीय क्रमांक मिळवणे ही मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे समन्वित प्रयत्न निर्णायक ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ई-गव्हर्नन्स उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. विभागनिहाय सातत्यपूर्ण आढावा, ई-ऑफिसचा प्रभावी वापर आणि नागरिक-केंद्रित निर्णय प्रक्रियेवर भर दिल्याने प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक झाले आहे.

ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शासकीय सेवा वितरणात पारदर्शकता, वेग आणि सुलभता वाढली आहे. 

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

*विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले*

 “150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमामुळे शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित झाले आहे. ही कामगिरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, भविष्यातही प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने केला जाईल. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक व सुलभ सेवा देण्यावर आम्ही भर दिला. या यशामागे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे समर्पण व टीमवर्क आहे.

******

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गौरव

 


हिंगोली(जिमाका), दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी '१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम' अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात येत असून, हिंगोली जिल्ह्याने यामध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.

या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत जिल्हा परिषद हिंगोलीने प्रशासनातील पारदर्शकता, गतिमानता व कार्यक्षमतेस प्राधान्य देत विविध सुधारणा राबवल्या. विशेषतः प्रलंबित प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करून शासकीय यंत्रणेला अधिक परिणामकारक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यामध्ये सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करून त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. पदोन्नती प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आला. तसेच, सरळसेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करून प्रशासनातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यात आली. बिंदुनामावली अद्ययावत करून तिचे प्रमाणिकरण करण्यात आले, ज्यामुळे आरक्षण व सेवा विषयक बाबींमध्ये पारदर्शकता सुनिश्चित झाली.

अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची प्रक्रिया देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली, ज्यामुळे संबंधित कुटुंबांना तातडीने आधार मिळाला. या सर्व कामांमुळे प्रशासनातील विश्वासार्हता व उत्तरदायित्व वाढले आहे.

तसेच, केंद्र शासनाच्या IGOT कर्मयोगी पोर्टलवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना कौशल्यवृद्धीसाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्यास प्रवृत्त करण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान पाच अभ्यासक्रम पूर्ण केले असून, यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत व सेवाभिमुखतेत सकारात्मक बदल झाला आहे.

यासोबतच, सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ व दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करून त्यांचे संगणकीकरण करण्यावर भर देण्यात आला. यामुळे सेवा नोंदी अधिक अचूक व सुलभ झाल्या असून भविष्यातील प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

जिल्हा परिषद हिंगोलीने प्रभावी नियोजन, विभागांतील सुसूत्रता, समन्वय, वेळेचे काटेकोर पालन व उद्दिष्टपूर्ती यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळेच हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हा गौरव केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नमूद केले.

या यशामागे जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध स्तरांवरील समन्वय आणि टीमवर्क महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही हीच कार्यपद्धती कायम ठेवून नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक सेवा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या राज्यस्तरीय गौरवामुळे जिल्हा परिषद हिंगोलीच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, प्रशासनातील उत्कृष्टतेचा हा आदर्श इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

*****


जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध * अफवांवर विश्वास ठेवू नका — जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा आवश्यक व पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्ह्यात पेट्रोल ३२० किलोलिटर व डिझेल ४३८ किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे.


प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देऊन साठ्याची तपासणी केली आहे. काही ठिकाणी अफवांमुळे अचानक मागणी वाढल्याने तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, नवीन साठा उपलब्ध होताच ही टंचाई तात्काळ दूर करून इंधन पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे.


*पेट्रोल पंप धारकांना सूचना :*

सर्व पेट्रोल पंप चालकांनी कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम टंचाई निर्माण करू नये व इंधनाची विक्री विहित दरानेच करावी. साठ्याची माहिती दररोज दर्शनी भागावर लावावी तसेच नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


*नागरिकांना आवाहन :*

इंधन टंचाईबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात कोणतीही टंचाई नसल्याने पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तेल कंपन्यांकडून इंधन पुरवठा नियमित सुरू असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.


तसेच, हिंगोली जिल्ह्यासाठी ६० किलोलिटर केरोसीन नियतन मंजूर झाले असून, साठा प्राप्त होताच त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

*******

27 March, 2026

जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र, हिंगोली कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार असून शूटिंग (नेमबाजी) व मैदानी क्रीडा प्रकारांसाठी ही निवड चाचणी दि. 10 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत ‘मिशन लक्ष्यवेध योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रायफल व पिस्टल शूटिंग (नेमबाजी) तसेच मैदानी क्रीडा प्रकारांसाठी तालुका क्रीडा संकुल, हिंगोली येथे जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

या केंद्रात निवड झालेल्या खेळाडूंना निवासी/अनिवासी स्वरूपात दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, अल्पोपहार सुविधा तसेच क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र व गुणवंत खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक खेळाडूंनी आपले आवेदनपत्र आवश्यक कागदपत्रांसह दि. 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी  6 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलकंठ श्रावण यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

******

हिंगोली जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत • विक्रीवरील निर्बंध आदेश रद्द

 

हिंगोली(जिमाका), दि. २७ : हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याने तात्पुरता मागणी-पुरवठा यात असमतोल निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुरुवार (दि. २६) रोजी पेट्रोल व डिझेल विक्रीवर मर्यादा घालण्याचा आदेश पारित करण्यात आला होता.

मात्र, सद्यस्थितीत बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल तसेच इतर कंपन्यांकडून आवश्यक तेवढा इंधनसाठा जिल्ह्यात उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे इंधन वितरणावरील निर्बंधाची आवश्यकता उरलेली नाही.

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तो (दि.२६) रोजीचा आदेश तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

*****

मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यातील मोटार सायकल संवर्गासाठी वापरात असलेली  एमएच38-एएम ही वाहन क्रमांक मालिका संपुष्टात येत असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन एमएच38-एएन0001 ते 9999 ही मालिका सुरू करण्यात आली आहे. नवीन वाहन नोंदणी करताना ही नवीन मालिका लागू राहणार आहे.

तसेच ज्या वाहन मालकांना आपल्या वाहनासाठी आकर्षक (फॅन्सी) क्रमांक राखीव ठेवावयाचा आहे, त्यांनी संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पद्धतीने विहित शासकीय शुल्क भरून इच्छित क्रमांक आरक्षित करून घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.

******

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षार्थी खेळाडूंना क्रीडागुण सवलतीसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांनी अहवाल सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुण सवलतीअंतर्गत वाढीव गुण देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने संबंधित क्रीडा संघटनांनी विविध स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धांचा सविस्तर अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी  यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

तथापि, अनेक क्रीडा संघटनांकडून स्पर्धांचे अहवाल केवळ आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याकडेच सादर केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे संबंधित प्रस्ताव प्राप्त न झाल्याने खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडागुण प्रस्तावांची पडताळणी व शिफारस करणे शक्य होत नाही. परिणामी, पात्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना क्रीडागुण सवलतीपासून वंचित राहावे लागते.

हिंगोली  जिल्ह्यातील  सर्व  एकविध  क्रीडा संघटनांनी सन 2025-26 या वर्षात आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचा अहवाल दि. 06 एप्रिल, 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहवालासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (1860 व 1950 कायद्यांनुसार), राज्य संघटनेचे संलग्नता पत्र, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा सविस्तर अहवाल, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा अहवाल (सहभागी संघ, खेळाडू यादी, लॉट्स व अंतिम निकालासह) आदी कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील.

सर्व संबंधित क्रीडा संघटनांनी वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह अहवाल निर्धारित मुदतीत सादर करून त्यांच्या संघटनेतील पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडागुण सवलतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी  कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलकंठ श्रावण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

*******

क्रीडा गुण सवलतीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 27 : फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण सवलतीच्या प्रस्तावांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य मंडळ सचिवांच्या सूचनेनुसार क्रीडा सवलतीचे प्रस्ताव आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in⁠ या लिंकद्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांची  छाननी करून ते विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत. सर्व प्रस्ताव दि. 15 एप्रिल 2026 पर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबंधित पोर्टलवरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

क्रीडा प्रस्ताव सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यास प्रस्ताव अपात्र ठरविण्यात येऊ शकतो. अशा वेळी त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांची  राहील. तसेच अपात्र प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीत दिसत नसल्याने मुदतीनंतर ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची वेळ येऊ शकते, याची नोंद घ्यावी. 

जिल्ह्यातील एकही खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधितांनी  दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. 

********

26 March, 2026

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्बंध लागू

 



हिंगोली (जिमाका), दि. २६ : हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी आदेश जारी केले आहेत.

यानुसार दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २००/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २०००/- पर्यंतच इंधन देण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावरील उपलब्ध शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंप धारकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ नुसार कडक कारवाई करण्यात येईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.

*******

25 March, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून रोजी * ऑनलाईन अर्ज भरण्यास 27 मार्चपासून सुरुवात

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटीईटी)-2026 परीक्षा रविवार, दि. 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर-1) व इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर-2) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे तसेच सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक/शिक्षक पदासाठी नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय, सूचना व सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून परीक्षार्थ्यांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची  प्रक्रिया दि. 27 मार्च 2026 पासून सुरू होत असून दि. 16 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीही दि. 27 मार्च ते दि. 16 एप्रिल 2026 असा आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याचा कालावधी दि. 9 जून ते दि. 21 जून 2026 असा राहील.

परीक्षा वेळापत्रकानुसार पेपर-1 (इयत्ता 1 ली ते 5 वी) रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून पेपर-2 (इयत्ता 6 वी ते 8 वी) त्याच दिवशी दुपारी 2.30 ते सायंकाळी  5 या वेळेत होणार आहे.

काही प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्यावत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

******

मोफत गुडघा व नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : मुख्यमंत्री वैद्यकीय‌ सहाय्यता निधी अंतर्गत आयोजित करण्यात आलेले मोफत गुडघा व नितंब  प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाले. ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने तसेच संजीवनी ममता हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात एकूण 70 रुग्णांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 26 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक त्या उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच गरजू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनात डॉ. अन्सारी, डॉ. दिपेन शर्मा, आवैज खान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले, समाजसेवा अधीक्षक डॉ. संतोष शेंडगे, सोमनाथ वानखेडे व आदिल खान यांचे विशेष योगदान राहिले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

*** 




 

कर्तव्यावर असताना तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

* कारवाईत 13 जणांकडून एकूण 2600 रुपयांचा दंड वसूल

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : कर्तव्यावर असताना तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचारी व इतर व्यक्तींविरुद्ध जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 13 जणांकडून एकूण 2600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार, अधिष्ठाता चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांच्या सहकार्याने आज जिल्हा परिषद येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ही कारवाई करण्यात आली. कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणे किंवा ते बाळगणे यामुळे कोटपा-2003 कायद्याच्या कलम 4 चे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर दंड ठोठावण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वीच शासकीय कार्यालय परिसर व शाळांच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हाभरात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.

ही कारवाई जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) व आनंद साळवे (सोशल वर्कर) आदींचा सहभाग होता.

 

कोटपा कायदा 2003 अंतर्गत प्रमुख तरतुदी :

 

कलम 4 : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे.

कलम 5 : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी आहे.

कलम 6 (अ) : 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे दंडनीय गुन्हा आहे.

कलम 6 (ब) : शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे.

कलम 7, 8, 9 : तंबाखू उत्पादने पॅकेटवर 85 टक्के भागावर वैधानिक इशारा आवश्यक आहे.

****** 




राज्य शासनाने 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी टप्पा-2 ही योजना आणली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा

#नानाजीदेशमुखकृषिसंजीवनीटप्पा-2