11 February, 2026

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव, नटराज, विश्वकर्मा व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांसाठी 21 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 11 : इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या मार्फत सन २०२५-२६ या वर्षाकरिता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार यांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या पुरस्कारांसाठी अर्ज करणारी व्यक्ती अथवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल व शिफारस पत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.

***

बारावी हिंदी विषयाचा पेपर जिल्ह्यात सुरळीत

 


  • 96.61 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11: हिंगोली जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या वार्षिक परीक्षेंतर्गत आज बुधवार, (दि. 11) रोजी सकाळच्या सत्रात हिंदी विषयाचा पेपर जिल्ह्यातील एकूण 26 परीक्षा केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडला.

या परीक्षेसाठी नोंदणीकृत 3 हजार 545 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 425 विद्यार्थी उपस्थित राहिले, तर 120 विद्यार्थी अनुपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण 96.61 टक्के इतके नोंदविण्यात आले.

परीक्षेच्या पारदर्शक व सुयोग्य आयोजनासाठी विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या 5 भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच मुख्य विषयांच्या परीक्षांसाठी 24 संवेदनशील परीक्षा केंद्रांवर श्रेणीवर्ग-1 चे स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने-आण करणाऱ्या सहाय्यक परीरक्षकांसोबत पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यात आजचा हिंदी विषयाचा पेपर कोणतीही अनुचित घटना न घडता सुरळीतपणे पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

******

'महा पशुधन एक्स्पो-२०२६' च्या लोगोचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते अनावरण





हिंगोली(जिमाका), दि. ११ : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दि. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोगो अनावरणप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे महा प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी या महा पशुधन एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन घडणार आहे. याशिवाय आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन, दुग्ध प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात येणार असून पशुधनाचे आरोग्य, लसीकरण व वैज्ञानिक संगोपन या विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रदर्शनाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व नागरिकांनी या महा पशुधन एक्स्पो-२०२६ मध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

******


हिंद दी चादर’ शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज*


*वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन*

नवी मुंबई, दि. 10 (विमाका) : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली.
    या बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, सह आयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नवी मुंबई समागम समन्वयक रविंद्र राठोड, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रविंद्र इंगोले, प्र. माहिती उपसंचालक मनोज सानप, जेएनपीएचे वाहतूक अधिकारी यशवंत पाटील व नागेश आकोडे, तसेच तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ आदी उपस्थित होते.
    नागपूर व नांदेड येथे शिस्तबद्ध व शांततेत पार पडलेल्या या समागमानंतर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.
      नाशिक, पुणे व मुंबईकडून जेएनपीएकडे जाणाऱ्या तसेच जेएनपीएकडून विविध ठिकाणी जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका निश्चित करणे, पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
    कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक रेल्वेने येण्याची शक्यता लक्षात घेता, दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ठेवू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
000000

*बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्न*


*जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला*

नवी मुंबई,दि.9(विमाका):- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आरम्भता की ‘अरदास’ खालसा भिंडरावाले, मुखी दमदमी टकसाल, प्रधान संत समाजचे संत ज्ञानी हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे आज करण्यात आली.    
    यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री. जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे श्री. चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ), राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग, उपजिल्हाधिकारी रविंद्र राठोड, नवी प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांच्यासह शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधी उपस्थिती होते. 
    संत ज्ञानी हरनाम सिंघजीं नी सर्वप्रथम ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या बलिदानाविषयीचे माहात्म्य सांगितले. आजच्या काळात ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या शहादतविषयी जागर करणे का महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन दिले. विशेषत्वाने त्यांनी प्रशासनाचे मनापासून कौतुक केले, आभार मानले. ते म्हणाले की, नागपूर आणि नांदेड या ठिकाणी "हिंद दी चादर" या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशासनाच्या सहकार्याची खूप मोठी जोड होती. आणि आज खारघर, नवी मुंबई येथे देखील आजच्या आरंम्भता की "अरदास" कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या खुद्द विभागीय आयुक्तांपासून ते अगदी शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या उत्साहातून हे स्पष्ट होत आहे की, येथील कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम उत्तमरित्या आयोजित करू या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
     यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून तयारी महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रायगड व ठाणे जिल्हा प्रशासनाने 25 समित्यांची स्थापना करून विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. नागपूर आणि नांदेड येथील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता खारघर येथील कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
    कार्यक्रमासाठी प्रशासन, पोलीस व महानगरपालिका यंत्रणा समन्वयाने दिवसरात्र कार्यरत असून भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली. गुरु नानक नामलेवा समिती, शीख समुदाय तसेच विविध समाजघटकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
     "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी प्रास्ताविक भाषणात गुरु तेग बहादूरजी यांच्याशी लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय यांच्याशी निगडीत असलेला इतिहास सांगितला. तसेच त्यांनी नागपूर आणि नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
000000000

विशेष लेख..



महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि-चादर,श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वा शहीदी समागमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९ येथे होत आहे.

“गुरु तेगबहादूर जी : धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचा अमर दीपस्तंभ”

 प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे - लेखक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम ) येथे परीक्षा नियंत्रक आहेत पूर्वी ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, येथे माध्यम शास्त्र संकुलात संचालक व प्राध्यापक तसेच श्री – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.

भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे.  

गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय

१ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादूर जी हे सहावे शीख गुरु श्री गुरु हरगोबिंद साहेब यांचे ते तेजस्वी पुत्र होते. बालपणापासूनच त्यांच्या जीवनावर अध्यात्म, शौर्य आणि सेवाभावाचे संस्कार कोरले गेले. वेद-उपनिषदे, इस्लामी तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल चिंतनातून त्यांच्या विचारांना सर्वधर्मसमभाव आणि उदात्त मानवतावादाची दिव्य झळाळी प्राप्त झाली. गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक प्रभावी सामाजिक सुधारक होते. त्या काळात भारतीय समाज जातीय भेदभाव, धार्मिक अत्याचार, अंधश्रद्धा आणि राजकीय दडपशाहीने ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी समाजाला सत्य, समानता आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला.

गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर मानवी स्वातंत्र्याचे सजग प्रहरी होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव, समता आणि आत्मसन्मान या मूल्यांचा पुरस्कार केला.

त्यांच्या धर्मांतरास उघड विरोधानंतर इ.स. १६७५ साली दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेगबहादूर जी यांना अमानुष यातना देऊन त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हे बलिदान कोणत्याही राजकीय सत्तेविरुद्ध नव्हते, तर विचारस्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले महान बलिदान होते. गुरु तेगबहादूर जी मानवतेचे अमर नायक बनले. म्हणूनच त्यांना “हिंद की चादर” असे गौरवाने संबोधले जाते.

गुरुजींनी केवळ शीख धर्मियांसाठी नव्हे, तर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला. धर्मस्वातंत्र्य, मानवी सन्मान आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले हे ऐतिहासिक बलिदान होते. त्यांच्या या बलिदानामुळे भारताच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाला नवी दिशा मिळाली. त्यांचे पुत्र श्री गुरु गोबिंदसिंग जी यांनी पुढे खालसा पंथाची स्थापना करून अन्यायाविरुद्ध संघटित लढ्याचा मार्ग दाखवला.

 मानवाधिकारांचे आद्य पुरस्कर्ते

आज आपण मानवाधिकारांची चर्चा करतो, पण गुरु तेगबहादूर जी यांनी १७ व्या शतकातच मानवी हक्कांचा पुरस्कार केला. धर्म मानण्याचा अधिकार, विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार हे मूलभूत मानवी हक्क आहेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांचे बलिदान हे कोणत्याही एका धर्मासाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी होते.

 जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष

त्या काळातील भारतीय समाज जातिभेदाच्या खोल दरीत अडकलेला होता. जन्मावर आधारित उच्च-नीचतेच्या कठोर रेषांनी माणसामाणसांत भिंती उभ्या केल्या होत्या. सामाजिक प्रतिष्ठा, धार्मिक अधिकार आणि मानवी सन्मान हे काही मोजक्या वर्गांपुरते सीमित झाले होते. अस्पृश्यता, भेदभाव आणि अन्याय हे समाजजीवनाचे अंग बनले होते. अशा विषम आणि अन्यायी सामाजिक रचनेत मानवी समानतेचा विचार मांडणे हे क्रांतिकारक धैर्याचे लक्षण होते.

याच अंधाऱ्या काळात गुरु तेगबहादूर जी यांनी शीख परंपरेतील “एक ओंकार” या तत्त्वाचा आशय समाजजीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने ईश्वर एकच असून, त्याची निर्मिती असलेला प्रत्येक मानव समान आहे. जात, धर्म, वर्ण किंवा पंथ यांवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या बाणीतून माणसाच्या अंतःकरणातील शुद्धता, आचरणातील नैतिकता आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित होते. सामाजिक समतेचा हा संदेश केवळ उपदेशापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष आचरणातून व्यक्त झाला. गुरु तेगबहादूर जी यांनी जातिभेदाच्या जखमांवर करुणेचा लेप लावला आणि समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हते, तर मूलगामी सामाजिक सुधारणा घडवणारे होते. त्यांच्या विचारांनी पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली.

अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला विरोध

गुरु तेगबहादूर जी यांच्या बाणीत आत्मचिंतनाला विशेष महत्त्व आहे. मनुष्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणाचा शोध घ्यावा, इच्छांचे बंधन ओळखावे आणि विवेकाच्या प्रकाशात जीवन जगावे, असा त्यांचा आग्रह होता. वैराग्य म्हणजे संसारापासून पलायन नव्हे, तर संसारात राहूनही आसक्तीवर विजय मिळवणे, हे त्यांनी स्पष्ट केले. संयम, सहनशीलता आणि धैर्य ही खरी साधना असून, संकटांच्या काळातही मन स्थिर ठेवणारा मनुष्यच खरा भक्त आहे, असा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या मते ईश्वरभक्ती ही केवळ शब्दांत, वेशात किंवा विधींमध्ये व्यक्त होत नाही; ती माणसाच्या आचरणात, व्यवहारात आणि सेवाभावात प्रतिबिंबित झाली पाहिजे. म्हणूनच गुरु तेगबहादूर जी यांची बाणी ही आत्मशुद्धीची आणि मानवी मूल्यांची अमूल्य देणगी ठरते. त्यांनी अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि निरर्थक कर्मकांडांवर कठोर टीका केली. त्यांच्या बाणीत आत्मचिंतन, वैराग्य, संयम आणि ईश्वरभक्तीवर भर दिला आहे.

ते म्हणतात “तीर्थ फिरौ, अरु दान करौ, अवरु न पूजा जाई।

अंतर की मलु न उतरै, ज्यों धोवै घरु बाहि॥”

 त्यांचे म्हणणे होते की, खरी भक्ती ही माणसाच्या आचरणात दिसली पाहिजे, केवळ बाह्य आडंबरात नव्हे.

“काहे रे बन खोजन जाई।

सरब निवासि सदा अलिपतो, तोही संगि समाई॥”

गुरु तेगबहादूर जी यांनी सत्य, करुणा, दया, संयम आणि निर्भयता या नैतिक मूल्यांचा समाजात प्रसार केला. त्यांनी सांगितले की, संकटाच्या काळातही जो मनुष्य विचलित होत नाही, तोच खरा ज्ञानी आहे. त्यांच्या बाणीतून मानसिक स्थैर्य आणि आत्मबळ यांचा संदेश मिळतो. आजचा समाजही विविध प्रकारच्या सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक संघर्षातून जात आहे. अशा वेळी गुरु तेगबहादूर जी यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. धार्मिक सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा सन्मान हे मूल्य आजही तितकेच आवश्यक आहेत. गुरु तेगबहादूर जी हे केवळ शीख धर्माचे गुरु नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त आपण त्यांच्या सामाजिक सुधारणा, मानवतावादी विचार आणि निर्भय बलिदानाचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण समाजात न्याय, समता आणि सहिष्णुता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले पाहिजे. गुरु तेगबहादूर जी यांचे बलिदान हे इतिहासातील एक तेजस्वी दीपस्तंभ आहे, जो आजही मानवतेचा मार्ग उजळवत आहे.

संदर्भ :1. मॅक्लिओड, डब्ल्यू. एच., सिख धर्म, पेंग्विन बुक्स, 1997.

2. सिंग, खुशवंत, अ हिस्ट्री ऑफ द सिख्स, खंड १ (1469–1839), ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 2004.

3. कोहली, सुरिंदर सिंग, गुरु तेगबहादूर: जीवन, प्रवास व बलिदान, नॅशनल बुक शॉप, दिल्ली, 1998.

4. श्री गुरु ग्रंथ साहिब, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती, अमृतसर, 2011.

5. • “श्री गुरु तेग बहादूर” – डॉ. रणजितसिंह देशमुख

6. • “धर्मस्वातंत्र्याचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादूर” – प्रा. भालचंद्र नेमाडे (संपादित/लेखसंग्रह

7. • “Guru Tegh Bahadur: Prophet and Martyr” – डॉ. हरबंस सिंह

8. • “The Life of Guru Tegh Bahadur” – मॅक्स आर्थर मॅकॉलीफ

००००००००

हिंद दी चादर’ शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज*


*वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन*

नवी मुंबई, दि. 10 (विमाका) : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली.
    या बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, सह आयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नवी मुंबई समागम समन्वयक रविंद्र राठोड, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रविंद्र इंगोले, प्र. माहिती उपसंचालक मनोज सानप, जेएनपीएचे वाहतूक अधिकारी यशवंत पाटील व नागेश आकोडे, तसेच तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ आदी उपस्थित होते.
    नागपूर व नांदेड येथे शिस्तबद्ध व शांततेत पार पडलेल्या या समागमानंतर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.
      नाशिक, पुणे व मुंबईकडून जेएनपीएकडे जाणाऱ्या तसेच जेएनपीएकडून विविध ठिकाणी जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका निश्चित करणे, पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
    कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक रेल्वेने येण्याची शक्यता लक्षात घेता, दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ठेवू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
000000