हिंगोली, दि. २२ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये लवकरच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात मतदार मॅपींगच्या कामाला वेग देण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज ९४-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत मॅपींगच्या कामकाजाची पडताळणी केली.
जिल्ह्यात मतदार मॅपींगची प्रक्रिया दिनांक २० जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ९२-वसमत मतदारसंघात ८७.१७ टक्के, ९३-कळमनुरी मतदारसंघात ९०.२० टक्के आणि ९४-हिंगोली मतदारसंघात ८७.७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण प्रगती दर ८८.३६ टक्के असून अद्याप सुमारे १ लाख १४ हजार मतदारांचे मॅपींग बाकी आहे.
कामकाजात समाधानकारक प्रगती न झाल्यामुळे ५५ टक्क्यांपेक्षा कमी मॅपींग असलेल्या १२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मतदार मॅपींग १०० टक्के पूर्ण करण्यासाठी दिनांक २५ व २६ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात दिवसभर काम करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार सिताराम साळसुंदर व मंगला मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आपल्या पालक/आजोबांच्या नावाचा तपशील संबंधित केंद्रस्तरीय अधिका-याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
*****















