06 March, 2026

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील वरुड, जवळा पांचाळ, सिंगी, वाघी, केलसुला, वाढोणा, जयपूर, साखरा, वेलतुरा, वटकळी, वरुड चक्रपान, पानकनेरगाव आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 






जिल्ह्यातील 343 पदासाठी पोलीस पाटील पदभरती, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्रे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. 06 : हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटलाची 647 पदे मंजूर असून, 343 पदे रिक्त होती. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण  करण्याची  कार्यवाही  जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राबविण्यात आली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यातील काहींना प्रातिनिधीक स्वरुपात छत्रपती  शिवाजी  महाराज महाराजस्व  समाधान शिबिरामध्ये नियुक्ती आदेश वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर तात्पुरत्या निवडीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोमवार, दि. 02 रोजी www.Hingolipp.recruitonline.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. दि. 4 व 5 फेब्रुवारी, 2025 रोजी निवड झालेल्या उमेदवारांच्या विविध पथकामार्फत कागदपत्राची पडताळणी करुन त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील 343 रिक्त पदांमध्ये हिंगोली तालुक्यातील 76, सेनगाव 65, कळमनुरी 89, वसमत 57 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 56 पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस पाटील पदासाठी गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी दि. 1 ते 5 जानेवारी, 2026 दरम्यान जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. या आरक्षणावर 6 ते 7 जानेवारी, 2026 या दोन दिवसात आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानंतर दि. 8 ते 10 जानेवारी, 2026 या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करुन दि. 12 ते 26 जानेवारी, 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दि. 27 ते 30 जानेवारी, 2026 या दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी करुन अर्जदारांना प्रवेशपत्रे वाटप करण्यात आले होते.

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पदांसाठीची लेखी परीक्षा 21 केंद्रांवर दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी शांततेत व शिस्तबद्धरित्या घेण्यात आली. या परीक्षेसाठी 4 हजार 639 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 4 हजार 472 अर्ज पात्र ठरले होते. दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी झालेल्या परीक्षेसाठी 4 हजार 379 उमेदवार उपस्थित राहिले, तर 93 उमेदवार गैरहजर होते.

प्रथम उत्तरतालिका दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिकेबाबत लेखी आक्षेप व हरकती सादर करण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. अंतिम उत्तरतालिका दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येऊन त्याच दिवशी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती  दि. 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध पॅनलच्या माध्यमातून पार पडल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

‘लिगो इंडिया’ प्रकल्पातील विकासकामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


हिंगोली दि.06, (जिमाका): जिल्ह्यातील दुधाळा येथे चार वर्षाच्या कालमर्यादेत गुरुत्वाकर्षण-लहरींचा अभ्यास करणारी अत्याधुनिक वेधशाळा ‘लिगो इंडिया’ अंतर्गंत येणाऱ्या विविध विकासप्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे घेतला. यावेळी लिगो इंडिया या प्रकल्पाच्या विकासाकामांची प्रगती ही समाधानकारक असून, विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधितांना दिले.  

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेश सरवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, तहसीलदार हरिष गाडे, लिगो इंडियाचे संचालक के. महापात्रा, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख प्रशांत बिलोलीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता एन. डी. कोकडवार यांच्यासह लार्सन अँड टुब्रोची टेक्निकल टीम यावेळी उपस्थ‍ित होते.

            अमेरिका-भारत-जर्मनी-ऑस्ट्रेलिया-यूके यांच्या सहकार्याने पुढील चार वर्षांत बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी लागणारे अतिरिक्त भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पाच्या कामकाजासाठी आवश्यक भूसंपादन मोजणी पुढील सात दिवसांमध्ये करण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लिगो इंडिया या प्रकल्पातून यापूर्वी गेलेल्या विविध नागरी सुविधांचे कार्यान्वयन करणाऱ्या यंत्रणांनी त्या सोयी-सुविधा प्रकल्पाच्या बाहेरील परिसरातून वळविण्यात याव्यात. तसेच या कामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम 2030 पर्यंत पूर्ण होऊन तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात संवेदनशील इंटरफेरोमीटरपैकी एक राहणार असून, तो खगोल भौतिकशास्त्रातील संशोधनाचे एक प्रमुख केंद्र असेल. भविष्यात या प्रयोगशाळेतून वैश्विक घटनांमुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.

 भारताचा अणुऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग युनायटेड स्टेट्समधील लिगो प्रयोगशाळेच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम सुरु आहे. जगभरातील लिगो वेधशाळांच्या जागतिक नेटवर्कमध्ये हे पाचवे राहणार आहे. हा प्रकल्प खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील भारताच्या क्षमता वाढवेल आणि तरुणांना या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रेरित करेल. त्यामुळे या प्रकल्पाची सर्व प्रकिया तात्काळ पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

***** 




जिल्ह्यात 13 हजार 288 मुलींना मोफत देणार कर्करोगावरील सुरक्षा लस



प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळणार एचपीव्ही लस

खासगी रुग्णालयात मोजावे लागतील 10 हजार रुपये

जिल्ह्यातील मुलींनी मोफत लस घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन 


हिंगोली, जिमाका (दि.6): दैनंदिन जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या निर्देशनुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षे पूर्ण झालेल्या पण 15 वा वाढदिवस साजरा न केलेल्या (जन्म तारीख 8 मार्च 2011 ते 7 मार्च 2012 या कालावधीत जन्मलेल्या) जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाणार आहे.  

  गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनमार्फत एचपीव्ही सुरक्षित लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, या लसीमुळे भविष्यात मुलींना गर्भाशय मुख कर्करोग होणार नाही. या मोहिमेचा जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 मुलींना थेट फायदा होणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेमध्ये आपल्या मुलींना ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने पालकांना केले आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा जीवघेणा आजार ठरत आहे. खासगी रुग्णालयांत या एका लसीसाठी जवळपास 10 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हीच लस आता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्येच आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विनामूल्य मिळणार आहे. ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका 99 टक्क्यांनी कमी होतो. 

गर्भाशय कर्करोग: वेळीच सावधनता बाळगावी


अस्वच्छता, असुरक्षित संबंध आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग वाढतोय. सध्या हा आजार महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा वयाच्या 14 ते 15 व्या वर्षी 'एचपीव्ही' लस घेणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील मुलींनाही या महागड्या लसीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पिढी आरोग्यदायी राहील. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या पालकांनी ही लसीकरण करून घ्यावे. ही लस एकदम सुरक्षित असून, जगात जवळपास 80 देशात ही लस किशोरवयीन मुलींना यशस्वी दिलेली आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. 

मोहीम यशस्वी राबवण्यासाठी सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखखाली प्रशिक्षित स्टाफमार्फत फक्त आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच दिली जाणार आहे.


 हे एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणासाठी पालकाची संमती अनिवार्य असून, ती यु-विन पोर्टलवर डिजिटल स्वरुपात किंवा इंटरनेट नसल्यास लेखी स्वरुपात घेतली जाईल. लसीकरणानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईने चिन्ह केले जाईल. 

मुलींनी उपाशीपोटी लस घेऊ नये; पालकांनी त्यांना नाश्ता देऊन लसीकरणासाठी पाठवावे, लसीकरणानंतर किमान 30 मिनिटे निरीक्षणाखाली थांबणे आवश्यक आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

- डॉ. सतिश रुणवाल, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी 

 *****

05 March, 2026

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, कहाकर (बु.), केंद्रा बु., गुगुळ पिंपरी, कडोळी, गोरेगाव, आखाडा बाळापूर, शेवाळा, येलकी, घोडा, येहळेगाव तु., सावना, बाभुळगाव, चिंचा, दांडेगाव, पारडी, पुसेगाव, खुडज, हत्ता आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 





आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धांचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून प्राप्त सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘अस्मिता महिला लीग’ आयोजनाबाबत मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका क्रीडा संकुल हिंगोली यांच्या सहकार्याने दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तालुका क्रीडा मैदान, हिंगोली येथे ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा सहभाग वाढविणे, स्थानिक स्तरावर क्रीडा चळवळ बळकट करणे तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. तसेच जिल्हा स्तरावर क्रीडा संरचना व तांत्रिक क्षमता विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत अॅथलेटिक्स प्रकारातील धावण्याच्या स्पर्धांचा समावेश असून १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा १३ वर्षाखालील, १३ ते १८ वर्षे व १८ वर्षांवरील मुली व महिलांसाठी खुल्या राहतील.

नोंदणीच्या वेळी खेळाडूंच्या वयाची पडताळणी आधार कार्ड (प्राधान्याने), राज्य किंवा केंद्र शासनाने दिलेला जन्मतारीख नमूद असलेला पुरावा, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच नोंदणीदरम्यान खेळाडूंचे वय, वजन व उंची नोंदविणे आवश्यक राहील.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक मुली व महिला खेळाडूंनी दि. ७ मार्च २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह https://account.kheloindia.gov.in/#/login या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी मेरा युवा भारत केंद्र, नाईक नगर, हिंगोली येथे प्रविण पांडे (मो. ७०२८३६९०७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेस मंत्रीमंडळाची मान्यता


* लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार 



• दि. १ एप्रिलपासून वर्षभर राबविणार अभियान  

हिंगोली: जिमाका, (दि. ५ ): राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या महत्वाकांक्षी “माझं  गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात लोकसहभागावर आधारित “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ  राबविण्यास १ एप्रिल पासून ३१ मार्चपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद येथील व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन अभियानाची दिशा ठरविण्यात आली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गट विकास अधिकारी माया वानखडे, अनिल मुंढे, प्रफुल्ल तोटेवाड, सुरेश कांबळे, कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी व तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

गाव पातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, प्रतिबंधात्मक व  प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल, व आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असून,  सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव बनवणे हा या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले 

या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणे, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, जीवनशैलीजन्य आजारांचे नियंत्रण आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापना केल्या जाणार आहेत. आरोग्यमंत्री श्री. आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती असून, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, आयुक्त व संचालक या समितीचे सदस्य असतील. राज्यस्तरीय कृती समितीही स्थापन करण्यात येणार असून,  सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव (अपर मुख्य सचिव) समितीचे अध्यक्ष असतील. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. एकूण गुणांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव”  म्हणून घोषित करण्यात येईल. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे. 

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ही योजना म्हणजे केवळ आरोग्य विभागाची नव्हे, तर समाजाच्या सर्व घटकांच्या सहभागातून उभी राहणारी लोकचळवळ ठरणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, आरोग्यदायी  महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.

*********