13 May, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण




मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.


*नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी*


नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

 सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.


➡️हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे.


➡️भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.


➡️त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती.


➡️काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

00000

12 May, 2026

हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे रोजी यलो अलर्ट जारी

 

* नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घ्यावी



हिंगोली(जिमाका), दि. १२ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी मंगळवार (दि.१२) रोजी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ मे २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्माघाताची शक्यता अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच स्थूल व्यक्तींनी उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे.


*उष्मालाट काळात घ्यावयाची काळजी*


तहान नसली तरी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत.

हलक्या रंगाचे, सैलसर व सुती कपडे वापरावेत.

घराबाहेर जाताना डोके झाकावे, टोपी, छत्री व गॉगलचा वापर करावा. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

अतिउष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे.


*नागरिकांनी टाळावयाच्या बाबी*


विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे व श्रमाची कामे करणे टाळावे.

अनवाणी बाहेर फिरू नये.

अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर राहील याची काळजी घ्यावी.

दारू, चहा, कॉफी व शीतपेये यांचे सेवन टाळावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

जास्त मीठ, तिखट, तेलकट तसेच उच्च प्रथिनयुक्त अन्नपदार्थ टाळावेत. शिळे अन्न सेवन करू नये.

उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

अनावश्यक उष्णता निर्माण करणारे चमकदार दिवे किंवा बल्बचा वापर टाळावा.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


*******

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी




हिंगोली(जिमाका), दि. १२ : पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पशुपालकांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने शासनामार्फत “मुरघास संयंत्र वाटप योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्र खरेदीसाठी भरघोस अनुदान देण्यात येणार असून, पात्र पशुपालक तसेच शेतकरी समुहगटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त  डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर व मुरघास बेलर संयंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत मर्यादा २६ लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान (कमाल रु. १३ लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदान (कमाल रु. १९.५० लाख) देण्यात येणार आहे.


*पात्रता निकष*


योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान १० मोठे पशुधन किंवा १०० शेळ्या / मेंढ्या असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या मालकीचा किमान ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेत अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी ५ टक्के तर महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.


*आवश्यक कागदपत्रे*


योजनेसाठी अर्ज करताना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी कार्ड, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र अथवा स्वनिधी उपलब्ध असल्यास त्यासंबंधी बँक स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र तसेच बचत गट सदस्यांनी संबंधित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.


*महत्त्वाच्या अटी*


निवड झालेल्या लाभार्थ्यांनी जिल्हा उपायुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आल्यानंतर एका महिन्याच्या आत आवश्यक रकमेचा भरणा करणे आवश्यक राहील. मंजुरीनंतर तीन महिन्यांच्या आत संयंत्र खरेदी करणे बंधनकारक असून, अन्यथा प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. उपकरणाच्या किंमतीत शासनाने निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च झाल्यास अतिरिक्त रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागेल. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

शेतकरी समुहगटांचाही समावेश

“वैरण विकास योजना” अंतर्गत “मुरघास संयंत्र वाटप योजनेव्दारे उद्योजकता विकास करणे” या उपक्रमात विविध शेतकरी समुहगटांचाही समावेश करण्यात आला आहे. यात सहकार अधिनियम अथवा धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत समूह आधारित संसाधन केंद्र तसेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघांचा समावेश आहे.

सदर संस्थांकडे किमान ५० शेतकरी सदस्य असणे, किमान ५ लाख रुपयांचे भागभांडवल असणे, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे व संस्था नफ्यात असणे आवश्यक आहे. पात्र समुहगटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार असून, शासनाने नमूद केलेल्या इतर सर्व अटी लागू राहतील.

पशुपालकांना चारा टंचाईवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पात्र पशुपालक व शेतकरी समुहगटांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******

पाणी टंचाई निवारणासाठी नवीन विंधन विहिरी व हातपंपांना प्रशासकीय मान्यता



हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील पाणी टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये नवीन विंधन विहिरी व हातपंप उभारणीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसमत, सेनगाव व हिंगोली तालुक्यातील प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.

वसमत व सेनगाव तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट तसेच प्रपत्र ‘ब’ प्राप्त झालेल्या 16 गावांमध्ये 23 नवीन विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील आंबा, पळशी, वाखारी, पळसगाव ता. माळवटा, सारोळा तसेच सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर, भंडारी, हत्ता तांडा, हत्ता, गोंडाळा, गोरेगाव, कहाकर बु., आजेगाव, सवना, कडोळी व उटीब्रम्हचारी या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 17 लाख 95 हजार 173 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तसेच हिंगोली तालुक्यातील पारोळा, समगा, घोटादेवी, बोराळा, बोराळवाडी, दुर्गधामणी व भांडेगाव या 7 गावांमध्ये 7 नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांसाठी  प्रति विंधन विहिरी 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 5 लाख 46 हजार 357 रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय हिंगोली तालुक्यातील खडकद बु., खानापूर बंगला, खंडाळा, देऊळगाव रामा व गाडीबोरी या 5 गावांमध्ये 6 नवीन विंधन विहिरी व हातपंपाच्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रक शासन मान्य दराप्रमाणे तयार करण्यात आले असून, त्यासाठी 4 लाख 68 हजार 306 रुपयांच्या खर्चासही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

*******

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी सोडविण्यासाठी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करण्याचे निर्देश

 



हिंगोली(जिमाका), दि. 12 : शासन सेवेत कार्यरत तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधित विविध अडचणी वेळेवर व कार्यक्षमतेने सोडविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात विशेष “कर्मचारी समाधान शिबिर” आयोजित करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

वेतन, बढती, बदली, निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान, रजा, सेवापुस्तिका अद्ययावतीकरण, वरिष्ठता आदी सेवाविषयक बाबींसाठी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही किरकोळ कारणांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने कर्मचारी वर्गाला विभागीय कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर अर्ज सादर करण्यासाठी जावे लागत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी दि. 2 मे 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार हिंगोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालय तसेच सर्व तालुका मुख्यालयांवर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी “कर्मचारी समाधान शिबिर” आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या शुक्रवारी शासकीय सुट्टी असल्यास त्यापूर्वीच्या कार्यालयीन दिवशी शिबिर घेण्यात येईल.

जिल्हा मुख्यालयावरील शिबिर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका मुख्यालयावरील शिबिर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबंधित सर्व विभागांचे जबाबदार अधिकारी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करतील. सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. अपरिहार्य परिस्थितीत अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.

या शिबिरात संबंधित तक्रारदार अधिकारी-कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयात, तालुकास्तरीय अडचणी तहसील कार्यालयात तर विभागीय स्तरावरील अडचणी विभागीय आयुक्त कार्यालयातील शिबिरात स्वीकारण्यात येणार आहेत.

परिपत्रक निर्गमित झालेल्या दिनांकापर्यंतची तसेच पुढील शिबिरापर्यंत प्राप्त होणारी सर्व प्रलंबित प्रकरणे प्रथम प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व कार्यालयांनी सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची अद्ययावत यादी तयार करून त्यांचा शिबिरामध्ये समावेश करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही सेवाविषयक अडचणी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेऊन नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये उच्च प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असल्यास निर्धारित कालावधीत प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे सादर करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक कार्यालयाने प्राप्त प्रकरणांची नोंदवही अद्ययावत ठेवून तक्रारी निकाली काढेपर्यंत त्यामध्ये नियमित नोंदी कराव्यात. तसेच प्रत्येक महिन्याच्या अखेरीस स्थितीदर्शक अहवाल उपविभागीय कार्यालय, तालुका कार्यालय व इतर कार्यालयांनी पुढील महिन्याच्या 2 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

*****

खरीप हंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पीकस्पर्धेचा निकाल जाहीर

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पीकस्पर्धेसाठी तालुका हा मूलभूत घटक मानण्यात येतो. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांची उत्पादकता विचारात घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादकता संबंधित तालुक्याच्या त्या पिकाच्या मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादकतेच्या दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.

खरीप हंगाम सन २०२५ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीद्वारे दि. ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते वगळून जिल्हास्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीमार्फत संबंधित जिल्ह्यातील स्पर्धकांमधून पीकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित तालुक्यातील स्पर्धकांमधून तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करून निकाल घोषित करण्यात येतील.

पीकस्पर्धेमध्ये उच्चतम उत्पादकता प्राप्त करणाऱ्या विजेत्या शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक पीक पद्धती व तंत्रज्ञानाची माहिती घडीपत्रिका तसेच विविध प्रचार-प्रसार माध्यमांद्वारे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील कृषी उत्पादन वाढीस चालना मिळून इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

******

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च 2026 च्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना “राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार” योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येकी रुपये 5 हजार इतकी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. त्यामध्ये शाळेचे निकालपत्र, शाळेचे शिफारसपत्र, इयत्ता 10 वी/12 वी गुणपत्रक, जातीचा दाखला, बँक पासबुकाची छायांकित प्रत, आधार कार्ड प्रत आदी कागदपत्रांचा समावेश असावा.

यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांच्यामार्फत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्यात यावेत, असे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.


********