28 April, 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल, मोबाईल अॅपद्वारे लाभार्थ्यांना थेट सेवा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप (Annasaheb Patil Mahamandal App) हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून, महामंडळाच्या योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून करता येणार आहे.

महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून, योजनांची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत होता किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्याने लाभार्थ्यांना वेळ, खर्च व अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर महामंडळाने दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांशी करार करून योजनांच्या सेवा प्रति सेवा 85 रुपये दराने उपलब्ध करून दिल्या होत्या. आता त्यापुढील टप्पा म्हणून मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी त्यांच्या अँड्राइड मोबाईलवर हे अॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेल नोंदवून ओटीपीद्वारे नोंदणी पूर्ण करावी. पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे.

महामंडळाच्या योजनांमध्ये  एलओआय, सँक्शन, आणि क्लेम असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे तसेच पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे.

सध्या क्लेम सादर करणाऱ्या तसेच नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, त्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल व पारदर्शकता वाढेल.

यामध्ये जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, गुगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाईल. तसेच ही माहिती महामंडळाच्या इएचआरएमएस (EHRMS) प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अॅप डाउनलोड करून वापर करावा व या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

*******

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे अपूर्ण कागदपत्रांअभावी रद्द स्थितीत असलेली  प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. या प्रकरणांतील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार असल्याने कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित  प्रकरण छाननी स्तरावर दिसेल. या टप्प्यावर महामंडळामार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी सबमिट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल.

तसेच, व्याज परताव्यासाठी  क्लेम  सादर करताना कागदपत्रांतील तुटींमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरणेही लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसून येतील. अशा प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता संबंधित जिल्हा समन्वयकांमार्फत करून घ्यावी. प्राथमिक तपासणीनंतर विभागीय समन्वयकांमार्फत ही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. लाभार्थ्यांनी 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रकरण नियमित करून घ्यावे.

भविष्यात होल्ड प्रकरणांसाठी कागदपत्रे थेट लाभार्थ्यांच्या लॉगिनमधून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुटी  नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वी व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम सादर  करण्यास  परवानगी  होती. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचा क्लेम सेंट फॉर कॅफो या स्तरावर पोहोचताच पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, बँक मंजुरी व व्याज परताव्यासाठी पात्र असलेली काही प्रकरणे तपासणीअंती एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा कागदपत्रांमधील विसंगतीमुळे ब्लॉक करण्यात आली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटमार्फत झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही करण्यात आली होती. या संदर्भात फौजदारी कार्यवाही सुरू आहे.

ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे ब्लॉक झाली आहेत त्यांनी संपर्क क्रमांक, बँक तपशील दुरुस्त करून तसेच मूळ कागदपत्रांसह संबंधित अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. पडताळणीनंतर अशा प्रकरणांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

सर्व लाभार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर जाऊन होल्ड किंवा ब्लॉक होण्याची कारणे तपासून त्वरित आवश्यक कागदपत्रांची  पूर्तता  करावी. काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. सर्व संपर्क यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महामंडळ नियमानुसार योजना राबवत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे. 

******

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण व व्यवसाय वर्धन उपक्रम

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य पुरविण्यापुरते काम मर्यादित न ठेवता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम तसेच मार्केटींग टॅब सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.

महामंडळाने स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन (बिजनेस प्रोमोशन)  मार्केटींग टॅब विकसित केला आहे. हा उपक्रम फ्ल्‍िापकार्ट, ॲमेझान आणि इंडियामार्ट यांसारख्या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता ऑनलाईन अपलोड करता येतो.

सध्या या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका यानुसार शोध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जवळील लाभार्थी उद्योजकांची माहिती सहज मिळू शकते व त्यांच्या उत्पादनांचा तसेच सेवांचा लाभ घेता येतो.

या माध्यमातून लोकल ते ग्लोबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, लघुउद्योजकांनाही मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याशिवाय, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ भांडवल नव्हे तर योग्य ज्ञान, कौशल्ये व बाजारपेठेची समज आवश्यक असल्याने महामंडळाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. वेबिनार, युट्यूब आणि पॉडकॉस्ट यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय विस्तार, उत्पादन गुणवत्ता, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहकांशी संवाद, विक्री कौशल्ये, आर्थिक नियोजन व नफा वाढविण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तांत्रिक माहितीही उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाच्या अधिकृत YouTube व Facebook चॅनेलवर प्रशिक्षण व्हिडिओ उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना सोयीच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

महामंडळाने  डिजीलॉकर  सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली असून त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. भविष्यात महा-आयडी तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्याशी समन्वय साधून आणखी डिजिटल सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

********

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेची निवड यादी जाहीर

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून त्यांना इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा 1 हजार रुपये असून वार्षिक 12 हजार रुपये इतका आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दि. 28 डिसेंबर 2025 रोजी  एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक आदी बाबींमध्ये आवश्यक दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेमार्फत दि. 5 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती.

विद्यार्थी व पालकांनी शाळेमार्फत सादर केलेल्या दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी शुक्रवार, दि. 24 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

दि. 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या एनएमएमएस परीक्षेसाठी राज्यभरातून 2 लाख 50 हजार 745 विद्यार्थ्यांची  नोंदणी  करण्यात आली  होती. महाराष्ट्र राज्यासाठी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून 11 हजार 682 शिष्यवृत्तींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील आरक्षण धोरणानुसार विविध संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के आरक्षण लागू आहे.

राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यासाठी  इयत्ता 7 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांची संख्या तसेच 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणावर जिल्हानिहाय स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे.

या परीक्षेची निवड यादी व गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://mseenmms.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हे, शाळा व विद्यार्थ्यांनी निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाची प्रक्रिया संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना) व शिक्षण संचालक (योजना) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.

******

परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी 21 मेपर्यंत अर्ज करा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी  प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्तीमध्ये विविध शाखांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी शाखेसाठी 25, वास्तुकला  शास्त्रासाठी  6, व्यवस्थापनासाठी  3, विज्ञानासाठी  15, वाणिज्य/अर्थशास्त्रासाठी 9, कला शाखेसाठी 9, विधी शाखेसाठी 5 आणि औषध निर्माण शास्त्रासाठी 3 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे राहील. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे सन 2025-26 या वर्षाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत तर पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण आवश्यक राहतील. तसेच परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना संबंधित परदेशी शैक्षणिक संस्थेकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असणे आवश्यक आहे. कंडिशनल ऑफर लेटर ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ts.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीनेही सादर करावी. अर्जाचा नमुना, शासन निर्णय, कागदपत्रांची यादी व सविस्तर माहिती https://obebahujankalyan.maharashtra.gov.in तसेच https://dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

पूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे, आकार प्रिमायरोरा, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे – 411006 येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.

******

27 April, 2026

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ५ मेपर्यंत सादर करावेत

 


हिंगोली (जिमाका), दि. २७ : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. सन २०१९-२० ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील हिंगोली जिल्ह्यातील अनेक अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याने संबंधित महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षातील ५५ अर्ज, २०२०-२१ मधील २०० अर्ज, २०२१-२२ मधील १५२ अर्ज आणि २०२२-२३ मधील २५० अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तसेच सन २०२३-२४ मधील ७७ अर्ज महाविद्यालय स्तरावर व १०० अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत.

याशिवाय सन २०२४-२५ मधील १८० अर्ज महाविद्यालय स्तरावर व २०२ अर्ज विद्यार्थी स्तरावर, तर सन २०२५-२६ मधील ७४६ अर्ज महाविद्यालय स्तरावर आणि ४३२ अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जांवर महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन पाठविणे अपेक्षित आहे. सातत्याने पत्रव्यवहार, बैठका तसेच व्हॉट्सअॅप समूहांद्वारे सूचना देऊनही काही महाविद्यालयांकडून अर्ज मंजुरीची कार्यवाही होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

विहित मुदतीत अर्ज मंजुरीसाठी न पाठवल्यास आणि पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज संबंधित महाविद्यालयांनी दि. ५ मे २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

*******

हिंगोली जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी * नागरिकांनी खबरदारी घ्यावी

 


हिंगोली(जिमाका), दि. २७ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी सोमवार (दि. २७) रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी मंगळवार (दि. २८)साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच दिनांक २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


*उष्णतेच्या काळात घ्यावयाची काळजी*


काय करावे :

१. तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

२. ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत. हलक्या रंगाचे, सैलसर सुती कपडे वापरावेत.

३. घराबाहेर पडताना डोके झाकावे, टोपी, छत्री, गॉगल वापरावा व त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

४. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.


काय टाळावे :

१. शक्यतो उन्हात जाणे टाळावे. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडू नये.

२. अनवाणी बाहेर जाऊ नये.

३. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर ठेवावे.

४. मद्यपान, चहा, कॉफी व शीतपेये टाळावीत.

५. जास्त मीठ, तिखट, तेलकट व शिळे अन्न खाऊ नये.

६. बंद चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

७. अनावश्यक उष्णता निर्माण करणारे दिवे किंवा बल्ब वापरणे टाळावे.


*विजांचा कडकडाट व पावसाच्या वेळी खबरदारी*


या गोष्टी कराव्यात :

१. गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळावे.

२. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेर थांबू नये.

३. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत.

४. तारांचे कुंपण, विजेचे खांब व लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.

५. पाण्यात उभे असल्यास त्वरित बाहेर पडावे.


या गोष्टी करू नयेत :

१. विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नये व शॉवरखाली अंघोळ करू नये.

२. वादळी वाऱ्याच्या वेळी लोखंडी तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.

३. उंच झाडाखाली थांबू नये.

४. उंच लोखंडी मनोऱ्याजवळ उभे राहू नये.

५. उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये.

जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


*******