.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
27 June, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ : बळीराजाला आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय
26 June, 2026
खरीप हंगामासाठी युरिया ४९० तर ३७८ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा वितरित करण्यास मंजुरी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार तालुकानिहाय वितरण
हिंगोली, (जिमाका) दि. २६ : खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यातील संरक्षित (बफर) साठ्यातील एकूण ८६८ मेट्रीक टन डीएपी व युरिया खताच्या वितरणास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी एकूण १९५० मेट्रीक टन युरिया व ५४० मेट्रिक टन डीएपीपैकी युरिया ४९० मेट्रिक टन व ३७८ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा वितरित करण्यास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज मंजुरी दिली.
कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हास्तरीय संरक्षित साठा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या., नांदेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून संरक्षित ठेवण्यात आलेल्या डीएपी खताच्या ३७८ मेट्रीक टन साठ्याच्या वितरणास मंजुरी देण्यात आली असून, तालुकानिहाय मेट्रीक टन परिमाणात वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली ७६, कळमनुरी ७६, वसमत ७६, औंढा नागनाथ ७५, सेनगाव ७५ असा एकूण ३७८ मेट्रीक टन डीएपी तसेच युरिया खताच्या एकूण ४९० मेट्रीक टन संरक्षित साठ्याच्या वितरणासही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत २५० मेट्रीक टन व महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळामार्फत २४० मेट्रीक टन युरिया खत तालुकानिहाय वितरित करण्यात येणार आहे. तालुकानिहाय युरिया हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, आणि सेनगाव अशा सर्वच तालुक्यात प्रत्येकी ९८ मेट्रिक टन मिळाला आहे.
सर्व तालुक्यांमध्ये कोणत्याही विक्रेत्याकडे खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच इतर निविष्ठा केंद्रांवरही खत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
खत विक्री करताना कृषि अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषि अधिकारी कार्यालय अथवा पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आधारकार्डच्या आधारे ई-पॉस मशीनद्वारे शेतकऱ्यांना खत वितरित करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही संबंधित कृषि कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नोडल संस्थांना तालुकानिहाय मंजूर केलेल्या वाटपामध्ये कोणताही बदल न करता निर्धारित प्रमाणात खताचे वितरण करून त्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*******
स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागेश्वर विकास आराखडा तयार करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ
•पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
हिंगोली, (जिमाका) दि. २६ : जिल्ह्यातील ८ वे ज्योर्तिलिंग असलेल्या दारुकावने श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिराचा १८२.८३ कोटी रुपयांचा बृहद विकास आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच येथील जुणे जाणकार यांच्याशी चर्चा करून त्यानुसार विकासकामे हाती घेण्याच्या सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना केल्या.
औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग दर्जाची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरु असून, येथील राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व विभागामार्फत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, त्याचा पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, विभागीय सहआयुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्याचे उत्तम नियोजन केले असून, यानुसार कामे झाल्यास मंदिर परिसराचा कायापालट होईल, असे सांगत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विशेष कौतुक केले. येथील विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना, तसेच येथील जुने जाणकारांना विश्वासात घेऊन कामे करावीत, अशाही सूचना दिल्या.
यावेळी खासदार रामराव वडकुते यांनी मंदिर परिसराचा विकासकामे करताना येथे देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे नागेश्वराच्या भक्तांना दर्शन व्हावे. त्यासाठी दर्शनरांगेत भक्त असताना बाजूच्या भिंती अथवा दर्शनी भागात ते दिसतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी १८२.८३ कोटी रुपयांतून तयार होणा-या औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्यातील नियोजनानुसार माहिती देताना येथील संकल्पचित्रानुसार विकासकामे होतील, असे सांगितले. प्रस्तावित संकल्पचित्रानुसार आतापर्यंत उच्चाधिकार समितीकडे तीन आढावा बैठका झाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील सर्व विकास कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून दारुकावने येथील पौराणिक महत्त्व त्यांनी विशद केले.
येथे येणा-या भक्तांसाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असणारी दर्शनरांग, भक्त निवास, वाहनतळ, व्हीआयपी भक्त निवासाचे बांधकाम करण्यात येणार असून, मंदिर परिसरातील अतिक्रमित दुकाने हटविली आहेत. तसेच येथे नवीन ५६ दुकाने नव्याने बांधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
श्रावण महिन्यात भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तात्काळ किंवा कमीत कमी वेळात दर्शन करून देण्याबाबतची योजनाही त्यांनी सांगितली. मंदिर परिसरात यापुढे पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे सांगून, भक्तांना रांगेतूनच मंदिराच्या शिखराचे दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सादरीकरणातून सांगितले.
मंदिरातील कचरा व्यवस्थापन, घाण साचणार नाही, तसेच मंदिराच्या गाभा-यात खेळती हवा राहील, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच रुद्राभिषेक व तिकीट काउंटरची व्यवस्था आणि तब्बल ५ हजार भक्त दर्शनरांगेत बसू शकतील, त्यांची प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
*भक्तांना येणार 'दारुकावने'चा फील*
मंदिर परिसरात भक्तांनी दर्शन केल्यानंतर मूळ दारुकावनेत विसावलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात त्यांना दारुकावनेत असल्याचा फिल येईल, असा स्थानिक जातीच्या वृक्षराजीने मंदिर परिसर विकसित करण्यात येईल. तसेच चालुक्य कालीन दरवाजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी नागेश्वर मंदिरात संरक्षणास्तव ठेवलेले स्तंभही येथे संरक्षित करण्यात येणार आहेत. भक्तांच्या संरक्षणार्थ दोन पोलीस चौकी, चप्पल स्टँड, प्रतिक्षालय, दर्शन मंडप, विशेष पूजा, अभिषेक आणि दर्शनरांगेत असताना भाविकांना पूर्णवेळ नागेश्वराचे मुखदर्शन होईल, असे नियोजित आहे. येथे मूर्तिसंग्रहालयही विकसित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
तसेच मूळ मंदिराभोवती इतर जवळपास १९ मंदिरे असून, ती विकसित करण्यात येतील. हरिहर कुंडालाही पुनर्जीवित व मंदिर संवर्धित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
*****
सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रभात फेरी; महापुरुषांना अभिवादन
हिंगोली(जिमाका), दि. २६ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून आज हिंगोली येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथील सुमारे २०० ते २५० विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
या प्रभात फेरीस समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय केंद्रे, पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस निरीक्षक संदीप मोघे, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, विशेष अधिकारी अमोल घुगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी बबन मोरे, गृहपाल सुलोचना ढोणे, धनश्री अवचार, विजयकुमार सोनटक्के, आरती वांझोळकर, प्रशांतकुमार बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रभात फेरीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, महाराज अग्रसेन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना तसेच संविधान कॉर्नर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नशामुक्ती अभियान व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणविषयक विचारांवर आधारित घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
प्रभात फेरीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे झाला. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व कर्मचारी यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
********





