04 February, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 



• परिस्थितीशी दोन हात करत परीक्षेची तयारी करा 

• मुलाखतीसाठी विविध आयएएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार 


हिंगोली(जिमाका), दि. ४ : सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ध्येयनिश्चिती करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. परिस्थिती कोणतीही असो तिचा बाऊ न करता प्रयत्नरत राहिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज‌ येथे केले.

 शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात आज जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधा व मार्गदर्शन योजनांची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे देताना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आर्थिक, सामाजिक वा इतर कोणत्याही परिस्थितीचा बाऊ करू नये. येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ध्येय निश्चित करून ते  गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

यावेळी त्यांनी यूपीएससी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण अभ्यास, चालू घडामोडींचे महत्त्व आणि आत्मविश्वास या बाबींवर भर दिला. अपयशातून खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास करू असा विश्वास व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांने त्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याचे सांगून आई-वडिल परजिल्ह्यात कामानिमित्त गेले असल्याचे सांगत मन वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यावर त्या विद्यार्थ्यास आत्मविश्वास असल्यास आई-वडिलांचे मन नक्कीच वळवू, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिला. 


या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गिरीकर यांनी केले.

*****

जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागांनी तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दायित्व व निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तसेच जनसुविधांशी संबंधित दायित्वाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सन 2024-25 मधील दायित्वाच्या निधी मागणीचे प्रस्ताव संबंधित कामे पूर्ण झाल्याच्या अहवालासह दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत. अन्यथा मार्च 2026 नंतर निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

तसेच विविध विकास योजनांअंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी विहित कार्यपद्धतीनुसार तातडीने खर्च करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

या बैठकीत सन 2025-26 मधील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण प्रक्रिया, सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांना युनिक आयडी देणे तसेच पुनर्विनियोजन प्रस्ताव यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

*****

03 February, 2026

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हिंगोली येथे टूडी-इको तपासणी शिबीर * १७० विद्यार्थ्यांच्या तपासणीत ३५ जणांना शस्त्रक्रियेसाठी केले संदर्भित

 




हिंगोली(जिमाका), दि. 03 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील संदर्भित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे टूडी-इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबीरामध्ये किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास एल., डॉ. सोनिया कारापूरकर तसेच विजय खरात व उल्हास पाटील यांनी तपासण्या केल्या.

हे शिबीर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हिंगोली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस  आणि अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. 


या शिबीरास उपस्थित विशेषतज्ज्ञांचे स्वागत डॉ. दीपक मोरे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. शैलेजा कुप्पास्वामी (नियंत्रक वैद्यकीय अधिकारी – बाल स्वास्थ्य), डॉ. नितीन पुरोहित (सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक), डॉ. नितीन अग्रवाल (बालरोग तज्ज्ञ), श्रीमती आशा क्षीरसागर (सहाय्यक मेट्रन) आदी मान्यवरांनी केले.

या शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्रीमती शिंदे (अधिपरिचारिका), श्रीमती कदम (परिचारिका), गाभणे लक्ष्मण (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण, राजेंद्र खंदारे , ब्रदीनाथ शेळके  तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, ए.एन.एम., कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन परिचारिकांनी परिश्रम घेतले.


हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यातील एकूण १७० संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टूडी-इको तपासणी करण्यात आली. यापैकी ३५ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किम्स हॉस्पिटल, ठाणे येथे मोफत करण्यात येणार आहेत.


या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी योग्य वेळी उपचार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी दैनंदिन जीवनात हृदयविकारासंदर्भात वेळोवेळी टूडी-इको तपासणी करून वेळेत आजाराचे निदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

***

02 February, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी

 







हिंगोली(जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिनांक 31 जानेवारी रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला, आजेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच जयपूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली.


यावेळी त्यांनी शाळेतील वर्गखोल्या, अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. यासोबतच शाळांमधील इतर आवश्यक सुविधांचीही पाहणी करण्यात आली.


पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशालेच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. शाळेच्या सध्याच्या परिस्थितीबाबत तसेच शैक्षणिक प्रगतीसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.


गोरेगाव, आजेगाव व जयपूर येथील दक्ष पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नसून, पालक व ग्रामस्थांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे आवाहन त्यांनी केले.


या वेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नागरिक तसेच पालक उपस्थित होते.

******

जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त हिंगोली’ अभियान राबविणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली (जिमाका), दि. 02: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षांची शुचिता, पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त हिंगोली’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

या अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर दक्षता उपाययोजना राबविण्यात येणार असून भरारी पथके, स्थिर पथके, केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. परीक्षा काळात कॉपीप्रकरणांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही निरीक्षण, कागदपत्रांची काटेकोर तपासणी तसेच गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता परीक्षा प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच केंद्रस्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 

पालक, शिक्षक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून ‘कॉपीमुक्त हिंगोली’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की, इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 687 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी 4 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून 39 परीक्षा केंद्रांवर 15 हजार 241 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 7 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. दहावीच्या 54 व बारावीच्या 39 अशा सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

******


01 February, 2026

 



जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांना अभिवादन



हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त  संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 


*****


31 January, 2026

आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर



* पात्र अर्जदारांनी कागदपत्रे तपासणी व मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन


हिंगोली(जिमाका), दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दि. २२ डिसेंबर २०२५ च्या जाहिराती  अन्वये जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांकरिता जाहिरात प्रसिद्ध करून दि. २४ डिसेंबर २०२५ ते दि. ०२ जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hingoll.nic.in/) प्रसिद्ध करण्यात आली आहे.


या अनुषंगाने पात्र अर्जदारांची तालुकानिहाय मूळ कागदपत्रांची तपासणी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार असून दुपारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार आहेत.

त्यानुसार हिंगोली (शहर) साठी दि. ०३ फेब्रुवारी २०२६, हिंगोली (ग्रामीण) साठी दि. ०४ फेब्रुवारी २०२६, सेनगाव तालुक्यासाठी दि. ०५ फेब्रुवारी २०२६, कळमनुरी तालुक्यासाठी दि. १० फेब्रुवारी २०२६, वसमत तालुक्यासाठी दि. ११ फेब्रुवारी २०२६ तसेच औंढा नागनाथ तालुक्यासाठी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी कागदपत्र तपासणी व मुलाखती होणार आहेत.


मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीची संधी दिली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. पात्र अर्जदारांनी अर्जासोबत सादर केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व एक छायांकित प्रतींचा संच सोबत आणून विहित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहावे. नेमून दिलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास अर्जाचा विचार न करता उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


******