हिंगोली (जिमाका) दि. 12 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ‘ढाई आखर’ पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेचा विषय “अ लेटर टू माय मदर अर्थ : माय प्रामीस टू प्रोटेक्ट नेचर” अर्थात “माझ्या पृथ्वी-मातेला एक पत्र : निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन” असा आहे. या स्पर्धेत विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परभणी विभागाचे डाक अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.
ही पत्रलेखन स्पर्धा १८ वर्षांपर्यंत व १८ वर्षांपेक्षा जास्त अशा दोन वयोगटांत घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी पत्रामध्ये आपले नाव, पत्ता तसेच वयाचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. वयाची गणना २ सप्टेंबर २०२६ रोजी ग्राह्य धरली जाणार आहे.
स्पर्धकांनी पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई-४०० ००१ यांच्या नावे लिहून जवळच्या टपाल कार्यालयामार्फत पाठवावे. पत्र एफोर आकाराच्या कोऱ्या कागदावर लिहिणे आवश्यक असून, पाकिटातून पाठविण्यात येणाऱ्या पत्राची शब्दमर्यादा १ हजार शब्द आहे. अंतर्देशीय पत्राचा वापर केल्यास त्याची शब्दमर्यादा ५०० शब्द राहील.
पत्र पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
राज्यस्तरावर प्रत्येक वयोगटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १० हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी अनुक्रमे ५० हजार रुपये, २५ हजार रुपये व २० हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
निसर्ग संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्याची संधी देणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्र लेखन स्पर्धेत विद्यार्थी, युवक तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.
*******







