03 June, 2026

"शेत वाचवा अभियान"चा हिंगोलीत प्रारंभ; संतुलित खत वापरावर भर

 


हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने हिंगोली जिल्ह्यात दि. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत "शेत वाचवा अभियान" राबविण्यात येत असून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. "सुदृढ मृदा – समृद्ध पीक – आनंदी शेतकरी" ही अभियानाची मुख्य संकल्पना असून कृषिविज्ञान केंद्र, हिंगोलीमार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या (आयसीएआर-आयआयएसएस) अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातील उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या २४६ जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. मृदा आरोग्य पत्रिकेतील माहितीच्या विश्लेषणातून जिल्ह्यातील जमिनीत स्फुरदाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद तसेच इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी वापर टाळून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


आयसीएआरच्या शिफारशीनुसार रासायनिक स्फुरद खतांच्या वापरात कपात करून पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) तसेच प्रतिहेक्टरी ५ टन शेणखताचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता अबाधित राहण्यास मदत होते आणि उत्पादनातही घट होत नाही.


अभियानांतर्गत जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके, सेंद्रिय खते, नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर, हिरवळीच्या खतांचा प्रसार, नैसर्गिक शेती पद्धतींचे प्रोत्साहन, ग्रामपंचायत स्तरावर "शेत वाचवा समिती" स्थापन करणे, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) संपृक्तता मोहीम राबविणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.


यासोबतच नैसर्गिक शेतीतील जिवामृत, बीजामृत, आच्छादन (मल्चिंग) यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, प्रगतशील शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या सहभागातून खतांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.


हिंगोली जिल्ह्यातील मातीची सुपीकता टिकविणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करावा तसेच खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषिविज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषिविज्ञान केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

********

खत-बियाणेच्या लिंकिंगला नाही म्हणा : शेतकऱ्यांनी तक्रारी तत्काळ नोंदवाव्यात

 



हिंगोली (जिमाका), दि. 03 : शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करण्यास सुरुवात केली असून कृषी निविष्ठांच्या विक्रीत कोणत्याही प्रकारचे लिंकिंग होऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा वितरकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन खतासोबत इतर कोणत्याही उत्पादनांची किंवा निविष्ठांची सक्तीने विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी देखील खते, बियाणे किंवा इतर निविष्ठा खरेदी करताना आपल्या मागणीनुसारच साहित्य घ्यावे. विक्रेत्यांकडून बळजबरीने इतर उत्पादने देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यास ठामपणे नकार द्यावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे.


अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षकांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. हिंगोली तालुक्यासाठी प्रविण मनवर (मो. 7588502060) व पंकज राठोड (मो. 9422815152), कळमनुरी तालुक्यासाठी समीर वाळके (मो. 7841882969) व रामेश्वर गवळी (मो. 7038847393), वसमत तालुक्यासाठी केशव भुक्तरे (मो. 7588522845) व रामेश्वर गवळी (मो. 7038847393), सेनगाव तालुक्यासाठी देवेंद्र देशमुख (मो. 9423129188) व पंकज राठोड (मो. 9422815152), तसेच औंढा नागनाथ तालुक्यासाठी किशोर शेळके (मो. 7798465075) व सुभाष पाचपुते (मो. 8850178461) यांच्याशी संपर्क साधता येईल.


याशिवाय कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 तसेच 8275487400 या क्रमांकांवरही तक्रार नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकिंगला बळी न पडता आपल्या हक्काची निविष्ठा मागणीप्रमाणेच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

*******

डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 03 : यंदाच्या खरीप हंगामात एल-निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पुरेसा पाऊस (किमान 100 मिमी) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.


कमी पाऊस अथवा पावसातील खंड यांचा विचार करून शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे व खते वाया जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच खतांच्या वापराबाबत केवळ डी.ए.पी. (18:46:0) खतावर अवलंबून न राहता स्फुरदयुक्त पर्यायी खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.


बाजारात डी.ए.पी.ला पर्याय म्हणून विविध स्फुरदयुक्त खते उपलब्ध असून त्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार व मृदा परीक्षणाच्या शिफारशीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असलेल्या खतांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होईल.


डी.ए.पी.ला पर्याय म्हणून टी.एस.पी. + युरिया तसेच एस.एस.पी. + युरिया यांचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय 12:32:16 व 20:20:0:13 ही एन.पी.के. युक्त खतेही पर्यायी स्वरूपात उपलब्ध आहेत.


शेतकरी बांधवांनी उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा व खरीप हंगामाची यशस्वी तयारी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.


*******

02 June, 2026

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करावी

 


 

·         'गोजातीय प्रजनन व नियमन' विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : राज्यातील खासगी कृत्रिम रेतन  सेवादात्यांनी त्यांच्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक असून, या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवांची संख्यात्मक व अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिणामी, पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन आयुक्त पशुसंवर्धन तथा अध्यक्ष, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरण डॉ. किरण पाटील यांनी केले.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात 'गोजातीय प्रजनन व नियमन' या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस विविध तज्ज्ञ अधिकारी, खासगी सेवा पुरवठादार व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच कृत्रिम रेतन सेवा, नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंग, तांत्रिक एकत्रीकरण तसेच राज्य व केंद्र शासनाच्या भविष्यकालीन धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृत्रिम रेतन सेवा आणि एनडीएलएम आधारित डिजिटल ट्रॅकिंग अत्यावश्यक असल्याचे सांगितले. राज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने काम करावे आणि विभाग त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यशाळेच्या उत्तरार्धात विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी तांत्रिक सादरीकरणे केली. बायफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीत बायफच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. चितळे-एबीएस जेनस प्रा. लि. चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी 'जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गोवंश उत्पादकता व पैदास सुधारण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

भारत पशुधन प्रणालीची उपयोगिता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते यांनी उपस्थित खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर उपस्थित प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन अभिप्राय घेण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

******

हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ उपक्रमाचे आयोजन

 



हिंगोली (जिमाका), दि. २ : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जून २०२६ हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप (मलेरिया) तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर (जे.ई.), चंडीपुरा, हत्तीरोग आदी किटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नागरिकांचा सहभाग वाढावा आणि डासोत्पत्ती रोखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती व्हावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. गावपातळीवर हिवतापाची लक्षणे, वेळेवर उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वच्छतेचे महत्त्व याबाबत विविध माध्यमांतून माहिती पोहोचविण्यात येणार आहे.


या मोहिमेअंतर्गत पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सभा, जलद तापरुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, क्षमता बळकटीकरणासाठी कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समितीच्या बैठका, स्वच्छता मोहिमा, दिंडी, डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचा विशेष कार्यक्रम, बचत गटांच्या सभा, शिक्षकांसाठी जनजागृती कार्यक्रम तसेच विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांमार्फत फवारणी कार्यक्रमांचे पर्यवेक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरातील व परिसरातील पाणी साचणारी भांडी, टाक्या, कुलर, टायर आदी स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून हा हिवताप प्रतिरोध महिना यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. नागरिकांनी किटकजन्य आजारांपासून संरक्षणासाठी स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

********

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे पशुवैद्यकीय सेवा अधिक सुलभ


• घरबसल्या पशुवैद्यकीय सल्ला, उपचार मार्गदर्शन व सरकारी योजनांची माहिती उपलब्ध


हिंगोली (जिमाका), दि. 02 : पशुपालकांना तात्काळ, सुलभ व तंत्रज्ञानाधारित पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी 1962 टोल-फ्री हेल्पलाइन सेवा राज्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमुळे गेल्या पाच वर्षांत राज्यातील 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या दारातच पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे.

‘मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स’ अर्थात फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून पशुधनासाठी वेळेवर, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सेवा अधिक गतिमान व डिजिटल करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे.

या नव्या डिजिटल उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांना घरबसल्या पशुवैद्यकीय सल्ला, उपचार मार्गदर्शन, लसीकरणाची माहिती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे.

पशुपालक +91 9063142299 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून किंवा उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. व्हॉट्सॲपवर "Hi" असा संदेश पाठवल्यानंतर पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण, पशुसंवर्धनविषयक माहिती तसेच विविध सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन मिळते. याशिवाय पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी थेट चॅट, ऑडिओ कन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध आहे. 

या चॅटबॉट सेवेअंतर्गत पशुवैद्यकीय टेलिकन्सल्टेशन, ऑडिओ व व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला, पशुवैद्यकीय डॉक्टरांशी थेट संवाद, पशुवैद्यकीय रुग्णालयांची माहिती, सरकारी योजनांचे मार्गदर्शन तसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ऑक्टोबर 2025 ते मे 2026 या कालावधीत या चॅटबॉट सेवेचा 615 शेतकऱ्यांनी वापर केला असून 201 व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. यामुळे डिजिटल माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

या उपक्रमामुळे पशुपालकांना प्रवास न करता घरबसल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद मिळत असून सरकारी योजनांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. तसेच वेळ व खर्चाची बचत होऊन पशुधनाच्या आरोग्य व उत्पादकतेत सुधारणा होत आहे.

राज्यातील पशुवैद्यकीय सेवा वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, शेतकऱ्यांना वेळेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आणि डिजिटल सुलभतेचा विस्तार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. पशुपालकांना तात्काळ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास पशुसंवर्धन विभागाने प्राधान्य दिले असून, राज्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांनी 1962 कॉलसेंटर सेवा आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

******* 




शासकीय वसतिगृहांतील 220 रिक्त जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन * मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली हिंगोली जिल्ह्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी एकूण 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये मुलांसाठी 4 व मुलींसाठी 4 शासकीय वसतिगृहांचा समावेश असून एकूण 750 प्रवेश क्षमतेपैकी 220 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.


आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 8 वीमध्ये प्रवेशित शालेय विद्यार्थ्यांनी दि. 30 जून 2026 पर्यंत, तर इयत्ता 11 वी (कनिष्ठ महाविद्यालय) तसेच पदवी व वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2026 पर्यंत शासनाच्या hmas.mahait.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.


हिंगोली जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमधील रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 


मुलांचे शासकीय वसतिगृह


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली – 36 जागा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वसमत – 25 जागा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी – 30 जागा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, सेनगाव – 38 जागा


मुलींचे शासकीय वसतिगृह


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 1, हिंगोली – 4 जागा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 2, हिंगोली – 39 जागा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी – 25 जागा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, वसमत – 23 जागा


अशा प्रकारे एकूण 220 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विहित मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करून शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*******