22 April, 2026

मतदार यादी मॅपींगसाठी जिल्हाधिकाऱ्यांची थेट मतदारांशी भेट

 

हिंगोली, दि. २२ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये लवकरच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात मतदार मॅपींगच्या कामाला वेग देण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज ९४-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत मॅपींगच्या कामकाजाची पडताळणी केली.

जिल्ह्यात मतदार मॅपींगची प्रक्रिया दिनांक २० जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ९२-वसमत मतदारसंघात ८७.१७ टक्के, ९३-कळमनुरी मतदारसंघात ९०.२० टक्के आणि ९४-हिंगोली मतदारसंघात ८७.७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण प्रगती दर ८८.३६ टक्के असून अद्याप सुमारे १ लाख १४ हजार मतदारांचे मॅपींग बाकी आहे.

कामकाजात समाधानकारक प्रगती न झाल्यामुळे ५५ टक्क्यांपेक्षा कमी मॅपींग असलेल्या १२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मतदार मॅपींग १०० टक्के पूर्ण करण्यासाठी दिनांक २५ व २६ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात दिवसभर काम करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार सिताराम साळसुंदर व मंगला मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आपल्या पालक/आजोबांच्या नावाचा तपशील संबंधित केंद्रस्तरीय अधिका-याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*****






रुग्णांना मोठा दिलासा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल

 


हिंगोली, दि.२२ (जिमाका) : गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, अर्ज थेट रुग्णालयातूनच सादर केला जाणार आहे. यामुळे अर्जासाठी होणारी कागदपत्रांची धावपळ थांबणार असून, अवघ्या ८ तासांत निधीला मंजुरी मिळणार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात मागील वर्षभरात ६८ रुग्णांना सुमारे ५१ लाख ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देणारी ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे.

शासनाच्या इतर आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र रुग्णांसाठी हा निधी मोठा आधार ठरत असून, आता रुग्णालयाकडूनच ऑनलाइन अर्ज सादर करण्यात येणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर कागदपत्रांची तत्काळ पडताळणी करून ८ तासांत मंजुरी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उपचारात होणारा विलंब टळणार आहे.

या योजनेअंतर्गत कोक्लिअर इम्प्लांट (२ ते ५ वर्षे वयोगट), हृदयविकार, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, गुडघा व हात प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, बाल शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, थॅलेसिमिया, केमोथेरपी/रेडिएशन, अंधत्व, नवजात शिशूंचे आजार, भाजलेल्या रुग्णांचे उपचार तसेच विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा सुमारे २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे व पाठपुरावा करण्याची संपूर्ण जबाबदारी आता रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवरील मानसिक व आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले यांनी दिली.

CSR निधीतून सहकार्याचे आवाहन

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत विविध स्तरावर मदत केली जाते. अनेक रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहतात. अशा रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उद्योग, संस्था व दानशूर व्यक्तींनी आपल्या CSR (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) निधीतून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबईचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

बँक तपशील :

Account Name – Chief Minister's Relief Fund

Account Number – 10972433751

IFSC Code – SBIN0000300

समाजसेवेच्या या उपक्रमात सहभागातून अनेक गरजू रुग्णांना उपचाराची संधी मिळून त्यांच्या कुटुंबाला आधार मिळणार असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

*****

जिल्हा वार्षिक योजनेतून बाजार समितीतील आडतींचे बळकटीकरण – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. २२ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन झाल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये दररोज १०० हून अधिक वाहनांची आवक होत आहे. वाढत्या कृषिमालामुळे बाजार समिती परिसरात जागेची कमतरता, साठवण क्षमतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांची अपुरी उपलब्धता यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी, व्यापारी व आडती यांच्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजार समितीतील आडतीचे बळकटीकरण करण्यात येणार असून, परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कृषिमालाच्या वाढत्या आवकेमुळे विद्यमान जागा अपुरी पडत असल्याने शेतकऱ्यांचा माल खुल्या जागेत ठेवावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून साठवण क्षमतेत वाढ, नवीन गोदाम उभारणी तसेच अतिरिक्त जागेचा पर्याय यावर प्रशासन गंभीरपणे विचार करत आहे.

बाजार समितीचे आधुनिकीकरण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी पुढे सांगितले की, वजनकाटा, लिलाव व्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारा आदी सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना माल विक्री प्रक्रियेत सुलभता मिळावी आणि कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषिमालाच्या बाजारभावाबाबत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन दर निश्चित करत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजारभावातील तफावत किंवा इतर अडचणी वरिष्ठ पातळीवरील संबंधित संस्था, एनसीडीईएक्स किंवा स्पॉट एजन्सीकडे पाठवून त्यावर पाठपुरावा करता येतो.

हिंगोली जिल्हा हळद उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जात असून, येथील हळदीला राष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. त्यामुळे बाजार समितीतील सुविधा सक्षम झाल्यास शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, चांगला भाव आणि विक्रीसाठी अनुकूल वातावरण मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव हळद मार्केट येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, व्यापारी, आडती व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

****






भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 

हिंगोली, दि. २२ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी भांडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यसेवा, सुविधा व स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसरासह केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली.

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रात करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता, अँब्युलन्स शेड तसेच नळ दुरुस्तीच्या कामांची माहिती घेतली. उपस्थिती पटलाची पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही विचारणा केली. तसेच केंद्रात होणाऱ्या सरासरी प्रसूती, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या आणि एन-क्वॉस गुणांकनाबाबत माहिती जाणून घेतली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक गट्टू यांनी यावेळी माहिती देताना, प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी २ ते ३ प्रसूती होत असून दररोज ३० ते ५० रुग्ण बाह्यरुग्ण विभाग सेवेसाठी येत असल्याचे सांगितले. एन-क्वॉस स्वयंमूल्यांकनात केंद्राला ७६ टक्के गुण मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. स्वच्छतेसाठी केंद्रात एक परिचर उपलब्ध असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भांडेगाव येथील एका महिलेची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र परिसरातील वृक्षांचीही पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक गट्टू, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश घुले तसेच जीएनएम आशा भवर उपस्थित होत्या.

*****






 हिंगोली जिल्हा उद्योग निर्मितीत राज्यात तिसरा


* विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप 


हिंगोली, दि. २२ (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे.

राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार वाढविणे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम १ ऑगस्ट २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीला चालना मिळाली आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात हिंगोली जिल्ह्याने १४१.६७ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यास एकूण ६०० प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी १९५७ प्रस्ताव विविध शाखांकडे सादर करण्यात आले. यामधून ८५० प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, एकूण ६७९.७५ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सक्षम नेतृत्वाखाली उद्योगनिर्मिती वाढविण्यासाठी वर्षभर सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. उद्योगांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जागा उपलब्ध करून देणे, बँकांकडून वित्तपुरवठा वेळेत उपलब्ध करून देणे, तसेच वीजपुरवठा व इतर अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधला. या सर्व प्रयत्नांमुळेच जिल्ह्याने ६०० प्रकरणे पूर्ण करत १४१.६७ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

या योजनेंतर्गत टेलरिंग व रेडीमेड गारमेंट्स, ब्युटी पार्लर तसेच कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत झाली आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास १००० प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, अधिकाधिक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

*****

 खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न



हिंगोली(जिमाका), दि. 22 : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांसह क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये विविध पिकांच्या बीज प्रक्रियेबाबत माहिती, सुधारित बियाण्यांची निवड, बियाण्यांची उगवणक्षमता चाचणी, खतांचा संतुलित वापर, माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पावसाच्या अनियमिततेचा विचार करून स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार योग्य पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याचेही सांगण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ साधावी तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यशाळेस कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******



21 April, 2026

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा


११ आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करा 

एचपीव्ही लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश



हिंगोली, दि. 21 (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची आढावा बैठक घेत जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून ११ 'आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. 

सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा व आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या स्तरावर रेफरलच्या प्रमाणाबाबत लेखा परीक्षण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याच बरोबर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त भारत अभियान, कुष्ठरोग, एनसीडी कार्यक्रमा अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग या आजाराच्या स्क्रीनिंगचे काम वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान बाबत आढावा घेतला व अभियान यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या.

 तसेच एचपीव्ही लसीकरणाचा आढावा घेतला असता १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वा वाढदिवस न केलेल्या एकूण मुलींची संख्या १०२२५ एवढी आहे, त्यापैकी २७७ मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. एचपीव्ही लसीकरणाचे काम जलद गतीने वाढवावे. यासाठी जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करावे व शाळेमध्ये जाऊन समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा दिल्या जातात, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे काम करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. 

 यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तथा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, बालरोग तज्ञ गोपाल कदम, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. सुनील देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिडुळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे,, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे , डॉ. डी व्ही. सावंत, डॉ. प्रशांत पुठावर, डॉ. निशांत थोरात, अमोल कुलकर्णी, विजय पाठक शेख मुनाफ आदी  कर्मचारी  उपस्थित होते. 

*****