‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन
* प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
नवी मुंबई,दि.17(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल सादर केला.
या बैठकीस विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप, सहआयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ उपस्थित होते.
यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गयोजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आरोग्य सेवांच्या दृष्टीने ग्रामीण भागात आतापर्यंत २ हजार १५९ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमस्थळी ५ तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात ८० हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. लंगर व्यवस्थेसाठी सुमारे अडीच लाख भाविकांचा विचार करण्यात आला असून, १२ हजार ५०० भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील ५ दिवसांत ते पूर्ण होणार आहे.तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाशयोजना यांसाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी हा महत्वाचा भाग असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील शासकीय व खासगी शाळांमध्ये आतापर्यंत राबविण्यात आलेल्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रभातफेऱ्या, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम अशा विविध कार्यक्रमांचा अहवाल सादर केला.
कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांच्या ग्रामीण भागातील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला असून, ४ हजार ३८१ फोटो आणि २ हजार १२५ व्हिडिओ हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या https://gurutegbahadurshahidi.com या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.
नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सुमारे १७ लाख विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी मुंबई शहर, उपनगर आणि कोकण विभागातील सर्व चित्रपटगृहांमध्ये सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले विशेष गीत प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर "हिंद दी चादर" कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत.
देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी कोपरा या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्यात येत आहे. एसटी, बसेससाठी निश्चित केलेल्या वाहततळापासून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने तातुरत्या स्वरुपातील पायवाट तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. जेएनपीए परिसरात दररोज सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.
कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी १ हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४० ते ५० लाख पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे.
या बैठकीस अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, इतर महसूल विभागातील इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
0000000








