18 July, 2026

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १३८ व्या राष्ट्रीय लोकअदालतीत ७० प्रकरणांचा निकाली निपटारा

  

• विशेष लोकअदालतीत १ कोटी ३ लाख ६६ हजार ६११ रुपयांची वसुली


हिंगोली, दि. १८ (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने १८ जुलै २०२६ रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यात १३८ व्या राष्ट्रीय लोकअदालतीअंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या विशेष लोकअदालतीत दाखल झालेल्या प्रकरणांपैकी ७० प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून एकूण १ कोटी ३ लाख ६६ हजार ६११ रुपयांची वसुली करण्यात आली.

विशेष लोकअदालतीत स्पेशल ड्राइव्ह (१३८ एन.आय. ॲक्ट) अंतर्गत प्रकरणे सुनावणीस घेण्यात आली. पक्षकारांमध्ये सामंजस्य निर्माण करून प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यात आल्याने न्यायप्रक्रियेला गती मिळाली तसेच संबंधित पक्षकारांचा वेळ आणि खर्चाचीही बचत झाली.

ही विशेष लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सातवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव बी. एम. काळे, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी, तसेच सर्व अधिवक्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अधिकाधिक नागरिकांनी लोकअदालतीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.

*****


राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट्ससाठी अनुदान

 

* तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिट्ससाठी 20 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अर्ज करा



हिंगोली (जिमाका), दि. 18 : हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, भुईमूग, तीळ, करडई आदी तेलबिया तसेच तूर, हरभरा, मुग, उडीद यांसारख्या कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान 2026-27 अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिली आहे.


या योजनेअंतर्गत 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 14.40 लाख रुपये (यापैकी जे कमी असेल ते) अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक व खासगी उद्योग तसेच समूह आधारित व्यवसाय संस्था पात्र असून मूल्य साखळी भागीदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर करण्यात येईल.

तेलबिया प्रक्रियेसाठी 10 टन प्रतिदिन क्षमतेच्या तेल काढणी युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9.90 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच फिल्टर प्रेससह मिनी ऑईल मिलसाठी यंत्रसामग्रीच्या किमतीच्या 40 ते 50 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपये, तर फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑईल मिलसाठी 40 ते 50 टक्के किंवा कमाल 3 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. या योजनेसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, नोंदणीकृत उद्योग आणि मूल्य साखळी भागीदार पात्र आहेत.

कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट स्थापन करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 25 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तरावरील महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच 21 वर्षे पूर्ण झालेले वैयक्तिक उद्योजक पात्र आहेत. संबंधित युनिटची क्षमता किमान 300 किलो प्रति तास असणे तसेच एफएसएसएआय नोंदणी आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.


या योजनांतील अनुदान क्रेडिट-लिंक्ड बँक सबसिडी स्वरूपात असल्याने लाभार्थ्यांनी बँकेचे कर्ज घेणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम स्वतःकडून उभारावी लागणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर 'कृषी मॅपर' ॲपद्वारे जिओ-टॅगिंग करणे, माहिती फलक उभारणे तसेच तेलबिया प्रकल्पाची किमान पाच वर्षे आणि कडधान्य प्रक्रिया युनिटची किमान तीन वर्षे देखभाल करणे बंधनकारक आहे. एकाच घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही.

इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. अर्जासोबत जीएसटी नोंदणीकृत पुरवठादारांकडील यंत्रसामग्रीची अधिकृत दरपत्रके जोडणे अनिवार्य आहे. प्राप्त अर्जांची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता जिल्हा तेलबिया अभियान समिती किंवा जिल्हा कार्यकारी समितीमार्फत तपासून अंतिम निवड करण्यात येणार आहे.

या योजनांमुळे जिल्ह्यातील तेलबिया व कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना काढणीनंतर होणारे नुकसान कमी होऊन स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर लाभ दिला जाणार असल्याने पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था व तरुण उद्योजकांनी 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑफलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*******

विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानाची पाहणी; पात्र एकही मतदार वंचित राहू नये – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

* जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा कळमनुरी दौरा


हिंगोली (जिमाका), दि. 18 : विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान प्रभावीपणे राबवून पात्र एकही मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती, स्थलांतर आदी प्रक्रियेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधून मतदार नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करून त्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मतदार यादी अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविकांत दरक यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी


या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, उपचार व्यवस्था, औषधांचा उपलब्ध साठा तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा त्यांनी आढावा घेतला. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर व वेळेत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर त्यांनी शहरातील पुलाचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली.

******* 









17 July, 2026

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या 'संवाद-2025' योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने 'संवाद -2025' योजनेअंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 2, तसेच आदिवासी मुलांचे वसतिगृह -1 हिंगोली येथे आयोजित या कार्यक्रमात वंचित, अनुसूचित, आदिवासी व विमुक्त भटक्या जमातींना न्याय सुलभ करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून त्यांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीचे सचिव बी. एम. काळे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना मोफत कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरजू नागरिकांनी मदतीसाठी 15100 या हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी रमेश भडके, गृहपाल श्री. दुबळकर, अच्युत बचाटे, तसेच आदिवासी वसतिगृहातील कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य केले.

*****

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी हिवरखेडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली तसेच एकता बहुउद्देशीय महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेनगाव तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथे ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीस प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण रक्त तपासणी (सीबीसी), रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, हृदय विद्युत आलेख (ईसीजी), वजन मोजणी, अस्थमा, डोळे तसेच कान-नाक-घसा आदी विविध तपासण्या करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी, सेनगाव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरा यांचे विशेष सहकार्य लाभले. हिवरखेडा व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विजय रहाटे, परिचारिका प्रीती धबडगे, एमपीडब्ल्यू बाळू काकडे, आशा सेविका रेणुका गायकवाड, अंगणवाडी सेविका आर. एन. जाधव, पोलीस पाटील रूपाली राऊत, सरपंच पूजा मस्के, उपसरपंच चंद्रभागा फुफाटे, ग्रामपंचायत सदस्य मीना निरगुडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिराचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा समन्वयक वैभव कांबळे व दत्तराज मगर यांनी विशेष परिश्रम घेतले. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा

चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन

 - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

·         शाळांतील स्वच्छतागृहांची कामेही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपूल भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आसावरी काळे, सर्व गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) येथील अधिव्याख्याते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमधील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी गणित व इंग्रजी विषयांवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेतून चार हजार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रभावी सरावासाठी पाच हजार प्रश्नांचा प्रश्नसंच तयार करण्यात आला असून, चालू शैक्षणिक वर्षात त्याचा नियमित सराव घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात निपुण 3.0 अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय निर्माण करणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

या बैठकीत चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील, यासाठी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच मुलींसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांचे प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे, ती तात्काळ दूर करून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

******

जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा

 

ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध नळ पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाचा सखोल आढावा घेण्यात आला. अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांची कामे गतीने पूर्ण करून ग्रामीण नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळेल, यावर विशेष भर देण्यात आला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या डोंगरकडा, आरळ तसेच इतर पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय पानकनेरगाव, जवळा बाजार, शिरड शहापूर आणि गोरेगाव येथील योजनांच्या प्रगतीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

विद्युत जोडणीअभावी प्रलंबित असलेल्या सिरला, टाकळगव्हाण, तपोवन, फत्तेपूर, ब्राह्मणगाव, खापरखेडा, राजापूर, चिखली, वांझोळा, हिंगणी, मसोड, हिवरा तर्फे जवळा, शिवणी बु. आणि वरुड काझीसह अन्य गावांतील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असून, आवश्यक विद्युत जोडणीची विहित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या योजना कार्यान्वित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सादर करण्यात आलेल्या नियोजनानुसार प्रत्यक्षात कामे पूर्ण होत आहेत की नाही, यावर नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी, तांत्रिक उणिवा व प्रलंबित बाबींची तात्काळ पूर्तता करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

जलजीवन मिशनचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविणे हे असून, योजनेची सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

*******