12 February, 2026

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी 536 कोटी 88 लाख रुपयाची अतिरिक्त मागणी

 



 

हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल

                                                                                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रस्ते, पूल, शिक्षण, कृषी, जलसंधारण आदी पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येणार असून, जिल्ह्यात होणाऱ्या दर्जात्मक विकासकामावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीमती शैला ए. , जिल्ह्याच्या पालकसचिव श्रीमती रिचा बागला, नियोजन विभागाचे उपायुक्त विजय पवार उपस्थित होते.

 जिल्हा वार्षिक योजना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतर्गंत प्रत्यक्ष 201 कोटी 66 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 536 कोटी 55 लाख 88 हजार रुपयांची अतिरिक्त मागणीबाबत सविस्तर सादरीकरण केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, प्रदीप नळगीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील रस्ते, शाळा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय इमारती, श्री. संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसेच जिल्ह्याचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्याचे सिंचन वाढविणे, पाणंद रस्त्याची कामे तसेच निजामकालीन मोडकळीस आलेल्या शाळेचे बांधकाम आदी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.

कृषी व संलग्न सेवामध्ये मत्स्य उत्पादनात वाढ, पशु विकास, स्मशान भूमी शेड बांधकाम, आठवडी बाजार विकसित करणे, भूमीगत गटार, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, कयाधू नदीवर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण कोल्हापुरी बंधारे प्रस्तावित करणे, पाझर तलाव व सिंचन तलाव दुरुस्ती, नवीन अंगणवाडी बांधकाम व सोलार संच पुरवणे, महिला बचत गटाकरिता विक्री केंद्र उभारणे, रस्ते व पूलाचे बांधकाम, पोलीस दलाकरिता वाहने व अत्याधुनिक सामुग्री खरेदी, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ देवस्थानचा विकास तसेच टुरिझम सर्कीट उभारणे तसेच संत नामदेव मंदिर व श्री नानाजी देशमुख यांच्या गावात म्युझियम उभारणे यासह जिल्ह्यातील विविध यात्रास्थळांच्या ठिकाणी भौतिक सोयीसुविधा निर्माण करणे आदी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

******* 



महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी – अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 

हिंगोली(जिमाका), दि. 12 : दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाच्या दिवशी भगरीचे विविध पदार्थ सेवन करण्याची प्रथा आहे. तथापि, भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात वारंवार घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

भगर हा भरड धान्याचा एक प्रकार असून वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्यांपासून ती तयार केली जाते. धान्याच्या प्रकारानुसार वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर असे प्रकार पडतात. वरई भगर उच्च प्रतीची तर कोद्रा भगर तुलनेने हलक्या प्रतीची समजली जाते. भगरीत कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर्स तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आढळतात. तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेही रुग्णांसाठीही ती उपयुक्त मानली जाते.

अन्न व औषध प्रशासनाच्या अभ्यासानुसार, भगरीवर Aspergillus tamarii प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामधून Fumigaclavin A, Cyclopiazonic Acid तसेच Aflatoxin, Ergotoxins यांसारखी मायकोटॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता असते. 25 ते 32 अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता बुरशी वाढीस अनुकूल ठरते. अशा प्रकारे बाधित भगर सेवन केल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.


भगर खाताना घ्यावयाची काळजी :

शक्यतो पॅकबंद व नामांकित ब्रँडची भगर खरेदी करावी. पाकीटावरील पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावा. सूटी अथवा लेबल नसलेली भगर खरेदी करू नये. भगर स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावी. जास्त दिवस साठवलेली भगर वापरू नये.

भगरीचे पीठ तयार स्वरूपात खरेदी करण्याऐवजी आवश्यक तेवढीच भगर दळून घ्यावी. पिठात ओलावा शोषण्याची क्षमता जास्त असल्याने बुरशी वाढण्याची शक्यता असते.

शक्यतो घरीच (मिक्सर/ग्राइंडर) दळून ताजे पीठ वापरावे. जाड कोद्रा भगर टाळावी. सलग उपवासाच्या काळात भगर व शेंगदाणे यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्यावेत, अन्यथा अॅसिडिटी, उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.


विक्रेत्यांसाठी सूचना :


पॅकबंद भगरीचीच विक्री करावी व घाऊक खरेदीची पावती जतन करावी. पॅकेट/पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक नमूद असल्याची खात्री करावी. मुदतबाह्य भगर अथवा भगर पिठाची विक्री करू नये. सूटी किंवा खुले भगर व भगर पीठ विक्रीसाठी ठेवू नये. महाशिवरात्री निमित्त उपवास करताना भगरीचे सेवन सुरक्षित पद्धतीने करावे व वरील सूचना पाळून संभाव्य अन्न विषबाधा टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, परभणी/हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

******

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ‘ड’ पदांची निवड व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

 



हिंगोली(जिमाका), दि. 12 : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ‘ड’ संवर्गातील 284 पदे भरण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे जुलै-2025 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दि. 20 आॅगस्ट 2025 रोजी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.

उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

कागदपत्र पडताळणीअंती तयार करण्यात आलेली निवड यादी, प्रतीक्षा यादी तसेच निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in येथे दि. 10 फेब्रुवारी, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ‘ड’ संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी लवकरच बोलावण्यात येणार आहे. समुपदेशनाचे स्थळ व दिनांक याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

11 February, 2026

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव, नटराज, विश्वकर्मा व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांसाठी 21 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 11 : इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या मार्फत सन २०२५-२६ या वर्षाकरिता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार यांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या पुरस्कारांसाठी अर्ज करणारी व्यक्ती अथवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल व शिफारस पत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.

***

बारावी हिंदी विषयाचा पेपर जिल्ह्यात सुरळीत

 


  • 96.61 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11: हिंगोली जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या वार्षिक परीक्षेंतर्गत आज बुधवार, (दि. 11) रोजी सकाळच्या सत्रात हिंदी विषयाचा पेपर जिल्ह्यातील एकूण 26 परीक्षा केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडला.

या परीक्षेसाठी नोंदणीकृत 3 हजार 545 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 425 विद्यार्थी उपस्थित राहिले, तर 120 विद्यार्थी अनुपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण 96.61 टक्के इतके नोंदविण्यात आले.

परीक्षेच्या पारदर्शक व सुयोग्य आयोजनासाठी विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या 5 भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच मुख्य विषयांच्या परीक्षांसाठी 24 संवेदनशील परीक्षा केंद्रांवर श्रेणीवर्ग-1 चे स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने-आण करणाऱ्या सहाय्यक परीरक्षकांसोबत पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यात आजचा हिंदी विषयाचा पेपर कोणतीही अनुचित घटना न घडता सुरळीतपणे पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

******

'महा पशुधन एक्स्पो-२०२६' च्या लोगोचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते अनावरण





हिंगोली(जिमाका), दि. ११ : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दि. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोगो अनावरणप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे महा प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी या महा पशुधन एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन घडणार आहे. याशिवाय आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन, दुग्ध प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात येणार असून पशुधनाचे आरोग्य, लसीकरण व वैज्ञानिक संगोपन या विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रदर्शनाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व नागरिकांनी या महा पशुधन एक्स्पो-२०२६ मध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

******


हिंद दी चादर’ शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज*


*वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन*

नवी मुंबई, दि. 10 (विमाका) : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली.
    या बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, सह आयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नवी मुंबई समागम समन्वयक रविंद्र राठोड, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रविंद्र इंगोले, प्र. माहिती उपसंचालक मनोज सानप, जेएनपीएचे वाहतूक अधिकारी यशवंत पाटील व नागेश आकोडे, तसेच तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ आदी उपस्थित होते.
    नागपूर व नांदेड येथे शिस्तबद्ध व शांततेत पार पडलेल्या या समागमानंतर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.
      नाशिक, पुणे व मुंबईकडून जेएनपीएकडे जाणाऱ्या तसेच जेएनपीएकडून विविध ठिकाणी जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका निश्चित करणे, पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
    कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक रेल्वेने येण्याची शक्यता लक्षात घेता, दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक ठेवू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
000000