.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
19 August, 2026
*हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र*
वयस्कर, बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या*
*मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर**अपलोड करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता*
विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावे -BSA प्रणालीद्वारे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांतील पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे, नातेवाईकामार्फत किंवा गावपातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक अथवा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्रातूनही ही सुविधा उपलब्ध आहे.
ही सेवा लाभार्थ्यांसाठी निशुल्क आहे. मात्र, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा घेतल्यास कमाल ५० रुपये सेवा शुल्क देय राहील. शासन निर्णय, दि. ७ मे २०२६ नुसार हयात प्रमाणपत्र सादर करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
*अशी करा प्रक्रिया*
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी प्रथम Google Play Store अथवा iOS वरून BSA (Beneficiary Satyapan App) आणि Aadhaar Face RD हे अॅप डाउनलोड करावे.
BSA अॅपमध्ये भाषा निवडून ‘Proceed For Device Registration’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवून Device Registration पूर्ण करावे.
त्यानंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे, त्या केंद्र किंवा राज्य पुरस्कृत योजनेची निवड करून ‘Beneficiary Verification’ हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक आणि उपलब्ध मोबाईल क्रमांक नोंदवून ‘Submit’ करावे.
यानंतर प्राप्त झालेला OTP नोंदवावा. त्यानंतर चेहरा ओळख (Face Capture) किंवा बोटांचे ठसे/डोळ्यांच्या बुबुळाची (Finger/Iris) पडताळणी यापैकी उपलब्ध पर्याय निवडावा. निवडलेल्या पर्यायानुसार पडताळणी पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र तयार होईल.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Digital Life Certificate डाउनलोड करावे. विशेष सहाय्य योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही कार्यवाही विहित पद्धतीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
**छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महावॉकेथॉन**
**हिंगोली, दि. १९ (जिमाका) :** ‘जलसंधारण दिना’निमित्त हिंगोली शहरात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता **‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’**चे आयोजन करण्यात आले आहे. तीन किलोमीटर अंतराची ही महावॉकेथॉन शहरातील प्रमुख मार्गांवरून होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.
महावॉकेथॉनचा प्रारंभ सकाळी ६ वाजता **छत्रपती शिवाजी महाराज पुतळा** येथून होणार आहे. तेथून **जिल्हा परिषद प्रशाला मैदान – नवीन न्यायालय इमारत – जिल्हाधिकारी कार्यालय – पोलीस अधीक्षक कार्यालय – नांदेड नाका – इंदिरा गांधी चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – निर्मल कॅफे – पाण्याची टाकी – जिल्हा परिषद प्रशाला मैदान** असा महावॉकेथॉनचा मार्ग राहणार आहे. जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महावॉकेथॉनची सांगता होईल.
**‘पाणी हेच जीवन, पाणी हेच भविष्य’** तसेच **‘जलसंधारण करू, पाणी वाचवा’** हा संदेश महावॉकेथॉनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. माती व पाण्याचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थी, युवक, अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी तसेच सर्व नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून **जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास हातभार लावावा**, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
18 August, 2026
*जलसंधारण दिनानिमित्त हिंगोलीत २१ ऑगस्टला ‘महा-वॉकेथॉन’*
हिंगोली, दि. १८ (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ३ किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
*‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’*
महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.
महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
*‘रिल्स’ स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस*
महा-वॉकेथॉनसोबतच १५ ते १९ ऑगस्टदरम्यान १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही स्पर्धेची थीम आहे.
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येईल.
रील ३० ते ६० सेकंदांची असावी. सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील स्वतःच्या सार्वजनिक Instagram खात्यावर पोस्ट करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरावा. विभागाच्या अधिकृत mahawalkathon2026 खात्याला टॅग करावे. त्यानंतर अधिकृत QR कोडद्वारे नोंदणी करून रीलची लिंक सादर करावी.
स्पर्धेतील प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास १५ हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला मैदान, हिंगोली येथे होईल. महा-वॉकेथॉन आणि रिल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.
माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्वळ यांनी केले आहे.
येलदरी ते शिवार: समृद्ध हिंगोलीचा नवा निर्धार!
पूर्णा, कयाधू नदीच्या तीरावर वसलेल्या हिंगोली जिल्ह्याची माती अत्यंत कसदार आहे. या मातीला जेव्हा पाण्याची जोड मिळते, तेव्हा शिवार सोन्यासारखे पिकते. मराठवाड्याच्या सिंचन इतिहासात येलदरी धरणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्णा नदीवर उभारलेला हा बहुउद्देशीय प्रकल्प केवळ दगड-मातीची भिंत नाही, तर हिंगोलीच्या कृषी आणि आर्थिक विकासाची खरी जीवनरेखा आहे. या प्रकल्पामुळे आपल्या भागात बागायती शेतीची पायाभरणी झाली.
मात्र, बदलत्या हवामानाच्या काळात केवळ एका मोठ्या धरणावर संपूर्ण जिल्ह्याचे भवितव्य अवलंबून ठेवता येत नाही. पावसाचा वाढता लहरीपणा आणि भूगर्भातील पाण्याची घटती पातळी हे आजचे भीषण वास्तव आहे. आजही हिंगोलीतील अनेक गावे सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळा सुरू झाला की शेतातील विहिरी तळ गाठतात आणि पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतात. हे चित्र बदलायचे असेल, तर आपल्याला मोठ्या धरणांच्या सोबतीला विकेंद्रित जलसंधारणाची भक्कम जोड द्यावी लागेल.
पाणी अडवा, पाणी जिरवा: एक शाश्वत विचार
शेतीसाठी सिंचनाचे पाणी किती मोलाचे असते, हे कोरडवाहू शेतकरी चांगल्या प्रकारे जाणतो. पाणी असेल तरच शेतात बारमाही पिके घेता येतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य सामावलेले असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी दिलेला "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा विचार याच भूमिकेतून पुढे आला. त्यांनी जलसंधारणाला राज्यव्यापी चळवळीचे स्वरूप दिले.
त्यांच्या याच अमूल्य कार्याचा सन्मान करण्यासाठी शासनाने २१ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राज्यभरात 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून निसर्गाचे देणे फेडण्याचा एक संकल्प आहे. मोठ्या धरणांवरील ताण कमी करून गावपातळीवर पाणी अडवणे आणि भूगर्भातील पाणीसाठा वाढवणे, हा यामागचा मूळ हेतू आहे.
शासकीय योजनेचे लोकचळवळीत रूपांतर
जलसंधारण ही केवळ योजना नाही. जोपर्यंत ही गावागावांतील लोकांची चळवळ बनत नाही, तोपर्यंत शाश्वत बदल घडणे कठीण आहे. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यानचा 'जलसंधारण सप्ताह' आणि पुढे २६ जानेवारीपर्यंत चालणारे विशेष अभियान हा याच लोकसहभागाचा मार्ग आहे.
पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभरात 'महा वॉकेथॉन'सारखे उपक्रम राबवले जात आहेत. 'माती वाचवा, पाणी वाचवा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा' हा संदेश घेऊन आजची तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तरुण पिढीला या चळवळीत सामावून घेतले जात आहे. जेव्हा गावातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी स्वतःला 'जलदूत' मानून पुढे येईल, तेव्हा पाण्याचे संवर्धन सहज साध्य होईल.
हिंगोलीच्या समृद्धीची गुरुकिल्ली: जलसिंचन
हिंगोली हा प्रामुख्याने हळद आणि केळी उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यातील हळदीला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख आहे. या 'पिवळ्या सोन्याची' शेती अधिक फुलवण्यासाठी मुबलक आणि वेळेवर मिळणारे पाणी हाच कळीचा घटक आहे. ज्या भागात पाण्याची शाश्वत सोय झाली, तेथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे.
जिल्ह्यातील उर्वरित कोरडवाहू पट्टा सिंचनाखाली आणणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नदी-नाल्यांचे खोलीकरण, पाझर तलावांची दुरुस्ती, शेततळ्यांची निर्मिती आणि मातीचे सलग समपातळी बांध घालणे या कामांना गती दिली जात आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शिवारातील पाणी शिवारातच अडवले गेले, तर कोरडवाहू शेतकरी देखील निश्चितपणे बागायती शेतीकडे वळेल.
जलसमृद्धीचा नवा निर्धार
पाणी हे केवळ निसर्गाचे साधन नाही, तर ते ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. पाणी अडवले तर मातीची धूप थांबते. माती वाचली तर जमिनीची सुपीकता टिकून राहते. जमिनीत ओलावा टिकून राहिला, तरच लहरी हवामानातही पिके तग धरू शकतात.
येलदरीच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगतानाच, आता प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अन् थेंब जिरवण्याचा ध्यास आपल्याला घ्यावा लागेल. हिंगोली जिल्ह्याला दुष्काळमुक्त, सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी प्रत्येकाने या जलसंधारणाच्या कार्यात आपले योगदान दिले पाहिजे. पाणी जपणे हीच आपल्या पुढच्या पिढीसाठी सर्वात मोठी शाश्वत संपत्ती ठरणार आहे.
- डॉ. श्याम टरके
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली


