24 February, 2026

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षा गुणयादी जाहीर * दुरुस्ती अर्जासाठी 5 मार्चपर्यंत मुदत

 


हिंगोली (जिमाका), दि. 24 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा सन 2025-26 साठी इयत्ता 8 वीची परीक्षा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी आज दि. 24 फेब्रुवारी 2026 पासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सन 2007-08 पासून मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या गुणवत्तेची जोपासना करणे व त्यांचे शिक्षण इयत्ता 12 वी पर्यंत पूर्ण व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये (वार्षिक 12 हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते.

इयत्ता 8 वीतील आर्थिक दुर्बल घटकांतील, वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयापेक्षा कमी असलेल्या व अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या गुणयादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आडनाव, जन्मतारीख, जात, आधार क्रमांक, माध्यम, प्रश्नपत्रिका संच कोड आदी बाबींमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित शाळेच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्ती प्रक्रिया दि. 5 मार्च 2026 पर्यंत खुली राहणार आहे.

ऑनलाईन पद्धतीशिवाय (टपाल, समक्ष किंवा ईमेलद्वारे) पाठविलेल्या अर्जांचा तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. प्राप्त दुरुस्त्यांनंतर पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कार्बनलेस उत्तरपत्रिकेमुळे गुण पडताळणीची  सुविधा उपलब्ध नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.

 

********

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा






हिंगोली (जिमाका), दि. 24 : न्यायिक जिल्हा परभणी येथून हिंगोली येथे स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना दिनांक 22 फेब्रुवारी  2025 रोजी करण्यात  आली होती. त्यानुसार  न्यायिक जिल्हा हिंगोली अस्तित्वात आला. याच्या वर्षपूर्तीनिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्षर अॅड. श्रीधर घुगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली उपस्थित होते.

येथील जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित हा  वर्धापन दिन कार्यक्रम जिल्हा न्यायालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर. एम. रोटे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व्ही. एम. मानखैर,  मुख्य न्यायदंडाधिकारी  श्रीमती  ए. बी. कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) पी. जी. महाळकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) डी. व्ही. भंडारी,  तृतीय सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) श्रीमती एस. एस. पळसुले यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ, वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. मिलिंद कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अॅड. डी. बी. खंदारे यांनी केले.


***

राष्ट्रीय लोकअदालतीचे 14 मार्च रोजी आयोजन

 


हिंगोली (जिमाका), दि. 24 : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 14 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडयुक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वाद पूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. श्रीधर घुगे यांनी केले आहे. 

***

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाद्वारे विविध गावात जनजागृती

  






हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली  जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील  लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील  वडद, लाख, पिंपळदरी, जलालदाभा, लोहारा बु. आदी गावामध्ये  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची  जनजागृती करण्यात आली . या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

हिंगोली  जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

***

23 February, 2026

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त वसतिगृहात स्वच्छता अभियान

 




हिंगोली (जिमाका), दि. 23 : नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे संत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वसतिगृह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

यावेळी श्रीमती सुलोचना विष्णु ढोणे (गृहपाल) यांच्या मार्गदर्शनाखाली वसतिगृहातील सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


******





*कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला*                                                                                                                            *“हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष*


'*बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद*


नवी मुंबई, दि.23( विमाका) :-  हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.

नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांच्यासह उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मनोज सानप, सहायक आयुक्त डॉ.सागर घोलप, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त दिपाली दिवेकर, नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोडे, तसेच गुरुबचन सिंग सिंघल, जसपाल सिंग नागरा, नगरसेवक कुलदीप सिंग सुरी, जसविंदर सिंग, मुख्याध्यापिका अमरजित कौर सेनी आणि ज्येष्ठ पत्रकार बी.पी. नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहादूर सिंग जी यांचे बलिदान केवळ शीख समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खारघर, सेक्टर 29 येथे आयोजित होणाऱ्या या भव्य समागमात जगभरातून 15 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा विश्वविक्रमी उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे मनस्वी समाधान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या या विक्रमी सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, श्री गुरु तेग बहादूर जी यांचे जीवन धैर्य, करुणा, समता आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा एक तेजस्वी आदर्श आहे. 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गायलेले हे गीत सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करणारे असून, जागतिक स्तरावर याची नोंद होणे ही गौरवास्पद बाब आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी खारघर येथील सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. उद्याचे भविष्य या मुलांच्या हातात असून त्यांना असे संस्कारक्षम कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरतील त्यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठिक 09.00 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक गायन केले. प्रास्ताविक करताना उपसंचालक मनोज सानप यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही मोहीम आता केवळ 'व्हिडिओ कंटेंट' न राहता एक संस्कारांची डिजिटल चळवळ बनली आहे. गुरुबचन सिंह यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत मुलांचे प्रबोधन केले. कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक संजीवनी जाधव-पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

000 000

 




हिंद दि चादर”चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

 

   *...जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*


पालघर, दि. २३ फेब्रुवारी (प्रतिनिधी)  वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत “हिंद दी चादर” या संकल्पनेचा मूलभूत संदेश त्यांच्या मनात रुजवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध सूफी गायक सतिंदर सरताज यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमास प्रांत अधिकारी प्रदीप चव्हाण, शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.

संवादातून विद्यार्थ्यांना विचारांची दिशा

भक्तिगीतानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी, “गाण्याचा अर्थ कोणाला समजला का?” असा थेट प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाची संधी दिली. “प्रत्येक कृतीमागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ ऐकणे नव्हे, तर त्यातून मूल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शीख धर्माचे नववे गुरु गुरू तेगबहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “हिंद दी चादर” म्हणजे हिंदू धर्माचे नव्हे, तर संपूर्ण हिंद — म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे. हा संदेश धार्मिक सहिष्णुता, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या मूल्यांना बळकटी देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

धर्मनिरपेक्षतेचा संविधानिक संदेश

“आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म पाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. कोणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. गुरु तेग बहादूर यांनी याच मूल्यांसाठी बलिदान दिले,” असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली.

गुरुद्वारातील सेवाभावाचा उल्लेख करत त्यांनी सेवा, नम्रता आणि स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. “समाजासाठी निस्वार्थ सेवा आणि स्वतःचे कार्य स्वतः करण्याची वृत्ती अंगीकारली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

   अंबिस्ते येथील आश्रमशाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिक्षकांचे प्रयत्न यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून आपण जीवनात यशस्वी व्हावे,” अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिल्या.

******