कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न
वैद्यकीय अधिका-यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश
हिंगोली (जिमाका), दि.13 : जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिका-यांनी मुख्यालयी उपस्थित राहून रुग्णांना गुणात्मक सेवा देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हा परिषद सभागृहात आज आयोजित कार्यकारी मंडळाच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
क्षयरोग (टीबी) नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. 'टीबी मुक्त अभियान' यशस्वी करण्यासाठी थुंकी तपासणी आणि एक्स-रे तपासणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
साथरोग नियंत्रणासाठी पाणी शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, ज्या गावांमध्ये टीसीएल पावडर उपलब्ध नाही, तिथे ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. नियमित पाणी शुद्धीकरण करून साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान जिल्ह्यात 1 एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे. तेव्हा आतापासून नियोजन करून सर्व विभागाशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करावे. निकष पूर्ण करून पुरस्कार मिळवावेत. ग्रामपंचायत यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 5 कोटी रुपये, द्वितीय 3 कोटी रुपये, तृतीय 2 कोटी रुपये आणि जिल्हास्तर प्रथम 25 लाख रुपये द्वितीय 20 लाख रुपये तृतीय 15 लाख रुपये, आरोग्य उपकेंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 25 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 5 लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 50 लाख तर जिल्हास्तरावर प्रथम 10 लाख रुपये ग्रामीण रुग्णालय राज्यस्तरावर पुरस्कार रक्कम प्रथम 75 लाख रुपये असे असणार आहे.
प्रमुख योजनांचा आढावा
बैठकीत खालील विषयांवर सविस्तर चर्चा आणि सूचना देण्यात आल्या.
एनसीडी पोर्टल: असंसर्गिक रोगांच्या स्क्रीनिंगचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे.
आयुष्यमान भारत: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि 'वय वंदना' कार्डांचे वाटप गतीने पूर्ण करणे.
माता-बाल संगोपन: माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
कुष्ठरोग व मानसिक आरोग्य: या कार्यक्रमांतर्गत रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, डॉ. विशाल पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कार्यक्रम समन्वयक आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी, कामामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट बजावले.
*****


