10 May, 2026

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये ७ कोटी २४ लाख ४५ हजार रुपयांची प्रकरणे निकाली




हिंगोली(जिमाका), दि. १० : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दिनांक ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत प्रलंबित व वाद दाखलपूर्व अशा विविध प्रकारच्या प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली १ हजार ३४६ प्रकरणे तसेच महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्या वाद दाखलपूर्व ९ हजार ६४० प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी प्रलंबित १७६ तर वाद दाखलपूर्व ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण तब्बल ७ कोटी २४ लाख ४५ हजार ६३ रुपयांची तडजोडीअंती रक्कम निश्चित करण्यात येऊन संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. 

लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी व विधिज्ञांचा समावेश असलेले एकूण सहा पॅनल गठीत करण्यात आले होते.

या लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. एस. माने, जिल्हा न्यायाधीश-२ आर. एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. एम. मानखैर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी, तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. एस. पळसुळे  तसेच दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती डी. व्ही. भंडारी  यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.


सयद गौस सयद अली यांच्या कुटुंबाला लोकअदालतीमार्फत ६४ लाखांची नुकसानभरपाई


राष्ट्रीय लोकअदालतीदरम्यान सयद गौस सयद अली यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळाला. सयद गौस सयद अली यांचा दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी भोगाव देवी ते जिंतूर रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणात लोकअदालतीत तडजोडीअंती लिबर्टी इन्शुरन्स कंपनीमार्फत ६४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली व प्रकरण निकाली काढण्यात आले. अर्जदारातर्फे अॅड. एस. बी. गडदे यांनी तर विमा कंपनीतर्फे अॅड. व्यास यांनी बाजू मांडली.

*******

08 May, 2026

महाडीबीटीवर प्रमाणित बियाणे वितरण व प्रात्यक्षिक प्लॉटसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

 

* शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन



हिंगोली(जिमाका), दि. ८ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामामध्ये गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिके हे घटक महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत.

सन २०२६-२७ खरीप हंगामासाठी तुर, मूग, उडीद, मका, ज्वारी व सोयाबीन या पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण (१० वर्षाखालील व १० वर्षावरील वाण) तसेच पिक प्रात्यक्षिके या घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत. उपलब्ध निधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

*******

एनक्यूएएस नामांकनाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट

 


हिंगोली(जिमाका), दि. ८ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शुक्रवारी (दि. ८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, रुग्णसेवा, बाह्यरुग्ण विभाग, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एनक्यूएएस नामांकन प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण नोंद व्यवस्थापन, औषध उपलब्धता, प्रसूती कक्ष, आपत्कालीन सेवा, प्रयोगशाळा सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विविध विभागांना भेट देत तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती घेतली. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजहंस हणमंते, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे, मेट्रन बाळासाहेब चिंचकर, सहाय्यक मेट्रन श्रीमती रागिणी जोशी, श्रीमती आशा क्षीरसागर, सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

****** 







पोकरा टप्पा-२ अंतर्गत आदर्श गाव विकासासाठी ऑनलाईन आढावा

 


हिंगोली(जिमाका), दि. ८ : नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ५ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व ‘आदर्श गाव’ निर्मितीच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेशजी अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा, हिंगोली तालुक्यातील वैजापूर, वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडी तसेच कळमनुरी तालुक्यातील कांडली या गावांच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राकेशजी अहिरे यांनी संबंधित गावांमध्ये तातडीने पी.आर.ए. सर्वेक्षण पूर्ण करून गावनिहाय समस्या ओळखण्याच्या सूचना दिल्या. तसेच शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत समस्यांच्या निराकरणासाठी ठोस कृती आराखडा तयार करून निवडलेल्या गावांचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकीय निधीचा प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा एटीआयसी प्रभारी डॉ. जी. डी. गडदे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके तसेच पोकरा प्रकल्पाचे जिल्हा नोडल अधिकारी कुणाल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली येथील सर्व विषय विशेषज्ञ तसेच निवड करण्यात आलेल्या पाच गावांतील पोकरा प्रकल्पाचे कर्मचारी ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी डॉ. पी. पी. शेळके यांनी हिंगोली जिल्ह्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत नियोजित कामांची माहिती दिली. हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, जलसंधारण व पाणी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी डॉ. पी. पी. शेळके यांनी आभार मानले.

********

टंचाई परिस्थिती कुशलतापूर्वक हाताळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात यश

 


हिंगोली(जिमाका), दि. 8 : हिंगोली जिल्ह्यात सन 2025-2026 या कालावधीतील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, टंचाई परिस्थिती कुशलतापूर्वक हाताळण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात एकूण 543 उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध स्तरांवर कामे सुरू आहेत.

खाजगी विहीर अधिग्रहण योजनेअंतर्गत 302 गावांमध्ये एकूण 336 विहिरी/बोअर अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या 26 गावांमध्ये 28 विहिरी/बोअर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 2 शासकीय टँकरच्या माध्यमातून 3 वाड्या/तांड्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच नविन विंधन विहिरी घेण्याच्या योजनेअंतर्गत 28 गावांमध्ये 36 नवीन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित कामांची पुढील कार्यवाही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातही या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोताजवळ रिचार्ज शॉफ्ट, बंधारे आदी जलसंधारणात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच सन 2025 मध्ये जिल्ह्यात 142.6 टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे अतिरिक्त नाविन्यपूर्ण योजनांची आवश्यकता भासली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, आवश्यकतेनुसार टंचाई कालावधीत परिस्थितीनुरूप विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

******

07 May, 2026

बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी महाविद्यालयांना भेटी द्याव्यात - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



* रोजगार, उद्योगवाढ व स्टार्टअपला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत सूचना



हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती द्यावी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कौशल्य विकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. व्ही. बोथीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे, बहिर्जी विद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा उद्योग केंद्राचे मेंढे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले की, राज्यातील नामांकित एमआयडीसी, शासकीय आयटीआय व खाजगी आयटीआय संस्थांना जिल्हास्तरीय पथकांनी भेटी देऊन तेथील उद्योगांचे कामकाज व कंपन्यांच्या मनुष्यबळ आवश्यकतांचा अभ्यास करावा. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी प्रयत्न करून कंपन्यांच्या गरजेनुसार स्थानिक एमआयडीसीमध्ये उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे. आवश्यक कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातच उपलब्ध करून देता येईल, असे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात स्टार्टअप व पेटंट निर्मितीसाठी तरुणांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता असून, जिल्ह्यात झालेल्या संशोधनाची नोंदणी होणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कौशल्य विकास विभागामार्फत सन 2024-25 मध्ये 600 युवक-युवतींना तर सन 2025-26 मध्ये 1050 युवक-युवतींना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थींमधून किती उमेदवारांना रोजगार मिळाला तसेच किती जणांनी स्वतःचे उद्योग सुरू केले याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सन 2024-25 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचा मेळावा आयोजित करावा, त्यामुळे किती उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला याची माहिती मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नाविण्यता सोसायटीमार्फत तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. तसेच सन 2024 मध्ये 10 जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत प्रत्येक दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड स्कील कौन्सिल स्पर्धा, जिल्ह्यातील सहा आयटीआयमधील विविध ट्रेड तसेच टेक्निकल हायस्कूलचा आढावा घेण्यात आला. सन 2025-26 मध्ये शासकीय आयटीआयमधून 644 तर खाजगी आयटीआयमधून 372 विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, यापैकी किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच आयटीआयचा समावेश असून या संस्थांमध्ये सोलार, इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारख्या आधुनिक विषयांवरील प्रशिक्षण दिले जात आहे. याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

यावेळी शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन योजना, उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना, प्रशिक्षण देण्याची दुहेरी प्रणाली, दक्ष योजना, व्यवसाय शिक्षण विद्यावेतन योजना तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी विविध योजनांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

******

हिंगोली येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 


* विविध प्रकारच्या प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्हा न्यायालय हिंगोली अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयांमध्ये तालुका विधी सेवा समिती व वकील संघ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत जिल्हा न्यायालय परिसर, हिंगोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक वाद प्रकरणे, परक्राम्य लिखत अधिनियम कलम 138 अंतर्गत प्रकरणे, नगर परिषद, महावितरण कंपनी, बँका व पतसंस्था यांच्याशी संबंधित वादपूर्व प्रकरणे आदी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत.

लोकअदालतीच्या माध्यमातून परस्पर सामंजस्याने व तडजोडीद्वारे प्रकरणांचा जलद निपटारा होणार असून पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रमाची बचत होणार आहे. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टी. एस. अकाली तसेच वकील संघाचे अध्यक्ष श्रीधर घुगे यांनी केले आहे.

*******