*नारी शक्ती वंदन अभियानांतर्गत यशकथा*
_*माविमच्या माध्यमातून प्रभावती काचगुंडे यांची मोहफुल लाडू उद्योगातून स्वावलंबनाकडे यशस्वी झेप*_
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा या छोट्याशा गावात राहणाऱ्या श्रीमती प्रभावती प्रकाश काचगुंडे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर गावातील इतर महिलांसाठीही नवा मार्ग खुला केला आहे. “नारी शक्ती वंदन अभियान” अंतर्गत त्यांची ही यशोगाथा खऱ्या अर्थाने ग्रामीण महिला सक्षमीकरणाचे जिवंत उदाहरण ठरते.
श्रीमती प्रभावती काचगुंडे या ३५ वर्षीय गृहिणी असून त्यांचे शिक्षण इयत्ता नववीपर्यंत झाले आहे. त्यांच्या कुटुंबात पती, एक मुलगा व दोन मुली असा पाच जणांचा परिवार आहे. कुटुंबाकडे चार एकर कोरडवाहू शेती असून शेती आणि शेतमजुरी हाच उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. मात्र, शेतीतील अनिश्चित उत्पन्नामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा भागवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने त्या जंगलातील व शेतातील मोहफुले गोळा करून विक्री करीत होत्या. त्यातून थोडेफार उत्पन्न मिळत असले तरी त्यात स्थैर्य नव्हते. परंतु, स्वतःचा काहीतरी वेगळा व्यवसाय उभा करण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती. एक दिवस त्यांनी वाळलेल्या मोहफुलामध्ये गूळ मिसळून लाडू तयार केले. घरातील सदस्यांनी त्याची चव घेतली असता ती अतिशय रुचकर असल्याचे लक्षात आले आणि याच क्षणापासून त्यांच्या उद्योगाची सुरुवात झाली.
यानंतर गावातील महिलांना एकत्र करून “जिजामाता महिला स्व-सहाय्यता बचत गट” स्थापन करण्यात आला. लोकसंचालित साधन केंद्र, औंढा नागनाथ येथील सहयोगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने दरमहा १०० रुपयांची बचत सुरू केली. बचतीतून अंतर्गत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारांचे नियोजन, हिशोब ठेवणे या प्रक्रियांमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि समूहभावना निर्माण झाली.
माविम व लोकसंचालित साधन केंद्रामार्फत त्यांना उद्योगजाणीव, कौशल्य विकास, क्षमता वृद्धी आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली. गरजेनुसार गटातून व बँकेकडून कर्ज मिळाल्याने व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध झाले.
प्रारंभी मोहफुल लाडू तयार करून विक्री करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रदर्शनांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे काही प्रमाणात निराशाही वाटू लागली. मात्र, माविमचे अधिकारी, कर्मचारी, सीएमआरसी व्यवस्थापक आणि सहयोगिनी यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेसोबतच पॅकेजिंग, लेबलिंग, सादरीकरण आणि ग्राहकांशी संवाद या बाबींमध्ये सुधारणा केल्या.
या बदलांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आकर्षक पॅकेजिंग आणि उत्कृष्ट चवीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढू लागली. हळूहळू प्रदर्शनांमध्ये नेलेला सर्व माल पहिल्याच दिवशी संपण्याइतकी विक्री होऊ लागली.
वाढत्या मागणीमुळे त्यांनी गटातील इतर महिलांना सोबत घेत उद्योगाचा विस्तार केला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने त्यांना विविध शहरांतील प्रदर्शन, स्टॉल्स आणि बाजारपेठांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध झाली.
आज सौ. प्रभावती काचगुंडे मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी करून मोहफुल लाडू उत्पादन करतात. त्यांच्या उत्पादनाची गावासह विविध शहरांमध्ये मागणी वाढली आहे. या उद्योगामुळे स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्नही वाढले आहे. त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावले असून समाजात त्यांना मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या प्रभावती आज यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. भविष्यात स्वतःचे स्वतंत्र दुकान सुरू करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे आणि अधिक मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे हा त्यांचा मानस आहे.
श्रीमती प्रभावती काचगुंडे सांगतात की, महिलांना योग्य संधी, प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास त्या नक्कीच स्वावलंबी बनू शकतात. महिलांचा विकास म्हणजे कुटुंब, समाज आणि देशाचा विकास होय.
त्यांचा हा संघर्षमय प्रवास अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. नारीशक्तीच्या सामर्थ्याचे हे जिवंत उदाहरण असून, अनेक महिलांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.
— प्रभाकर बारहाते
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
*****