11 March, 2026

हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; घाबरण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


• तीन दिवसांचा बफर साठा 


हिंगोली, (जिमाका) दि. ११: अमेरिका-इराण  यांच्यात युद्ध सुरू असले तरीही ‌जिल्ह्यात पुरेसा गँस सिलिंडरचा साठा असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हावासीयांना केले आहे. 

  जिल्ह्यातील गँस वितरणात गॅस पुरवठा स्थिती सध्या पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून जाण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात एकूण १३ गॅस एजन्सी कार्यरत असून एकूण ३,७४,४७८ ग्राहकांना गॅस पुरवठा केला जात आहे. सध्या ४,४३५ घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करताना रुग्णालये, वसतिगृहे तसेच इतर शासकीय संस्थांना प्राधान्य दिले जात आहे.

तसेच गॅस प्लांटमध्ये घरगुती सिलिंडरचा सुमारे ३ दिवसांचा बफर साठा उपलब्ध आहे. वितरकांकडेही सुमारे दीड दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याने पुरवठा सुरळीत सुरू आहे.

सध्याची परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे गॅसचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

******



वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा ग्रंथालय ठरणार डिटॉक्स सेंटर

 


 

·         वाचक सभासद नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष वाचक सभासद नोंदणी अभियानाला विद्यार्थी, निवासी डॉक्टर, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय क्षेत्रातील धावपळ व ताणतणाव दूर करण्यासाठी वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक भावी डॉक्टरांनी ग्रंथालयाचे सभासद होण्याबाबत मोठी उत्सुकता दर्शविली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने या विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप-अधिष्ठाता राजहर्ष हनुमंते यांची विशेष उपस्थिती होती.

या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेच्या ताणतणावातून मानसिक ताजेपणा मिळविण्यासाठी वाचन अत्यंत उपयुक्त ठरते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शासकीय जिल्हा ग्रंथालय हे केवळ वाचनालय नसून ते एक प्रकारचे ‘डिजिटल  डिटॉक्स  सेंटर’ असल्याचे सांगत उत्तम पुस्तके मनासाठी ‘नैसर्गिक अँटी-डिप्रेसंट’प्रमाणे कार्य करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

मानसशास्त्रातील ‘बिब्लिओथेरपी’ (ग्रंथोपचार) या संकल्पनेचा संदर्भ देत दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी ‘व्हिटॅमिन-आर’ अर्थात वाचनाचा नियमित डोस आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय परिभाषेत मांडलेल्या या संकल्पनेला उपस्थित वैद्यकीय विद्यार्थी व प्राध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

येथील नेहरू नगर, रिसाला नाका येथे असलेल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात अवांतर वाचनासाठी हजारो पुस्तके, कथा-कादंबऱ्या, थोर व्यक्तींची चरित्रे तसेच पीजी नीट, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथांचा मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता चक्रधर मुंगल, उप-अधिष्ठाता राजहर्ष हनुमंते, प्रशासकीय अधिकारी प्रशांत चांदजकर, प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी तसेच शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे कर्मचारी शंभुनाथ दुभळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. ताणतणाव मुक्तीसाठी राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या आवाहनाला प्रतिसाद देत लवकरच मोठ्या संख्येने विद्यार्थी ग्रंथालयाचे सभासद होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

*****

समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार सत्र 2024-25 व सन 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्या वर्षासाठी आणि ज्या पुरस्काराकरिता अर्ज करण्यात येणार आहे त्या वर्षासाठी संबंधित पुरस्कारासाठी शासनाने निर्धारित केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर असा विचारात घेण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, सन 2024-25 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 असा ग्राह्य धरला जाणार आहे.

इच्छुक संस्था व व्यक्तींनी सदर पुरस्कारांसाठी विहित नमुन्यात अर्ज करून संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात दिनांक 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कारांसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयात उपलब्ध असून, तसेच https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही अर्जाचा नमुना उपलब्ध आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

******

आज हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

 

 

* जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहीमेचे उद्घाटन


 

हिंगोली, (जिमाका), दि. 11 : सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथे आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहीमेचे उद्घघाटन करण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस हि अत्यंत सुरक्षित लस आहे. 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वा वाढदिवस न केलेल्या मुलींना पालकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

लसीकरण झालेल्या मुलींना लसीकरण प्रमाण पत्र व पुष्पगुछ देऊन गौरव करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण करून घेण्याचा पहिला बहुमान कु. वेदिका साहेबराव हराळ हिला मिळाला असून, एकूण 15 मुलींना आज लसीकरण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ पडोळे, डॉ. हराळ व प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथील कर्मचारी चमू उपस्थित होता.

 

वसमत येथेही लसीकरण

 

उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे नगराध्यक्ष श्रीमती सुनीता बाहेती यांच्या हस्ते लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसारे, डॉ. सनाउल्ला खान उपस्थित होते.

****** 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची सेनगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी

 


 

·         प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीने निराकरण करण्याच्या दिल्या सूचना

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी, धानोरा बंजारा, बरडा, वझर खुर्द आणि बन या गावांना भेट देऊन विविध शासकीय योजनांची व प्रलंबित कामांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीने निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या दौऱ्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी नमूद गावांमधील प्रलंबित ई-केवायसी (नैसर्गिक आपत्ती, पुरवठा, संजय गांधी योजना) कामांचा आढावा घ्यावा, लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तरांची  तपासणी  करावी, अशा सूचना देण्यात आल्या. यासोबतच ई-चावडी, घोषणापत्र-४, ई-हक्क प्रणालीअंतर्गत तलाठी स्तरावर प्राप्त झालेल्या प्रलंबित अर्जांचा आढावा घेऊन ते निकाली काढावेत तसेच प्रलंबित ई-फेरफार (नोंदणीकृत व अनोंदणीकृत) प्रकरणांची तपासणी करून महसूल विषयक तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) हिंगोली यांनी नमूद सर्व गावांमध्ये रोहयो विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित गावांमधील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करावी, ई-केवायसी कामांचा आढावा घ्यावा व लाभार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करावे. तर अधीक्षक अभियंता, महावितरण यांनी वीज विषयक कामांची पाहणी करून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वरीलप्रमाणे नमूद सर्व कामांचा सविस्तर आढावा घेऊन अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित गावांतील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची व शाळा परिसराची, उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

***** 













13 मार्च रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता वितरित


हिंगोली (जिमाका), दि. 11 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते दि. 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथून वितरित करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 21 हप्त्यांद्वारे सुमारे 39 हजार 300 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सद्यस्थितीत भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण केलेल्या 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 13 मार्च रोजी सुमारे 1 हजार 837 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी कार्यालये, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), शेतकरी उत्पादक संघटना (FPO) तसेच सहकारी पतसंस्था (PACS) येथे आयोजित करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

10 March, 2026

एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक

 

एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक

 

·         प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळणार एचपीव्ही लस

·         जिल्ह्यातील मुलींना एचपीव्ही लस घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि.10:  दैनंदिन जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद येथील सभागृहामध्ये एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. चक्रधर   मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलजा कुप्पास्वामी, गट विकास अधिकारी माया वानखडे, अनिल मुंढे, प्रफुल्ल तोटेवाड, सुरेश कांबळे, यांच्यासह इतर  विभाग प्रमुख, सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

14 वर्षे पूर्ण झालेल्या पण 15 वा वाढदिवस साजरा न केलेल्या (जन्म तारीख 8 मार्च 2011 ते 7 मार्च 2012 या कालावधीत जन्मलेल्या) जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाणार आहे. 

            गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासन एचपीव्ही सुरक्षित लसीकरण मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, या लसीमुळे भविष्यात मुलींना गर्भाशय मुख कर्करोग होणार नाही. या मोहिमेचा जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 मुलींना थेट फायदा होणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेमध्ये आपल्या मुलींना ही लस द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

प्रास्ताविक जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ सतीश रुणवाल यांनी केले आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा जीवघेणा आजार ठरत आहे. हीच लस आता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्येच आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विनामूल्य मिळणार आहे. ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका 99 टक्क्यांनी कमी होतो.

 

गर्भाशय कर्करोग : वेळीच सावधनता बाळगावी

 

अस्वच्छता, असुरक्षित संबंध आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग वाढतोय. सध्या हा आजार महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा वयाच्या 14 ते 15 व्या वर्षी 'एचपीव्ही' लस घेणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील मुलींनाही या महागड्या लसीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पिढी आरोग्यदायी राहील. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या पालकांनी ही लसीकरण करून घ्यावे. ही लस एकदम सुरक्षित असून, जगात जवळपास 80 देशात ही लस किशोरवयीन मुलींना यशस्वी दिलेली आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

मोहीम यशस्वी राबवण्यासाठी सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखखाली प्रशिक्षित स्टाफमार्फत फक्त आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच दिली जाणार आहे.

हे एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणासाठी पालकाची संमती अनिवार्य असून, ती यु-विन पोर्टलवर डिजिटल स्वरुपात किंवा इंटरनेट नसल्यास लेखी स्वरुपात घेतली जाईल. लसीकरणानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईने चिन्ह केले जाईल.

मुलींनी उपाशीपोटी लस घेऊ नये; पालकांनी त्यांना नाश्ता देऊन लसीकरणासाठी पाठवावे, लसीकरणानंतर किमान 30 मिनिटे निरीक्षणाखाली थांबणे आवश्यक आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

*******