25 July, 2026

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

 


* नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये


हिंगोली, दि. 25 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात आज (दि. 25) सायंकाळी 6.49 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे असून तो भूगर्भात सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हिंगोली जिल्ह्यातील 44 हजार 177 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

 

• लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक आयडीची प्रक्रिया पूर्ण करावी – जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे


हिंगोली (जिमाका), दि. 25 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील एकूण 673 गावांतील 44 हजार 177 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही यादी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली कार्यालयासह हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, परभणीच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये तसेच संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावरही ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यादीतील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्यांच्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

तसेच ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक आयडी तयार केलेला नाही, त्यांनीही त्वरित आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन अॅग्रीस्टॅक आयडी तयार करून घ्यावा. अन्यथा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच सर्व सहाय्यक निबंधक, बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित शाखा, विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत व चावडी येथे लाभार्थ्यांची यादी तात्काळ प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये हिंगोली तालुक्यातील 142 गावांतील 12,118 लाभार्थी, वसमत तालुक्यातील 136 गावांतील 6,441, कळमनुरी तालुक्यातील 144 गावांतील 9,992, सेनगाव तालुक्यातील 130 गावांतील 7,348 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 121 गावांतील 8,278 लाभार्थींचा समावेश असून, एकूण 673 गावांतील 44,177 पात्र शेतकरी या यादीत समाविष्ट आहेत.

योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

******

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार





हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत. या मोहिमेत संपूर्ण जिल्ह्यात 1,015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 37 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण, प्रपत्रे पूर्ण करून घेणे तसेच प्राप्त माहितीचे संगणकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व कामांमध्ये 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्त हे विभागातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी हिंगोली दौऱ्यावर आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सत्कार करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये एस. एस. कंदी, देवेंद्र डोल्हारे, रवी गायकवाड, एस. एन. नवले आणि देवानंद जावळे यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी गणना प्रपत्रांचे 100 टक्के वितरण, 100 टक्के डिजिटायझेशन आणि विहित कालावधीत काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

 

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रामाणित करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन



मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार असून, राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती पुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून नव्या उमेदीने शेतीसाठी बळ देणारी योजना असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

0000

24 July, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण


संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






 


पंढरपूर, दि. २४: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी फडणवीस म्हणाले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड आदी उपस्थित होते. 

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी, वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, तिथून याची सुरुवात करावी या उद्देशाने येथून कर्जमाफीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून १३ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहेत. यापुढे जसजशी बँकाकडून माहिती जमा होईल तसतशा पुढील याद्या जाहीर करून कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येईल. एकही पात्र शेतकरी या योजनेतून मागे राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ७.५ हॉर्स पॉवरच्या आतील कृषीपंपांची वीजबिल माफी देण्यासाठी दरवर्षी २४ ते २५ हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून महावितरणला देते. आता कर्जमुक्तीबरोबरच यापूर्वीची या कृषीपंपांची थकीत वीज देयकांची रक्कमही माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ५० लाख शेतकऱ्यांचं ४८ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ केलेले आहे. आता राज्यातल्या ७५ टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतो आहोत. येत्या डिसेंबर किंवा मार्चपर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात येणार आहे.

कर्जमाफी, विजदेयकांच्या रकमेची माफी याव्यतिरिक्त गतवर्षी शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सबसिडींच्या माध्यमातून, ठिबक सिंचन, खते, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरण आदींसाठी सुमारे ९५ हजार कोटी खर्च केले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीने उभे आहे, असेही ते म्हणाले.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारीची परंपरा शतकानुशतके चालली असून दरवर्षी लाखो वारकरी चालत चालत पंढरपूरपर्यंत येतात. वारीमध्ये प्रत्येकालाच पांडुरंगाचे दर्शन मिळतेच असे नसले तरी कोणी कळस दर्शन, कोणी मुख दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाची भेट झाल्याचा अनुभव प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी प्राप्त होतो. वारीच्या परंपरेत प्रत्येक व्यक्ती समोरचा वारकरी, व्यक्तीमध्ये आपल्या माऊलीचे दर्शन घेत असतो. आणि अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक असा वारीचा सोहळा आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो.

      यावेळी विक्रमी असे ३५ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरला येत आहेत. जवळजवळ २१ किलोमीटरची दर्शनाची रांग यावेळी लागलेली आहे. मात्र राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिशय उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. वारकऱ्यांच्या निवाससाठी जर्मन हँगर्स, तेथे पाद्य सेवा, वैद्यकीय सेवा आदी सर्व प्रकारच्या सेवा अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. वारीची परंपरा अशीच वाढत राहणार असून त्याप्रमाणे दरवर्षी सुविधा देण्याचे काम करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत सर्वांचे १०० टक्के पुनर्वसन


      पंढरपूरच्या कॉरिडॉर विकासाची जवळजवळ सर्व तयारी झाली आहे. काही थोड्या लोकांच्या मनात शंका असल्या तरी चर्चेतून त्या सर्व शंका दूर करून सर्वांचे चांगल्यात चांगले पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देत आहोत. १०० टक्के लोकांचे समाधान करण्याचा उद्देश घेऊन हे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.

पंढरपूरमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने ३०-३० लाख लोक येतात. वारकऱ्यांकरता आणि आता देशभरातून दर्शनकरिता येणाऱ्या भाविकांची योग्य व्यवस्था व्हाव्यात, या दृष्टीने खऱ्या अर्थानं या सगळ्या व्यवस्था येथे केल्या असून पंढरपूर कॉरिडॉरमुळे चांगल्या सुविधा निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

      २०१५-१६ मध्ये दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली. पंढरपूरला येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत शेतीच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग पोहोचले पाहिजेत, या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली. राज्यातल्या उत्तम बाजार समित्यांमध्ये गणना होत असलेली ही बाजार समिती अतिशय उत्तम कारभार करत असून १६ कोटींपासून प्रचंड मोठी भरारी घेत समितीने मोठा विस्तार केलेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बाजार समितीचा गौरव केला.


शेतीमध्ये ‘एआय’ला चालना; ‘महा विस्तार’ ॲपचा वापर करावा


मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे, उत्पादनाचा खर्च कमी करता आला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचा नफा वाढला पाहिजे, अशा पद्धतीने आपण राज्यात वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताचे (एआय) महत्व ओळखून, देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने शेतकऱ्यांकरिता ‘महा विस्तार’ नावाचे एआय ॲप तयार केले आहे. जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी महा विस्तारवर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ॲपवर नोंदणी करून उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘महा विस्तार’ म्हणजे एक प्रकारचा एआय एजंट असून आपण त्याच्याशी संवाद साधून शेतीशी संबंधित खतांचा वापर, कीड प्रतिबंध, पाण्याचा वापर आदी सर्व विषयांवरील प्रश्नांची उत्तरे, ज्ञान, माहिती जाणून घेऊ शकता. आधुनिक शेतीच्या प्रयोगाचे व्हिडिओ त्याच्यावर आहेत. कुठल्याही नवीन पीक पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती त्यात असून सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बोली भाषेत पर्सनलाईझ्ड पद्धतीने तेथे मिळते. पुढील काळात ‘माती परीक्षण’पासून सर्व सुविधा, पद्धती या केवळ आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

      भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्याच्या मागणीच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आंतर राज्य लवादाच्या निर्णयाची बंधने पाळतानाच त्यातून मार्ग काढून कशा पद्धतीने हे बंधारे तयार करता येतील, या संदर्भातले निर्देश संबंधित विभागाला देण्यात येईल. तसेच चंद्रभागा नदीवरचा जो नवीन पूल आहे, तो आता ‘पूल कम बंधारा’ असा परिवर्तित करून त्याही ठिकाणी पाणी कसे अडवता येईल, याचाही प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावर डायव्हर्जन कॅनल आपण सुरू केला असून यावर्षीच त्याचे काम पूर्ण होत आहे. यामुळे ३५ ते ४० टीएमसी पाणी हे तेथून उजनीमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह येथील दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या पाण्यामुळे उजनीमधील मृत साठा वापरावा लागण्याची परिस्थिती पुढील काळात राहणार नाही.

रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूरला तसेच सोलापूर जिल्ह्याला संपूर्ण दक्षिणेशी जोडण्याचे काम निश्चितपणे पूर्ण करू. लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी राज्यशासनाने पैसे दिले असून काम सुरू करायचे आहे. परंतु, पंढरपूर-विजापूर रेल्वेसाठीही मागील काळात केंद्र सरकारला विनंती केली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. 

पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजमाफी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेतकरी समृद्ध, मजबूत होईल अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात काम केले आहे. ही वारी वारकऱ्यांना आनंद देणारी स्वच्छ आणि सुंदर अशी वारी होत आहे. जवळपास ३५ लाख वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. पंढरी कॉरिडॉरच्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी पायाभूत सोयी निर्माण करण्याचा मानस मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी परिचारक यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख करत कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात ‘इन्फ्रामॅन : देवेंद्र फडणवीस- मेकिंग ऑफ महाराष्ट्रा’ या पुस्तकाचे तसेच निवासी मूकबधिर विद्यालय पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील दालनांना भेट देऊन माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात वारकरी, शेतकरी उपस्थित होते.

0000



महिला व बालविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



·         सनियंत्रण समिती व जिल्हास्तरीय ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ टास्कफोर्स बैठकीत विविध योजनांचा आढावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी. तसेच महिला व बालकांना आवश्यक सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

महिला व बालविकास विभागाच्या सनियंत्रण समितीची तसेच जिल्हास्तरीय ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेंतर्गत टास्कफोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, विधी सल्लागार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, केंद्र प्रशासक, समुपदेशक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजना, वन स्टॉप सेंटर तसेच महिला समुपदेशन केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र पुरस्कृत विविध योजनांची जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच हिंगोली येथे वन स्टॉप सेंटरच्या स्वतंत्र इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

******

महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त तपासणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



 

·         शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी, वजन-उंची मोजणी व लसीकरणावर भर

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त तपासणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. तसेच प्रत्येक बालकाची वजन व उंची मोजणी, पोषणस्थितीचे मूल्यमापन आणि नियमित लसीकरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त तपासणीबाबतची आढावा बैठक आज (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे यांनी प्रास्ताविक करून संयुक्त तपासणी मोहिमेची उद्दिष्टे, नियोजन व अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आरोग्य विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरबीएसके पथके तसेच अंगणवाडी सेविका यांची भूमिका स्पष्ट केली. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अंगणवाडी केंद्रातील प्रत्येक बालकाचे वजन व उंची मोजणे, आरोग्य तपासणी करणे, पोषणस्थितीचे मूल्यमापन करणे आणि लसीकरणाची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रतिनिधी, बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे, विस्तार अधिकारी अविनाश बोथीकर तसेच सर्व पर्यवेक्षिका प्रत्यक्ष उपस्थित होत्या. तर सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी  यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग नोंदविला.

*****