18 August, 2026

*जलसंधारण दिनानिमित्त हिंगोलीत २१ ऑगस्टला ‘महा-वॉकेथॉन’*


हिंगोली, दि. १८ (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ३ किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* 

महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

*‘रिल्स’ स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस*

महा-वॉकेथॉनसोबतच १५ ते १९ ऑगस्टदरम्यान १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही स्पर्धेची थीम आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येईल.

रील ३० ते ६० सेकंदांची असावी. सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील स्वतःच्या सार्वजनिक Instagram खात्यावर पोस्ट करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरावा. विभागाच्या अधिकृत mahawalkathon2026 खात्याला टॅग करावे. त्यानंतर अधिकृत QR कोडद्वारे नोंदणी करून रीलची लिंक सादर करावी.

स्पर्धेतील प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास १५ हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला मैदान, हिंगोली येथे होईल. महा-वॉकेथॉन आणि रिल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.

माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्वळ यांनी केले आहे.

येलदरी ते शिवार: समृद्ध हिंगोलीचा नवा निर्धार!



पूर्णा, कयाधू नदीच्या तीरावर वसलेल्या हिंगोली जिल्ह्याची माती अत्यंत कसदार आहे. या मातीला जेव्हा पाण्याची जोड मिळते, तेव्हा शिवार सोन्यासारखे पिकते. मराठवाड्याच्या सिंचन इतिहासात येलदरी धरणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्णा नदीवर उभारलेला हा बहुउद्देशीय प्रकल्प केवळ दगड-मातीची भिंत नाही, तर हिंगोलीच्या कृषी आणि आर्थिक विकासाची खरी जीवनरेखा आहे. या प्रकल्पामुळे आपल्या भागात बागायती शेतीची पायाभरणी झाली.

मात्र, बदलत्या हवामानाच्या काळात केवळ एका मोठ्या धरणावर संपूर्ण जिल्ह्याचे भवितव्य अवलंबून ठेवता येत नाही. पावसाचा वाढता लहरीपणा आणि भूगर्भातील पाण्याची घटती पातळी हे आजचे भीषण वास्तव आहे. आजही हिंगोलीतील अनेक गावे सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळा सुरू झाला की शेतातील विहिरी तळ गाठतात आणि पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतात. हे चित्र बदलायचे असेल, तर आपल्याला मोठ्या धरणांच्या सोबतीला विकेंद्रित जलसंधारणाची भक्कम जोड द्यावी लागेल.

 पाणी अडवा, पाणी जिरवा: एक शाश्वत विचार 

शेतीसाठी सिंचनाचे पाणी किती मोलाचे असते, हे कोरडवाहू शेतकरी चांगल्या प्रकारे जाणतो. पाणी असेल तरच शेतात बारमाही पिके घेता येतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य सामावलेले असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी दिलेला "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा विचार याच भूमिकेतून पुढे आला. त्यांनी जलसंधारणाला राज्यव्यापी चळवळीचे स्वरूप दिले.

त्यांच्या याच अमूल्य कार्याचा सन्मान करण्यासाठी शासनाने २१ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राज्यभरात 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून निसर्गाचे देणे फेडण्याचा एक संकल्प आहे. मोठ्या धरणांवरील ताण कमी करून गावपातळीवर पाणी अडवणे आणि भूगर्भातील पाणीसाठा वाढवणे, हा यामागचा मूळ हेतू आहे.

 शासकीय योजनेचे लोकचळवळीत रूपांतर 

जलसंधारण ही केवळ योजना नाही. जोपर्यंत ही गावागावांतील लोकांची चळवळ बनत नाही, तोपर्यंत शाश्वत बदल घडणे कठीण आहे. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यानचा 'जलसंधारण सप्ताह' आणि पुढे २६ जानेवारीपर्यंत चालणारे विशेष अभियान हा याच लोकसहभागाचा मार्ग आहे.

पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभरात 'महा वॉकेथॉन'सारखे उपक्रम राबवले जात आहेत. 'माती वाचवा, पाणी वाचवा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा' हा संदेश घेऊन आजची तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तरुण पिढीला या चळवळीत सामावून घेतले जात आहे. जेव्हा गावातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी स्वतःला 'जलदूत' मानून पुढे येईल, तेव्हा पाण्याचे संवर्धन सहज साध्य होईल.

 हिंगोलीच्या समृद्धीची गुरुकिल्ली: जलसिंचन 

हिंगोली हा प्रामुख्याने हळद आणि केळी उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यातील हळदीला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख आहे. या 'पिवळ्या सोन्याची' शेती अधिक फुलवण्यासाठी मुबलक आणि वेळेवर मिळणारे पाणी हाच कळीचा घटक आहे. ज्या भागात पाण्याची शाश्वत सोय झाली, तेथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे.

जिल्ह्यातील उर्वरित कोरडवाहू पट्टा सिंचनाखाली आणणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नदी-नाल्यांचे खोलीकरण, पाझर तलावांची दुरुस्ती, शेततळ्यांची निर्मिती आणि मातीचे सलग समपातळी बांध घालणे या कामांना गती दिली जात आहे.  जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शिवारातील पाणी शिवारातच अडवले गेले, तर कोरडवाहू शेतकरी देखील निश्चितपणे बागायती शेतीकडे वळेल.

 जलसमृद्धीचा नवा निर्धार 

पाणी हे केवळ निसर्गाचे साधन नाही, तर ते ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. पाणी अडवले तर मातीची धूप थांबते. माती वाचली तर जमिनीची सुपीकता टिकून राहते. जमिनीत ओलावा टिकून राहिला, तरच लहरी हवामानातही पिके तग धरू शकतात.

येलदरीच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगतानाच, आता प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अन् थेंब जिरवण्याचा ध्यास आपल्याला घ्यावा लागेल. हिंगोली जिल्ह्याला दुष्काळमुक्त, सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी प्रत्येकाने या जलसंधारणाच्या कार्यात आपले योगदान दिले पाहिजे. पाणी जपणे हीच आपल्या पुढच्या पिढीसाठी सर्वात मोठी शाश्वत संपत्ती ठरणार आहे.

- डॉ. श्याम टरके 

प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

17 August, 2026

*विशेष लेख* *जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र*

 

           पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.

            महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

            स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ घेऊन या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’, रील्स स्पर्धा, जलपूजन, श्रमदान आणि जनजागृतीचे उपक्रम नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आयोजित केले जात आहेत. 

*जलसंधारण म्हणजे काय*

पावसाचे पाणी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात जमिनीवर अडविणे, त्याचा वेग कमी करणे, जमिनीत मुरविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, याला व्यापक अर्थाने जलसंधारण म्हणता येईल. जलसंधारण म्हणजे केवळ बंधारा बांधणे नव्हे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिथे पडतो, तिथेच त्याचा अधिकाधिक उपयोग करणे, ही त्यामागची मूलभूत संकल्पना आहे.

      महाराष्ट्रासाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. पावसाचे भौगोलिक आणि कालिक वितरण असमान आहे. काही भागात अतिवृष्टी होते, तर काही भागात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ‘पाणी आहे, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नाही’ हीच मोठी समस्या आहे. जलसंधारणातून या विसंगतीवर मात करता येते.

*महाराष्ट्राच्या जलसंधारणाची मुळे*

महाराष्ट्रात जलसंधारणाची परंपरा नवी नाही. गावागावातील तलाव, बंधारे, पाझर तलाव, विहिरी आणि पारंपरिक जलव्यवस्थापन ही ग्रामीण जीवनाची पूर्वापार साधने आहेत. ही परंपरा थेट छत्रपती शिवरायांचा काळापर्यंत जाते. गड किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्याची मोठी परंपरा आहे. यावर महाराष्ट्राने शिवकालीन पाणी साठवण योजनाही सुरु केली आहे. आधुनिक शासकीय पातळीवर मात्र जलसंधारणाला स्वतंत्र संस्थात्मक दिशा मिळाली ती स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या स्थापनेमुळे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही 1972 च्या दुष्काळानंतर जलसंधारण माध्यमातून ‘जलक्रांन्ती’ घडवून आणली होती. त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवून पाणलोट क्षेत्र वाढवले मोठ्या धरणांपेक्षा बॅरेजेसला महत्व दिले.

*जलयुक्त शिवारातून नव्या पर्वाला सुरुवात*

जलसंधारणाला मोठ्या प्रमाणावर लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने २०१४ नंतरचा काळ महत्त्वाचा ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या योजनेतून पुढे हजारो हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. लक्षावधी टीएमसी पाणी साठा निर्माण झाला. हजारो गावे पाणीदार झाली. त्यांचा शाश्वत विकास झाला.

         आज जलयुक्त शिवार २.०च्या माध्यमातूनही जलसंधारण, जलसाक्षरता, लोकसहभाग आणि उपलब्ध भूजलाच्या शाश्वत वापरावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणातून परिवर्तन घडविणे आवश्यक आहे.

*योजनांची ताकद, लोकसहभागाची साथ*

महाराष्ट्राने जलसंधारणासाठी अनेक मार्ग स्वीकारले आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला २०१६ मध्ये सुरुवात करून शेतकऱ्यांना स्वतःची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देण्यात आली.

     ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना तर जलसंधारण आणि शेती यांची सांगड घालणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे जलाशयाची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. २०२४ मध्ये ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याशिवाय विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, शेततळी, जलस्रोतांमधील गाळ काढणे, बांधावर वृक्ष व बांबू लागवड अशा असंख्य उपाययोजना राज्यात राबविल्या जात आहेत.

*देशातील प्रेरणादायी उपक्रम*

          राजस्थानच्या अलवरमध्ये पारंपरिक ‘जोहड’ या पावसाच्या पाण्याच्या साठवण संरचनांचे पुनरुज्जीवन करून गावकऱ्यांनी जलव्यवस्थापनाचे प्रभावी मॉडेल उभे केले. जलतज्ज्ञ आणि ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकसहभागातून कोरड्या प्रदेशात जलस्रोत पुनरुज्जीवित झाले आणि अरवरीसारख्या नद्यांना पुन्हा प्रवाह मिळाला.

महाराष्ट्रात राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार ही दोन उदाहरणे तितकीच प्रेरणादायी आहेत. राळेगणसिद्धीत नाला बांध, गली प्लगिंग, समतल चर, पाझर तलाव आणि लोकसहभागातून दुष्काळी गावाचा कायापालट झाला. हिवरे बाजारने पाण्याचे बजेट, पिकांचे नियोजन, ठिबक सिंचन, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण यांची सांगड घालत जलसुरक्षेचे आदर्श मॉडेल निर्माण केले.

*नागरिकांनी काय करायचे*

          शासन आपले काम करीत आहे; परंतु जलसंधारणाची खरी यशोगाथा नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या छतावरील पाणी साठविण्याची किंवा जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करावी. गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा. शेतकऱ्यांनी शेततळी, बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, ठिबक-सिंचन आणि पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार नियोजन करावे. गावातील नाले, तलाव, बंधारे आणि पारंपरिक जलस्रोत यांची स्वच्छता व देखभाल करावी. शक्य तेथे श्रमदान करावे. पाणी वाया जाणार नाही, याची प्रत्येक कुटुंबाने काळजी घ्यावी.आणि पावसाळा सुरु आहे. वृक्ष लागवडीत कुटूंबाने दरवर्षी एक या प्रमाणे वृक्ष लागवड करावी.

             जलसंधारण हा केवळ मृद व जलसंधारण विभागाचा विषय नाही; तो कृषीचा, ग्रामविकासाचा, पर्यावरणाचा, अर्थव्यवस्थेचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विषय आहे. कारण पाणी वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर गावाची अर्थव्यवस्था वाचेल आणि गाव समृद्ध झाले तर महाराष्ट्र समृद्ध होईल.

म्हणून २१ ऑगस्टचा जलसंधारण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस न राहता प्रत्येकाच्या मनात एक संकल्प निर्माण करणारा दिवस ठरू दे. चला !जलसंधारणातून ‘बारमाही हिरवा महाराष्ट्र!’

  घडवूया! 

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर

मो.क्र.9702858777

*जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन*

 *‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया*

मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.


जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.


“चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

००००

16 August, 2026

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा


* १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहात रील्स स्पर्धेचे आयोजन




हिंगोली दि १५,(जिमाका) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 

दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६  हा कालावधी 'जलसंधारण सप्ताह' म्हणून राबविण्यात येणार आहे. 

या दरम्यान मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे. 

१५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी 'रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत युवक - युवतींनी उत्स्फूर्त  सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.


यानिमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या सप्ताहात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. सहभागी स्पर्धकांनी व्हिडीओ/रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ/ रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकांने तयार केलेली Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

रिल्स बनवण्यासाठी 

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य हे विषय देण्यात आले आहेत.


रील्स करीता गुणांकन पद्धती पुढीलप्रमाणे आहे. 

विषय व संदेश-३० गुण, कल्पकता-२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश-२० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता-१५ गुण, Instagram Engagement -१० गुण 

असे एकूण - १०० गुण असणार आहेत.  केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

राज्यासाठी एकच अधिकृत  #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे

"एक रील ... मातीसाठी !, एक रील ... पाण्यासाठी !, एक रील ... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

वरील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

*****

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

 



हिंगोली, दि १६ (जिमाका): शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. 


दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी 'महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर' या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. 


या उपक्रमाची थीम 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सीक्यूर टूमारो' अशी असून 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा' हे घोषवाक्य आहे. दि. २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.


माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि.२१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 


 *क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी* 

या कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतील.


सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 


२१ ऑगस्ट रोजी महा- वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

0000

15 August, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 







हिंगोली (जिमाका), दि. 15 : कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित विविध कार्यक्रमांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी प्रक्रिया उद्योग ही भविष्यातील शेतीची मुख्य दिशा आहे. केव्हीके हिंगोलीकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, प्रगत सिंचन पद्धती तसेच मोहफुलांसारख्या स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, प्रयोगशाळांचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसोबतच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच केव्हीकेच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाची पाहणी करून विशेषतः मोहफुलांपासून तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


आदिवासी महिलांना सायकल व्हील होचे वाटप


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदिवासी शेतकरी महिलांच्या श्रमाची बचत व्हावी तसेच शेतीकामे अधिक सुलभ व्हावीत, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सायकल व्हील हो’ चे वाटप करण्यात आले. या साधनामुळे महिलांना शेतीतील आंतरमशागत व तण नियंत्रणाची कामे अधिक सुलभपणे करता येणार आहेत.

यानंतर पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात मोह वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल केव्हीके हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

******