17 June, 2026

महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य अनिल माचेवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 ******

‘एल निनो’च्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे

  

·         पोषक चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती व चारा साठवणुकीचे आवाहन; पशुवैद्यकीय सेवांसाठी 1962 हेल्पलाईन उपलब्ध

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

‘एल निनो’मुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पशुपालकांनी पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करावी. गाई-म्हशींचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी अशा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे, ज्यातून मुख्य पीक उत्पादनाबरोबरच दर्जेदार चाऱ्याचीही उपलब्धता होईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील किंवा पडीक जमिनीवरील नैसर्गिक गवताचे संवर्धन करून त्याचा योग्य वापर करावा. पावसाची कमतरता किंवा चारा टंचाईच्या काळात हेच गवत जनावरांसाठी महत्त्वाचे खाद्यस्रोत ठरू शकते. त्यामुळे उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्पादित अतिरिक्त चारा ‘मुरघास’ (सायलेज) किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. खरीप व रब्बी हंगामातील चारा पिकांचे सायलेज तंत्रज्ञानाद्वारे जतन केल्यास फेब्रुवारी ते जून २०२७ या संभाव्य टंचाईच्या कालावधीत जनावरांच्या खाद्याची गरज भागविणे शक्य होणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांबाबत पशुपालक व शेतकरी बांधवांना विविध माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येत असून, पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी विभाग सज्ज असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

पशुपालकांनी कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा अडचणींसाठी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक माहिती तसेच पशुवैद्यकीय सेवा प्राप्त कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याची प्रभावी साठवणूक यामुळे पशुधनाचे पोषण आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

******

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 18 जून रोजी मतदान; मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत

 


 

 

हिंगोली, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.

मतदानासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व  शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 128 मतदार मतदान करणार आहेत.

तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 59 मतदार मतदान करतील.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 73 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 74 मतदार मतदान करतील.

तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 58 मतदार आहेत.

तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे 23 मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 51 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सदर निवडणुकीमध्ये एकूण 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी  253 स्त्री मतदार तर 213 पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य,  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती,  शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.

दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. 22 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे.

*****

जिल्ह्यात 'नशामुक्त सप्ताहा'स आजपासून सुरुवात * व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती अभियान

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 17 ते 26 जून या कालावधीत ‘नशा मुक्त अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित नशा मुक्त सप्ताहास आज प्रारंभ झाला.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली  आणि स्व. कलावतीबाई देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, विशेष अधिकारी अमोल घुगे, जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर व आनंद साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाज कल्याण विभागामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुलदीप केळकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर ठोंबरे यांनी व्यसनमुक्तीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तसेच उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजयानंद पकाने, माधव सोनुले, चेतन कामखेडे, चंद्रमुनी नरवाडे, राहुल कांबळे, सुनील अंभोरे, श्रीमती जयश्री शिंदे तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हिंगोली  जिल्ह्यात नशा मुक्त सप्ताहाच्या निमित्ताने विविध जनजागृती उपक्रम, शपथविधी, मार्गदर्शन सत्रे आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली.

*****

माविमच्या वार्षिक क्रेडिट प्लॅन कार्यशाळेत २५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट जाहीर


बचत गटांची ९९.८ टक्के कर्जपरतफेड; महिलांनी शाश्वत उपजीविकेसाठी उद्योजकतेकडे वळावे – मान्यवरांचे आवाहन






हिंगोली(जिमाका), दि. १६ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने जिल्हास्तरीय वार्षिक क्रेडिट प्लॅन (२०२६-२७) कार्यशाळा हॉटेल शिवलीला पॅलेस येथे उत्साहात पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यशाळेत नवतेजस्विनी व अल्पसंख्याक प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहायता महिला बचत गटांसाठी तसेच वैयक्तिक कर्ज योजनांसंदर्भातील क्रेडिट प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. मागील वर्षातील योजना व बँकनिहाय प्रगतीचा आढावा घेऊन चालू आर्थिक वर्षासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी जिल्ह्यातील ५२० स्वयं सहायता महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. तसेच १२५ महिलांना ६५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बचत गटांचा कर्जपरतफेडीचा दर ९९.८ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरावती विभागाचे विभागीय सल्लागार केशव पवार यांनी राज्यस्तरीय कामकाजाचा आढावा घेतला, तर विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख यांनी वैयक्तिक कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुजीत झोडगे यांनी माविमच्या बचत गटांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अविनाश लहाने यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय उभारून शाश्वत उपजीविका विकसित करावी, असे आवाहन केले. आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी लोंढे यांनी बँकेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

कार्यशाळेत विविध बँका, महामंडळे आणि शासकीय विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कृती संगम उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बँकांनी अधिकाधिक कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत माविमच्या महिला बचत गटांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब झिंजाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन मुकुंद जहागीरदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, एमआयएस सल्लागार गजानन इंगळे, संतोष ठाकूर तसेच विविध सीएमआरसी व्यवस्थापकांनी योगदान दिले.

मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आणि विविध संस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

***

16 June, 2026

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी १७ व १८ जून रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांमध्ये विशेष शिबिरे



हिंगोली(जिमाका), दि. १६ : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची अॅग्रीस्टॅक (Agristack) आधार मंचावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या अनुषंगाने अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय व शाखानिहाय यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी संबंधित शाखास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये दि. १७ व १८ जून २०२६ रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

वसमत तालुक्यातील आरळ, वसमत, चोंडी आंबा, गिरगाव, कुरुंदा व पूर्णा एसएसके शाखांमध्ये, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, कळमनुरी, पोतरा व वारंगा फाटा शाखांमध्ये, सेनगाव तालुक्यातील आजेगाव, गोरेगाव, केंन्द्रा बुद्रुक, पानकनेरगाव, साखरा व सेनगाव शाखांमध्ये, हिंगोली तालुक्यातील हिंगोली, खानापूर चित्ता, फाळेगाव, नरसी सिरसम बु. शाखांमध्ये तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, जवळा बाजार, लाख, शिरड शहापूर व येहळेगाव सोळंके शाखांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

********

पी.एम. किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याचे शनिवारी वितरण

 


* 'पी.एम. किसान उत्सव दिवस' निमित्त राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ

हिंगोली, दि.१६ (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीसाठीचा २३ वा हप्ता शनिवार, (दि.२०) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने दि. २० जून हा दिवस देशभर ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये, असे एकूण सहा हजार रुपये थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात.

राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी २२ हप्त्यांद्वारे सुमारे ४१ हजार ८३ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना अंदाजे १,८१७ कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.

पी.एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच प्राथमिक कृषी पतसंस्था येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

कृषी, महसूल व वन तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा उत्सव साजरा करण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in⁠ या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******