प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी यादीत आपले नाव तपासावे
नाव नसल्यास तातडीने बीएलओशी संपर्क साधून नाव नोंदवावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
पत्रकारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार - विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे
हिंगोली, दि. 1 सप्टेंबर (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची तपासणी करावी. यादीत नाव नसल्यास संबंधित बीएलओशी तातडीने संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘पत्रकारांशी संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता बोलत होते. यावेळी लातूर विभागाचे विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, उपसंपादक अलका पाटील तसेच हिंगोली जिल्ह्यातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत. नावामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास किंवा पात्र असूनही नाव यादीत नसल्यास संबंधित बीएलओशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
औंढा नागनाथच्या विकासकामांना गती
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथच्या विकासाला मंजुरी मिळाली असून, त्याअनुषंगाने विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांना गती देऊन त्यांचा नागरिकांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
तसेच कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीतून जिल्ह्यातील तीन गावांमध्ये वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी संबंधित कंपनीला काम देण्यात आले आहे. या वर्गखोल्यांचे बांधकाम सीबीएसई पॅटर्ननुसार करण्यात येत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या
लातूर विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. पत्रकारांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सुविधा व योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकारांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधा, योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात येईल. पत्रकारांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे यांनी दिले.
यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी असलेल्या अधिस्वीकृती पत्रिका, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी आणि सन्मान योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विविध योजना, निर्णय आणि उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारिता प्रभावीपणे कार्य करते, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे यांनी जिल्हा माहिती कार्यालयास भेट देऊन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध कामकाजाची माहिती घेतली. कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना, उपक्रम, निर्णय तसेच लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी कार्याचा त्यांनी आढावा घेतला.
शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक विशाखा शेंडगे, लिपिक श्रीकांत देशमुख, मनोहर भारती, मानसी राऊत आदी उपस्थित होते.