01 May, 2026

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा; तुटवडा होऊ देऊ नका – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

खरिप हंगाम 2026, पाणीपुरवठा, कृषी नियोजन व शासन योजनांचा पालकमंत्र्यांकडून सर्वंकष आढावा

 


हिंगोली, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये. खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा, वितरण व उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. तसेच जिल्ह्यात पाणीटंचाई, चारा टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या उन्हाचा पारा जास्त असून उन्हापासून संरक्षण करावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगाम 2026 पूर्वतयारी, पाणीटंचाई निवारण, कृषी निविष्ठा उपलब्धता तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरिप हंगाम 2025 तालुकानिहाय नुकसानभरपाई वाटप, रब्बी हंगामाचा आढावा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण, बियाण्यांची गरज, महाबीजमार्फत उपलब्धता, कापूस बियाण्यांच्या विशिष्ट वाणांची मागणी व पुरवठा, तसेच रासायनिक खतांचा साठा, मागणी व विक्री याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. मंजूर आवंटनापैकी सुमारे 77 टक्के खतसाठा उपलब्ध झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यास डीएपी खताची दररोज सुमारे 52 मेट्रिक टन गरज असून सद्यस्थितीत सुमारे 3 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. तसेच युरियाचा शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लागणारा साठा मुबलक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा दाखविणे बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने विक्रेत्यांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

खरिप 2026 करिता निश्चित करण्यात आलेल्या कृषी मोहिमांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्येक कृषि सहाय्यकाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात 20 जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव परिसरात खड्डे निर्माण केले जाणार आहेत. महाविस्तार मोबाईल अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवार फेऱ्यांचे नियोजन, पोकरा योजनेअंतर्गत कामांची गती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फलोत्पादन वाढ, तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत क्षेत्रवाढीचे नियोजन यावरही सविस्तर चर्चा झाली. प्रधानमंत्री नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत यासंदर्भातील कामांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कृषि विभागाच्या दोन घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. जून, जुलै व ऑगस्टपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी विहीर अधिग्रहण, जलजीवन मिशनअंतर्गत कामे, तसेच टँकर नियोजनाची प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जात असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, लेखन फाउंडेशन, व्हिजन समिती व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 70 शाळांनी सहभाग घेऊन पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. यामध्ये विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये शिक्षण, कृषी व मूलभूत सुविधा या तिन्ही क्षेत्रांचा समन्वित विकास करण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आरोग्य संपन्न गावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज-पालकमंत्री

 

जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि आपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृद्ध बनविण्यासाठी हातभार लावा. आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न केल्यास आपल्या जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात एक आदर्श स्थान मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी याप्रसंगी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेले "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" हे अभियान म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तन घडविणारे पाऊल आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या तरच आपण खऱ्या अर्थाने निरोगी समाज घडवू शकतो. "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" ही केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे, जी प्रत्येक ग्रामस्थाच्या सहभागातून यशस्वी होणार आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना "आरोग्यसंपन्न गाव" म्हणून गौरविण्यात येणार आहे. यावेळी 'मी निश्चय मित्र' लोगोचे यावेळी विमोचन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती दिली.

यावेळी  जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांच्या विशेष प्रयत्नाने  हिंगोलीचे 'यलो गोल्ड' म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या हळदीचे बॉक्स पालकमंत्री नरहरी झिरवाळ व मान्यवरांना भेट देण्यात आले.

****** 










No comments: