21 August, 2026

राष्ट्रीय क्रीडा दिनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार

 


हिंगोली, दि. २१ (जिमाका) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा २९ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता येथे आयोजन  करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी कळवले आहे.

जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंनी त्यांच्या प्रमाणपत्रांची छायांकित प्रत २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावी.

या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी तसेच सत्कारासाठी पात्र खेळाडूंनी २५ ऑगस्टपर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  'महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर' अभियानाचा उत्साहात शुभारंभ  हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मृद व जलसंधारणाची घेतली शपथ






हिंगोली, दि. २१ (जिमाका):  महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून मृद व जलसंधारण करा, पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मृद व जलसंधारण ही शाश्वत विकासाची महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब नागरिकांनी जपून वापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोलीतील मृद व जलसंधारण विभागच्यावतीने मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरात महा-वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले होते.  आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी गुप्ता,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून महा-वॉकेथॉनला जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथून सुरूवात झाली.

उद्घाटनप्रसंगी आमदार श्री. बांगर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश उपस्थितांना दिला.  जलसंधारण अभियानाअंतर्गत प्रत्येक विभाग प्रमुखांनी तर 15  ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 दरम्यान त्यांच्या शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, असे सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी याप्रसंगी आवाहन केले.

मृदसंधारण, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.  जिल्हा परिषद प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निर्मल कॅफे, पाण्याची टाकी असा मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महा-वॉकेथॉनचा समारोप झाला.

महा-वॉकेथॉनमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, मृदक्षय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वॉकेथॉनप्रसंगी नागरिक, तरूणाईने जलजागृतीपर घोषणा दिल्या.

महा-वॉकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एम. शिंदे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास याचावाड, जलसंधारण अधिकारी अनंत घोलकर, विठ्ठल काळबांडे, उमेश अनमुलवाड, पंकज बारहाते, चैताली मेंते, श्रद्धा डाकोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पवन माने, मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हिंगोलीत २५ ऑगस्टपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


हिंगोली, दि. २१ (जिमाका) : श्रावण मास तसेच आगामी धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी ००:०१ वाजेपासून ८ सप्टेंबर रोजी २३:५९ वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सदरील आदेश निर्गमित केले आहेत. नागरिकांनी आदेशाचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शस्त्रे, काठ्या, दगड, स्फोटक व ज्वलनशील पदार्थ तसेच इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील, सार्वजनिक शांतता भंग होईल अथवा अराजक निर्माण होईल, अशा घोषणा, फलक, अंगविक्षेप किंवा कृती करण्यासही मनाई आहे.

जिल्ह्यात ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रावण सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला आदी धार्मिक सण-उत्सव होणार आहेत. तसेच विविध सामाजिक व राजकीय मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको व उपोषण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदरील आदेश लागू करण्यात आले आहेत.

शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याची विशेष परवानगी असलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना आदेश लागू राहणार नाहीत. विशेष परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील, असेही आदेशात नमूद आहे.

20 August, 2026

*हिंगोलीत उद्योजकता मेळाव्यात ७८ नवउद्योजकांचा सहभाग*

 

हिंगोली, दि. २० (जिमाका) : युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित उद्योजकता मेळाव्यात जिल्ह्यातील ७८ नवउद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळाव्यात विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धी आणि उद्योग विस्ताराच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली आणि ‘दे-आसरा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हिंगोली येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आयटीआयचे प्राचार्य रवी बोथीकर यांनी युवक आणि महिला बचत गटांनी अपयशाची भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. कौशल्य, सातत्य आणि योग्य नियोजनातून यशस्वी उद्योजक होता येते, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त अनिल कदम आणि जिल्हा उद्योग अधिकारी श्री.पतकी यांनी उद्योग उभारणीसाठी उपलब्ध शासकीय योजना, सुविधा आणि प्रोत्साहनपर योजनांची माहिती दिली. कर सल्लागार सुनील झवर यांनी करप्रणाली व आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

सावंत डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक भगवान सावंत यांनी उद्योग उभारणी व विस्तारातील प्रत्यक्ष अनुभव सांगितला. ‘दे-आसरा फाउंडेशन’च्या रुपाली श्रीमाळ आणि ऐश्वर्या कुलकर्णी यांनी व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय नीती याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपलब्ध आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि उद्योग विस्ताराच्या विविध बाबींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ टोणपे यांनी केले.

*जलसंधारण दिन विशेष*

 *जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया*

*-संजय राठोड*

*मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन*

पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधारआहे. बदलते हवामानआणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.

*जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे*

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

*गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन*

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते.

२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन देते.

*भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली*

भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.

*जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन*

जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची प्रक्रिया आहे.

*हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर*

आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.

गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.

*गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी*

या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्येमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे.विभागाच्या नव्या प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

*प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे*

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत.या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.

*जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ*

महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.“माती वाचवा , पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा”हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे.सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

*प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया*

जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.

जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—

*पाणी अडवूया… पाणी जिरवूया…*

*माती वाचवूया… पाणी जपूया…*

*आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया!*

0000

*‘महा-वॉकेथॉन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन* जलसंधारण दिनानिमित्त विशेष उपक्रम हिंगोली, दि. २० (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उद्या, २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता तीन किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. महा-वॉकेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल. माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 जलसंधारण दिनानिमित्त विशेष उपक्रम 

 हिंगोली, दि. २० (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उद्या, २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता तीन किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* 

महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. महा-वॉकेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.

माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

19 August, 2026

*हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र*



 - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 - ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी ४३ हजार ५२५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून ९ हजार ५९९ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

योजनेच्या जिल्हास्तरीय प्रक्रियेंतर्गत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निश्चिती करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.