09 July, 2026

हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यांनंतर प्राथमिक पाहणीचे पंचनामे पूर्ण

 

• औंढा नागनाथ १० तर वसमत तालुक्यात ९५ घरांचे अंशतः नुकसान 


• नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – प्रशासनाचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. ९ : जिल्ह्यात गुरुवार (दि.९) रोजी झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भूकंप बाधित गावांना भेटी देत गावनिहाय प्राथमिक पाहणीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले होते. सायंकाळपर्यंत पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून, अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र १०५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी सांगितले.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अहवालानुसार आज गुरुवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र हिंगोली परिसरात असून सर्व धक्क्यांची खोली १० किलोमीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ सर्व तहसील प्रशासन, महसूल यंत्रणा व संबंधित विभागांना परिस्थितीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. गावनिहाय पंचनामे व प्राथमिक पाहणी करण्यात आली असून, प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक नुकसान अहवालानुसार हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्यांत कोणतेही नुकसान झाले नाही.

औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथे २ तर आमदरी येथील ८ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, धामणगाव, खंडाळा, सिरळी आणि राजवाडी

या गावांमध्ये ९५ घरांच्या भिंतींना तडे गेल्याची नोंद झाली असून संबंधित महसूल यंत्रणेकडून पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे. भूकंपासंदर्भातील अधिकृत माहिती प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येत असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

*****

आयुष्मान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व एनक्यूएएस मानांकनासाठी आरोग्य यंत्रणेने गतीने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 




हिंगोली (जिमाका), दि. ९ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र रुग्णांना लाभ मिळवून द्यावा तसेच राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच एनक्यूएएसच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आरोग्य संस्थानिहाय आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पात्र रुग्णांना दाखल करून योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच प्रत्येक लाभार्थ्याची पोर्टलवर वेळेत नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्रांची पदे भरलेली असताना शासकीय रुग्णालयांमध्ये या सेवेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी पुढील सात दिवसांत उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्रांची नियुक्ती करण्याबाबत संबंधित कंपनीला निर्देश देण्यात आले.

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांनी प्राधान्याने मानांकनासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यासाठी अंग झोकून काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक तालुक्यातून किमान दहा उपकेंद्रांचा एनक्यूएएस मानांकनासाठी समावेश करण्यात यावा, असे ठरविण्यात आले. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन आरोग्य संस्थांमधील एनक्यूएएसच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घ्यावा, असे कडक निर्देशही त्यांनी दिले.

रुग्णालयांतील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याच्या तसेच आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे, डॉ. नरवाडे, डॉ. तृप्ती पाटील, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. नारायण शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, डॉ. प्रशांत पुठावार यांच्यासह सर्व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.


******

शेतखरडणी अनुदान वितरणातील अनियमिततेप्रकरणी सहायक कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

 


 

·         ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 9 : कळमनुरी तालुक्यातील मौजे पिंप्री बु., कृष्णापूर आणि येगाव येथील बाधित शेतकऱ्यांना शेतखरडणी अनुदान वितरणात अनियमितता झाल्याप्रकरणी संबंधित सहायक कृषी अधिकारी श्री. एस. एस. संगमवार यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला असून, संबंधित ग्राम महसूल अधिकारी श्री. एकनाथ कदम यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

तहसीलदार, कळमनुरी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, शेतखरडणी अनुदान वितरणासाठी तयार करण्यात आलेल्या लाभार्थी यादीत सातबारा उताऱ्यावर नावे नसलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. तसेच काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखवून अतिरिक्त अनुदान वितरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणात संबंधित सहायक कृषी अधिकारी श्री. एस. एस. संगमवार यांनी शासकीय कामकाजात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जबाबदारीची निश्चिती करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस तहसीलदार, कळमनुरी यांनी केली होती.

त्यानुसार संबंधित सहायक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार, कळमनुरी यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे.

याशिवाय या प्रकरणातील संबंधित ग्राम महसूल अधिकारी (बाळापूर सज्जा) एकनाथ कदम यांच्याविरुद्धही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून, नियमानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे.

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखण्यासाठी अनियमितता करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा प्रशासनाने इशारा दिला आहे.

********

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

  

·         जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाची धडक मोहीम; 17 जणांकडून 3 हजार 400 रुपयांचा दंड वसूल

 

हिंगोली (जिमाका), दि. 9 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार तसेच अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध विशेष दंडात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत आज पंचायत समिती, हिंगोली येथे तपासणी करण्यात आली. यावेळी कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या अथवा तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांकडून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेतील विविध कार्यालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत 3 कर्मचाऱ्यांकडून 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

अशाप्रकारे एकूण 17 व्यक्तींवर कारवाई करून 3 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यांनी कोटपा अधिनियम, 2003 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटख्याचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार जिल्हाभर ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयात अचानक भेट देऊन तपासणी करण्यात येणार असल्याने कर्तव्यावर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करू नये किंवा ते सोबत बाळगू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही तंबाखू-गुटखा अथवा अन्य तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करू नये किंवा ते सोबत बाळगू नयेत, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने केले आहे.

ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) आणि आनंद साळवे (मेडिकल सोशल वर्कर) यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.

कोटपा अधिनियम, 2003 मधील प्रमुख तरतुदी

  • कलम 4 : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी.
  • कलम 5 : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी.
  • कलम 6 (अ) : 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणे अथवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.
  • कलम 6 (ब) : शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करण्यास बंदी.
  • कलम 7, 8 व 9 : तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील किमान 85 टक्के भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा स्पष्टपणे छापणे बंधनकारक आहे.

 

*******

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ९२ विद्यार्थ्यांची टुडी-इको तपासणी * १८ विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड





हिंगोली (जिमाका), दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे आज टुडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्यातील ९२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १८ विद्यार्थ्यांची मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.

हे शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. ही तपासणी ठाणे येथील केआयएमएस हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल., तसेच विजय खरात व उल्हास पाटील यांनी केली.

या शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील नवजात शिशु विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडुळे, डॉ. स्नेहल नगरे, सहाय्यक मेट्रन श्रीमती जोशी आदी उपस्थित होते.

हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील १०० संशयित विद्यार्थ्यांपैकी ९२ विद्यार्थ्यांची टुडी-इको तपासणी करण्यात आली. त्यामधून १८ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केआयएमएस हॉस्पिटल, ठाणे येथे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरजू बालरुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरबीएसकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अधिपरिसेविका, परिसेविका, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, डीईआयसी व्यवस्थापक डॉ. संतोष नांदूरकर, ज्ञानोबा चव्हाण, राजेंद्र खंदारे, ब्रदीनाथ शेळके तसेच आरबीएसके व डीईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, एएनएम, कार्यालयीन कर्मचारी आणि रुग्णालयातील परिचारिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास वेळेत टुडी-इको तपासणी करून आजाराचे लवकर निदान करून घ्यावे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

****

हक्क व बाल संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती


  

हिंगोली (जिमाका), दि. 9 : महिला व बालविकास विभागाच्या वतीने येथील शहरातील बियाणी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल हक्क, बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध तसेच शासकीय योजनांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे मूलभूत हक्क, शिक्षणाचा हक्क, संरक्षणाचा हक्क आणि सहभागाचा हक्क याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी चाईल्ड हेल्पलाइन 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन सेवेची माहिती देताना, संकटात सापडलेली, अत्याचारग्रस्त, बेवारस, हरवलेली किंवा संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी ही सेवा 24 तास उपलब्ध असल्याचे सांगितले. कोणत्याही बालकावर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, बाल संरक्षण सेवा, समुपदेशन सुविधा तसेच गरजू व संकटग्रस्त बालकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहण्याबरोबरच इतर बालकांनाही योग्य माहिती देऊन समाजात जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षिका शुभांगी नाईक, एस. आर. देसाई, एस. आर. चव्हाण आणि सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बाल हक्क, बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली, असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त केला.

******

आपत्ती सौम्यीकरणाच्या कामांसाठी बाजारभावानुसार सुधारित प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



·         प्रत्येक गावात पब्लिक ॲड्रेस सिस्टीम उभारण्याचे निर्देश

·         भूकंपग्रस्त गावांजवळ सिस्मो मशीन बसविण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

·         जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर

·         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 9 : जिल्ह्यात अलिकडच्या काळात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना व इशारे देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भूकंपाच्या हालचालींचे वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी भूकंपग्रस्त गावांच्या परिसरात सिस्मो मशीन बसविण्याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या यंत्रणेमुळे भूकंपविषयक नोंदी संकलित होऊन भविष्यातील नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, पूर्वतयारीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि नागरिकांच्या जीवित व वित्तहानीचे प्रमाण कमीत कमी राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

बैठकीत आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत प्राप्त विविध प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारण व आपत्ती सौम्यीकरणाच्या दृष्टीने नालाखोलीकरण व सरळीकरणाची कामे हाती घेण्यासाठी प्राप्त प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये हिंगोली तालुक्यातील कलगाव, खांबाळा, वैजापूर, भांडेगाव तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील काकडधाबा आणि पांगरा तर्फे लाख या गावांमध्ये नालाखोलीकरण व सरळीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमधील अंदाजित दर बाजारभावाच्या तुलनेत अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विभागांनी प्रत्यक्ष बाजारभावाचा आधार घेऊन वाजवी दराने सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. शासन निधीचा पारदर्शक, काटेकोर व परिणामकारक वापर होण्यासाठी प्रस्ताव वास्तववादी, तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि बाजारभावाशी सुसंगत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

*****