• औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रातील विकासकामांची पाहणी;
• पावसाळी उपाययोजना व पुरातत्त्व संवर्धनाला प्राधान्य
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज (दि. 20) श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिर परिसरातील सर्व अत्यावश्यक कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
पाहणीप्रसंगी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, जतन सहायक राम निपाणे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे, कंत्राटदार राहुल चव्हाण तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या मूळ स्थापत्य रचनेचे जतन करत दुरुस्तीची कामे करण्यावर भर दिला. मंदिराची तटबंदी, भिंतींची दुरुस्ती, परिसरातील 22 ठिकाणची रंगरंगोटी काढून टाकणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या शिखर व छतावरील गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच मुख्य रासायनिक संवर्धनाची कामे तातडीने व परिपूर्ण गुणवत्तेने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता, कामाची गती व नियोजनाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. भाविकांना अधिक सुरक्षित, सुकर व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे मंजूर आराखड्यानुसार व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणूनप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने व्यापक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत मंदिर परिसराचे संवर्धन, सुशोभीकरण, मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या विकास आराखड्याला महत्त्वपूर्ण गती मिळाली असून, दि. 23 जून रोजी मुंबई येथे झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 182.83 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे. तसेच दि. 25 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील 266.61 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार पुरातत्त्व विभागाने 76.55 कोटी रुपयांचा सुधारित संवर्धन आराखडा, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य परिसर विकासासाठी 106.28 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. या प्रकल्पांचे कार्यान्वयन निश्चित यंत्रणांमार्फत प्रभावीपणे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार ही कामे होत असल्याबाबत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी पाहणी केली. श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळणार आहे.
***







