21 May, 2026

वैयक्तिक वनहक्क दावे व अपील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 



हिंगोली (जिमाका), दि. 21 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 तसेच सुधारित नियम 2012 अंतर्गत प्राप्त वैयक्तिक वनहक्क दावे व अपील प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपविभागीय वन अधिकारी यांचे प्रतिनिधी सचिन माने तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे प्राप्त झालेले मूळ दावे व अपील अर्ज निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक ती पुनर्तपासणी करून अतिक्रमण नोंदवहीच्या सत्यप्रतीसह अभिप्राय अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय वन अधिकारी, हिंगोली यांना दिले.

तसेच वनहक्क दाव्यांबाबत आवश्यक पुरावे व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित प्रकरणे समितीसमोर तात्काळ सादर करावीत, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांचे दावे व अपील प्रकरणे वेळेत निकाली काढता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनहक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र वनवासी व पारंपारिक वन निवासी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

*******

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 30 मेपर्यंत अंतिम मुदत

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही निवास, भोजन व इतर सुविधांच्या अभावामुळे पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 30 मे 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.

शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून सध्या 140 अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी विद्यार्थी लॉगीनकडे प्रलंबित आहेत.

सदर अर्जांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी तातडीने पूर्ण करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात जमा करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

******

पाणी टंचाई निवारणासाठी वसमत तालुक्यातील नवीन विंधन विहिरी व हातपंपांना प्रशासकीय मान्यता

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील पाणी टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने विविध गावांमध्ये नवीन विंधन विहिरी व हातपंप उभारणीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसमत तालुक्यातील प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कामांना अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.

वसमत तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट तसेच प्रपत्र ‘ब’ प्राप्त झालेल्या 4 गावांमध्ये 5 नवीन विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील जवळा बु., लहाण, हिवरा खु. व आरळ या गावांचा समावेश आहे. प्रति विंधन विहिरीस 78 हजार 51 रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख 90 हजार 255 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

******  

क्रीडा संकुलांच्या कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तालुका क्रीडा अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत हिंगोली तालुका क्रीडा संकुलातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

कळमनुरी तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम तसेच क्रीडांगण समपातळीत करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

औंढा नागनाथ तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच वसमत तालुका क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदानांसह जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा नव्याने निर्माण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सेनगाव तालुका क्रीडा संकुलासाठी अद्याप जागा उपलब्ध नसल्याने संबंधित विभागांनी तातडीने जागा उपलब्ध करून पुढील कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुलासाठी नव्याने जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी 400 मीटर धावपट्टी, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल मैदान, स्केटिंग रिंग तसेच इतर अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कामे गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

*******

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रद्द

 


हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या, शुक्रवार, दि. 22 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी दिली आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, दि. 22 मे रोजी होणारा मेळावा पूर्णतः रद्द करण्यात येत आहे.

या संदर्भात इच्छूक व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच पुढील आयोजनाबाबतची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी आवाहनाद्वारे स्पष्ट केले आहे.

*******

प्रकल्पबाधितांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम  1976, 1986 व 1999 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनविषयक प्रश्न हाताळण्यासाठी तसेच पर्यायी जमीन व पुनर्वसित गावठाणामधील रहिवासी भूखंड संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सदस्य म्हणून लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, हिंगोली, वसमत-कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी तसेच आखाडा बाळापूर येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 4 चे कार्यकारी अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित प्रकल्पग्रस्तांपैकी दोन प्रतिनिधींची मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या मार्फत नामनिर्देशन करण्यात येणार आहे. तर समितीचे सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्य पाहणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार समितीची बैठक दरमहा घेण्यात येणार असून, संबंधित प्रकरणांची नोंदवही व अभिलेख तयार करून तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या समितीमुळे प्रकल्पबाधित व्यक्तींच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यास गती मिळणार असून, त्यांच्या तक्रारींचे प्रभावी व वेळेत निराकरण होण्यास मदत होणार आहे.

 

*******

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

 



             हिंगोली (जिमाका), दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*******