हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने हिंगोली जिल्ह्यात दि. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत "शेत वाचवा अभियान" राबविण्यात येत असून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. "सुदृढ मृदा – समृद्ध पीक – आनंदी शेतकरी" ही अभियानाची मुख्य संकल्पना असून कृषिविज्ञान केंद्र, हिंगोलीमार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या (आयसीएआर-आयआयएसएस) अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातील उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या २४६ जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. मृदा आरोग्य पत्रिकेतील माहितीच्या विश्लेषणातून जिल्ह्यातील जमिनीत स्फुरदाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद तसेच इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी वापर टाळून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयसीएआरच्या शिफारशीनुसार रासायनिक स्फुरद खतांच्या वापरात कपात करून पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) तसेच प्रतिहेक्टरी ५ टन शेणखताचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता अबाधित राहण्यास मदत होते आणि उत्पादनातही घट होत नाही.
अभियानांतर्गत जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके, सेंद्रिय खते, नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर, हिरवळीच्या खतांचा प्रसार, नैसर्गिक शेती पद्धतींचे प्रोत्साहन, ग्रामपंचायत स्तरावर "शेत वाचवा समिती" स्थापन करणे, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) संपृक्तता मोहीम राबविणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
यासोबतच नैसर्गिक शेतीतील जिवामृत, बीजामृत, आच्छादन (मल्चिंग) यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, प्रगतशील शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या सहभागातून खतांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मातीची सुपीकता टिकविणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करावा तसेच खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषिविज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषिविज्ञान केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
********

