01 May, 2026

आजपासून ऑनलाईन स्वगणनेला सुरुवात; नागरिकांनी सहभागी होऊन विकास प्रक्रियेला बळ द्यावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

हिंगोली जिल्ह्यात कृषी, महसूल, आरोग्य, रोजगार व सेवा हक्क क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती




हिंगोली, दि. 1 (जिमाका) : भारताच्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ होत असून ऑनलाईन स्वगणनेची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक घर, कुटुंब व मूलभूत सुविधा अशी एकूण 34 प्रकारची अचूक नोंद या प्रक्रियेतून होणार असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभागी होत विकास प्रक्रियेला बळ द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आज हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते.

            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

देशामध्ये 1872 पासून जनगणना केली जात आहे. आता ही 16वी जणगणना सुरु असून, स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ती दोन टप्प्यांत होणार असून, या जणगणनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात घरांची व मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. प्रथमच ऑनलाईन स्वगणना सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना स्वतः माहिती नोंदविण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात भेट देणारे प्रगणक व पर्यवेक्षक हे शासकीय ओळखपत्रासह येणार असल्याने नागरिकांनी त्यांना योग्य ते सहकार्य करावे, तर तोतया व्यक्तींपासून सावध राहण्याचेही आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामापूर्वी कृषी विभागामार्फत खतसाठ्याचे नियोजन केले असून शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे यासाठी कंपन्या व विक्रेत्यांशी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. साठेबाजी, जादा दर आकारणी, खत-बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारींसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 761 शेतकऱ्यांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून कृषी यांत्रिकीकरण व फळबाग लागवड योजनांमधूनही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत 26 महसूल मंडळांमध्ये शिबिरे घेऊन जवळपास 10 हजार प्रमाणपत्रे व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. ‘राजस्व अभियान’ अंतर्गत पोट हिस्सा मोजणीचे काम सुरू असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत.


जिल्ह्यात एलपीजी गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून आवश्यक मागणी पूर्ण केली जात आहे. केंद्र शासनाच्या साधना सप्ताहात हिंगोली जिल्हा परिषदेतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत द्वितीय क्रमांक मिळविल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर 311 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. बालविवाह निर्मूलन मोहिमेत वर्षभरात 52 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाद्वारे ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांनी “निरोगी गाव-सशक्त गाव-समृद्ध गाव” या ध्येयाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.


उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वित प्रयत्नांतून हिंगोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. 


यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार सचिन जोशी, महसूल सहायक रामेश्वर नांदणकर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एनआरसी, डिजिटल आयुष्यमान भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. नितीन तडस, डॉ. गोपाळ कदम, मुख कर्करोग उपचार व निदानमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. फैसल खान यांचा, बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या समासेविकांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आले. 

आदर्श तलाठी पुरस्कार, एसपीसीचे विद्यार्थी यांचा सन्मान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकारी, जिल्हा व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत खून प्रकरणातील पीडित व्यक्तींच्या वारसास नियुक्तीपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘ॲनिमिया मुक्त हिंगोली’ उपक्रमाच्या चित्ररथाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****







महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

 





 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते  आज ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

******

30 April, 2026

मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम


‘युआयडीएआय’चे निर्देश



हिंगोली (जिमाका), दि. 30: आधार कार्डमधील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत.

महाराष्ट्र दिनी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबद्दल रहिवाशांना माहिती देण्यासाठी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून जिल्हाधिकारी कार्यालयांना 'डिस्प्ले स्टँडी' वितरित करण्यात येत आहेत. विशेषतः 1 मे रोजीच्या ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यात विशेष 'एमबीयू' शिबिरे आयोजित केली जाणार असून, या ठिकाणी स्टँडीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल.

शाळा आणि शासकीय कार्यालयांत ही केवळ 1 मे पुरती निरंतर जनजागृती मर्यादित न राहता, ही मोहीम निरंतर राबवण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर या माहितीपर स्टँडीजचा वापर स्थानिक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी केला जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

मुलांचे आधार बायोमेट्रिक वेळेत अपडेट न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. ही अडचण टाळण्यासाठी जिल्ह्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****

स्वाधार ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी मंगळवारपर्यंत मुदत

 



हिंगोली (जिमाका), दि. 30: शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर केलेल्या ऑनलाईन अर्जांची नुकतीच तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 147 अर्ज विद्यार्थी लॉगिनवर त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. अर्जांची ऑनलाईन त्रुटी पूर्तता करण्यासाठी रविवार, दि.5 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असल्याचे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधा अभावी पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.


संबंधित विद्यार्थ्यांनी 05 मे 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्तता करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

****

आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

 


• तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध


हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४२३ रिक्त केंद्रे अशा एकूण ४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत दि.०२ जानेवारी २०२६ अखेर एकूण ३ हजार १०१ अर्ज प्राप्त झाले.

प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १ हजार ८६१ उमेदवारांच्या दि.३ ते दि.१२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर दि.०१ मार्च २०२६ रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या अंतरिम गुणवत्ता यादीवर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी दि.११ ते दि.१३ मार्च २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली होती.

या कालावधीत १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. त्यानुसार पात्र गुणदान करण्यात आले. तसेच तात्पुरत्या निवड यादीवरील ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्तेच्या आधारे न्यायनिर्णय करण्यात आला. यानंतर काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात बदल होऊन दि.१७ एप्रिल रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम गुणवत्ता यादीवर पुन्हा उमेदवारांकडून दि.२० ते दि.२२ एप्रिल या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत प्राप्त झालेल्या २५ हरकतींची सुनावणी करून त्यावरील निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात आला. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीत काही अंशतः बदल करण्यात आले असून सुधारित अंतिम गुणवत्ता यादी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.

तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी खालील वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

कागदपत्र पडताळणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उमेदवारांनी ४ मे २०२६ रोजी, वसमत तालुका दि.०५ मे रोजी,  

हिंगोली (शहरी व ग्रामीण) दि.०६ मे रोजी, *सेनगाव दि.०७ मे रोजी आणि  कळमनुरी तालुक्यातील उमेदवारांनी दि.०८ मे २०२६ रोजी* पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची छायांकित व स्वसाक्षांकित दोन प्रती, अलीकडील तीन रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्रे तसेच आपले सरकार सेवा केंद्र स्वीकारण्याबाबतचे संमतीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसार अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. यानंतर शासनाकडे युजरनेम व पासवर्ड मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक साक्षांकन नमुना व अग्रिम रक्कम भरण्याबाबत संबंधितांना यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

*****

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता





हिंगोली (जिमाका), दि.30: जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अतिवृष्टी, महापूर आदी आपत्तींचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देत आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.   

या  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, नगर परिषद, अग्निशमन विभाग, जलसंधारण विभागासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गुप्ता म्हणाले की, महसूल व पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या संपर्क क्रमांकांची अद्ययावत माहिती तयार ठेवावी. कृषि विभागाने संभाव्य महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा सज्ज ठेवावी. होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आकडेवारीत एकवाक्यता ठेवावी, जेणेकरून नुकसानीचा अचूक अंदाज येईल. जिल्ह्यातील कालवे, साठवण तलाव, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधकामे तसेच नद्यांवरील केटीवेअर यांच्या दुरुस्तीबाबतची माहिती तात्काळ सादर करून कालवे व तलाव दुरुस्तीची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुपता यांनी दिले. 

पूरप्रवण 70 गावांतील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याच्या सूचना देत, पावसाळ्यात महापुराचा धोका असलेल्या गावांमध्ये दवंडीव्दारे नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. गावांना पाण्याचा वेढा पडल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती उपलब्ध ठेवावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांक असलेली दिनदर्शिका तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावेत. कुशल जलतरणपटूंची संपर्क यादी तयार ठेवावी. आरोग्य विभागाने डॉक्टरांची उपलब्धता, संपर्क क्रमांक व प्रथमोपचार पेट्यांची तयारी ठेवावी. गटविकास अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.

रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने तात्काळ देखभाल व दुरुस्ती करून आठवड्याभरात अहवाल सादर करावा. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नद्या व नाल्यांचे खोलीकरण आवश्यक असलेल्या ठिकाणांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, त्यानंतर जिल्हा प्रशासन त्यास मान्यता देईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना व प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महापुरात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तयार ठेवावी तसेच नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. राज्य राखीव पोलीस दलाने सतर्क राहावे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपत्ती काळात आवश्यक उपकरणे व वाहनांची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. 

*****

29 April, 2026

पालकमंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

 


हिंगोली (जिमाका), दि. २९ : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे. 

शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. 


***