27 June, 2025

वैद्यकीय सहाय्य सल्ला शिबिरात केली दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : उम्मीद फाऊन्डेशन यांच्या सहकार्याने तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25 जून, 2025 रोजी हिंगोली येथील खाकीबाबा निवासी अस्थिव्यंग विद्यालयामध्ये व दि. 26 जून, 2025 रोजी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील निवासी मतिमंद विद्यालयात मोफत दिव्यांग वैद्यकीय सहाय्यता मूल्यमापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक ती उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, खासदार कार्यालयाचे प्रतिनिधी दयानंद सोनसळे, उम्मीद फाऊंडेशनचे संचालक परवेज फरीद, डॉ.बुशरा खान, प्रकल्प अधिकारी सय्यद निलोफर, राईज बायोनिक्स कंपनीच्या डॉ.स्नेहा प्रवीण, डॉ. रिम्पल लॉरे, डॉ. अच्युत नरेन, शिबीर समन्वयक हर्षवर्धन लव्हाळे, शिबीर सहायक सरफराज, समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी मधुकर राऊत, सहायक सल्लागार विजयानंद पकाने, संगमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे वैजनाथराव तोनसुरे, जगजाहीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंतराव करंजे यांची उपस्थिती होती. खाकीबाबा निवासी अस्थिव्यंग विद्यालयातील शिबीर यशस्वीतेसाठी एम. के. शिंदे, व्ही.एन.उबाळे, एस.पी.इंगोले, आर. एस. झगडे, ए.एन.निकुंभ, व्ही. एस. लामतुरे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मऱ्यांनी सहभाग नोंदवला. तर डोंगरकडा येथील निवासी मतिमंद विद्यालयातील शिबीर यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका लता बेंडके, निवासी अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडूरंग दाभाडे, कृष्णा राव, अनिल जगताप, एस. ए. नरवाडे तसेच निवासी मतिमंद विद्यालय व निवासी अस्थिव्यंग विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केला. ***

ग्रामीण विकास विभागाच्या एकात्मिक वित्त विभागाचे संचालक जगदीश कुमार यांचा हिंगोली दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारत सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या एकात्मिक वित्त विभागाचे संचालक जगदीश कुमार हे दि. 28 जून ते 2 जुलै, 2025 या कालावधीत हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. श्री. जगदीश कुमार हे दौरा कालावधीत ग्रामीण विकास विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ग्राम विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे मूल्यांकन करणार आहेत. *****

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा हिंगोली दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 26 : कै.वसंतराव नाईक शेती स्वावंलबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे दि. 1 जुलै, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. 1 जुलै रोजी दुपारी 12 वाजता अमरावती येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता विश्राम भवन, हिंगोली येथे आगमन. दुपारी 3.30 वाजता रोहयो अंतर्गत शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार हिंगोली यांनी सुचविलेल्या हिंगोली तालुक्यातील गावास भेट. सायंकाळी 6 वाजता सोईनुसार अमरावती मार्गे काटोलकडे प्रयाण . **

26 June, 2025

जिल्ह्यातील ५ हजाराहून अधिक लोकसंख्येची १४ गावे 'रुफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज' घोषित होणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. २६ (जिमाका): सन २०११ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यातील ५,००० हून अधिक लोकसंख्या असलेली १४ गावे ‘रूफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज’ म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित गावे सौरऊर्जेवर आधारित विविध सुविधा प्राप्त करून घेणार असून, हरित ऊर्जा वापरात जिल्ह्याची मोठी कामगिरी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय रुफटॉप सोलर, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा आढावा या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण, शिखर बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, महाऊर्जेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड, महावितरणचे उपविभागीय अभियंता रणजीत देशमुख, श्री. पिसे, डिग्रसचे सरपंच, यांच्यासह रुप टॉप सोलरचे व्हेंडर यावेळी उपस्थित होते. जी गावे १०० टक्के सौरऊर्जायुक्त होतील, त्या गावांना केंद्र शासनाचे १ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून, या अनुदानाच्या रकमेतून या योजनेच्या माध्यमातून घरगुती सौर दिवे, पथदिवे, सौरपंप, शासकीय इमारतींवरील सोलर पॅनल्स आदींची कार्यवाही हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. महावितरण व मेडाच्या अधिका-यांनी याकामी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या सहकार्याने गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून, स्वयंपूर्ण व हरित ऊर्जेवर चालणारी गावे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. या योजनेंतर्गत शासकीय अनुदानासोबत स्वयंप्रेरित सहभागालाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत. या योजनेच्या माध्यमातून जी व्यक्ती एखाद्या घराला सौरऊर्जेवर आणण्यासाठी प्रोत्साहीत करेल, त्याने त्याचा संदर्भ सोलर अँप्लिकेशनमध्ये टाकल्यास त्याला १ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून, यामधूनही युवकांना पैसे कमावण्याची व गावे सौरऊर्जेवर चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी जिल्ह्यात वीज वितरणाच्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, भविष्यात येणा-या योजना आणि सद्यस्थितीत चालू असलेल्या योजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. तसेच हानी कमी करण्यासाठी आरडीएसएस, तसेच वीज वाहिन्यांचे विलगीकरणाची माहितीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधित यंत्रणेकडून जाणून घेतली. या योजनेमध्ये मॉडेल सोलर व्हिलेजकरिता हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार निवड करण्यात आलेल्या गावामध्ये जास्तीत जास्त घरावरती सौरसंच आस्थापित करण्यासाठी महावितरणद्वारे कार्यक्रम राबवण्याकरिता जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सूचना दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतीवर वीज पारेषण संलग्न सौरसंच बसवण्याकरिता सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याकरिता महाऊर्जा विभागास सूचना दिल्या. *****

बँकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला विविध बँकांचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी योग्य नियोजन करुन सन 2025-26 च्या खरीप पीक कर्जाचे जास्तीत-जास्त वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, आरबीआयचे अधिकारी अरुण बाबू, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमराज बनसोड, विविध बँकेचे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात बँकनिहाय पीक कर्ज वितरणाचा तपशील, पीक कर्जाचा केलेला परतावा, पीक कर्ज नूतनीकरण प्रकरणे याची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे 875 कोटी 90 लाखांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 278 कोटी 81 लाख 75 हजार रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. त्याची टक्केवारी 31.38 टक्के इतकी आहे. यासाठी गावात शिबिरांचे तसेच गावभेटीचे आयोजन करुन सर्व बँकांनी चालू वर्षात जास्तीत-जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत. तसेच बँकेचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश दिले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसवंर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगटांना कर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करुन त्याचा अहवाल सादर करावा. बचतगटांना तालुकानिहाय कार्यक्रम घेऊन लोकप्रतिनिधींच्या हस्ते कर्जाचे वितरण करावे. तसेच विविध योजनेत आपणांस देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. धरती आबा योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये बँकांचे स्टॉल लावून शासनाच्या विविध योजनाचा लाभ द्यावा. जिल्ह्यात मागणीप्रमाणे नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी किंवा बँक ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन नागरिकांना सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. आरसेटीने शेतकरी व नागरिकांना रेशीम, हळद प्रक्रिया उद्योग यासह विविध प्रशिक्षणाचे आयोजन करुन लाभ द्यावा. प्रॉपर्टी कार्डच्या आधारे नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. ***

अमृत लक्षित गटातील (खुला प्रवर्ग) उमेदवारांकरिता मोफत स्वरुपाचा अमृत आयात-निर्यात प्रशिक्षण

हिंगोली, दि.26 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अमृत लक्षित गटातील (खुला प्रवर्गासाठी) आयात-निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम 21 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गातील अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती महिलांसाठी निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल. प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवती व महिलांना रोजगार व उद्योग करण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील आयात-निर्यात वाढीच्या दृष्टिकोनातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्यात क्षेत्र व त्याचे महत्त्व, निर्यात म्हणजे काय व त्याची प्रक्रिया, परकीय व्यापार धोरणाचा आढावा 2015-20 ते 2020-25, पॅक हाउस मानक कार्य व्यवस्थापन, निर्यातीतील इसीओ टर्म, परदेशात खरेदीदार कसे शोधावे, अपेडा/फेमाच्या भूमिकेचा अभ्यास, डीजीएफटीची भूमिका, नवीन कंपनी तयार करणे, इसीजीसीची भूमिका, पेमेंट व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. वरील प्रशिक्षणाकरिता उमेदवाराची प्रत्यक्ष निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असेल. यासाठी किमान वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे आहे. अधिक माहिती व नोंदणी करिता एमसीइडी जिल्हा कार्यालय द्वारा जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली, दुसरा मजला एस-12 जिल्हाधिकारी प्रशासकीय कार्यालय, नांदेड रोड या ठिकाणी दत्ता उचीतकर (9960189358) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली यांनी केले आहे. *****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी

हिंगोली(जिमाका), दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तानाजी मुटकुळे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त छाया कुलाल, इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक यादव गायकवाड, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, आयकर विभागाचे अंकेत जाधव, असिस्टंट कमांडंट अक्षय राठोड, विशेष अधिकारी अमोल घुगे, कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागतकर उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे यांनी विचार व्यक्त केले. आयकर विभागाचे अंकेत जाधव, असिस्टंट कमांडंट अक्षय राठोड यांनी स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे भारतीय संविधानाच्या उद्देशिका प्रतिमा व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला, संविधान उद्देशिकेचे वाचनही सामूहिकरीत्या करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. वर्षा कुरील, प्रा. विक्रम जावळे, शांताबाई मोरे, बबन मोरे आदीं मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातून प्रथम आलेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार 5 हजार रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ योजने अंतर्गत श्रीमती संगीता राठोड यांना पाच लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गीते यांनी केले, तर शेवटी वर्षा घुगे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागातील सर्व कर्मचारी व बार्टी समतादूत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ****