02 March, 2026

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव, गिरगाव, सोमठाणा, कुरुंदा, कांडली, बोथी, वडगाव तर्फे जवळा, सुकळीवीर, बाभुळगाव, हयातनगर आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

***** 




होळी व रंगपंचमी प्राणीमित्र पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : होळी हा आनंद, मैत्री आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण असून यंदा ४ मार्च २०२६ रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी होळी व रंगपंचमी प्राणीमित्र पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, हिंगोली यांनी केले आहे.

सणांच्या काळात भटके कुत्रे, मांजर, गुरे, पक्षी तसेच पाळीव प्राणी यांना मोठा आवाज, रंग, पाण्याचे फुगे आणि गर्दीमुळे ताण व भीती निर्माण होऊ शकते. रासायनिक रंगांमुळे त्यांच्या त्वचेवर व डोळ्यांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

प्राण्यांना त्रास देणे हे ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट, १९६०’ अंतर्गत दंडनीय गुन्हा असून सण दयाळूपणे साजरा करणे हे कायदेशीर तसेच नैतिक कर्तव्य आहे.

प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती व जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना पुढील बाबींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

प्राण्यांवर सुका किंवा ओला रंग लावू नये. पाण्याचे फुगे फेकणे किंवा रंगीत पाणी उडवणे टाळावे. पाळीव प्राणी सुरक्षित व शांत ठिकाणी ठेवावेत. सणानंतर परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिक, रंगांचे अवशेष यांची योग्य विल्हेवाट लावावी. लहान मुले व नागरिकांमध्ये प्राणीमित्र होळीबाबत जनजागृती करावी. प्राण्याला दुखापत झाल्यास तत्काळ स्वच्छ पाण्याने धुऊन पशुवैद्यकीय मदत घ्यावी.

केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक सण साजरा करावा. उत्साहाबरोबरच सहानुभूती आणि दयाळूपणाला प्राधान्य देत कोणत्याही सजीव प्राण्याला इजा होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

“सुरक्षित खेळा, दयाळूपणे खेळा आणि क्रूरतेशिवाय होळी साजरी करा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, हिंगोली यांनी केले आहे.

******

पोलीस पाटील भरती 2026 ची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागांतील पोलीस पाटील भरती 2026 प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची यादी आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

पोलीस पाटील भरतीसाठीची लेखी परीक्षा दि. 08 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध उपविभागांमध्ये पार पडल्या.

मुलाखतीनंतर तात्पुरत्या निवडीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आज सोमवार, दि. 02 रोजी www.Hingolipp.recruitonline.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निःपक्षपाती व गुणवत्तेच्या आधारे राबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

*****

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा (चना) खरेदी सुरु

 


जिल्ह्यात 11 खरेदी केंद्र निश्चित

1 मार्चपासून खरेदी सुरु


हिंगोली (जिमाका), दि. 02 : हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीनुसार हरभरा (चना) खरेदी योजना जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व एनसीसीएफ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी दि. 01 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात खरेदी दि. 1 मार्च, 2026 ते पुढील 60 दिवस राहणार असून, केंद्र शासनाने हरभरा (चना) साठी प्रती क्विंटल 5 हजार 875 रुपये असा आधारभूत दर निश्चित केला आहे.

जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी एकूण 11 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. येथे केंद्र चालक शेख गफार शेख अली हे (9881501040) आहेत. औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर  केंद्र चालक कबीर बशीर कुरेशी हे (9767680780) आहेत. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक अमोल काकडे हे (8007386143) आहेत. विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सोपान बोकारे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9834851485 असा आहे. शेतकरी फळे व भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रिया सहकारी संस्था शिरड शहापूर ता. औंढा नागनाथ या संस्थेचे खरेदी केंद्र भेंडेगाव येथे आहे. केंद्र चालक सुभाष सोनटक्के हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8788232830 असा आहे. स्वाभिमानी स्वयंरोजगार सेवा सहकारी रिधोरा या संस्थेचे खरेदी केंद्र नर्सी नामदेव येथे आहे. केंद्र भागवत रोडगे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7499985448 असा आहे. 

श्री बेलेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.गोरेगाव या संस्थेचे खरेदी केंद्र पुसेगाव येथे आहे. केंद्र चालक माधव गाडे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9423737672 असा आहे. वाबळे ॲन्ड ऑदर फार्मर प्रोड्यूसर कंपनी भांडेगाव ता.जि.हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र उमरा येथे आहे. केंद्र चालक जगन वाबळे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9923847634 असा आहे. अभिमन्यू सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था म. करंजाळा ता.जि.हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र डिग्रसफाटा येथे आहे. केंद्र चालक रामराव कऱ्हाळे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9158648234 असा आहे.

शेतकरी बांधवांनी हरभरा विक्रीसाठी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा व पिकपेरा यांसारखी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना देण्यात येईल. त्यानंतरच शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

***

समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-2025 व 2025-2026 या कालावधीसाठी विविध पुरस्कार योजनांसाठी राज्यातील पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार तसेच शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कार या योजनांचा समावेश आहे.

या पुरस्कारांद्वारे अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, तसेच विविध सामाजिक घटकांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतीत दिनांक 15 मार्च 2026 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली केले आहे.

वरील सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती/संस्थांनी समाजकल्याण क्षेत्रात दीर्घकालीन व मौलिक कार्य केलेले असणे आवश्यक आहे. व्यक्तींसाठी  साधारणतः किमान 10 ते 15 वर्षांचा अनुभव आवश्यक असून पुरुषांसाठी किमान वय 50 वर्षे व महिलांसाठी 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्था या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत असाव्यात व किमान 5 ते 10 वर्षे कार्यरत असणे अपेक्षित आहे. संस्थांकडे मागील पाच वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, गैरव्यवहार नसल्याचे प्रमाणपत्र तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार न केल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

तसेच अर्जदारांविरुद्ध कोणतीही फौजदारी किंवा दंडात्मक कार्यवाही नसावी व संस्था राजकारणापासून स्वतंत्र असावी, अशी अटही घालण्यात आली आहे. पुरस्कारासाठी पात्रता ही व्यक्ती किंवा संस्थेच्या मौलिक सामाजिक कार्याच्या आधारे निश्चित करण्यात येणार असून कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कार देण्यात येणार नाही.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

*******

पोक्सो कायद्यान्वये सपोर्ट पर्सन नियुक्तीसाठी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, 2012 (पोक्सो कायदा) व पोक्सो  नियम 2020 अन्वये बाल पीडितांना न्यायप्रक्रिये दरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी सपोर्ट पर्सन  म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी समाजकार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील पदव्युत्तर/पदवीधर, एमएस-सीआयटी  उत्तीर्ण किंवा पदवीधर व किमान 3 वर्षांचा बाल शिक्षण, बाल विकास किंवा बाल संरक्षण क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार पात्र राहतील. तसेच  पोक्सो नियम 2020 मधील नियम 5 (6) नुसार बाल हक्क किंवा बाल संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था तसेच बालगृह/निवारा गृहातील जबाबदार अधिकारी देखील अर्ज करू शकतात.

सपोर्ट पर्सन यांना बालक व त्यांच्या कुटुंबास न्यायप्रक्रियेदरम्यान मानसिक, भावनिक व सामाजिक सहाय्य करणे, बालकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे, आवश्यकतेनुसार पुनर्वसन व स्थलांतराची कार्यवाही करणे, शिक्षण, आरोग्य, समुपदेशन, कायदेशीर मदत व भरपाई मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे, पोलीस, सीडब्ल्यूसी, डीसीपीयू, न्यायालय व इतर यंत्रणांशी समन्वय साधणे, नियमित गृहभेटी व मासिक अहवाल सादर करणे, पोक्सो ट्रॅकिंग पोर्टलवर माहिती अद्ययावत करणे तसेच गोपनीयता राखून निष्पक्षपणे कार्य करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपले अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस. 7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे सादर करावेत.

अर्जांची छाननी झाल्यानंतर पोक्सो सपोर्ट पर्सन नियुक्ती समितीमार्फत पात्र उमेदवारांना मुलाखतीची  तारीख कळविण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

******

01 March, 2026

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश


गुरु तेग बहादूरांच्या शौर्याची परंपरा नवी पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी



खारघर, दि. १ – महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितद्वारे दाखविण्यात आला.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले की, गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिब, नांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादूर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

देशभरात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याचे सांगत हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी सांगितला. केंद्र शासन गुरूं संबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्व, स्मृतिचिन्ह टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचे प्रकाशन, तसेच गुरु नानक देव यांचा ५५०वा प्रकाश पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सांगितले की, करतारपूर साहिब कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी सुविधा उभारण्यात आल्या. शीख संघटना आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत सवलती देण्यात आल्या. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम केले. गुरु ग्रंथ साहिबांचे स्वरूप सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे ही आमची जबाबदारी असून ही सेवा करण्याचे आम्हाला सौभाग्य लाभले आहे, असे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या मूल्यांशी जोडली गेली पाहिजे, असे आवाहन केले. इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००