28 July, 2026

कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

अडचणींसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय हेल्पलाईन उपलब्ध



हिंगोली (जिमाका), दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील 44 हजार 213 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाच्या flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुजीत झोडगे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक अचूकपणे जोडलेला असल्याची खात्री करून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झाल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरणावेळी रकमेत तफावत, कर्ज खात्याशी आधार क्रमांक जुळत नसणे किंवा इतर तांत्रिक अडचणी आल्यास flrs.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून, जिल्हास्तरीय समितीमार्फत त्याचे तातडीने निराकरण करण्यात येत आहे.  

ते पुढे म्हणाले की, शासनाच्या निकषानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या पात्र थकीत कर्जासाठी कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी संबंधित बँकांमार्फत वन टाइम सेटलमेंट (OTS) प्रक्रियेद्वारे कार्यवाही करण्यात येईल. कर्जमाफीच्या यादीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका, तक्रार किंवा तांत्रिक अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी  विजय गीते, सहकार अधिकारी श्रेणी-1 (7038969535), उमाकांत चौव्हाणकर, सहाय्यक सहकार अधिकारी (9890049482), राजेश बांडे, प्रमुख लिपिक (7507486880), उद्धव सूर्यवंशी, सहकार अधिकारी श्रेणी-1 (9921807635), ज्ञानदेव डुकरे, सहकार अधिकारी श्रेणी-2 (9284787552) यांच्याशी नमूद हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. 


तालुकानिहाय संपर्क अधिकारी

सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी  ए. डी. गुंडे, सहाय्यक निबंधक (7020475834), हिंगोली  व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी  एम. यू. यादव, सहाय्यक निबंधक (9420433838), वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी के. एम. कलेतवाड, सहाय्यक निबंधक (8975943111) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कोणताही संभ्रम न बाळगता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी  पत्रकार परिषदेत केले. 

***

शासकीय योजनांतील कर्जवाटपाला गती द्या; कर्जमाफी तक्रारींचे तातडीने निराकरण करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे बँकांना निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी शासकीय योजनांअंतर्गत कर्जवाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्य करावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेशी संबंधित तक्रारी जिल्हा अग्रणी बँकेच्या निदर्शनास आणून त्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या शासकीय योजनांअंतर्गत कर्जवाटप, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सुजीत झोडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जासाठी आवश्यक प्रशिक्षणाची व्यवस्था स्थानिक स्तरावर पुरेशा संख्येअभावी पर्यायी स्वरूपात नांदेड येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्याच्या सूचना दिल्या.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणाबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी संबंधित विमा कंपनीने समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रत्येक बँकेने किमान पाच शेतकऱ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गटांना कर्जपुरवठा, कृषी कर्जमाफी तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत बँकांनी निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कृषी, उद्योग व स्वयंरोजगार क्षेत्राला चालना देण्यासाठी पीक कर्ज, उद्योग कर्ज तसेच महिला बचत गटांच्या कर्ज प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्वरित कर्जवाटप करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील तक्रारींसाठी हेल्पलाईन व ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार

 


 

·         ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य; शुल्क आकारल्यास तक्रार करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, काही प्रकरणांमध्ये कर्जमाफीच्या रकमेबाबत तफावत आढळून येत आहे. अशा प्रकरणांतील शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, संबंधितांनी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

तसेच शासनाने www.flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी या संकेतस्थळावरूनही आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

सध्या योजनेअंतर्गत माहिती अद्ययावत (डेटा अपडेटेशन) करण्याचे काम सुरू असल्यामुळे सर्व्हरवर तांत्रिक ताण निर्माण झाला असून, काही वेळा सर्व्हर डाऊन होत आहे. सर्व्हर पूर्ववत सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच सेवा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, या प्रक्रियेसाठी आपले सरकार सेवा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास मनाई आहे. कोणत्याही सेवा केंद्राकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारण्यात आल्यास संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माध्यमांचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी व आवश्यक असल्यास हेल्पलाईन किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारू नये– सहकार आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

* ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः मोफत


हिंगोली (जिमाका), दि. २८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, या प्रक्रियेसाठी आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्राम स्तरीय उद्योजक (व्हीएलई) यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत असून, त्यासाठी आधार ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. ही प्रक्रिया राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत राबविण्यात येत असून, प्रत्येक ई-केवायसीसाठी शासनाकडून निश्चित मानधन संबंधित ग्रामस्तरीय उद्येजकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, संबंधित विभागीय अधिकारी तसेच आपले सरकार सेवा केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सेवा केंद्राच्या दर्शनी भागात "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे" असा फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तसेच कोणत्याही व्हीएलई किंवा सेवा केंद्राकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसे आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवून शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असल्याने कोणालाही कोणतेही शुल्क देऊ नये. तसेच कोणत्याही सेवा केंद्राकडून शुल्काची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

********

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश




हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धतीत सुधारणा करून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा तसेच राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, संबंधित अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक पायाभूत सुविधा, दुरुस्ती व सुधारणा ही जिल्हा वार्षिक योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजनांतील उपलब्ध निधी तसेच इतर उपलब्ध निधीच्या माध्यमातून तातडीने पूर्ण कराव्यात. यासाठी आवश्यक मंजुरी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रुग्णालयांतील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीत बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजना, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वेळेत अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
या कामात हलगर्जीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
******


27 July, 2026

सेनगाव तालुक्यातील युवक-युवतींसाठी आरी वर्क व फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण

 

* ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २७ : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली यांच्या वतीने सेनगाव तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतींसाठी आरी वर्क व फॅशन डिझाईनिंग या विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) व बँक पासबुकची प्रत यांसह अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी.

नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून, इच्छुकांनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ (मो. ८४१२०८९२७२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली येथेही संपर्क साधता येईल.

या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए. एस. कदम तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.

******

औंढा नागनाथ तालुक्यातील युवक-युवतींसाठी फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण


* ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २७ : जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतींसाठी फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) आणि बँक पासबुकची प्रत या आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी.

प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक किसन धाबे (मो. ९३७०६३१४६९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली व जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली येथेही संपर्क साधता येईल.

या प्रशिक्षणाचा लाभ पात्र युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक ए. एस. कदम तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.

*****