04 September, 2026

पावसाच्या खंडाने पिकांवर ताण; जिल्हाधिकाऱ्यांची शेतावर जाऊन पाहणी

वडद व बोंडाळा येथे शेतावर जाऊन सोयाबीन, कापूस पिकांची घेतली सद्यस्थितीची माहिती

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली, दि. 4 (जिमाका) : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे व अल निनोच्या प्रभावामुळे हिंगोली तालुक्यातील पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः सोयाबीन व कापूस पिकांवर त्याचा परिणाम जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली तालुक्यातील वडद व बोंडाळा येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची त्यांनी यावेळी माहिती घेतली.


वडद येथे शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीन व कापूस पिकांची पाहणी करताना पावसाच्या खंडामुळे पिकांवर आलेला ताण जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिला. काही ठिकाणी पाण्याअभावी सोयाबीन व कापूस पिके सुकण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची अवस्था, उपलब्ध सिंचनाची साधने, जमिनीतील ओलावा आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांची माहिती जाणून घेतली. पावसाचा खंड लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.


दरम्यान, बोंडाळा येथे ‘कापूस उत्पादकता अभियान’ अर्थात ‘कापूस क्रांती’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘क्लोजर लागवड पद्धती’च्या प्रात्यक्षिक प्लॉटचीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाहणी केली. या लागवड पद्धतीमुळे कापूस पिकातील उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. आधुनिक व शास्त्रोक्त लागवड तंत्रज्ञानाचा वापर, पिकांचे योग्य व्यवस्थापन तसेच उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली.


पावसाचा खंड हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध आणि कार्यक्षम वापर करावा. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य पद्धतीने वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.



कृषी विभागाने पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, यावरही यावेळी भर देण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

*****************

आपले सरकार सेवा केंद्रांची अचानक तपासणी; अनियमिततेवर होणार कारवाई

गोरेगाव येथील केंद्राला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

हिंगोली, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमधून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील आपले सरकार सेवा केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली.


यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रामार्फत नागरिकांना विविध प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांशी संबंधित सेवांबाबत माहिती जाणून घेतली. केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा, नागरिकांना विहित मानदंडानुसार दिली जाणारी सेवा याबाबतही खात्री केली.


नागरिकांना आवश्यक सेवा विहित कालावधीत आणि शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केंद्र चालकांना दिल्या. तसेच गोरेगाव येथील अनधिकृत सीएससी केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.

जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. केंद्रे शासनाने निश्चित केलेल्या मानदंडांनुसार कार्यरत नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून शाळा व उपकेंद्राची पाहणी

परतीच्या मार्गावर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

हिंगोली, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इमारत बांधकामाची, सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राची पाहणी केली. पाहणी दौऱ्यावरून परतताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्यांच्या निदर्शनास आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सदरील ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

काम दर्जेदार करा

गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुरू असलेल्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती, कामाचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. बांधकामाचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

आयुष्मान उपकेंद्राला भेट

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. उपकेंद्रामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, उपलब्ध औषधसाठा, मनुष्यबळ तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


एक ट्रॅक्टर जप्त

पाहणी दौरा आटोपून परतत असताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आला. त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

***************

03 September, 2026

शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

 शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा


हिंगोली, दि. 3 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येतात. इयत्ता 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या योजनांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा.


ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग (इमाव), विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज) व विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी गृहपाल, मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

रोजगार महाकुंभाअंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी रोजगार मेळावे 29 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी प्लेसमेंट ड्राईव्ह; नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे

 रोजगार महाकुंभाअंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी रोजगार मेळावे


29 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी प्लेसमेंट ड्राईव्ह; नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे


हिंगोली, दि. 3 सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत राज्यव्यापी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 29 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे.


हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी सहा ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली; वराहमिहिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमनुरी; शककर्ता शालीवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ; बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत; तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव आणि कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर यांचा समावेश आहे.


10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी


या रोजगार महाकुंभामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR कोडद्वारे किंवा https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवरून नावनोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रांसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा.


रोजगार महाकुंभाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय, हिंगोली येथे 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे.


विद्यार्थ्यांना ग्रंथालयाशी जोडून वाचन संस्कृतीची चळवळ गतिमान करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

•        हिंगोलीच्या अद्ययावत जिल्हा ग्रंथालय इमारतीत मुख्याध्यापकांची विशेष बैठक संपन्न


नवीन इमारतीतील पहिले सभासद डॉ. प्रकाश अंभोरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार


शिक्षक दिनानिमित्त आठवडाभर भव्य ग्रंथप्रदर्शन 


कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना विश्वकर्मा यांच्या हस्ते उद्घाटन


हिंगोली, दि. 3 सप्टेंबर (जिमाका) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तके माणसाच्या विचारांना प्रगल्भ करतात आणि जीवनाला नवी दिशा देतात. त्यामुळे हिंगोलीतील नूतन जिल्हा ग्रंथालय इमारतीमधील सर्व सोयी-सुविधांचा शालेय विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा. शाळांनी विद्यार्थ्यांना थेट ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची घट्ट नाळ निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.





जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या महसूल कॉलनीतील नूतन व सुसज्ज इमारतीच्या सभागृहात आज गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री. साखरकर, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोली तथा मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक उपस्थित होते.


आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पुढे म्हणाले की, "आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढत असताना त्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळवणे ही काळाची गरज आहे. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकेच नव्हे, तर शांत व पोषक वातावरण उपलब्ध होते. प्रत्येक शाळेने दर आठवड्याला रोटेशन पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांची 'ग्रंथालय अभ्यास भेट' घडवून आणावी. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअर काउन्सिलिंग, पुस्तक परीक्षण, कथाकथन व सुलेखन यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचा हातभार लावावा." ग्रंथालयाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या सर्व उपक्रमांचा शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.






नवीन इमारतीचे पहिले सभासद डॉ. प्रकाश अंभोरे यांचा गौरव :

जिल्हा ग्रंथालय कार्यालय नूतन इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर या अद्ययावत इमारतीतील ग्रंथालयाचे पहिले वाचक सभासद होण्याचा बहुमान डॉ. प्रकाश अंभोरे यांना मिळाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते डॉ. प्रकाश अंभोरे यांना ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला व ग्रंथालयाशी जोडल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.


मुख्याध्यापिका वंदना विश्वकर्मा यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे शानदार उद्घाटन :


आगामी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'ग्रंथप्रदर्शना'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, शहरातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रतिनिधी म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, हिंगोली येथील मुख्याध्यापिका श्रीमती वंदना रामदास विश्वकर्मा यांच्या शुभहस्ते ग्रंथपूजन व फीत कापून करण्यात आले. हे ग्रंथप्रदर्शन पुढील आठवडाभर सर्व नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.


ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन :


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी बैठकीचा मूळ उद्देश स्पष्ट केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. नूतन इमारतीतील आधुनिक वाचन कक्ष, समृद्ध संदर्भ विभाग, बाल विभाग व ई-लायब्ररी या सर्व अद्ययावत सुविधांची माहिती त्यांनी दिली. शहरातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथालयाचे नियमित सभासद व्हावे तसेच आठवडाभर चालणाऱ्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस हिंगोली शहरातील जिल्हा परिषद, शासकीय, अशासकीय अनुदानित व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवृंद, वाचकप्रेमी व ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा प्रकल्पात समावेश

 स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा प्रकल्पात समावेश


हिंगोली, दि. 3 सप्टेंबर (जिमाका) : राज्यातील निवडक जिल्ह्यांतील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सांडस, सालेगाव, सोडेगाव, सावंगी तर्फे नांदापूर, सेलसूरा, उमरा, रामवाडी, असोलवाडी, कळमकोंडा, शेनोडा आदी गावांचा समावेश आहे.


या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, एसजीजीएस महाविद्यालय, नांदेडचे टेक्निकल ॲकर इन्स्टिट्यूटचे (TAI) अनिल गोंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) केशव गड्डापोड यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.




गावनिहाय सर्वेक्षणातून अडचणींचे विश्लेषण


प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या 11 गावांचे एसजीजीएस महाविद्यालय, नांदेड येथील टेक्निकल ॲकर इन्स्टिट्यूट (TAI) मार्फत गावनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तसेच त्या सोडविण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाधारित पर्यायांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाचे सादरीकरण अनिल गोंडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून समितीसमोर केले.


यावेळी अकरा गावांमधील समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी, नागरी सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, शासन सेवा, आरोग्य आणि उपजीविका या क्षेत्रांतील अडचणी व त्यावरील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांची माहिती सादरीकरणातून देण्यात आली.


जिल्ह्यातील हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टेक्निकल ॲकर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावात निदानात्मक गरज मूल्यांकन (Diagnostic Need Assessment) पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामाध्यमातून प्रत्येक गावाच्या स्थानिक गरजा, उपलब्ध साधनसंपत्ती आणि ग्रामस्थांच्या समस्या यांचे अचूक मूल्यांकन करून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने योग्य उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली.