02 May, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची औंढा नागनाथ येथे विकास कामांची पाहणी; हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा व आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचे उद्घाटन

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हिंगोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. कामाची प्रगती, दर्जा आणि नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याच दिवशी हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवनशैली व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

*******


01 May, 2026

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा; तुटवडा होऊ देऊ नका – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

खरिप हंगाम 2026, पाणीपुरवठा, कृषी नियोजन व शासन योजनांचा पालकमंत्र्यांकडून सर्वंकष आढावा

 


हिंगोली, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये. खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा, वितरण व उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. तसेच जिल्ह्यात पाणीटंचाई, चारा टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या उन्हाचा पारा जास्त असून उन्हापासून संरक्षण करावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगाम 2026 पूर्वतयारी, पाणीटंचाई निवारण, कृषी निविष्ठा उपलब्धता तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरिप हंगाम 2025 तालुकानिहाय नुकसानभरपाई वाटप, रब्बी हंगामाचा आढावा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण, बियाण्यांची गरज, महाबीजमार्फत उपलब्धता, कापूस बियाण्यांच्या विशिष्ट वाणांची मागणी व पुरवठा, तसेच रासायनिक खतांचा साठा, मागणी व विक्री याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. मंजूर आवंटनापैकी सुमारे 77 टक्के खतसाठा उपलब्ध झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यास डीएपी खताची दररोज सुमारे 52 मेट्रिक टन गरज असून सद्यस्थितीत सुमारे 3 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. तसेच युरियाचा शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लागणारा साठा मुबलक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा दाखविणे बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने विक्रेत्यांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

खरिप 2026 करिता निश्चित करण्यात आलेल्या कृषी मोहिमांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्येक कृषि सहाय्यकाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात 20 जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव परिसरात खड्डे निर्माण केले जाणार आहेत. महाविस्तार मोबाईल अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवार फेऱ्यांचे नियोजन, पोकरा योजनेअंतर्गत कामांची गती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फलोत्पादन वाढ, तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत क्षेत्रवाढीचे नियोजन यावरही सविस्तर चर्चा झाली. प्रधानमंत्री नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत यासंदर्भातील कामांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कृषि विभागाच्या दोन घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. जून, जुलै व ऑगस्टपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी विहीर अधिग्रहण, जलजीवन मिशनअंतर्गत कामे, तसेच टँकर नियोजनाची प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जात असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, लेखन फाउंडेशन, व्हिजन समिती व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 70 शाळांनी सहभाग घेऊन पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. यामध्ये विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये शिक्षण, कृषी व मूलभूत सुविधा या तिन्ही क्षेत्रांचा समन्वित विकास करण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आरोग्य संपन्न गावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज-पालकमंत्री

 

जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि आपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृद्ध बनविण्यासाठी हातभार लावा. आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न केल्यास आपल्या जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात एक आदर्श स्थान मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी याप्रसंगी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेले "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" हे अभियान म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तन घडविणारे पाऊल आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या तरच आपण खऱ्या अर्थाने निरोगी समाज घडवू शकतो. "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" ही केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे, जी प्रत्येक ग्रामस्थाच्या सहभागातून यशस्वी होणार आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना "आरोग्यसंपन्न गाव" म्हणून गौरविण्यात येणार आहे. यावेळी 'मी निश्चय मित्र' लोगोचे यावेळी विमोचन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती दिली.

यावेळी  जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांच्या विशेष प्रयत्नाने  हिंगोलीचे 'यलो गोल्ड' म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या हळदीचे बॉक्स पालकमंत्री नरहरी झिरवाळ व मान्यवरांना भेट देण्यात आले.

****** 










कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन

  

हिंगोली, दि. 1 (जिमाका) : हिंगोली शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीच्या स्वच्छता, संवर्धन व सुशोभीकरणासाठी जिल्हा प्रशासन व नगरपरिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. नदी परिसरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत मोहिमेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कयाधू नदी पात्राची पाहणी करून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. यानंतर नदीपात्रातील गाळ, प्लास्टिक कचरा, निर्माल्य, झुडपे व अन्य घनकचरा हटविण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत यंत्रसामग्रीबरोबरच मानवी श्रमदानालाही प्राधान्य देण्यात आले असून विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात येत आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, कयाधू नदी ही केवळ हिंगोली शहराची नैसर्गिक जलवाहिनी नसून शहराच्या पर्यावरणीय समतोलाची प्रमुख आधाररेषा आहे. वाढते शहरीकरण, अनियंत्रित कचरा टाकणे आणि नदीपात्रातील अतिक्रमण यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. नदी स्वच्छ आणि प्रवाही ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. कयाधू नदी स्वच्छता मोहीम ही केवळ एकदिवसीय उपक्रम नसून नदी संवर्धनाचे लोकआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

******* 





पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

  

हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते .

******* 






आजपासून ऑनलाईन स्वगणनेला सुरुवात; नागरिकांनी सहभागी होऊन विकास प्रक्रियेला बळ द्यावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

हिंगोली जिल्ह्यात कृषी, महसूल, आरोग्य, रोजगार व सेवा हक्क क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती

* हिंगोली येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण




हिंगोली, दि. 1 (जिमाका) : भारताच्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ होत असून ऑनलाईन स्वगणनेची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक घर, कुटुंब व मूलभूत सुविधा अशी एकूण 34 प्रकारची अचूक नोंद या प्रक्रियेतून होणार असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभागी होत विकास प्रक्रियेला बळ द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आज हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते.

            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

देशामध्ये 1872 पासून जनगणना केली जात आहे. आता ही 16वी जणगणना सुरु असून, स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ती दोन टप्प्यांत होणार असून, या जणगणनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात घरांची व मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. प्रथमच ऑनलाईन स्वगणना सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना स्वतः माहिती नोंदविण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात भेट देणारे प्रगणक व पर्यवेक्षक हे शासकीय ओळखपत्रासह येणार असल्याने नागरिकांनी त्यांना योग्य ते सहकार्य करावे, तर तोतया व्यक्तींपासून सावध राहण्याचेही आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामापूर्वी कृषी विभागामार्फत खतसाठ्याचे नियोजन केले असून शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे यासाठी कंपन्या व विक्रेत्यांशी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. साठेबाजी, जादा दर आकारणी, खत-बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारींसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 761 शेतकऱ्यांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून कृषी यांत्रिकीकरण व फळबाग लागवड योजनांमधूनही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत 26 महसूल मंडळांमध्ये शिबिरे घेऊन जवळपास 10 हजार प्रमाणपत्रे व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. ‘राजस्व अभियान’ अंतर्गत पोट हिस्सा मोजणीचे काम सुरू असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत.


जिल्ह्यात एलपीजी गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून आवश्यक मागणी पूर्ण केली जात आहे. केंद्र शासनाच्या साधना सप्ताहात हिंगोली जिल्हा परिषदेतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत द्वितीय क्रमांक मिळविल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर 311 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. बालविवाह निर्मूलन मोहिमेत वर्षभरात 52 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाद्वारे ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांनी “निरोगी गाव-सशक्त गाव-समृद्ध गाव” या ध्येयाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.


उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वित प्रयत्नांतून हिंगोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. 


यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार सचिन जोशी, महसूल सहायक रामेश्वर नांदणकर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एनआरसी, डिजिटल आयुष्यमान भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. नितीन तडस, डॉ. गोपाळ कदम, मुख कर्करोग उपचार व निदानमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. फैसल खान यांचा, बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या समासेविकांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आले. 

आदर्श तलाठी पुरस्कार, एसपीसीचे विद्यार्थी यांचा सन्मान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकारी, जिल्हा व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत खून प्रकरणातील पीडित व्यक्तींच्या वारसास नियुक्तीपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘ॲनिमिया मुक्त हिंगोली’ उपक्रमाच्या चित्ररथाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****







महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

 





 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते  आज ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

******

30 April, 2026

मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम


‘युआयडीएआय’चे निर्देश



हिंगोली (जिमाका), दि. 30: आधार कार्डमधील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत.

महाराष्ट्र दिनी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबद्दल रहिवाशांना माहिती देण्यासाठी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून जिल्हाधिकारी कार्यालयांना 'डिस्प्ले स्टँडी' वितरित करण्यात येत आहेत. विशेषतः 1 मे रोजीच्या ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यात विशेष 'एमबीयू' शिबिरे आयोजित केली जाणार असून, या ठिकाणी स्टँडीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल.

शाळा आणि शासकीय कार्यालयांत ही केवळ 1 मे पुरती निरंतर जनजागृती मर्यादित न राहता, ही मोहीम निरंतर राबवण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर या माहितीपर स्टँडीजचा वापर स्थानिक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी केला जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

मुलांचे आधार बायोमेट्रिक वेळेत अपडेट न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. ही अडचण टाळण्यासाठी जिल्ह्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****