06 August, 2026

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय इमारतींचे रेट्रोफिटिंग करण्यावर भर , सीबीआरआयच्या तज्ज्ञांकडून अधिकारी, अभियंत्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन

 


हिंगोली (जिमाका), दि. 6 : जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने केंद्रीय इमारत संशोधन संस्था, रुडकी, उत्तराखंड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व अभियंत्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, केंद्रीय इमारत संशोधन संस्थेचे मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक अजय चौरसीया तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात भूकंपाच्या घटना घडत असल्याने भविष्यात होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जुन्या इमारतींचे बळकटीकरण, भूकंपरोधक इमारतींची उभारणी तसेच रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून विद्यमान इमारती अधिक सुरक्षित करण्याबाबत या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

भूकंपग्रस्त गावांचा केंद्रीय इमारत संशोधन संस्थेमार्फत सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय इमारतींचे रेट्रोफिटिंग करण्यात येणार आहे. या कामाचे प्रात्यक्षिक वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे रेट्रोफिटिंग करून दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

नागरिकांनीही भूकंपरोधक बांधकामाचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून विद्यमान घरांची सुरक्षितता वाढविता येते. या तंत्रज्ञानामुळे भूकंपाच्या वेळी जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार माफक खर्चात आपल्या घरांचे रेट्रोफिटिंग करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कार्यशाळेत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कमी खर्चात घर अधिक सुरक्षित कसे करता येईल, याबाबत व्हिडिओ व सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. भूकंपरोधक इमारतींची उभारणी, विद्यमान इमारतींचे रेट्रोफिटिंग, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्याचे योग्य प्रमाण आणि वापरण्याची पद्धत याबाबत सीबीआरआयचे तज्ज्ञ वरिष्ठ वैज्ञानिक अजय चौरसिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

भूकंपप्रवण भागातील इमारतींची सुरक्षितता वाढविण्यासाठी अभियांत्रिकीच्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे, जुन्या इमारतींची तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांचे संरचनात्मक बळकटीकरण करणे या बाबींवरही कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, अभियंते तसेच संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******* 







मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला हिंगोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद




हिंगोली(जिमाका), दि. ६ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला जिल्हाभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ११ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १ हजार ९२८ नागरिकांनी आरोग्य तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यक उपचारांचा लाभ घेतला.

नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांमध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आवश्यक औषधोपचार, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा सुलभपणे उपलब्ध झाल्या.

दरम्यान, सुरक्षित रक्तसाठा उपलब्ध राहावा तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने अभियानांतर्गत ३ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १४२ स्वेच्छा रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संलग्न रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच स्वेच्छा रक्तदाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत भविष्यातही अशा लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून सांगण्यात आले.

*******

समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. ६ : स्मार्ट प्रकल्पांतर्गत टीएसए (Palladium) यांच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या प्रशिक्षण सहभागृहात करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेची प्रस्तावना जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड यांनी केली.

या कार्यशाळेत समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळांना व्यवस्थापन कौशल्य विकास या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, लातूरचे कृषी व्यवसाय सहयोगी मंगेश लाभांडे यांनी व्यवस्थापन कौशल्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच अन्न सुरक्षा विषयावर विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, लातूरचे अन्न सुरक्षा अधिकारी सचिन कच्छवे यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, जिल्हा समन्वयक गजानन खिरोडकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व समुदाय आधारित संस्थांचे संचालक उपस्थित होते.

महिला संचालक मंडळाच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांचे प्रभावी व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता वाढविणे, व्यवसायवृद्धी तसेच मूल्यसाखळीच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.

कार्यशाळेच्या समारोपावेळी पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ तथा कृषी व्यवसाय सल्लागार जी. एच. कच्छवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

******* 





05 August, 2026

हिंगोली शहरातील 11 अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 

कोटपा कायद्यांतर्गत 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल; जिल्हाभर मोहीम सुरूच राहणार




हिंगोली (जिमाका), दि. 5 : जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरातील अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील नारायण नगर, खटकाळी बायपास, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पोस्ट ऑफिस रोड परिसरातील अवैध पान टपऱ्यांची तपासणी केली.

या कारवाईदरम्यान 11 पान टपऱ्यांवर कोटपा कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तरित्या केली. पोलीस विभागातर्फे पोलीस हवालदार शेख मोहसीन व पोलीस शिपाई भूषण जोगे यांनी सहभाग घेतला. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्यासह कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ), आनंद साळवे (मेडिकल सोशल वर्कर) तसेच मराठा मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थांच्या अनधिकृत विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी आणि कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात दंडात्मक कारवाईची मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

******

हिंगोलीत ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ

 

तरुणांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प


हिंगोली (जिमाका), दि. 5 : युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत ‘मेरा युवा भारत, हिंगोली’ यांच्या वतीने डॉ. हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ डेंटल कॉलेज, हिंगोली येथे ‘जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विशेष अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली ग्रामीण) नारायण देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “नशा ही केवळ एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला अवनतीच्या मार्गावर नेते. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर देशातील युवा शक्तीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.”

या कार्यक्रमास डॉ. हंसराज खुराणा, प्राचार्य डॉ. विवेक चौकसे, रासेयो, जिल्हा समन्वयक डॉ. पवन वासणिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर इंगोले, कार्यक्रम समन्वयक डॉ. श्वेता हाबू, सहायक पोलीस निरीक्षक विकास आडे, ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगावीकर तसेच अनिल ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर तसेच मानसिक स्थितीवर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रासेयोच्या स्वयंसेवकांनी जनजागृतीपर विचार मांडत उपस्थितांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली.


नशामुक्त समाजनिर्मितीसाठी जिल्हाभर जनजागृती


‘मेरा युवा भारत’च्या प्रतिनिधींनी या अभियानाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार असून, प्रत्येक गावातील तरुणांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. युवा वर्गाने व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सक्षम समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणीत सांगवीकर यांनी केले, तर अनिल ढेंगे यांनी आभार मानले. उपस्थितांच्या सहभागाने कार्यक्रमाची सांगता झाली.

****** 





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी

 



हिंगोली (जिमाका), दि. 5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण 44 हजार 223 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील 44 हजार 223 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 27 हजार 111 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर 17 हजार 966 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

प्रलंबित ई-केवायसीपैकी 16 हजार 687 शेतकरी राष्ट्रीयकृत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व व्यापारी बँकांशी संबंधित आहेत. यामध्ये एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी बँकांच्या शाखांमध्ये ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. 

या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्रलंबित ई-केवायसीबाबत लाभार्थी शेतकऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. 

*****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी तात्काळ पूर्ण करावी-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. 5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने दि. 2 जून 2026 रोजी घेतला आहे. शासन निर्णयातील निकषानुसार या योजनेतील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची ॲग्रिस्टॅक आधार क्रमांकावर आधारित शेतकरी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक आधार क्रमांकावर आधारित नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून ॲग्रिस्टॅक नोंदणी नसलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. 

या अनुषंगाने तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी कृषी विभागाच्या समन्वयाने कॅम्पचे आयोजन करून शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र असलेल्या आणि अद्याप ॲग्रिस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ॲग्रिस्टॅक नोंदणीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******