29 June, 2026

विशेष लेख : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : शेतकऱ्यांना दिलासा देणारी ऐतिहासिक योजना




राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना" जाहीर केली आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, जवळपास ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या योजनेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभागाने व्यापक नियोजन केले असून राज्यातील सर्व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ थेट पोहोचविण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा तपशील संकलित करून विशेष पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.


योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक बँकेने मुख्यालय स्तरावर योजना समन्वयक आणि माहिती तंत्रज्ञान समन्वयक अशा दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय समितीशी समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.


कर्जखात्यांचे आधार क्रमांक उपलब्ध असलेली आणि आधार क्रमांक उपलब्ध नसलेली अशी दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही, त्यांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करून विशेष आधार-जोडणी मोहीम राबविण्यात येत आहे. आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या नमुन्यानुसार विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.


दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली आणि दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली वैयक्तिक तसेच संयुक्त अल्पमुदतीची पीककर्ज खाती या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. संयुक्त कर्जखात्यांमध्ये सर्व कर्जदारांचे आधार क्रमांक, आधार-जोडलेली बचत खाती आणि प्रत्येकाचा कर्जातील हिस्सा नमूद करणे आवश्यक राहील. मयत कर्जदारांच्या प्रकरणांमध्ये वारसांची नोंद करून त्यानुसार लाभ वितरित केला जाणार आहे.


माहितीची संगणकीय पडताळणी झाल्यानंतर गावनिहाय लाभार्थी यादी तयार करून ती ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा संबंधित बँक शाखेत उपस्थित राहण्याबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना यादीतील माहितीबाबत हरकत असल्यास ती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे सादर करता येणार असून समितीच्या निर्णयानुसार आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील.


आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर व्यापारी बँकांच्या लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ४८ तासांच्या आत संबंधित नोंदी अद्ययावत करून पोर्टलवर माहिती नोंदविणे बंधनकारक राहील. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीककर्जाची माफी करण्यात येणार असून थकीत, पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा किंचित अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर शासन त्यांच्या कर्जखात्यात दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करणार आहे.


नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली असून यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र करण्यात आले आहे.


एकवेळ समजोता योजना (वन टाईम सेटलमेंट) अंतर्गतही शासनाने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. व्यापारी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून उर्वरित रक्कम भरण्यासाठी दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.


अॅग्रीस्टॅकमध्ये नाव नसल्यामुळे कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही. अशा शेतकऱ्यांची प्रथम नोंदणी करून त्यानंतर लाभ देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार विशेष नोंदणी मोहीमही राबविण्यात येईल.


शासनाचा प्रयत्न लवकरात लवकर पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा असून त्यामुळे खरीप हंगामासाठी नव्याने पीककर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शेतीला नवसंजीवनी देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.


- चंद्रकांत कारभारी, उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


*******

रोजगार हमी योजनेतील कामांचा अहवाल तात्काळ सादर करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, सर्व गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी, गोठे तसेच इतर विविध वैयक्तिक व सार्वजनिक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुमारे ३० टक्के पूर्ण झालेली कामे, पंचनामे पूर्ण झालेली कामे तसेच पूर्णत्वास गेलेल्या कामांच्या सद्यस्थितीची तपासणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पूर्ण झालेल्या प्रत्येक कामाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र, स्थळपाहणी अहवाल आणि संबंधित यंत्रणेचे प्रमाणित मूल्यांकन तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र फाईल तयार करून आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, तसेच पंचनामे पूर्ण झालेल्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन ती प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत की नाही, याची खातरजमा करावी, असेही त्यांनी सांगितले.

पूर्ण झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, तपासणीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिला.

******

एकल महिला धोरण अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सूचना व अभिप्राय नोंदवा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


* व्हॉट्सअॅप क्रमांक 8208589195 वर नोंदवा अभिप्राय


 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावे, यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय, सूचना व प्रस्ताव लवकरात लवकर व्हॉट्सअॅप क्रमांक 8208589195 वर नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. दरपलवार तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित घटक उपस्थित होते.

राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र व परिणामकारक धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री व राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मसुदा समिती गठित करण्यात आली असून, राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांच्या आधारे अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती आणि संबंधित विभागांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. हिंगोली येथे आयोजित कार्यशाळेतही उपस्थितांकडून विविध विषयांवर अभिप्राय नोंदवून घेण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार एकल महिलांची संख्या 31 हजार 613 इतकी आहे. या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. याशिवाय, एकल महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या सर्व योजनांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करावे तसेच या उपक्रमात महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. एकल महिलांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संबंधित विभागांनी अधिक प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेदरम्यान विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकल महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी आणि गरजा याविषयी मते मांडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्यावरील उपाययोजना, नवीन योजना आणि धोरणात्मक सूचना देखील पाठविण्याचे आवाहन केले. नागरिकांकडून प्राप्त होणारे अभिप्राय एकल महिला धोरण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकल महिला धोरणासाठी नागरिकांनी आपले अभिप्राय व सूचना तात्काळवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

******

पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव पद्मभूषण पुरस्कारांद्वारे केला जातो. प्रजासत्ताक दिन 2027 निमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले असून, हिंगोली जिल्ह्यातील पात्र व्यक्तींची नामांकने सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

पद्म पुरस्कारांचा उद्देश विविध क्षेत्रांमध्ये विशेष व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेणे हा आहे. कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा, व्यापार व उद्योग यांसह विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानालाही या पुरस्कारांद्वारे विशेष गौरविण्यात येते.

पद्म पुरस्कार 2027 साठी इच्छुक अथवा पात्र व्यक्तींची नामांकने विहित नमुन्यात भरून दि. 31 जुलै 2026 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल http://awards.gov.in वर ऑनलाइन सादर करावीत. नामांकन प्रक्रिया व अधिक माहितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर 1 जुलैपासून कारवाई

 


 

·         30 जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना दिलासा

·         नागरिकांनी तातडीने एचएसआरपी बसविण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. दि. 1 जुलै 2026 पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, दि. 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या दि. 18 मे 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय, एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनधारकांच्या वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे आदी कामांवर यापूर्वीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, यापुढे एचएसआरपी नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळता) करण्यात येणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी तात्काळ आपल्या वाहनांना एचएसआरपी बसवून घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

28 June, 2026

आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते लासिना येथे पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन






हिंगोली, दि. २८  जून : राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा संचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण (मुंबई) यांचे आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील लासिना येथील अंगणवाडी शाळेत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्त संजय काटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

यावेळी आरोग्य सेवा पुणे येथील उपसंचालिका डॉ. बबिता कमलाकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सरपंच वनमाला काळे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास शिंदे तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शेतातील महत्त्वाचे काम सोडून आज सर्वजण आपल्या बालकांना  पोलिओचा डोस पाजण्यासाठी बूथवर घेऊन आले हे पाहून मला खरोखर आनंद झाला असल्याचे सांगून ते म्हणाले की, बालकाच्या आरोग्याची काळजी प्रत्येक कुटुंब घेत असते या काळजी मध्ये प्रशासन सुद्धा सहभागी आहे.

 या मोहिमेकडे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे याची प्रतिमात्मक घटना म्हणून बघण्यास हरकत नाही.

या जिल्ह्यामध्ये सर्वजण आरोग्याचे नेतृत्व चांगले करत आहे. आपण ज्या ताकतीने पायाभूत एक सामाजिक बांधिलकी, नेतृत्व, एक संस्कार म्हणून  जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात नेतृत्व देत आहात ते निश्चित प्रशांसनीय आहे, मला खात्री आहे.  या जिल्ह्यासाठी पालक आणि आरोग्य विभाग चांगले योगदान देऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा उल्लेखनीय कार्य करीत आहे, याची आरोग्य प्रशासनाला जाणीव असल्याचे आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केले. हिंगोली जिल्ह्यात नवजात बालकांच्या आरोग्यासाठी चांगले काम होत आहे.  जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळाले. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन यावेळी पालकांना केले.

******

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार


महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर... एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता कोलमडून गेला आहे. कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ते म्हणजेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’.ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक  संकटात  सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे.


महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात

राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.


योजनेचे त्रिसूत्र कर्जमुक्ती एकवेळा समजोता आणि प्रोत्साहनपर लाभ


या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही तर, विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन घटकांचा समावेश आहे:

यात २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती: जे शेतकरी थकबाकीदार आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे. यापूर्वीच्या 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे.


एकवेळ समझोता योजना (OTS): ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) म्हणजेच एकवेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी 

आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर, राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात  जमा करणार आहे. 

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन: अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये, म्हणून शासनाने त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.


डिजिटल तंत्रज्ञान आणि पारदर्शकता


 कर्जमुक्तीयोजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने 

'महाआयटी'च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि  आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे.

सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन: 

 आधार प्रमाणिकर अनिवार्य


शेकऱ्यांनीयोजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे.पात्र शेकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह 'आपले सरकार सेवा केंद्रात' किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली, की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल.आणि  एकवेळ समझोता (OTS) योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा  हिश्शाची रक्कम  भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ  शेकऱ्यांच्या  कर्जखात्यात जमा होईल.यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.


तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा


योजनेच्या पारदर्शकतेवर शासनाने विशेष भर दिला आहे. कर्जखात्याच्या माहितीत किंवा बँक तपशीलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना  दाद मागता यावी, म्हणून  सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. तसेच या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समितीसुद्धा  नियुक्त करण्यात आली आहे.


प्रशासकीय समन्वय


सहकार विभाग, जिल्हाधिकारी, बँका, महाआयटी, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासन या सर्व घटकांमध्ये राज्य शासनाने अचूक समन्वय साधला आहे. विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान झाली आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा 'कर्जमुक्त' होऊन 'कर्जपात्र' होणार आहेत. त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू कर्जमुक्तीचा  लाभ राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी गती, नवी ऊर्जा आणि बळिराजाला सन्मानाने जगण्याचा नवा विश्वास देणारा ठरणार आहे.


काशीबाई थोरात-धायगुडे

(वरिष्ठ सहायक संचालक )

****