23 April, 2026

लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार - डॉ. मोहंती


• प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन


हिंगोली, दि. २३ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी केले. 

दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज गुरुवार (दि.२३) रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

या प्रसंगी प्रकल्पाच्या साईट ऑफिस इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, डीसीएसईएमचे संचालक के. महापात्रा, आरआरसीएटीचे संचालक व्ही. पी. भनागे, आयपीआरचे संचालक डॉ. तपस गांगुली तसेच आययूकेए, पुणेचे संचालक आर. श्रीआनंद यांच्यासह संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


लिगो इंडिया प्रकल्प हा गुरुत्वीय तरंगांचा शोध व अभ्यासासाठी उभारला जाणारा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून, या माध्यमातून अवकाशातील सूक्ष्म कंपनांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे ‘एल’ आकारातील दोन भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या निर्वात प्रणालीमुळे अत्यल्प पातळीवरील हालचालींचे अचूक मोजमाप शक्य होणार आहे.

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग व विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत गुरुत्वीय तरंग संशोधनात अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीची विशेष ओळख असलेल्या 'यलो गोल्ड' हळदीचे बॉक्स प्रमुख अतिथींना भेट दिले.

******







 उष्णतेच्या लाटेपासून कामगारांचे संरक्षण करा



• जिल्हा कामगार कार्यालयाचे आस्थापना मालकांना आवाहन



हिंगोली, दि. २३ (जिमाका) :

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट तीव्र होत असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत कामगार कार्यालयाने सर्व आस्थापना मालकांना कामगारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आवाहन केले आहे.

सचिव, श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स, रिटेल व्यवसाय आदींनी कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कामगारांच्या संरक्षणासाठी खालील उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणे, कामाच्या ठिकाणी सावली व विश्रांतीची व्यवस्था करणे, दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात काम टाळणे किंवा कामाच्या वेळेत बदल करणे, तसेच उष्माघाताबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

याशिवाय, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवणे, जड शारीरिक कामे दुपारच्या वेळेत टाळणे, बांधकाम क्षेत्रात कामगारांसाठी आईस पॅक व थंडावा देणाऱ्या सुविधा उपलब्ध करणे, तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित तपासणी करणे यावर भर देण्यात आला आहे.

तसेच, कामगारांना उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करावे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा सूचना व आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शविणारे पोस्टर्स व बॅनर्स लावावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेच्या तीव्रतेमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणारा धोका लक्षात घेता सर्व आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हा कामगार कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

*****

 गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील प्रकल्पात जास्तीचा पाणीसाठा


* पाण्याचा काटकसरीने वापर करावा– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. 23 (जिमाका): यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आजघडीला अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जिल्ह्यासाठी दिलासादायक असला, तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धरणे, तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सध्या समाधानकारक साठा असून, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी पुरेसा ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

      नागरिकांनी दैनंदिन वापरात पाण्याची बचत करण्यावर भर द्यावा, तसेच शेती क्षेत्रात ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पाणी गळती रोखणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबवणे आणि जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित विभागांना पाणीसाठ्याचे नियमित परीक्षण करण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच जलसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन शक्य होणार असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नमूद केले.

*मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली असून, इसापूर धरणात 597.63 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, तो 61.99 टक्के आहे. हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात 524.68 दलघमी म्हणजे 64.79 टक्के आहे तर सिद्धेश्वर धरण प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 14.97 द.ल.घ.मी. असा कमी दिसत असला तरीही येलदरी धरण प्रकल्पात यंदाचा अधिक साठा करण्यात आला आहे.* 

  राज्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठी पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 53.36%, (गतवर्षी 41.72%) असून, त्याखालोखाल अमरावती विभाग 51.08% (43.98), नागपूर 48.54%, नाशिक 48.32%, कोकण 43.42% आणि सर्वात कमी पाणीसाठा हा पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये असून, त्याची टक्केवारी ही 35.50% इतकी आहे. राज्यातील मोठ्या धरणातील उपायुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही गतवर्षी आजच्या दिवशी 36.08% होती तर आजघडीला 43.43% आहे. तर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही गतवर्षीच्या तुलनेत जास्त असून, यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक (53.23) असून, त्याखालोखाल कोकण (52.72), अमरावती (49.73), छत्रपती संभाजीनगर (44.08), नाशिक (43.92) आणि सर्वात कमी नागपूर (31.74 टक्के) विभागात आहे. राज्यातील मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत 46.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर लहान प्रकल्पाची पाणीसाठ्याची स्थिती अमरावती विभागात सर्वाधिक 58.77,कोकण 52.68, नागपूर 46.86, छत्रपती संभाजीनगर 41.74, नाशिक 37.60 तर सर्वात कमी पाणीसाठा 37.15 टक्के आहे. 

 मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता, येथील सर्व धरण प्रकल्पांमध्ये 5484.66 दश लक्ष घन मीटर पाणीसाठा असून, तो पुणे विभागानंतर सर्वाधिक आहे. राज्यातील सर्व धरण प्रकल्पातील पाणीसाठा हा 25732.38 द.ल.घ.मी इतका आहे. 

******



22 April, 2026

मतदार यादी मॅपींगसाठी जिल्हाधिकाऱ्यांची थेट मतदारांशी भेट

 

हिंगोली, दि. २२ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये लवकरच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात मतदार मॅपींगच्या कामाला वेग देण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज ९४-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत मॅपींगच्या कामकाजाची पडताळणी केली.

जिल्ह्यात मतदार मॅपींगची प्रक्रिया दिनांक २० जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ९२-वसमत मतदारसंघात ८७.१७ टक्के, ९३-कळमनुरी मतदारसंघात ९०.२० टक्के आणि ९४-हिंगोली मतदारसंघात ८७.७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण प्रगती दर ८८.३६ टक्के असून अद्याप सुमारे १ लाख १४ हजार मतदारांचे मॅपींग बाकी आहे.

कामकाजात समाधानकारक प्रगती न झाल्यामुळे ५५ टक्क्यांपेक्षा कमी मॅपींग असलेल्या १२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मतदार मॅपींग १०० टक्के पूर्ण करण्यासाठी दिनांक २५ व २६ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात दिवसभर काम करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार सिताराम साळसुंदर व मंगला मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आपल्या पालक/आजोबांच्या नावाचा तपशील संबंधित केंद्रस्तरीय अधिका-याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*****






रुग्णांना मोठा दिलासा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल

 


हिंगोली, दि.२२ (जिमाका) : गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, अर्ज थेट रुग्णालयातूनच सादर केला जाणार आहे. यामुळे अर्जासाठी होणारी कागदपत्रांची धावपळ थांबणार असून, अवघ्या ८ तासांत निधीला मंजुरी मिळणार असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात मागील वर्षभरात ६८ रुग्णांना सुमारे ५१ लाख ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देणारी ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे.

शासनाच्या इतर आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र रुग्णांसाठी हा निधी मोठा आधार ठरत असून, आता रुग्णालयाकडूनच ऑनलाइन अर्ज सादर करण्यात येणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर कागदपत्रांची तत्काळ पडताळणी करून ८ तासांत मंजुरी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उपचारात होणारा विलंब टळणार आहे.

या योजनेअंतर्गत कोक्लिअर इम्प्लांट (२ ते ५ वर्षे वयोगट), हृदयविकार, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, गुडघा व हात प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, बाल शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, थॅलेसिमिया, केमोथेरपी/रेडिएशन, अंधत्व, नवजात शिशूंचे आजार, भाजलेल्या रुग्णांचे उपचार तसेच विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा सुमारे २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे व पाठपुरावा करण्याची संपूर्ण जबाबदारी आता रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवरील मानसिक व आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले यांनी दिली.

CSR निधीतून सहकार्याचे आवाहन

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत विविध स्तरावर मदत केली जाते. अनेक रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहतात. अशा रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उद्योग, संस्था व दानशूर व्यक्तींनी आपल्या CSR (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) निधीतून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबईचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

बँक तपशील :

Account Name – Chief Minister's Relief Fund

Account Number – 10972433751

IFSC Code – SBIN0000300

समाजसेवेच्या या उपक्रमात सहभागातून अनेक गरजू रुग्णांना उपचाराची संधी मिळून त्यांच्या कुटुंबाला आधार मिळणार असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

*****

जिल्हा वार्षिक योजनेतून बाजार समितीतील आडतींचे बळकटीकरण – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. २२ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन झाल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये दररोज १०० हून अधिक वाहनांची आवक होत आहे. वाढत्या कृषिमालामुळे बाजार समिती परिसरात जागेची कमतरता, साठवण क्षमतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांची अपुरी उपलब्धता यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी, व्यापारी व आडती यांच्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजार समितीतील आडतीचे बळकटीकरण करण्यात येणार असून, परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कृषिमालाच्या वाढत्या आवकेमुळे विद्यमान जागा अपुरी पडत असल्याने शेतकऱ्यांचा माल खुल्या जागेत ठेवावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून साठवण क्षमतेत वाढ, नवीन गोदाम उभारणी तसेच अतिरिक्त जागेचा पर्याय यावर प्रशासन गंभीरपणे विचार करत आहे.

बाजार समितीचे आधुनिकीकरण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी पुढे सांगितले की, वजनकाटा, लिलाव व्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारा आदी सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना माल विक्री प्रक्रियेत सुलभता मिळावी आणि कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषिमालाच्या बाजारभावाबाबत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन दर निश्चित करत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजारभावातील तफावत किंवा इतर अडचणी वरिष्ठ पातळीवरील संबंधित संस्था, एनसीडीईएक्स किंवा स्पॉट एजन्सीकडे पाठवून त्यावर पाठपुरावा करता येतो.

हिंगोली जिल्हा हळद उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जात असून, येथील हळदीला राष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. त्यामुळे बाजार समितीतील सुविधा सक्षम झाल्यास शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, चांगला भाव आणि विक्रीसाठी अनुकूल वातावरण मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव हळद मार्केट येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, व्यापारी, आडती व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

****






भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 

हिंगोली, दि. २२ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी भांडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यसेवा, सुविधा व स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसरासह केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली.

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रात करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता, अँब्युलन्स शेड तसेच नळ दुरुस्तीच्या कामांची माहिती घेतली. उपस्थिती पटलाची पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही विचारणा केली. तसेच केंद्रात होणाऱ्या सरासरी प्रसूती, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या आणि एन-क्वॉस गुणांकनाबाबत माहिती जाणून घेतली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक गट्टू यांनी यावेळी माहिती देताना, प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी २ ते ३ प्रसूती होत असून दररोज ३० ते ५० रुग्ण बाह्यरुग्ण विभाग सेवेसाठी येत असल्याचे सांगितले. एन-क्वॉस स्वयंमूल्यांकनात केंद्राला ७६ टक्के गुण मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. स्वच्छतेसाठी केंद्रात एक परिचर उपलब्ध असून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भांडेगाव येथील एका महिलेची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र परिसरातील वृक्षांचीही पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक गट्टू, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश घुले तसेच जीएनएम आशा भवर उपस्थित होत्या.

*****