25 April, 2026

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ



हिंगोली, दि. २५ (जिमाका) : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दि. १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेत देशभरातील एक कोटीहून अधिक मौल्यवान हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

भारताला प्राचीन काळापासून वेद, उपनिषदे, आयुर्वेद, ज्योतिष, गणित, तत्वज्ञान, साहित्य, इतिहास, धर्मशास्त्र, संगीत, कला अशा विविध क्षेत्रांतील हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या या हस्तलिखितांच्या माध्यमातून जतन होत आले असले तरी ही ज्ञानसंपदा विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने ती एकत्रितपणे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ज्ञानभारतम् प्रकल्पाची आखणी करून देशातील मौल्यवान हस्तलिखितांचा एक राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा डिजिटल संग्रह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था, संशोधन केंद्रे तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने हस्तलिखितांचा शोध, त्यांचे वर्गीकरण, पडताळणी व नोंदणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत नोंदविण्यात येणाऱ्या हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालय किंवा खाजगी संग्राहक यांच्याकडेच राहणार असून, स्वेच्छेने शासनाकडे हस्तलिखिते सुपूर्द करण्याची इच्छाही व्यक्त करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कवि कालिदास‌ संस्कृत विद्यापीठ भांडारकर ओरीएंटेल रिसर्च इंस्टिट्यूट या क्लस्टर केंद्रांचा, तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास‌ संशोधक मंडळ या स्वतंत्र केंद्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले हे कार्य पाहणार आहेत. तसेच सहनोडल अधिकारी म्हणून अंजली धमाल‌ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर सर्वेक्षण मोहिमेसाठी “ज्ञान भारतम् हे विशेष मोबाईल अँप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, छायाचित्रण, पडताळणी आणि दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्हास्तरावर या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, विद्यार्थी, एनसीसी-एनएसएस स्वयंसेवक तसेच वारसा संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

आपल्याकडे प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, ताडपत्रे, कागदी हस्तलिखिते किंवा दुर्मीळ लिखित साहित्य उपलब्ध असल्यास त्याची माहिती मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय वारसा जतन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****

जिल्ह्यात १ मेपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ; नागरिकांनी ऑनलाइन स्वयं-गणना करण्याचे आवाहन

 



हिंगोली, दि. २५ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास १ मे २०२६ पासून प्रारंभ होत असून, या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक घराची तसेच कुटुंबातील मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन स्वयं-गणना करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी www.se.census.gov.in⁠ या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची व घराची माहिती अचूकरीत्या नोंदवावी. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर संबंधित कुटुंबास एक ‘युनिक आयडी’ प्राप्त होणार असून, जनगणनेसाठी नियुक्त प्रगणक घरभेटीवर आल्यास हा क्रमांक त्यांना सादर करणे आवश्यक राहणार आहे.

जनगणना प्रक्रिया सुरळीत, अचूक आणि वेळेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक यंत्रणा उभी केली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ९७८ प्रगणक, ३४३ पर्यवेक्षक तसेच फिल्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण कामकाजासाठी २ हजार २६ गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन माहिती संकलनाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

या जनगणनेत नागरिकांना एकूण ३४ प्रश्नांची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये घरातील टीव्ही, मोबाइल, संगणक, वाहन यांसारख्या सुविधा, शौचालयाची उपलब्धता, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, घराची मालकी, कुटुंबातील सदस्यांची संख्या, जातीचा प्रवर्ग, विवाहित जोडपी आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजनांचे नियोजन, संसाधनांचे वाटप आणि विकास आराखडे तयार करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेषतः आपण ज्या ठिकाणी सध्या राहात आहोत, त्या ठिकाणचीच माहिती पोर्टलवर भरावी किंवा प्रगणकांना द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे लोकसंख्येचे वास्तव चित्र समोर येण्यास मदत होणार आहे.

जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून, त्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्याविषयक सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन हे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*****

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल रोजी * डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजवावा

 

हिंगोली दिनांक २५  :-  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल  २०२६ रोजी,  पहिला मजला, परिचारीका महाविद्यालय ईमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी  होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबादारीने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ही निवडणूक दि.२६ एप्रिल २०२६ रोजी पहिला मजला, परिचारीका महाविद्यालय ईमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली येथे होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. 

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे. १) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेली नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) जर यावर छायाचित्र नसेल तर त्यासोबत अन्य फोटो आयडी पुरवा जोडणे आवश्यक आहे. 

२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र (Identity Card). 

३) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले छायाचित्रासंहित ओळखपत्र.

४) विवाहित महिला मतदारांसाठी जर नाव बदलेले असेल तर नाव बदलल्याबाबतचा अधिकृत पुरावा (शासन अधिसूचना/ गॅझेट) सादर करणे आवश्यक आहे.


  मोबाईल आणि कॅमेरा, मतदान केंद्राच्या आत  नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीस व्हिडिओ कॅमेरा वापरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. मतदान पध्दत: मतदान गुप्त व पारंपारिक पध्दतीने मतपत्रिकेव्दारे घेण्यात येईल.

*मतदान प्रक्रिया :-* प्रत्येक मतदारास नऊ (९) मते देता येतील. मतदारास ज्या उमेदवारास मत द्यायचे आहे, त्यांच्या नावासमोर (X) अशी खूण त्यांना पुरविण्यात आलेल्या काळ्या बॉल पेनाने करावी अशा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने पार पडावा असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

००००००००

राज्य सेवा हक्क आयोगाकडून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विशेष सन्मान


*अधिसूचित सेवांच्या वेळेत निपटाऱ्यात हिंगोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी*


• मुख्य सचिवांच्या‌ हस्ते सह्याद्रीवर होणार सन्मान 


हिंगोली, दि. २५ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान मंगळवार, (दि. २८) रोजी‌ सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित "द्वितीय सेवा हक्क दिन" निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण (निर्धार) यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विशेष निमंत्रण पत्र पाठविले असून, त्या पत्रानुसार, वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने संपूर्ण राज्यासाठी आदर्श निर्माण केला असून, राज्यातील इतर जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सदर राज्यस्तरीय सोहळा  महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या‌ अध्यक्षतेखाली तसेच मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेवा हक्क अधिनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना वेळोवेळी सूचना, आढावा बैठक, ऑनलाइन अर्ज निपटारा यंत्रणा बळकट करणे, प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष आणि नागरिकाभिमुख प्रशासन या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिपाक म्हणून हिंगोली जिल्ह्याने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या या यशामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक व उत्तरदायी सेवा देण्याच्या दिशेने प्रशासनाचा आत्मविश्वास आणखी वृद्धिंगत झाला आहे.

******

24 April, 2026

हिंगोली जिल्ह्यात 480 रुग्णांना सुमारे 3.85 कोटींची मदत


·  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती


हिंगोली, दि. २४ (जिमाका):  शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.  हिंगोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात 480 रुग्णांना सुमारे 3 कोटी 85 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.


            मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.


*२० गंभीर आजारासाठी मदत*


कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.


*सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा*


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.


*आर्थिक वर्षातील मदत*


१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील 480 रुग्णांना सुमारे 03 कोटी 85 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे.  सुधारित कार्यपद्धती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभ अधिक वेगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे. अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

*****


नांदेड येथे ३० एप्रिलला कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा; सहभागी होण्याचे आवाहन


हिंगोली, दि.२४ (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे गुरुवार (दि. 30) रोजी सकाळी 10 वाजता नांदेड येथील श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर येथे आयोजन करण्यात आले असून, लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात विविध महामंडळांच्या कर्ज व प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज करताना होणाऱ्या त्रुटी टाळण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र, मंजुरीपत्र, प्रशस्तीपत्र व पदकांचे वितरण करण्यात येणार असून ट्रॅक्टर, वाहने आदी साधनांचे वाटपही करण्यात येईल.

या कार्यक्रमात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शनाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी झुंझारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली, किंवा दूरध्वनी 02456-224442 व www.msobcfdc.org⁠ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

23 April, 2026

लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार - डॉ. मोहंती


• प्रकल्पाच्या नागरी व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन


हिंगोली, दि. २३ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी केले. 

दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व निर्वात पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज गुरुवार (दि.२३) रोजी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

या प्रसंगी प्रकल्पाच्या साईट ऑफिस इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, डीसीएसईएमचे संचालक के. महापात्रा, आरआरसीएटीचे संचालक व्ही. पी. भनागे, आयपीआरचे संचालक डॉ. तपस गांगुली तसेच आययूकेए, पुणेचे संचालक आर. श्रीआनंद यांच्यासह संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


लिगो इंडिया प्रकल्प हा गुरुत्वीय तरंगांचा शोध व अभ्यासासाठी उभारला जाणारा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून, या माध्यमातून अवकाशातील सूक्ष्म कंपनांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे ‘एल’ आकारातील दोन भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या निर्वात प्रणालीमुळे अत्यल्प पातळीवरील हालचालींचे अचूक मोजमाप शक्य होणार आहे.

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग व विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत गुरुत्वीय तरंग संशोधनात अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीची विशेष ओळख असलेल्या 'यलो गोल्ड' हळदीचे बॉक्स प्रमुख अतिथींना भेट दिले.

******