06 March, 2026

जिल्ह्यात 13 हजार 288 मुलींना मोफत देणार कर्करोगावरील सुरक्षा लस



प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळणार एचपीव्ही लस

खासगी रुग्णालयात मोजावे लागतील 10 हजार रुपये

जिल्ह्यातील मुलींनी मोफत लस घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन 


हिंगोली, जिमाका (दि.6): दैनंदिन जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या निर्देशनुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षे पूर्ण झालेल्या पण 15 वा वाढदिवस साजरा न केलेल्या (जन्म तारीख 8 मार्च 2011 ते 7 मार्च 2012 या कालावधीत जन्मलेल्या) जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाणार आहे.  

  गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनमार्फत एचपीव्ही सुरक्षित लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, या लसीमुळे भविष्यात मुलींना गर्भाशय मुख कर्करोग होणार नाही. या मोहिमेचा जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 मुलींना थेट फायदा होणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेमध्ये आपल्या मुलींना ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने पालकांना केले आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा जीवघेणा आजार ठरत आहे. खासगी रुग्णालयांत या एका लसीसाठी जवळपास 10 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हीच लस आता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्येच आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विनामूल्य मिळणार आहे. ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका 99 टक्क्यांनी कमी होतो. 

गर्भाशय कर्करोग: वेळीच सावधनता बाळगावी


अस्वच्छता, असुरक्षित संबंध आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग वाढतोय. सध्या हा आजार महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा वयाच्या 14 ते 15 व्या वर्षी 'एचपीव्ही' लस घेणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील मुलींनाही या महागड्या लसीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पिढी आरोग्यदायी राहील. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या पालकांनी ही लसीकरण करून घ्यावे. ही लस एकदम सुरक्षित असून, जगात जवळपास 80 देशात ही लस किशोरवयीन मुलींना यशस्वी दिलेली आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. 

मोहीम यशस्वी राबवण्यासाठी सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखखाली प्रशिक्षित स्टाफमार्फत फक्त आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच दिली जाणार आहे.


 हे एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणासाठी पालकाची संमती अनिवार्य असून, ती यु-विन पोर्टलवर डिजिटल स्वरुपात किंवा इंटरनेट नसल्यास लेखी स्वरुपात घेतली जाईल. लसीकरणानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईने चिन्ह केले जाईल. 

मुलींनी उपाशीपोटी लस घेऊ नये; पालकांनी त्यांना नाश्ता देऊन लसीकरणासाठी पाठवावे, लसीकरणानंतर किमान 30 मिनिटे निरीक्षणाखाली थांबणे आवश्यक आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

- डॉ. सतिश रुणवाल, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी 

 *****

05 March, 2026

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, कहाकर (बु.), केंद्रा बु., गुगुळ पिंपरी, कडोळी, गोरेगाव, आखाडा बाळापूर, शेवाळा, येलकी, घोडा, येहळेगाव तु., सावना, बाभुळगाव, चिंचा, दांडेगाव, पारडी, पुसेगाव, खुडज, हत्ता आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 





आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धांचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून प्राप्त सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘अस्मिता महिला लीग’ आयोजनाबाबत मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका क्रीडा संकुल हिंगोली यांच्या सहकार्याने दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तालुका क्रीडा मैदान, हिंगोली येथे ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा सहभाग वाढविणे, स्थानिक स्तरावर क्रीडा चळवळ बळकट करणे तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. तसेच जिल्हा स्तरावर क्रीडा संरचना व तांत्रिक क्षमता विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत अॅथलेटिक्स प्रकारातील धावण्याच्या स्पर्धांचा समावेश असून १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा १३ वर्षाखालील, १३ ते १८ वर्षे व १८ वर्षांवरील मुली व महिलांसाठी खुल्या राहतील.

नोंदणीच्या वेळी खेळाडूंच्या वयाची पडताळणी आधार कार्ड (प्राधान्याने), राज्य किंवा केंद्र शासनाने दिलेला जन्मतारीख नमूद असलेला पुरावा, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच नोंदणीदरम्यान खेळाडूंचे वय, वजन व उंची नोंदविणे आवश्यक राहील.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक मुली व महिला खेळाडूंनी दि. ७ मार्च २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह https://account.kheloindia.gov.in/#/login या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी मेरा युवा भारत केंद्र, नाईक नगर, हिंगोली येथे प्रविण पांडे (मो. ७०२८३६९०७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेस मंत्रीमंडळाची मान्यता


* लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार 



• दि. १ एप्रिलपासून वर्षभर राबविणार अभियान  

हिंगोली: जिमाका, (दि. ५ ): राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या महत्वाकांक्षी “माझं  गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात लोकसहभागावर आधारित “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ  राबविण्यास १ एप्रिल पासून ३१ मार्चपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद येथील व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन अभियानाची दिशा ठरविण्यात आली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गट विकास अधिकारी माया वानखडे, अनिल मुंढे, प्रफुल्ल तोटेवाड, सुरेश कांबळे, कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी व तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

गाव पातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, प्रतिबंधात्मक व  प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल, व आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असून,  सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव बनवणे हा या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले 

या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणे, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, जीवनशैलीजन्य आजारांचे नियंत्रण आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापना केल्या जाणार आहेत. आरोग्यमंत्री श्री. आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती असून, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, आयुक्त व संचालक या समितीचे सदस्य असतील. राज्यस्तरीय कृती समितीही स्थापन करण्यात येणार असून,  सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव (अपर मुख्य सचिव) समितीचे अध्यक्ष असतील. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. एकूण गुणांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव”  म्हणून घोषित करण्यात येईल. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे. 

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ही योजना म्हणजे केवळ आरोग्य विभागाची नव्हे, तर समाजाच्या सर्व घटकांच्या सहभागातून उभी राहणारी लोकचळवळ ठरणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, आरोग्यदायी  महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.

********* 




04 March, 2026

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील जवळा बु., अकोली, नहाद, गुंडा, हट्टा, करंजाळा, पळशी, आजेगाव व वाघजळी आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******* 






‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 4 : ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ प्रभावी व यशस्वीपणे राबवावे. या शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

हिंगोली जिल्ह्यातील सरपंचांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्याने पहिल्या टप्प्यात किमान पाच पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. यासाठी आवश्यक साधनसामग्री, प्रशासकीय मान्यता व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. तसेच सरपंचांनी शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

या शिबिरांमध्ये मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी निश्चित दिनांकांना उपस्थित राहून विविध महसूल विषयक कामांचा निपटारा करणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा दुरुस्ती, अभिलेख पडताळणी, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारणे व मार्गदर्शन करणे या सेवा उपलब्ध राहणार आहेत.

तसेच ‘जिवंत सातबारा’ मोहिम, तुकडेबंदी कायद्याविषयी जनजागृती, अकृषीक तरतुदींबाबत माहिती, डिजिटल सातबाराची वैधता, भूसंपादन प्रकरणे, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, प्रधानमंत्री किसान योजना आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेसंदर्भात माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण तसेच पांदण रस्त्यांच्या मान्यतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

 

शिबिरांचे प्रभावी आयोजन करून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जिल्ह्यात पाणंद रस्त्यांसाठी एकूण 625 किमीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून उपलब्ध निधीनुसार पहिल्या टप्प्यात 25 किमी रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. उर्वरित कामे निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. तसेच शासनाच्या 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक गावात शिबिरांचे प्रभावी आयोजन करून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनीही या अभियानाचा आढावा घेत मार्च ते मे 2026 या कालावधीत हे शिबीर अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शासन निर्णयानुसार शिबिरांचे सुयोग्य नियोजन करून ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

*******

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी 31 मार्चपर्यंत नामांकन सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने सन 2024-25 या वर्षासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी पात्र युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी हा पुरस्कार एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थेला प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामध्ये युवक व युवतीस प्रत्येकी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रु. 10 हजार रोख रक्कम, तर संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रु. 50 हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक/युवतीचे वय संबंधित वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 13 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे तसेच अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात किमान 5 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. अर्जासोबत केलेल्या कार्याचे पुरावे (वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो, चित्रफिती इ.) जोडणे बंधनकारक आहे. तसेच चारित्र्य प्रमाणपत्र व हमीपत्र सादर करणे आवश्यक राहील. शासकीय व निमशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच प्राध्यापक या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थांसाठीही स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करण्यात आले असून संबंधित संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 अंतर्गत नोंदणीकृत असावी व किमान 5 वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.

या पुरस्कारासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201311121122043321 आहे. इच्छुकांनी अर्जाचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावा व पूर्ण प्रस्तावासह दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत सादर करावा.

अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.


******