14 March, 2026

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये ५ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपयांची १३१ प्रकरणे निकाली




हिंगोली (जिमाका), दि. १४ : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय परभणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील न्यायालयात दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर आर. घुगे, सचिव अॅड. मिलींद कांबळे तसेच जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या लोकन्यायालयात प्रलंबित असलेली ५०१ प्रकरणे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व ३ हजार ६२७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित १२८ प्रकरणे व दाखलपूर्व ३ प्रकरणे अशी एकूण १३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडीच्या आधारे एकूण ५ कोटी ५८ लाख ९१ हजार ६५३ रुपये इतक्या रकमेवर समझोता करण्यात येऊन संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधीज्ञ यांचा समावेश असलेली एकूण सहा पॅनल गठीत करण्यात आली होती.

या पॅनलचे प्रमुख म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एस. एन. माने-गाडेकर (जिल्हा न्यायाधीश-१), आर. एस. रोटे (तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२), पी. जी. महाळंकर (२रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), श्रीमती पी. आर. पमनानी (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), श्रीमती डी. व्ही. भंडारी (२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) व श्रीमती एस. एस. पळसुळे (तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) यांनी कामकाज पाहिले.


*अपघातातील मृत्यू प्रकरणात ५७ लाखांची नुकसानभरपाई*


या लोकन्यायालयात एक वर्षापूर्वी झालेल्या अपघातात समरजितसिंग रघुवंशी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नी आरती रघुवंशी यांनी नुकसानभरपाईसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरण तडजोडीने निकाली निघून लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून त्यांना ५७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला. हे प्रकरण आर. एस. रोटे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ यांच्या पॅनलवर निकाली काढण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी पुढील दि. ९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.

*******

जल महोत्सव अभियानांतर्गत आडगाव मुटकुळे येथे ‘जल अर्पण दिन’ उत्साहात


• जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

 



हिंगोली, दि. १४ (जिमाका) : जल महोत्सव अभियानांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अध्यक्ष राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे ‘जल अर्पण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी उप विभागीय अधिकारी योगेशकुमार मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) समृद्धी दिवाने, कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे, गटविकास अधिकारी माया वानखेडे, उपअभियंता श्री. शिंदे, शाखा अभियंता जाधव, नितीन रायबोले, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, ग्रामपंचायत अधिकारी आर. बी. हेलगंड उपस्थित होते.

 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद हिंगोली व पंचायत समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे ग्रामस्थांना हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने झाली. भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कलश घेऊन प्रभातफेरीद्वारे गावातील प्रमुख मार्गांवरून पाण्याच्या टाकीपर्यंत जलदिंडी काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीस्थळी जलदेवतेच्या कलशाचे पूजन करून जल अर्पण करण्यात आले.

यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे शाश्वत, स्वच्छ व दर्जेदार पाणी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा उद्देश साध्य झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. तसेच ‘जल तारा’ योजनेअंतर्गत पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी पाणी पुनर्भरणाच्या उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जलजीवन मिशनचा उद्देश गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे दरडोई ५५ लिटर स्वच्छ व दर्जेदार पाणी पुरवठा करणे हा असून तो साध्य झाल्याचे सांगितले. तसेच आता या योजनेची देखभाल, दुरुस्ती व पाणी गुणवत्तेची जबाबदारी ग्रामस्थांची असून ही योजना ग्रामस्थांच्या मालकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शाळा व स्मशानभूमीच्या प्रश्नांबाबतही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) समृद्धी दिवाने यांनी केले. कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे यांनी नळ पाणीपुरवठा योजनेबाबत तांत्रिक माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनीर पठाण व महेश थोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र सरकटे यांनी मानले. यावेळी आशा वर्कर, बचत गटाच्या महिला, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

*****

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आध्यात्मिक मानवंदना


 “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” कार्यक्रम हिंगोली येथे आयोजन 



   हिंगोली, दि. १७ मार्च – महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील तेजस्वी संत व्यक्तिमत्त्व असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता शिवाजी देशमुख सभागृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

   संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी, भावार्थदीपिका यांसारख्या ग्रंथांद्वारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मांडले. समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजमनात प्रबोधनाची ज्योत पेटवली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनावर स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम त्यांच्या विचारसंपदेचा आणि संतपरंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे.

   या कार्यक्रमात “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या संकल्पनेवर आधारित विशेष सादरीकरण होणार असून प्रख्यात व्याख्याते व स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार श्री. गणेश शिंदे यांचे संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मदर्शनावर आणि त्यांच्या विचारांच्या सामाजिक परिणामांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानयोग, भक्तियोग आणि समाजप्रबोधन या संत परंपरेतील महत्त्वपूर्ण मूल्यांचा उलगडा होणार आहे.

   सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. संतपरंपरेचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजात आध्यात्मिक जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

   हिंगोली व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्याचे अभ्यासक तसेच भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समृद्ध अध्यात्मपरंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

******

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून गॅस एजन्सींची पाहणी; घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश



हिंगोली, दि.१४ (जिमाका): जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या साठ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शनिवार, (दि.१४) रोजी बावनखोली येथील साई गॅस एंटरप्राइजेस तसेच लिंबाळा येथील हिंगोली गॅस एजन्सीच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी गुप्ता यांनी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्ध साठ्याबाबत माहिती घेतली. तसेच रिकामे व भरलेले (रिफिल) गॅस सिलेंडर यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि पुरवठ्याची सद्यस्थिती याचा सविस्तर आढावा घेतला.

दोन्ही गॅस एजन्सींना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नागरिकांना सुरळीत व नियमितपणे करण्यात यावा, तसेच शासनाच्या नियमांनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा रुग्णालये, वसतिगृहे व इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.

*****

जिल्ह्यातील पुरवठा कंपन्यांकडील उपलब्ध गँस साठ्याचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा




• हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

• गँस बुकींग प्रक्रियेची दिली माहिती

हिंगोली, दि. १४ (जिमाका): आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरेसा साठा उपलब्धतेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार (दि.१४) रोजी बैठक पार पडली. 

या बैठकीला उपविभागीय अधिकारी योगेश मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, निरीक्षण अधिकारी, पोलीस विभाग, सर्व तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.



बैठकीत जिल्ह्यातील सर्व एजन्सीकडील उपलब्ध गॅस साठा व आवश्यक साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त हिंगोली जिल्ह्यातील एजन्सीकडील दैनंदिन आवश्यक व उपलब्ध साठ्याची नियमित माहिती घेऊन एजन्सींना वेळेत पुरेसा गॅस साठा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच एजन्सींची तपासणी करून तांत्रिक समस्या असल्यास त्यांचे तात्काळ निराकरण करण्याबाबतही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.

यावेळी गॅस एजन्सींना कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, तसेच ग्राहकांकडे रिकामा सिलेंडर नसताना भरलेले (रिफिल) सिलेंडर देऊ नयेत, अशी सक्त ताकीद देण्यात आली. अशा प्रकारची बाब आढळून आल्यास संबंधितांवर प्रशासनाकडून दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

 सध्या हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे घाबरून जाऊन अतिरिक्त गॅस सिलेंडर बुकिंग किंवा साठा करण्याची गरज नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

सर्व ग्राहकांनी केवायसी (KYC) करणे आवश्यक असून त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित गॅस एजन्सीला भेट द्यावी. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी इंडेन, भारत, एचपी या गँस कंपन्याचे आयव्हीआर बुकींग क्रमांक जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये 

718955555

7715012345

8888823456

मिस कॉल

8454955555

7718012345

9493602222

व्हॉट्सॲप

7588888824

1800224344

9222201122

मोबाईल अँप

इंडियन ऑईल वन, हँलो बीपीसीएल, एचपी गँस अँपचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातील चौकशी किंवा तक्रारींसाठी नागरिकांनी ९४०३५५९४९४ / ८५४५०८८५४५ / ०२४५६-२२१७०१ / ९४०४६५८५४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.  तसेच नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

******

13 March, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आरोग्य विभागाचा आढावा

 कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न

वैद्यकीय अधिका-यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश



​हिंगोली (जिमाका), दि.13 : जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिका-यांनी मुख्यालयी उपस्थित राहून रुग्णांना गुणात्मक सेवा देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हा परिषद सभागृहात आज आयोजित कार्यकारी मंडळाच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 

​ क्षयरोग (टीबी) नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. 'टीबी मुक्त अभियान' यशस्वी करण्यासाठी थुंकी तपासणी आणि एक्स-रे तपासणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

​साथरोग नियंत्रणासाठी पाणी शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, ज्या गावांमध्ये टीसीएल पावडर उपलब्ध नाही, तिथे ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. नियमित पाणी शुद्धीकरण करून साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान जिल्ह्यात 1 एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे. तेव्हा आतापासून नियोजन करून सर्व विभागाशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करावे. निकष पूर्ण करून पुरस्कार मिळवावेत. ग्रामपंचायत यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 5 कोटी रुपये, द्वितीय 3 कोटी रुपये, तृतीय 2 कोटी रुपये आणि जिल्हास्तर प्रथम 25 लाख रुपये द्वितीय 20 लाख रुपये तृतीय 15 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 25 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 5 लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 50 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 10 लाख रुपये ग्रामीण रुग्णालय राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 75 लाख रुपये असे असणार आहे.

​प्रमुख योजनांचा आढावा

​बैठकीत खालील विषयांवर सविस्तर चर्चा आणि सूचना देण्यात आल्या. 

​एनसीडी पोर्टल: असंसर्गिक रोगांच्या स्क्रीनिंगचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे.

​आयुष्यमान भारत: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि 'वय वंदना' कार्डांचे वाटप गतीने पूर्ण करणे.

​माता-बाल संगोपन: माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी.

​कुष्ठरोग व मानसिक आरोग्य: या कार्यक्रमांतर्गत रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे.


​या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, डॉ. विशाल पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी  उपस्थित होते.

 वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कार्यक्रम समन्वयक आणि कर्मचारी उपस्थित होते.

​बैठकीच्या शेवटी,  कामामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट बजावले.

*****

गॅस सिलेंडर तुटवड्याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


 

* जिल्ह्यात पुरेसा गँस सिलिंडर साठा

* प्रशासनाकडून चौकशी/तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जारी

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करतानाच जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातील चौकशी किंवा तक्रारींसाठी ९४०३५५९४९४, ८५४५०८८५४५, ०२४५६-२२१७०१, ९४०४६५८५४६ हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गॅसचा पुरवठा नियमित व सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सध्या प्राधान्याने वैद्यकीय क्षेत्र तसेच शैक्षणिक संस्थांच्या खानावळींसाठी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिक खानावळी, कॅफे, खाद्यपदार्थ विक्री करणारे हातगाडे आदी ठिकाणी तपासणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी तसेच गॅस कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना प्रशासनाकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून सर्व एजन्सीमार्फत नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस सिलेंडरची अनावश्यक अतिरिक्त बुकिंग किंवा साठा करू नये. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

*****