26 February, 2026



श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन

*शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज– कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

 

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार– राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक

      

मुंबई दि. २६ : ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय  समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी  ८० हजार ते १ लाख भाविक आसनस्थ होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  स्वतंत्र पार्किंग स्थळे ३८, विशेष तीन हेलिपॅडची व्यवस्था, २५ हजार भाविकांची निवास व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे १ हजार पेक्षा अधिक,  स्वच्छता कर्मचारी ५०० पेक्षा अधिक उपलब्ध असणार आहेत.

            तसेच आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी ३०० पेक्षा अधिक असणार आहेत. तात्पुरती वैद्यकीय केंद्रे १५ पेक्षा अधिक, तात्पुरते एक आयसीयू केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. राखीव खाटा (जवळील रुग्णालये)  ३५०, तर नजीकच्या रूग्णालयात राखीव आयसीयू खाटा ७५उपलब्ध आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमात १० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.


*शहिदी समागमाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन*

*राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक*

राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की,  'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभाग व शहिदी समागम राज्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथे भव्य शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिग सैनी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तामीळनाडू येथील भाजपा नेते अण्णामलाई, योग गुरु बाबा रामदेव, बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, दीदी मा साध्वो ऋतंभरा उपस्थित राहणार आहेत. 

तसेच शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संप्रदाय या समाजातील संत आणि रागी जत्थेदार उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी नगर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शौर्य, धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि न्यायमूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाची संपुर्ण माहिती https://gurutegbahadurshahidi.com/home  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००




 पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


हिंगोली, दि.२६ (जिमाका): पी एम सूर्यघर मोफत वीज या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत‌ दिले. 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जा व महावितरण विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.

 महाऊर्जा विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या पी एम सूर्यघर मोफत वीज योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींवर पारेषण सलग्न सौर ऊर्जा संच बसविण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येत असलेल्या तांत्रिक अडचणी, पारेषण यंत्रणेशी समन्वय, वीज जोडणी प्रक्रिया आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड व महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र मुंगारे यांना सदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दोन्ही विभागांनी परस्पर समन्वय साधून येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात व योजनेची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

या बैठकीमुळे जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढीस लागून ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

***** 



 जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा व सकस आहार सुकाणू समितीची आढावा बैठक संपन्न



हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा व सकस आहार सुकाणू समितीची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रतिनिधी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अन्न सुरक्षेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. अन्न आस्थापनांची तपासणी, अन्न नमुना संकलनाची कार्यवाही तसेच परवाना व नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गर्दीच्या हॉटेल्स व मिठाई दुकानांमध्ये अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी व नमुना संकलनाचे काम अधिक गतीने व प्रभावीपणे करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अन्न व्यवसायिकांनी परवाना व नोंदणी घेण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी व आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. 


*******



 आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा (चना) खरेदी सुरु


* जिल्ह्यात 11 खरेदी केंद्र निश्चित



हिंगोली (जिमाका), दि. 26 : हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीनुसार हरभरा (चना) खरेदी योजना जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व एनसीसीएफ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी दि. 01 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, केंद्र शासनाने हरभरा (चना) साठी प्रती क्विंटल 5 हजार 875 रुपये असा आधारभूत दर निश्चित केला आहे.

जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी एकूण 11 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. येथे केंद्र चालक शेख गफार शेख अली हे (9881501040) आहेत. औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर  केंद्र चालक कबीर बशीर कुरेशी हे (9767680780) आहेत. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक अमोल काकडे हे (8007386143) आहेत. विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सोपान बोकारे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9834851485 असा आहे. शेतकरी फळे व भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रिया सहकारी संस्था शिरड शहापूर ता. औंढा नागनाथ या संस्थेचे खरेदी केंद्र भेंडेगाव येथे आहे. केंद्र चालक सुभाष सोनटक्के हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8788232830 असा आहे. स्वाभिमानी स्वयंरोजगार सेवा सहकारी रिधोरा या संस्थेचे खरेदी केंद्र नर्सी नामदेव येथे आहे. केंद्र भागवत रोडगे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7499985448 असा आहे. 

श्री बेलेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.गोरेगाव या संस्थेचे खरेदी केंद्र पुसेगाव येथे आहे. केंद्र चालक माधव गाडे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9423737672 असा आहे. वाबळे ॲन्ड ऑदर फार्मर प्रोड्यूसर कंपनी भांडेगाव ता.जि.हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र उमरा येथे आहे. केंद्र चालक जगन वाबळे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9923847634 असा आहे. अभिमन्यू सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था म. करंजाळा ता.जि.हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र डिग्रसफाटा येथे आहे. केंद्र चालक रामराव कऱ्हाळे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9158648234 असा आहे.

शेतकरी बांधवांनी हरभरा विक्रीसाठी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा व पिकपेरा यांसारखी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना देण्यात येईल. त्यानंतरच शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

***

 राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील राहुली बु., सवड, सिद्धेश्वर, दुधाळा, लोहगाव, नरसी, गांगलवाडी, नागझरी आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 





हिंद-दी-चादर अभियानातील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा निकाल जाहीर


 *शुक्रवारी बक्षीस वितरण समारंभ*


        कोल्हापूर, दि. 26 : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. विभागीय माहिती कार्यालयाकडे शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या.                            

विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवार म्हणजे उदया 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालय येथे होणार आहे. 

      या निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध प्राप्त झाले. तर घोषवाक्य स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून घोषवाक्य प्राप्त झाले.निबंध व घोषवाक्य स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे :- निबंध स्पर्धा (शालेय गट) प्रथम :आरती सागर नाईक ; द्वितीय :चेतना राजेंद्र चव्हाण ; तृतीय :आयेशा इरफान बहेलर तर घोषवाक्य स्पर्धेत : प्रथम : रेहान रियाज बागवान, द्वितीय : इशा निलेश बळते,  तृतीय : अनुष्का संदिप मोरे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले .

           खुला गट ( निबंध स्पर्धा ) प्रथम : दीपक सर्जेराव पाटील ; द्वितीय : अक्षय अरुण नलावडे ; तृतीय :सुनील बा . नातू तर घोषवाक्य स्पर्धा प्रथम : संजय सौंदलगे ; द्वितीय :अनुराधा शरद व्हटकर ; तृतीय : डॉ .राधिका उदय पेंडसे यांनी यश संपादन केले. या दोन्ही गटातून, म्हणजेच निबंध आणि घोषवाक्य स्पर्धेत  सहभागी होणाऱ्या प्रत्येकी तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये विजेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले .        

****** 




 ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आवाहन 


हिंगोली (जिमाका), दि. 26 : आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने  दिल्या आल्या आहेत. त्यानुसार शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हे मराठी भाषा विभागाचे प्रमुख धोरण असून, पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विविध माध्यमांचा वापर करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना संबंधित परिपत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत.

निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, मराठी भाषेतील साहित्य प्रदर्शन, डिजिटल माध्यमातून जनजागृती आदी उपक्रमांचे आयोजन शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांमध्ये करण्यात यावे. तसेच आयोजित कार्यक्रमांची माहिती व अहवाल शासनास सादर करण्याची कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुखांनी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******