17 April, 2026

विशेष लेख - नारी शक्ती वंदन अभियान : बचत गटांच्या बळावर हिंगोली जिल्ह्यात महिलांचा सर्वांगीण विकास

 

 

महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक परिवर्तन यांचा प्रभावी संगम घडवून आणणारे कार्य महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे. नारी शक्ती वंदन अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून त्यांना आर्थिक, सामाजिक आणि कौशल्याधारित विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम माविमकडून सातत्याने केले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या 4 लोकसंचालित साधन केंद्रांच्या माध्यमातून विविध विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, वॉटर डॉट ऑर्ग अंतर्गत पाणी, आरोग्य व स्वच्छता अभियान, तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस, व्हल्नरेबल सपोर्ट प्रोग्राम, स्मार्ट प्रकल्प, जिल्हा वार्षिक योजना, लाडकी बहिण सहकारी पतसंस्था, तसेच जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 500 बचत गटांच्या माध्यमातून तब्बल 15 हजार 850 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. सध्या 1 हजार 25 बचत गटांवर 41 कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज सुरू असून महिलांनी उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मितीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. चालू आर्थिक वर्षात 635 बचत गटांना 32 कोटी 17 लाख रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ 6 हजार 650 महिलांना झाला आहे.

या आर्थिक सहाय्यामुळे महिलांनी प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, बिगरशेती व्यवसाय, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मसाले निर्मिती, लोणचे-पापड उद्योग, गारमेंट्स, हस्तकला, ट्रेडिंग, फुलशेती, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू निर्मिती अशा विविध उद्योगांना सुरुवात केली आहे. अनेक महिला ‘लखपती दीदी बनत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.

महिलांच्या कौशल्यविकासासाठी  क्षमता बांधणी प्रशिक्षण, उत्पादन दर्जा सुधारणा प्रशिक्षण, विपणन व्यवस्थापन, बायर-सेलर मेळावे, प्रदर्शनांद्वारे बाजारपेठ उपलब्धता अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. समान व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी क्लस्टर पद्धतीने महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

विशेष अभिमानाची बाब म्हणजे महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण 99.9 टक्के इतके आहे. यावरून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता, बँक व्यवहारांची जाण आणि जबाबदारीची भावना दृढ झाल्याचे दिसून येते.

महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य जनजागृती, सकस आहारासाठी सेंद्रिय परसबाग लागवड, संयुक्त मालकी हक्क जनजागृती, बेटी बचाव-बेटी पढाव, मुलीच्या जन्माचे स्वागत, जागतिक महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, पर्यावरण दिन, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणावर राबविले जातात.

हवामान बदल, जेंडर समता आणि सामाजिक सहभाग या विषयांवर महिलांसह पुरुषांनाही प्रशिक्षण दिले जाते. जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड देऊन पुरुषांचाही गौरव करण्यात येतो. महिलांना कायदेविषयक ज्ञान मिळावे यासाठी कायदा साथी ही संकल्पनाही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

रानमेवा उपक्रमांतर्गत मोहफुलाचे लाडू तयार करून महिलांनी स्वतःची बाजारपेठ निर्माण केली आहे. तसेच हळद लागवड, हळद प्रक्रिया उद्योग, दूध संकलन केंद्र, लघुउद्योग विक्री केंद्र यांसारखे उपक्रम कृती संगमच्या माध्यमातून उभे करण्यात आले आहेत.

महिलांचा सर्वांगीण विकास, कुटुंबाचा शाश्वत विकास, समाजात सन्मान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावे, या उद्देशाने माविममार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली आहे.


                                                                                                संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

******

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक



हिंगोली(जिमाका), दि. १७ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे. या सुधारित प्रणालीमुळे लाभार्थ्यांना विविध प्रक्रियांचा लाभ ऑनलाईन माध्यमातून घेता येणार असून कार्यालयीन फेऱ्यांची गरज कमी होणार आहे.

योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर "Reject for Incomplete Documents" म्हणजेच अपूर्ण कागदपत्रांमुळे नाकारलेली प्रकरणे आता लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. तसेच अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थी स्वतः ऑनलाईन अपलोड करून करू शकतील. आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण "Scrutiny" स्तरावर दिसेल. त्या ठिकाणी महामंडळामार्फत ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी "Submit" पर्याय उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी "Submit" केल्यानंतर प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल.

तसेच व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करताना कागदपत्रांतील तुटींमुळे "Hold" स्थितीत असलेली प्रकरणेही लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसहित दिसतील. अशा प्रकरणांतील तुटींची पूर्तता संबंधित लाभार्थ्यांनी जिल्हा समन्वयकांमार्फत करावी. प्राथमिक तपासणीनंतर ही प्रकरणे विभागीय समन्वयकांमार्फत मुख्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जातील. लाभार्थ्यांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले प्रकरण नियमित करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्रुटी नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वीच्या व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा होती. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचा क्लेम "Sent for CAFO" या स्तरावर पोहोचताच पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार असून प्रक्रिया गतिमान होणार आहे.

योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, बँक मंजुरी व व्याज परताव्यासाठी पात्र प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा सादर कागदपत्रांमध्ये विसंगती अथवा खाडाखोड आढळल्यास ती प्रकरणे "Block" करण्यात आलेली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटमार्फत झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. अशा प्रकरणांतील लाभार्थ्यांनी आवश्यक दुरुस्त्या करून मूळ कागदपत्रांसह अर्ज संबंधित जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. पडताळणीनंतर योग्य निर्णय घेण्यात येईल.

सर्व लाभार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर जाऊन Hold किंवा Block होण्याची कारणे तपासावीत व त्वरित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. वेब प्रणालीवरील सर्व संपर्क यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महामंडळ नियमानुसार योजना राबवत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

*******

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 


            हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही  दिन राबविण्यात येतो.

माहे एप्रिल, 2026 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 20 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.  

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

******

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जास 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


हिंगोली(जिमाका), दि. १७ : शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६ चे आयोजन रविवार दि. २१ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. २७ मार्च २०२६ ते दि. १६ एप्रिल २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, परीक्षार्थी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ साठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आता दि. १७ एप्रिल २०२६ ते दि. २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*******

आपले सरकार सेवा केंद्राची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर * उमेदवारांना हरकती सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. १७ : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी हरकती अथवा आक्षेप असल्यास दि. २० ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रिक्त ४२३ केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण ४३० केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली.

दि. २ जानेवारी २०२६ अखेर प्राप्त झालेल्या एकूण ३१०१ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १८६१ उमेदवारांच्या मुलाखती दि. ३ फेब्रुवारी २०२६ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.

यानंतर दि. ९ मार्च २०२६ रोजी अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या आधारे पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. तसेच तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांविरोधात हरकतीही प्राप्त झाल्या.

एकूण १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील कागदपत्रे सादर केली. त्यानुसार त्यांना गुणदान करण्यात आले. तसेच प्राप्त ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्ता व नियमांच्या आधारे निर्णय देण्यात आला. जाहिरातीत नमूद अटी व शर्तींनुसार अपात्र उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात आले.

या सर्व प्रक्रियेनंतर अंतरिम गुणवत्ता यादीत काही प्रमाणात बदल करण्यात आले असून काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात सुधारणा झाली आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम गुणवत्ता यादीबाबत कोणत्याही उमेदवारास हरकत अथवा आक्षेप असल्यास त्यांनी दि. २० एप्रिल २०२६ ते दि. २२ एप्रिल २०२६ या कालावधीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आयटी सेल यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच दि. २२ एप्रिल २०२६ पर्यंत कोणतीही हरकत प्राप्त न झालेल्या केंद्रांबाबत पुढील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

***

उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
वाढत्या तापमानात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२४५६- २२१७०१ तर हिंगोली नगर परिषदेचा मदत कक्षाचा ०२४५६-२२३१०१:हा क्रमांक आहे. नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित कक्ष व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.
उष्माघाताची लक्षणे म्हणून तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, चक्कर येणे, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
घ्यावयाची काळजी :
नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस यांसारख्या पेयांचा वापर करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच कलिंगड, संत्री, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत.
काय टाळावे :
दुपारच्या उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे. चहा, कॉफी व मद्यपान टाळावे. बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत.
उष्माघात झाल्यास उपाय :
एखाद्या व्यक्तीस चक्कर, मळमळ, ताप किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास त्याला सावलीत बसवावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे.
लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
----**----

16 April, 2026

जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करा; टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था ठेवा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. १६ : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता तसेच सर्व तालुक्यांचे उपअभियंता उपस्थित होते.


बैठकीत जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ६३१ योजना मंजूर असून त्यापैकी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या ६१९ तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १२ योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ३९२ योजनांद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


उन्हाळ्याच्या टंचाई काळात नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी विद्युत कनेक्शन प्रलंबित आहेत, ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून स्टँडपोस्ट व इतर माध्यमांतून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.


जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पेडगाव वाडी, पाणबुडी, लोहगाव, नरसी ना., पहेणी, सिंगी नागा, चिखली, चोंडी शहापूर, बळसोंड व केसापूर येथील प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.


तसेच ज्या गावांमध्ये विहीर व पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागा अधिग्रहणाची प्रकरणे प्रलंबित आहेत, ती तत्काळ निकाली काढावीत. टँकर प्रस्तावित गावांना जलजीवन मिशन व इतर योजनांच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले.


बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.


*******