25 June, 2026

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

 विशेष लेख : 


शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.


शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 आणि महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करुन शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे.


राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येते. शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता म्हणून यादृष्टीने शिफारशी करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (मित्र) प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली  उच्चाधिकार समिती गठीत केली होती. 


या समितीने शेतकऱ्यांना  कर्जमुक्तीची  आवश्यकता, शेतकऱ्यांवर वारंवार कर्जमाफीची वेळ का येते? त्यांच्या उत्पन्नात स्थैर्य का निर्माण होत नाही? भविष्यात शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकू नयेत, शेतकरी सक्षम व्हावा याबाबत अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत. मात्र तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य  शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू करण्याचा  ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.


कर्जमुक्ती योजना काय आहे :-*

2017 मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, तर 2019 मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. यावेळीही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येत आहे. अल्पमुदतीची थकीत पीककर्जे, तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 


        यावेळी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आणि तो म्हणजे पूर्वी दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता, म्हणजे एकाद्या शेतकऱ्याचे दोन लाख दहा हजार कर्ज असेल तर तो शेतकरी  अपात्र होता. आता मात्र अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच यामध्ये जमीन धारणेची अट नाही.


याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्जफेडीची शिस्त टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रामाणिक कर्जदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


एकवेळ समझोता योजना (One Time Settlement):

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जखात्यांची एक किंवा अनेक बॅंकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जी थकित रक्कम आहे त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागेल. विशेष म्हणजे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची दोन लाखांवरील थकित रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत कालावधी दिला जाणार आहे.


प्रोत्साहनपर लाभ : 

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ पैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन ३० जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार विहित वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी रु. ५० हजार पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०२५-२६ व २०२६-२७ या आर्थिक वर्षांतील अल्पमुदत पीक कर्जाचीही वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील.


तसेच, 2023-24 अथवा 2024-25 या वर्षात पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2023-24 अथवा 2024-25 या वर्षात अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा 5 हजार प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.


नियमित परतफेड करणाऱ्यांना मोठा दिलासा:

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019 मधील योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुर्नगठन/फेरपुर्नगठन थकीत हप्त्याची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत  रक्कम रु. 50 हजार पर्यंत असल्यास पूर्ण कर्जमुक्ती, आणि रु. 50 हजारांपेक्षा जास्त असल्यास  एकवेळ समझोता (OTS) योजनेचा लाभ मिळणार आणि रक्कम भरण्याची मुदत 31 मार्च 2027 असणार आहे.


योजनेचे निकष :

पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह प्रति शेतकरी २ लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती.

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी लागू.

३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या कर्जाचा समावेश.

३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाचा समावेश.

जमीन धारणेची अट नाही.

पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांनाही २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती.

२ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्यास अतिरिक्त रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत जमा केल्यास कर्जमुक्तीचा लाभ.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा बँका व प्रा. कृषी पतपुरवठा संस्थांच्या कर्जाना लागू.


कोण पात्र असणार नाहीत :

 ● विद्यमान किंवा माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे विद्यमान किंवा माजी सदस्य.

● केंद्र किंवा राज्य शासनातील असे अधिकारी व कर्मचारी, ज्यांचे एकत्रित मासिक वेतन रु. 25 हजार  पेक्षा अधिक आहे.

● राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (उदा. महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इ.) तसेच अनुदानित संस्थांतील रु. 25,000 पेक्षा अधिक मासिक वेतन असलेले अधिकारी व कर्मचारी.


● शेतीव्यतिरिक्तच्या उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती

● निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे 25 हजार पेक्षा अधिक 

● मासिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक (मात्र माजी सैनिकांना हा अपवाद लागू राहील).

● कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड तसेच सहकारी दूध संघ यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व रु. २५ हजार पेक्षा अधिक एकत्रित वेतन असलेले कर्मचारी. मात्र, सहकारी साखर कारखान्यांतील हंगामी कामगार या अपात्रतेतून वगळण्यात आले असून ते योजनेसाठी पात्र राहतील.


या कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक असून या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असून केवळ कर्जमाफी नाहीतर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

- काशीबाई थोरात, विभागीय संपर्क अधिकारी

०००००

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २५ : ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२६-२७ या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा व राज्यस्तरावरील योजनेचे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे ३१ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व पंचायत समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींकडून शासन निर्णयानुसार विविध विकासकामांपैकी आर्थिक मर्यादेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून हे प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रस्तावासोबत तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांचे आदिवासी लोकसंख्या व क्षेत्र प्रमाणपत्र, कामांचा पाच वर्षांचा प्राधान्यक्रम आराखडा, अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचा बहुमताने मंजूर ठराव, नाहरकत प्रमाणपत्र, स्थळदर्शक नकाशा, जिओ-टॅग केलेले छायाचित्र, संबंधित काम इतर कोणत्याही योजनेतून मंजूर नसल्याचे प्रमाणपत्र, देखभाल-दुरुस्तीचे प्रमाणपत्र, जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचा पुरावा, ग्रामसेवकांचा अहवाल, कार्यान्वयीन यंत्रणेचे प्रमाणपत्र, जादा खर्चाचे हमीपत्र तसेच कामाच्या जागेबाबत कोणताही वाद नसल्याचे हमीपत्र आणि तांत्रिक मान्यतेसह अंदाजपत्रक आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

सर्व संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ते वेळेत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.

******

24 June, 2026

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम

 




कार्यशाळा संपवून परतताच जिल्हाधिका-यांकडून मतदार यादी छपाईची पाहणी

हिंगोली(जिमाका), दि. २४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आवश्यक मतदार यादी छपाईचे काम सुरू असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील विशेष सखोल पुनरीक्षण संबंधीची कार्यशाळा संपल्याबरोबर हिंगोलीतील संबंधीत प्रिंटींग प्रेसला प्रत्यक्ष भेट‌ देत कामाचा आढावा घेतला.  

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी छपाई प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. छपाईचे काम अचूक, त्रुटीमुक्त व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना व प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या. मतदार यादीतील माहितीची गोपनीयता, गुणवत्तापूर्ण छपाई आणि निर्धारित कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून, नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्त्या करण्याचे कामही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छापील मतदार यादीची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असून, त्याद्वारे नागरिकांना मतदार यादीतील तपशील पडताळण्यास सुलभता होणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी छपाईच्या विविध टप्प्यांची पाहणी करून कामाची गती व गुणवत्ता समाधानकारक असल्याचे नमूद केले. तसेच मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले.

यावेळी निवडणूक शाखेचे अधिकारी, संबंधित कर्मचारी तसेच प्रिंटींग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती अर्जास ८ जुलैपर्यंत मुदतवाढ



हिंगोली, दि.२४ (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णयातील तरतुदीनुसार, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी अर्ज स्विकारण्यासाठी ८ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 


यापूर्वी जाहिरातीव्दारे अर्ज करण्यासाठी दि. २२ जून २०२६ ही अंतिम मुदत दिली होती. तथापि, सदर जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली असून आता ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक ८ जुलै २०२६ ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिली आहे. 


सन २०२६-२७ करीता यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा व आवश्यक सर्व कागदपत्रांसह सदर अर्ज दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ६.१५  वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे, आकार प्रिमायरोरा, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे- ४११००६ येथे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक संचालक  प्रदिप धर्माधिकारी यांनी केले आहे.

*******

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जून रोजी आयोजन; २५० रिक्त पदांसाठी मुलाखती

 

हिंगोली (जिमाका), दि. २४: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दि. ३० जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. 


 उत्पादन व सेवा क्षेत्रातील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

रोजगार मेळाव्यात एके ग्लोबल एचआर प्रा. लि., बेरॉक इंजिनिअरिंग लि., परम स्कील ट्रेनिंग प्रा. लि., ग्रीव्हज कॉटन बीकेटी टायर्स, धूत ट्रान्समिशन प्रा. लि., स्कॉय प्लेसमेंट सर्व्हिस, संकल्प जॉब प्लेसमेंट प्रा. लि., उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, स्वतंत्र मायक्रोफिन तसेच भारतीय जीवन विमा निगम यांसारख्या नामांकित आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.

या आस्थापनांकडून एकूण २५० रिक्त पदांची मागणी प्राप्त झाली असून संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in अथवा www.ncs.gov.in या संकेतस्थळांवर नोंदणी करून उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा. तसेच दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता वराहमिहीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी परिसर, मेन रोड, कळमनुरी येथे शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी ०२४५६-२२४५७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

******

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम


*जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची बैठक आज*


हिंगोली (जिमाका), दि. २४ : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली असून, या कार्यक्रमाबाबत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी  जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्या  निर्देशांन्वये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात उद्या गुरुवार, (दि. २५) रोजी सकाळी १०:३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देणे, तसेच कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर चर्चा करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सदर बैठकीस व्यक्तिशः उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

23 June, 2026

शासकीय योजनांतील प्रकरणे तातडीने निकाली काढून लाभार्थ्यांना जलद कर्जवाटप करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली(जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील सर्व बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकांच्या विविध योजनांअंतर्गत कर्जवाटप व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक, शिखर बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गटांना कर्जपुरवठा, कृषी कर्जमाफी तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत बँकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांनी विविध योजनांतील प्रलंबित कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी व वितरण प्रक्रियेत अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले.

कृषी व स्वयंरोजगार क्षेत्राला चालना देण्यासाठी पीक कर्ज, उद्योग कर्ज तसेच बचत गटांच्या कर्ज प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्वरित कर्जवाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले. बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या.

********