12 June, 2026

जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण क्रीडा विकास साधण्यासाठी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र, हिंगोली कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मैदानी (अॅथलेटिक्स) क्रीडा प्रकाराकरिता बाह्य स्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिली आहे.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक असून बी.पी.एड., एम.पी.एड. किंवा क्रीडा विज्ञानातील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच एन.आय.एस. डिप्लोमा इन कोचिंग (अॅथलेटिक्स) किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला, अथवा वर्ल्ड अॅथलेटिक्स संघटनेचा लेव्हल-1 कोर्स अथवा सहा आठवड्यांचा एन.आय.एस. प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारास किमान एक वर्षाचा राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिल्याचा अनुभव तसेच युवा खेळाडूंसोबत काम केलेल्या प्रशिक्षकांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य असून इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

याशिवाय उमेदवार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पदकविजेता खेळाडू असावा. खेळाडूंच्या प्रगती नोंदी, अहवाल सादर करणे व डेटा व्यवस्थापनासाठी मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक आहे. शासनमान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक राहणार आहे.

उपरोक्त निकषांनुसार पात्र क्रीडा मार्गदर्शकाची नेमणूक करण्यास इच्छुक बाह्य यंत्रणांनी आपल्या दरपत्रकासह अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे दि. 15 जून 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. निलकंठ श्रावण (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.


*********

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम व बाल कामगार शोध अभियान

 



हिंगोली (जिमाका), दि. 12 : जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बाल कामगार शोध अभियान राबविण्यात आले.

या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


स्वाक्षरी मोहिमेनंतर शहरातील विविध भागांत बाल कामगार शोध मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत हॉटेल, वर्कशॉप, दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकांना बालकामगार न ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच बालकामगार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या अभियानाचा मुख्य उद्देश बालकामगार प्रथा रोखणे, बालकांच्या शिक्षण व संरक्षणाच्या हक्कांचे जतन करणे तसेच बालकामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा होता. बालकांना शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित बालपणाचा हक्क मिळावा यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतेही बालक काम करताना आढळल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098, स्थानिक पोलीस ठाणे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

या मोहिमेत कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बालकांचे शिक्षण, संरक्षण व सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अशा जनजागृतीपर आणि तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

******

पीएलएफएस व एएसयूएसई राष्ट्रीय सर्वेक्षणांचा हिंगोलीत शुभारंभ

 

विश्वसनीय माहितीच्या आधारे विकास नियोजनाला चालना; नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली (जिमाका), दि. 12 : केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीरिऑडिक लेबर फोर्स सर्वे (पीएलएफएस) आणि ॲन्युअल सर्वे ऑफ अनइन्कॉर्पोरेटेड एंटरप्रायझेस (एएसयुएसई) या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करून करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त एस. एम. रचावाड, जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी तसेच आयपॉस संस्थेचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसायांची स्थिती आणि असंघटित क्षेत्रातील आर्थिक उपक्रमांची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचे महत्त्व अधोरेखित केले. रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक-आर्थिक विकास योजना तसेच विविध धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएलएफएस सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची रोजगार, बेरोजगारी, व्यवसाय, कामाचे स्वरूप, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक स्थिती यासंदर्भातील माहिती एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत प्रत्यक्ष भेटी व मुलाखतींच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील श्रमबाजाराची सद्यस्थिती, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि वेतनाधारित रोजगाराबाबतची अद्ययावत माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध होणार आहे.

एएसयूएसई सर्वेक्षणाद्वारे नोंदणीकृत नसलेल्या बिगर कृषी क्षेत्रातील लघुउद्योग, सेवा व्यवसाय, दुकाने, कार्यशाळा, घरगुती उद्योग आणि इतर असंघटित व्यावसायिक उपक्रमांची माहिती एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत गोळा केली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील रोजगार, उत्पादनक्षमता, उत्पन्न, स्थूल मूल्यवर्धन आणि आर्थिक निर्देशकांची माहिती संकलित करून राज्य व जिल्हास्तरीय उत्पन्नाचे अंदाज तसेच विकास निर्देशांक तयार करण्यास मदत होणार आहे.

सर्वेक्षणासाठी आयपॉस संस्थेमार्फत नियुक्त अधिकृत क्षेत्रीय कर्मचारी तसेच सांख्यिकी अधिकारी नागरिकांच्या घरी व उद्योग आस्थापनांमध्ये भेट देणार आहेत. नागरिकांनी व उद्योजकांनी त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून ती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठी वापरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा प्रशासन, हिंगोली आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून “विश्वसनीय माहिती – सक्षम नियोजन – विकसित भारत” या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

******

11 June, 2026

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






*नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर 


*पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट


*आकांक्षित जिल्हे-तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर


*युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी  देण्याचे नियोजन


नवी दिल्ली, दि. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल व सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.



राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या (गव्हर्निंग कौन्सिल) अकराव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा रोड मॅप सादर केला. या बैठकीस केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोककुमार लाहिडी आणि सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  एकूण सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे १४ टक्के योगदान देणारे महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित होत असल्या तरी सुशिक्षित, कुशल, निरोगी आणि सक्षम नागरिक हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र - २०४७ हे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले असून २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागांनी २०२९-३० पर्यंतच्या कालावधीसाठी कृती आराखडे तयार केले असून शाश्वत विकास उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करण्यावर राज्याचा भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 आकांक्षित जिल्ह्यांची संख्या चारवरून दहापर्यंत आणि आकांक्षित तालुक्यांची संख्या २७ वरून १७७ पर्यंत वाढविण्यात आली असून या भागांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. 

*पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत व्यापक सुधारणा*

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० ची सर्वसमावेशक अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले बहुविद्याशाखीय शिक्षण, मल्टिपल एन्ट्री-एक्झिट प्रणाली, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, इंटर्नशिप तसेच एआय, रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश करण्यात येत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात देशातील पहिली जागतिक दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत असून ती देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण केंद्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्व प्राथमिक शिक्षण मजबूत करण्यासाठी ‘पोषण भी – पढाई भी’, आरंभ, स्मार्ट अंगणवाडी आणि सक्षम अंगणवाडी यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बालस्नेही शिक्षण वातावरण निर्माण करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर आणि अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण सुरू आहे. शालेय शिक्षणात महाराष्ट्राची परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये प्रचेष्टा-१ कडे वाटचाल सुरू आहे. राज्यात २ कोटी आठ लाखांपेक्षा अधिक ‘अपार आयडी’ तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणणे, डिजिटल वर्ग, व्यावसायिक शिक्षण तसेच मुली, आदिवासी व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे.


*कौशल्य विकास, स्टार्टअप आणि नवसंशोधनाला चालना*

 राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून राज्यात ३ लाख ३० हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नवसंशोधन धोरण २०२५ अंतर्गत पुढील पाच वर्षांत १ लाख २५ हजार उद्योजक घडविणे आणि ५० हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एआय, डीप-टेक, फिनटेक आणि शाश्वतता या क्षेत्रांवर विशेष भर दिला जात असून ‘महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यात येत आहे. तसेच कुशल युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी' ही संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


*आरोग्य क्षेत्रात व्यापक विस्तार*

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य कटिबद्ध असून आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार पॅकेजेसची संख्या २३९९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात ४५३७ रुग्णालये या योजनांशी संलग्न करण्यात आली आहेत.

शहरी भागांसाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात आले असून ११ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे. मेडिसिटी संकल्पनेद्वारे वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तृतीयक आरोग्यसेवा आणि आयुष प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


*महिला सक्षमीकरणाला गती*

महिला सक्षमीकरण हे आर्थिक विकासाचे प्रमुख साधन असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उमेद अभियानाअंतर्गत राज्यात ५० लाख लखपती दिदी  झाल्या असून ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा मानस आहे. बचत गटांच्या उत्पादनांसाठी १३ जिल्हास्तरीय उमेद मॉल्स उभारण्यात येत आहेत.

लाडकी बहीण योजनेतर्गत सध्या १.६६ कोटी महिला लाभार्थी असून या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता आणि आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.


*सर्वसमावेशक विकासावर भर*

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून संधी निर्माण करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १०० नवीन वसतिगृहे उभारण्यात येत असून त्यात २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची व्यवस्था होणार आहे.


*प्रशासनात तंत्रज्ञान आणि सुधारणा*

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने ८०० हून अधिक नागरिक आणि व्यवसाय सेवांची प्रक्रिया पुनर्रचना केली आहे. महासारथी आणि महाडीबीटी २.०द्वारे नागरिक सेवा अधिक सुलभ करण्यात येत आहेत. अर्जातील रकाने आणि कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. महाराष्ट्र एआय धोरण २०२६ अंतर्गत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि १.५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी क्षेत्रासाठी महाअॅग्री-एआय धोरण महाअॅगएक्स आणि महाट्रेस यांसारखे डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.


*गडचिरोलीसाठी विशेष विकास आराखडा*

गडचिरोली जिल्ह्यासाठी नक्षलग्रस्त भागोत्तर विकास कार्ययोजना राबविण्यात येत असून पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. गडचिरोलीला भारतातील पहिले मोठे इंटिग्रेटेड स्टील हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


*पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना*

‘एक राज्य, एक जागतिक पर्यटन स्थळ’ योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि नाशिक या ठिकाणांचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. राज्यभरात १०० पर्यटन उप-परिपथ विकसित करण्याचे उद्दिष्ट असून धार्मिक, वारसा, जल, बेट आणि अनुभवात्मक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.राज्यात ६३.८५ लाखांहून अधिक एमएसएमई कार्यरत असून २.५ कोटींहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतातील एकूण एफडीआयपैकी सुमारे ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचे नमूद करून 

महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत २०.३ लाख कोटींच्या गुंतवणुकीची पाइपलाईन तयार झाली आहे. मैत्री प्रणालीद्वारे सिंगल विंडो क्लिअरन्स, वेळेत मंजुरी आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकसित भारत २०४७ साठी महाराष्ट्र शासनाची कटिबद्धता व्यक्त करत केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सहकार्याने देशाला समृद्ध, आत्मनिर्भर आणि न्याय्य राष्ट्र बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.

******

हिंगोली येथे कमोडिटी जागरूकता कार्यशाळा संपन्न · शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदा बाजार, गुणवत्ता निकष व किंमत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

 




 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) वायदा बाजाराची माहिती, हळदीच्या गुणवत्ता-आधारित व्यापाराची संकल्पना आणि बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कमोडिटी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सुमारे 150 शेतकरी, एफपीओ प्रतिनिधी, कृषी उद्योजक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध घटकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लहाने, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड तसेच ललित बहाले, गुणवंत पाटील हंगरगेकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रमुख हळद उत्पादक क्षेत्रांपैकी असलेल्या मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना कमोडिटी बाजारपेठेची माहिती थेट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत बाजारपेठेतील किंमत निर्धारण, बाजारातील चढ-उतार आणि जोखीम व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांना मंडई व एक्सचेंजमधील किमतींतील फरक, किमतींच्या निर्धारणामागील घटक तसेच किंमतीतील चढ-उतारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी उपलब्ध साधनांची माहिती देण्यात आली. याशिवाय वायदा बाजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे, किंमत ठरविण्याचे फायदे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पूरक ठरणाऱ्या पर्यायी बाजारपेठा, मालगोदाम व्यवस्था, गुणवत्ता निकष आणि आधार केंद्रांच्या उभारणीसंदर्भातील बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी कमोडिटी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांच्या मध्यस्थीखाली झालेल्या पॅनेल चर्चेत वायदा बाजाराची कार्यपद्धती, नियामक तरतुदी आणि बाजारातील व्यवहार प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच एफपीओ प्रमुख सूर्यजी शिंदे यांनी हळद वायदा बाजार आणि ऑप्शन्स करारांमधील स्वतःचा अनुभव सहभागींसमोर मांडला. गुणवत्ता निकष, वाहतूक खर्च, विक्री खर्च आणि व्यवहाराची वेळ स्वतः ठरवून बाजारपेठेतील संधींचा कसा लाभ घेता येतो, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या माध्यमातून एफपीओंना उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्य योजनांची माहितीही देण्यात आली. यामध्ये तपासणी खर्चाची 100 टक्के परतफेड तसेच स्वच्छता, वर्गवारी, वाळवणे आणि वाहतूक खर्चाच्या 75 टक्क्यांपर्यंत परतफेडीची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एक्सचेंज-आधारित व्यवहारांमध्ये शेतकरी गटांचा खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे नमूद करण्यात आले.

शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (एफपीओ) आधुनिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अधिक माहितीसाठी www.ncdex.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनसीडीईएक्सच्या किसान कॉल सेंटरशी 1800-103-4861 या क्रमांकावर  व एनसीडीईएक्सचे स्थानिक प्रतिनिधी रोहन धांडे (मो. 9130897105) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

******

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या नावात व नियमावलीत सुधारणा; सर्व प्रवासी वाहन चालकांना सदस्यत्वाचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 11 : राज्यातील ऑटो-रिक्षा, मीटर्ड टॅक्सी तसेच इतर प्रवासी वाहन चालक-मालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नावामध्ये शासनाने सुधारणा केली असून, शुद्धीपत्रकान्वये सदर मंडळाचे नाव आता धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे.

तसेच मंडळाच्या नियमावलीतही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सभासदत्वासाठीच्या पात्रतेमध्ये सुधारणा करून सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक अनुज्ञप्तीधारक (लायसन्सधारक) चालक मंडळाचे सदस्य होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक प्रवासी वाहन चालकांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

मंडळामार्फत सदस्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामध्ये जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, राज्य शासन निर्देशित इतर कल्याणकारी योजना, 65 वर्षांवरील ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन वाहन व गृह खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची अंशतः प्रतिपूर्ती तसेच राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर योजनांचा समावेश आहे.

मंडळाचे सदस्यत्व घेतल्यानंतर पात्र बॅजधारक प्रवासी वाहन चालकांना वरील सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहने चालविणारे अनुज्ञप्तीधारक चालकांनी मंडळाचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.

सदस्यत्व नोंदणीसाठी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत परिवहन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*******

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती, पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

 

• पशुधन संरक्षणासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. 11 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. सन 2026-27 या वर्षासाठी आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे सुरू असून, 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या 40 टक्के म्हणजेच 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ही लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे यांनी आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. लसींचे वितरण जिल्हास्तरावर सुरू असून, लस क्षेत्रीय स्तरावर पोहोचविताना शीतसाखळी (कोल्ड चेन) कुठेही खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणेचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी सर्व जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना निर्देश देताना सांगितले की, गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करावे. तसेच लसीकरण मोहिमेचा विहित नमुन्यातील बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे सादर करावा.


हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष


गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता, त्या हॉटस्पॉट भागांमध्ये प्राधान्यक्रमाने लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यापक मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील विविध सेवादात्यांचे सहकार्य घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.


पशुधनाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य


लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून राज्यातील गोधनाचे संरक्षण करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तसेच शेतकरी बांधवांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून, सद्यस्थितीत ही मोहीम राज्यभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. पशुपालकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील केले आहे.

राज्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे वेळेत लसीकरण करून घेण्यासाठी स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

******