28 June, 2026

आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते लासिना येथे पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन






हिंगोली, दि. २८  जून : राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा संचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण (मुंबई) यांचे आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील लासिना येथील अंगणवाडी शाळेत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्त संजय काटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

यावेळी आरोग्य सेवा पुणे येथील उपसंचालिका डॉ. बबिता कमलाकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सरपंच वनमाला काळे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास शिंदे तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शेतातील महत्त्वाचे काम सोडून आज सर्वजण आपल्या बालकांना  पोलिओचा डोस पाजण्यासाठी बूथवर घेऊन आले हे पाहून मला खरोखर आनंद झाला असल्याचे सांगून ते म्हणाले की, बालकाच्या आरोग्याची काळजी प्रत्येक कुटुंब घेत असते या काळजी मध्ये प्रशासन सुद्धा सहभागी आहे.

 या मोहिमेकडे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे याची प्रतिमात्मक घटना म्हणून बघण्यास हरकत नाही.

या जिल्ह्यामध्ये सर्वजण आरोग्याचे नेतृत्व चांगले करत आहे. आपण ज्या ताकतीने पायाभूत एक सामाजिक बांधिलकी, नेतृत्व, एक संस्कार म्हणून  जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात नेतृत्व देत आहात ते निश्चित प्रशांसनीय आहे, मला खात्री आहे.  या जिल्ह्यासाठी पालक आणि आरोग्य विभाग चांगले योगदान देऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा उल्लेखनीय कार्य करीत आहे, याची आरोग्य प्रशासनाला जाणीव असल्याचे आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केले. हिंगोली जिल्ह्यात नवजात बालकांच्या आरोग्यासाठी चांगले काम होत आहे.  जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळाले. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन यावेळी पालकांना केले.

******

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार


महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर... एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता कोलमडून गेला आहे. कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ते म्हणजेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’.ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक  संकटात  सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे.


महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात

राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.


योजनेचे त्रिसूत्र कर्जमुक्ती एकवेळा समजोता आणि प्रोत्साहनपर लाभ


या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही तर, विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून याची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन घटकांचा समावेश आहे:

यात २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती: जे शेतकरी थकबाकीदार आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जात आहे. यापूर्वीच्या 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे.


एकवेळ समझोता योजना (OTS): ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) म्हणजेच एकवेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी 

आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर, राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात  जमा करणार आहे. 

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन: अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये, म्हणून शासनाने त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.


डिजिटल तंत्रज्ञान आणि पारदर्शकता


 कर्जमुक्तीयोजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने 

'महाआयटी'च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि  आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे.

सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन: 

 आधार प्रमाणिकर अनिवार्य


शेकऱ्यांनीयोजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे.पात्र शेकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह 'आपले सरकार सेवा केंद्रात' किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली, की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल.आणि  एकवेळ समझोता (OTS) योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा  हिश्शाची रक्कम  भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ  शेकऱ्यांच्या  कर्जखात्यात जमा होईल.यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.


तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा


योजनेच्या पारदर्शकतेवर शासनाने विशेष भर दिला आहे. कर्जखात्याच्या माहितीत किंवा बँक तपशीलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना  दाद मागता यावी, म्हणून  सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. तसेच या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समितीसुद्धा  नियुक्त करण्यात आली आहे.


प्रशासकीय समन्वय


सहकार विभाग, जिल्हाधिकारी, बँका, महाआयटी, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासन या सर्व घटकांमध्ये राज्य शासनाने अचूक समन्वय साधला आहे. विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान झाली आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा 'कर्जमुक्त' होऊन 'कर्जपात्र' होणार आहेत. त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू कर्जमुक्तीचा  लाभ राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी गती, नवी ऊर्जा आणि बळिराजाला सन्मानाने जगण्याचा नवा विश्वास देणारा ठरणार आहे.


काशीबाई थोरात-धायगुडे

(वरिष्ठ सहायक संचालक )

****

27 June, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ : बळीराजाला आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय


महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना" जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ होणार असून, यासाठी सुमारे ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

*योजनेची पार्श्वभूमी*

गेल्या काही वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
१) दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
पात्र शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जाची माफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले अल्पमुदतीचे पीककर्ज या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
२) नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन
ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे, अशा नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळणार आहे.
३) एकरकमी परतफेड योजना
ज्या शेतकऱ्यांनी मूळ कर्जाची काही रक्कम भरली आहे, त्यांना उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेचाही लाभ देण्यात येणार आहे.

*पात्रता निकष*
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याने राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी किंवा इतर पात्र बँकांकडून घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज असावे. त्याचे दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्ज थकीत असावे. शासनाने निश्चित केलेल्या इतर अटी व निकषांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

*अँग्रीस्टॅक नोंदणीचे महत्त्व*

राज्य शासनाने कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अँग्रीस्टॅक नोंदणीला विशेष महत्त्व दिले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होऊन लाभाचे वितरण सुलभ होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
कर्जमाफीसाठी आधार कार्ड, शेतक-यांचा सातबारा उतारा, बँक पासबुक, कर्ज खात्याची माहिती, अँग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक
इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते.

*योजनेचा अपेक्षित परिणाम*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होऊन त्यांना नव्याने शेतीसाठी कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल. कर्जमुक्त झाल्यानंतर शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती व्यवसाय करू शकतील. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान आणि एकरकमी परतफेड योजना या माध्यमातून लाखो शेतकरी कर्जमुक्त होऊन नव्या उमेदीने शेती करू शकतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, शेतक-यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी व प्रक्रियांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

शब्दांकन : 
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******

26 June, 2026

खरीप हंगामासाठी युरिया ४९० तर ३७८ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा वितरित करण्यास मंजुरी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार तालुकानिहाय वितरण

 

हिंगोली, (जिमाका) दि. २६ : खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यातील संरक्षित (बफर) साठ्यातील एकूण ८६८ मेट्रीक टन डीएपी व युरिया खताच्या वितरणास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी एकूण १९५० मेट्रीक टन युरिया व ५४० मेट्रिक टन डीएपीपैकी युरिया ४९० मेट्रिक टन व ३७८ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा वितरित करण्यास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज मंजुरी दिली.


कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हास्तरीय संरक्षित साठा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या., नांदेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून संरक्षित ठेवण्यात आलेल्या डीएपी खताच्या ३७८ मेट्रीक टन साठ्याच्या वितरणास मंजुरी देण्यात आली असून, तालुकानिहाय मेट्रीक टन परिमाणात वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली ७६, कळमनुरी  ७६, वसमत ७६, औंढा नागनाथ ७५, सेनगाव ७५ असा एकूण ३७८ मेट्रीक टन डीएपी तसेच युरिया खताच्या एकूण ४९० मेट्रीक टन संरक्षित साठ्याच्या वितरणासही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत २५० मेट्रीक टन व महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळामार्फत २४० मेट्रीक टन युरिया खत तालुकानिहाय वितरित करण्यात येणार आहे. तालुकानिहाय युरिया हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, आणि सेनगाव अशा सर्वच तालुक्यात प्रत्येकी ९८ मेट्रिक टन मिळाला आहे. 

सर्व तालुक्यांमध्ये कोणत्याही विक्रेत्याकडे खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच इतर निविष्ठा केंद्रांवरही खत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

खत विक्री करताना कृषि अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषि अधिकारी कार्यालय अथवा पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आधारकार्डच्या आधारे ई-पॉस मशीनद्वारे शेतकऱ्यांना खत वितरित करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही संबंधित कृषि कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने नोडल संस्थांना तालुकानिहाय मंजूर केलेल्या वाटपामध्ये कोणताही बदल न करता निर्धारित प्रमाणात खताचे वितरण करून त्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


*******

स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागेश्वर विकास आराखडा तयार करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ


•पालकमंत्र्यांनी घेतला आढावा


हिंगोली, (जिमाका) दि. २६ : जिल्ह्यातील ८ वे ज्योर्तिलिंग असलेल्या दारुकावने श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिराचा १८२.८३ कोटी रुपयांचा बृहद विकास आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच येथील जुणे जाणकार यांच्याशी चर्चा करून त्यानुसार विकासकामे हाती घेण्याच्या सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना केल्या.


औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग दर्जाची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरु असून, येथील राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व विभागामार्फत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, त्याचा पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. 


यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, विभागीय सहआयुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.चव्हाण उपस्थित होते. 


पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्याचे उत्तम नियोजन केले असून, यानुसार कामे झाल्यास मंदिर परिसराचा कायापालट होईल, असे सांगत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विशेष कौतुक केले. येथील विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना, तसेच येथील जुने जाणकारांना विश्वासात घेऊन कामे करावीत, अशाही सूचना दिल्या. 


 यावेळी खासदार रामराव वडकुते यांनी मंदिर परिसराचा विकासकामे करताना येथे देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे नागेश्वराच्या भक्तांना दर्शन व्हावे. त्यासाठी दर्शनरांगेत भक्त असताना बाजूच्या भिंती अथवा दर्शनी भागात ते दिसतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. 


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी १८२.८३ कोटी रुपयांतून तयार होणा-या औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्यातील नियोजनानुसार माहिती देताना येथील संकल्पचित्रानुसार विकासकामे होतील, असे सांगितले. प्रस्तावित संकल्पचित्रानुसार आतापर्यंत उच्चाधिकार समितीकडे तीन आढावा बैठका झाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील सर्व विकास कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून दारुकावने येथील पौराणिक महत्त्व त्यांनी विशद केले. 


येथे येणा-या भक्तांसाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असणारी दर्शनरांग, भक्त निवास, वाहनतळ, व्हीआयपी भक्त निवासाचे बांधकाम करण्यात येणार असून, मंदिर परिसरातील अतिक्रमित दुकाने हटविली आहेत. तसेच येथे नवीन ५६ दुकाने नव्याने बांधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.

श्रावण महिन्यात भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तात्काळ किंवा कमीत कमी वेळात दर्शन करून देण्याबाबतची योजनाही त्यांनी सांगितली. मंदिर परिसरात यापुढे पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे सांगून, भक्तांना रांगेतूनच मंदिराच्या शिखराचे दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सादरीकरणातून सांगितले.


मंदिरातील कचरा व्यवस्थापन, घाण साचणार नाही, तसेच मंदिराच्या गाभा-यात खेळती हवा राहील, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच रुद्राभिषेक व तिकीट काउंटरची व्यवस्था आणि तब्बल ५ हजार भक्त दर्शनरांगेत बसू शकतील, त्यांची प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.


 *भक्तांना येणार 'दारुकावने'चा फील*


मंदिर परिसरात भक्तांनी दर्शन केल्यानंतर मूळ दारुकावनेत विसावलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात त्यांना दारुकावनेत असल्याचा फिल येईल, असा स्थानिक जातीच्या वृक्षराजीने मंदिर परिसर विकसित करण्यात येईल. तसेच चालुक्य कालीन दरवाजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी  नागेश्वर मंदिरात संरक्षणास्तव ठेवलेले स्तंभही येथे संरक्षित करण्यात येणार आहेत. भक्तांच्या संरक्षणार्थ दोन पोलीस चौकी, चप्पल स्टँड, प्रतिक्षालय, दर्शन मंडप, विशेष पूजा, अभिषेक आणि दर्शनरांगेत असताना भाविकांना पूर्णवेळ नागेश्वराचे मुखदर्शन होईल, असे नियोजित आहे. येथे मूर्तिसंग्रहालयही विकसित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. 

तसेच मूळ मंदिराभोवती इतर जवळपास १९ मंदिरे असून, ती विकसित करण्यात येतील. हरिहर कुंडालाही पुनर्जीवित व मंदिर संवर्धित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. 

*****


सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रभात फेरी; महापुरुषांना अभिवादन

 







हिंगोली(जिमाका), दि. २६ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून आज हिंगोली येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सामाजिक न्याय दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथील सुमारे २०० ते २५० विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

या प्रभात फेरीस समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय केंद्रे, पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस निरीक्षक संदीप मोघे, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, विशेष अधिकारी अमोल घुगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी बबन मोरे, गृहपाल सुलोचना ढोणे, धनश्री अवचार, विजयकुमार सोनटक्के, आरती वांझोळकर, प्रशांतकुमार बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या प्रभात फेरीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, महाराज अग्रसेन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना तसेच संविधान कॉर्नर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नशामुक्ती अभियान व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणविषयक विचारांवर आधारित घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

प्रभात फेरीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे झाला. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व कर्मचारी यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******


जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

********