19 September, 2026

लोकसंवाद २०२६ अंतर्गत गणेश मंडळात बाल संरक्षण व बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती



खासदार रामराव वडकुते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : लोकसंवाद २०२६ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली शहरातील गणपती चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या परिसरात बाल संरक्षण व बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या नागरिक, भाविक तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत बालकांच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत बालकांचे हक्क, बालकांचे संरक्षण, बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी उपस्थित नागरिक, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविकांना बाल संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बॅनर व माहितीफलकांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. बालविवाहामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील संधींवर होणारे परिणाम याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

बालकांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबासह समाजातील प्रत्येक व्यक्तीने सजग राहणे आवश्यक आहे. बालकांशी संबंधित कोणतीही समस्या अथवा बालविवाहाची बाब निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती देणे गरजेचे आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या जनजागृती उपक्रमास खासदार रामराव वडकुते, फुलाजी शिंदे, विलास गोरे, रजनीश पुरोहित यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक आणि भाविक उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा.

बालविवाहास प्रतिबंध करणे, बालकांचे संरक्षण करणे आणि बालकांना सुरक्षित व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हिवरा जाटू येथील पीक परिस्थितीची कृषिमंत्र्यांकडून पाहणी

हिंगोली, दिनांक १९ (जिमाका): राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी आज औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शेतशिवारात सोयाबीन पिकांची पाहणी केली. पाहणीनंतर शेतकरी शंकर दत्तराव कऱ्हाळे यांच्या शेताच्या बांधावर त्यांनी शेतकऱ्यांसोबत बेसन-भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या साध्या जेवणाचा आस्वाद घेतला.
हिंगोली जिल्ह्यासह औंढा नागनाथ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री भरणे यांनी हिवरा जाटू येथे शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. यावर विविध योजनांच्या माध्यमातून तसेच शासनाकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.
यावेळी राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संघेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
*****

आयुष्मान भारत योजनेची ‘लोकसंवाद’मधून जनजागृती

▶️जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळतो. त्यामुळे पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुंडा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गरुड यांनी केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील शिवतांडव मित्र मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात आज जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ. गरुड यांनी आयुष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो. पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळतात, आदी सविस्तर माहिती त्यांनी दिली.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्काची ठिकाणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. पात्र नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवतांडव मित्र मंडळाचे अभिमन्यू चव्हाण, आदिनाथ चव्हाण, कृष्णा चव्हाण, सतीश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आणि तुकाराम चव्हाण यांनी सहकार्य केले.

शासन खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीशी- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे



⏺️वसमत तालुक्यातील आसेगाव, टाकळगाव, बोराळा परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

⏺️शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : वसमत तालुक्यात पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  आज वसमत तालुक्यातील आसेगाव, टाकळगाव आणि बोराळा येथील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनय आवटे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे उपनगराध्यक्ष राजकुमार एगडे, पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
टाकळगाव, आसेगाव, बोराळा परिसरातील शेती पिकांची पाहणी करताना कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान, पावसाची परिस्थिती तसेच विविध अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, सुकलेली पिके, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली. या गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास शेतकरी बांधवांना दिला.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले. 
अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा- कृषीमंत्री भरणे

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी ट्रिगर लागू झालेले आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश आहे. वसमत तालुक्याचा या दुष्काळी यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशा माध्यमाची पोस्ट  विविध समाज माध्यमांमध्ये सध्या व्हायरल होत आहे. याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी सदर पोस्ट ही बनावट असून यामध्ये कोणतीही सत्यता नाही. शासनामार्फत अशा प्रकारची कोणतीही यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये, केवळ शासनामार्फत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन यावेळी केले.
00000

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’मध्ये चमकण्याची सुवर्णसंधी ३० सप्टेंबरपर्यंत ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी होता येणार.

हिंगोली १९ सप्टेंबर:-  हिंगोली जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कल्पना आणि नेतृत्वगुण दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग-२०२७’ उपक्रमासाठी ‘विकसित भारत क्विझ’ला सुरुवात झाली असून, इच्छुकांना ३० सप्टेंबर अखेर सहभाग नोंदविता येणार असल्याचे जिल्हा युवा अधिकारी श्रद्धा वीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या उपक्रमात विकसित भारत चॅलेंज, सांस्कृतिक विभाग, डिझाईन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज, युवा उद्योजक चॅलेंज आणि युवा संसद अशा सहा विभागांचा समावेश आहे. क्विझनंतर निबंध, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड प्रक्रियेतून राष्ट्रीय स्तरासाठी युवकांची निवड केली जाणार आहे. 
१० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे अंतिम कार्यक्रम होणार असून, निवड झालेल्या युवकांना राष्ट्रीय नेतृत्वासमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी श्रद्धा वीर यांनी केले आहे.

दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये


हिंगोली,दि. १९ : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांची व पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी व आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.
त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

18 September, 2026

भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन२१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार


छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या भेटीसाठी विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी भेटसाठी उपस्थित राहून आपले अनुभव व सूचना समितीसमोर मांडाव्यात. यापूर्वी ई-मेलद्वारे सूचना व अभिप्राय सादर केलेल्या विद्यार्थी व संबंधित घटकांनीही बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत याबाबत चर्चा होणार आहे. परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध घटकांना प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.
भरती परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, क्लास चालक-मालक व संबंधित संस्थांनी या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
---