10 March, 2026

एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक

 

एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक

 

·         प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळणार एचपीव्ही लस

·         जिल्ह्यातील मुलींना एचपीव्ही लस घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि.10:  दैनंदिन जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद येथील सभागृहामध्ये एचपीव्ही लसीकरण मोहीम बाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. चक्रधर   मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलजा कुप्पास्वामी, गट विकास अधिकारी माया वानखडे, अनिल मुंढे, प्रफुल्ल तोटेवाड, सुरेश कांबळे, यांच्यासह इतर  विभाग प्रमुख, सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

14 वर्षे पूर्ण झालेल्या पण 15 वा वाढदिवस साजरा न केलेल्या (जन्म तारीख 8 मार्च 2011 ते 7 मार्च 2012 या कालावधीत जन्मलेल्या) जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाणार आहे. 

            गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासन एचपीव्ही सुरक्षित लसीकरण मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, या लसीमुळे भविष्यात मुलींना गर्भाशय मुख कर्करोग होणार नाही. या मोहिमेचा जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 मुलींना थेट फायदा होणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेमध्ये आपल्या मुलींना ही लस द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

प्रास्ताविक जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ सतीश रुणवाल यांनी केले आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा जीवघेणा आजार ठरत आहे. हीच लस आता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्येच आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विनामूल्य मिळणार आहे. ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका 99 टक्क्यांनी कमी होतो.

 

गर्भाशय कर्करोग : वेळीच सावधनता बाळगावी

 

अस्वच्छता, असुरक्षित संबंध आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग वाढतोय. सध्या हा आजार महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा वयाच्या 14 ते 15 व्या वर्षी 'एचपीव्ही' लस घेणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील मुलींनाही या महागड्या लसीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पिढी आरोग्यदायी राहील. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या पालकांनी ही लसीकरण करून घ्यावे. ही लस एकदम सुरक्षित असून, जगात जवळपास 80 देशात ही लस किशोरवयीन मुलींना यशस्वी दिलेली आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

मोहीम यशस्वी राबवण्यासाठी सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखखाली प्रशिक्षित स्टाफमार्फत फक्त आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच दिली जाणार आहे.

हे एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणासाठी पालकाची संमती अनिवार्य असून, ती यु-विन पोर्टलवर डिजिटल स्वरुपात किंवा इंटरनेट नसल्यास लेखी स्वरुपात घेतली जाईल. लसीकरणानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईने चिन्ह केले जाईल.

मुलींनी उपाशीपोटी लस घेऊ नये; पालकांनी त्यांना नाश्ता देऊन लसीकरणासाठी पाठवावे, लसीकरणानंतर किमान 30 मिनिटे निरीक्षणाखाली थांबणे आवश्यक आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

******* 




आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रियेचा निकाल जाहीर, पदवी-पदव्युत्तर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १३ मार्चपर्यंत अंतिम संधी

 


·         * कागदपत्र पडताळणीचा दि. १२ ते १८ मार्च दरम्यानचा कार्यक्रम रद्द, सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अंतर्गत हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रिक्त असलेल्या ४२३ केंद्रांसह एकूण ४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती.

या प्रक्रियेनुसार दि. ०२ जानेवारी २०२६ अखेर प्राप्त झालेल्या एकूण ३१०१ अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १८६१ उमेदवारांच्या मुलाखती दि. ०३ फेब्रुवारी २०२६ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.

आपले सरकार सेवा केंद्राकरिता घेण्यात आलेल्या या मुलाखत प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. ०९ मार्च २०२६ रोजी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hingoli.nic.in/) जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ज्या उमेदवारांना गुणदान करण्यात आलेले नाही, अशा उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात विनंती करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम संधी देण्याची मागणी केली होती.

या विनंतीची सहानुभूतीपूर्वक दखल घेत जिल्हा प्रशासनाने संबंधित उमेदवारांना त्यांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टीफिकेट) जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी   वाजेपर्यंत अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांनी केवळ पदवीचे मूळ प्रमाणपत्र (डिग्री सर्टीफिकेट) सादर करणे आवश्यक असून उत्तीर्ण प्रमाणपत्र (पासिंग सर्टीफिकेट) किंवा प्रोव्हीजनल डिग्री सर्टीफिकेट यांचा विचार केला जाणार नाही. निर्धारित मुदतीनंतर सादर केलेल्या प्रमाणपत्रांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी गंभीर नोंद घ्यावी.

तसेच आपले सरकार सेवा केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांच्या रहिवास व शैक्षणिक अर्हतेबाबत इतर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले आक्षेप दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही.

उमेदवारांनी सादर केलेल्या पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रांच्या आधारे गुणदान करण्यात आल्यानंतर गुणवत्ता यादीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच प्राप्त आक्षेपांच्या आधारेही गुणवत्ता यादीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दि. ०९ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादी ही तात्पुरती असून, कागदपत्र पडताळणीनंतर काही उमेदवारांच्या गुणांमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलण्याची अथवा काही उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रांची अंतिम गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://hingoli.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी जाहीर करण्यात आलेला तात्पुरत्या निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचा दि. १२ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ दरम्यानचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*****

'जल जीवन'च्या पाणी पुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत विविध गावांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित गावांतील योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती समृद्धी दिवाणे, सर्व संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंते, सर्व उपविभागांचे अधिकारी, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस लि. या अंमलबजावणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेणे आवश्यक असलेल्या गावांतील विद्युत जोडणीसाठी लागणाऱ्या कोटेशनची आवश्यक रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोग निधीतून कोटेशनची रक्कम भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर करण्यात आली असल्यामुळे यावर्षी टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, या दृष्टीने नियोजन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच योजनांच्या कामांबाबत प्रतिसाद न देणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

याशिवाय जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करून त्याची नोंद शासनाच्या संकेतस्थळावर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

*****

नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणी प्रशिक्षण आजपासून सुरु

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्यामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली अंतर्गत अधिकारी-कर्मचारी वेतन देयके, भत्ते व निवृत्तीवेतन संबंधित देयके तयार करणे, कर्ज व अग्रिमे तसेच आयकर प्रणाली आदी कामकाजासाठी अद्ययावत सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याबाबत संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सूचित केले आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच त्यांच्या कार्यालयातील वेतन देयक व लेखाविषयक कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली कोषागार कार्यालय व जिल्हा मुख्यालय स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दि. 11 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत शासकीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षण हॉल,  हिंगोली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

तसेच उपकोषागार कार्यालय वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा नागनाथ स्तरावरील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दि. 12 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत शासकीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षण हॉल, हिंगोली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचेही कोषागार कार्यालयाने कळविले आहे.

संबंधितांनी स्वतः उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी केले आहे.

 

******

 

जागतिक महिला दिनानिमित्त ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धा उत्साहात

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च रोजी येथील तालुका क्रीडा संकुलावर अस्मिता महिला लीग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित मैदान गाजविले.

ही स्पर्धा केंद्र शासनाच्या मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग हिंगोली, खेलो इंडिया हिंगोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट व गाईड तसेच एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या शर्यतींमध्ये खेळाडूंनी अटीतटीची लढत देत उत्कृष्ट कामगिरी केली.

खुल्या गटातील स्पर्धेत 100 मीटर धावण्यात पल्लवी पांचाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. 200 मीटरमध्ये आरती राठोड तर 400 मीटरमध्ये वैष्णवी वाशिमकर हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.

18 वर्षांखालील गटात 100 मीटर धावण्यात पायल अशोक राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व प्राची काठाले (तृतीय) यांनी क्रमांक मिळवले. 200 मीटरमध्ये पायल राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व आकांक्षा नरवाडे (तृतीय) तर 400 मीटरमध्ये पायल राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व कोमल नवले (तृतीय) यांनी यश मिळवले. या गटात पायल राठोड व शुभांगी राठोड यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली.

13 वर्षांखालील गटात 100 मीटर धावण्यात कल्याणी पवार (प्रथम), अश्विनी राठोड (द्वितीय) व रागिणी पतंगे (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. 200 मीटरमध्ये कल्याणी अनिल पवार (प्रथम), मेघा लोणकर (द्वितीय) व अनुष्का वायगाये (तृतीय) तर 400 मीटरमध्ये कल्याणी पवार (प्रथम), शर्वरी पोले (द्वितीय) व मीरा नरवाडे (तृतीय) यांनी यश मिळवले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  राजेश मारावार, ॲड. अंजली इंगोले, क्रीडा अधिकारी  भूमरे, गणेश बोडके, खेलो इंडिया केंद्राचे शेख नफिज बाजंलावार आदी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान डॉ. अयोध्या तांबिळे व करण श्रीखंडे यांनी वैद्यकीय सेवा दिली.

हा कार्यक्रम मेरा युवा भारत हिंगोलीचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, अनिल ढंगे व प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पवन वासनिक, अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव गंगावणे व गजानन आडे यांच्या टीमने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

****** 






महिला दिनानिमित्त पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची बालगृहास भेट

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, सावरकर नगर, हिंगोली येथे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी भेट देऊन बालिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या हस्ते बालिकांना पुस्तके, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी बालिकांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्वास आणि स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमलत्ता जगताप, श्री. शेख तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला बालगृहाचे अधीक्षक शंकर घ्यार, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे व संगीता दुबे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बालगृहातील एका बालिकेने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे यांनी केले.

*****

उन्हाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीच्या वेळेत बदल

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी  येणाऱ्या वाहनचालक व वाहनमालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वाहन तपासणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मौजे जामवाडी, औंढाहिंगोली  रोड, देवळा पाटी जवळील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे  दि. 12 मार्च 2026 पासून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. दुपारी  1 नंतर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची  प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार नाही. मात्र त्या वेळेनंतर संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच वाहनप्रणालीवरील इतर कामकाज करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व  वाहनधारक व अर्जदार नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच ज्यांना अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे त्यांनी नियोजित दिवशी सकाळी  7.30 ते दुपारी 1 या वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

******