18 March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली  जिल्ह्यातील कोथळज, माळहिवरा, पेडगाव, लिंबाळा, पारडा, खंडाळा, माळहिवरा, येळी, आडगाव, खरवड, उमरा, वारंगा मसाई आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 








जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छुकांसाठी शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन

 



हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात ग्लोबल पब्लिक इंग्लिश स्कूल हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली तसेच संकल्प जॉब प्लेसमेंट हिंगोली या आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.

जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी (10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, डी.एड., बी.एड., एम.एड., पदवीधर इ.) आपले शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह स्वतः उपस्थित राहावे. हा मेळावा दि. 20 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी कोणतीही  प्रवास किंवा इतर खर्चाची  भरपाई दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी  02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे. 


*******

17 March, 2026

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी- जिल्हा प्रशासनाचे आवाहन



•जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन


 • आरोग्य विभाग सतर्क: आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा


 हिंगोली (जिमाका), दि. 17 : सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.

 ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी तर शहरी भागातील आरोग्य यंत्रणेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सूचना दिल्या आहेत.

 हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशापर्यंत पोहोचला आहे. ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने ४२ ते ४५ अंशांच्या घरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. 

अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. 

आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन या सह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत  जनजागृती करण्यात येत आहे.


*उष्माघात होण्याची कारणे :*


 शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.


*लक्षणे :*


मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ.


*अति जोखमीच्या व्यक्ती*

बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार.


*प्रतिबंधात्मक उपाय :*


 वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे

 (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत.

 सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.

 उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा.

घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा.

 पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.

 उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.


*उपचार :* 


रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत,

रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.

 रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे.

 चहा, कॉफी देवू नये .

रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात.

थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व ३६.८ सेल्सिअस तापमान होई पर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा.

*******

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : आर्थिक वर्ष संपत येत असल्याने तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे कल वाढण्याची  शक्यता आहे. परिणामी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची  शक्यता लक्षात घेता तसेच इष्टांक पूर्ततेच्या दृष्टीने दि. 26 मार्च 2026, दि. 28 मार्च 2026, दि. 29 मार्च 2026 व दि. 31 मार्च 2026 या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही  जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे  यांच्या आदेशानुसार  सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी  तसेच अभिनिर्णय, कमी पडलेले मुद्रांक शुल्क आदी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 यांनाही कार्यरत ठेवण्यात येणार आहे, अशी  माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

*******

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील कानडखेडा खु., कनका, कन्हेरगाव नाका, चिंचोली, राजुरा, इसापूर (रमणा), बळसोंड, केसापूर, नरसी नामदेव, पहेनी, इंचा, हनवतखेडा, राहोली बु., डिग्रस कऱ्हाळे आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 





16 March, 2026

समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी घेण्यात आलेल्या समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3  व 4 फेब्रुवारी 2026 रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेकरिता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी ) उत्तीर्ण असल्यास त्याबाबतची माहिती सर्व उमेदवारांनी https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर दि. 16 मार्च  ते 21 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन भरावी.

ही माहिती केवळ दिलेल्या लिंकवरच सादर करणे बंधनकारक असून ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

दरम्यान, परीक्षेची गुणपडताळणी तसेच रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घेण्यासाठी https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx या लिंकवर दि. 16 मार्च  ते 31 मार्च 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहे. गुण पडताळणीसाठी  प्रती  पेपर रुपये 500 इतके शुल्क सदर लिंकद्वारे भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित उमेदवारांच्या ई-मेलवर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती ई-मेल, पत्र किंवा इतर माध्यमांद्वारे सादर केल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच निश्चित मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  

 

*******

हृदयविकारग्रस्त संशयित विद्यार्थ्यांसाठी टुडी-इको तपासणी शिबीर

 


 

 

·         जिल्ह्यातील 75 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची  टुडी-इको तपासणी, 10 विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील हृदयविकारग्रस्त संशयित विद्यार्थ्यांसाठी आज सोमवार, (दि.16) रोजी येथील जिल्हा रुग्णालयात टुडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव या तालुक्यांतील 75 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची  दुडी-इको तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 10 विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत बालाजी हॉस्पिटल, मुंबई येथे मोफत करण्यात येणार आहे.

या तपासणी शिबिरासाठी  मुंबई येथील भायखळा येथील बालाजी  हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री मिश्रा (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. प्रतिक मिश्रा व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांची तपासणी केली.

या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय अधीक्षक  डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, बाल स्वास्थ्य डॉ. शैलेजा कुप्पास्वामी, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, भूलतज्ञ डॉ. नितीन पुरोहित, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. अमोल देशमुख, बालरोग तज्ञ डॉ. नितीन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बी. चिंचकर, श्रीमती आशा क्षीरसागर, श्रीमती कदम, डॉ. मोसीन (आयुष्यमान भारत समन्वयक), डॉ. संतोष नांदूरकर (डीईआयसी मॅनेजर), लक्ष्मण गाभणे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसीमधील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, एएनएम, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका यांनी परिश्रम घेतले.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून शस्त्रक्रिया व उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी दैनंदिन जीवनात हृदयविकारासंदर्भात जागरूक राहून वेळोवेळी टुडी-इको तपासणी करून आजाराचे वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

 

******