20 August, 2026

*हिंगोलीत उद्योजकता मेळाव्यात ७८ नवउद्योजकांचा सहभाग*

 

हिंगोली, दि. २० (जिमाका) : युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित उद्योजकता मेळाव्यात जिल्ह्यातील ७८ नवउद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळाव्यात विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धी आणि उद्योग विस्ताराच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली आणि ‘दे-आसरा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हिंगोली येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आयटीआयचे प्राचार्य रवी बोथीकर यांनी युवक आणि महिला बचत गटांनी अपयशाची भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. कौशल्य, सातत्य आणि योग्य नियोजनातून यशस्वी उद्योजक होता येते, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त अनिल कदम आणि जिल्हा उद्योग अधिकारी श्री.पतकी यांनी उद्योग उभारणीसाठी उपलब्ध शासकीय योजना, सुविधा आणि प्रोत्साहनपर योजनांची माहिती दिली. कर सल्लागार सुनील झवर यांनी करप्रणाली व आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

सावंत डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक भगवान सावंत यांनी उद्योग उभारणी व विस्तारातील प्रत्यक्ष अनुभव सांगितला. ‘दे-आसरा फाउंडेशन’च्या रुपाली श्रीमाळ आणि ऐश्वर्या कुलकर्णी यांनी व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय नीती याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपलब्ध आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि उद्योग विस्ताराच्या विविध बाबींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ टोणपे यांनी केले.

*जलसंधारण दिन विशेष*

 *जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया*

*-संजय राठोड*

*मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन*

पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधारआहे. बदलते हवामानआणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.

*जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे*

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

*गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन*

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते.

२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन देते.

*भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली*

भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.

*जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन*

जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची प्रक्रिया आहे.

*हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर*

आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.

गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.

*गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी*

या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्येमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे.विभागाच्या नव्या प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

*प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे*

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत.या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.

*जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ*

महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.“माती वाचवा , पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा”हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे.सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

*प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया*

जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.

जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—

*पाणी अडवूया… पाणी जिरवूया…*

*माती वाचवूया… पाणी जपूया…*

*आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया!*

0000

*‘महा-वॉकेथॉन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन* जलसंधारण दिनानिमित्त विशेष उपक्रम हिंगोली, दि. २० (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उद्या, २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता तीन किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. महा-वॉकेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल. माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 जलसंधारण दिनानिमित्त विशेष उपक्रम 

 हिंगोली, दि. २० (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उद्या, २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता तीन किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* 

महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. महा-वॉकेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.

माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

19 August, 2026

*हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र*



 - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 - ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी ४३ हजार ५२५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून ९ हजार ५९९ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

योजनेच्या जिल्हास्तरीय प्रक्रियेंतर्गत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निश्चिती करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

वयस्कर, बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या*

*
*शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्च‍ित*
                                      - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
 कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना

          हिंगोली, दि. १९ (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाताना आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जावे. योजनेच्या पोर्टलवरील संबंधित क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे कर्जखात्याची माहिती तपासल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. यादीमधील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची विस्तृत माहिती दिसेल. या माहितीनुसार मान्य, अमान्य पर्यायाची नोंद झाल्यानंतर ऑनलाइन बोटाच्या ठशांची नोंद घेण्यात येईल.

आधार प्रमाणीकरण करताना बोटांचा ठसा जुळत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. तीन प्रयत्नांनंतरही आधार प्रमाणीकरण झाले नाही, तर ‘"प्रमाणीकरण शक्य नाही" हा पर्याय निवडावा. यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाने आधार प्रमाणीकरण करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदारांकडे पाठविण्यात येईल.

तहसीलदारांकडून संबंधित शेतकऱ्याची कागदपत्रे (उदा.आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 उतारा इ.) तपासून ओळख निश्चित केली जाईल. आधार क्रमांक आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओळख निश्चित झाल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. वयस्कर तसेच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाबाबत निश्च‍ित केलेल्या कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

*मयत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर**अपलोड करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता*



‍ हिंगोली, दि. १९ (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती त्यांच्या कायदेशीर वारसांकडून घेऊन योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. संबंधित बँकांनी या कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बँकांना दिले आहेत.

योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमध्ये मयत शेतकरी असल्यास, त्याच्या वारसाची माहिती घेऊन कर्जखात्याचा वारस नोंदवावा. त्यानंतर पोर्टलवरील‘Upload Deceased Accounts सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करावी.

बँकेने मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हिस्से कर्जखात्यामध्ये नमूद करावेत. मयत शेतकऱ्यांऐवजी वारस खातेदाराची माहिती नुमना तक्त्यात ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी. वारसांची माहिती भरताना BR-ID, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, AgriStack Registry, CIF, बचत खाते क्रमांक, PAC ID, PACS Membership Number, Loan Account Number आणि कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहिती देणे आवश्यक आहे.

एका BR-ID अंतर्गत किमान एक आणि कमाल सहा कायदेशीर वारसांची नोंद करता येईल. प्रत्येक वारसाचा कर्जातील हिस्सा नोंदविणे आवश्यक आहे. सर्व वारसांच्या हिस्स्यांची एकूण बेरीज १०० टक्के असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक हिस्सा असल्यास प्रणाली नोंदणी स्वीकारणार नाही.

माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित कर्जखात्याची आवश्यक तपासणी करावी. तसेच तक्रार निवारण स्थिती आणि e-KYC पडताळणीसह प्रणालीतील प्राथमिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे.

माहिती सादर केल्यानंतर शासन निर्णयातील निकषांनुसार स्वयंचलित छाननी केली जाईल. वारस आयकरदाता आहे किंवा नाही, तसेच तो शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाईल. निकषांनुसार अपात्र आढळणाऱ्या वारसांना योजनेच्या लाभासाठी अपात्र घोषित केले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित बँकांनी मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक कार्यवाही करून वारसांची माहिती पोर्टलवर तातडीने अद्ययावत करावी, अशा सूचनाही ‍जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.

विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावे -BSA प्रणालीद्वारे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा

 


हिंगोली, दि. १९ (जिमाका) : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांतील पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे, नातेवाईकामार्फत किंवा गावपातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक अथवा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्रातूनही ही सुविधा उपलब्ध आहे.


ही सेवा लाभार्थ्यांसाठी निशुल्क आहे. मात्र, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा घेतल्यास  कमाल ५० रुपये सेवा शुल्क देय राहील. शासन निर्णय, दि. ७ मे २०२६ नुसार हयात प्रमाणपत्र सादर करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.


*अशी करा प्रक्रिया*


हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी प्रथम Google Play Store अथवा iOS वरून BSA (Beneficiary Satyapan App) आणि Aadhaar Face RD हे अॅप डाउनलोड करावे.


BSA अॅपमध्ये भाषा निवडून ‘Proceed For Device Registration’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवून Device Registration पूर्ण करावे.


त्यानंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे, त्या केंद्र किंवा राज्य पुरस्कृत योजनेची निवड करून ‘Beneficiary Verification’ हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक आणि उपलब्ध मोबाईल क्रमांक नोंदवून ‘Submit’ करावे.


यानंतर प्राप्त झालेला OTP नोंदवावा. त्यानंतर चेहरा ओळख (Face Capture) किंवा बोटांचे ठसे/डोळ्यांच्या बुबुळाची (Finger/Iris) पडताळणी यापैकी उपलब्ध पर्याय निवडावा. निवडलेल्या पर्यायानुसार पडताळणी पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र तयार होईल.


प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Digital Life Certificate डाउनलोड करावे. विशेष सहाय्य योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही कार्यवाही विहित पद्धतीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.