13 July, 2026

भूकंप आपत्ती व्यवस्थापनासाठी सीबीआरआयच्या सहकार्याने उपाययोजना करणार-जिल्हाधिकारी

 

शासकीय इमारतींच्या रेट्रोफिटिंगसाठी अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना

भूकंपरोधक बांधकाम व सुरक्षिततेसंदर्भात सीबीआरआयचे जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण आयोजित



हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती इमारत संशोधन संस्था, रुरकी (सीबीआरआय), उत्तराखंड यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सीबीआरआयचे संचालक प्रा. प्रदीप कुमार रामचंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्राध्यापक व भूकंपतज्ञ डॉ. टी. विजय कुमार, अजय चौरसिया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी सीबीआरआयच्या संचालकांनी इमारतींचे भूकंपरोधक मजबुतीकरण, जुन्या इमारतींचे संरचनात्मक बळकटीकरण (रेट्रोफिटिंग) तसेच भूकंपसुरक्षित बांधकाम याविषयी सादरीकरण करून आवश्यक तांत्रिक माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीबीआरआयच्या तज्ज्ञांचे पथक हिंगोली जिल्ह्यात भेट देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून त्यांचे विशेष दौरे आयोजित करावेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकारी, अभियंते आणि संबंधित यंत्रणांसाठी भूकंपसुरक्षित इमारत बांधकाम व सुरक्षिततेबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय सीबीआरआयच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच अन्य शासकीय इमारतींच्या रेट्रोफिटिंगसाठी आवश्यक अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिल्या.

या बैठकीदरम्यान संचालक प्रा. प्रदीप कुमार रामनचार्ला यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना उत्तराखंड येथील सीबीआरआय संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.

****** 







विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

 


मतदार पडताळणी, गणना पत्रक वितरण व डिजिटायझेशनची कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा गौरव


हिंगोली (जिमाका), दि. 13 : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदार पडताळणी, गणना पत्रक वितरण व डिजिटायझेशनची कामे शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सत्कार करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 1015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कार्यास सहाय्य करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत 37 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या विशेष मोहिमेदरम्यान मतदारांना गणना पत्रकांचे वितरण, प्राप्त गणना पत्रकांचे संकलन तसेच माहितीचे डिजिटायझेशन ही प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव करून जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सत्कार करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील टी. टी. जंगले, मुंजाजी असोले, सुरेश जाधव, कळमनुरी मतदारसंघातील एस. डी. लोंढे तसेच हिंगोली मतदारसंघातील जी. एन. वानखेडे, श्रीमती एस. के. चव्हाण, आर. जे. अंडीले, डी. एम. गडदे, पी. यू. राजपूत आणि ए. एस. धुमाळ यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रगती चोंडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

****** 






बुधवारी हिंगोलीत भव्य रोजगार मेळावा * महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



 

·         20 हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग; 2 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी हिंगोली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अध्यक्ष आणि सचिव यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी विपुल भागवत तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील 20 हून अधिक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, विविध पदांसाठी 2 हजारांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध असतील. दहावी, बारावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, सर्व शाखांतील पदवीधर, सीएनसी ऑपरेटर, सिपेट तसेच इतर पात्र उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असून, निवड झालेल्या उमेदवारांना साधारणतः 15 हजार ते 30 हजार रुपये मासिक वेतन अथवा विद्यावेतन मिळण्याची संधी आहे. तसेच संबंधित कंपन्यांकडून जेवण, चहा-नाश्ता, बस सुविधा, आठ तासांची ड्युटी तसेच ओव्हरटाईमची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हा रोजगार मेळावा कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाशेजारी, हिंगोली  येथे बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी महाविद्यालयांनी गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एम्स, नीट, आयआयटी, सीए आदी स्पर्धात्मक अभ्यासक्रमांसाठी विशेष मार्गदर्शन व लक्ष्याधारित उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक महाविद्यालयातून किमान एक विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी निवडला जाईल, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक महाविद्यालयातून तीन गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

********

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


 

·         पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासह नोंदणी तातडीने पूर्ण करावी

·         राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटींचा लाभ

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या व 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांवरील 50 हजार रुपयांची मर्यादा शासनाने रद्द केली असून, अशा शेतकऱ्यांनाही आता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, उर्वरित रक्कम 'एक रक्कमी समझोता' योजनेअंतर्गत भरता येणार आहे. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माहितीच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी, खासगी, राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील संभाव्य थकीत पीक कर्ज खात्यांचा डेटा कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यस्तरावर पूर्ण झाले असून, पुढील अंतिम कार्यवाही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

कर्जमाफीच्या लाभात कोणताही विलंब होऊ नये आणि कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करावी. तसेच बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात आणि मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*******

12 July, 2026

हिंगोली येथे 15 जुलै रोजी भव्य रोजगार मेळावा

 



हिंगोली, दि.१२(जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार  (दि.१५) रोजी हिंगोली येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, विविध पदांसाठी २००० पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यात दहावी, बारावी पास/नापास, आय.टी.आय., डिप्लोमा, इंजिनिअरिंग, सर्व शाखेतील पदवीधर, सीएनसी ऑपरेटर, सिपेट तसेच इतर पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असून, निवड झालेल्या उमेदवारांना साधारणतः १५ ते ₹३० हजार रुपये मासिक वेतन/विद्यावेतन मिळण्याची संधी आहे. कंपनीमार्फत जेवण, चहा, नाश्ता, बस सुविधा तसेच ८ तास ड्युटी व ओव्हरटाईमची सुविधा लागू राहील.

हा रोजगार मेळावा कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाच्या बाजूला, हिंगोली येथे दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी. इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 9765535444, 9673668844 आणि 9607965622 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे राबवा; नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


• जिल्हाधिकाऱ्यांकडून 'एसआयआर'चा आढावा








हिंगोली (जिमाका), दि. 12 : विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियान (एसआयआर) प्रभावीपणे राबवून पात्र एकही मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज वसमत, कळमनुरी दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज वसमत व कळमनुरी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रथम वसमत नगर परिषद कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच मतदार नोंदणी व पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील विविध बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

यानंतर त्यांनी गणपती मंदिर परिसरात सुरू असलेल्या एसआयआर मतदार यादी पडताळणी केंद्राला भेट देऊन मतदार याद्यांची पाहणी केली. या ठिकाणी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती व इतर प्रक्रियेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी महात्मा गांधी विद्यालय येथे सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानाच्या कामकाजाची पाहणी केली. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, अर्ज स्वीकृती, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. अभियानात पारदर्शकता, अचूकता आणि वेळेचे नियोजन राखून काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

त्यानंतर कळमनुरी तहसील कार्यालय आणि इंदिरानगर येथे विशेष‌ संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानाच्या कामकाजाची पाहणी केली. येथेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थितांना यादी अद्ययावत करताना एकही मतदार मतदार यादीत नाव नोंदणी करण्यापासून  राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. 

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, श्रीमती प्रतीक्षा भुते, तहसीलदार सारंग चव्हाण, जीवककुमार कांबळे, मुख्याधिकारी रविकांत दरक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


*वसमत शासकीय स्त्री रुग्णालयास भेट*


या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालयालाही भेट देऊन रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, उपचार व्यवस्था, औषधांचा साठा तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. रुग्णांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

*******

डॉ. टी. विजयकुमार यांची जिल्हा भूकंप आपत्ती व्यवस्थापन समितीवर तांत्रिक सल्लागार म्हणून करणार तात्पुरती नियुक्ती

 


* तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भूकंप आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार होणार


* जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक


हिंगोली, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यात अलीकडे सातत्याने जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप तसेच इतर संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या काळात जीवित व वित्तहानी कमीत कमी ठेवण्यासाठी शास्त्रशुद्ध व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील भूगर्भशास्त्र विभागाचे प्राध्यापक व भूकंप तज्ज्ञ डॉ. टी. विजयकुमार यांची जिल्हा भूकंप आपत्ती व्यवस्थापन समितीवर तांत्रिक सल्लागार पदी तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत भूकंप आपत्तीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, तांत्रिक मार्गदर्शन, जनजागृती तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

भूकंपरोधक बांधकाम, इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता तसेच आपत्तीपूर्व तयारीसाठी उत्तराखंडमधील रुडकी येथील केंद्रीय इमारत संशोधन संस्थे(CBRI)च्या संचालकांसमवेत बैठक आयोजित करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

भूकंपाचे धक्के जाणवलेल्या परिसरातील शाळा, शासकीय कार्यालये व इतर सार्वजनिक इमारतींची तातडीने संरचनात्मक सुरक्षितता तपासण्याचे निर्देश संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. या तपासणीचा सविस्तर अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले.

संवेदनशील भागातील नागरिकांना वेळेवर सूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणालीचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. तसेच भूकंपासंदर्भातील अफवांना आळा घालण्यासाठी अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचविणे, जनजागृती करणे आणि आपत्तीच्या काळात नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सातत्याने मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

डॉ. टी. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक सूचना तयार करून व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे भूकंपाच्या प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी सक्षमपणे पूर्ण करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तत्परतेने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

*******