20 February, 2026

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 26 फेब्रुवारीला तांत्रिक उद्योजकता परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन



हिंगोली (जिमाका), दि.20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक, युवती व महिलांसाठी संगणक आधारित डीटीपी एक महिन्याच्या कालावधीचा मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 27 फेब्रुवारी  ते 27 मार्च 2026 या कालावधीत हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या 30 दिवशीय प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता एक दिवशीय उद्योजकता विकास परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेनबो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, आदर्श कॉलेजजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, हिलटॉप कॉलनी, हिंगोली येथे करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल्स अँड ऑपरेटिंग सिस्टीम, अडोबी फोटोशॉपची ओळख, ग्राफिक डिझाईन मूलतत्त्वे, बॅनर व फ्लेक्स डिझाईन, लोगो डिझाईन, ब्रँडिंग संकल्पना, व्हिजिटिंग कार्ड, पॅम्प्लेट/फ्लायर डिझाईन आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी प्रक्रिया, उद्योग निवड, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, निधी उभारणी, आवश्यक परवाने इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्रता किमान इयत्ता 10 वी उत्तीर्ण असून उमेदवार हिंगोली जिल्ह्याचा रहिवासी असावा. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी जातीचा दाखला, रहिवासी  प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, पॅन कार्डच्या दोन प्रती व दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी  कार्यालय, हिंगोली येथे कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी  सुदाम थोटे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे  व प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले (मो. 9168667133) यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  कार्यक्रम आयोजक  किसन धाबे (मो. 9370631461) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

*******

हिंगोली येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

  

  • ग्रंथोत्सवात कविता सादर करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी नाव नोंदणी करावी
  • ग्रंथविक्री स्टॉलसाठी 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी

 

 

हिंगोली(जिमाका), दि. 20 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय तसेच जिल्हा येथील ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली  येथे दिनांक 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री हा या ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते व ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांच्या सहभागातून परिसंवाद, काव्यवाचन, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी व साहित्यिक चळवळीला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

या ग्रंथोत्सवात सन 2025-26 मध्ये राज्य शासन किंवा विविध नामांकित संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. संबंधित साहित्यिकांनी आपली नावे व तपशील कार्यालयात नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी  कवी  संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविता सादर करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी आपल्या नावाची नोंदणी कार्यालयात करावी. वेळेच्या मर्यादेनुसार सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

तसेच ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रंथविक्रेते व प्रकाशक यांनी स्टॉल लावण्याबाबत आपली नावे व तपशील कै. रं. रा. बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विराज प्लॉट क्र. 45, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली-431513 संपर्क क्रमांक : 9822657625 या ठिकाणी संपर्क साधून दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समिती 2025 मार्फत करण्यात आले आहे.

 

*******

 

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  उपसंपादक चंद्रकांत कारभारी,  लिपिक मनोहर भारती, गंगा देशमुख उपस्थित होते.

******

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


                                   

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, कुसुम भिसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*****

19 February, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी




        हिंगोली (जिमाका), दि. 19 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

            यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक एस. व्ही.जारे, सुनिल मरळे, श्रीमती मनकरना जाधव यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

********

17 February, 2026

 ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन

* प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

नवी मुंबई,दि.17(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

     बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल सादर केला.

     या बैठकीस विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप, सहआयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ उपस्थित होते.

     यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली.

      कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गयोजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

     आरोग्य सेवांच्या दृष्टीने ग्रामीण भागात आतापर्यंत २ हजार १५९ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमस्थळी ५ तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

     या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात ८० हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. लंगर व्यवस्थेसाठी सुमारे अडीच लाख भाविकांचा विचार करण्यात आला असून, १२ हजार ५०० भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील ५ दिवसांत ते पूर्ण होणार आहे.तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाशयोजना यांसाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.       

      कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी हा महत्वाचा भाग असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील शासकीय व खासगी शाळांमध्ये आतापर्यंत राबविण्यात आलेल्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रभातफेऱ्या, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम अशा विविध कार्यक्रमांचा अहवाल सादर केला.     

     कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांच्या ग्रामीण भागातील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला असून, ४ हजार ३८१ फोटो आणि २ हजार १२५ व्हिडिओ हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या https://gurutegbahadurshahidi.com या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.      

    नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सुमारे १७ लाख विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी मुंबई शहर, उपनगर आणि कोकण विभागातील सर्व चित्रपटगृहांमध्ये सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले विशेष गीत प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर "हिंद दी चादर" कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत.  

      देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी कोपरा या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्यात येत आहे. एसटी, बसेससाठी निश्चित केलेल्या वाहततळापासून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने तातुरत्या स्वरुपातील पायवाट तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. जेएनपीए परिसरात दररोज सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.

      कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी १ हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४० ते ५० लाख पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे.

     या बैठकीस अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, इतर महसूल विभागातील इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

0000000






 ‘भारत विस्तार’ डिजिटल प्रणालीचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण



हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे ‘भारत विस्तार’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल ॲपच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाले.  

जयपूर (राजस्थान) येथून आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘भारत विस्तार’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले. 

या ॲपच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, हवामान अंदाज, पीक संरक्षण, मृदा व्यवस्थापन तसेच बाजारभाव यांसारखी अद्ययावत माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शेळके यांनी भारत विस्तार ॲपमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन सुलभ होणार असून, ही कृषी क्षेत्रातील डिजिटल क्रांती ठरेल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. 

यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी पदवीधर तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे ॲपच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विषय विशेषज्ञ राजेश भालेराव (कृषी विद्या), अनिल ओळंबे (उद्यानविद्या), अजयकुमार सुगावे (पीक संरक्षण), रोहिणी शिंदे (गृह विज्ञान), डॉ. अतुल मुराई (कृषी विस्तार), साईनाथ खरात (मृदा विज्ञान), डॉ. कैलास गीते (पशु विज्ञान) तसेच विजय ठाकरे यांनी परिश्रम घेतले. तसेच मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारोती कदम, संतोष हानवते व प्रेमदास जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

******