20 March, 2026

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर; माहिती भरण्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ




हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन दि. 03 व 04 फेब्रुवारी 2026 रोजी  तीन  सत्रांमध्ये करण्यात आले होते.

  या परीक्षेस एकूण 46 हजार 68 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यापैकी 38 हजार 559 परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित होते.

या परीक्षेचा निकाल दि. 13 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सीटीईटी उत्तीर्ण असल्यास त्याबाबतची माहिती https://mscepune.in/dredola/KP२०२६Info.aspx⁠ या लिंकवर भरण्यासाठी यापूर्वी दि. 16 ते 21 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, उमेदवारांकडून  प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता सदर माहिती भरण्याची मुदत वाढवून आता दि. 22 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

*******

हुतात्मा दिनानिमित्त ‘माय भारत’ तर्फे देशभरात पदयात्रांचे आयोजन, युवकांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20: हुतात्मा दिनाचे औचित्य साधून ‘माय भारत’ संस्थेतर्फे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘हुतात्मा दिवस पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव या  स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.

'माझा भारत, माझी जबाबदारी' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची भावना जागृत करणे, तसेच नागरी जबाबदारी आणि सामुदायिक विकासासाठी त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे.

या पदयात्रेत प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 युवा स्वयंसेवकांचा सहभाग अपेक्षित असून, युवक एकता, शिस्त आणि देशभक्तीचा संदेश देतील. पदयात्रेपूर्वी 19 मार्चपासून ‘माय भारत’ पोर्टलवर ‘अनसंग हिरोज’ या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि एक युवा ऐसा भी या विषयावर रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

22 मार्च रोजी स्वच्छता मोहीम व रस्ते सुरक्षा जनजागृती यांसारख्या उपक्रमांद्वारे ‘सिव्हीक सेन्स चँलेंज’ राबविण्यात येत आहे. पदयात्रेची सुरुवात हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या अभिवादन सभेने होणार आहे.

ही पदयात्रा अंदाजे 2 ते 4 किलोमीटर अंतराची असून शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येईल. सहभागी युवक हातात तिरंगा, डोक्यावर टोपी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी युवक तसेच स्वातंत्र्याचा आदर करा, जबाबदारीने वागा अशा संदेशांचे फलक घेऊन सहभागी होतील.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवाशक्तीला विधायक कार्यासाठी संघटित करणे, तसेच समाजात शिस्त व नागरी जाणीव निर्माण करणे हा उद्देश आहे. नागरिक, शैक्षणिक संस्था व विविध युवा संघटनांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

******

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील येलकी, कसबे धावडा, डिग्रस तर्फे कोंढूर, कोंढूर, येहळेगाव साळुंके, अंजनवाडा तांडा, तुप्पा, येहळेगाव तुकाराम, शिरड शहापूर, सेंदूरसना, सिरला, असोला तर्फे औंढा नागनाथ , जवळा बाजार, आजरसोंडा, किल्ले वडगाव, सिंदगी, जवळा पांचाळ, डोंगरकडा, वारंगा फाटा, चुंचा, दिग्रस बु., उखळी आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 







19 March, 2026

आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त सोमठाणा उपकेंद्र

 

*हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार


हिंगोली  (जिमाका), दि. १९ : हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत उपकेंद्र सोमठाणा या आरोग्य संस्थेने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय आरोग्य संस्था  'राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्र दिल्ली'ने निर्धारित केलेल्या निर्देशांकांची पूर्तता करून, विशेष परीक्षण केंद्रीय गठीत समितीमार्फत करण्यात आले. सदरील केंद्रीय परीक्षण 21 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले. सदरील परीक्षणमध्ये केंद्रीय परीक्षक डॉ. जेम्स टी. डी. पोडिचेरी , डॉ. मोहम्मद इरफान अहमद राजस्थान यांनी मुद्देनिहाय परीक्षण करून अहवाल केंद्रीय समितीस सादर केला. या अहवालानुसार उपकेंद्र सोमठाणा आरोग्य संस्थेने  ९३ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन केंद्रीय महत्त्वाकांक्षी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या उपकेंद्राला आरोग्य संस्थेचा बहुमान मिळाला. त्याबद्दल राज्यस्तरीय अधिका-यांनी भरभरून कौतुक केले व स्थानिक नागरिकांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

याचे खरे श्रेय सोमठाणा उपकेंद्राची टीम समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रवी कुमार करवंदे, आरोग्य सेविका रुपाली झाड आरोग्य कर्मचारी कैलास लेकुळे, राहुल दरगु व वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ सूर्यवंशी व डॉ. दिव्या भारती यांच्यासह संपूर्ण कर्मचारी स्टाफ यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन तयारी केली. त्यातच जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार यांनी सुद्धा अथक परिश्रम घेऊन  सहकार्य केले. या सर्वांमुळे हे यश संपादन करता आले 

हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सपोर्ट मिळाल्यामुळे हे यश संपादन करता आले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे व एमकॉस असेसमेंट वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रुवार डॉ. विनोद आतुरकर, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. ताटेवाड, डॉ. जाधव, डॉ. खैरे यांची सहकार्य व मार्गदर्शन मिळाले

*****  




18 March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली  जिल्ह्यातील कोथळज, माळहिवरा, पेडगाव, लिंबाळा, पारडा, खंडाळा, माळहिवरा, येळी, आडगाव, खरवड, उमरा, वारंगा मसाई आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 








जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छुकांसाठी शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन

 



हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात ग्लोबल पब्लिक इंग्लिश स्कूल हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली तसेच संकल्प जॉब प्लेसमेंट हिंगोली या आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.

जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी (10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, डी.एड., बी.एड., एम.एड., पदवीधर इ.) आपले शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह स्वतः उपस्थित राहावे. हा मेळावा दि. 20 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी कोणतीही  प्रवास किंवा इतर खर्चाची  भरपाई दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी  02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे. 


*******

17 March, 2026

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी- जिल्हा प्रशासनाचे आवाहन



•जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन


 • आरोग्य विभाग सतर्क: आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा


 हिंगोली (जिमाका), दि. 17 : सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.

 ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी तर शहरी भागातील आरोग्य यंत्रणेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सूचना दिल्या आहेत.

 हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशापर्यंत पोहोचला आहे. ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने ४२ ते ४५ अंशांच्या घरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. 

अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. 

आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन या सह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत  जनजागृती करण्यात येत आहे.


*उष्माघात होण्याची कारणे :*


 शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.


*लक्षणे :*


मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ.


*अति जोखमीच्या व्यक्ती*

बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार.


*प्रतिबंधात्मक उपाय :*


 वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे

 (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत.

 सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.

 उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा.

घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा.

 पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.

 उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.


*उपचार :* 


रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत,

रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.

 रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे.

 चहा, कॉफी देवू नये .

रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात.

थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व ३६.८ सेल्सिअस तापमान होई पर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा.

*******