.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
02 September, 2026
आपले सरकार सेवा केंद्रांसाठी नवे मानदंड; 15 सप्टेंबरपर्यंत पूर्तता बंधनकारक
शासकीय योजनांतील कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करा— जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या ऑनलाईन प्रवेशिकेसाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत
01 September, 2026
सीएसआर निधीतून जिल्हा परिषदेच्या सहा वर्गखोल्या बांधण्यात येणार
▶️ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची तत्त्वतः परवानगी
▶️ साळवा, भौसीसह बोरी सावंत शाळेचा समावेश
हिंगोली, दि. 01 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून प्रत्येकी दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तत्त्वतः परवानगी दिली आहे. त्यामुळे तीन शाळांना एकूण सहा नवीन वर्गखोल्या उपलब्ध होणार आहेत.
सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबई येथील रवींद्र एनर्जी लिमिटेड, पुणे येथील श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि उत्तर प्रदेश येथील ट्रूआरई कॉस्मिक प्रा. लि. या कंपन्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी दोन वर्गखोल्या बांधण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत संबंधित कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संमतीपत्रे सादर केली आहेत. संबंधित संमतीपत्रांमध्ये सीएसआर निधीतून दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीनंतर संबंधित कंपन्यांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी संमती दर्शविली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामांना तत्त्वतः परवानगी दिली आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील साळवा, औंढा नागनाथमधील भौसी आणि वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी शाळेची जागा निश्चित करून सीमांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाईल. बांधकाम करताना आवश्यक वैधानिक व तांत्रिक मान्यता, संबंधित विभागाच्या मार्गदर्शक सूचना तसेच शासनाच्या प्रचलित नियमांचे काटेकोर पालन करणे संबंधित कंपन्यांवर बंधनकारक राहील.
सीएसआर निधीतून होणाऱ्या या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी यादीत आपले नाव तपासावे
नाव नसल्यास तातडीने बीएलओशी संपर्क साधून नाव नोंदवावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
पत्रकारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार - विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे
हिंगोली, दि. 1 सप्टेंबर (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची तपासणी करावी. यादीत नाव नसल्यास संबंधित बीएलओशी तातडीने संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘पत्रकारांशी संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता बोलत होते. यावेळी लातूर विभागाचे विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, उपसंपादक अलका पाटील तसेच हिंगोली जिल्ह्यातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत. नावामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास किंवा पात्र असूनही नाव यादीत नसल्यास संबंधित बीएलओशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
औंढा नागनाथच्या विकासकामांना गती
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथच्या विकासाला मंजुरी मिळाली असून, त्याअनुषंगाने विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांना गती देऊन त्यांचा नागरिकांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
तसेच कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीतून जिल्ह्यातील तीन गावांमध्ये वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी संबंधित कंपनीला काम देण्यात आले आहे. या वर्गखोल्यांचे बांधकाम सीबीएसई पॅटर्ननुसार करण्यात येत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या
लातूर विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. पत्रकारांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सुविधा व योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकारांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधा, योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात येईल. पत्रकारांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे यांनी दिले.
यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी असलेल्या अधिस्वीकृती पत्रिका, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी आणि सन्मान योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विविध योजना, निर्णय आणि उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारिता प्रभावीपणे कार्य करते, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
विभागीय उपसंचालक सुनील कच्छवे यांनी जिल्हा माहिती कार्यालयास भेट देऊन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध कामकाजाची माहिती घेतली. कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना, उपक्रम, निर्णय तसेच लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी कार्याचा त्यांनी आढावा घेतला.
शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक विशाखा शेंडगे, लिपिक श्रीकांत देशमुख, मनोहर भारती, मानसी राऊत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला खरीप हंगाम पीक नोंदणीसह विविध विषयाचा आढावा
हिंगोली, दि. 1 सप्टेंबर (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामातील पीक नोंदणीच्या कामकाजासह महसूल, कृषी, भूसंपादन विभागाशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनिल माचेवाड, भूसंपादन उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वनपट्टेधारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना क्रमांक 7 ई/12 ई तयार करण्याच्या कामकाजाचा, शेतकरी ओळख क्रमांक नोंदणीच्या प्रगतीचा तसेच वनहक्कधारकांना प्रदान करण्यात आलेल्या कम्पार्टमेंटमधील पट्ट्याच्या आधारे गाव नमुना क्रमांक सातबारा तयार करण्याच्या कामकाजाचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला.
तसेच शासकीय जमिनींचे Ground Truthing करून त्यांची Land Bank मध्ये नोंद करण्याबाबत आणि जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील अनियमितता तपासणीसाठी गठीत समितीने सुचविलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या सनियंत्रण पोर्टलच्या वापराबाबत यावेळी माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत तातडीने देण्यात आलेली कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या.
ज्या सर्व्हे क्रमांकासाठी सातबारा व मिळकत पत्रिका अशा स्वरूपात दुहेरी अधिकार अभिलेख सुरू आहेत, त्या सर्व्हे क्रमांकांचा सातबारा बंद करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलम 122 अन्वये करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक कापणी प्रयोगाच्या नोंदणीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पीक कापणी प्रयोगांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
00000
३१ ऑगस्ट रोजी हिंगोलीत ‘भटके विमुक्त दिवस’ साजरा
हिंगोली, दि. 1 सप्टेंबर (जिमाका) : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा येथील प्राचार्य एन. ए. गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते चंद्रशेखर पाटील (निलंगा, जि. लातूर), बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, ज्ञानेश्वर सातपुते, नारायण बाबर तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थी, अशासकीय सदस्य, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी, वसंतराव नाईक महामंडळाचे कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात ३१ ऑगस्ट या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच भटक्या-विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये आणि सामाजिक योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये Criminal Tribes Act लागू करून अनेक भटक्या जमातींना जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. भारत सरकारने १९५२ मध्ये हा कायदा रद्द करून या जमातींना ‘विमुक्त’ (Denotified) असा दर्जा दिला. मात्र, या समाजावर असलेला सामाजिक भेदभाव आणि आर्थिक दुर्लक्ष दूर करण्यासाठी अद्यापही व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी, प्राचार्य एन. ए. गायकवाड आणि प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांनी भटके-विमुक्त समाजाच्या हक्कांबाबत जागृती, शिक्षण, रोजगार आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पाटील यांनी भटके-विमुक्त समाजासाठी करण्यात आलेल्या विविध कार्यांची माहिती दिली. तसेच या समाजाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला.
या निमित्ताने आश्रमशाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, भटके-विमुक्त लोककलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण व निबंध स्पर्धा, तसेच ‘सेटलमेंट’व १९५२ चा गुन्हेगार कायदा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपली सोनकांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निरीक्षक मनिष राजुलवार, बालाजी टेंभुर्णे, भास्कर वाकळे, जयदीप देशपांडे, प्रतिक सरनाईक, उखा मुरकुटे, बिना कोकणी, प्रफुल चवरे, सचिन टाले, संतोष गलांडे, नीरज राठोड, विश्वनाथ खोकले, धीरज गोरकर, तसेच इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोलीच्या गृहपाल श्रद्धा तडकसे यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000





