31 July, 2026

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 


साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानातून युवकांनी प्रेरणा घ्यावी – पंडित अवचार


  

हिंगोली (जिमाका), दि. 31 : जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, शंभोनाथ दुभळकर, डिगंबर झुंजारे तसेच ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ग्रंथ प्रदर्शनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठी भाषेतील विविध विषयांवरील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले आहे.

नागरिक, विद्यार्थी, युवक, साहित्यप्रेमी तसेच वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

 

*******

कळमनुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात * 7 हजार 513 विविध योजनांच्या लाभांचे वितरण

 





हिंगोली (जिमाका), दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंदाजे 4 हजार 500 लाभार्थी उपस्थित होते.

या शिबिरास आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिवंत सातबारा उतारे 1 हजार 151, वाटणीपत्रावरील नोंदणी फीमध्ये सवलत/लाभ 131, पाणंद रस्ते 19, अतिक्रमण नियमानुकूल अर्ज 386, घरकुल लाभार्थी 73, राज्यस्तरीय योजनांचे लाभ 5 हजार 608, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचे लाभ 20 आणि बसच्या मोफत पासचे वाटप 125 असे एकूण 7 हजार 513 लाभांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विविध विभागांच्या स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली.

यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 104 मिमी पाऊस

 

हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद


  हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

******

जिल्हा वार्षिक योजनेच्या विकास कामांचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी  प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रत्येक कामाचे यूआयडी क्रमांकासह प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. यामध्ये शाळा वर्गखोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम तसेच दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, जलसंधारण, शाळा क्रीडांगण विकास यासह विविध कामांचा समावेश आहे.

या सर्व कामांचे अंदाजपत्रक यूआयडी क्रमांकासह तयार करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. तसेच दायित्वाच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.


अमृत वृक्ष योजनेत हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट 11 लाख


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली वृक्ष लागवड तसेच आगामी काळात करावयाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला.

हिंगोली जिल्ह्यासाठी यापूर्वी 7 लाख 98 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अमृत वृक्ष योजनेंतर्गत हे उद्दिष्ट वाढवून 11 लाख करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

उर्वरित उद्दिष्टानुसार संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड पूर्ण करावी तसेच लागवड केलेल्या वृक्षांची माहिती ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अद्ययावत करावी. वृक्ष लागवड मोहिमेत हिंगोली जिल्ह्याला आघाडीवर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

****** 



माजी सैनिक व वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 181 पदांची भरती

 


हिंगोली (जिमाका), दि. 31 : सशस्त्र दलातील  भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील किमान 20 वर्षे सेवा केलेल्या भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 181 रिक्त पदे उपलब्ध असून, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

या भरती मेळाव्याचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय येथे दि. 1 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून, तर दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर येथील एआरओ प्रांगणात दि. 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे.

भरतीमध्ये जेसीओची 4 पदे, सोल्जर (जीडी)ची 162 पदे आणि ट्रेड्समनची 15 पदे आहेत. सोल्जर (जीडी) पदांसाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवार पात्र असतील. ट्रेड्समन पदांमध्ये सोल क्लार्क (जीडी)-7, हेअर ड्रेसर-1, मेस कीपर-1, स्टिवर्ड-1, हाऊस कीपर-1, शेफ कम्युनिटी-2 आणि वॉशरमन-2 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार पात्र आहेत.


पात्रता व सेवा अटी


उमेदवार हा सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक (निवृत्तिवेतनधारक) किंवा वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची किमान अट नाही. मात्र, सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.

उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शेष-1 आणि चारित्र्य अनुकरणीय अथवा अतिशय चांगले असावे. उमेदवार कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभागी नसावा. निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागणार आहे.


शारीरिक पात्रता


भूतपूर्व सैनिकांसाठी उंची 160 सेंमी, तर गोरखा, गढवाली व आसामी उमेदवारांसाठी 152 सेंमी उंची आवश्यक आहे. वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उंची 150 सेंमी आवश्यक आहे.

वजन माजी सैनिकांसाठी किमान 50 किलो, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी किमान 42 किलो असावे. माजी सैनिकांसाठी छाती 82 सेंमी व किमान 5 सेंमी विस्तार आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांची छाती किमान 5 सेंमी विस्तारण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.


निवड प्रक्रिया


सैनिकांसाठी प्रारंभिक कागदपत्र तपासणी, 1 मैल धाव, 9 फूट खंदक, पुलअप्स, बॅलन्स बीम, बीओओमार्फत मुलाखत व वैद्यकीय तपासणी अशी प्रक्रिया राहणार आहे. वने व हवामान बदल मंत्रालय व राज्य वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रारंभिक कागदपत्रे तपासणी, बीओओमार्फत मुलाखत, संबंधित कामातील प्रावीण्य चाचणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.


आवश्यक कागदपत्रे


उमेदवारांनी मूळ निवृत्तिवेतन आदेश (पीपीओ), मूळ डिस्चार्ज बुक व स्वयं-साक्षांकित प्रत, मूळ अधिवास प्रमाणपत्र, सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड व स्वयं-साक्षांकित प्रत, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची 10 छायाचित्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

ही भरती गुणवत्ता व रिक्त पदांच्या आधारे केली जाणार आहे. इको टीए मधील सेवा निवृत्तिवेतनास पात्र नसलेली आहे. उमेदवाराची सुरुवातीला दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येईल. कामगिरीच्या आधारे एक वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. सैनिक जेसीओंना वयाच्या 55 वर्षांपर्यंत, तर भूतपूर्व सैनिक शिपायांना 50 वर्षांपर्यंत सेवा करता येईल. सैनिकांचे सध्याचे निवृत्तिवेतन अबाधित राहणार आहे.


महत्त्वाच्या सूचना


या भरती मेळाव्यादरम्यान मोबाईल फोनला परवानगी राहणार नाही. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य व निष्पक्ष असून उमेदवारांनी कोणालाही लाच देऊ नये तसेच दलालांपासून सावध राहावे. खोटी अथवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

भरतीबाबत चौकशी अथवा स्पष्टीकरणासाठी 9168168136 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

******

30 July, 2026

तृतीयपंथीयांना रोजगार, प्रमाणपत्र व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्य शासनाने तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी 2026 च्या सुधारणा अधिनियमाची अंमलबजावणी केली असून, तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याची संधी देण्यात येणार असून, यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तरुणांनी तृतीयपंथीयांचा इतिहास जाणून घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक न्याय विभाग आणि सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तृतीयपंथीय संवेदनशीलता जनजागृती कार्यशाळे' मध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, पोलीस उपअधीक्षक डी. जी. केंद्रे, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सहउपाध्यक्षा डॉ. सान्वी जेटवाणी, रेखाताई देवकते, विनय खरटमोल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयात दिव्यांगांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तृतीयपंथीयांना स्वावलंबी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज असून, समाजातील त्यांच्याविषयीची मानसिकता बदलण्यासाठी आरोग्य विभागामार्फत व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना डॉ. सान्वी जेटवाणी यांनी तृतीयपंथीयांचा इतिहास, त्यांच्यासमोरील सामाजिक व आर्थिक समस्या, स्मशानभूमी व घरकुलासारखे मूलभूत प्रश्न यावर प्रकाश टाकला. तसेच तृतीयपंथीयांसाठी शासनाने लागू केलेल्या अधिनियमातील तरतुदींची माहिती देत समाजाची विचारधारा आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी कार्यशाळेची भूमिका विशद केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, तृतीयपंथीय व्यक्ती, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******  








पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू


पहिल्या टप्प्यात 16.96 लाख कर्जखात्यांची यादी प्रसिद्ध; 3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण


हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, योजनेअंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक आहेत.

योजनेअंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा, तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचा समावेश आहे. दि. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पात्र कर्जबाकी कर्जमाफीसाठी विचारात घेण्यात आली आहे.


दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी


योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील रक्कम दि. 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा केल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.


प्रोत्साहनपर लाभासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान


सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची उचल करून त्याची विहित मुदतीत परतफेड केलेल्या तसेच सन 2025-26 मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.


31.17 लाख कर्जखात्यांची माहिती प्रणालीवर सादर


योजनेच्या संगणकीय प्रणालीवर बँकांनी एकूण 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील 10.01 लाख आणि व्यापारी बँकांकडील 21.16 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे.

शासनाने दि. 9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना अनुत्पादित वर्गवारीतील कर्जखात्यांना निर्देशित प्रमाणात सवलत (Haircut) देण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच दि. 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना दि. 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत.


16.96 लाख कर्जखात्यांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध


महा-आयटीमार्फत बँकांनी सादर केलेल्या कर्जखात्यांचे योजना निकषानुसार संगणकीय संस्करण करण्यात आले आहे. त्यानंतर दि. 25 जुलै 2026 रोजी एकूण 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील 7.03 लाख आणि व्यापारी बँकांकडील 9.93 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचा समावेश आहे. उर्वरित कर्जखाती तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जबाकी असलेली कर्जखाती त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.


शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे


आधार प्रमाणीकरणाच्या वेळी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, कर्जखाते क्रमांक तसेच कर्जाच्या रकमेची अचूकता तपासून त्याबाबत मान्यता द्यावी. आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध केलेली यादी योजनेच्या प्रणालीवर, संबंधित बँक शाखेत तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच गावस्तरावर बँक शाखा, विकास संस्था, ग्रामपंचायत व चावडीवरही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गावस्तरावर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये दिसणारी रक्कम आणि आधार प्रमाणीकरणाच्या वेळी प्रणालीवर दिसणारी रक्कम यामध्ये फरक असू शकतो. गावस्तरावरील यादीमध्ये अनुत्पादित कर्जखात्यांना शासनाच्या निर्देशानुसार देण्यात आलेली सवलत (Haircut) लागू केल्यानंतरची तडजोड रक्कम दर्शविण्यात आली आहे.

दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनामार्फत माफ

दि. 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर बँकांकडून व्याज आकारणी करण्यात येणार नाही. त्यामुळे दि. 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील दोन लाख रुपयांपर्यंतची पात्र रक्कम शासनामार्फत माफ करण्यात येणार असून, या रकमेपोटी शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही रक्कम जमा करावी लागणार नाही.


3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण


दि. 28 जुलै 2026 पर्यंत 3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून ही प्रक्रिया सुरू आहे. आधार प्रमाणीकरणानंतर प्रत्येक पात्र शेतकऱ्यास देय कर्जमाफीची रक्कम निश्चित करण्यात येईल. त्यानंतर ही रक्कम थेट लाभ वितरण (डीबीटी) पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करून कर्जखाते निरंक करण्यात येणार आहे.

कर्जखाते निरंक झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील आपले नाव तपासून विहित प्रक्रियेनुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****