01 July, 2026

हिंगोलीच्या प्रगतिशील शेतकरी अनिल जाधव यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : हिंगोली तालुक्यातील मौजे माळहिवरा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गंगाराम जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन 2023-24 या वर्षासाठीचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार-2024’ (सर्वसाधारण गट) आज प्रदान करण्यात आला.

आज मुंबई येथील डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अनिल जाधव यांनी आधुनिक, शाश्वत व नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या यशाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब, मंडळ कृषी अधिकारी गणेश पवार तसेच कृषी विभाग, हिंगोलीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिल जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

********

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा - जिल्हा उपनिबंधक

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमानुसार विहित वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एक रक्कमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहिती श्रीमती फुफाटे यांनी दिली.

माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

******

पालखी सोहळ्यासाठी सर्वांनी समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात – जिल्हाधिकारी


 


हिंगोली (जिमाका), दि. 1 : हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या श्री गजानन महाराज, श्री संत नामदेव महाराज व श्री रुक्मिणी संस्थान, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर यांच्या पालख्यांसह विविध दिंड्यांच्या वारकऱ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिले. 

हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाते. 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार विविध विभागांचे नोडल अधिकारी व समन्वय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पालखी मुक्कामस्थळी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व स्वच्छता पथक, पुरेसा पोलीस बंदोबस्त, फिरते वैद्यकीय पथक, व्हेंटिलेटरसह अॅम्ब्युलन्स, प्रथमोपचार सुविधा, फूट मसाजची व्यवस्था, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी, अखंडित वीजपुरवठा व प्रकाशव्यवस्था, महाप्रसाद व अन्नदान स्थळी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, पालखी मार्गावरील आवश्यक रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण तसेच अग्निशमन व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

या कामांसाठी संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वारकऱ्यांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्देशित केले आहे.  

******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना शेतकरी कल्याणाला बळ

 



हिंगोली (जिमाका), दि. 01 : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा असून, त्यासाठी सुमारे 36 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या शेतकरी हितैषी व लोकाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या माध्यमातून करण्यात आला आहे.

दोन लाखांपर्यंत थेट कर्जमुक्ती : योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जाचाही यामध्ये समावेश करण्यात आला असून, या योजनेसाठी जमीनधारणेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्जदारांनाही लाभ : यावेळी शासनाने महत्त्वाचा बदल करत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक तरतूद केली आहे. अशा शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील अतिरिक्त रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत संबंधित बँकेत भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्वी अल्प फरकामुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन : कर्जफेडीची शिस्त कायम ठेवण्यासाठी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. तसेच 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षांतील अल्पमुदतीच्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील. ज्या शेतकऱ्यांनी 2023-24 किंवा 2024-25 या वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे पीक कर्ज पूर्णपणे फेडले आहे, त्यांना प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 मधील लाभार्थ्यांसाठीही या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जाचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत हप्ते 50 हजार रुपयांपर्यंत असल्यास संपूर्ण कर्जमुक्ती, तर त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेचा लाभ मिळणार आहे. अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोणाला मिळणार लाभ ? : राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य राहणार आहे.

कोण अपात्र ? : विद्यमान व माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान व माजी सदस्य, केंद्र व राज्य शासनातील 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन घेणारे अधिकारी-कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी-कर्मचारी, शेतीव्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिक वगळून) तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी या योजनेसाठी अपात्र असतील.

पारदर्शक ऑनलाइन प्रक्रिया : या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

*******

जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र वाढीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली जिल्ह्यास 7.98 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 'एक पेड माँ के नाम' अभियानालाही गती देण्याचे निर्देश


हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात वनाच्छादित व वृक्षाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार तसेच विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

राज्य शासनाने 300 कोटी वृक्षारोपण मोहिम तसेच इतर हरित उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी 'हरित महाराष्ट्र आयोग' स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सन 2026 ते 2047 या कालावधीत राज्यातील हरित आच्छादन वाढविण्याचा शासनाचा निर्धार असून, त्याअनुषंगाने आवश्यक नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ तसेच विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

ही मोहीम परिणामाधारित अंमलबजावणी आराखड्यानुसार राबविण्यात येणार असून, लागवड केलेल्या वृक्षांच्या दहा वर्षांच्या जतन व संवर्धनाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्व व वाढ सुनिश्चित होण्यास मदत होणार असून, राज्यातील हरित आच्छादनाची गुणवत्ता, शाश्वतता आणि पर्यावरणीय मूल्य वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

हिंगोली जिल्ह्यास 7 लाख 98 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सर्व विभागांनी आपापल्या वाट्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून वृक्षलागवडीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यातील 5 हजार 815 हेक्टर पोटखराब जमिनीवर वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात यावे.

सध्या विविध यंत्रणांकडे सुमारे 11 लाख रोपे उपलब्ध असून, त्यापैकी जास्तीत जास्त रोपे प्राधान्याने ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावीत. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागास आवश्यकतेनुसार रोपांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक झाड लावून त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर सोपविण्याचे नियोजन करावे. तसेच 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गतही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून जनसहभाग वाढविण्यात यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.


*******

मतदार पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा; जबाबदारीत कसूर केल्यास होणार कार्यवाही – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 




हिंगोली (जिमाका), दि. 1 : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2026 पासून जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्जांचे वितरण करीत आहेत. या मतदार पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी दिले. 

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज (दि. 1) जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चोंडेकर, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, श्रीमती प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 30 जून 2026 पासून जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून आवश्यक अर्जांचे वितरण करीत आहेत. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व बीएलओंना या मोहिमेसंदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदार पडताळणीचे काम अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात दि. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन अर्जांचे वितरण, 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारणे, 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबरदरम्यान हरकतींवरील सुनावणी घेणे आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. या महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिला.

******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 26 मिमी पाऊस

 

• जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी

 


  हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 41.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 4.3 मि.मी. पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 32.4 (205.8), कळमनुरी 29 (145.9), वसमत 28 (118.3), औंढा नागनाथ 41.7 (136) आणि सेनगाव तालुक्यात 4.3 (104.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 01 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 143.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 18.1 अशी आहे. हिंगोली तालुक्यातील नरसी (77.8 मिमी) व वसमत तालुक्यातील आंबा (65 मिमी)या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  

*****