13 August, 2026

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धनावर तीन दिवसीय प्रशिक्षण

  

हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक, पशुपालक, महिला शेतकरी, युवक तसेच दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छुक पात्र लाभार्थींना शास्त्रीय पद्धतीने दूध उत्पादन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनाचे ज्ञान आणि कौशल्य मिळावे, या उद्देशाने येथील जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आणि जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण दि. 18 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत केमिस्ट भवन सभागृह, खटकाळी रेल्वे पुलाजवळ, बांगर नगर, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  हे राहणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, बँक अधिकारी तसेच पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक व साधन व्यक्ती यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

दुग्ध व्यवसायातील शास्त्रीय पद्धती, व्यवसाय व्यवस्थापन आणि पशुसंवर्धनाशी संबंधित आवश्यक ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शेतकरी, दूध उत्पादक, पशुपालक, महिला शेतकरी व युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. राजेसाहेब कल्ल्यापुरे (मो. 9518399323) तसेच डॉ. वाघमारे (मो. 8329178110) यांच्याशी संपर्क साधावा.

*****

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून औंढा नागनाथ तालुक्यात विविध विकासकामांची पाहणी

  

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ तालुक्याला भेट देऊन विविध शासकीय कार्यालये, विकासकामे व सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालय, तालुका क्रीडा संकुल, महावितरणचे वीज उपकेंद्र, तहसील कार्यालय तसेच चिमेगाव ते पेरजाबाद रस्त्याची पाहणी करून संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्वप्रथम औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय सेवा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या आरोग्य सेवा प्रभावीपणे व वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी औंढा नागनाथ शहरातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मतदार यादी पुनरीक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाची प्रगती, मतदारांच्या नोंदींची पडताळणी तसेच आवश्यक कार्यवाहीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट राहतील आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, यासाठी काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तालुका क्रीडा संकुलालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा, मैदानाची स्थिती, खेळाडूंसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि संकुलाच्या वापराबाबत त्यांनी माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

त्यानंतर महावितरणच्या वीज उपकेंद्राची पाहणी करून वीजपुरवठ्याची स्थिती आणि उपकेंद्राच्या कामकाजाची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 तहसील कार्यालयात सुरू असलेल्या हॉलच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. सदर कामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती त्यांनी घेतली. यावेळी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या एसआयआर कार्यक्रमाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चिमेगाव ते पेरजाबाद रस्त्याची पाहणी करून रस्त्याची सद्यस्थिती आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती घेतली. नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार हरीश गाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे औंढा नागनाथ तालुक्यातील विविध शासकीय सेवा, विकासकामे आणि प्रशासकीय उपक्रमांच्या प्रगतीला गती मिळण्यास मदत होणार आहे.

****** 










पालक मंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

 


हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी रात्री  8  वाजता नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे.

शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती राहील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्कार वितरण, जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच आरोग्य वर्धिनी बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.30 वाजता खेडेकर सुपर स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअरच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, दुपारी 12 वाजता त्यांची वेळ शासकीय विश्रामगृह येथे राखीव असेल. त्यानंतर शिरडशहापूर येथे त्यांचे शासकीय वाहनाने दुपारी 1.30 वाजता आगमन होईल व 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सम्मान समारोहास उपस्थित राहतील. शिरड शहापूर येथून त्याचे शासकीय वाहनाने वारंगा फाट्याकडे प्रयाण होईल. पालकमंत्री श्री. झिरवाळ यांचे दुपारी 3 वाजता वारंगा फाटा येथे आगमन व कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता वारंगा फाटा येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.

******

रास्तभाव दुकानांच्या जाहीर प्रगटनात अंशतः सुधारणा * सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातील तीन गावांतील प्रक्रिया स्थगित



हिंगोली (जिमाका), दि. 13 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकूण 68 रास्तभाव दुकानांसाठी दिनांक 15 जुलै 2026 रोजी जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर जाहीर प्रगटनामध्ये सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावांच्या बाबतीत अंशतः सुधारणा करण्यात आली आहे.

सेनगाव तालुक्यातील मौजे कारेगाव तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे असोला तर्फे औंढा नागनाथ, दुकान क्र. 2 आणि मौजे स. हिवरखेडा या गावांसाठीची रास्तभाव दुकान परवाना देण्याची जाहीर प्रगटन प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

दिनांक 15 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर प्रगटनामध्ये सेनगाव तालुक्यातील एकूण 6 तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील एकूण 14 रास्तभाव दुकानांचा समावेश होता. त्यामधील सेनगाव तालुक्यातील अनुक्रमांक 6 – मौजे कारेगाव आणि औंढा नागनाथ तालुक्यातील अनुक्रमांक 7 व 11 – अनुक्रमे मौजे असोला तर्फे औंढा नागनाथ दुकान क्र. 2 व मौजे स. हिवरखेडा या गावांबाबत मा. उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात तसेच मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे अपील अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच सदर गावांची नावे जाहीर प्रगटनातून कमी करण्याबाबत आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर सदर तीन गावांची नावे जाहीर प्रगटनाच्या यादीतून वगळण्यात आली असून, त्या गावांसाठीची जाहीर प्रगटन प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. तथापि, दिनांक 15 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले जाहीर प्रगटन सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून, वरील तीन गावे वगळता कायम राहणार आहे.

सदर जाहीर प्रगटन संबंधित तहसील कार्यालयामार्फत गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच जाहीर प्रगटनानुसार अर्ज करण्यासाठीचे विहित नमुने संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2017 नुसार रास्तभाव दुकान परवाने खालील प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. पंचायत, ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, 

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत संस्था, 

महिला स्वयं सहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकानाचा परवाना मंजूर झाल्यानंतर संबंधित दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायामार्फत करणे आवश्यक राहील.

अधिकृत स्वयं सहाय्यता बचत गटांनी प्राधिकारपत्रातील अटी व शर्तींचे पालन करून विहित प्रतिभूती ठेव रक्कम चलनाद्वारे शासन खात्यात जमा करणे आवश्यक आहे.

रास्तभाव दुकान परवाने मंजूर करताना शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2007 तसेच शासन पत्र दिनांक 25 जून 2010 मधील प्राधान्यसूची विचारात घेतली जाणार आहे. प्राधान्यसूचीनुसार गटांची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेले, अंतर्गत व्यवहार पारदर्शक असलेले, परतफेड चोख व नियमित असलेले तसेच प्रतिवर्षी लेखापरीक्षण केलेले गट यांना प्राधान्य देण्यात येईल. संबंधित गटांचे हिशेब व लेखे अद्ययावत असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या संस्थांनी शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2007, 6 जुलै 2017 व 1 ऑगस्ट 2017 यांचे अवलोकन करून अर्ज अचूकपणे भरावा.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट


रास्तभाव दुकानासाठीचे अर्ज दिनांक 15 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधित दाव्याच्या पुष्टीसाठी आवश्यक लेखी पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

स्वयं सहाय्यता बचत गटांची निवड जिल्हा पुरवठा अधिकारी अध्यक्ष असलेल्या शासन नियुक्त समितीमार्फत करण्यात येणार असून, संबंधित गावच्या महिला ग्रामसभेची शिफारस विचारात घेतली जाणार आहे.

सदर जाहीर प्रगटनामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांनी राखून ठेवले आहेत. इच्छुक संस्था, बचत गट व संबंधित पात्र अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर

 


·         31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा असून, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे. प्राप्त अर्जांची छाननी दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org/ या ऑनलाइन संकेतस्थळावर दि. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विहित मुदतीत सादर करावीत.

जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी गुरुकुल, मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

*****

जिल्ह्यात कौशल्य विकास विभागामार्फत नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 


हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांना व्यवसाय विकासासाठी मार्गदर्शन मिळावे, त्यांचे ज्ञानवर्धन व्हावे तसेच उद्योजकांमध्ये परस्पर संवाद व नेटवर्किंग वाढावे, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्योजक मेळावा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी परिसर, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्योजकांनी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात लाखो सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजक विविध क्षेत्रांत व्यवसाय करीत असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, व्यवसायवृद्धीसाठी प्रभावी रणनीती, डेअरी व ॲग्रो इंडस्ट्रीज, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, शासकीय योजनांचा लाभ, वित्तीय व्यवस्थापन, उत्पादनाचा दर्जा तसेच ग्राहकांशी प्रभावी संवाद आदी बाबींमध्ये उद्योजकांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर उद्योजकांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या अडचणींचे निराकरण व्हावे तसेच विविध क्षेत्रांतील उद्योजकांमध्ये परस्पर ओळख व व्यावसायिक नेटवर्किंग निर्माण व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त एस. एस. कदम (उद्योग व सेवा) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सीए सुनील झंवर, भगवान सावंत (सावंत डेअरी) आणि दे आसरा फाउंडेशनचे प्रतिनिधी विविध विषयांवर उद्योजकांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://forms.gle/Y5CegHnMSK3sPzek8 या लिंकवर नोंदणी करावी. तसेच दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे.

या मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी 7385924589 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

***

12 August, 2026

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या –ॲड. निलेश हेलोंडे पाटील

 

 

·         शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी

 


हिंगोली (जिमाका), दि. 12 :
जिल्ह्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र कुटुंबांना आवश्यक त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मिशनसंबंधी जिल्हास्तरीय आढावा बैठक ॲड. हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात 105 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब गंभीर असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासोबतच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून कुटुंबीयांचे समुपदेशन करून आरोग्य सुविधा व आरोग्य शिबिरांचा लाभ द्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान, चारा लागवड, अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व रोजगार मेळावे यांची माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.

हळद उत्पादनात जिल्हा अग्रेसर असल्याने हळदीपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. दूध, रेशीम व अंडी उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नालाखोलीकरणाच्या बांधावर व गायरान जमिनीवर चारा लागवड करावी. तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रेशीम लागवड तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

अवैध सावकारीच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी संबंधित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. शासनाच्या सर्व योजनांचे टोल फ्री क्रमांक ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात लावावेत आणि विविध विभागांनी समन्वयाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ॲड. हेलोंडे पाटील यांनी दिले.

 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी

 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या प्रलंबित समस्या निकाली काढून त्यांना पात्र योजनांचा लाभ द्यावा. अवैध सावकारीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी दूध, रेशीम व अंडी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*******