17 February, 2026

 ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन

* प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

नवी मुंबई,दि.17(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

     बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल सादर केला.

     या बैठकीस विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप, सहआयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ उपस्थित होते.

     यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली.

      कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गयोजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

     आरोग्य सेवांच्या दृष्टीने ग्रामीण भागात आतापर्यंत २ हजार १५९ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमस्थळी ५ तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

     या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात ८० हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. लंगर व्यवस्थेसाठी सुमारे अडीच लाख भाविकांचा विचार करण्यात आला असून, १२ हजार ५०० भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील ५ दिवसांत ते पूर्ण होणार आहे.तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाशयोजना यांसाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.       

      कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी हा महत्वाचा भाग असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील शासकीय व खासगी शाळांमध्ये आतापर्यंत राबविण्यात आलेल्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रभातफेऱ्या, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम अशा विविध कार्यक्रमांचा अहवाल सादर केला.     

     कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांच्या ग्रामीण भागातील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला असून, ४ हजार ३८१ फोटो आणि २ हजार १२५ व्हिडिओ हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या https://gurutegbahadurshahidi.com या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.      

    नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सुमारे १७ लाख विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी मुंबई शहर, उपनगर आणि कोकण विभागातील सर्व चित्रपटगृहांमध्ये सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले विशेष गीत प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर "हिंद दी चादर" कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत.  

      देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी कोपरा या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्यात येत आहे. एसटी, बसेससाठी निश्चित केलेल्या वाहततळापासून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने तातुरत्या स्वरुपातील पायवाट तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. जेएनपीए परिसरात दररोज सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.

      कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी १ हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४० ते ५० लाख पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे.

     या बैठकीस अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, इतर महसूल विभागातील इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

0000000






 ‘भारत विस्तार’ डिजिटल प्रणालीचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण



हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे ‘भारत विस्तार’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल ॲपच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाले.  

जयपूर (राजस्थान) येथून आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘भारत विस्तार’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले. 

या ॲपच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, हवामान अंदाज, पीक संरक्षण, मृदा व्यवस्थापन तसेच बाजारभाव यांसारखी अद्ययावत माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शेळके यांनी भारत विस्तार ॲपमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन सुलभ होणार असून, ही कृषी क्षेत्रातील डिजिटल क्रांती ठरेल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. 

यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी पदवीधर तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे ॲपच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विषय विशेषज्ञ राजेश भालेराव (कृषी विद्या), अनिल ओळंबे (उद्यानविद्या), अजयकुमार सुगावे (पीक संरक्षण), रोहिणी शिंदे (गृह विज्ञान), डॉ. अतुल मुराई (कृषी विस्तार), साईनाथ खरात (मृदा विज्ञान), डॉ. कैलास गीते (पशु विज्ञान) तसेच विजय ठाकरे यांनी परिश्रम घेतले. तसेच मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारोती कदम, संतोष हानवते व प्रेमदास जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

****** 






राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

हिंगोली(जिमाका), दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
अ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक
1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) रु.1 लाख रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कार
13. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15.
आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग) 51 हजाररुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
20. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

खारघर येथे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन

 



* पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शालेय स्तरावर विविध प्रबोधनपर उपक्रम



पालघर, दि. १७ फेब्रुवारी : शीख धर्मातील नववे गुरु, ‘हिंद-दि-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, टाकवहाळ येथे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेचे संस्कार रुजविण्यासाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक प्रमोद देवसरकर यांनी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावरील माहितीपर भाषणाने केली. काश्मिरी पंडितावरील धार्मिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन मुघल सम्राट औरंगजेब याला दिलेले थेट आव्हान आणि धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना इतिहासातील त्या निर्णायक क्षणाची जाणीव करून दिली.

मुख्याध्यापक विशाल सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात गुरुजींच्या पंजाब, बिहार, आसाम व बंगाल पर्यंतच्या व्यापक प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी लोकांमध्ये धार्मिक सहिष्णुता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.


*वकृत्व स्पर्धेतून इतिहासाचा जागर*

इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी “गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे जीवन व बलिदान” या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी शैलीत वक्तृत्व सादर करत त्यांच्या जन्मस्थळ अमृतसर येथील बालपणापासून ते दिल्लीतील शहादतीपर्यंतचा प्रवास उलगडला. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या बलिदानामुळे भारतात धार्मिक स्वातंत्र्याची परंपरा कशी अबाधित राहिली, याचे सखोल विवेचन केले.


*प्रभात फेरीतून जनजागृती*

शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. “धर्मस्वातंत्र्याचे रक्षक – गुरु तेग बहादूर साहिबजी अमर राहो!”, “मानवतेसाठी दिले बलिदान – गुरु तेग बहादूर महान!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही इतिहासाविषयी जागर निर्माण झाला.

माहितीपटातून प्रेरणेचा साक्षात्कार

विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. त्यांच्या बालपणापासून ते दिल्ली येथे दिलेल्या बलिदाना पर्यंतचा प्रवास पाहताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग नोंदविला. धार्मिक स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची गाथा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवून गेली.

गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि मानवतेची मूल्ये अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खारघर येथील मुख्य समारंभाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील हा उपक्रम सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सहिष्णुतेचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

******

हिंद दि चादर या उपक्रमा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा , मेंढवण येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 



पालघर दि 17 फेब्रुवारी : खारघर , नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी आयोजित होणाऱ्या हिंद दि चादर गुरु तेजबहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमा निमीत्त डहाणू,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मेंढवण येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

     सदर स्पर्धा ह्या श्री. गुरु तेजबहादुर साहिबजी यांचे जीवनचरित्र व बलिदान या विषयावर आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा तसेच मानवतेचा विचार त्यांच्या भाषणातून व्यक्त केला.या विषयावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, तर्कसंगत व प्रभावीपणे मांडणी केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शुद्ध उच्चार, आशय घनता व सुसंगत मांडणी यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. 

या स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

*******


16 February, 2026

हिंगोली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 

हिंगोली, दि. १६ (जिमाका) : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला असून, त्या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष‌ बांगर तसेच राजुभैय्या नवघरे उपस्थित राहणार आहेत.

या अनुषंगाने दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्यात येणार आहे. तसेच दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवगीत, पोवाडे व गोंधळ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे.

*****

मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे दामिनी पथकाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रेमा जगताप,  व महिला पोलीस श्रीमती आरती साळवे यांनी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी दामिनी पथक विद्यार्थिनींना करत असलेली मदत, त्या मदतीचा प्रभावीपणे उपयोग करणे, तसेच स्वतः सक्षम व सुरक्षित राहण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी त्यांना योग्य व तात्काळ मदत मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मार्गदर्शनात नमूद केले.

या कार्यक्रमाच्या वेळी गृहपाल सुलोचना विष्णू ढोणे यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी तसेच सुमारे 200 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरुकता वाढण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

*****