07 September, 2026

हिंगोली तालुक्यातील युवक-युवतींसाठी मोफत DTP प्रशिक्षणाची संधी

हिंगोली तालुक्यातील युवक-युवतींसाठी मोफत DTP प्रशिक्षणाची संधी

नाव नोंदणीची अंतिम मुदत १२ सप्टेंबर

हिंगोली, दि. ७ (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली तालुक्यातील सर्वसाधारण (GEN) प्रवर्गातील युवक-युवतींसाठी DTP (Desktop Publishing) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.


प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करताना आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, टी.सी. व बँक पासबुक यांची आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. नाव नोंदणीची अंतिम मुदत १२ सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुक युवक-युवतींनी विहित मुदतीत नाव नोंदणी करून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.


नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी विकास उंडाळ, कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली (मो. ८४१२०८९२७२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करता येईल. या प्रशिक्षणाच्या संधीचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए. एस. कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दाटेगावचे राज्यस्तरीय मुल्यमापन


▶️ प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी

▶️ महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग


हिंगोली, दि. 6 (जिमाका): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय मूल्यमापन शनिवारी (ता.05) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने गावाला भेट देऊन विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली.

राज्यस्तरीय मूल्यमापन समितीत आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यशदा, पुणे येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत राज विभागाचे संचालक गिरीश भालेराव, भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत सरपंच शारदा गायधने आदींचा समावेश होता.

राज्यस्तरीय पथकाच्या भेटीपूर्वी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मागील महिनाभर दाटेगाव येथे वेळोवेळी बैठका घेऊन ग्रामस्थांना अभियानाच्या विविध निकषांबाबत मार्गदर्शन केले होते. ग्रामपंचायत, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी मूल्यमापनासाठी नियोजनबद्ध तयारी केली होती.




दाटेगाव येथे आगमनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी प्रधान सचिव डॉ. पुलकुंडवार व राज्यस्तरीय पथकाचे स्वागत केले. याप्रसंगी  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अध‍िकारी सुधीर ठोंबरे,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, गटविकास अधिकारी विष्णू भोजे, दाटेगावच्या सरपंच कन्याकुमारी माने, उपसरपंच गिताबाई माने आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

समितीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सहभागावर विशेष भर देण्यात आला. यावेळी मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले.

मूल्यमापन कार्यक्रमात दाटेगावसह परिसरातील महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. युवक-युवती आणि ग्रामस्थही उत्साहाने सहभागी झाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, ग्रामस्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांबाबतही समितीने माहिती घेतली.

ग्रामपंचायत दाटेगावने लोकसहभागातून राबविलेल्या विविध विकासकामांची समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांनी विकासकामांसाठी घेतलेला पुढाकार, महिला बचत गटांची सक्रिय भूमिका आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले.
राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ मूल्यमापनापुरता मर्यादित राहिला नाही. ग्रामस्थांची एकजूट, महिलांचा सक्रिय सहभाग आणि लोकसहभागातून विकास साधण्याची सामूहिक इच्छाशक्ती यावेळी प्रकर्षाने दिसून आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये विकासाभिमुख स्पर्धा, लोकसहभाग आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला चालना मिळत असून, दाटेगावचा हा प्रयत्न इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.



06 September, 2026

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जास मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जास मुदतवाढ

हिंगोली, दि. ६ (जिमाका): राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जास मुदतवाढ* 


यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त  गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, या उद्देशाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.


या स्पर्धेसाठीचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके पटकावावीत, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

०००

04 September, 2026

पावसाच्या खंडाने पिकांवर ताण; जिल्हाधिकाऱ्यांची शेतावर जाऊन पाहणी

वडद व बोंडाळा येथे शेतावर जाऊन सोयाबीन, कापूस पिकांची घेतली सद्यस्थितीची माहिती

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली, दि. 4 (जिमाका) : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे व अल निनोच्या प्रभावामुळे हिंगोली तालुक्यातील पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः सोयाबीन व कापूस पिकांवर त्याचा परिणाम जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली तालुक्यातील वडद व बोंडाळा येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची त्यांनी यावेळी माहिती घेतली.


वडद येथे शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीन व कापूस पिकांची पाहणी करताना पावसाच्या खंडामुळे पिकांवर आलेला ताण जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिला. काही ठिकाणी पाण्याअभावी सोयाबीन व कापूस पिके सुकण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची अवस्था, उपलब्ध सिंचनाची साधने, जमिनीतील ओलावा आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांची माहिती जाणून घेतली. पावसाचा खंड लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.


दरम्यान, बोंडाळा येथे ‘कापूस उत्पादकता अभियान’ अर्थात ‘कापूस क्रांती’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘क्लोजर लागवड पद्धती’च्या प्रात्यक्षिक प्लॉटचीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाहणी केली. या लागवड पद्धतीमुळे कापूस पिकातील उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. आधुनिक व शास्त्रोक्त लागवड तंत्रज्ञानाचा वापर, पिकांचे योग्य व्यवस्थापन तसेच उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली.


पावसाचा खंड हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध आणि कार्यक्षम वापर करावा. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य पद्धतीने वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.



कृषी विभागाने पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, यावरही यावेळी भर देण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

*****************

आपले सरकार सेवा केंद्रांची अचानक तपासणी; अनियमिततेवर होणार कारवाई

गोरेगाव येथील केंद्राला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

हिंगोली, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमधून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील आपले सरकार सेवा केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली.


यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रामार्फत नागरिकांना विविध प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांशी संबंधित सेवांबाबत माहिती जाणून घेतली. केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा, नागरिकांना विहित मानदंडानुसार दिली जाणारी सेवा याबाबतही खात्री केली.


नागरिकांना आवश्यक सेवा विहित कालावधीत आणि शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केंद्र चालकांना दिल्या. तसेच गोरेगाव येथील अनधिकृत सीएससी केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.

जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. केंद्रे शासनाने निश्चित केलेल्या मानदंडांनुसार कार्यरत नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

परतीच्या मार्गावर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

हिंगोली, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इमारत बांधकामाची, सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राची पाहणी केली. पाहणी दौऱ्यावरून परतताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्यांच्या निदर्शनास आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सदरील ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

काम दर्जेदार करा

गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुरू असलेल्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती, कामाचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. बांधकामाचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

आयुष्मान उपकेंद्राला भेट

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. उपकेंद्रामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, उपलब्ध औषधसाठा, मनुष्यबळ तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


एक ट्रॅक्टर जप्त

पाहणी दौरा आटोपून परतत असताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आला. त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

***************

03 September, 2026

शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

 शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा


हिंगोली, दि. 3 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येतात. इयत्ता 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या योजनांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा.


ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग (इमाव), विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज) व विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी गृहपाल, मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.