13 February, 2026

 ‘मिनी सरस प्रदर्शन 2026’ चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

• सर्वांसाठी प्रदर्शन प्रवेश विनामूल्य – प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे

• ग्रामविकास व पंचायतराज विभाग

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली


हिंगोली, दि. १३ (जिमाका) : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या वतीने आयोजित ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री – 2026’ चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदान, हिंगोली येथे सुरू असलेले हे प्रदर्शन येत्या गुरुवार (दि. १९) पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम, आरसेटीचे संचालक बनसोडे तसेच जिल्हा  ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या उत्पादित मालाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

या मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीमध्ये स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर वस्तू तसेच इतर आकर्षक उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शनिवार व रविवार या दोन दिवसांत सहकुटुंब प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ व इतर उत्पादने खरेदी करून महिलांच्या उपजीविकेस हातभार लावावा, असे आवाहन प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी केले आहे.

सदर प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

***** 





महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 


 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही  दिन राबविण्यात येतो.

माहे फेब्रुवारी, 2026 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 16 फेब्रुवारी) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. 

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****** 

राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांची हिंगोलीतील शासकीय वसतिगृहांना अचानक भेट

 


हिंगोली(जिमाका), दि. 13 : राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी त्यांच्या पथकासह हिंगोली येथे नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह यांना अचानक भेट दिली.


या भेटीदरम्यान विद्यार्थिनींना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर विचारणा करण्यात आली. विद्यार्थिनींनी सकारात्मक दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून गोरक्ष लोखंडे यांनी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे तसेच गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे यांचे कौतुक केले.


यावेळी सदस्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, शिस्त आणि उपलब्ध शासकीय योजनांचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले.


****** 




पांगरा शिंदे येथे दुग्ध उत्पादकांसाठी बँक कर्ज वाटप मेळावा * कर्जातून गावात ‘दूध क्रांती’अपेक्षित – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता






हिंगोली (जिमाका), दि. 13 : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे दुग्ध उत्पादन वाढीसाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप मेळावा उत्साहात पार पडला. मिळालेल्या कर्जातून गावात दूध क्रांती घडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला.

पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, दिनेश कुमार झा, दीपक बारहाते, किरण चांदेरकर, वसमत गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील झोडगे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण राठोड, नाबार्डचे अविनाश लहाने, सरपंच पूनम शिंदे, दत्तगुरु फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सूर्याजी शिंदे तसेच शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त गंगाधर शृंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात हिंगोली जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना 75 दुधाळ म्हशींसाठी सुमारे 1 कोटी 50 लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच विविध उद्योगांसाठी सुमारे 4 कोटी रुपयांचे कर्ज वाटपही करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला मोठी संधी आहे. बँकांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या कर्जामुळे पांगरा शिंदे गावात दुग्ध उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन आर्थिक उन्नती साधता येईल. शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसायाकडे अधिकाधिक वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बँक ऑफ इंडिया वसमत शाखेचे शालिकराम जाधव, चोंडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. दैठणकर, भारतीय स्टेट बँक व युनियन बँकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

रमेश चेंडके यांच्या दर्पण दूध उत्पादक प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पांगरा शिंदे व परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश चेंडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वानखेडे, साईनाथ शिंदे, सोपान मारकळ, सोनबा शिंदे आदींनी परिश्रम घेतले. 


******

औंढा नागनाथ येथील महाराशिवरात्री यात्रा तयारीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा

 

ड्रोन शोसह सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश


हिंगोली (जिमाका), दि. 13 : महाराशिवरात्री सणानिमित्त औंढा नागनाथ येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने तसेच यात्रेदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ड्रोन शोच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, पोलीस विभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच औंढा नागनाथ मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यात्रेच्या कालावधीत पार्किंग ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमची व्यवस्था, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, पुरेशी पार्किंग व्यवस्था, दर्शन बारी व मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, अग्निशामक यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था, आरोग्य पथकाची नियुक्ती, आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेसा औषधी साठा तसेच जागोजागी स्क्रीनिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित ड्रोन शोच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


भगवान बाहुबली मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी  घेतला आढावा


दरम्यान, या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे दि. 18 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या श्री 1008 भगवान बाहुबली मूर्तीच्या आंतरराष्ट्रीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असून बाहेरगावाहूनही नागरिक येणार असल्याचे नमूद केले. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावर बैठक घेऊन सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना दिल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, गट विकास अधिकारी, पोलीस विभाग, आरोग्य, महावितरण, परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


*****

12 February, 2026

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी 536 कोटी 88 लाख रुपयाची अतिरिक्त मागणी

 



 

हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल

                                                                                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रस्ते, पूल, शिक्षण, कृषी, जलसंधारण आदी पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येणार असून, जिल्ह्यात होणाऱ्या दर्जात्मक विकासकामावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीमती शैला ए. , जिल्ह्याच्या पालकसचिव श्रीमती रिचा बागला, नियोजन विभागाचे उपायुक्त विजय पवार उपस्थित होते.

 जिल्हा वार्षिक योजना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतर्गंत प्रत्यक्ष 201 कोटी 66 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 536 कोटी 55 लाख 88 हजार रुपयांची अतिरिक्त मागणीबाबत सविस्तर सादरीकरण केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, प्रदीप नळगीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील रस्ते, शाळा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय इमारती, श्री. संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसेच जिल्ह्याचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्याचे सिंचन वाढविणे, पाणंद रस्त्याची कामे तसेच निजामकालीन मोडकळीस आलेल्या शाळेचे बांधकाम आदी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.

कृषी व संलग्न सेवामध्ये मत्स्य उत्पादनात वाढ, पशु विकास, स्मशान भूमी शेड बांधकाम, आठवडी बाजार विकसित करणे, भूमीगत गटार, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, कयाधू नदीवर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण कोल्हापुरी बंधारे प्रस्तावित करणे, पाझर तलाव व सिंचन तलाव दुरुस्ती, नवीन अंगणवाडी बांधकाम व सोलार संच पुरवणे, महिला बचत गटाकरिता विक्री केंद्र उभारणे, रस्ते व पूलाचे बांधकाम, पोलीस दलाकरिता वाहने व अत्याधुनिक सामुग्री खरेदी, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ देवस्थानचा विकास तसेच टुरिझम सर्कीट उभारणे तसेच संत नामदेव मंदिर व श्री नानाजी देशमुख यांच्या गावात म्युझियम उभारणे यासह जिल्ह्यातील विविध यात्रास्थळांच्या ठिकाणी भौतिक सोयीसुविधा निर्माण करणे आदी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

******* 



महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी – अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 

हिंगोली(जिमाका), दि. 12 : दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाच्या दिवशी भगरीचे विविध पदार्थ सेवन करण्याची प्रथा आहे. तथापि, भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात वारंवार घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

भगर हा भरड धान्याचा एक प्रकार असून वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्यांपासून ती तयार केली जाते. धान्याच्या प्रकारानुसार वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर असे प्रकार पडतात. वरई भगर उच्च प्रतीची तर कोद्रा भगर तुलनेने हलक्या प्रतीची समजली जाते. भगरीत कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर्स तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आढळतात. तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेही रुग्णांसाठीही ती उपयुक्त मानली जाते.

अन्न व औषध प्रशासनाच्या अभ्यासानुसार, भगरीवर Aspergillus tamarii प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामधून Fumigaclavin A, Cyclopiazonic Acid तसेच Aflatoxin, Ergotoxins यांसारखी मायकोटॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता असते. 25 ते 32 अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता बुरशी वाढीस अनुकूल ठरते. अशा प्रकारे बाधित भगर सेवन केल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.


भगर खाताना घ्यावयाची काळजी :

शक्यतो पॅकबंद व नामांकित ब्रँडची भगर खरेदी करावी. पाकीटावरील पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावा. सूटी अथवा लेबल नसलेली भगर खरेदी करू नये. भगर स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावी. जास्त दिवस साठवलेली भगर वापरू नये.

भगरीचे पीठ तयार स्वरूपात खरेदी करण्याऐवजी आवश्यक तेवढीच भगर दळून घ्यावी. पिठात ओलावा शोषण्याची क्षमता जास्त असल्याने बुरशी वाढण्याची शक्यता असते.

शक्यतो घरीच (मिक्सर/ग्राइंडर) दळून ताजे पीठ वापरावे. जाड कोद्रा भगर टाळावी. सलग उपवासाच्या काळात भगर व शेंगदाणे यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्यावेत, अन्यथा अॅसिडिटी, उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.


विक्रेत्यांसाठी सूचना :


पॅकबंद भगरीचीच विक्री करावी व घाऊक खरेदीची पावती जतन करावी. पॅकेट/पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक नमूद असल्याची खात्री करावी. मुदतबाह्य भगर अथवा भगर पिठाची विक्री करू नये. सूटी किंवा खुले भगर व भगर पीठ विक्रीसाठी ठेवू नये. महाशिवरात्री निमित्त उपवास करताना भगरीचे सेवन सुरक्षित पद्धतीने करावे व वरील सूचना पाळून संभाव्य अन्न विषबाधा टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, परभणी/हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

******