21 June, 2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 



हिंगोली(जिमाका), दि. 21 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसर, हिंगोली येथे योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थिनींनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव करून योग दिनात सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी योग शिक्षिका व महिला पतंजली जिल्हाध्यक्ष ज्योती शेळके, संवाद प्रभारी पूजा चौरसिया, श्रीमती चौंडेकर, श्रीमती दारवेकर, श्रीमती कांदे, श्रीमती मंगला चव्हाण तसेच श्रीमती सुलोचना ढोणे (गृहपाल) व श्रीमती धनश्री अवचार (गृहपाल) उपस्थित होत्या. दोन्ही शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थिनी तसेच कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थिनींनी नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

********

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी : मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

 

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा







हिंगोली, दि. 21 (जिमाका) : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी व संतुलित जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती तसेच विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.              

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे, मयूर रसाळ, शिक्षणाधिकारी विपुल भागवत, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, योग शिक्षक रत्नाकर महाजन, पतंजलीचे कुंडलिकराव निर्मले, ज्योती वाघमारे, शितलताई तापडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी 14 जून रोजी आयोजित ऑनलाईन योग शिबिरामध्ये 4 लाख नागरिकांनी सहभाग नोंदवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याचा उल्लेख केला. योग दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन, मन आणि धनाने सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

योगगुरु रत्नाकर महाजन यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने आपल्या मित्रपरिवार व कुटुंबीयांमध्ये योगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांकडून सराव करून घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या योग शिबिरास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, योगाभ्यासी मंडळांचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


******

20 June, 2026

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी छपाईची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

 





हिंगोली(जिमाका), दि. २० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आवश्यक मतदार यादी छपाईचे काम सुरू असून, या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज संबंधित प्रिंटींग प्रेसला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी छपाई प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. छपाईचे काम अचूक, त्रुटीमुक्त व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना व प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या. मतदार यादीतील माहितीची गोपनीयता, गुणवत्तापूर्ण छपाई आणि निर्धारित कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून, नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्त्या करण्याचे कामही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छापील मतदार यादीची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असून, त्याद्वारे नागरिकांना मतदार यादीतील तपशील पडताळण्यास सुलभता होणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी छपाईच्या विविध टप्प्यांची पाहणी करून कामाची गती व गुणवत्ता समाधानकारक असल्याचे नमूद केले. तसेच मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले.

यावेळी निवडणूक शाखेचे अधिकारी, संबंधित कर्मचारी तसेच प्रिंटींग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सुवर्णसंधी; पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका), दि. २०: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (हिंगोली, कळमनुरी, वसमत व सेनगाव) तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह (हिंगोली, कळमनुरी व वसमत) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर प्रवर्गातील इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार ऑनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org⁠ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून युजर आयडी व पासवर्ड तयार करावा. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा.

शालेय अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६, तर इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम तसेच इंटरनेट (वाय-फाय) सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज करता येईल. वसतिगृह योजनेसाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार व वसतिगृह या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे.

तरी पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

*******

19 June, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 2026 ही परीक्षा दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांतील 1729 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून परीक्षा पारदर्शक, निकोप व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी पेपर-1 साठी 701 आणि पेपर-2 साठी 1028 केंद्रांवर एकूण 18,717 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सर्व उमेदवारांची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी आणि फेस रेकग्निशन करण्यात येणार आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटरसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित असून राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज, मॉर्फ केलेले फोटो तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी ‘फोटो व्ह्यू’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजेपर्यंत आणि पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशपत्रे 16 जून 2026 पासून उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती वेळेत डाउनलोड करून घ्यावीत. परीक्षेबाबत केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच ग्राह्य धरावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.

******

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धडक तपासण्या करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित आणि अचानक तपासणी करून आवश्यक तेथे कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा (पीसीपीएनडीटी) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

राज्यात तसेच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा वापर वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा व तालुका समुचित प्राधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन तपासण्या कराव्यात आणि आवश्यक त्या कायदेशीर कारवाया कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्ह्याच्या लिंगगुणोत्तर प्रमाणाचा आढावा घेण्यात आला. सन 2023 मध्ये हे प्रमाण 1000 मुलांमागे 897 मुली इतके होते. सन 2024 मध्ये ते वाढून 1000 मुलांमागे 961 मुली इतके झाले असून यात 64 अंकांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची त्रैमासिक तसेच अचानक तपासणी करण्याचे, तसेच आवश्यकतेनुसार स्टिंग ऑपरेशन व डिकॉय केसेस राबविण्याच्या सूचना सर्व समुचित प्राधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अनधिकृत गर्भपात रोखण्यासाठीही विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

गर्भलिंग निदानाविरोधात सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बक्षीस योजना, तक्रार नोंदणीची सुविधा, संकेतस्थळ आणि हेल्पलाईन क्रमांक यांची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात यापूर्वी 11 सोनोग्राफी केंद्रांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सध्या 3 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. समुचित प्राधिकाऱ्यांकडून नियमित तपासण्या, धडक मोहिमा आणि जनजागृती उपक्रम राबविले जात असून समाजात मुलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी समुपदेशनही केले जात आहे.

गर्भलिंग निदान किंवा अनधिकृत गर्भपाताबाबत माहिती असल्यास नागरिकांनी www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

*******

जिल्हा विकास आराखड्यातील कामांची प्रमाणपत्रे तात्काळ सादर करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

जिल्हा विकास आराखडा 2025-26 अंतर्गत हस्तक्षेपांच्या प्रगतीचा आढावा


हिंगोली (जिमाका), दि. 19: महास्ट्राईड प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत विविध विभागांमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या हस्तक्षेपांची उपयोगिता प्रमाणपत्रे, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे तात्काळ सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

महास्ट्राईड प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत विविध विभागांच्या हस्तक्षेपांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास बालाजी मरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग, विभागीय वन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी आणि यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महास्ट्राईड प्रकल्प आणि जिल्हा विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध हस्तक्षेपांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे सादर केल्यास कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रत्यक्ष परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच विविध विभागांनी आपल्या अखत्यारितील हस्तक्षेपांची अद्ययावत माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रभावी देखरेख ठेवता येईल आणि विकासकामांना गती देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. आगामी वर्षासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव संबंधित विभागांनी वेळेत सादर करावेत, जेणेकरून विकास आराखड्याची प्रभावी आखणी करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असून, मंजूर कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीत विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. विकासकामांची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


******