28 February, 2026

जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो योगगुरू रामदेव बाबा

 


मुंबई, दि. 28 - वेदवाणी आणि गुरुवाणी मानवतेला मार्गदर्शन करणाऱ्या असून आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो, असा विश्वास योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

खारघर येथे आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमात योगगुरू रामदेव यांनी गुरु परंपरेच्या त्याग, शौर्य आणि अध्यात्मिक वारशाचे स्मरण करून राष्ट्रएकतेचा संदेश दिला. गुरुंनी समाजासमोर महान आदर्श ठेवला असून आपण त्या परंपरेचे वारसदार आहोत, असे सांगत त्यांनी गुरुंच्या मार्गावर श्रद्धा आणि कृतज्ञतेने चालण्याचे आवाहन केले. 

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. यावेळी जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जी, श्री बाबू सिंग महाराज,  श्री शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग जी,  ज्ञानी गुरुदयाल जी,  रघुवीर बाबा,  ग्यानी हरमिंदर साहेब,  प्रधान गुरुविंदर सिंग, हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील  आदिसह विविध संत ग्यानी उपस्थित होते.

या सोहळ्यात सिख समाजासह बंजारा, लबाना, वारकरी, सिंधी, वाल्मीकि आणि उदासीन परंपरेतील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा केवळ मेळावा नसून गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाज एकतेचा संकल्प दृढ करण्याचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व असून धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी गुरुंनी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यागामुळेच सनातन परंपरा आजही टिकून आहे. गुरु नानक देवांपासून गुरु गोविंद सिंह महाराजांपर्यंतची परंपरा हि शौर्य, त्याग आणि अध्यात्माची असल्याचे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.

रामेश्वर नाईक म्हणाले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नाम संगत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ व छत्तीसगडच्या संगतीच्या उपस्थितीत शहीदी समारंभ झाला. त्यानंतर २४ व २५ जानेवारीला नांदेड मधील तख्त श्री हजूर साहिब येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कोकण विभागासह राज्यभरातून आणि देश-विदेशातून आलेल्या संगतीने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेत आहेत . विविध समाजघटक, उदासीन संप्रदाय आणि वारकरी परंपरेतील भक्तांनी एकत्र येत धार्मिक एकतेचा संदेश दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शीख गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची गाथा सांगताना त्यांच्या शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा उल्लेख करून काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली शहादत ही मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय घटना असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक संस्था, ग्रामसभा आणि विविध उपक्रमांतून गुरुंचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

श्री रामराव महाराज यांनी महाराष्ट्र सरकार गुरु गोविंद सिंह महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी भगवान संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केला. संत सेवालाल महाराजांनी देशभर भ्रमंती करून समाजजागृती केली, व्यापार आणि संघटनाच्या माध्यमातून बंजारा समाजाला बळ दिले, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थित संताचा, गुरूंचा सन्मान करण्यात आला.

000नंदकुमार वाघमारे000




खारघर येथील हिंद दि चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

 

मुंबई, दि. 28 - खारघर येथे आयोजित हिंद दि चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी देश विदेशातून विविध संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि कीर्तनात भाविक रममाण झाल्याचे दिसत होते.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य समागमामुळे गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा संदेश देश-विदेशात अधिक दृढपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या ऐतिहासिक सोहळ्यास संत जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जी, श्री बाबू सिंग महाराज, श्री शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग जी, सिंधी समाजाचे गुरु छोटू सिंग, जसकरन सिंग, ज्ञानी गुरुदयाल जी, रघुवीर बाबा, ग्यानी हरमिंदर साहेब, प्रधान गुरुविंदर सिंग, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील, सरदार जसपाल सिंग सिद्धू, सरदार अमृपाल सिंग, सरदार अवतार सिंग शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. विविध समाजघटकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले.

*विदेशातील भाविकांचाही सहभाग*

लंडन, कॅनडा, अमेरिका तसेच न्यूयॉर्क येथूनही भाविकांनी विशेष उपस्थिती दर्शविली. विदेशातून सरदार हरभजन सिंग ढिल्लो, संत बाबा प्रेमसिंग, सरदार रणजीत सिंग, सरदार जगजीत सिंग, सरदार सुखदेव सिंग, सरदार गुरुप्रित सिंग, सरदार जयपाल आदी सहभागी झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व समाजातील भाविक एकत्र आल्याचे पाहून सरदार हरभजन सिंग ढिल्लो यांनी समाधान व्यक्त केले. 

000







हिंद दी चादर कार्यक्रमात भाविकांसाठी प्रशासनाच्या सर्व सोयी–सुविधा उपलब्ध

 

नवी मुंबई –  भव्य समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा, स्वच्छता व पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन  करण्यात आले आहे.

भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक मार्गयोजना आखण्यात आली असून, पोलीस विभागामार्फत आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सायबर पोलीस व एटीएस यांचीही मदत घेण्यात आली आहे.

आरोग्य सेवांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी  तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व १ आयसीयू उभारण्यात येणार असून, जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण १०० पेक्षा अधिक डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहणार आहेत.


ओवे मैदानाची एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची क्षमता असून, मुख्य मंडपात ८० हजार ते १ लाख भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात असून, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, प्रकाशयोजना व स्वच्छतागृहांची कामे प्रगतीपथावर आहेत. १ हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे आणि ५०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.


देशभरातून भाविक येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. जेएनपीए परिसरात दररोज होणाऱ्या सुमारे २५ हजार जड वाहनांच्या ये-जा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ३८ स्वतंत्र पार्किंग स्थळे, ३ हेलिपॅड, २५ हजार भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.


लंगर व्यवस्थेसाठी सुमारे १ हजार गॅस सिलेंडर, आवश्यक इंधन व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसीय कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत 

https://gurutegbahadurshahidi.com/home

संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक सोयी–सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

000

खारघर येथे “हिंद-दी-चादर” शहीदी समागमात भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संगम

 


नवी मुंबई,दि.२८ :खारघर नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित समागमात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.

समागमस्थळी अखंड कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. रागी जत्थेदारांच्या कीर्तनात भाविक भावनिकरित्या तल्लीन झालेले दिसत होते. विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी स्क्रीनमुळे प्रत्येक भाविकाला कीर्तनाचा लाभ घेता आला.

‘विरासत-ए-सीख’ या प्रदर्शनातून शीख समाजाचा इतिहास, शौर्यगाथा आणि परंपरा सचित्र स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू असून सर्व धर्मीयांना प्रेमपूर्वक भोजन दिले जात आहे. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. हजारो स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ हा संदेश  दिला जात आहे.

समागमात मुख्यमंत्री सहायता निधी च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डोळ्यांची तपासणी करून मोफत *देवाभाऊ चष्मे* वाहनातून चष्मे  वितरित करण्याची सोयही करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. बंजारा व लबाना समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.

 शिखांची पारंपरिक मार्शल आर्ट ची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली.३३ पार्किंग स्थळे, मोफत पिकअप-ड्रॉप सुविधा, कडक वाहतूक नियोजन, पोलीस व अग्निशामक दलाचा बंदोबस्त यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे. स्वच्छता रथ व कचरा संकलन व्यवस्था सतत कार्यरत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.

एकंदरीत, श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरत आहे.

००००००००००

‘हिंद-दी-चादर’ समागमात नऊ समाजांचे सामाजिक ऐक्य

 

नवी मुंबई, दि. २८ :  “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. विविध समाज, पंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले.

या समागमात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीयम, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समागमात सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धा, सेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला.

कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा समागम केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध समाजांच्या सहभागामुळे हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोख्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे.

0000

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम; भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी

 


- महामार्गपासूनच मार्गदर्शक फलक

- कलर कोडींग नुसार पार्किंगची व्यवस्था



खारघर, दि. 28 : अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी भाविकांच्या सोयीसाठी व्यापक आणि रंग-कोडनिहाय 33 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन बस, कार आणि दुचाकींसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक पार्किंग स्थळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ओला-उबरसह सर्व टॅक्सी सेवांसाठी देखील स्वतंत्र पिकअप-ड्रॉप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत.


कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ‘ब्ल्यू’, ‘ऑरेंज’ आणि ‘पिंक’ अशा तीन रंगांमध्ये पार्किंगचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक रंगानुसार विशिष्ट मार्ग व जिल्हे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार वाहनचालकांना पार्किंग स्थळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

*ब्ल्यू पार्किंग (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आदी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी)*

ओवे कॅम्प मैदान, इनामपुरी क्रिकेट मैदान, श्री सत्य साई हॉस्पिटल परिसर, मेट्रो स्टेशनजवळील मैदाने आदी ठिकाणी बस व कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या विभागात सुमारे ५५० बसेस आणि ११३५ कार पार्किंगची क्षमता उपलब्ध आहे.


*ऑरेंज पार्किंग (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी)*

पापडीचा पाडा सर्कल, सेक्टर ३५ ई, सेक्टर ३३, ३२, २७ आणि २३ मधील विविध मैदाने येथे मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था आहे. या विभागात ४०० बसेस आणि तब्बल ४९९० कार पार्किंगची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे.


*पिंक पार्किंग (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर येथून येणाऱ्या वाहनांसाठी)*

सेक्टर २४, १४, ११, १६, ७, ४, ८ आणि १० मधील मैदाने तसेच लिटल वर्ल्ड मॉल परिसर येथे वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. या विभागात २०० बसेस आणि २५६० कार पार्किंगची सुविधा आहे.

याशिवाय, कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी सेंट्रल पार्क, सेक्टर ६ परिसर आणि गुरुद्वारामागील टनेल रोड येथे स्वतंत्र पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सुमारे १४५० कार आणि १००० मोटारसायकली उभ्या करण्याची क्षमता आहे.

*महामार्गपासून मार्गदर्शक फलक*

कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवेश मिळावा यासाठी प्रशासनकडून मार्गदर्शक फलक, स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आयोजकांनी भाविकांनी दिलेल्या रंग-कोडनुसार पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्थेबद्दल नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त (वाहतूक ) तिरुपती काकडे यांनी सांगितले की, खारघर येथे ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या परिसरामध्ये जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; म्हणजे, ज्या ठिकाणी पार्किंगमध्ये आपण वाहन लावाल, तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोफत पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी येणारे ओला, उबर आणि टॅक्सी यांच्यासाठीसुद्धा पिकअप आणि ड्रॉपची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दोन्ही दिवशी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 11:00 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जड आणि वाजड वाहनांना प्रवेश करण्यास आणि पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, खारघरमध्येसुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, काही ठिकाणी रस्ते, पर्यायी रस्ते निर्माण केलेले आहेत आणि काही रस्त्यांवरती वाहतूक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, वाहतूक शाखेकडून एक डीसीपी, एक एसीपी, 20 अधिकारी आणि 500 अंमलदार यांच्यासोबत 500 वार्डन नेमण्यात आलेले आहेत; ज्यामुळे वाहतूक जी आहे, ती सुव्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल.

 काही ठिकाणी वाहनं बंद पडण्याची संभावना लक्षात घेता, पुरेसा प्रमाणात क्रेन नेमण्यात आलेले आहेत. टोइंग व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पार्किंगच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावरती सर्वत्र साइन बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत, या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, यासाठी वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस सज्ज आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000

हिंद-दी-चादर’ समागमात बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य सादरीकरण


नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 रंगीत पारंपरिक वेशभूषा आणि आकर्षक दागिने परिधान करून सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

समागमाच्या निमित्ताने धर्म, संस्कृती आणि परंपरांचा संगम पाहायला मिळाला. बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या सादरीकरणातून एकता, बंधुता आणि सांस्कृतिक वैविध्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता आणि मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

00000