15 May, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र वाटपास प्रारंभ

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चे आयोजन दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. १ (इयत्ता १ ली ते ५ वी स्तर) व पेपर क्र. २ (इयत्ता ६ वी ते ८ वी स्तर) यांचा अंतिम निकाल दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता.

या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर) यांच्या कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ मधील पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचे वाटप दिनांक १८ मे २०२६ ते ०८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ या संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अथवा शिक्षण निरीक्षक, मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.

*******

हिंगोली जिल्ह्यासाठी 1766 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 


हिंगोली (जिमाका), दि. 15 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रति कुटुंब 1 किलोच्या सुलभ पॅकींगमध्ये साखर वितरणासाठी शासनामार्फत माहे जून ते नोव्हेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियमित साखर नियतन मंजूर करण्यात आले आहे.

या कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यास एकूण 1765.98 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले असून संबंधित स्वस्त धान्य दुकानांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. नियतनाची उचल करून लाभार्थ्यांपर्यंत वेळेत साखर पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय साखर नियतन पुढीलप्रमाणे आहे : हिंगोली तालुका- 460.22 क्विंटल, कळमनुरी- 365.28 क्विंटल, वसमत- 347.34 क्विंटल, सेनगाव- 374.28 क्विंटल आणि औंढा नागनाथ- 218.46 क्विंटल अशा प्रकारे जिल्ह्यासाठी एकूण 1765.98 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.

सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानातून नियमानुसार साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. 

*******

14 May, 2026

आज (१५ मे ) शेवटची संधी; नागरिकांनी तातडीने स्व-गणना करावी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


*https://se.census.gov.in या पोर्टलवर अचूक माहिती भरावी*


हिंगोली, दि. १४ (जिमाका) : आज  (शुक्रवार, दि. १५ मे रोजी) स्व-गणना करण्याची अंतिम तारीख आहे,  अद्याप  ज्यांनी स्वगणना केली नाही, त्यांनी जनगणना विभागाच्या  https://se.census.gov.in या पोर्टलवर आपली माहिती अचूक भरावी. 


जनगणना ही देश व नागरिकांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनगणनेत सहभागी व्हावे व स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

देशाच्या 2027 च्या जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना आहे.  स्व-गणनेची प्रक्रिया झाल्यानंतर जिल्ह्यात दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे.  त्यापूर्वी नागरिकांना स्वतःची माहिती भरण्यासाठी दि. 15 मे 2026 पर्यंत स्व-गणनेची विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.


नागरिकांनी https://se.census.gov.in या पोर्टलवर आपली माहिती भरून स्व-गणना करावी. दि. 15 मेपर्यंत नागरिकांनी माहिती भरता येईल. यानंतर मात्र हे पोर्टल बंद होणार आहे. 


*पोर्टलवर अशी भरा माहिती* - आपला मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून  जनगणनेच्या https://se.census.gov.in या पोर्टलच्या होम पेजवर ‘स्व-गणना’ (Self Enumeration) पर्यायावर क्लिक करा. तुमचा चालू मोबाईल क्रमांक द्या. त्यावर एक ओटीपी येईल, तो तिथे टाकून पडताळणी पूर्ण करा.  लॉगिन झाल्यानंतर सर्वप्रथम कुटुंबप्रमुखाचे नाव, वय, लिंग आणि इतर वैयक्तिक तपशील भरा.  नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण/स्थान दाखवा (चिन्हांकित करा). कुटुंबात एकूण किती सदस्य राहतात (पुरुष, महिला आणि इतर) त्यांची संख्या नमूद करा.  घराचा प्रकार (कच्चे/पक्के), पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, शौचालय, वापरली जाणारी इंधने आदीसह वाहने, संगणक आदी सुविधांची माहिती द्या.  सर्व माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा नीट तपासा. काही चूक असल्यास एडीट पर्यायावर जाऊन ती   दुरुस्त करा.  माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घ्या. खात्री पटल्यानंतर सबमीट बटण दाबा. अर्ज सबमिट झाल्यावर आयडी क्रमांक मिळेल, तो जतन करून ठेवा, त्याची प्रिंट काढा. तो घरगणनेवेळी  प्रगणकाला द्या.


*माहिती भरल्यानंतर मिळणारा आयडी जपून ठेवावा* -- पोर्टलवर माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) मिळणार आहे. हा आयडी नागरिकांनी मोबाईल किंवा वहीमध्ये  नोंदवून ठेवावा.

 

*घर भेटीदरम्यान प्रगणकांना द्यावा लागणार आयडी क्रमांक* - पोर्टलवर माहिती भरल्यानंतर दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देणार आहेत. यावेळी स्वयं गणना झाली असेल, तर संबंधित प्रगणकाला तो आयडी क्रमांक द्यावा लागणार आहे. हा आयडी प्रगणक आपल्याकडील पोर्टलवर अपलोड करेल. त्यामुळे संबंधित नागरिकांच्या कुटुंबाची सर्व माहिती अधिकृरित्या जनगणनेत नोंद होईल. यामुळे प्रश्न विचारणे आणि त्यानुसार माहिती भरणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

  

*-*-*-*-*

मातंग समाज बांधवांसाठी विविध शासकीय योजनांविषयी जनजागृती कार्यशाळेचे 21 मे रोजी आयोजन

 



हिंगोली(जिमाका), दि. 14 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोली, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाज बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे गुरुवार, दि. 21 मे 2026 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस मातंग समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी जनजागृती व्हावी, योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा तसेच समाजातील युवक-युवतींना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई यांच्या आदेशान्वये राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यशाळेत मातंग समाजातील 12 पोटजातीतील समाज बांधवांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून विविध योजनांचे मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः स्वयंरोजगार, कर्ज योजना, आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण योजना तसेच युवक-युवतींसाठी उपलब्ध विविध लाभांविषयी माहिती देण्यात येणार आहे.

मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

******

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


 

 

 हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, सी.आर.गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

********  

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश



हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, साठवण तलाव, उच्च पातळी बंधारे, लिगो प्रकल्प तसेच अन्य विकास कामांच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, सर्व उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये जलसंपदा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, उच्च पातळी बंधारे, साठवण तलाव आदी प्रकल्पांतील प्रलंबित मावेजा वाटप, भूसंपादन मोजणी, लिगो प्रकल्पासंदर्भातील भूसंपादन प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींची चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वाटाघाटीद्वारे समितीसमोर ठेवावयाची प्रकरणे, दर निश्चिती, निवाडा पारित झालेल्या प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके, ताबा घेतलेल्या जमिनींच्या मावेजा वाटपाची स्थिती तसेच प्राधिकरणाकडे पाठवावयाच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला.

भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.


*******

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते कामांना गती द्या - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


* प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


हिंगोली (जिमाका), दि. 14 : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांना गती देऊन प्राधान्यक्रमानुसार प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), सर्व उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. आतापर्यंत पूर्ण झालेली कामे, अपूर्ण रस्ते, प्रगतीपथावरील कामे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची माहिती त्यांनी तपासली.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की, अद्याप सादर न करण्यात आलेल्या रस्ते कामांचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवून तातडीने सादर करावेत. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पडताळणी करूनच प्रस्ताव पाठविण्यात यावेत. तसेच कामांची द्विरुक्ती होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.

रस्त्यांची कामे करताना काम सुरू होण्यापूर्वीचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जीओ-टॅगिंग फोटो तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केलेले व्हिडिओ सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योजनेंतर्गत दर्जेदार व पारदर्शक कामे करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा


यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सन 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी तयार करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पंचवार्षिक बृहत आराखड्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

******