17 May, 2026

अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई

 


* मसोड येथे संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या जप्त; 20.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 




हिंगोली (जिमाका), दि. 17 : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या 500 गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 20 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 16 मे 2026 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार मसोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकची कृषी विभागाच्या पथकाने कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ‘आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर (राजस्थान)’ यांचे बिल असलेली संशयास्पद जिप्सम पावडर आढळून आली. सदर ट्रकमधून 40 किलो वजनाच्या एकूण 500 गोण्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद खताचे नमुने घेऊन ते शासकीय खत तपासणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून प्राप्त निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या कारवाईत जिपचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी लक्ष्मण काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज राठोड, गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके व वसमत पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामेश्वर गवळी यांनी सहभाग घेतला.

पथकाने 500 बॅगा संशयास्पद जिप्सम पावडर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा मोटर्स कंपनीचा RJ 07 GD 7095 क्रमांकाचा ट्रक जप्त केला आहे.

या प्रकरणात श्री. राम रतन (रा. सियागाव का मोहल्ला, स्वरूपदेसार, जि. बिकानेर, राजस्थान) व इतर एक जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कळमनुरी गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके यांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, विभागीय कृषी अधिकारी अशोक तिडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

********

15 May, 2026

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

हिंगोली(जिमाका), दि. 15 : जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळ पाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांना गती देऊन नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

तसेच, नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडण्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजनांसाठी महावितरणकडून विद्युत जोडणी प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल दि. 20 मे 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेतला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी व मुद्द्यांची पूर्तता आठ दिवसांच्या आत करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

******

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार

 


 

 

 

हिंगोली(जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटीईटी) 2026 परीक्षेचे रविवार दि. 21 जून रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र 21 जून रोजी नीट (NEET) या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 परीक्षेचे आयोजन 21 जून ऐवजी रविवार दि.  28 जून रोजी करण्यात आले आहे.

प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट 16 ते 28 जून या सुधारित कालावधीत काढता येणार आहे.  तर शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर क्रमांक एक दि. 28 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होईल. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा दुसरा पेपर त्याच दिवशी अर्थात 28 जून रोजी दुपारी 2.30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. अद्ययावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

******

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा-1 अंतर्गत आज शुक्रवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास  नगराध्यक्ष कपील खंदारे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काटकर उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिबिरात तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार अनिता कोलगणे उपस्थित होते.

या समाधान शिबिरामध्ये औंढा नागनाथ मंडळातील नागरिकांना मंडळ व तहसील स्तरावर विविध शासकीय सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये शिधापत्रिका वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र वितरण, सातबारा नोंदी, सातबारा वरील शिवरस्ते नोंदी आदी महसुली कामांचा समावेश होता. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग आणि इतर विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात आले.

यावेळी उपायुक्त रमेश काटकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे आणि नायब तहसीलदार अनिता कोलगणे यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक कल्याणी हटवार, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, मंडळ अधिकारी आशा गिते, तलाठी गजानन गुंजकर, विशाखा डोंगरे, जी. एस. मुकीर, भुसावळे, गजानन हजारे, रुपा कळसकर, केशव जगताप, इमरान पठाण, अक्षय कांबळे, वहीद पठाण, नितेश कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

******

खरीप हंगामासाठी बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन




* शेतकऱ्यांनी तक्रारी व अडचणी नोंदविण्याचे कृषि विभागाचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 15 :  राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाला अनन्यसाधारण महत्व असून राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

कृषि आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्तालय स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून शेतकरी, वितरक व विक्रेत्यांसाठी संपर्कासाठी व्हाट्सअप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर देखील संपर्क साधता येणार आहे.

यासोबतच बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिकींग किंवा इतर संबंधित अडचणी व तक्रारी controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येतील.

तक्रार नोंदविताना संबंधितांनी आपले नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक तसेच अडचण किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील नमूद करावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हाट्सअप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे अधिक सोयीस्कर होणार असल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

ज्या शेतकऱ्यांना व्हाट्सअपचा वापर करणे शक्य नाही, त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तोंडी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक, एक टोल फ्री क्रमांक व एक ई-मेल तक्रार निवारणासाठी समर्पित करण्यात आले असून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी व अडचणी नोंदवाव्यात, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

******

उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली (जिमाका), दि. 15 : राज्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण होत असलेल्या उष्मालाट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

वातावरणीय बदलामुळे उन्हाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून राज्यातील काही भागांमध्ये उष्मालाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मानव, पशुपक्षी तसेच इतर घटकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महसूल, कृषी, पशुसंवर्धन तसेच इतर संबंधित विभागांना उष्मालाट प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः शासकीय कार्यालये व कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सुविधा, विश्रांतीसाठी जागा तसेच मजुरांसाठी आवश्यक त्या मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच बांधकाम कामगार, शेतमजूर, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व आजारी व्यक्ती यांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे व हलक्या रंगाचे सूती कपडे वापरावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने उष्माघाताच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुपालकांनीही जनावरांना सावली, स्वच्छ पाणी व योग्य काळजी उपलब्ध करून द्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व विभागांनी उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

****

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र वाटपास प्रारंभ

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चे आयोजन दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. १ (इयत्ता १ ली ते ५ वी स्तर) व पेपर क्र. २ (इयत्ता ६ वी ते ८ वी स्तर) यांचा अंतिम निकाल दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता.

या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर) यांच्या कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ मधील पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचे वाटप दिनांक १८ मे २०२६ ते ०८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ या संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अथवा शिक्षण निरीक्षक, मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.

*******