10 July, 2026

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


• 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ


• कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण


मुंबई, दि. १० : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण, अमली पदार्थांविरोधातील कारवाई, पोलीस आधुनिकीकरण, जलसंपदा, कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा आणि २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्रासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च करीत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जातात. कापसाची १३६ लाख क्विंटल खरेदी करून १० हजार ८८३ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. सोयाबीनचे ६ लाख टन उत्पादन ३ हजार १९८ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, तर कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ठिबक सिंचनासाठी प्रलंबित २१७ कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येतील, तसेच कृषी समृद्धी योजनेतील उर्वरित निधी पुरवणी मागण्यांतून उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात कुठेही नियोजित भारनियमन नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा ३२ हजार मेगावॅटपर्यंतची वीज मागणी पूर्ण करण्यात आली आहे. ७६ टक्के कृषी फिडरवर दिवसा वीजपुरवठा सुरू असून उर्वरित भागातही काम सुरू आहे. स्मार्ट मीटरबाबत प्राप्त झालेल्या बहुतांश तक्रारी तपासणीत चुकीच्या आढळल्या असून वाढीव वीजबिलांचा संबंध स्मार्ट मीटरशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


*गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात वाढ*


कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय गुन्हेगारी आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा प्रति एक लाख लोकसंख्येमागील गुन्हेगारी दराच्या बाबतीत देशात सातवा क्रमांक आहे. मे २०२५ ते मे २०२६ या कालावधीत दुखापत, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गुन्हे सिद्धतेचा दर ४४.२ टक्क्यांवरून ५२.६ टक्क्यांपर्यंत वाढला असून तो ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

नवीन फौजदारी कायद्यांमुळे तपास प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाल्याचे सांगताना त्यांनी ई-साक्ष, फॉरेन्सिक तपास, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल पुरावा व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याचे सांगितले. गंभीर गुन्ह्यांतील दोषारोपपत्रे विहित मुदतीत दाखल करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून फिर्यादींना मालमत्ता परत मिळण्याचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२१ ते २०२६ या कालावधीत बेपत्ता झालेल्या ९३ टक्के महिलांचा शोध घेण्यात यश आले आहे. 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत ४३ हजार ५९१ बेपत्ता बालकांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस म्हणाले, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत सायबर फसवणुकीतील ४३९ कोटी रुपये गोठविण्यात आले असून निधी गोठविण्याचे प्रमाण ११ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतच्या फसवणुकीतील रक्कम तातडीने परत करण्याची व्यवस्था करण्यात आली असून हजारो नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. 'तपास सारथी' ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली सीसीटीएनएसशी जोडण्यात आली असून तपास प्रक्रियेला गती मिळाली आहे. एपीके फाइल्स डाउनलोड करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अमली पदार्थांविरोधातील कारवाईत आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटविरोधात कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'ब्रोमो-४ मिथाईल प्रोपिओ फेनॉल' या रसायनाचा नियंत्रित पदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अवैध उत्पादनाला आळा बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'ड्रग फ्री मुंबई' अभियानांतर्गत चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचे धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आधुनिकीकरणासाठी केंद्र शासनाने ७३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, रडार, स्पीडबोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यात येणार आहे. राज्यात ९ हजार ७६२ पोलीस निवासस्थानांची कामे सुरू असून मुंबईत ४० हजार नवीन पोलीस निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. तसेच ९३ अत्याधुनिक पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून ही समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाग नदी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जायकामार्फत २,४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, सांडपाणी वाहिन्या आणि पंपिंग स्टेशन उभारले जात आहेत. नळगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची अंतिम मान्यता मिळताच याच वर्षी काम सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील विकास, शेतकरी कल्याण, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका कायम राहील.

अधिवेशनाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांच्या श्रम, श्रद्धा आणि त्यागातूनच महाराष्ट्राचा विकास घडतो. त्यांच्या आशीर्वादाने राज्याला नवाचार आणि नवा आकार देण्याचे काम शासन करेल."

0000

विशेष लेख : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : कर्जमुक्ती योजनेची शेतकऱ्यांसाठी नवी संधी



शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली आहे. या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध होणार असून, भविष्यात नियमित कर्जव्यवहारासाठीही पोषक वातावरण निर्माण होणार आहे.

शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे अनेकदा अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जाची वेळेवर परतफेड करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत थकीत कर्जाचा भार वाढत जातो. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ही योजना अंमलात आणली आहे.

या योजनेत निश्चित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार आहे. अल्पमुदतीच्या पीक कर्जांसह योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुनर्गठित कृषी कर्जांचाही विचार करण्यात आला आहे. मात्र लाभासाठी शासनाने निश्चित केलेल्या अटी व निकषांची पूर्तता आवश्यक राहणार आहे.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थ्यांची माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्ज खाते, आधार क्रमांकाशी संबंधित माहिती, बँकेतील तपशील तसेच इतर आवश्यक नोंदी अद्ययावत असल्यास पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी संबंधित माहितीमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

कर्जमुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी माहितीची डिजिटल पडताळणी, बँकांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद आणि विविध स्तरांवरील तपासणी यांना महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ योग्य पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या प्रक्रियेत सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर अचूक माहितीची देवाणघेवाण आणि वेळेत कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची माहिती नियमितपणे तपासावी, आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधावा आणि आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी. चुकीची अथवा अपूर्ण माहितीमुळे लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अचूक माहिती देणे ही प्रत्येक लाभार्थ्याची जबाबदारी आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ थकीत कर्जातून दिलासा देणारी योजना नसून शेतकऱ्यांना नव्याने आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्याची संधी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेच्या निकषांची माहिती करून घेत आवश्यक कार्यवाही वेळेत केल्यास या योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकतो.

> जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

00000

अल्पसंख्यांक वसतिगृहातील सुविधा निर्धारित मुदतीत पूर्ण करा

 

 

·         मुलींचे वसतिगृह 15, तर मुलांचे महिन्याभरात सुरू करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक वसतिगृहातील प्रलंबित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अल्पसंख्यांक वसतिगृहातील विविध सुविधा व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा सहायक नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, एस. एल. कोंडावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. विशेषतः सोलर वॉटर हिटर, पाईपलाईन व्यवस्था, आवश्यक फर्निचर, विद्युत जोडणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पेव्हर ब्लॉक बसविणे, ड्रेनेज लाईन तसेच इतर आवश्यक कामे मंजूर दरपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मुलींच्या अल्पसंख्यांक वसतिगृहातील सर्व कामे 15 दिवसांच्या आत, तर मुलांच्या वसतिगृहातील कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करून वसतिगृहे विद्यार्थ्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त निवासी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

******

महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागातून अधिकाधिक युवकांची नोंदणी करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 10 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'मेरा युवा भारत (माय भारत)' उपक्रमाअंतर्गत युवा नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी मेरा युवा भारत संकेतस्थळ, उपक्रमाची उद्दिष्टे, युवकांसाठी उपलब्ध स्वयंसेवा संधी, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या युवा नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी युवा नोंदणी अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त युवकांची मेरा युवा भारत संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक शाखेनुसार उपलब्ध स्वयंसेवा, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख संधींची माहिती देण्यावरही भर देण्यात आला.

यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, शासकीय तंत्रनिकेतनचे जे. व्ही. वानखेडे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन वासनिक, प्रा. डॉ. किशोर इंगोले, डॉ. सचिन हाटकर, डॉ. सोपान खरात, स्काऊट आणि गाईड्सच्या जिल्हा संघटक माधुरी दळवी तसेच डॉ. विजय निलावार उपस्थित होते.

******

ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा

 

·         पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिलेल्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. 31 जुलै 2026 या कालावधीत 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अभिवादन करत आयुष्यभर कला व साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक आधार व सन्मान मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सहाय्य करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

योजनेसाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता असून त्यांच्यासाठी किमान वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक आहे. तसेच वयाने ज्येष्ठ असलेल्या विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. उपजीविका प्रामुख्याने कलेवर अवलंबून असून, अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसलेल्या पात्र कलाकारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित मासिक पेन्शन अथवा कोणत्याही महामंडळाच्या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र राहतील. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचे संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच आवश्यक अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

ही योजना सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान करून त्यांना सामाजिक व आर्थिक बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग विविध कल्याणकारी उपक्रम राबवत आहे.

पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी दि. 31 जुलै 2026 पूर्वी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

******

मृग बहार 2026 अंतर्गत शेतकऱ्यांनी विहित मुदतीत सहभाग नोंदवावा

 

·         पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना

 

हिंगोली(जिमाका), दि. 10 : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार) 2026-27 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

मृग बहार 2026 अंतर्गत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ, द्राक्ष कलम, हळद आणि अंजीर या 10 फळपिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांची विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष कलम व हळद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 14 जुलै 2026, तर सिताफळ व अंजीर या पिकांसाठी दि. 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी, तसेच नोंदणीकृत भाडेकरारावर शेती करणारे शेतकरी सहभागी होऊ शकतात. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कोकण विभागात किमान 0.10 हेक्टर, तर उर्वरित विभागात किमान 0.20 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आवश्यक असून, प्रति शेतकरी सर्व फळपिकांसाठी कमाल 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण लागू राहील. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

योजनेअंतर्गत विविध हवामान धोक्यांपासून संरक्षण देण्यात येणार असून, निर्धारित हवामान निकष (ट्रिगर) लागू झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देय राहील. संत्रा व मोसंबीसाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये, पेरूसाठी 70 हजार रुपये, चिकूसाठी 70 हजार रुपये, डाळिंबासाठी 1 लाख 60 हजार रुपये, लिंबूसाठी 80 हजार रुपये, सिताफळासाठी 70 हजार रुपये, द्राक्ष (कलम)साठी 3 लाख 80 हजार रुपये, हळदीसाठी 1 लाख 80 हजार रुपये आणि अंजीरसाठी 1 लाख 60 हजार रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक (फार्मर आयडी) नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणेचा उतारा, जिओ-टॅग फोटो आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे पूर्ण असणे बंधनकारक आहे. बोगस विमा प्रकरणे आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्याला पुढील किमान पाच वर्षे विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.

शेतकरी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच बँक, प्राथमिक सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र किंवा अधिकृत विमा प्रतिनिधीमार्फतही अर्ज सादर करता येतील. सेवा केंद्रांना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार प्रति अर्ज 60 रुपये सेवा शुल्क विमा कंपनीमार्फत अदा करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळील बँक, ई-सेवा केंद्र, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

******

खरीप पिकांसाठी 31 जुलैपर्यंत पीकविमा अर्ज करण्याचे आवाहन

 


·         सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडदाचा समावेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : खरीप हंगाम 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

यंदा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी एचडीएफसी इरगो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळात चालू वर्षातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देय राहणार असून, सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती देऊन किंवा चुकीच्या पद्धतीने विमा अर्ज भरून गैरफायदा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या पुढील पाच वर्षांतील कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.

पीकविमा अर्जासाठी सातबारा उतारा, नमुना 8-अ, पीकपेरा घोषणापत्र, आधार क्रमांक तसेच आधारशी संलग्न बँक खाते आवश्यक आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत पीक नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष पेरणी केलेले पीक आणि विमा अर्जातील पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वेतील नोंद अंतिम ग्राह्य धरली जाईल व तफावत असलेले अर्ज रद्द करण्यात येतील.

जिल्ह्यात प्रती हेक्टर कपाशीसाठी विमा संरक्षित रक्कम 65 हजार रुपये असून शेतकरी हिस्सा 650 रुपये, सोयाबीनसाठी संरक्षित रक्कम 62 हजार 500 रुपये व हिस्सा 1 हजार 250 रुपये, तुरीसाठी संरक्षित रक्कम 47 हजार रुपये व हिस्सा 1 हजार 175 रुपये, मूगासाठी संरक्षित रक्कम 30 हजार रुपये व हिस्सा 600 रुपये तसेच उडदासाठी संरक्षित रक्कम 27 हजार रुपये व हिस्सा 540 रुपये निश्चित करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रावर संबंधित पिकाची लागवड असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत विमा योजनेत सहभागी व्हावे. योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत संबंधित बँकेस लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.

शेतकरी राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच बँका किंवा सामूहिक सेवा केंद्रामार्फतही अर्ज सादर करता येतील. सीएससी चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज 60 रुपये मानधन दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये.

योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जवळील बँक अथवा टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******