'दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. प्रशासन, विकास आणि लोकसहभाग यांचा समतोल साधत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी आणि नियोजनावर या मुलाखतीत सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.
'दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, दि. २ आणि शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ऐकण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. निवेदक संजय पाटोळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मुलाखतीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची सकारात्मक व दूरदृष्टी मांडली. विविध शासकीय योजनांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्ह्यात महसूल अभियान, आरोग्यविषयक मोहिमा, सिंचन प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या कामांद्वारे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय पर्यटन विकास, शेती क्षेत्रातील नव्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती तसेच महिला स्वयंरोजगारासाठी स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
000




