29 May, 2026

जिल्ह्यातील बँकांना 4 हजार 313 कोटींचे कर्ज वितरण उद्दिष्ट • वार्षिक ऋण योजना 2026-27 चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन

 




 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27चे प्रकाशन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

या वार्षिक ऋण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पीक कर्ज, कृषी पूरक व जोडव्यवसाय कर्ज, शासकीय योजनांतर्गत उद्योग कर्ज, प्राधान्य क्षेत्र तसेच अग्रक्रम नसलेल्या क्षेत्रातील विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांसाठी जिल्हाभरातील बँकांना एकूण 4 हजार 313 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या बैठकीत नाबार्डच्या युनिट कॉस्ट पुस्तिकेचे सर्व बँकांना वितरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला. शेतकरी, उद्योजक तसेच पात्र लाभार्थ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लहाने, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे श्री. गलांडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. बनसोड तसेच जिल्हाभरातील विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

 

******

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत पात्र प्रकरणांना मान्यता

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पेन्शन मंजुरी, वारसांना नोकरी आदी विषयांवरील प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच संबंधित प्रकरणे वेळेत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अमोल घुगे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रथम खबर अहवाल, दोषारोप पत्र, पीडितांना आर्थिक सहाय्य, पेन्शन मंजुरी तसेच वारसांना नोकरी देण्यासंदर्भातील प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. पात्र ठरलेल्या प्रकरणांना समितीने मान्यता दिली. तसेच प्रकरणांच्या निकाली प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

 

शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर पात्र, अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सर्व तहसीलदार, सर्व तालुका कृषी अधिकारी, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित प्रस्तावांमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता करून पात्र व अपात्रतेबाबत कार्यवाहीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पुढील आठवड्यात समितीसमोर सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

******

कृत्रिमरित्या इंधन टंचाई निर्माण केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पेट्रोल पंप चालकांनी दक्षता घ्यावी. तसेच कोणीही कृत्रिमरित्या इंधनटंचाई निर्माण केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर तसेच शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक व संबंधित कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक तसेच संबंधित कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याचा आढावा घेत पंप चालकांना आवश्यक सूचना दिल्या. इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणारे तसेच पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

वाहनधारकांना निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इंधन देऊ नये तसेच विना क्रमांकाच्या वाहनांना डिझेल पुरवठा करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. रुग्णालये, बँका व अन्य अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत कोणाकडून दबाव टाकला जात असल्यास त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी. तसेच कंपन्यांना अनामत रक्कम भरूनही वेळेत इंधन पुरवठा होत नसल्यास त्याबाबतही कळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पंप चालकांना दिले.

संकटकाळात सर्वांनी जबाबदारीने वागून देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

 

******

 

28 May, 2026

कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार नियमन नियम, 1967 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज पारदर्शक, नियमबद्ध व शेतकरी हिताचे असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदेशात म्हटले आहे. काही बाजार समित्यांमध्ये अभिलेख संधारण, आर्थिक नोंदी, बाजार शुल्क व परवाना शुल्क नोंदवही, शेतकऱ्यांना देयके अदा करणे तसेच आवश्यक नोंदवही अद्ययावत ठेवण्याबाबत त्रुटी आढळून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना कडक निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आपल्या अधिनस्त सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार नियमन नियम, 1967 मधील विविध नियमांनुसार तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश निर्गमित केले आहेत.

नियम 19 नुसार कृषी उत्पादनाच्या प्रत्येक वाहनाची व प्रत्येक विक्रीची नियमित व अचूक नोंद नोंदवही तसेच डिजिटल स्वरूपात ठेवणे बंधनकारक राहील. सदर डिजिटल माहिती प्रत्येक सोमवारी hincollector@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे तसेच बाजार समितीच्या नोटीस बोर्ड किंवा एलईडी बोर्डवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम 20 नुसार विकलेल्या शेतीमालाचे पैसे खरेदीदार किंवा कमिशन एजंट यांनी तात्काळ हिशोब पूर्ण करून शक्यतो लवकरात लवकर विक्रेत्यास अदा करणे आवश्यक आहे. वजन, मोजमाप व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करावेत व कोणतीही अनधिकृत कपात करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नियम 22 नुसार बाजार समित्यांनी कृषी मालाच्या दर्जानुसार नमुने जतन व प्रदर्शित करणे, बाजारभावाची माहिती उपलब्ध करून देणे तसेच कृषी उत्पादनांच्या प्रतवारी प्रक्रियेवर देखरेख ठेवून भेसळ रोखणे आवश्यक आहे.

नियम 27 नुसार कृषी उत्पादनांचे दर, आवक, साठा, वाहतूक व इतर संबंधित माहिती नियमितपणे नोटीस बोर्ड किंवा एलईडी बोर्डवर प्रसिद्ध करून ती सर्व संबंधितांना सहज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम 31-अ नुसार शेतमाल विक्री होईपर्यंत बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांकडून निश्चित शुल्क आकारावे. समितीने ठरविलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नियम 95 नुसार समितीने सर्व शुल्क, पावत्या व देयके अचूकपणे जतन करणे आवश्यक आहे. बाजाराच्या कामकाजाचे नियमन करणाऱ्या सर्व नियम, उपनियम व विनियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समितीचे अध्यक्ष, सचिव व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावर राहणार आहे. तसेच दुकाने व गोदामांच्या तपासणीवर देखरेख ठेवून अवैध व्यापार रोखण्यासाठी कृषी उत्पादनांच्या खरेदी-विक्रीचे नियमन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम 96 नुसार प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी बाजार समित्यांनी वार्षिक अहवाल तयार करून तो 31 डिसेंबरपूर्वी संचालकांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक राहील.

नियम 116 नुसार रोकड पुस्तक, खातेवही, वैयक्तिक लेजर, बाजार शुल्क नोंदवही, परवाना शुल्क नोंदवही, परवानाधारकांची नोंदवही, स्टेशनरी नोंद, डेड स्टॉक रजिस्टर, भरणा नोंदवही, शासकीय कर्ज नोंदवही व मालमत्ता नोंदणी यांसह सर्व आवश्यक नोंदवही अद्ययावत ठेवणे बंधनकारक राहील. सदर नोंदवही ठेवण्याची जबाबदारी समितीचे अध्यक्ष, सचिव व संबंधित नियंत्रण अधिकारी यांची राहणार आहे.

तसेच नियम 120 (उपविधी) नुसार बाजार क्षेत्रातील खरेदी-विक्रीची पद्धत, व्यापाराची वेळ, वजन पावत्या, बिले, बिल्ले तसेच व्यापाऱ्यांच्या हिशोब पुस्तिकांबाबतचे नियम काटेकोरपणे अंमलात आणावेत. बाजार परिसरात विनापरवाना व्यापारास प्रतिबंध घालण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी कृषी उत्पादन बाजार समित्यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार नियमन नियम, 1967 मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत.

*******

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी  नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******

27 May, 2026

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

 


 

 

           हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. तसेच या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील . 

ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, अशा नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस-6, हिंगोली या पत्यावर दि. 5 जून, 2026 रोजीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील . 

******

जिल्ह्यातील महसूल व भूमी अभिलेख कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


 

 

·         सातबारा पडताळणी, गायरान जमीन, ई-पीक पाहणी व फार्मर आयडी प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील महसूल, भूमी अभिलेख, गायरान जमीन, ई-पीक पाहणी, फार्मर आयडी, जनगणना तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेसंदर्भातील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच तालुकास्तरीय भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मिळकतींच्या दुहेरी नोंदी बंद करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मिळकतींच्या सातबारा उताऱ्यांची व पीआर कार्डची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. सातबारा पद्धत बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करताना सर्वे क्रमांक व सिटी सर्वे क्रमांकांची अचूक पडताळणी करावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच शासकीय जमिनींचे ग्राऊंड ट्रुथिंग करून संबंधित जमिनींचे फोटो व व्हिडिओ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील गायरान जमिनींचे क्षेत्रफळ, अतिक्रमित क्षेत्र, अतिक्रमणाचा प्रकार याबाबत सविस्तर माहिती तयार करून संबंधित जमिनींचे फोटो तसेच केएमएल फाईल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चुकीच्या नोंदी शोधून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. तसेच डीसीएस ॲपची प्रभावी अंमलबजावणी, ई-पीक पाहणी, फार्मर आयडी, एसआयआर तसेच जनगणनेच्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाची कामे करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्रामपंचायतींचे ठराव घेण्यात यावेत व त्यानंतर प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय वनपट्टाधारकांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने राबवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.

******