हिंगोली, दि. २५ (जिमाका) : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दि. १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेत देशभरातील एक कोटीहून अधिक मौल्यवान हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
भारताला प्राचीन काळापासून वेद, उपनिषदे, आयुर्वेद, ज्योतिष, गणित, तत्वज्ञान, साहित्य, इतिहास, धर्मशास्त्र, संगीत, कला अशा विविध क्षेत्रांतील हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या या हस्तलिखितांच्या माध्यमातून जतन होत आले असले तरी ही ज्ञानसंपदा विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने ती एकत्रितपणे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ज्ञानभारतम् प्रकल्पाची आखणी करून देशातील मौल्यवान हस्तलिखितांचा एक राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा डिजिटल संग्रह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था, संशोधन केंद्रे तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने हस्तलिखितांचा शोध, त्यांचे वर्गीकरण, पडताळणी व नोंदणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत नोंदविण्यात येणाऱ्या हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालय किंवा खाजगी संग्राहक यांच्याकडेच राहणार असून, स्वेच्छेने शासनाकडे हस्तलिखिते सुपूर्द करण्याची इच्छाही व्यक्त करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ भांडारकर ओरीएंटेल रिसर्च इंस्टिट्यूट या क्लस्टर केंद्रांचा, तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या स्वतंत्र केंद्रांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले हे कार्य पाहणार आहेत. तसेच सहनोडल अधिकारी म्हणून अंजली धमाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर सर्वेक्षण मोहिमेसाठी “ज्ञान भारतम् हे विशेष मोबाईल अँप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, छायाचित्रण, पडताळणी आणि दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्हास्तरावर या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, विद्यार्थी, एनसीसी-एनएसएस स्वयंसेवक तसेच वारसा संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
आपल्याकडे प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, ताडपत्रे, कागदी हस्तलिखिते किंवा दुर्मीळ लिखित साहित्य उपलब्ध असल्यास त्याची माहिती मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय वारसा जतन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*****




