04 February, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 



• परिस्थितीशी दोन हात करत परीक्षेची तयारी करा 

• मुलाखतीसाठी विविध आयएएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार 


हिंगोली(जिमाका), दि. ४ : सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ध्येयनिश्चिती करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. परिस्थिती कोणतीही असो तिचा बाऊ न करता प्रयत्नरत राहिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज‌ येथे केले.

 शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात आज जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधा व मार्गदर्शन योजनांची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे देताना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आर्थिक, सामाजिक वा इतर कोणत्याही परिस्थितीचा बाऊ करू नये. येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ध्येय निश्चित करून ते  गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

यावेळी त्यांनी यूपीएससी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण अभ्यास, चालू घडामोडींचे महत्त्व आणि आत्मविश्वास या बाबींवर भर दिला. अपयशातून खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास करू असा विश्वास व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांने त्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याचे सांगून आई-वडिल परजिल्ह्यात कामानिमित्त गेले असल्याचे सांगत मन वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यावर त्या विद्यार्थ्यास आत्मविश्वास असल्यास आई-वडिलांचे मन नक्कीच वळवू, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिला. 


या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गिरीकर यांनी केले.

*****

No comments: