05 August, 2026

हिंगोली शहरातील 11 अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 

कोटपा कायद्यांतर्गत 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल; जिल्हाभर मोहीम सुरूच राहणार




हिंगोली (जिमाका), दि. 5 : जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरातील अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील नारायण नगर, खटकाळी बायपास, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पोस्ट ऑफिस रोड परिसरातील अवैध पान टपऱ्यांची तपासणी केली.

या कारवाईदरम्यान 11 पान टपऱ्यांवर कोटपा कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तरित्या केली. पोलीस विभागातर्फे पोलीस हवालदार शेख मोहसीन व पोलीस शिपाई भूषण जोगे यांनी सहभाग घेतला. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्यासह कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ), आनंद साळवे (मेडिकल सोशल वर्कर) तसेच मराठा मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थांच्या अनधिकृत विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी आणि कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात दंडात्मक कारवाईची मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

******

हिंगोलीत ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ

 

तरुणांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प


हिंगोली (जिमाका), दि. 5 : युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत ‘मेरा युवा भारत, हिंगोली’ यांच्या वतीने डॉ. हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ डेंटल कॉलेज, हिंगोली येथे ‘जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विशेष अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली ग्रामीण) नारायण देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “नशा ही केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला अवनतीच्या मार्गावर नेते. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर देशातील युवा शक्तीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.”

या कार्यक्रमास डॉ. हंसराज खुराणा, प्राचार्य डॉ. विवेक चौकसे, रासेयो, जिल्हा समन्वयक डॉ. पवन वासणिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर इंगोले, कार्यक्रम समन्वयक डॉ. श्वेता हाबू, सहायक पोलीस निरीक्षक विकास आडे, ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगावीकर तसेच अनिल ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर तसेच मानसिक स्थितीवर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रासेयोच्या स्वयंसेवकांनी जनजागृतीपर विचार मांडत उपस्थितांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली.


नशामुक्त समाजनिर्मितीसाठी जिल्हाभर जनजागृती


‘मेरा युवा भारत’च्या प्रतिनिधींनी या अभियानाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार असून, प्रत्येक गावातील तरुणांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. युवा वर्गाने व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सक्षम समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणीत सांगवीकर यांनी केले, तर अनिल ढेंगे यांनी आभार मानले. उपस्थितांच्या सहभागाने कार्यक्रमाची सांगता झाली.

****** 





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी

 



हिंगोली (जिमाका), दि. 5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण 44 हजार 223 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील 44 हजार 223 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 27 हजार 111 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर 17 हजार 966 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

प्रलंबित ई-केवायसीपैकी 16 हजार 687 शेतकरी राष्ट्रीयकृत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व व्यापारी बँकांशी संबंधित आहेत. यामध्ये एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी बँकांच्या शाखांमध्ये ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. 

या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्रलंबित ई-केवायसीबाबत लाभार्थी शेतकऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. 

*****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी तात्काळ पूर्ण करावी-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. 5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने दि. 2 जून 2026 रोजी घेतला आहे. शासन निर्णयातील निकषानुसार या योजनेतील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची ॲग्रिस्टॅक आधार क्रमांकावर आधारित शेतकरी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक आधार क्रमांकावर आधारित नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून ॲग्रिस्टॅक नोंदणी नसलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. 

या अनुषंगाने तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी कृषी विभागाच्या समन्वयाने कॅम्पचे आयोजन करून शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र असलेल्या आणि अद्याप ॲग्रिस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ॲग्रिस्टॅक नोंदणीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून जिल्हा संसाधन व्यक्ती पदासाठी 31 ऑगस्‍टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 5 : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीमार्फत जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा व हाताळणी सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कळमनुरी रोड, हिंगोली येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

या पदासाठी उमेदवार हा सर्व प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना व जटिल प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे ज्ञान व अनुभव असलेला असावा. अन्न प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान विकास, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारास अन्न प्रक्रिया उद्योगातील किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव किंवा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याची  एकूण 12 पदे भरावयाची आहेत.

निवड झालेल्या संसाधन व्यक्तींमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या सहाय्यानुसार मोबदला देण्यात येईल. मंजुरीनंतर प्रत्येक बँक कर्जासाठी 20 हजार रुपयापर्यंत मोबदला देण्यात येणार असून, त्यापैकी 50 टक्के रक्कम बँक कर्ज मंजुरीनंतर आणि उर्वरित 50 टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, आधार नोंदणी, एफएसएसएआयची उत्पादन मानके पूर्ण करणे, उद्योगाची कार्यवाही तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाणार आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचना, सविस्तर पात्रता, पारिश्रमिक व इतर अटी व शर्ती www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

******

04 August, 2026

भारत सरकार शिष्यवृत्तीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक व प्राचार्यांची कार्यशाळा संपन्न

 

• महाडीबीटीवरील अडचणी दूर करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या सूचना


हिंगोली (जिमाका), दि. 4 : हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये व वरिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची कार्यशाळा आज (दि. 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता शिंदे, सहायक संचालक तथा सहायक सरकारी अभियोक्त्या श्रीमती देवयानी सरदेशपांडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी आणि बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीची शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नियोजनबद्ध कार्यवाही करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठी पात्र लाभार्थ्यांचे मॅपिंग व नोंदणी, आधार व बँक खाते संलग्नता, संस्थास्तरीय उत्तरदायित्व, जनजागृती व मदत केंद्रे, त्रुटी निवारण तसेच नियमित देखरेख व आढावा या बाबींवर विशेष भर देण्यात आला.

पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के मॅपिंग व नोंदणी

सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शाळा-महाविद्यालयांमधील युडायस+ नुसार प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा आधार आधारित डेटाबेस तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील वर्षी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अथवा अर्ज करता न आलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा यावर्षी शंभर टक्के समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले.

आधार व बँक खाते संलग्नतेवर भर

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते व एनपीसीआय मँपींग किंवा आधार संलग्न करण्यासाठी भारतीय पोस्ट बँक तसेच स्थानिक बँकांच्या सहकार्याने विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला तसेच बँक खात्याशी संबंधित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शाळांचे मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर अनिवार्य कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देण्यात आला. संस्थास्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या शाळा व महाविद्यालयांबाबत शिस्तभंगाची कारवाई तसेच एसएलए निश्चित करण्याबाबत माहिती देण्यात आली.

ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीची माहिती पोहोचविण्यासाठी दवंडी, माहितीपत्रके तसेच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात ‘शिष्यवृत्ती मदत केंद्र’ व हेल्पलाइन कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी ओळखून त्यांचे तातडीने निराकरण करण्याबरोबरच मागील वर्षी अर्ज बाद झालेल्या कारणांचे वर्गीकरण करून त्या त्रुटींची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

शिष्यवृत्ती अर्जाच्या प्रगतीचा जिल्हास्तरावर दर सोमवारी आढावा घेण्यात येणार आहे. सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांनी शिष्यवृत्ती अर्जांची अद्ययावत माहिती दर सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक राजू ससाणे यांनी केले. कार्यशाळेस हिंगोली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच महाविद्यालयातील शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****** 




शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी

 

मॉड्युलर ओटी, क्रिटिकल केअर ब्लॉक व कॅथ लॅबमधील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना



हिंगोली (जिमाका), दि. 4 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज मंगळवार, (दि. 4) रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, क्रिटिकल केअर ब्लॉक तसेच कॅथ लॅबच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.

या पाहणीदरम्यान काही कामे व आवश्यक दुरुस्तीची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी यांना संबंधित कामांमध्ये आढळलेल्या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून घेण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ती कामे विलंब न करता पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


कॅथ लॅब व क्रिटिकल केअर ब्लॉकसाठी विद्युत सुविधांना प्राधान्य


कॅथ लॅब तसेच क्रिटिकल केअर ब्लॉकच्या कार्यान्वयनासाठी अखंडित व पुरेसा विद्युत पुरवठा अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग यांना कॅथ लॅब व क्रिटिकल केअर ब्लॉक येथे तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या सुविधांमुळे जिल्ह्यातील रुग्णांना हृदयविकार तसेच गंभीर स्वरूपाच्या आजारांवर आवश्यक उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

******