16 April, 2026

जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करा; टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था ठेवा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. १६ : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता तसेच सर्व तालुक्यांचे उपअभियंता उपस्थित होते.


बैठकीत जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ६३१ योजना मंजूर असून त्यापैकी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या ६१९ तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १२ योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ३९२ योजनांद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


उन्हाळ्याच्या टंचाई काळात नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी विद्युत कनेक्शन प्रलंबित आहेत, ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून स्टँडपोस्ट व इतर माध्यमांतून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.


जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पेडगाव वाडी, पाणबुडी, लोहगाव, नरसी ना., पहेणी, सिंगी नागा, चिखली, चोंडी शहापूर, बळसोंड व केसापूर येथील प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.


तसेच ज्या गावांमध्ये विहीर व पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागा अधिग्रहणाची प्रकरणे प्रलंबित आहेत, ती तत्काळ निकाली काढावीत. टँकर प्रस्तावित गावांना जलजीवन मिशन व इतर योजनांच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले.


बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.


*******

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत हिंगोली जिल्ह्यात आरोग्यसेवा बळकट

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत कार्यरत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिकांना मोफत, दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

या कक्षामार्फत आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 16 समुदाय आरोग्य शिबिरे यशस्वीरित्या पार पडली असून या शिबिरांमधून 6 हजार 291 लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचारांचा लाभ मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरले आहेत.

या शिबिरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांचे निदान, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार तसेच आरोग्य जनजागृती करण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून वेळेवर उपचार घेण्याची प्रवृत्तीही बळकट झाली आहे.

याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. चालू वर्षात या योजनेअंतर्गत एकूण 109 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 68 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर लाभार्थ्यांना एकूण रुपये 50 लाख 51 हजार इतकी आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत कॉकलियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, हिप प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, औषधोपचार व किरणोपचार, नवजात शिशूंचे आजार, गुडघा प्रत्यारोपण, डायलिसिस, रस्ते अपघातातील जखमी रुग्ण, जळीत रुग्ण, विद्युत अपघातग्रस्त रुग्ण तसेच मेंदूविकार व हृदयरोगासंदर्भातील शस्त्रक्रिया यांसारख्या गंभीर आजारांसाठी मदत दिली जाते.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच गरजू रुग्णांपर्यंत या सुविधांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*******

जिल्ह्यातून दरवर्षी सैनिक स्कूल व राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेशित व्हावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातून दरवर्षी किमान एक विद्यार्थी सैनिक स्कूल सातारा येथे व एक विद्यार्थी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज येथे प्रवेशित झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.

निपुण भारत अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्रा.) आसावरी काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अदा करण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच विविध प्रश्नसंच तयार करण्यासाठी डायटमार्फत दोन गणित, दोन इंग्रजी, दोन मराठी व दोन तांत्रिक विषयांचे तज्ज्ञ सदस्य तसेच शिक्षणाधिकारी (प्रा.) सदस्य सचिव असलेली समिती स्थापन करावी, असे सांगण्यात आले.

या समितीमार्फत टप्प्याटप्प्याने पाच हजार प्रश्न तयार करावेत. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घ्यावी. प्रश्नसंच तयार करण्यासाठी आवश्यक झेरॉक्स मशीन व ओएमआर मशीन खरेदी करावीत. दिवाळी सुट्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा घेण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले.

या स्पर्धा परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थी आकांक्षित क्षेत्रातील व दोन हजार विद्यार्थी सर्वसाधारण क्षेत्रातील निवडावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावणे व त्यांची गुणवत्ता विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दरमहा सुटीच्या दिवशी शनिवार किंवा रविवारी टप्प्याटप्प्याने रेमिडियल क्लासेस आयोजित करावेत. व्हर्च्युअल क्लासरूममधील व्याख्याने युट्युब चॅनलवर अपलोड करावीत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी निश्चित निकष ठरवावेत. तसेच चार हजार विद्यार्थ्यांच्या ट्रॅकिंगची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

*******

उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल

 


हिंगोली(जिमाका), दि. 16 : उन्हाळ्यातील वाढत्या तीव्रतेचा विचार करून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांनी पक्क्या व शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) संबंधित कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार पक्क्या व शिकाऊ अनुज्ञप्ती संबंधित कामकाज दि. 20 एप्रिल 2026 पासून सकाळी 7.30 वाजता सुरू होऊन दुपारी 12.30 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात संबंधित मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, करण्यात आलेल्या कामकाजाचा अहवाल नियमितपणे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नागरिकांनी  नवीन  वेळेनुसार कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.  


***

आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : आकांक्षित जिल्हा व तालुका विकास कार्यक्रमांतर्गत सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कामांची गुणवत्ता वाढवावी व लक्षणीय सुधारणा साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिगंबर माडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध परिमाणांची नियमित तपासणी करून प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. जिल्हा किंवा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्यास नीती आयोगाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. हा निधी विविध विकास कामांसाठी उपयोगात आणता येणार असून, त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. उत्तम कामगिरीच्या आधारे डेल्टा रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गृहविकास (हाऊसिंग) क्षेत्रात सध्या 16.52 टक्के प्रगती असून, त्यात वाढ करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन, आरोग्य तपासणी, सिव्हिअर, घरकुल व एफएसटीसी या घटकांमध्येही सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कारही दिले जातात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विभागांनी स्पर्धात्मक भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

आरोग्य व पोषणावर भर

आरोग्य व पोषण विभागाला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एन-क्वॉस (NQAS) सर्टिफिकेशन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे सांगितले. पूरक पोषण आहार 100 टक्के सुनिश्चित करणे, तसेच अतितिव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील त्रुटी दूर करून वितरण व्यवस्थेत सुधारणा करावी, असे निर्देश देण्यात आले.

 

डिजिटल व शिक्षण क्षेत्रातील सुधारणा

फेस रिकग्निशन, भारत नेट, प्रधानमंत्री आवास योजना व प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान यामध्ये प्रगती साधण्यावर भर देण्यात आला. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची ओळखपत्रे, स्थलांतर, टीसी व यु-डायस प्रणालीतील नोंदी अद्ययावत ठेवाव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व बदलांची काटेकोर नोंद करावी, असेही सांगितले.

 

विभागनिहाय आढावा

पशुसंवर्धन विभागात औषध साठ्याचे ऑडिट करून वितरणाची अद्ययावत माहिती ठेवावी. मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य बीज व विक्रीची माहिती सादर करावी. ग्रामविकास विभागाने रस्ते, सभागृह व सामाजिक सुविधांतील वाढीची आकडेवारी द्यावी. सिंचन व जलसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात किती वाढ झाली याचा अहवाल सादर करावा. केवळ सीएनबी बांधकाम न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला का, याची खात्री करावी. शाळा व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची माहितीही सादर करावी. क्रीडा विभागाने क्रीडांगणे व व्यायामशाळांच्या विकासाची माहिती द्यावी. ग्रामपंचायतीमार्फत कामे न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच कामे करून घ्यावीत, असेही स्पष्ट करण्यात आले.

 

आरोग्य व स्वच्छतेवर लक्ष

आरोग्य विभागात दैनंदिन व मासिक तपासण्या नियमित कराव्यात. औषधांची स्वतः तपासणी करणे, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कामापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे घेणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

 

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना हिंगोली येथे रुजू होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

****** 




विशेष लेख - #नारी शक्ती वंदन : कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा

 

15 April, 2026

कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड व पाणीपुरवठा यंत्रणेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी



हिंगोली(जिमाका), दि. 15 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड (कचरा डेपो) तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन त्यांनी कचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, स्वच्छता उपाययोजना, कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट प्रक्रिया यांचा आढावा घेतला. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा डेपोची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कळमनुरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पंपगृहाला भेट देऊन तेथील यंत्रणा, पाण्याचा पुरवठा, दाब व वितरण व्यवस्थेची पाहणी केली. नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या तसेच उद्भवणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*******