हिंगोली, दि. 8 (जिमाका): महाराष्ट्र शासनाने भोगवटादार वर्ग-२ (सिलिंग) धारणाधिकारावरील जमिनींचे भोगवटादार वर्ग-१मध्ये रूपांतरण करण्यासाठी स्वतंत्र नियम अधिसूचित केले आहेत. यामुळे राज्यातील हजारो लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवर अधिक व्यापक मालकी हक्क प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग-२ चे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करणे) नियम, २०२६ या नावाने हे नियम लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत कलम २७ नुसार वाटप करण्यात आलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमिनींना हे नियम लागू राहतील.
या नव्या नियमांमुळे भोगवटादार वर्ग-२ जमिनींच्या धारकांना मालकी हक्क प्राप्त करण्यासाठी स्पष्ट, पारदर्शक व सुलभ प्रक्रिया उपलब्ध होणार असून जमीन व्यवस्थापन आणि व्यवहारांमध्ये अधिक सुसूत्रता येण्यास मदत होणार असल्याचे शासनाने अधिसूचनेत नमूद केले आहे.
नियमांनुसार जमीन वाटप झाल्यापासून किमान दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित भूधारकाला जिल्हाधिकाऱ्यांकडे रूपांतरणासाठी अर्ज करता येणार आहे. जमीन वाटप करताना घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले नसल्यास किंवा उल्लंघन झाले असल्यास ते सक्षम प्राधिकाऱ्याने नियमित केले असल्यासच रूपांतरणास मंजुरी दिली जाईल.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी तीन महिन्यांच्या आत जमिनीची व संबंधित अटींची पडताळणी करतील. सर्व बाबी समाधानकारक आढळल्यास निश्चित करण्यात आलेले रूपांतरण अधिमूल्य भरल्यानंतर १५ दिवसांच्या आत भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याचा अंतिम आदेश पारित करण्यात येईल.
शासनाने रूपांतरण अधिमूल्यासाठी स्वतंत्र दर निश्चित केले आहेत. महानगर प्रदेश, महानगरपालिका, नगर परिषद व त्यांच्या सीमावर्ती क्षेत्रांतील जमिनींसाठी वार्षिक दर विवरणपत्रानुसार निर्धारित मूल्याच्या ३० टक्केपर्यंत अधिमूल्य आकारण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागातील जमिनींसाठी हे प्रमाण २५ टक्के राहील. तसेच पूर्वपरवानगीने हस्तांतरित झालेल्या किंवा वापर बदललेल्या जमिनींसाठीही स्वतंत्र अधिमूल्याची तरतूद करण्यात आली आहे.
ज्या प्रकरणांमध्ये जमिनीचे बाजारमूल्य ५० लाख रुपयांपर्यंत असेल, त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार राहतील. मात्र ५० लाख रुपयांपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या जमिनींच्या रूपांतरणासाठी राज्य शासनाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहणार आहे.
******


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)



