20 May, 2026

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत.

राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे.

या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले असून, प्राधिकरणाला संबंधित केंद्रांची तपासणी, झडती तसेच नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. क्षेत्रीय स्तरावर अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार व संस्था यांनी अद्याप प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.


दंड व शिक्षेच्या तरतुदी :

कलम 4 व 5 अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 50 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 1 लाखांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात अथवा प्रसिद्धी केल्यास दोष सिद्ध झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. २ लाखांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यामात्रांचाच वापर करावा. सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासून नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्यावी. कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून पशुधनाचे संरक्षण करावे.


शेतकऱ्यांना होणारे फायदे :

सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन मिळणार आहे. उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढणार आहे. वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास साध्य होणार आहे. दुग्ध व्यवसायात स्थैर्य निर्माण होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

*******

19 May, 2026

हप्ता रखडलेल्या 'लाडक्या बहिणीं’ना टप्प्याटप्प्याने मिळणार लाभ

 


हिंगोली (जिमाका), दि. १९ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च व एप्रिल २०२६ या महिन्यांचे हप्ते इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. मात्र, शासन स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, हिंगोली यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून लाभ प्राप्त न झालेल्या लाडक्या बहिणींनी सोशल मीडियावरील अथवा इतर अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******

18 May, 2026

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी


• आदर्श आचारसंहिता लागू 




हिंगोली (जिमाका), दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार, २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, १ जून २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २ जून २०२६ रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवार, ४ जून २०२६ अशी आहे.

निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरुवार, २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

*******

सेवा क्षेत्रातील रोजगार संधींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन



हिंगोली (जिमाका), दि. १८ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. २२ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात सेवा क्षेत्रातील नामांकित कंपनी व आस्थापना सहभागी होणार असून त्यामध्ये कैरोस सेक्युरिटी हेल्थ अॅन्ड कॅम्पोसाईट सर्व्हिस प्रा. लि., सिकिंद्राबाद तसेच पलटन सेक्युरिटी फोर्स, हिंगोली या आस्थापनांचा समावेश आहे. संबंधित आस्थापनांकडून एकूण १०० रिक्त पदांची मागणी प्राप्त झाली असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

१० वी, १२ वी, पदवीधर तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा.

त्यानंतर उमेदवारांनी दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-३, दुसरा मजला, हिंगोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२४५७४ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

****

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी संप

 


* संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ औषधे  खरेदी करावीत


हिंगोली (जिमाका), दि. १८ : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला असल्याबाबतचे निवेदन अन्न व औषध प्रशासन विभागास प्राप्त झाले आहे.

या संपामध्ये संघटनेच्या सदस्यांनी सहभागी न होण्याबाबत दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली असली, तरी ज्या रुग्णांना नियमित औषधांची आवश्यकता आहे अशा रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

तसेच बंद कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. ना. सी. भालेराव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९४०५७८३६३६ वर संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

****

17 May, 2026

अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई

 


* मसोड येथे संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या जप्त; 20.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 




हिंगोली (जिमाका), दि. 17 : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 20 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 16 मे 2026 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार मसोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकची कृषी विभागाच्या पथकाने कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ‘आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर (राजस्थान)’ यांचे बिल असलेली संशयास्पद जिप्सम पावडर आढळून आली. सदर ट्रकमधून 40 किलो वजनाच्या एकूण 500 गोण्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद खताचे नमुने घेऊन ते शासकीय खत तपासणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून प्राप्त निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या कारवाईत जिपचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी लक्ष्मण काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज राठोड, गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके व वसमत पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामेश्वर गवळी यांनी सहभाग घेतला.

पथकाने 500 बॅगा संशयास्पद जिप्सम पावडर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा मोटर्स कंपनीचा RJ 07 GD 7095 क्रमांकाचा ट्रक जप्त केला आहे.

या प्रकरणात श्री. राम रतन (रा. सियागाव का मोहल्ला, स्वरूपदेसार, जि. बिकानेर, राजस्थान) व इतर एक जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कळमनुरी गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके यांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, विभागीय कृषी अधिकारी अशोक तिडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

********

15 May, 2026

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

हिंगोली(जिमाका), दि. 15 : जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळ पाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांना गती देऊन नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

तसेच, नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडण्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजनांसाठी महावितरणकडून विद्युत जोडणी प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल दि. 20 मे 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेतला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी व मुद्द्यांची पूर्तता आठ दिवसांच्या आत करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

******