16 August, 2026

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा


* १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहात रील्स स्पर्धेचे आयोजन




हिंगोली दि १५,(जिमाका) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 

दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६  हा कालावधी 'जलसंधारण सप्ताह' म्हणून राबविण्यात येणार आहे. 

या दरम्यान मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे. 

१५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी 'रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत युवक - युवतींनी उत्स्फूर्त  सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.


यानिमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या सप्ताहात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. सहभागी स्पर्धकांनी व्हिडीओ/रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ/ रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकांने तयार केलेली Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

रिल्स बनवण्यासाठी 

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य हे विषय देण्यात आले आहेत.


रील्स करीता गुणांकन पद्धती पुढीलप्रमाणे आहे. 

विषय व संदेश-३० गुण, कल्पकता-२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश-२० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता-१५ गुण, Instagram Engagement -१० गुण 

असे एकूण - १०० गुण असणार आहेत.  केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

राज्यासाठी एकच अधिकृत  #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे

"एक रील ... मातीसाठी !, एक रील ... पाण्यासाठी !, एक रील ... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

वरील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

*****

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

 



हिंगोली, दि १६ (जिमाका): शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. 


दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी 'महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर' या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. 


या उपक्रमाची थीम 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सीक्यूर टूमारो' अशी असून 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा' हे घोषवाक्य आहे. दि. २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.


माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि.२१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 


 *क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी* 

या कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतील.


सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 


२१ ऑगस्ट रोजी महा- वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

0000

15 August, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 







हिंगोली (जिमाका), दि. 15 : कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित विविध कार्यक्रमांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी प्रक्रिया उद्योग ही भविष्यातील शेतीची मुख्य दिशा आहे. केव्हीके हिंगोलीकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, प्रगत सिंचन पद्धती तसेच मोहफुलांसारख्या स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, प्रयोगशाळांचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसोबतच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच केव्हीकेच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाची पाहणी करून विशेषतः मोहफुलांपासून तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


आदिवासी महिलांना सायकल व्हील होचे वाटप


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदिवासी शेतकरी महिलांच्या श्रमाची बचत व्हावी तसेच शेतीकामे अधिक सुलभ व्हावीत, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सायकल व्हील हो’ चे वाटप करण्यात आले. या साधनामुळे महिलांना शेतीतील आंतरमशागत व तण नियंत्रणाची कामे अधिक सुलभपणे करता येणार आहेत.

यानंतर पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात मोह वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल केव्हीके हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

******

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

 

* वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा

* १०८ रुग्णवाहिका सेवेत वाढ करण्याचे निर्देश







हिंगोली (जिमाका), दि. 15 : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर, आवश्यक भौतिक सुविधांचे बळकटीकरण आणि विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्याच्या भौतिक सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी नमूद केले. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून नागरिकांना गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कॅन्सर रुग्णांच्या तपासणी व उपचारानंतरच्या देखरेखीवर भर

जिल्ह्यात कॅन्सरच्या संशयित रुग्णांची तपासणी प्रभावीपणे करण्यात यावी. कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारानंतरच्या पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) योग्य सनियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. आशा कार्यकर्त्यांमार्फत कॅन्सरग्रस्त महिलांच्या नियमित भेटी घेऊन त्यांच्या आरोग्यस्थितीची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.

या बैठकीत हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची गुणवत्ता व प्रगती यांचाही आढावा घेण्यात आला. बांधकामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत संदर्भ सेवा उपलब्ध होण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेची क्षमता वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यासाठी नव्याने आणखी ६ रुग्णवाहिकांची मागणी करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जिंगलचे अनावरण

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जिंगल टोनचे अनावरण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

*******

वीरमाता, वीरपत्नींच्या त्यागाला सलाम; त्यांच्या कुटुंबीयांच्या शासन सदैव पाठीशी– पालकमंत्री नरहरी झिरवाळ



* शिरडशहापूर येथे वीर योद्धा परिवार सन्मान सोहळा उत्साहात








हिंगोली(जिमाका), दि. १५  : देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या पतीचे किंवा मुलाचे दुःख मनात ठेवूनही त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या या त्यागाला आणि योगदानाला सलाम असून, शासन व समाज म्हणून सर्वजण वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ‘वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्या’त पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते.

यावेळी मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज, मुनिश्री १०८ उपशमयसागर महाराज, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मिलिंद यंबल आदी उपस्थित होते.

देशरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हिंगोली, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वीर जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागातून देशसेवेची प्रेरणा मिळते. अशा कुटुंबीयांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करत पालकमंत्री झिरवाळ यांनी वीरमाता व वीरपत्नींना सलाम केला. तसेच श्री शांती विद्या मंदिराच्या मंदिरासाठी आवश्यक असलेल्या सोलर व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी समयोचित भाषणातून वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद यंबल यांनी केले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

******

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलसंधारण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘महा वॉकॅथॉन’ लोगोचे अनावरण

 



हिंगोली (जिमाका), दि. 15 : जलसंधारणाचे महत्त्व, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त आयोजित ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या लोगोमध्ये ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अर्थात मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि सुरक्षित भविष्याचा संदेश देण्यात आला आहे. जलसंधारणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबरोबरच पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी लोकसहभाग वाढविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. ‘महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून ‘पाणी वाचवा, माती वाचवा आणि भविष्यातील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश व्यापक स्वरूपात पोहोचविण्यात येणार आहे.

******

80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देणार– पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 






पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला मुख्य ध्वजारोहण समारंभ

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन

जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण 

शेतकरी कर्जमुक्ती हाच राज्य शासनाचा मुख्य अजेंडा

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घेण्याचे आवाहन

जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; भूकंपरोधक इमारती रेट्रोफिटींगची प्रकिया सुरु


हिंगोली(जिमाका),दि. 15 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या साडेसात हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 62 कोटी 54 लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी श्री. झिरवाळ बोलत होते.

यावेळी आमदार खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर आणि राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते. 

पुढे बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सक्षमीकरणासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आवाहन केले. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे 43 हजार 541 लाभार्थी शेतकरी असून, 31 हजार 372 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मागील वर्षी थेट हस्तांतरणाद्वारे 491 कोटी रुपये वितरित केले असून, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार कृषीपंप ग्राहकांचे 572 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

देशात भारत निवडणूक आयोगाचे विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियान सुरु आहे. मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात हिंगोलीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 83 हजार 645 मतदारांचे गणनापत्र डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. नागरिकांनी 17 ऑगस्टपर्यंत गणनाप्रपत्र भरून देत या अभियानात आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा वितरणात हिंगोलीने राज्यात दुसरा व विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच फेब्रुवारी 2026 मध्ये सीसीटीएनएस कामगिरीत हिंगोली जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले.

येत्या 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त जलसंधारण सप्ताह आणि ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले असून, जिल्हावासीयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री झिरवाळ यांनी केले.

जिल्ह्यात सतत होत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक बांधकामासाठी इमारत सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली असून, नागरिकांच्या जीवित रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी ‘इंग्रजी काळ समृद्धी’ व पुस्तकपेटी उपक्रम राबविण्यात येत असून, भाषाज्ञान वृद्धीसाठी चौदाखडीचा स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये मतदार यादी सूक्ष्म निरीक्षणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी, विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक, विविध सामाजिक व विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा तसेच संस्थेचा जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पोलीस विभागातील अति उत्कृष्ट, उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांचा तसेच मिशन ऊर्जामध्ये महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा या विषयाची जनजागृती करणारे अधिकारी-कर्मचारी, हिंगोली पोलीस दलास डायल 112 कामकाजामध्ये महाराष्ट्र पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच सीसीटीएनसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच मिशन ऊर्जा कार्यक्रमात जनजागृती करणाऱ्या शाळा-महाविद्यालयाचा तसेच एनक्यूएस मानांकनात पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्ती व मृद व जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले.

या कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****