18 April, 2026

विशेष लेख - नारीशक्ती वंदन अभियान : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ठरतेय आधारवड

 


राज्य शासन व केंद्र शासनामार्फत महिला, मुली तसेच बालकांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. नारीशक्ती वंदन अभियानाच्या माध्यमातून या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे तसेच समाजात जनजागृती  निर्माण करणे यावर विशेष भर दिला जात आहे. त्यापैकी महिला व बालकांसाठी  महत्त्वपूर्ण  ठरणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही अनेक गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे.

ही योजना विशेषतः अनाथ, निराधार, संकटग्रस्त व वंचित बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी राबविण्यात येत असून एका कुटुंबातील  किमान दोन बालकांना दरमहा प्रत्येकी 2250 रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षे वयोगटातील पात्र बालकांना दिला जातो.

या योजनेंतर्गत अनाथ बालके, एक पालक असलेली बालके, पालकांचा शोध न लागलेली बालके, कुष्ठरोगग्रस्त पालकांची बालके, कुटुंब विभक्तीकरण झालेली बालके, घटस्फोटीत अथवा अविवाहित मातृत्वातील बालके, गंभीर आजारग्रस्त पालकांची बालके, बहुविकलांग बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके, मतिमंद बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची  बालके, एचआयव्हीग्रस्त बालके, दुर्लक्ष किंवा फेटाळणी झालेली बालके, न्यायालयीन अथवा पोलीस प्रकरणातील  अपवादात्मक  परिस्थितीतील बालके, शाळेत न जाणारे बालकामगार, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारग्रस्त पालकांची बालके, कौटुंबिक वादग्रस्त कुटुंबातील बालके तसेच कोविड कालावधीत एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके पात्र ठरतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्जासोबत बालकाचा  जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, बालकाचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बालकासोबत  घरासमोरील फोटो, रेशनकार्ड झेरॉक्स, मृत पालक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र तसेच निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. दोन बालके असल्यास दोन्ही  बालकांचे संयुक्त छायाचित्र दोन प्रतींमध्ये देणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी या योजनेसाठी अर्ज अंगणवाडी सेविका, संबंधित तालुक्यातील संरक्षण अधिकारी, किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  कार्यालय, हिंगोली येथे विहित नमुन्यात सादर करावा. अर्ज करताना सर्व कागदपत्रांच्या दोन प्रती जोडणे बंधनकारक आहे.

हिंगोली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण 3 हजार 772  लाभार्थी नोंदणीकृत असून त्यापैकी मार्च 2025 अखेर 2 हजार 937 बालकांना महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत डीबीटी प्रणालीद्वारे लाभ वितरित करण्यात आला आहे. उर्वरित 835 बालकांचा लाभ प्रलंबित असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

समाजातील वंचित, निराधार व संकटग्रस्त बालकांना शिक्षण, संरक्षण आणि संगोपनाचा आधार देणारी ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून नारीशक्ती वंदन अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.


संकलन :  चंद्रकांत स. कारभारी, 

                             उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


******

17 April, 2026

खत वितरणात लिंकींग करू नये; समान वाटप करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली(जिमाका), दि. १७ : खत कंपन्यांनी कुठल्याही खताची लिंकींग करून शेतक-यांची अडवणूक करू नये. कंपनीकडून अशा प्रकारची लिंकींग होत असल्यास शेतक-यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. तसे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली खत विक्रेते, खत विक्रेता संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा कृषि विकास अधिकारी अतुल वायसे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी खत कंपन्यांनी सर्व दुकानदारांना खताचे समान वाटप करावे, असे निर्देश दिले. ज्या व्यापाऱ्यांना माल मिळाला आहे आणि ज्यांना मिळाला नाही, याची माहितीही प्रशासनाला देण्याच्या सूचना त्यांनी केल्या

शेतकऱ्यांना वर्षभरासाठी लागणारे संपूर्ण खत एकाच वेळी देऊ नये, याची दुकानदारांनी काळजी घ्यावी. खताचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मागणीचा विचार करून खत विक्री करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक खत विक्रेत्याने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खत साठ्याची माहिती व हेल्पलाईन क्रमांक स्पष्टपणे लावावा, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळेल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

***

विशेष लेख - नारी शक्ती वंदन अभियान : बचत गटांच्या बळावर हिंगोली जिल्ह्यात महिलांचा सर्वांगीण विकास

 

 

महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक परिवर्तन यांचा प्रभावी संगम घडवून आणणारे कार्य महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे. नारी शक्ती वंदन अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून त्यांना आर्थिक, सामाजिक आणि कौशल्याधारित विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम माविमकडून सातत्याने केले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या 4 लोकसंचालित साधन केंद्रांच्या माध्यमातून विविध विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, वॉटर डॉट ऑर्ग अंतर्गत पाणी, आरोग्य व स्वच्छता अभियान, तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस, व्हल्नरेबल सपोर्ट प्रोग्राम, स्मार्ट प्रकल्प, जिल्हा वार्षिक योजना, लाडकी बहिण सहकारी पतसंस्था, तसेच जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 500 बचत गटांच्या माध्यमातून तब्बल 15 हजार 850 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. सध्या 1 हजार 25 बचत गटांवर 41 कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज सुरू असून महिलांनी उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मितीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. चालू आर्थिक वर्षात 635 बचत गटांना 32 कोटी 17 लाख रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ 6 हजार 650 महिलांना झाला आहे.

या आर्थिक सहाय्यामुळे महिलांनी प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, बिगरशेती व्यवसाय, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मसाले निर्मिती, लोणचे-पापड उद्योग, गारमेंट्स, हस्तकला, ट्रेडिंग, फुलशेती, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू निर्मिती अशा विविध उद्योगांना सुरुवात केली आहे. अनेक महिला ‘लखपती दीदी बनत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.

महिलांच्या कौशल्यविकासासाठी  क्षमता बांधणी प्रशिक्षण, उत्पादन दर्जा सुधारणा प्रशिक्षण, विपणन व्यवस्थापन, बायर-सेलर मेळावे, प्रदर्शनांद्वारे बाजारपेठ उपलब्धता अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. समान व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी क्लस्टर पद्धतीने महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

विशेष अभिमानाची बाब म्हणजे महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण 99.9 टक्के इतके आहे. यावरून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता, बँक व्यवहारांची जाण आणि जबाबदारीची भावना दृढ झाल्याचे दिसून येते.

महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य जनजागृती, सकस आहारासाठी सेंद्रिय परसबाग लागवड, संयुक्त मालकी हक्क जनजागृती, बेटी बचाव-बेटी पढाव, मुलीच्या जन्माचे स्वागत, जागतिक महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, पर्यावरण दिन, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणावर राबविले जातात.

हवामान बदल, जेंडर समता आणि सामाजिक सहभाग या विषयांवर महिलांसह पुरुषांनाही प्रशिक्षण दिले जाते. जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड देऊन पुरुषांचाही गौरव करण्यात येतो. महिलांना कायदेविषयक ज्ञान मिळावे यासाठी कायदा साथी ही संकल्पनाही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

रानमेवा उपक्रमांतर्गत मोहफुलाचे लाडू तयार करून महिलांनी स्वतःची बाजारपेठ निर्माण केली आहे. तसेच हळद लागवड, हळद प्रक्रिया उद्योग, दूध संकलन केंद्र, लघुउद्योग विक्री केंद्र यांसारखे उपक्रम कृती संगमच्या माध्यमातून उभे करण्यात आले आहेत.

महिलांचा सर्वांगीण विकास, कुटुंबाचा शाश्वत विकास, समाजात सन्मान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावे, या उद्देशाने माविममार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली आहे.


                                                                                                संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

******

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक



हिंगोली(जिमाका), दि. १७ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे. या सुधारित प्रणालीमुळे लाभार्थ्यांना विविध प्रक्रियांचा लाभ ऑनलाईन माध्यमातून घेता येणार असून कार्यालयीन फेऱ्यांची गरज कमी होणार आहे.

योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर "Reject for Incomplete Documents" म्हणजेच अपूर्ण कागदपत्रांमुळे नाकारलेली प्रकरणे आता लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. तसेच अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थी स्वतः ऑनलाईन अपलोड करून करू शकतील. आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण "Scrutiny" स्तरावर दिसेल. त्या ठिकाणी महामंडळामार्फत ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी "Submit" पर्याय उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी "Submit" केल्यानंतर प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल.

तसेच व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करताना कागदपत्रांतील तुटींमुळे "Hold" स्थितीत असलेली प्रकरणेही लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसहित दिसतील. अशा प्रकरणांतील तुटींची पूर्तता संबंधित लाभार्थ्यांनी जिल्हा समन्वयकांमार्फत करावी. प्राथमिक तपासणीनंतर ही प्रकरणे विभागीय समन्वयकांमार्फत मुख्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जातील. लाभार्थ्यांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले प्रकरण नियमित करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्रुटी नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वीच्या व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा होती. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचा क्लेम "Sent for CAFO" या स्तरावर पोहोचताच पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार असून प्रक्रिया गतिमान होणार आहे.

योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, बँक मंजुरी व व्याज परताव्यासाठी पात्र प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा सादर कागदपत्रांमध्ये विसंगती अथवा खाडाखोड आढळल्यास ती प्रकरणे "Block" करण्यात आलेली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटमार्फत झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. अशा प्रकरणांतील लाभार्थ्यांनी आवश्यक दुरुस्त्या करून मूळ कागदपत्रांसह अर्ज संबंधित जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. पडताळणीनंतर योग्य निर्णय घेण्यात येईल.

सर्व लाभार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर जाऊन Hold किंवा Block होण्याची कारणे तपासावीत व त्वरित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. वेब प्रणालीवरील सर्व संपर्क यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महामंडळ नियमानुसार योजना राबवत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

*******

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 


            हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही  दिन राबविण्यात येतो.

माहे एप्रिल, 2026 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 20 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.  

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

******

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जास 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


हिंगोली(जिमाका), दि. १७ : शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६ चे आयोजन रविवार दि. २१ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. २७ मार्च २०२६ ते दि. १६ एप्रिल २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, परीक्षार्थी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ साठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आता दि. १७ एप्रिल २०२६ ते दि. २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*******

आपले सरकार सेवा केंद्राची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर * उमेदवारांना हरकती सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. १७ : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी हरकती अथवा आक्षेप असल्यास दि. २० ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रिक्त ४२३ केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण ४३० केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली.

दि. २ जानेवारी २०२६ अखेर प्राप्त झालेल्या एकूण ३१०१ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १८६१ उमेदवारांच्या मुलाखती दि. ३ फेब्रुवारी २०२६ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.

यानंतर दि. ९ मार्च २०२६ रोजी अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या आधारे पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. तसेच तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांविरोधात हरकतीही प्राप्त झाल्या.

एकूण १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील कागदपत्रे सादर केली. त्यानुसार त्यांना गुणदान करण्यात आले. तसेच प्राप्त ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्ता व नियमांच्या आधारे निर्णय देण्यात आला. जाहिरातीत नमूद अटी व शर्तींनुसार अपात्र उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात आले.

या सर्व प्रक्रियेनंतर अंतरिम गुणवत्ता यादीत काही प्रमाणात बदल करण्यात आले असून काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात सुधारणा झाली आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम गुणवत्ता यादीबाबत कोणत्याही उमेदवारास हरकत अथवा आक्षेप असल्यास त्यांनी दि. २० एप्रिल २०२६ ते दि. २२ एप्रिल २०२६ या कालावधीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आयटी सेल यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच दि. २२ एप्रिल २०२६ पर्यंत कोणतीही हरकत प्राप्त न झालेल्या केंद्रांबाबत पुढील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

***