13 September, 2026

*महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर*

मुंबई, दि. १३ :  महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. 
यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. अर्ज सादर करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांनी गेल्या वर्षभरातील आयोजित केलेल्या गणेशोत्सव व संबंधित सांस्कृतिक उपक्रमांची तसेच यावर्षीच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे जिओ टॅग फोटोसहीत सादर करावयाची आहेत.
आतापर्यंत राष्ट्रीय स्तरासाठी देशभरातील विविध शहरांतून अर्ज प्राप्त झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरासाठी जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर इ. देशांतून अर्ज प्राप्त झाले असून, या स्पर्धेचा जागतिक विस्तार या राज्य महोत्सवाला 'ग्लोबल' ओळख मिळवून देताना दिसतो आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे पारंपरिक व सांस्कृतिक महत्त्व ओळखून शासनाकडून गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणू घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी या स्पर्धा व संबंधित अन्य उपक्रम यांच्या आयोजनात व्यापक बदल करण्यात आले असून वर्षागणिक मंडळांचा व नोंदणीकृत संस्थांचा या स्पर्धेतील सहभाग वाढत आहे.  
स्पर्धेचे परीक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येते. सहभागी मंडळांना तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील परीक्षण समिती प्रत्यक्ष भेट देणार असून, भेटीदरम्यान सहभागी मंडळांची सर्व कागदपत्रे, वर्षभरात राबविलेले उपक्रम, त्यांचे अहवाल, फोटो व व्हिडिओ तसेच सांस्कृतिक स्पर्धा, संस्कृती व सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन विषयक उपक्रम, भाविकांसाठी केलेल्या सोयी सुविधा, विविध स्पर्धा, विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांसाठीचे कायमस्वरूपी व उत्सव काळातील उपक्रम, पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट, प्रदूषणरहित वातावरण इ. विविध बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे. हे परीक्षण ऑनलाईन स्वरूपातील असल्याने परीक्षकांना जिओ टॅग फोटो द्वारे आपला निकाल सादर करावयाचा आहे. यामुळे निकालात पारदर्शकता निर्माण होऊन स्पर्धेचे नियमन व नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.
तालुकास्तरीय प्रथम विजेत्याला २५ हजार, जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार ४० हजार व ३० हजार रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून व राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना ७.५ लाख, ५ लाख, २.५ लाखांची पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. 
तसेच घरगुती व सार्वजनिक गणपतीचे दर्शन घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सर्वांना होण्यासाठी तयार करण्यात आलेले https://ganeshotsav.pldmka.co.in हे पोर्टल १४ सप्टेंबरपासून खुले होणार आहे. यावर सार्वजनिक मंडळे आपल्या गणपतीचे थेट मोफत दर्शन जगभरातील गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात, तसेच घरगुती गणपतीची छायाचित्रे देखील सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात.
या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये मंडळांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

00000

विशेष लेख / १७ सप्टेंबर / मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहिला आहे.

स्वातंत्र्य मिळाले; पण हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर संस्थानांच्या भारतात विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी हैदराबाद स्वतंत्र अस्तित्वात ठेवण्याची भूमिका घेतली. भारत सरकार आणि हैदराबाद संस्थान यांच्यात वाटाघाटी सुरू राहिल्या. काही काळासाठी स्थिती कायम ठेवण्याचा करार अर्थात ‘जैसे थे’ करार (Standstill Agreement) करण्यात आला. मात्र संस्थानातील राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत गेली. गावागावांत रजाकारांविरुद्ध संघर्ष वाढत गेला.
हैदराबाद संस्थानातील जनतेमध्ये नागरी हक्क, जबाबदार शासन आणि भारतीय संघात सहभागी होण्याची मागणी अधिक तीव्र होत होती. या लोकचळवळीला हैदराबाद स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद तसेच विविध सामाजिक व राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी दिशा दिली.

मराठवाड्यात जागृतीची बीजे
मराठवाड्यातील मुक्ती संग्राम अचानक सुरू झालेला नव्हता. त्यामागे अनेक वर्षांची सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जागृती होती. राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी शाळा, वाचनालये आणि सामाजिक संस्था कार्यरत होत्या. परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन विद्यालय, हिप्परगा येथील शारदा मंदिर, अंबाजोगाईचे योगेश्वरी विद्यालय, उदगीरचे श्यामलाल विद्यालय, लातूरमधील ज्युबिली विद्यालय, बीडचे चंपावती विद्यालय, नांदेडचे प्रतिभा निकेतन आदी संस्थांनी राष्ट्रीय जागृतीच्या कार्याला हातभार लावला. या कार्याला स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा लाभली.
१९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेने या चळवळीला संघटित राजकीय स्वरूप मिळाले. निजाम सरकारने या संघटनेवर बंदी घातल्यानंतर सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्यात आला. मुक्तिसंग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, आ. कृ. वाघमारे, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास अजरामर केला आहे. गावागावातील संघर्षांमध्ये अनेक अनामिक वीरांनी आपले बलिदान दिले आहे. १९३८ च्या सत्याग्रहातील नांदेडच्या कार्यकर्त्यांचा सहभाग या लढ्यात विशेषत्वाने नोंदविला गेला आहे.

आठ जिल्ह्यांची व्यापक लोकचळवळ
आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे आठ जिल्हे आहेत. तत्कालीन काळातील प्रशासकीय सीमांमध्ये काही बदल झाले असले तरी या संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशाने हैदराबाद मुक्तीच्या लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. मराठवाड्याचा संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश भारतीय संघात विलीन होण्यासाठी आतुर होता.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे प्रमुख केंद्र होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात बीड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आणि अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले.
या व्यापक लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा आणि पी. एच. पटवर्धन यांसारख्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
लढ्याचे स्वरूप केवळ एका शहरापुरते मर्यादित नव्हते. नांदेड, परभणी, सेलू, जालना, अंबड, बीड, उस्मानाबाद, लातूर, अंबाजोगाई, उदगीर, उमरी, धर्माबाद, कंधार, देगलूर आदी भागांत विविध स्वरूपाचे सत्याग्रह, जनजागृती आणि प्रतिकाराच्या चळवळी झाल्या.

दडपशाहीला लोकशक्तीचा प्रतिकार
स्वातंत्र्याच्या मागणीला तत्कालीन सत्तेकडून विरोध झाला. आंदोलनकर्त्यांना अटक, कारावास आणि विविध प्रकारच्या दडपशाहीला सामोरे जावे लागले. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यानंतर रजाकारांच्या हिंसक कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या. लोकशाही, नागरी हक्क आणि जबाबदार शासनासाठी जनतेने निकराचा संघर्ष केला.
प्रशासनाच्या नोंदीनुसार, १९४२ च्या ‘भारत छोडो’ चळवळीत नांदेड, वैजापूर, गंगापूर, परभणी, सेलू, उस्मानाबाद, बीड, अहमदपूर, जालना आणि अंबड यांसारख्या ठिकाणी सत्याग्रहींना कारावास भोगावा लागला. या आंदोलनामुळे हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यवादी शक्ती अधिक संघटित झाल्या. स्वातंत्र्याच्या लढ्यातील या सहभागाने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याला आणखी गती मिळाली.

निजामाची आणि भारताची भूमिका
भारत सरकारने हैदराबाद प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला संवाद आणि वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्णायक भूमिका घेतली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ सुरू झाले. भारतीय सैन्याच्या कारवाईसमोर हैदराबाद संस्थानाच्या सैन्याचा प्रतिकार फार काळ टिकला नाही. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती स्वीकारली आणि हैदराबाद राज्य भारतीय संघात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या अधिकृत नोंदीत या प्रक्रियेला भारताच्या राजकीय एकात्मतेतील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून अधोरेखित केले आहे.
स्वातंत्र्योत्तर भारताने संस्थानांचे एकत्रीकरण करताना संवाद, राजनैतिक प्रयत्न आणि आवश्यक त्या वेळी निर्णायक कारवाई यांचा समन्वय साधला. हैदराबादच्या प्रश्नावर भारत सरकारने सुरुवातीला संवाद व राजनैतिक प्रयत्नांचा मार्ग स्वीकारला; मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर निर्णायक लष्करी कारवाई करण्यात आली. हैदराबादचा संघर्ष आणि विलीनीकरण हा एकसंघ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरला.
भारताच्या मध्यभागी स्वतंत्र राज्याचे अस्तित्व कायम राहिल्यास निर्माण होणारी राजकीय व प्रशासकीय गुंतागुंत किती गंभीर ठरली असती, याची कल्पना आजही करता येते. भारताच्या राजकीय एकात्मतेच्या दृष्टीने ही कारवाई किती महत्त्वाची होती, हे त्यानंतरच्या घडामोडींवरून स्पष्ट होते. त्यामुळे संस्थानांच्या विलीनीकरणासाठी झालेला हा संघर्ष भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनाक्रम ठरला आहे.

भाषिक वेगळेपणही लक्षणीय ठरले
१९४८ मध्ये भारतीय संघात समाविष्ट झालेले हैदराबाद संस्थान आज एकाच राज्याचा भाग नाही. त्यातील मराठवाडा महाराष्ट्रात, तेलुगू भाषिक प्रदेश तेलंगणात आणि कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट झाला. तत्कालीन हैदराबाद राज्यात आजच्या तेलंगणासह मराठवाडा आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांचा समावेश होता.
भाषावार प्रांतरचनेनंतर मराठवाडा १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. अशा प्रकारे १९४८ मध्ये भारतीय संघाशी जोडलेला हा प्रदेश पुढे आधुनिक महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि सामाजिक विकासाचा अविभाज्य घटक बनला.

१७ सप्टेंबर : मुक्ती संग्राम दिन

महाराष्ट्र शासनाने ४ मे २००१ रोजी शासन निर्णयाद्वारे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा विभागात ‘मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात शासकीय पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत हा दिवस साजरा केला जातो. विभागीय मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. इतर जिल्ह्यांतही पालकमंत्री किंवा नियुक्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात, कारण हे शहर मराठवाड्याचे विभागीय मुख्यालय असून मुक्ती संग्रामाच्या स्मृतींशी जोडलेले प्रमुख केंद्र आहे. स्मृतिस्तंभाला अभिवादन, हुतात्म्यांना श्रद्धांजली, ध्वजारोहण, मानवंदना आणि विविध शासकीय कार्यक्रमांद्वारे या इतिहासाचे स्मरण केले जाते. महाराष्ट्र शासन मुक्ती संग्रामाचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १०० कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर येथे स्मारक उभारत आहे.
इतिहासाचा सन्मान, भविष्याची प्रेरणा
मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ भूतकाळातील संघर्ष नाही. तो लोकशाही, स्वातंत्र्य, नागरी हक्क, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकसहभागाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा इतिहास आहे. या लढ्यात ज्ञात-अज्ञात असंख्य स्वातंत्र्यसैनिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांनी योगदान दिले. त्यांच्या त्यागामुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याच्या भारतीय संघात विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला.
१७ सप्टेंबर रोजी तिरंगा अभिमानाने फडकताना त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण होते. हा दिवस अन्यायाविरुद्धच्या लोकशाही मूल्यांच्या आणि भारताच्या एकात्मतेच्या विजयाचे स्मरण करून देतो.
मराठवाड्याने भारताच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान इतिहासाच्या पानांवर अढळ आहे. छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत, जालन्यापासून लातूरपर्यंत, बीडपासून धाराशिवपर्यंत आणि परभणीपासून हिंगोलीपर्यंत या भूमीने स्वातंत्र्याची आस जपली आणि राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी संघर्ष केला. त्या ज्ञात-अज्ञात वीरांना आणि वीरांगनांना कृतज्ञ अभिवादन करणे आणि त्यांच्या त्यागातून लोकशाही व राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची खरी प्रेरणा आहे.
१७ सप्टेंबर हा त्यामुळे केवळ स्मरणाचा दिवस नाही; तो मराठवाड्याच्या देशभक्तीला, लोकशक्तीला आणि अखंड भारताच्या एकात्मतेला अभिवादन करण्याचा दिवस आहे.

प्रवीण टाके
उपसंचालक
विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

---------

*हिंगोली येथील लोक न्यायालयामध्ये १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली* *१२ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून* *निकाली काढण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांचे आवाहन*

हिंगोली, दि. 13 सप्टेंबर :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी व तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायीक जिल्हा हिंगोली अंतर्गत येणा-या न्यायालयामध्ये शनिवार १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात  प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणात एकुण तब्बल १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची तडजोडी आधारे रक्कम ठरविण्यात आली व प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतमध्ये  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर, तालुका विधी सेवा समिती हिंगोली यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, जिल्हा न्यायाधीश-२ डी.जी. ढोबळे, सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर एस.जी. दुबाले, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती डि. व्ही. भंडारी यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम केले. दिवाणी न्यायाधीश व स्तर तथा समन्वयक व्ही.एम. मानखैर, तालुका विधी सेवा समिती, हिंगोली पी.जी. महाळंकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर श्रीमती. एस. डी. जायभार दिवाणी न्यायाधीश क. स्तर, कळमनुरी हे उपस्थित होते. अॅड. एम.जे. पठाडे, अॅड. आर.बी. बांगर, अॅड. ए.ए. गायकवाड, अॅड. ए.पी. खरटमोल यांनी पॅनल विधीज्ञ म्हणून काम केले.
या लोकअदालतीमध्ये सर्वांत मोठ्या रक्कमेचा धनादेश ६५ लाख रुपये लिबर्टी जनरल विमा कंपनीच्या अधिकारी श्रीमती श्रध्दा किनारे यांनी संबंधित पक्षकारांना तडजोडीअंती सुपुर्द केला. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबीत असलेली १९ हजार ७९९ प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती व फायनान्स कंपनी यांची वाद दाखलपुर्व ११ हजार ४३५ प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यामध्ये सदरील लोकअदालतीमध्ये प्रलंबित ३६५ व वाद दाखलपुर्व प्रकरणे ३१३ निकाली काढण्यात आली.
तसेच यावेळी जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य अॅड. पि.के. शिरसाठ, अॅड. एन.एस. घुगे, अॅड. एस. के. शिरसाठ, अॅड. एम.एस. साकळे, कोषाध्यक्ष अॅड. विलास घोंगडे पाटील, सचिव अॅड. मिलीद कांबळे, विमा कंपनीचे विधीज्ञ अॅड. अजय व्यास, अॅड. नरवाडे, अॅड. एस. जी. वाघमारे, तसेच वकील संघाचे विधीज्ञ अॅड. एस. बी. गडदे, अॅड. महेश आहेर, अॅड. परतवार, अॅड. सुरज शिंदे, अॅड. बि.डी. टेकाळे, अॅड. रवि जाधव, अॅड. महारूद्र जाधव, अॅड. आडे, अॅड. दायमा, अॅड, रवि पठाडे, अॅड. स्वप्नील इंगळे, अॅड. हनुमान वामन, अॅड. मुदसर, अॅड. अर्धापुरकर, अॅड. निलेश पुरी, अॅड. पृथ्वीराज आखरे, अॅड. के. नरोटे उपस्थीत होते.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायीक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले एकुण चार पॅनल करण्यात आले होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी सदर लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी कर्तव्य पार पाडले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांनी पुढील १२ डिसेंबर, २०२६ रोजीच्या आयोजीत राष्ट्रीय लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवुन निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.
00000

दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना* *तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश* *महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा*

नागपूर दि १२: दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या राज्यातील १८ जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन तात्काळ उपाययोजना करता याव्या यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी  जिल्ह्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीसह उद्धवलेल्या परिस्थितीबाबत मुद्देसूद व सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस खासदार माया इवनाते, सर्वश्री आमदार प्रवीण दटके, मोहन मते, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, डॉ.राजीव पोतदार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त विपीन इटनकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
​दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या १८ जिल्ह्यांचा समावेश आहे.
मराठवाडा विभागात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि मूग, विदर्भात कापूस, मूग, उडीद, तूर तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत संत्र्याचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून ​धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच ऊस कारखाने लवकर सुरू झाल्यास गळीत हंगाम कमी कालावधीचा राहील, ज्यामुळे चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड कमी होण्याचा अंदाज असून दुष्काळाबाबत नोंदवण्यात आलेली महत्त्वाची निरीक्षणे पालकमंत्र्यांनी यावेळी 
जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोंदवली.
​या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करता यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सद्य स्थितीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करावा. प्राप्त अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील. या जिल्ह्यांतील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने या परिस्थितीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवल्या जातील असे श्री बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

******

12 September, 2026

पीक परिस्थितीचा अहवाल सादर करा- महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश*


 
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करुन सोमवारी अहवाल सादर करावा,असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज यंत्रणेला दिले. श्री. बावनकुळे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आज आढावा घेतला.
विभागीय आयुक्त जी.श्रीकांत तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यापार्श्वभुमिवर शेतकऱ्यांची पीक पाण्याची तसेच पशुधनाच्या चाऱ्याची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत वस्तूनिष्ठ माहिती येत्या दोन दिवसात सादर करावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी. पीक स्थितीचा आढावा घ्यावा,असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाची माहिती सादर करण्यात आली की, विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या ५७ .७८ टक्के पाऊस झाला आहे.मागील वर्षी याच तारखेपर्यंत १०६.३८ टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पर्जन्यमान याप्रमाणे- छत्रपती संभाजीनगर-८२.३६ टक्के, जालना-८०.०४ टक्के, नांदेड-७४.२३ टक्के, हिंगोली-७०.०८ टक्के, बीड-६४.०५ टक्के, धाराशिव-६२.७३ टक्के, परभणी-५५.३४ टक्के आणि लातूर-५२.१८ टक्के. विभागात एकूण ४९६ मंडळे असून सर्वाधिक २१८ मंडळे हे मध्यम (५० ते ७५ टक्के) पावसाच्या श्रेणीत आहेत. 
विभागातील प्रकल्पांमध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ६६.७४ टक्के जलसाठा असून  मध्यम प्रकल्प ७६ असून त्यात २१.३४ टक्के  तर लघु प्रकल्प ७८० असून त्यात २०.४८ टक्के जलसाठा आहे.
विभागात सरासरी ९३ टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. विभागात असलेल्या ५५.६६ लक्ष जनावरांसाठी १ कोटी ०७ मे.टन चारा साठा उपलब्ध आहे. पावसाचा खंड दि.२३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर हा दीर्घ म्हणजेच २० दिवसांचा खंड आहे.
येत्या दोन दिवसांत पाहणी करुन अहवाल सादर करावा,असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.
०००००

शिष्यवृत्तीसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत**महाविद्यालयांना 15 सप्टेंबरपर्यंत त्रुटीपूर्तता व अर्ज सादरीकरणाची संधी*



हिंगोली, दि. १२ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचे शिष्यवृत्तीचे https://mahadbt.maharashtra.gov.in हे ऑनलाइन संकेतस्थळ सुरू झाले असून, हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयांतील सन 2024-25 व 2025-26 मधील शिष्यवृत्तीसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

सन 2024-25 व 2025-26 मधील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करून अर्जांची तात्काळ तपासणी करावी. परिपूर्ण अर्ज शिष्यवृत्ती मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. जुन्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता, छाननी व पुढील कार्यवाहीसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरू राहणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी जुने प्रलंबित अर्ज तात्काळ तपासून त्यातील त्रुटींची पूर्तता करावी व परिपूर्ण अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सादर करावेत. सन 2024-25 व 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील.

या पोर्टलवर सन 2026-27 साठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज करता येणार नाहीत. केवळ जुन्या महाविद्यालयस्तरावरील अर्जांमधील त्रुटींची पूर्तता व तपासणी करून संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज शिष्यवृत्ती मंजुरीसाठी ऑनलाइन पद्धतीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाकडे पुढे पाठवावेत. याबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपिक यांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
00000 पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत*

*महाविद्यालयांना 15 सप्टेंबरपर्यंत त्रुटीपूर्तता व अर्ज सादरीकरणाची संधी*

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचे शिष्यवृत्तीचे https://mahadbt.maharashtra.gov.in हे ऑनलाइन संकेतस्थळ सुरू झाले असून, हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयांतील सन 2024-25 व 2025-26 मधील शिष्यवृत्तीसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

सन 2024-25 व 2025-26 मधील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करून अर्जांची तात्काळ तपासणी करावी. परिपूर्ण अर्ज शिष्यवृत्ती मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. जुन्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता, छाननी व पुढील कार्यवाहीसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरू राहणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी जुने प्रलंबित अर्ज तात्काळ तपासून त्यातील त्रुटींची पूर्तता करावी व परिपूर्ण अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सादर करावेत. सन 2024-25 व 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील.

या पोर्टलवर सन 2026-27 साठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज करता येणार नाहीत. केवळ जुन्या महाविद्यालयस्तरावरील अर्जांमधील त्रुटींची पूर्तता व तपासणी करून संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज शिष्यवृत्ती मंजुरीसाठी ऑनलाइन पद्धतीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाकडे पुढे पाठवावेत. याबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपिक यांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
00000

भरती परीक्षा सुधारणांसाठी हिंगोलीत विशेष कक्ष

⏺️ १८ सप्टेंबरपर्यंत सूचना, अभिप्राय सादर करण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

 ⏺️ छत्रपती संभाजीनगरात २१ सप्टेंबरला उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक आणि लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सहाही महसुली विभागांना भेट देत आहे. यावेळी विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जात आहेत.

 *हिंगोलीत १८ सप्टेंबरपर्यंत विशेष कक्ष* 

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना निवासी उपजिल्हाधिकारी (नोडल अधिकारी), जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील विशेष कक्षात सूचना, हरकती व निवेदने प्रत्यक्ष सादर करता येतील. हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहील. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत.

 *छत्रपती संभाजीनगरात २१ सप्टेंबरला संवाद* 

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, उमेदवार व संबंधित हितधारकांशी उच्चस्तरीय टास्क फोर्स २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संवाद साधणार आहे.

 *या बाबींवर अभिप्राय अपेक्षित* 

विद्यमान परीक्षा प्रणाली, प्रश्नपत्रिका तयार करणे व वितरण, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, मूल्यमापन व निकाल प्रक्रिया, डिजिटल प्रणाली व बायोमेट्रिक प्रमाणीकरण, सीसीटीव्ही देखरेख, ऑडिट ट्रेल्स, पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा केंद्रांची किमान मानके, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी तक्रार निवारण प्रणाली याबाबत सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येणार आहेत. या सूचनांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत.