06 February, 2026

मेरा युवा भारततर्फे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’चे आयोजन

 


हिंगोली (जिमाका), दि. ०६ : मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, हिंगोली कार्यालयाच्या वतीने युवकांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जागरूकता व समज विकसित करण्याच्या उद्देशाने ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम क्विझ स्पर्धा नोंदणी मोहिमेचा एक भाग असून तो बहुस्तरीय व सहभागी स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन प्रश्नमंजुषा (क्विझ) आयोजित करण्यात येणार असून ही स्पर्धा दि. ०३ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी माय भारत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रश्नमंजुषा (क्विझ) टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावर निबंध लेखन टप्प्यासाठी निवड करण्यात येणार असून, या टप्प्यात सहभागी युवकांना केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या प्रमुख विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवडलेल्या युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पावर धोरणकर्ते व मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी देण्यात येणार आहे. यामुळे युवकांमध्ये धोरण प्रक्रियेबाबतची समज, जागरूकता व सहभाग अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ हा युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पाशी जोडणारा एक अर्थपूर्ण उपक्रम असून, या माध्यमातून युवकांना धोरणनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याची व त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याची संधी मिळणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व युवकांनी दि. ०३ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत माय भारत पोर्टलवर नोंदणी करून मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, हिंगोली यांनी केले आहे.

****

शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांच्या प्रवेश अर्जास 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 


हिंगोली (जिमाका), दि. 06 : सन 2025-26 करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी प्राप्त झाली होती. तसेच वसतिगृह प्रवेशासाठी अपेक्षित अर्ज प्राप्त न झाल्याने व अर्ज करताना विविध अडचणी उद्भवल्याने, बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकास दि. 15 फेब्रुवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुसार, शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. 6 ते दि. 15 फेब्रुवारी, 2026 असा वाढविण्यात आला आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शपथपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. 

विद्यार्थी भाड्याने राहत असून स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याबाबतचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र, विद्यार्थी आई-वडिलांसोबत राहत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शिक्षण घेत असताना कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करणार नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. 

शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांसाठी विचारात घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे शासनाने दिलेल्या विहित कालावधीत दि. 6 ते 15 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*******

05 February, 2026

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान अधिकारी यांच्याकडून पाहणी





हिंगोली: (दि. ५ ) राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने आज त्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा सहायक संचालक  डॉ. रामजी आडकेकर यांनी हिंगोली येथे भेट देऊन अरुणोदय सिकलसेल विशेष अभियानबाबत सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विशाल पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, सिकलसेल समन्वयक संदीप मुरकर आदी उपस्थित होते.

 कळमनुरी तालुक्यातील  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड येथे भेट देऊन अरुणोदय सिकलसेल कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सिकलसेल रुग्णांना आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचित केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शून्य ते ४० या वयोगटातील अद्यापपर्यंत चाचणी न झालेल्या लाभार्थी यांचे तपासणी करून घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत चालणाऱ्या एनसीडी कार्यक्रमाचा आढावा घेऊन कामात सुधारणा करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड नंतर आरोग्यवर्धिनी केंद्र कामठा येथेही भेट देऊन अरुणोदय  सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाचा आढावा घेतला. नियमित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत एनसीडी अंतर्गत कामकाजाबाबत समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेविका आरोग्य सेवक त्याचप्रमाणे आशाताईंच्या कामकाजाबाबत चर्चा करून उत्कृष्ट आरोग्य सेवा व कार्यक्षेत्रामध्ये नियमित भेटी देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विशाल पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलेजा कुप्पास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, सिकलसेल समन्वयक संदीप मुरकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप, डॉ. शेख शाहरूख खाजा व कर्मचारी उपस्थित होते.

******

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर–2025 चा निकाल जाहीर

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर2025 परीक्षेचे आयोजन दिनांक 9 ते 17 डिसेंबर, 2025 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल आज दिनांक 5 फेब्रुवारी, 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर  जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षार्थींना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणी करण्यासाठी विहित नमुन्यात, विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक 20 फेब्रुवारी, 2026 अशी राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.

 

*****

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते जिल्हास्तरीय उत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक पुरस्कार वितरण

 





  

हिंगोली, दि. 05 (जिमाका) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते येथील नक्षत्र सभागृहात आज जिल्हास्तरीय उत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. शंकर तावडे, जिल्हा समूह संघटक अजहर अली आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांशी संवाद साधत गावपातळीवर आरोग्य सेवा देताना प्रामाणिकपणे व स्पर्धात्मक भावनेने काम केल्यास त्याचे निश्चित फळ मिळते, असे सांगून आज मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याची खरी पावती असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले. तसेच हिंगोली तालुका सध्या आकांक्षित तालुक्यात असल्याने येत्या सहा महिन्यांत सकारात्मक प्रयत्न करून तो आकांक्षित यादीतून बाहेर काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून धन्वंतरीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले.

 यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार 

भांडेगाव येथील श्रीमती भाग्यरथा शिवाजी शिखरे यांना 5000 रुपये रोख प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मासोड येथील श्रीमती मुक्ता शेकुराव खुडे व्दितीय (3000 रुपये), सिद्धार्थनगर येथील श्रीमती आशा गजानन कोरडे तृतीय (2000 रुपये रोख) क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार

पिंपळदरी येथील श्रीमती वंदना गजानन लेकुळे, प्रथम, पिंपळदरी येथील श्रीमती वैशाली गणेश ढगे, द्वितीय तर जवळा बाजार येथील श्रीमती अर्चना बापूराव दिपके तृतीय असा अनुक्रमे तीन, दोन आणि एक हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कुरुंदा येथील श्रीमती निता भारत गायकवाड प्रथम, गिरगाव येथील श्रीमती प्रेमिला गजानन रानखांब द्वितीय तर कुरुंदा येथील श्रीमती भारती रमेश गायकवाड यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

नर्सी येथील श्रीमती प्रणाली प्रल्हाद खिलारे प्रथम, भांडेगाव येथील श्रीमती अनिता अशोक जळके द्वितीय तर नर्सी येथील श्रीमती नीता प्रदीप जयस्वाल यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

डोंगरकडा येथील श्रीमती कविता दयानंद थोरात प्रथम, वाकोडी येथील श्रीमती पद्मिना सोपान पाईकराव द्वितीय तर

आखाडा बाळापूर येथील श्रीमती शोभा गणेश तोरकड तृतीय क्रमांक मिळाला.

साखरा येथीलच श्रीमती सुचिता शामराव पांडे, प्रथम, श्रीमती सीमा रेणुकादास पांडे द्वितीय आणि श्रीमती शारदा राहुल वाघमारे यांनी क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

जिल्हास्तरीय गट प्रवर्तक पुरस्कार

आखाडा बाळापूर येथील  श्रीमती रेणुका दिवाकर देशपांडे प्रथम क्रमांकाचा, शिरडशहापूर येथील श्रीमती प्रणिता दिलीपराव काळे द्वितीय तर कुरुंदा येथील श्रीमती शांता संजय गायकवाड तृतीय क्रमांकाचा अनुक्रमे अडीच हजार, दीड हजार आणि एक हजार रुपये रोख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे यांनी आशा वर्कर या गावपातळीवरील आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद करून या पुरस्कारामुळे कामाची नवी प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी, तालुका समूह संघटक बापू सूर्यवंशी,  ओंकार जोशी, मारोती सोलापरे, अशोक चव्हाण व शिवानंद स्वामी यांनी परिश्रम घेतले.

 

******

अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणातील जप्त जंगम मालमत्तेचा 10 फेब्रुवारी रोजी द्वितीय जाहीर लिलाव

 


 

हिंगोली(जिमाका), दि. 05 : स्टोन क्रशर खदानीमधून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जंगम मालमत्तेचा (वाहने व क्रशर मशीन) जाहीर द्वितीय फेरीचा लिलाव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली आहे.

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने व इतर जंगम मालमत्ता सोडविण्यासाठी संबंधित कसूरदारांना वारंवार सूचना देऊनही दंडात्मक रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली नाही. तसेच जप्त जंगम मालमत्ता सोडविण्यासाठी मालक/कसूरदार न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे एकूण सहा खदानधारकांकडील जप्त वाहने व क्रशर मशीनचा लिलाव करण्यात येणार आहे.

सदर जंगम मालमत्तेचे लघुत्तम मूल्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांच्याकडील दि. 19 डिसेंबर 2025 च्या पत्रानुसार निश्चित करण्यात आले असून, त्या अनुषंगाने अटी व शर्तींच्या अधीन राहून जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जप्त जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महसूल मंडळ बासंबा, भांडेगाव, डिग्रस कऱ्हाळे अंतर्गत असलेल्या स्टोन क्रशर खदानच्या ठिकाणी बोली पद्धतीने घेण्यात येणार आहे.

लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत प्रती वाहन 10 हजार रुपये अनामत रक्कमेचा धनादेश, पॅनकार्ड, आधारकार्ड व बँक पासबुक/स्टेटमेंटची छायाप्रत सादर करणे बंधनकारक आहे. पात्र अर्जदारांना लिलावासाठी टोकन देण्यात येईल.

लिलावाबाबत सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी, हिंगोली व तहसीलदार, हिंगोली यांनी राखून ठेवले असून, लिलावातील अटी व शर्तींनुसारच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

वरील अटी व शर्ती मान्य असलेल्या इच्छुक नागरिकांनी लिलावामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे.

 

*******

 

04 February, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 



• परिस्थितीशी दोन हात करत परीक्षेची तयारी करा 

• मुलाखतीसाठी विविध आयएएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार 


हिंगोली(जिमाका), दि. ४ : सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ध्येयनिश्चिती करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. परिस्थिती कोणतीही असो तिचा बाऊ न करता प्रयत्नरत राहिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज‌ येथे केले.

 शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात आज जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधा व मार्गदर्शन योजनांची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे देताना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आर्थिक, सामाजिक वा इतर कोणत्याही परिस्थितीचा बाऊ करू नये. येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ध्येय निश्चित करून ते  गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

यावेळी त्यांनी यूपीएससी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण अभ्यास, चालू घडामोडींचे महत्त्व आणि आत्मविश्वास या बाबींवर भर दिला. अपयशातून खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास करू असा विश्वास व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांने त्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याचे सांगून आई-वडिल परजिल्ह्यात कामानिमित्त गेले असल्याचे सांगत मन वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यावर त्या विद्यार्थ्यास आत्मविश्वास असल्यास आई-वडिलांचे मन नक्कीच वळवू, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिला. 


या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गिरीकर यांनी केले.

*****