.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
25 August, 2026
मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत शेतकरी जागृकता कार्यक्रम संपन्न
२०४ आश्रमशाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी आदिवासी विकास विभाग: अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार
हिंगोली दि. 25, (जिमाका) राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागामार्फत सध्या राज्यभरात 'अॅनिमिया निवारण कार्यक्रम' युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत अवघ्या दीड महिन्यात २०४ शाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५,८६८ तर ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२,४२० तसेच ६ एकलव्य शाळांमधील १,३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 'सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स' (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची एचबी पातळी तपासली जात आहे. या मोहिमेत ३७,९१९ विद्यार्थ्यांचे तर ४१,७०५ विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. नाशिक विभागातील १०४ शाळांमधील एकूण ४१,४६९ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यात ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१,३९३ तर २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९२२७ आणि ३ एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ठाणे विभागातील ८१ शाळांममधील एकूण ३३,४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२,०५४ तर, १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १०,८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे २,८९८ आणि १,८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळी मोजण्यात आली आहे. अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १,८८५ विद्यार्थी आणि ३ अनुदानित आश्रमशाळेच्या १,०१३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ विद्यार्थी आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १,२९५ विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
दरम्यान, या तपासणी मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये एचबीचे प्रमाण कमी आढळले, त्यांना पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विभागाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
चौकट
विभागनिहाय विद्यार्थी संख्या
नाशिक- ४१,४६९
ठाणे- ३३,४२६
अमरावती- २,८९८
नागपूर- १,८१३
प्रतिक्रिया
आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 'अॅनिमिया निवारण कार्यक्रमा'च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयासारख्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्धपातळीवर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे.
-लीना बनसोड, आयुक्त
आदिवासी विकास विभाग
दिव्यांग सक्षमीकरणाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा
हिंगोली दि. 25, (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सेवा व सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत केल्या.
बैठकीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यान्वयन व मनुष्यबळ बळकटीकरण, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामाचा आढावा, दिव्यांग व्यक्ती सर्वेक्षण, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी केंद्रीय अनुदानाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतच्या कार्यवाहीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे, पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक दत्ताजी केंद्रे, छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी सेवा संघाचे संचालक विजय घाणेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली.
बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सन 2026-27 मधील 18 प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली. या सर्व प्रकरणांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेत याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे, पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गुट्टे यांनी बैठकीत विविध प्रकरणांची तपशीलवार माहिती सादर केली.
27 ऑगस्टला खेलो इंडिया संवाद-युवा कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. २५ ऑगस्ट : आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), हिंगोली यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 27 ऑगस्ट 2026 रोजी न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे करण्यात आले आहे.
मेरा युवा भारत, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतीक मेजर ध्यानचंदजी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्ताने देशभरात युवकांचा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मिती यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि युवकांच्या आकांक्षा याबाबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आभासी संवाद, 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1 हजार 600 ठिकाणांहून 8 लाखांहून अधिक युवक या कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवाद आयोजित करण्यात येणार आहे. या संवादामध्ये भारतातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेला बदल, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था याबाबत चर्चा केली जाणार आहे.
कार्यक्रमात ‘युवा संवाद’आयोजित करून युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना आणि आकांक्षा मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
या चर्चेत पुढील प्रमुख विषयांवर विचारमंथन करण्यात येईल :
क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण – दर्जेदार क्रीडा सुविधा, प्रशिक्षक, प्रशिक्षण व्यवस्था आणि तळागाळातील क्रीडा संधी उपलब्ध करून देणे.
2036 ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन – वैज्ञानिक पद्धतीने क्रीडा प्रतिभा शोधणे, खेळाडूंची निवड व विकास आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण.
युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग – युवकांना निर्णयप्रक्रिया, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेणे.
विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण – भविष्याभिमुख कौशल्ये, स्वयंसेवा, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध संधींमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे.
युवकांच्या सूचना व कल्पना क्युआर कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quiz मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
*****
24 August, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा
पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.
*प्रतिक्रिया :*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.