09 February, 2017

मे-2017 अखेर नागरी भाग हागणदारीमुक्‍त करावेत
                                                                          -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी  
        हिंगोली, दि.09:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत मे-2017 पर्यंत जिल्ह्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त व शहर स्वच्छ करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिले.
            नगर परिषद प्रशासन, हिंगोली यांच्यावतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती 100 टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी सभागृहात सर्व लोकप्रतीनीधी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळेत श्री. भंडारी बोलत होते. यावेळी हिंगोली नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी न.प. चे उत्तमराव शिंदे, औंढा नागनाथ नगर पंचायत अध्यक्षा जयाताई देशमुख, सेनगाव नगर पंचायत अध्यक्ष अभिजीत देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, प्रमुख पाहुणे पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, औंढा ना. नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी ज्योती भगत आणि सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे  यांची या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, 2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याबाबतचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील शहरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्टिने प्रशासनाने  नियोजन केलेले आहे. नगर परिषद व नगर पंचायतस्‍तरावरून लोकप्रतिनीधी यांनी आप-आपल्या प्रभागातील नागरिकांच्या बैठकी घेवून त्यांना वैयक्तीक शौचालय बांधुन वापर करणे किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी. नागरी स्वच्छता अभियानाबाबत नागरिकांची मानसिकता बदलण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावेत. जिल्ह्यातील नगर परीषदा - नगर पंचायतींनी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरविले आहे.  सार्वजनिक स्वच्छतेसाठी सामुहीक प्रयत्नांबरोबरच वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विविध घटकांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनीधी आणि नगर परीषद/ नगर पंचायत प्रशासनाने करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रयत्न केल्यास नागरी क्षेत्रातील शौचालयांच्या बांधकामाला अपेक्षित गती मिळण्यास नक्कीच मदत होईल. आणि निश्चित केलेल्या कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती करणे शक्य होईल असे ही  जिल्हाधिकारी श्री. भंडारी यावेळी म्हणाले.  
            हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परीषद / औंढा ना. सेनगाव नगर पंचायत क्षेत्रात एकुण 10 हजार 136 शौचालय बांधकामाचे उद्दीष्‌ट असून, त्यापैकी 3 हजार 138 शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर 4 हजार 130 शौचालयाची बांधकामे सुरु आहेत.  जिल्ह्यातील नागरी भागातील स्वच्छता अभियानाने गती घेतली असून, लवकरात - लवकर शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न नगर परीषद - नगर पंचायतीनी करावा. नागरी भागातील स्वच्छता अभियानात जिल्हा कुठल्याही परिस्थितीत मागे राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील हिंगोली नगर परिषद फेब्रूवारी-2017 अखेर तर वसमत नगर परिषद मार्च-2017 अखेर हागणदारी मुक्तीसाठी कालावधी निर्धारीत केला असून, कळमनुरी नगर परिषदेने उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर औंढा ना. आणि सेनगाव या नवीन नगर पंचायती हागणदारी मुक्तीसाठी मे-2017 पर्यंतचा कालावधी निर्धारीत केला आहे. नागरी भागातील लोकप्रतिनीधी आणि नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन, जिल्ह्याला नागरी स्वच्छता अभियानातही अग्रेसर ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ही श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
            यावेळी पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी पाथरी येथे यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत सादरीकरणांद्वारे मार्गदर्शन केले. तसेच हिंगोली नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, कळमनुरी न.प. चे उत्तमराव शिंदे, औंढा नागनाथ नगर पंचायत अध्यक्षा जयाताई देशमुख  आणि सेनगाव नगर पंचायत अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी ही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
            या जिल्हास्तरीय कार्यशाळेत लोकप्रतिनीधी आणि अधिकारी-कर्मचारी यांनी नागरी क्षेत्र हागणदारीमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प केला. यावेळी हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर परिषद आणि औंढा ना. सेनगाव नगर पंचायतीचे सदस्यांची उपस्थिती होती.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले. तर औंढा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत यांनी आभार मानले.

*****


माजी सैनिकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन मिळणार
हिंगोली, दि. 9 : जिल्ह्यातील माजी सेनिकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्श्न लागु होणार आहे. त्यामुळे माजी सैनिक / माजी सैनिक विधवा यांनी सविस्तर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. माजी सैनिक / माजी सैनिक विधवा यांनी सैन्यसेवा नंबर, रँक, सेवा पुस्तकाप्रमाणे नाव, आधार नंबर, पेंन्शनर किंवा  नॉन पेंन्शनर, जन्मतारीख, सेवामुक्तीची  तारीख, युनीटचे नाव, घराचा संपुर्ण पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पेंन्शन मिळत असलेल्या बँकेचे नाव, अकाऊंट नंबर, बँकेचा आय.एफ.सी. कोड व ओळखपत्र क्रमांक एका कागदावर लिहून या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
जि.प. , पं.स. निवडणूक मतदानासाठी खासगी आस्थापनातील मतदारांना सुट्टी
हिंगोली, दि. 9 :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबात उद्योग, उर्जा व कामगार विभागाने परिपत्रक काढले आहे. त्याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात 5 तालुक्यात ज्या गट व गणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्या मतदान क्षेत्रातील विविध आस्थापनातील कामगारांना निवडणूक मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या दिवशी निवडणूक क्षेत्रात कामगाराच्या अनुपस्थितीमध्ये धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनातील उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम / अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यातील कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

*****
25 एप्रिल, 30 ऑगस्ट आणि 18 ऑक्टोबर, 2017
 या तीन स्थानिक सुट्टया जाहीर
हिंगोली, दि. 9 : परिक्रम्य संलेख अधिनियम, 1881 अंतर्गत राज्य शासनाच्या शासन निर्णयाव्दारे राजनैतिक सेवा विभागाच्या दिनांक 16 जानेवारी, 1958 च्या शासन निर्णयान्वये हिंगोली जिल्ह्यात सन 2017 या वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर करण्यात येत आहेत. यामध्ये 1)  हिंगोली येथील हजरत सिरेहक शाहबाबा ऊर्दु तिथी रहेमत तुल्ला का संदल और ऊरुस ( मंगळवार, दि. 25 एप्रिल, 2017) , 2) जेष्ठ गौरी पुजन (महालक्ष्मी) (बुधवार, दि. 30 ऑगस्ट, 2017) व 3) नरक चतुर्दशी (बुधवार, दि. 18 ऑक्टोबर, 2017) आदि. अशा प्रकारे जिल्ह्यातील वरील तीन दिवस स्थानिक सुट्टया म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जाहीर केल्या आहेत.
उपरोक्त स्थानिक सुट्या (राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालय, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयांखेरीज) हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

*****  

03 February, 2017

हिंगोली जिल्ह्यात औरंगाबाद शिक्षक मतदार
संघासाठी 93.69 टक्के मतदान

         हिंगोली, दि.3: विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात 93.69 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.
            जिल्‍हयात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तहसिल कार्यालय, हिंगोली 91.83 टक्के, जि. प. प्रशाला बासंबा ता. हिंगोली 89.44 टक्के, तहसिल कार्यालय, कळमनुरी 96.00 टक्के, जि. प. प्रशाला आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी 90.86 टक्के, जि. प. प्रशाला डोंगरकडा, ता. कळमनुरी 87.10 टक्के, जि. प. प्रशाला सेनगांव 96.00 टक्के, जि. प. प्रशाला गोरेगांव ता. सेनगांव 90.73 टक्के, तहसिल कार्यालय, वसमत 96.09 टक्के, जि. प. प्रशाला, हट्टा ता. वसमत 96.30 टक्के, जि. प. प्रशाला कुरूंदा, ता. वसमत 97.24 टक्के, तहसिल कार्यालय औंढा ना. 94.39 टक्के आणि जि. प. प्रशाला जवळा बाजार, ता. औंढा ना. 97.20 टक्के या 12 मतदान केंद्रावर एकूण 93.69 टक्के मतदान झाले.
            शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि निवडणूक यंत्रणेने पुर्वतयारी केली होती. या 12 मतदान केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता. मतदानासाठी शिक्षक मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर पुरुष मतदार 2 हजार 307 आणि स्त्री मतदार 357 असे एकूण 2 हजार 664 या शिक्षक मतदारांपैकी 2 हजार 496 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची माहिती निवडणूक विभागाने कळविली आहे.


****


02 February, 2017

परिवीक्षा अधिकारी संदिप जाधव यांचा सत्कार व निरोप
हिंगोली, दि. 2 :- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील परिवीक्षा अधिकारी संदिप जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी या पदावर नेमणुक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे येथील विभागीय सहसंचालक कार्यालयात नेमणुक मिळाली  त्यासाठी त्यांना या कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश वाघ, संरक्षण अधिकारी कु. माया सुर्यवंशी, विधी सल्लागार उत्तम शिंदे, क. सहाय्यक पांडुरंग खटिंग, क. संरक्षण अधिकारी गजानन घुगे, नितीश मकासरे, जगदीश राठोड, एस.बी.पांडे, श्रीमती. उर्मिला तांबे, श्री. रफीक, श्री. साबळे, श्री. पहाडे, श्री. सुरोशे, श्री. पवार उपस्थित होते.
            यावेळी श्री. कैलास तिडके व श्री. गणेश वाघ यांचेकडुन श्री. संदिप जाधव यांचा गणेश प्रतिमा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यालयातील श्री. शिंदे, कु. सुर्यवंशी, श्री. मकासरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सर्वांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी व नविन सेवेसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या.

*****
विधानपरिषद शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या
 मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागु
हिंगोली, दि. 2 :- विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्‍टीकोनातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहावी यादृष्‍टीने शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली कार्यालयानी कळविले आहे. 
हिंगोली जिल्‍हयात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 82-तहसिल कार्यालय, हिंगोली, 83-जि. प. प्रशाला बासंबा ता. हिंगोली, 84-तहसिल कार्यालय, कळमनुरी, 85-जि. प. प्रशाला आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी, 86-जि. प. प्रशाला डोंगरकडा, ता. कळमनुरी, 87-जि. प. प्रशाला सेनगांव, 88-जि. प. प्रशाला गोरेगांव ता. सेनगांव, 89-तहसिल कार्यालय, वसमत, 90-जि. प. प्रशाला, हट्टा ता. वसमत, 91-जि. प. प्रशाला कुरूंदा, ता. वसमत, 92-तहसिल कार्यालय औंढा ना., 93-जि. प. प्रशाला जवळा बाजार, ता. औंढा ना. अशी 12 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
या मतदान केंद्र परिसरात शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राच्या हद्दी पावेतो मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. या आदेशान्वये उपरोक्त नमुद ठिकाणी 100 मिटरच्या परीसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहे. सदरील आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी/कर्मचारी व मतदान केंद्राच्या परिसरातील मतदारास लागु होणार नाहीत. मतदान केंद्राच्या परिसरात 100 मिटरच्या आत खाजगी वाहन घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. तसेच संबंधितास नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येत आहे. असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

*****