22 July, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


_७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी जाहीर_



मुंबई, दि. २२ : राज्य शासनाने शेतकरी हितासाठी  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करताना राज्यातील सात जिल्ह्यांमधील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करीत आहोत असे बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात यादी जाहीर करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने सुमारे ५६ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे.


ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नाही  तर शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यास सक्षम बनविण्यासाठी असल्याचे सांगत सहकार मंत्री पाटील म्हणाले, सहकार विभाग सातत्याने यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. २ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली होती. तसेच १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली. योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता घटकाच्या अंमलबजावणी साठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खाजगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील सर्व कर्जखात्यांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची माहितीही पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीचे संगणकीय विश्लेषण करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील ५३२ पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहितीही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील  यांनी यावेळी दिली. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असून, आधार क्रमांक किंवा त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन करीत सहकार मंत्री म्हणाले, राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक वर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम डीबीटी द्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.


राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया ३१ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर व्यापारी बँकांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरणाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, या  योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे तसेच सहकार विभागाची संपूर्ण यंत्रणा सातत्याने आढावा घेऊन जिल्हास्तरावर आणि बँकांच्या स्तरावर नियोजन करत आहेत. अत्यल्प कालावधीत ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार विभाग समर्पित भावनेने कार्य करत आहे, अशा शब्दात  सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांनी विभागाचे अभिनंदन केले.

0000

दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



हिंगोली (जिमाका), दि. 22 : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना आज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर, सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 *****

फाळेगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न


शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद








हिंगोली, दि. २२ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या “शासन आपल्या दारी, सेवा आपल्या गावात”या संकल्पनेअंतर्गत महसूल विभागाच्या वतीने फाळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाधान शिबिरात विविध शासकीय विभागांनी सहभागी होत नागरिकांना अनेक योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला.

कार्यक्रमास आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी माया वानखडे, सुरेश कांबळे यांच्यासह महसूल, पंचायत राज, महिला व बाल विकास, कृषी, सहकार, वन, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मत्स्यव्यवसाय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिबिरामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. 75 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल हप्त्यांची रक्कम वितरीत करण्यात आली. पूर्ण झालेल्या 10 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल चाव्यांचे वाटप, तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत 35 गर्भवती महिलांना बेबी किटचे वितरण करण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत ५०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कृषी विभागामार्फत १५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, तर २० शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले. सहकार विभागाने पीक कर्जमाफी योजनेबाबत मार्गदर्शन केले. वन विभागामार्फत वृक्षलागवडीसाठी १,००० रोपांचे वितरण करण्यात आले.

महसूल विभागामार्फत २०० विद्यार्थ्यांना जात, नॉन-क्रिमिलेयर व रहिवासी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत ५० निराधार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा, ५ लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा योजनेचा आणि २५ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला. याशिवाय २१ नागरिकांना फॅब्रिक अंथरुणे व ७/१२ उताऱ्यांचे वितरण, तसेच ५० पात्र लाभार्थ्यांना ई-शिष्यवृत्तीचे लाभपत्र देण्यात आले.

शिबिरादरम्यान नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी, मागण्या व अर्ज सादर केले. संबंधित विभागांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बाल विकास, वन, सहकार तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागांच्या संयुक्त सहभागामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळाला. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व मागण्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने फाळेगाव येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

या समाधान शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६

 

* लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच; सहकार आयुक्तालयाचे निर्देश


हिंगोली, दि. २२ (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकारचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

शासन निर्णयानुसार, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार नोंदणी अनिवार्य आहे. त्यानुसार, योजनेच्या संगणकीय प्रणालीवर कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून, माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

नवीन कार्यपद्धतीनुसार, आधार प्रमाणीकरण केवळ बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येणार असून, ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख सुनिश्चित होऊन योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होणार आहे.

या संदर्भातील कार्यपद्धतीची माहिती व आवश्यक सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती तसेच संबंधित बँक शाखांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आपल्या सरकार सेवा केंद्रे व बँक शाखांमध्ये आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 *****

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत उद्या घेणार हिंगोली जिल्ह्याचा आढावा

 


हिंगोली, दि.२२ (जिमाका): छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे उद्या, गुरुवार (दि.२३) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, या दौ-यात ते विविध विकासकामांचा व प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, निवडणूक, पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, न्यायालयीन प्रकरणे, ई-फेरफार, तसेच विविध प्रलंबित विषयांचा विभागनिहाय बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे आढावा घेणार आहेत.

बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय जमिनीची उपलब्धता, डेटा सेंटरसाठी जमीन संपादन, ग्रामीण वस्तींसाठी शासकीय जमिनीचे वाटप, डिजिटल क्रॉप सर्व्हे, जमीन संकलनाशी संबंधित विविध प्रकरणे तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचा आढावा घेतला जाणार आहे.

याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा, भूसंपादनाची प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती मदत, गौण खनिज, वसुली, न्यायालयीन प्रकरणे, ई-फेरफार, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, कर्मचारी समाधान शिबिर तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यांसाठी सुचविलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबतही चर्चा होणार आहे.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

*****

वृक्षारोपणासह त्याचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 






* हिंगोलीत विविध उपक्रमांनी ‘वनमहोत्सव २०२६’ उत्साहात

* वृक्षपूजन, वृक्षारोपण व रोप विक्री केंद्राच्या उद्घाटनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


हिंगोली, दि. २२ (जिमाका) :  वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. ही सामूहिक जबाबदारी सर्वांनी पार पाडावी. त्यामुळे जिल्हा हरित व पर्यावरणीयदृष्‍ट्या संपन्न होईल. ही पर्यावरणीय संपन्नता आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. 

सामाजिक वनीकरण विभाग तथा राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वनमहोत्सव २०२६’ विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वृक्षपूजन, वृक्षारोपण, रोप विक्री केंद्राचे उद्घाटन आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश यावेळी देण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. 

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १२ चे समादेशक सुशांत सिंह, सहायक समादेशक एस. एच. पवार, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार, सहायक वनसंरक्षक विजय कटके तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण व पूजनाने करण्यात आली. ‘हरित हिंगोली’च्या संकल्पनेला बळ देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार रोपे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी रोप विक्री केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल संदीप वाघ तसेच वनरक्षक देवराव दिपके, बालाजी जाधव, सूरज शेळके, सुनिता लोणे आणि राजू कोटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. एसआरपीएफच्या वतीने अतुल अवरगंड, तुषार भालेराव, शाहू भालेराव तसेच इतर अधिकारी-कर्मचारी यांनीही नियोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****


अनधिकृत वाळू उपसा प्रतिबंधासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



        जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची बैठक संपन्न 

              

*हिंगोली, दि. २२ (जिमाका) :* जिल्ह्यातील गौण खनिज वाळूच्या उत्खनन, वाहतूक व साठवणुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून अनधिकृत वाळू उपसा, वाहतूक व साठवणुकीविरुद्ध सातत्याने संयुक्त कारवाई करावी. महसूल, पोलीस, परिवहन, गौण खनिज व संबंधित विभागांनी नियमित तपासण्या करून शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिले.

                जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.


 जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विन माने, पोलीस उपअधीक्षक पी. एम. माकोडे, सहायक वनसंरक्षक एस. आर. माने, सहायक भूवैज्ञानिक डी.एन. बावळे, सहायक कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे विभाग)  डी. एस. येस्के, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                बैठकीत जिल्ह्यातील वाळू घाटांची सद्यस्थिती, अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाया, जप्तीची प्रकरणे, महसूल व दंडवसुली, संवेदनशील भागांतील देखरेख, तसेच विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

               यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी अनधिकृत वाळू उपशास प्रतिबंध करण्यासाठी संयुक्त तपासणी पथके अधिक सक्रिय ठेवण्याच्या, रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याच्या, तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. नदीपात्रातील पर्यावरणीय समतोल अबाधित राहील याची दक्षता घेण्याबरोबरच शासनाच्या धोरणानुसार वाळू व्यवस्थापनाची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.           

              ******