17 August, 2026

*विशेष लेख* *जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र*

 

           पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.

            महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

            स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ घेऊन या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’, रील्स स्पर्धा, जलपूजन, श्रमदान आणि जनजागृतीचे उपक्रम नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आयोजित केले जात आहेत. 

*जलसंधारण म्हणजे काय*

पावसाचे पाणी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात जमिनीवर अडविणे, त्याचा वेग कमी करणे, जमिनीत मुरविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे, जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, याला व्यापक अर्थाने जलसंधारण म्हणता येईल. जलसंधारण म्हणजे केवळ बंधारा बांधणे नव्हे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिथे पडतो, तिथेच त्याचा अधिकाधिक उपयोग करणे, ही त्यामागची मूलभूत संकल्पना आहे.

      महाराष्ट्रासाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. पावसाचे भौगोलिक आणि कालिक वितरण असमान आहे. काही भागात अतिवृष्टी होते, तर काही भागात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ‘पाणी आहे, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नाही’ हीच मोठी समस्या आहे. जलसंधारणातून या विसंगतीवर मात करता येते.

*महाराष्ट्राच्या जलसंधारणाची मुळे*

महाराष्ट्रात जलसंधारणाची परंपरा नवी नाही. गावागावातील तलाव, बंधारे, पाझर तलाव, विहिरी आणि पारंपरिक जलव्यवस्थापन ही ग्रामीण जीवनाची पूर्वापार साधने आहेत. ही परंपरा थेट छत्रपती शिवरायांचा काळापर्यंत जाते. गड किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्याची मोठी परंपरा आहे. यावर महाराष्ट्राने शिवकालीन पाणी साठवण योजनाही सुरु केली आहे. आधुनिक शासकीय पातळीवर मात्र जलसंधारणाला स्वतंत्र संस्थात्मक दिशा मिळाली ती स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या स्थापनेमुळे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही 1972 च्या दुष्काळानंतर जलसंधारण माध्यमातून ‘जलक्रांन्ती’ घडवून आणली होती. त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवून पाणलोट क्षेत्र वाढवले मोठ्या धरणांपेक्षा बॅरेजेसला महत्व दिले.

*जलयुक्त शिवारातून नव्या पर्वाला सुरुवात*

जलसंधारणाला मोठ्या प्रमाणावर लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने २०१४ नंतरचा काळ महत्त्वाचा ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या योजनेतून पुढे हजारो हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. लक्षावधी टीएमसी पाणी साठा निर्माण झाला. हजारो गावे पाणीदार झाली. त्यांचा शाश्वत विकास झाला.

         आज जलयुक्त शिवार २.०च्या माध्यमातूनही जलसंधारण, जलसाक्षरता, लोकसहभाग आणि उपलब्ध भूजलाच्या शाश्वत वापरावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणातून परिवर्तन घडविणे आवश्यक आहे.

*योजनांची ताकद, लोकसहभागाची साथ*

महाराष्ट्राने जलसंधारणासाठी अनेक मार्ग स्वीकारले आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला २०१६ मध्ये सुरुवात करून शेतकऱ्यांना स्वतःची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देण्यात आली.

     ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना तर जलसंधारण आणि शेती यांची सांगड घालणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे जलाशयाची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. २०२४ मध्ये ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याशिवाय विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, शेततळी, जलस्रोतांमधील गाळ काढणे, बांधावर वृक्ष व बांबू लागवड अशा असंख्य उपाययोजना राज्यात राबविल्या जात आहेत.

*देशातील प्रेरणादायी उपक्रम*

          राजस्थानच्या अलवरमध्ये पारंपरिक ‘जोहड’ या पावसाच्या पाण्याच्या साठवण संरचनांचे पुनरुज्जीवन करून गावकऱ्यांनी जलव्यवस्थापनाचे प्रभावी मॉडेल उभे केले. जलतज्ज्ञ आणि ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकसहभागातून कोरड्या प्रदेशात जलस्रोत पुनरुज्जीवित झाले आणि अरवरीसारख्या नद्यांना पुन्हा प्रवाह मिळाला.

महाराष्ट्रात राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार ही दोन उदाहरणे तितकीच प्रेरणादायी आहेत. राळेगणसिद्धीत नाला बांध, गली प्लगिंग, समतल चर, पाझर तलाव आणि लोकसहभागातून दुष्काळी गावाचा कायापालट झाला. हिवरे बाजारने पाण्याचे बजेट, पिकांचे नियोजन, ठिबक सिंचन, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण यांची सांगड घालत जलसुरक्षेचे आदर्श मॉडेल निर्माण केले.

*नागरिकांनी काय करायचे*

          शासन आपले काम करीत आहे; परंतु जलसंधारणाची खरी यशोगाथा नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या छतावरील पाणी साठविण्याची किंवा जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करावी. गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा. शेतकऱ्यांनी शेततळी, बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, ठिबक-सिंचन आणि पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार नियोजन करावे. गावातील नाले, तलाव, बंधारे आणि पारंपरिक जलस्रोत यांची स्वच्छता व देखभाल करावी. शक्य तेथे श्रमदान करावे. पाणी वाया जाणार नाही, याची प्रत्येक कुटुंबाने काळजी घ्यावी.आणि पावसाळा सुरु आहे. वृक्ष लागवडीत कुटूंबाने दरवर्षी एक या प्रमाणे वृक्ष लागवड करावी.

             जलसंधारण हा केवळ मृद व जलसंधारण विभागाचा विषय नाही; तो कृषीचा, ग्रामविकासाचा, पर्यावरणाचा, अर्थव्यवस्थेचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विषय आहे. कारण पाणी वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर गावाची अर्थव्यवस्था वाचेल आणि गाव समृद्ध झाले तर महाराष्ट्र समृद्ध होईल.

म्हणून २१ ऑगस्टचा जलसंधारण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस न राहता प्रत्येकाच्या मनात एक संकल्प निर्माण करणारा दिवस ठरू दे. चला !जलसंधारणातून ‘बारमाही हिरवा महाराष्ट्र!’

  घडवूया! 

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर

मो.क्र.9702858777

*जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन*

 *‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया*

मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.


जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.


“चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

००००

16 August, 2026

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा


* १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहात रील्स स्पर्धेचे आयोजन




हिंगोली दि १५,(जिमाका) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 

दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६  हा कालावधी 'जलसंधारण सप्ताह' म्हणून राबविण्यात येणार आहे. 

या दरम्यान मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे. 

१५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी 'रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत युवक - युवतींनी उत्स्फूर्त  सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.


यानिमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या सप्ताहात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. सहभागी स्पर्धकांनी व्हिडीओ/रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ/ रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकांने तयार केलेली Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

रिल्स बनवण्यासाठी 

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य हे विषय देण्यात आले आहेत.


रील्स करीता गुणांकन पद्धती पुढीलप्रमाणे आहे. 

विषय व संदेश-३० गुण, कल्पकता-२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश-२० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता-१५ गुण, Instagram Engagement -१० गुण 

असे एकूण - १०० गुण असणार आहेत.  केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

राज्यासाठी एकच अधिकृत  #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे

"एक रील ... मातीसाठी !, एक रील ... पाण्यासाठी !, एक रील ... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

वरील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

*****

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

 



हिंगोली, दि १६ (जिमाका): शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. 


दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी 'महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर' या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. 


या उपक्रमाची थीम 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सीक्यूर टूमारो' अशी असून 'पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा' हे घोषवाक्य आहे. दि. २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.


माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि.२१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 


 *क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी* 

या कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतील.


सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 


२१ ऑगस्ट रोजी महा- वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

0000

15 August, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 







हिंगोली (जिमाका), दि. 15 : कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित विविध कार्यक्रमांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी प्रक्रिया उद्योग ही भविष्यातील शेतीची मुख्य दिशा आहे. केव्हीके हिंगोलीकडून आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, प्रगत सिंचन पद्धती तसेच मोहफुलांसारख्या स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केव्हीकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, प्रयोगशाळांचा आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसोबतच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्न प्रक्रिया प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच केव्हीकेच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाची पाहणी करून विशेषतः मोहफुलांपासून तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


आदिवासी महिलांना सायकल व्हील होचे वाटप


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदिवासी शेतकरी महिलांच्या श्रमाची बचत व्हावी तसेच शेतीकामे अधिक सुलभ व्हावीत, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सायकल व्हील हो’ चे वाटप करण्यात आले. या साधनामुळे महिलांना शेतीतील आंतरमशागत व तण नियंत्रणाची कामे अधिक सुलभपणे करता येणार आहेत.

यानंतर पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात मोह वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल केव्हीके हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

******

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

 

* वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा

* १०८ रुग्णवाहिका सेवेत वाढ करण्याचे निर्देश







हिंगोली (जिमाका), दि. 15 : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर, आवश्यक भौतिक सुविधांचे बळकटीकरण आणि विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्याच्या भौतिक सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी नमूद केले. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून नागरिकांना गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कॅन्सर रुग्णांच्या तपासणी व उपचारानंतरच्या देखरेखीवर भर

जिल्ह्यात कॅन्सरच्या संशयित रुग्णांची तपासणी प्रभावीपणे करण्यात यावी. कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारानंतरच्या पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) योग्य सनियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. आशा कार्यकर्त्यांमार्फत कॅन्सरग्रस्त महिलांच्या नियमित भेटी घेऊन त्यांच्या आरोग्यस्थितीची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.

या बैठकीत हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची गुणवत्ता व प्रगती यांचाही आढावा घेण्यात आला. बांधकामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत संदर्भ सेवा उपलब्ध होण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेची क्षमता वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यासाठी नव्याने आणखी ६ रुग्णवाहिकांची मागणी करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जिंगलचे अनावरण

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जिंगल टोनचे अनावरण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

*******

वीरमाता, वीरपत्नींच्या त्यागाला सलाम; त्यांच्या कुटुंबीयांच्या शासन सदैव पाठीशी– पालकमंत्री नरहरी झिरवाळ



* शिरडशहापूर येथे वीर योद्धा परिवार सन्मान सोहळा उत्साहात








हिंगोली(जिमाका), दि. १५  : देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या पतीचे किंवा मुलाचे दुःख मनात ठेवूनही त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या या त्यागाला आणि योगदानाला सलाम असून, शासन व समाज म्हणून सर्वजण वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ‘वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्या’त पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते.

यावेळी मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज, मुनिश्री १०८ उपशमयसागर महाराज, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मिलिंद यंबल आदी उपस्थित होते.

देशरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हिंगोली, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वीर जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागातून देशसेवेची प्रेरणा मिळते. अशा कुटुंबीयांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करत पालकमंत्री झिरवाळ यांनी वीरमाता व वीरपत्नींना सलाम केला. तसेच श्री शांती विद्या मंदिराच्या मंदिरासाठी आवश्यक असलेल्या सोलर व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी समयोचित भाषणातून वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद यंबल यांनी केले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

******