15 June, 2026

अमृतच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : समाजातील सर्व घटकांची उन्नती करणे हे शासनाचे कर्तव्य असून कोणताही वर्ग विकासापासून वंचित राहिल्यास संपूर्ण समाज दुर्बल होतो. समाजाच्या उन्नतीबरोबरच चारित्र्यनिर्माणालाही तितकेच महत्त्व आहे. व्यक्तीनिर्माणातून चारित्र्यनिर्माण आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती घडते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेने कार्य करताना स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमृतचे प्रतिनिधी म्हणून कर्मचारी नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून काम केल्यास व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय साध्य होईल, असे सांगून कामातून माणसे जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्याची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेची स्थापना, आतापर्यंतचा संघर्षमय प्रवास आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यभरातील अनेक संस्थांकडून अमृतच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रशिक्षण शिबिरांमधून नवीन कौशल्ये, उपक्रम आणि कल्पना आत्मसात करून अधिक जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. औंध येथील अमृतच्या मुख्यालयात आयोजित या निवासी प्रशिक्षण शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यांतील अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि अमृत सखी सहभागी झाले आहेत. हे शिबिर दि. १४ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

*******

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान; ४६६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 


हिंगोली, दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.


मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.


सदर निवडणुकीमध्ये एकूण ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी २५३ स्त्री मतदार तर २१३ पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य,  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.


मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 


तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५८ मतदार आहेत. 


तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे २३ मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तर परभणी जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व  शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे १२८ मतदार मतदान करणार आहेत. 


तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ५९ मतदार मतदान करतील.


उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 


तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ७४ मतदार मतदान करतील.


दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे. 


********

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावेत

 



हिंगोली(जिमाका), दि. 15 : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. यांची उपकंपनी) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज व अनुदान योजनांकरिता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळाकडे अनुदान योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, बीज भांडवल योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, थेट कर्ज योजनेअंतर्गत ०४ कर्ज प्रकरणे, एनएसएफडीसी योजनेअंतर्गत ०१ कर्ज प्रकरण, एनएसएफडीसी सूक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत ०१ प्रकरण तसेच एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ०१ प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

हिंदू खाटीक समाजातील इच्छुक व पात्र अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.

अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच व्यवसायाचे परवाना (लायसन्स) इत्यादी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. 

हिंदू खाटीक समाजातील पात्र नागरिकांनी उपलब्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कर्ज व बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा

 


हिंगोली(जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे कर्ज व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळामार्फत अनुदान योजनेअंतर्गत १० कर्ज प्रकरणांचे तसेच बीज भांडवल योजनेअंतर्गत १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र व इच्छुक अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा,दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. 

पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

****

स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज अनिवार्य

 




हिंगोली(जिमाका), दि. १५ : अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी आता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी दिली आहे.


सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी  https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदवावा.


शालेय अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून, इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.


गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी एखाद्या विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर अशा विद्यार्थ्याला स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्जच करणार नाहीत, त्यांना वसतिगृह तसेच स्वाधार या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.


ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश अर्ज वेळेत सादर करावा, जेणेकरून भविष्यात स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.

संबंधित मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता




हिंगोली(जिमाका), दि. १५ : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एकरकमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी सुरेखा फुफाटे यांनी दिली.

माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करून अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६  संदर्भात समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी सुरेखा फुफाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे तसेच विविध व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीत कर्जमाफी अर्ज स्वीकारण्याबाबतचे नियोजन निश्चित करणे, आधार कार्ड व अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रलंबित कामे तसेच मयताच्या वारसाच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी जनजागृती व नोंदणी शिबिरे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

*******

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अंतुलेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत








हिंगोली(जिमाका), दि. १५ : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी हिंगोली शहरातील अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन तसेच विविध स्वागतपर उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्येही शाळेबाबत उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व इतर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शासनाच्या विविध विद्यार्थी हिताच्या योजना आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडणाऱ्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नव्या शैक्षणिक वर्षात मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, डिजिटल शिक्षण, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अभ्यासक्रम, शालेय उपक्रम तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आनंदाने शाळेत प्रवेश घेत नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या स्वागत कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांसह करण्यात आली. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

****