16 March, 2026

समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी घेण्यात आलेल्या समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3  व 4 फेब्रुवारी 2026 रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेकरिता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी ) उत्तीर्ण असल्यास त्याबाबतची माहिती सर्व उमेदवारांनी https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर दि. 16 मार्च  ते 21 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन भरावी.

ही माहिती केवळ दिलेल्या लिंकवरच सादर करणे बंधनकारक असून ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

दरम्यान, परीक्षेची गुणपडताळणी तसेच रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घेण्यासाठी https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx या लिंकवर दि. 16 मार्च  ते 31 मार्च 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहे. गुण पडताळणीसाठी  प्रती  पेपर रुपये 500 इतके शुल्क सदर लिंकद्वारे भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित उमेदवारांच्या ई-मेलवर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती ई-मेल, पत्र किंवा इतर माध्यमांद्वारे सादर केल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच निश्चित मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  

 

*******

हृदयविकारग्रस्त संशयित विद्यार्थ्यांसाठी टुडी-इको तपासणी शिबीर

 


 

 

·         जिल्ह्यातील 75 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची  टुडी-इको तपासणी, 10 विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील हृदयविकारग्रस्त संशयित विद्यार्थ्यांसाठी आज सोमवार, (दि.16) रोजी येथील जिल्हा रुग्णालयात टुडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव या तालुक्यांतील 75 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची  दुडी-इको तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 10 विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत बालाजी हॉस्पिटल, मुंबई येथे मोफत करण्यात येणार आहे.

या तपासणी शिबिरासाठी  मुंबई येथील भायखळा येथील बालाजी  हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री मिश्रा (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. प्रतिक मिश्रा व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांची तपासणी केली.

या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय अधीक्षक  डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, बाल स्वास्थ्य डॉ. शैलेजा कुप्पास्वामी, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, भूलतज्ञ डॉ. नितीन पुरोहित, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. अमोल देशमुख, बालरोग तज्ञ डॉ. नितीन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बी. चिंचकर, श्रीमती आशा क्षीरसागर, श्रीमती कदम, डॉ. मोसीन (आयुष्यमान भारत समन्वयक), डॉ. संतोष नांदूरकर (डीईआयसी मॅनेजर), लक्ष्मण गाभणे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसीमधील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, एएनएम, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका यांनी परिश्रम घेतले.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून शस्त्रक्रिया व उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी दैनंदिन जीवनात हृदयविकारासंदर्भात जागरूक राहून वेळोवेळी टुडी-इको तपासणी करून आजाराचे वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

 

******

महारेशीम अभियानास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

 


हिंगोली(जिमाका), दि. 16 : रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत जिल्ह्यात दि. 4 फेब्रुवारी 2026 पासून महारेशीम अभियान राबविण्यात येत असून या अभियानास जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.

अभियान सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील 120 शेतकऱ्यांनी नोंदणी फी भरून रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील 78 गावांमध्ये एकूण 447 शेतकऱ्यांनी सुमारे 454 एकर क्षेत्रावर तुती लागवड केलेली आहे. यापैकी अनेक शेतकरी वर्षाला 4 ते 5 किटक संगोपनाच्या बॅच घेऊन त्यातून दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही किमान एक एकर तुती लागवड करून आपले वार्षिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे आपले सरकार पोर्टल मार्फत किंवा काही अडचण असल्यास ऑफलाईन पद्धतीने जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करून तुती लागवड करावी. नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना तुती लागवड, किटक संगोपन गृह, साहित्य आदी बाबींसाठी शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (म.न.रे.गा.), सिल्क समग्र व पोकरा योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

म.न.रे.गा. योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये तुती लागवड करून यशस्वीपणे कोष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी सुमारे 4.32 लाख रुपये अनुदान देय आहे. तसेच इतर योजनांमधूनही या उद्योगासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

*******

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ

 

 



हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात  समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत  सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रँक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, मागासवर्गीय मुला - मुलींसाठी शासकीय वसतिगृह, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी शासकीय निवासी शाळा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि राजर्षि शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना यासह विविध योजनांचा समावेश आहे. 

तसेच मागासवर्गीय मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी शासकीय निवासी शाळा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. 

हिंगोली जिल्ह्यातील  अनुसचित जाती व मागास प्रवर्गातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे, कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागदकर, जिल्हा माहिती अधिकारी  प्रभाकर बारहाते, उपसंपादक चंद्रकांत कारभारी आदींची उपस्थिती होती. 

******* 





14 March, 2026

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये ५ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपयांची १३१ प्रकरणे निकाली




हिंगोली (जिमाका), दि. १४ : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय परभणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील न्यायालयात दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर आर. घुगे, सचिव अॅड. मिलींद कांबळे तसेच जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या लोकन्यायालयात प्रलंबित असलेली ५०१ प्रकरणे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व ३ हजार ६२७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित १२८ प्रकरणे व दाखलपूर्व ३ प्रकरणे अशी एकूण १३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडीच्या आधारे एकूण ५ कोटी ५८ लाख ९१ हजार ६५३ रुपये इतक्या रकमेवर समझोता करण्यात येऊन संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधीज्ञ यांचा समावेश असलेली एकूण सहा पॅनल गठीत करण्यात आली होती.

या पॅनलचे प्रमुख म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एस. एन. माने-गाडेकर (जिल्हा न्यायाधीश-१), आर. एस. रोटे (तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२), पी. जी. महाळंकर (२रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), श्रीमती पी. आर. पमनानी (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), श्रीमती डी. व्ही. भंडारी (२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) व श्रीमती एस. एस. पळसुळे (तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) यांनी कामकाज पाहिले.


*अपघातातील मृत्यू प्रकरणात ५७ लाखांची नुकसानभरपाई*


या लोकन्यायालयात एक वर्षापूर्वी झालेल्या अपघातात समरजितसिंग रघुवंशी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नी आरती रघुवंशी यांनी नुकसानभरपाईसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरण तडजोडीने निकाली निघून लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून त्यांना ५७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला. हे प्रकरण आर. एस. रोटे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ यांच्या पॅनलवर निकाली काढण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी पुढील दि. ९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.

*******

जल महोत्सव अभियानांतर्गत आडगाव मुटकुळे येथे ‘जल अर्पण दिन’ उत्साहात


• जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

 



हिंगोली, दि. १४ (जिमाका) : जल महोत्सव अभियानांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अध्यक्ष राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे ‘जल अर्पण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी उप विभागीय अधिकारी योगेशकुमार मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) समृद्धी दिवाने, कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे, गटविकास अधिकारी माया वानखेडे, उपअभियंता श्री. शिंदे, शाखा अभियंता जाधव, नितीन रायबोले, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, ग्रामपंचायत अधिकारी आर. बी. हेलगंड उपस्थित होते.

 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद हिंगोली व पंचायत समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे ग्रामस्थांना हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने झाली. भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कलश घेऊन प्रभातफेरीद्वारे गावातील प्रमुख मार्गांवरून पाण्याच्या टाकीपर्यंत जलदिंडी काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीस्थळी जलदेवतेच्या कलशाचे पूजन करून जल अर्पण करण्यात आले.

यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे शाश्वत, स्वच्छ व दर्जेदार पाणी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा उद्देश साध्य झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. तसेच ‘जल तारा’ योजनेअंतर्गत पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी पाणी पुनर्भरणाच्या उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जलजीवन मिशनचा उद्देश गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे दरडोई ५५ लिटर स्वच्छ व दर्जेदार पाणी पुरवठा करणे हा असून तो साध्य झाल्याचे सांगितले. तसेच आता या योजनेची देखभाल, दुरुस्ती व पाणी गुणवत्तेची जबाबदारी ग्रामस्थांची असून ही योजना ग्रामस्थांच्या मालकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शाळा व स्मशानभूमीच्या प्रश्नांबाबतही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) समृद्धी दिवाने यांनी केले. कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे यांनी नळ पाणीपुरवठा योजनेबाबत तांत्रिक माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनीर पठाण व महेश थोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र सरकटे यांनी मानले. यावेळी आशा वर्कर, बचत गटाच्या महिला, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

*****

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आध्यात्मिक मानवंदना


 “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” कार्यक्रम हिंगोली येथे आयोजन 



   हिंगोली, दि. १७ मार्च – महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील तेजस्वी संत व्यक्तिमत्त्व असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता शिवाजी देशमुख सभागृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

   संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी, भावार्थदीपिका यांसारख्या ग्रंथांद्वारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मांडले. समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजमनात प्रबोधनाची ज्योत पेटवली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनावर स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम त्यांच्या विचारसंपदेचा आणि संतपरंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे.

   या कार्यक्रमात “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या संकल्पनेवर आधारित विशेष सादरीकरण होणार असून प्रख्यात व्याख्याते व स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार श्री. गणेश शिंदे यांचे संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मदर्शनावर आणि त्यांच्या विचारांच्या सामाजिक परिणामांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानयोग, भक्तियोग आणि समाजप्रबोधन या संत परंपरेतील महत्त्वपूर्ण मूल्यांचा उलगडा होणार आहे.

   सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. संतपरंपरेचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजात आध्यात्मिक जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

   हिंगोली व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्याचे अभ्यासक तसेच भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समृद्ध अध्यात्मपरंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

******