13 May, 2026

राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्त जनजागृती मोहिमेचे आयोजन

 

*डेंग्यु नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांचे आवाहन*


हिंगोली(जिमाका), दि. १३ : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६ मे २०२६ रोजी राष्ट्रीय डेंग्यु दिन राज्यभर साजरा करण्यात येणार असून, हिंगोली जिल्ह्यातही विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डेंग्यु प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.


राज्यात तापाच्या साथीमध्ये विशेषतः डेंग्यु रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हवामानातील बदल तसेच अनेक भागांतील पाणीटंचाईमुळे नागरिकांकडून पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होत असल्याने डेंग्युचा धोका वाढत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

यावर्षी राष्ट्रीय डेंग्यु दिनाचे घोषवाक्य “डेंग्यु नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” असे आहे.


हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यु दिन यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य संस्थांचे अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग राहणार आहे.


राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्त पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सभा, जलद तापरुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तरीय बैठका, जनजागृती रॅली, ग्रामसभा, बाजारपेठांमध्ये प्रदर्शन, हस्तपत्रिका वाटप, आशा सेविकांसाठी कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम, दिंडी, डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण तसेच “एक दिवस कोरडा दिवस” पाळण्याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.


*डेंग्यु व चिकुनगुनियाची लक्षणे*


एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमित चाव्यानंतर साधारणपणे पाच ते सहा दिवसांनी डेंग्युची लागण होते. डेंग्यु ताप आणि डेंग्यु रक्तस्त्रावात्मक ताप हे गंभीर स्वरूपाचे असून काहीवेळा जीवघेणे ठरू शकतात. लहान मुलांमध्ये ताप सौम्य स्वरूपाचा असतो; मात्र प्रौढांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, डोळेदुखी, अंगदुखी तसेच अंगावर लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसून येतात.


*मोफत उपचाराची सुविधा*


डेंग्यु व चिकुनगुनिया आजारांवर सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.


*प्रतिबंधात्मक उपाययोजना*


डेंग्यु ताप हा विषाणूमुळे होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस एजिप्टाय डासांद्वारे होतो. हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात वाढतो. कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवल्यास त्यामध्ये डासांची अंडी व अळ्या तयार होतात. त्यामुळे पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करणे, झाकून ठेवणे आणि आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळणे आवश्यक आहे.


डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी मास्यांचा वापर, परिसर स्वच्छता, मच्छरदाणीचा वापर, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे तसेच डास चावू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


किटकजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.

*******

ज्येष्ठांसाठी मदतीचा विश्वासार्ह आधार : एल्डर लाईन १४५६७

 




            हिंगोली (जिमाका), दि. 13 : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले असून, ३० हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर याबाबत माहिती दिली जाते. तसेच मालमत्ता व कौटुंबिक वाद, कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७ संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

याशिवाय मानसिक ताण, चिंता, नैराश्य, एकटेपणा यांसारख्या समस्यांवर समुपदेशन करून भावनिक आधार दिला जातो. बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांना मदत व पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद साधणे, तसेच पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाते.

एल्डर लाईन १४५६७ ही केवळ हेल्पलाईन नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार ठरत आहे. या सेवेद्वारे वृद्धांच्या गरजा समजून घेत त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील प्रत्येकाने या सेवेबाबत जागरूकता निर्माण करून गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तिचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या हेल्पलाईनवर अनेक व्यथा, वेदना आणि तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक एल्डर लाईन १४५६७ हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत असून, या माध्यमातून त्यांना आवश्यक मदत व आधार मिळत आहे.

******

‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या पायाभूत विकासकामांवर भर

 




हिंगोली (जिमाका), दि. 13 : मौजे दुधाळा येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध विकासकामांबाबत आज दूरदृष्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध पायाभूत विकासकामांवर भर देण्यात आला असून, प्रकल्प पूर्ण करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले. 


या बैठकीला अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, अणुऊर्जा वित्त विभागाचे सहसचिव मुथु कृष्णन शंकर नारायणन, लिगो इंडिया प्रकल्प प्रमुख सेंधील राजा एस तसेच लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


तर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विन माने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग, पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.


जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पपूर्तीसाठी आवश्यक बाबी वेळेत पूर्ण करण्यात येतील. तसेच येथील प्रकल्पासाठी आवश्यक असणारे भूसंपादनही पूर्ण झाले असून, भविष्यात प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे स्वत: प्रकल्पाला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. 


बैठकीदरम्यान लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून 5 किलोमीटर, 15 किलोमीटर, 30 किलोमीटर आणि 60 किलोमीटर अंतराच्या परिघात लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्टोन क्रेशर उद्योग, खाणकाम व ब्लास्टिंग आधारित उद्योग, 20 अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग उद्योग, नवीन वीज प्रकल्प, पवनचक्की उभारणीवरील निर्बंध लादण्याबाबत चर्चा करण्यात आली. 


हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाच्या दृष्टीने हे निर्बंध लिगो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत शिथिल करण्यात यावेत, तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत केली. 


जिल्ह्यातील विकासकामांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये अणुऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिगो इंडिया एम्पावर्ड बोर्डामध्ये या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि सकारात्मक निर्णयासह आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाला बैठकीत दिले.


 या बैठकीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच लिगो इंडिया प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील काळात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

******

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 


            हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

माहे मे, 2026 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 18 मे) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.  

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

******

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण




मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.


*नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी*


नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

 सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.


➡️हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे.


➡️भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.


➡️त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती.


➡️काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

00000

12 May, 2026

हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे रोजी यलो अलर्ट जारी

 

* नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घ्यावी



हिंगोली(जिमाका), दि. १२ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी मंगळवार (दि.१२) रोजी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी दिनांक १४ व १५ मे २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्माघाताची शक्यता अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच स्थूल व्यक्तींनी उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे.


*उष्मालाट काळात घ्यावयाची काळजी*


तहान नसली तरी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत.

हलक्या रंगाचे, सैलसर व सुती कपडे वापरावेत.

घराबाहेर जाताना डोके झाकावे, टोपी, छत्री व गॉगलचा वापर करावा. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

अतिउष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे.


*नागरिकांनी टाळावयाच्या बाबी*


विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे व श्रमाची कामे करणे टाळावे.

अनवाणी बाहेर फिरू नये.

अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर राहील याची काळजी घ्यावी.

दारू, चहा, कॉफी व शीतपेये यांचे सेवन टाळावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

जास्त मीठ, तिखट, तेलकट तसेच उच्च प्रथिनयुक्त अन्नपदार्थ टाळावेत. शिळे अन्न सेवन करू नये.

उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

अनावश्यक उष्णता निर्माण करणारे चमकदार दिवे किंवा बल्बचा वापर टाळावा.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


*******

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी




हिंगोली(जिमाका), दि. १२ : पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पशुपालकांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने शासनामार्फत “मुरघास संयंत्र वाटप योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्र खरेदीसाठी भरघोस अनुदान देण्यात येणार असून, पात्र पशुपालक तसेच शेतकरी समुहगटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त  डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर व मुरघास बेलर संयंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत मर्यादा २६ लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान (कमाल रु. १३ लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदान (कमाल रु. १९.५० लाख) देण्यात येणार आहे.


*पात्रता निकष*


योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान १० मोठे पशुधन किंवा १०० शेळ्या / मेंढ्या असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या मालकीचा किमान ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेत अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी ५ टक्के तर महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.


*आवश्यक कागदपत्रे*


योजनेसाठी अर्ज करताना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी कार्ड, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र अथवा स्वनिधी उपलब्ध असल्यास त्यासंबंधी बँक स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र तसेच बचत गट सदस्यांनी संबंधित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.


*महत्त्वाच्या अटी*


निवड झालेल्या लाभार्थ्यांनी जिल्हा उपायुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आल्यानंतर एका महिन्याच्या आत आवश्यक रकमेचा भरणा करणे आवश्यक राहील. मंजुरीनंतर तीन महिन्यांच्या आत संयंत्र खरेदी करणे बंधनकारक असून, अन्यथा प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. उपकरणाच्या किंमतीत शासनाने निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च झाल्यास अतिरिक्त रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागेल. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

शेतकरी समुहगटांचाही समावेश

“वैरण विकास योजना” अंतर्गत “मुरघास संयंत्र वाटप योजनेव्दारे उद्योजकता विकास करणे” या उपक्रमात विविध शेतकरी समुहगटांचाही समावेश करण्यात आला आहे. यात सहकार अधिनियम अथवा धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत समूह आधारित संसाधन केंद्र तसेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघांचा समावेश आहे.

सदर संस्थांकडे किमान ५० शेतकरी सदस्य असणे, किमान ५ लाख रुपयांचे भागभांडवल असणे, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे व संस्था नफ्यात असणे आवश्यक आहे. पात्र समुहगटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार असून, शासनाने नमूद केलेल्या इतर सर्व अटी लागू राहतील.

पशुपालकांना चारा टंचाईवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पात्र पशुपालक व शेतकरी समुहगटांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******