15 August, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 







हिंगोली (जिमाका), दि. 15 : कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित विविध कार्यक्रमांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी प्रक्रिया उद्योग ही भविष्यातील शेतीची मुख्य दिशा आहे. केव्हीके हिंगोलीकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, प्रगत सिंचन पद्धती तसेच मोहफुलांसारख्या स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, प्रयोगशाळांचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसोबतच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच केव्हीकेच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाची पाहणी करून विशेषतः मोहफुलांपासून तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


आदिवासी महिलांना सायकल व्हील होचे वाटप


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदिवासी शेतकरी महिलांच्या श्रमाची बचत व्हावी तसेच शेतीकामे अधिक सुलभ व्हावीत, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सायकल व्हील हो’ चे वाटप करण्यात आले. या साधनामुळे महिलांना शेतीतील आंतरमशागत व तण नियंत्रणाची कामे अधिक सुलभपणे करता येणार आहेत.

यानंतर पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात मोह वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल केव्हीके हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

******

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

 

* वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा

* १०८ रुग्णवाहिका सेवेत वाढ करण्याचे निर्देश







हिंगोली (जिमाका), दि. 15 : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर, आवश्यक भौतिक सुविधांचे बळकटीकरण आणि विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्याच्या भौतिक सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी नमूद केले. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून नागरिकांना गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कॅन्सर रुग्णांच्या तपासणी व उपचारानंतरच्या देखरेखीवर भर

जिल्ह्यात कॅन्सरच्या संशयित रुग्णांची तपासणी प्रभावीपणे करण्यात यावी. कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारानंतरच्या पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) योग्य सनियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. आशा कार्यकर्त्यांमार्फत कॅन्सरग्रस्त महिलांच्या नियमित भेटी घेऊन त्यांच्या आरोग्यस्थितीची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.

या बैठकीत हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची गुणवत्ता व प्रगती यांचाही आढावा घेण्यात आला. बांधकामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत संदर्भ सेवा उपलब्ध होण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेची क्षमता वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यासाठी नव्याने आणखी ६ रुग्णवाहिकांची मागणी करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जिंगलचे अनावरण

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जिंगल टोनचे अनावरण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

*******

वीरमाता, वीरपत्नींच्या त्यागाला सलाम; त्यांच्या कुटुंबीयांच्या शासन सदैव पाठीशी– पालकमंत्री नरहरी झिरवाळ



* शिरडशहापूर येथे वीर योद्धा परिवार सन्मान सोहळा उत्साहात








हिंगोली(जिमाका), दि. १५  : देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या पतीचे किंवा मुलाचे दुःख मनात ठेवूनही त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या या त्यागाला आणि योगदानाला सलाम असून, शासन व समाज म्हणून सर्वजण वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ‘वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्या’त पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते.

यावेळी मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज, मुनिश्री १०८ उपशमयसागर महाराज, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मिलिंद यंबल आदी उपस्थित होते.

देशरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हिंगोली, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वीर जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागातून देशसेवेची प्रेरणा मिळते. अशा कुटुंबीयांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करत पालकमंत्री झिरवाळ यांनी वीरमाता व वीरपत्नींना सलाम केला. तसेच श्री शांती विद्या मंदिराच्या मंदिरासाठी आवश्यक असलेल्या सोलर व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी समयोचित भाषणातून वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद यंबल यांनी केले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

******

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलसंधारण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘महा वॉकॅथॉन’ लोगोचे अनावरण

 



हिंगोली (जिमाका), दि. 15 : जलसंधारणाचे महत्त्व, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त आयोजित ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या लोगोमध्ये ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अर्थात मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि सुरक्षित भविष्याचा संदेश देण्यात आला आहे. जलसंधारणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबरोबरच पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी लोकसहभाग वाढविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. ‘महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून ‘पाणी वाचवा, माती वाचवा आणि भविष्यातील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश व्यापक स्वरूपात पोहोचविण्यात येणार आहे.

******

80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देणार– पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 






पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला मुख्य ध्वजारोहण समारंभ

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन

जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण 

शेतकरी कर्जमुक्ती हाच राज्य शासनाचा मुख्य अजेंडा

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घेण्याचे आवाहन

जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; भूकंपरोधक इमारती रेट्रोफिटींगची प्रकिया सुरु


हिंगोली(जिमाका),दि. 15 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या साडेसात हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 62 कोटी 54 लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी श्री. झिरवाळ बोलत होते.

यावेळी आमदार खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर आणि राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते. 

पुढे बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सक्षमीकरणासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आवाहन केले. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे 43 हजार 541 लाभार्थी शेतकरी असून, 31 हजार 372 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मागील वर्षी थेट हस्तांतरणाद्वारे 491 कोटी रुपये वितरित केले असून, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार कृषीपंप ग्राहकांचे 572 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

देशात भारत निवडणूक आयोगाचे विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियान सुरु आहे. मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात हिंगोलीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 83 हजार 645 मतदारांचे गणनापत्र डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. नागरिकांनी 17 ऑगस्टपर्यंत गणनाप्रपत्र भरून देत या अभियानात आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा वितरणात हिंगोलीने राज्यात दुसरा व विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच फेब्रुवारी 2026 मध्ये सीसीटीएनएस कामगिरीत हिंगोली जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले.

येत्या 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त जलसंधारण सप्ताह आणि ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले असून, जिल्हावासीयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री झिरवाळ यांनी केले.

जिल्ह्यात सतत होत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक बांधकामासाठी इमारत सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली असून, नागरिकांच्या जीवित रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी ‘इंग्रजी काळ समृद्धी’ व पुस्तकपेटी उपक्रम राबविण्यात येत असून, भाषाज्ञान वृद्धीसाठी चौदाखडीचा स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये मतदार यादी सूक्ष्म निरीक्षणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी, विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक, विविध सामाजिक व विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा तसेच संस्थेचा जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पोलीस विभागातील अति उत्कृष्ट, उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांचा तसेच मिशन ऊर्जामध्ये महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा या विषयाची जनजागृती करणारे अधिकारी-कर्मचारी, हिंगोली पोलीस दलास डायल 112 कामकाजामध्ये महाराष्ट्र पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच सीसीटीएनसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच मिशन ऊर्जा कार्यक्रमात जनजागृती करणाऱ्या शाळा-महाविद्यालयाचा तसेच एनक्यूएस मानांकनात पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्ती व मृद व जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले.

या कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

14 August, 2026

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; 7 हजार 516 शेतकऱ्यांच्या खात्यात 62.54 कोटी रुपये जमा

 

जिल्ह्यातील 43 हजार 541 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 14 : शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 7 हजार 516 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 62 कोटी 54 लाख 18 हजार 374 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी नव्याने आर्थिक बळ मिळणार आहे.

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच ही यादी ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅक नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सोपी असून पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता ती पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण 43 हजार 541 पात्र शेतकरी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी व आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

**

विशेष लेख : माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

 




महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे.

दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र दिला. पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, पाझर तलाव, गाव तलाव, नाला बांध, माती बंधारे आणि अन्य छोट्या जलसंधारण संरचनांवर त्यांनी भर दिला. जलसंधारणाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देत त्यांनी या विषयाला लोकसहभागाची जोड दिली.

१९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि जलसंधारणाची कामे यांची सांगड घालून त्यांनी जलस्रोत निर्मितीला चालना दिली. जलसंधारण हे केवळ अभियांत्रिकीचे काम नसून गावागावातील नागरिकांच्या सहभागातून उभे राहणारे अभियान आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून स्पष्ट झाली. आज जलयुक्त शिवार, भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते.

            याच योगदानाची दखल घेत दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा २००३ पासून जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. मात्र, स्मृतिदिनाऐवजी जन्मदिवस अधिक उत्साहपूर्ण आणि लोकसहभागातून साजरा व्हावा, या विचारातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटकांशी चर्चा करून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यास मान्यता दिल्यानंतर शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीचा महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे.

व्यापक जनसहभागाची जोड

यंदाचा जलसंधारण दिन केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता त्याला व्यापक जनसहभागाची जोड देण्यात आली आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या अभियानातील सर्वात आकर्षक उपक्रम म्हणजे ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी तीन किलोमीटरची महा वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार नागरिकांच्या सहभागाचे उद्दिष्ट असून, राज्यभरातून तीन लाखांहून अधिक नागरिक प्रत्यक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, ‘माय भारत’, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

ही केवळ चालण्याची स्पर्धा नसून जलसंधारणासाठी जनजागृतीची सामूहिक पावले आहेत. वॉकथॉनच्या प्रारंभी सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी अडविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा यंदाच्या अभियानाचा मुख्य संदेश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेशही या चळवळीला दिशा देणार आहे.

युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. ‘रील फॉर सईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ या उपक्रमातून १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना मृद व जलसंधारणाचा संदेश सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे. ३० ते ६० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून मातीची धूप, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर संदेश देता येणार आहे. अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून युवकांना आपली कल्पकता सादर करता येणार आहे. #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात रिल्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

जलसंधारणाचा संस्कार पुढील पिढीवर व्हावा यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निबंध, चित्रकला, पोस्टर, वादविवाद स्पर्धा, जलसंधारणाची शपथ, ‘एक शाळा–एक शोषखड्डा’, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना जलसंधारणाशी जोडले जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या जलसंधारणविषयक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामांनाही गती दिली जाणार आहे. विविध योजनांतर्गत कामांचे भूमीपूजन, लोकार्पण आणि जलपूजन, शेततळी व जलस्रोतांची पाहणी, अमृत सरोवरांच्या परिसरात वृक्षारोपण, नाला, तलाव, विहीर आणि पाझर तलावांची लोकसहभागातून स्वच्छता अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक यांसारख्या उपक्रमांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

जलसंधारणाच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, लोकसहभागातून श्रमदान, जलस्रोतांचे संवर्धन आणि जनजागृती या माध्यमातून शासन आणि समाज यांच्यातील सहभाग अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समन्वय साधून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

            आज हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळीतील घट आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जलसुरक्षेचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत सुधाकरराव नाईक यांनी दशकांपूर्वी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. जलसंधारणाची कामे किती झाली यापेक्षा ती किती परिणामकारक ठरली, पाणी किती काळ टिकले आणि पुढील पिढीसाठी आपण किती जलसाठा निर्माण केला, हा खरा प्रश्न आहे.

            मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

२१ ऑगस्टचा ‘जलसंधारण दिन’ त्यामुळे केवळ एका महान नेत्याच्या स्मरणाचा दिवस न राहता महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी सामूहिक संकल्पाचा दिवस ठरला पाहिजे. सुधाकरराव नाईक यांना खरी आदरांजली त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात नाही, तर त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्यात आहे. प्रत्येक गावात जलस्रोत जपला, प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अडविला, प्रत्येक शाळेत जलसंधारणाचा संस्कार रुजविला आणि प्रत्येक नागरिकाने पाण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच ‘जलसंधारण दिना’चा खरा उद्देश साध्य होईल.

माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर जीवन सुरक्षित राहील आणि लोकसहभाग वाढला तर महाराष्ट्र जलसंपन्न बनेल. चला, सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाच्या विचारांना कृतीची जोड देऊया—‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा!’‍

-          गजानन पाटील,

विभागीय संर्पक अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

0000