10 April, 2026

जमीन पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा केळी तांडा येथून प्रारंभ

 हिंगोली, दि. 10(जिमाका): राज्यातील जमिनीचे नकाशे आणि सातबारा यामधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. या अंतर्गत जमिनीची पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावत करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली असून, मौजे केळीतांडा येथे आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय भूमापन दिनाच्या निमित्ताने प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.

 याप्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, औंढा नागनाथचे उपअधीक्षक भूमी अभिलेख नितीन गुरव, कर्मचारी प्रदीप महालनकर, सचिन आहेर, प्रदीप प्रधान, तलाठी नितीन अंभोरे, नवनाथ गोडसे, ग्रामसेवक श्री. एम. सी. घनसावंत तसेच रामटेक सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. या संस्थेचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जमीन पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पामुळे सातबारा व नकाशातील विसंगती दूर होऊन जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक होणार आहेत. पोटहिस्सा मोजणीमुळे सीमावाद कमी होऊन अचूक डिजिटल नकाशे उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतकरी किंवा पोटहिस्साधारकांमधील वाद थांबतील. भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण शक्य होईल. पीक विमा व बँकिंग प्रक्रियेसाठी अद्ययावत डेटाबेस उपलब्ध होईल. खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेसाठी अचूक डिजिटल माहिती प्रणाली विकसित होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

 औंढा नागनाथ तालुक्यातील केळीतांडा येथे पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पांतर्गत शेतजमिनीच्या प्रत्यक्ष मोजणी कामास शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन गट क्रमांक 11 मधील सुरू असलेल्या मोजणीची व नकाशांची पाहणी केली. तसेच सर्व खातेदारांनी या प्रकल्पाचा लाभ घेऊन मोजणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केले.

कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर यांनी प्रास्ताविक करत पोटहिस्सा मोजणीचे महत्त्व स्पष्ट केले. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

******





 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून बालविवाह प्रतिबंधात्मक विषयावर मागर्दशन

 हिंगोली, दि. १० (जिमाका): हिंगोली जिल्ह्यात गत वर्षभरात बालविवाह प्रतिबंधक विविध उपक्रम राबविण्यात आल्यामुळे या उपक्रमांची विशेष दखल घेण्यात आली असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज राज्यातील अधिकाऱ्यांना ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. 

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख, युनिसेफचे (मध्ये प्रदेश) बाल संरक्षण अधिकारी गोविंद बेनिवाल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली जिल्ह्यातील बालविवाहाची सद्यस्थिती, प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, जनजागृती मोहिमा तसेच चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवरील कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती सादर केली. बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविणे आणि गावपातळीवर प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जिल्ह्यात पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच सेवा पुरवठादार व धार्मिक स्थळांसाठी विशेष परिपत्रके काढण्यात आली असून, शाळांमधील प्रत्येक वर्गखोलीत चाइल्ड हेल्पलाइन १०९८ चे स्टिकर लावण्याची मोहिम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेबिनारमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन १०९८ चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शाळा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने बालविवाह प्रतिबंधासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी मोहिम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात बाल संरक्षण प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत बालविवाह प्रतिबंध अधिक बळकट करण्यासाठी या वेळेत ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

बालविवाह हा बालकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन असून त्याचे दीर्घकालीन परिणाम बालकांच्या जीवनावर होतात. एनएफएचएस-५ अहवालानुसार महाराष्ट्रात २१.९ टक्के मुलींचे विवाह १८ वर्षांपूर्वी होतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अडचणी, सुरक्षिततेच्या समस्या तसेच पारंपरिक रूढी या घटकांमुळे बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह सोहळे होत असल्याने संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

 ******

 

 

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम 20 एप्रिलपासून सुरू

 

हिंगोली दि.10, (जिमाका): हिंगोली जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम सोमवार, दि. 20 एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129/177 अन्वये हेल्मेट परिधान न करणाऱ्या चालकांवर कारवाईची तरतूद असून, या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली, शहर वाहतूक शाखा, हिंगोली तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे, याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देश देण्यात आले आहेत.

 

ही संयुक्त मोहीम दि. 20 एप्रिल ते दि. 30 मे 2026पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालक व मालकांनी वाहन चालविताना अनिवार्यपणे हेल्मेट परिधान करावे, अन्यथा मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.

******

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

 


हिंगोली दि.10, (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा  अधिकारी यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर प्रत्येकी एक युवक, युवती व नोंदणीकृत संस्थेला देण्यात येतो. हा पुरस्कार गौरवपत्र, सन्माचिन्ह, रोख रक्कम दहा हजार (प्रति युवक व युवतीसाठी), प्रति संस्थेस गौरवपत्र, सन्माचिन्ह, 50 हजार रुपये रोख रक्कम अशा स्वरुपाचे असेल. सदरचा पुरस्कार हा सन 2025-26  या वर्षासाठी देण्यात येणार आहे.


      अर्जदार युवक-युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षांपर्यंत असावे. जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्षे वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही तसेच तो मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. त्यांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती  राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यापिठातील अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/ कर्मचारी पुरस्कारास पात्र राहणार नाही. अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्याचा दाखला देणे आवश्यक राहील.


    पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थेने वरीलप्रमाणे केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार युवक व युवतीने  पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त  अधिनियम 1860 किंवा  मुंबई ‍ पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार नोंदणीकृत असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे अनिवार्य आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्हात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार- संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्याचा दाखला देणे आवश्यक राहील. जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्जाचा विहित नमुना परिपूर्ण प्रस्‍तावासह दिनांक 20 एप्रिल 2026पर्यंत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा व माहितीसाठी या कार्यालयास संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.

******

09 April, 2026

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा दि. 7 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 5 एप्रिल, 2026 होता.

मात्र, इच्छुक विद्यार्थ्यांच्या  सोयीसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांनी आवेदनपत्र सादर करण्यास 15 एप्रिल, 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

या बदलाची नोंद घेऊन पात्र उमेदवारांनी मुदतीत आपली आवेदनपत्रे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.


*******

दृढनिश्चय व वेळेचे महत्त्व ओळखून यश संपादन करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विद्यार्थ्यांना आवाहन



हिंगोली(जिमाका), दि. 09 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील योगदान अत्यंत मोठे असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन वेळेचे महत्त्व ओळखत दृढनिश्चयाने शिक्षण घेतल्यास यश निश्चित मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, समाज भूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर तसेच विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वेळ ही अमूल्य असून तिचा योग्य उपयोग केल्यास यश मिळविणे शक्य आहे. विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक संधींचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करावे, असे त्यांनी नमूद केले. 

आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविणे हीच खरी आदरांजली आहे. तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. 

यावेळी सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित निबंध, वक्तृत्व व पथनाट्य स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे लाभार्थी प्रदीप संजय जाधव यांना 23 हजार 500 रुपयांचा धनादेश, तर परराज्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी जयदीप ज्ञानबाराव वाठोरे यांना 2 लाख 82 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास विविध आश्रमशाळा, निवासी शाळा, वसतिगृहातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******








08 April, 2026

हळद उत्पादनामुळे हिंगोलीची जागतिक पातळीवर ओळख - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


हिंगोली (जिमाका), दि. 08 : हळद पिकामुळे हिंगोली जिल्हा जागतिक नकाशावर विशेष प्रसिद्ध झाला असून देशाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे १५ टक्के हळदीचे उत्पादन एकट्या हिंगोली जिल्ह्यातून होत आहे. हळद प्रक्रियेमध्ये उद्योजक शेतकरी, फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच बचत गटांतील महिला मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून त्यांना प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

दत्तगुरु स्पाइस फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन मार्केट यार्ड व प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फार्मचे विलास शिंदे होते, तर मार्गदर्शक म्हणून राजश्रीताई पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी गजानन घुगे, शिवाजीराव माने, आमदार राजू भैया नवघरे, भाऊराव पाटील गोरेगावकर, अजय परमार, एम. बी. गाजरे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

हळद पिकाची संपूर्ण मूल्य साखळी विकसित करून मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल. योग्य नियोजन केल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत वाढविणे शक्य असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त केले.

तसेच, हळद मूल्यवर्धन प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवून ब्रँडिंग व मार्केटिंगवर भर देण्याची गरज असून वसमत येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हळद संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजश्रीताई हेमंत पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तगुरु फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे संचालक गंगाधर श्रृंगारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सूर्याजी शिंदे यांनी मानले.


*जिल्हाधिका-यांची अल्पसंख्याक वसतिगृह, दाल मिलला भेट*


या दरम्यान आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी येथील अल्पसंख्यांक वसतिगृहाची तसेच कळमनुरी येथील महिला उद्योजिका संगीता जितेंद्र खिल्लारे यांच्या सरस्वती दालमिलला भेट देवून पाहणी केली. 

*******