22 April, 2026

 खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न



हिंगोली(जिमाका), दि. 22 : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांसह क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये विविध पिकांच्या बीज प्रक्रियेबाबत माहिती, सुधारित बियाण्यांची निवड, बियाण्यांची उगवणक्षमता चाचणी, खतांचा संतुलित वापर, माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पावसाच्या अनियमिततेचा विचार करून स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार योग्य पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याचेही सांगण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ साधावी तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यशाळेस कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******



21 April, 2026

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा


११ आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करा 

एचपीव्ही लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश



हिंगोली, दि. 21 (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची आढावा बैठक घेत जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून ११ 'आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. 

सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा व आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या स्तरावर रेफरलच्या प्रमाणाबाबत लेखा परीक्षण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याच बरोबर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त भारत अभियान, कुष्ठरोग, एनसीडी कार्यक्रमा अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग या आजाराच्या स्क्रीनिंगचे काम वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान बाबत आढावा घेतला व अभियान यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या.

 तसेच एचपीव्ही लसीकरणाचा आढावा घेतला असता १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वा वाढदिवस न केलेल्या एकूण मुलींची संख्या १०२२५ एवढी आहे, त्यापैकी २७७ मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. एचपीव्ही लसीकरणाचे काम जलद गतीने वाढवावे. यासाठी जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करावे व शाळेमध्ये जाऊन समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा दिल्या जातात, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे काम करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. 

 यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तथा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, बालरोग तज्ञ गोपाल कदम, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. सुनील देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिडुळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे,, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे , डॉ. डी व्ही. सावंत, डॉ. प्रशांत पुठावर, डॉ. निशांत थोरात, अमोल कुलकर्णी, विजय पाठक शेख मुनाफ आदी  कर्मचारी  उपस्थित होते. 

*****





 *विशेष वृत्त*

नारी शक्ती अभियान : सुरक्षित मातृत्वासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ठरतेय आधारवड



हिंगोली, दि. 21 (जिमाका): महिलांचे आरोग्य, पोषण आणि सुरक्षित मातृत्व सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 प्रभावीपणे राबविण्यात येत असून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. ‘नारी शक्ती अभियानअंतर्गत मातृत्वाच्या काळात महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे व बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दोन टप्प्यांत आर्थिक मदत दिली जाते. पहिल्या अपत्यासाठी एकूण 5 हजार रुपयांची मदत दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. गर्भधारणेची नोंदणी आणि आवश्यक एएनसी तपासणीनंतर 3 हजार रुपये, तर बाळाच्या जन्मानंतर जन्मनोंदणी व प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर 2 हजार रुपये दिले जातात. तसेच दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6 हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात देण्यात येतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे, मनरेगा जॉब कार्ड, ई-श्रम कार्ड, किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गोल्डन कार्ड), बीपीएल शिधापत्रिका, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ, दिव्यांगत्व, अनुसूचित जाती-जमातीतील असणे यापैकी कोणत्याही एक पात्रतेचा पुरावा आवश्यक आहे. तसेच गरोदर व स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.

लाभार्थींनी अर्ज करताना आधार कार्ड, एएनसी/लसीकरण कार्ड, जन्म दाखला, पात्रतेचा पुरावा आणि आरसीएच क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. सर्व रक्कम थेट लाभार्थीच्या आधार-संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यात थेट बँक खात्यात जमा केली जाते.

दरम्यान, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या माहितीनुसार सन 2025-26 मध्ये जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत एकूण 4630 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून तब्बल 1 कोटी 41 लाख 34 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली 444, हिंगोली शहर 1014, कळमनुरी 608, सेनगाव 750, वसमत 1021, औंढा नागनाथ 660 आणि आखाडा बाळापूर 133 असे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. ही योजना केवळ आर्थिक मदत न देता मातृत्वाबाबत जागरूकता वाढविणे, वेळेवर आरोग्य तपासणी व लसीकरण सुनिश्चित करणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सुरक्षित मातृत्व, सुदृढ बालक आणि सक्षम महिला यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हीच खरी नारी शक्तीची बळकटी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

******



अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी निवासी शाळांमध्ये पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

 



हिंगोली, दि. 21 (जिमाका): सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून अर्जासोबत जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्राची छायांकित प्रत व अनुक्रमांक नमूद करावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत मर्यादित असून सक्षम अधिकाऱ्याने दिलेले 31 मार्च 2027 पर्यंत वैध उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तसेच अर्जासोबत पालकांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, जन्मतारखेचा पुरावा (ग्रामसेवक/नगरपरिषद दाखला), रहिवासी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय अधिकाऱ्याचे विद्यार्थ्याच्या आरोग्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेत आदिम जमातीतील विद्यार्थी, विधवा, घटस्फोटित, निराधार तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत. कळमनुरी येथील प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे दिनांक 22 एप्रिल 2026 पासून प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून, 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण भरलेले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांनी केले आहे. 

 ******


 त्रैमासिक विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक



हिंगोली, दि. २१(जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आस्थापनांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती असलेले माहे मार्च २०२६ अखेरचे ई आर-१ त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिल २०२६ पर्यंत डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणे बंधनकारक असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी कळविले आहे. 

सदर विवरणपत्र भरल्याची प्रत माहे एप्रिल २०२६ च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक असून, ही प्रत जोडल्याशिवाय वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच वितरित करण्यात आलेले आहेत. सर्व कार्यालयांनी आपले ईमेल आयडी, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन नंबर व पॅन नंबर नोंदवून आपली प्रोफाईल अद्ययावत करावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

 ******

 *नारी शक्ती वंदन अभियानांतर्गत यशकथा*


_*माविमच्या माध्यमातून प्रभावती काचगुंडे यांची मोहफुल लाडू उद्योगातून स्वावलंबनाकडे यशस्वी झेप*_



हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा या छोट्याशा गावात राहणाऱ्या श्रीमती  प्रभावती प्रकाश काचगुंडे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर गावातील इतर महिलांसाठीही नवा मार्ग खुला केला आहे. “नारी शक्ती वंदन अभियान” अंतर्गत त्यांची ही यशोगाथा खऱ्या अर्थाने ग्रामीण महिला सक्षमीकरणाचे जिवंत उदाहरण ठरते.

श्रीमती प्रभावती काचगुंडे या ३५ वर्षीय गृहिणी असून त्यांचे शिक्षण इयत्ता नववीपर्यंत झाले आहे. त्यांच्या कुटुंबात पती, एक मुलगा व दोन मुली असा पाच जणांचा परिवार आहे. कुटुंबाकडे चार एकर कोरडवाहू शेती असून शेती आणि शेतमजुरी हाच उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. मात्र, शेतीतील अनिश्चित उत्पन्नामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा भागवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने त्या जंगलातील व शेतातील मोहफुले गोळा करून विक्री करीत होत्या. त्यातून थोडेफार उत्पन्न मिळत असले तरी त्यात स्थैर्य नव्हते. परंतु, स्वतःचा काहीतरी वेगळा व्यवसाय उभा करण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती. एक दिवस त्यांनी वाळलेल्या मोहफुलामध्ये गूळ मिसळून लाडू तयार केले. घरातील सदस्यांनी त्याची चव घेतली असता ती अतिशय रुचकर असल्याचे लक्षात आले आणि याच क्षणापासून त्यांच्या उद्योगाची सुरुवात झाली.

यानंतर गावातील महिलांना एकत्र करून “जिजामाता महिला स्व-सहाय्यता बचत गट” स्थापन करण्यात आला. लोकसंचालित साधन केंद्र, औंढा नागनाथ येथील सहयोगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने दरमहा १०० रुपयांची बचत सुरू केली. बचतीतून अंतर्गत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारांचे नियोजन, हिशोब ठेवणे या प्रक्रियांमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि समूहभावना निर्माण झाली.

माविम व लोकसंचालित साधन केंद्रामार्फत त्यांना उद्योगजाणीव, कौशल्य विकास, क्षमता वृद्धी आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली. गरजेनुसार गटातून व बँकेकडून कर्ज मिळाल्याने व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध झाले.

प्रारंभी मोहफुल लाडू तयार करून विक्री करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रदर्शनांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे काही प्रमाणात निराशाही वाटू लागली. मात्र, माविमचे अधिकारी, कर्मचारी, सीएमआरसी व्यवस्थापक आणि सहयोगिनी यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेसोबतच पॅकेजिंग, लेबलिंग, सादरीकरण आणि ग्राहकांशी संवाद या बाबींमध्ये सुधारणा केल्या.

या बदलांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आकर्षक पॅकेजिंग आणि उत्कृष्ट चवीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढू लागली. हळूहळू प्रदर्शनांमध्ये नेलेला सर्व माल पहिल्याच दिवशी संपण्याइतकी विक्री होऊ लागली.

वाढत्या मागणीमुळे त्यांनी गटातील इतर महिलांना सोबत घेत उद्योगाचा विस्तार केला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने त्यांना विविध शहरांतील प्रदर्शन, स्टॉल्स आणि बाजारपेठांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध झाली.

आज सौ. प्रभावती काचगुंडे मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी करून मोहफुल लाडू उत्पादन करतात. त्यांच्या उत्पादनाची गावासह विविध शहरांमध्ये मागणी वाढली आहे. या उद्योगामुळे स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्नही वाढले आहे. त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावले असून समाजात त्यांना मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या प्रभावती आज यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. भविष्यात स्वतःचे स्वतंत्र दुकान सुरू करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे आणि अधिक मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे हा त्यांचा मानस आहे.

श्रीमती प्रभावती काचगुंडे सांगतात की, महिलांना योग्य संधी, प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास त्या नक्कीच स्वावलंबी बनू शकतात. महिलांचा विकास म्हणजे कुटुंब, समाज आणि देशाचा विकास होय.

त्यांचा हा संघर्षमय प्रवास अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. नारीशक्तीच्या सामर्थ्याचे हे जिवंत उदाहरण असून, अनेक महिलांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.



— प्रभाकर बारहाते

जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

***** 





20 April, 2026

 हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी व्यापक नियोजनावर भर : लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची सविस्तर आढावा बैठक



हिंगोली, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तातडीने ठोस, बृहद व दीर्घकालीन एकात्मिक आराखडा तयार करावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले. आमदार तानाजी मुटकुळे व आमदार राजू नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, अधीक्षक अभियंता सु. ह. कचकलवार, कार्यकारी अभियंते अण्णाराव कांबळे व अनिल कांबळे, प्रियंका राजपूत, पाटबंधारे व्यवस्थापन विभागाचे आर. पी. गरुड, प्रसाद लांब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाडा २०२६” अंतर्गत जिल्ह्यातील सिंचनस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दि. १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या पंधरवाड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सिंचन अनुशेष कमी करणे व उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्प, बंधारे व तलावांच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. रामवाडी-शेवाडी परिसरासह पैनगंगा खोऱ्यातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत आमदार तानाजी मुटकुळे यांनी पाण्याचे योग्य नियोजन व नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगितले. खरबी बंधाऱ्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची परतफेड होत नसल्याबाबतही त्यांनी लक्ष वेधले. जांभरूण तलाव, सापळी परिसरातील पाणी वाहून जाण्याच्या समस्या तातडीने सोडवाव्यात तसेच जुनुना व राजवाडी तलावांची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

आसना नदीवरील पुराच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पूरपरिस्थितीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांनी प्रस्ताव पूर्ण करून सादर केल्याशिवाय जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोणत्याही कामांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. लघु पाटबंधारे विभागांतर्गत नरसी, पूरजळ, लोहारा, गवळेवाडी, केळी उपसा सिंचन योजना तसेच नाला खोलीकरण आदी कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून मे अखेरपर्यंत सुमारे ३० टक्के निधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

बैठकीत जिल्ह्यातील एकूण १५,१६० हेक्टर सिंचन अनुशेषाबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. त्यापैकी जलसंपदा विभागामार्फत १०,०८९ हेक्टर सिंचनक्षेत्र निर्माण करण्याचे नियोजन असून, २ पूर्ण प्रकल्पांद्वारे ७७८ हेक्टर, ३ प्रगतीपथावरील प्रकल्पांद्वारे २,११२ हेक्टर, पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांद्वारे ४,२१९ हेक्टर आणि नव्याने मंजूर प्रकल्पांद्वारे १,२८० हेक्टर क्षेत्र विकसित होणार आहे. उर्वरित सुमारे १,७०० हेक्टर क्षेत्र जांभरूण या भविष्यकालीन योजनेद्वारे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित ६,१७१ हेक्टर क्षेत्र जलसंधारण विभागामार्फत विकसित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पूर्णा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन करून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सिद्धेश्वर उपसा योजनेसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या योजनेसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा अंदाज असून लाभक्षेत्र सर्वेक्षण, भूतांत्रिक तपासणी व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तसेच, केळी पाझर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. केळी तलावातून आसपासच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक संस्थांकडून प्रस्ताव सादर करून त्यानुसार जलनियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील कोरडवाहू भागात सिंचनक्षेत्र वाढवून हळद व केळीसारख्या नगदी पिकांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हंगामी पिकांऐवजी बारमाही पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी पाणीसाठा वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

*****