19 June, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 2026 ही परीक्षा दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांतील 1729 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून परीक्षा पारदर्शक, निकोप व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी पेपर-1 साठी 701 आणि पेपर-2 साठी 1028 केंद्रांवर एकूण 18,717 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सर्व उमेदवारांची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी आणि फेस रेकग्निशन करण्यात येणार आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटरसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित असून राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज, मॉर्फ केलेले फोटो तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी ‘फोटो व्ह्यू’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजेपर्यंत आणि पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशपत्रे 16 जून 2026 पासून उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती वेळेत डाउनलोड करून घ्यावीत. परीक्षेबाबत केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच ग्राह्य धरावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.

******

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धडक तपासण्या करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित आणि अचानक तपासणी करून आवश्यक तेथे कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा (पीसीपीएनडीटी) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

राज्यात तसेच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा वापर वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा व तालुका समुचित प्राधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन तपासण्या कराव्यात आणि आवश्यक त्या कायदेशीर कारवाया कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्ह्याच्या लिंगगुणोत्तर प्रमाणाचा आढावा घेण्यात आला. सन 2023 मध्ये हे प्रमाण 1000 मुलांमागे 897 मुली इतके होते. सन 2024 मध्ये ते वाढून 1000 मुलांमागे 961 मुली इतके झाले असून यात 64 अंकांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची त्रैमासिक तसेच अचानक तपासणी करण्याचे, तसेच आवश्यकतेनुसार स्टिंग ऑपरेशन व डिकॉय केसेस राबविण्याच्या सूचना सर्व समुचित प्राधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अनधिकृत गर्भपात रोखण्यासाठीही विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

गर्भलिंग निदानाविरोधात सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बक्षीस योजना, तक्रार नोंदणीची सुविधा, संकेतस्थळ आणि हेल्पलाईन क्रमांक यांची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात यापूर्वी 11 सोनोग्राफी केंद्रांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सध्या 3 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. समुचित प्राधिकाऱ्यांकडून नियमित तपासण्या, धडक मोहिमा आणि जनजागृती उपक्रम राबविले जात असून समाजात मुलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी समुपदेशनही केले जात आहे.

गर्भलिंग निदान किंवा अनधिकृत गर्भपाताबाबत माहिती असल्यास नागरिकांनी www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

*******

जिल्हा विकास आराखड्यातील कामांची प्रमाणपत्रे तात्काळ सादर करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

जिल्हा विकास आराखडा 2025-26 अंतर्गत हस्तक्षेपांच्या प्रगतीचा आढावा


हिंगोली (जिमाका), दि. 19: महास्ट्राईड प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत विविध विभागांमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या हस्तक्षेपांची उपयोगिता प्रमाणपत्रे, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे तात्काळ सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

महास्ट्राईड प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत विविध विभागांच्या हस्तक्षेपांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास बालाजी मरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग, विभागीय वन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी आणि यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महास्ट्राईड प्रकल्प आणि जिल्हा विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध हस्तक्षेपांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे सादर केल्यास कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रत्यक्ष परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच विविध विभागांनी आपल्या अखत्यारितील हस्तक्षेपांची अद्ययावत माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रभावी देखरेख ठेवता येईल आणि विकासकामांना गती देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. आगामी वर्षासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव संबंधित विभागांनी वेळेत सादर करावेत, जेणेकरून विकास आराखड्याची प्रभावी आखणी करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असून, मंजूर कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीत विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. विकासकामांची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


******

जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा; विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


नळ पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा आढावा ; त्रुटी दूर करण्याचे दिले निर्देश



हिंगोली(जिमाका), दि. 19 : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच विहित कालावधीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घेत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी आणि योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांची कामे वेगाने पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्येक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेत कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ज्या योजनांची कामे पूर्णत्वास आली आहेत, त्या योजनांचे तात्काळ कार्यान्वयन करून लाभार्थी गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविण्यात येत असलेल्या डोंगरकडा, आरळ यासह इतर पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. ज्या कंत्राटदारांकडून निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण होत नाहीत, त्यांची नावे शासनाच्या सचिवांना कळवून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

तसेच येत्या कालावधीत दरमहा किती कामे पूर्ण होणार आहेत, याचा सविस्तर कृती आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सादर केलेल्या नियोजनानुसार प्रत्यक्षात कामे पूर्ण होत आहेत की नाही, यावर नियमित लक्ष ठेवण्यास सांगितले. 

या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी, तांत्रिक उणिवा व प्रलंबित बाबींची पूर्तता करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, योजनेची सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. 

****

सर्व आरोग्य संस्थांनी एनक्यूएएस मानांकनासाठी गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


नियामक मंडळाच्या बैठकीत आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा



हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व इतर आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कामकाजात सुधारणा कराव्यात. एनक्यूएएसच्या अनुषंगाने सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून 31 जुलै 2026 पर्यंत आवश्यक पूर्तता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा तसेच एनक्यूएएस मानांकन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्यासह संबंधित‌ अधिकारी तसेच कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांनी जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी, दुरुस्ती व सुधारणा जिल्हा वार्षिक योजना तसेच उपलब्ध इतर निधीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी आवश्यक मंजुरी प्रस्ताव तात्काळ सादर करण्यासही सांगितले.

रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नमूद केले. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजना, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दर पंधरवड्याला बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व त्याबाबतचे अहवाल वेळेत सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

या कामात हलगर्जीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. डिसेंबर 2026 अखेरपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, सर्व संबंधितांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य देऊन गुणवत्तावृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

*****

पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहू नये : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न




हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. सुनील देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे, डॉ. नरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. नारायण शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकूण 1 लाख 23 हजार 956 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी 1 हजार 202 बुथ उभारण्यात येणार आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानके, चेकपोस्ट आणि साखर कारखान्यांवर ट्रांझिट टीममार्फत, तर वीटभट्ट्या व पालांवर मोबाईल टीममार्फत बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पर्यवेक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना दि. 28 जून रोजी जवळच्या पोलिओ बुथवर घेऊन जाऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच आरोग्य, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागांनी समन्वयाने काम करून मोहिमेची व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीच्या आयोजनासाठी मनिषा वडकुते, शीतल मानतकर, विजय पाठक आणि शेख मुनाफ यांनी परिश्रम घेतले.

***

18 June, 2026

पोलीस कवायत मैदानावर 21 जून रोजी भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

 

* नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


हिंगोली(जिमाका), दि. 18  : योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हिंगोली येथे भव्य योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 7 वाजता होणारा हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, युवक, क्रीडापटू, योगप्रेमी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा आणि विभागांतील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी विपुल भागवत, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, शासकीय तंत्रनिकेतनचे मुकेश सामलेटी, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक माधुरी दळवी, योग विद्या धामचे रत्नाकर महाजन, पतंजली योग समितीचे विठ्ठल सोळुंके तसेच विविध योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री. बोधवड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. योगाचा संदेश गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था, प्रवेशद्वार आणि इतर आवश्यक सुविधांबाबत क्रीडा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योगाचार्य आणि योग संघटनांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रम अधिक प्रभावी व व्यापक करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.

जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या योग दिन कार्यक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

***