13 April, 2026

वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक  योजनेची अंमलबजावणी  सुरू करण्यात आली असून, कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी विशेष फार्मर आयडी नोंदणी मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे.

वनहक्क अधिनियम, 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने वनपट्टा धारक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी फार्मर आयडी नोंदणीस प्राधान्य देण्यात येत आहे.

ही नोंदणी प्रक्रिया राज्यातील नागरी सुविधा केंद्रामार्फत करण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी  सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन नोंदणी करून घ्यावी. विशेष म्हणजे, या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

फार्मर आयडी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे शासनाच्या सेवांचा पारदर्शक व वेगवान लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सहाय्य होणार आहे.

राज्यातील सर्व वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

******

पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर बुधवारी डिजिटल शेती शाळा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’अंतर्गत सुरू असलेल्या विशेष डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या डिजिटल शेतीशाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपाययोजनांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे आणि मृदास्वास्थ्य जपणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

दरम्यान, या डिजिटल शेतीशाळा मालिकेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. 3 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत, आंतरपीक पद्धती, बीज उगवण क्षमता चाचणी तसेच बीजप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात 85 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

तसेच दि. 8 एप्रिल रोजी आयोजित दुसऱ्या सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर भर देत बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात 1 लाख 108 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते, ही या उपक्रमाची उल्लेखनीय बाब ठरली आहे.

या मालिकेतील चौथी डिजिटल शेतीशाळा दि. 22 एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र या विषयावर आयोजित करण्यात येणार आहे.

या डिजिटल शेतीशाळा मालिकेतील सत्रांमध्ये कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ मिळणारी उत्तरे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव यामुळे ही शिकण्याची प्रक्रिया अधिक संवादात्मक व उपयुक्त ठरत आहे.

या सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी  विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्प आणि पानी फाउंडेशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरी शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

*****

विशेष लेख - सुदृढ मातृत्व-सुदृढ बालक : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सशक्त पिढीकडे नेणारे एक भक्कम पाऊल

 


शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकाराम महाराजांच्या ओवीतून व्यक्त होणारा संदेश अत्यंत गहन व मार्गदर्शक आहे. जसे उत्तम बीजापासूनच निरोगी व गुणवत्तापूर्ण फळांची निर्मिती होते, तसेच सुदृढ समाज घडविण्यासाठी  निरोगी  मातृत्व ही अत्यावश्यक बाब आहे. देशाचे भविष्य हे त्या देशातील बालकांमध्ये दडलेले असते आणि त्या बालकांचे आरोग्य ज्या मातेकडून आकार घेते, त्या मातेचे आरोग्य सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

 

कुपोषणाचे दुष्परिणाम

 

भारतासारख्या विकसनशील देशात आजही कुपोषण ही गंभीर समस्या आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, दर तीन स्त्रियांमागे  एक स्त्री कुपोषित आहे, तर दोन स्त्रियांमागे एक स्त्री रक्तक्षयाने (ॲनिमिया) ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत जन्माला येणारी बालके अनेकदा कमी वजनाची व अशक्त असतात.

मातेच्या गर्भाशयात सुरू होणारे कुपोषण बाळाच्या संपूर्ण जीवनचक्रावर परिणाम करते. बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात. पुढील आयुष्यात या त्रुटींची भरपाई करणे अत्यंत कठीण ठरते.

 

गरोदरपणातील आव्हाने

 

सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. प्रसूतीनंतरही त्या लवकरच कामावर रुजू होतात. परिणामी, त्यांना आवश्यक ती विश्रांती मिळत नाही.

गरोदरपण व स्तनपानाच्या काळात महिलांची  शारीरिक  क्षमता नैसर्गिकरीत्या कमी  झालेली असते. या काळात योग्य आहार, विश्रांती आणि आरोग्यसेवा न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम बालकाच्या पोषणावर होतो. विशेषतः बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

 

योजनेची पार्श्वभूमी

 

या सर्व बाबींचा सखोल विचार करून भारत सरकारने  दिनांक 1 जानेवारी 2017 पासून ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’ सुरू केली. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 अंतर्गत राबविण्यात येत असून, गरोदर व स्तनदा मातांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

योजनेअंतर्गत लाभ

 

या योजनेअंतर्गत  गरोदर व स्तनदा मातांना त्यांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी  एकूण 5 हजार रुपये इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. केंद्र  शासनाकडून राज्यांना निधी  थेट हस्तांतरित केला जातो, ज्यामुळे पारदर्शकता व वेळेवर लाभ वितरण सुनिश्चित होते.

 

योजनेची उद्दिष्टे

 

या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर मातेला आवश्यक विश्रांती मिळावी. बुडीत मजुरीची अंशतः भरपाई करणे

गरोदर व स्तनदा मातांना पोषणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. आरोग्य सेवांचा वापर वाढविणे.

सुदृढ माता व सुदृढ बालक घडविणे.

 

पात्रता व अटी

 

सर्व गरोदर व स्तनदा माता (पहिल्या जिवंत अपत्यासाठी) पात्र आहेत. सरकारी कर्मचारी व सार्वजनिक उपक्रमातील महिला या योजनेस अपात्र आहेत. इतर कोणत्याही कायद्यांद्वारे समान लाभ घेत असल्यास पात्रता राहत नाही. एमसीपी (Mother and Child Protection) कार्डवरील नोंदीनुसार लाभ निश्चित केला जातो.

 

विशेष तरतुदी

 

गर्भपात किंवा उपजत मृत्यू झाल्यास, ठराविक अटींनुसार पुढील गरोदरपणात उर्वरित लाभ मिळू शकतो. अर्भक मृत्यू झाल्यास योजना पुन्हा लागू होत नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या पात्र असल्यास या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

हप्त्यांनुसार लाभ वितरण

 

योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांत दिले जाते :

पहिला हप्ता 1 हजार रुपये : गरोदरपणाची लवकर नोंदणी केल्यावर, दुसरा हप्ता 2 हजार रुपये : सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झाल्यास, तिसरा हप्ता 2 हजार रुपये : बाळाचा जन्म नोंदवून लसीकरण पूर्ण झाल्यावर दिला जातो.

 

अतिरिक्त लाभ

 

जननी सुरक्षा योजना (JSY) अंतर्गत लाभ मिळाल्यास, एकूण आर्थिक सहाय्य सुमारे 6 हजार रुपयापर्यंत मिळू शकते.

 

सुदृढ माता हीच सुदृढ समाजाची  भक्कम पायाभरणी आहे. मातृत्व सुरक्षित आणि सक्षम असेल, तरच निरोगी  व सक्षम पिढी घडू शकते. त्यामुळे सर्व गरोदर महिलांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात वेळेत नोंदणी करून ‘प्रधानमंत्री  मातृत्व  वंदना योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात येत आहे. मातृत्व व बालआरोग्य सुधारण्यासाठी  ही  योजना प्रभावी ठरत आहे. सुदृढ मातृत्वाच्या माध्यमातून सक्षम राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

 

                                                                                                - संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******* 



सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध योजनांचा लाभवाटप व ‘घर-घर संविधान’ उपक्रमाचे उद्घाटन



हिंगोली(जिमाका), दि. 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने हिंगोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आज विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभवाटप तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मार्जिन मनी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याचवेळी ‘घर-घर संविधान’ वाटप उपक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हे होते. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती गीता गुठ्ठे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, समाजभूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर, आनंद शिखरे, डॉ. विजयकुमार निलावार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, प्रमुख व्याख्याते प्रा. गजानन बांगर, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, महात्मा फुले मागास विकास महामंडळाचे कृष्णाजी शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा फुले मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले. याशिवाय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना व मार्जिन मनी योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी उपस्थितांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व त्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ‘घर-घर संविधान’ उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिकेचे ग्रामीण भागात पंचायत समितीमार्फत व शहरी भागात नगर परिषदेमार्फत व्यापक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले, तर सूत्रसंचालन समता दूत सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व संविधान उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास सुमारे 250 ते 300 लाभार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध अधिकारी व कर्मचारी तसेच बार्टीचे समता दूत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

****** 




12 April, 2026

येलदरी येथील केबल स्टेड पुल व भूसंपादन प्रक्रियेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


हिंगोली (जिमाका), दि. 12 : हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी येथे पूर्णा नदीवर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उभारण्यात आलेल्या केबल स्टेड पुलाची तसेच संबंधित भूसंपादन प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच स्थानिक शेतकरी खातेदारांशी चर्चा केली. पुलाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच पुलाला जोडणारा रस्ता विकसित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सविस्तर चर्चा केली.

पुलासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे, अशा सर्व प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

तसेच आतापर्यंत भूसंपादन व रस्ते विकासाबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येलदरी येथील जलविद्युत प्रकल्पालाही भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

******





भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पांगरा शिंदे गावाला भेट

 





हिंगोली, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे भूकंप मापन केंद्रांच्या नोंदीनुसार ४.७ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज रविवारी (दि.१२) पांगरा शिंदे येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती नागरिकांनी दिली असून प्रशासनाकडून आवश्यक ती पाहणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

******

सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

 



हिंगोली (जिमाका), दि. १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज हिंगोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज  सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती महिला सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी श्रीमती शांताबाई मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम गोरे, समाजसेवा अधीक्षक संदीप सोळंके, गौरव लोथे व रक्तपेढी सहाय्यक स्वप्नील दिपके, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उबाळे, गृहपाल विजयकुमार सोनटक्के, श्रीमती सुलोचना ढोणे, श्रीमती धनश्री अवचार, कोटक महिंद्रा बँकेचे विभागीय व्यवस्थापक अनिल जाधव तसेच सरस्वती महिला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती ताराबाई खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार सोनटक्के यांनी केले तर सूत्रसंचालन शंकर पोघे यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिरात सुमारे 150 ते 200 रक्तदाते उपस्थित होते, त्यापैकी 21 जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. या उपक्रमात समाज कल्याण विभागाचे कर्मचारी तसेच बार्टीचे समतादूत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

*****