07 April, 2026

केरोसीन परवाना नूतनीकरणासाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 07: सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून केंद्र शासनाने दि. 12 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यास 3744 कि.ली. केरोसीन नियतन मंजूर केले आहे.

या अनुषंगाने हिंगोली तालुक्यातील सर्व किरकोळ, होलसेलर व सेमी होलसेलर परवाना धारकांनी आपल्याकडे असणारा संबंधित परवाना नूतनीकरणासाठी तात्काळ तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा. केरोसीन वाटप करण्यास इच्छुक नसल्यास तसे लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.

तसेच मूळ परवानाधारक मयत असल्यास, वारसाहक्काने परवाना वर्ग करण्याबाबत प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

ही प्रक्रिया कालमर्यादित असल्यामुळे उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा परवाना नूतनीकरण तसेच वारस प्रक्रियेबाबत कोणताही विचार केला जाणार नाही, याची  संबंधितांनी  नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

 

स्थळ पाहणीशिवाय विहीर अधिग्रहण, टँकर सुरू करू नयेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



 

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : विंधन विहीर अधिग्रहण किंवा टँकर सुरू करणे आवश्यक असणा-या गावांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच संबंधित कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना आज आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती समृद्धी दिवाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित उपअभियंते व कनिष्ठ अभियंते, तसेच टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर असल्याने यंदाच्या टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जल जीवन मिशनची कामे अपूर्ण असली तरी विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी स्टँडी बसवून पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच गावांतील सर्व पाणीस्रोतांची तपासणी करून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जोडण्यांसाठी लागणाऱ्या कोटेशनची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी 15 व्या वित्त आयोग निधीतून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 701 गावांसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यामध्ये नळ योजनांची दुरुस्ती 5, विंधन विहिरींची दुरुस्ती 16, नवीन विंधन विहिरी व कुपनलिका 131 गावांत 158, खाजगी विहीर अधिग्रहण 302 गावांत 336, तसेच 22 गावांत 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

******

06 April, 2026

जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षण अभियान 8 एप्रिलपासून सुरु

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या विविध योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अमृत संस्थेमार्फत संपूर्ण राज्यात सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षण अभियान दि. 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांचा लाभ मिळत नाही आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्था कार्य करते.

अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुंघर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी जातींचा समावेश आहे. तसेच विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेकडून विविध योजना राबविल्या जातात.

या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित गटातील कुटुंबांशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांकडूनही माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित जातींमधील व्यक्ती, संस्था, संघटना व मंडळांनी  या कालावधीत अमृत प्रतिनिधींशी  संपर्क साधून आपल्या परिवाराची व समाजाची माहिती नोंदवावी तसेच विविध योजनांची माहिती घ्यावी. अधिक माहितीसाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे (मो. 7391065471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी अमृत संस्थेकडे आपल्या परिवाराची नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

 

******

 

शासकीय कार्यालयात तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा कचेरीतील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्तव्यावर असताना तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 11 जणांकडून एकूण 1880 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार, अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने ही कारवाई केली. कोटपा-2003 कायद्याच्या कलम 4 चे उल्लंघन करत कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणे तसेच तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणे याबाबत 11 कर्मचारी व इतर व्यक्तींवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1880 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयात तंबाखू-गुटखा सेवनास सक्त मनाई केली असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हाभरात अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे.

त्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी  व नागरिकांनी  कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करू नये तसेच शासकीय कार्यालयात येताना तंबाखू-गुटखा सोबत बाळगू नये, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर व मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे उपस्थित होते.

 

कोटपा कायदा 2003 अंतर्गत प्रमुख तरतुदी :

 

कलम 4 : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे.

कलम 5 : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी आहे.

कलम 6 (अ) : 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे दंडनीय गुन्हा आहे.

कलम 6 (ब) : शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे.

कलम 7, 8, 9 : तंबाखू उत्पादने पॅकेटवर 85 टक्के भागावर वैधानिक इशारा आवश्यक आहे.

******

01 April, 2026

 'दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत


मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. प्रशासन, विकास आणि लोकसहभाग यांचा समतोल साधत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी आणि नियोजनावर या मुलाखतीत सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.


'दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, दि. २ आणि शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ऐकण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. निवेदक संजय पाटोळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


मुलाखतीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची सकारात्मक व दूरदृष्टी मांडली. विविध शासकीय योजनांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्ह्यात महसूल अभियान, आरोग्यविषयक मोहिमा, सिंचन प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या कामांद्वारे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

याशिवाय पर्यटन विकास, शेती क्षेत्रातील नव्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती तसेच महिला स्वयंरोजगारासाठी स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

000 



31 March, 2026

विविध कृषी पुरस्काराचे अर्ज सादरीकरणास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि.31 : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात येतो.

यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो.

यापूर्वी हे पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र, प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेत होणारा विलंब तसेच शेतकऱ्यांना होणारा खर्च लक्षात घेता ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध करण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत.

प्रणालीद्वारे अर्ज सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून यामुळे कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढणार आहे.

सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीचे हे पहिले वर्ष असल्याने तसेच अर्जासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने काही अर्ज प्रलंबित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त मागण्यांचा विचार करून कृषी विभागाने अर्ज सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार, सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता दि. 15 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

*******

थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी ७ एप्रिल रोजी लॉटरी प्रक्रिया

 


हिंगोली (जिमाका), दि. 31: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय हिंगोली यांना सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेअंतर्गत ३० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

या योजनेअंतर्गत एकूण १११ अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी ७२ अर्ज पात्र तर ३९ अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र अर्जदारांमधून लाभार्थी निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) करण्यात येणार आहे.

यासाठी अपर जिल्हाधिकारी, हिंगोली तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

या लॉटरी प्रक्रियेदरम्यान संबंधित पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.

********