16 June, 2026

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी १७ व १८ जून रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांमध्ये विशेष शिबिरे



हिंगोली(जिमाका), दि. १६ : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची अॅग्रीस्टॅक (Agristack) आधार मंचावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या अनुषंगाने अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय व शाखानिहाय यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी संबंधित शाखास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये दि. १७ व १८ जून २०२६ रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

वसमत तालुक्यातील आरळ, वसमत, चोंडी आंबा, गिरगाव, कुरुंदा व पूर्णा एसएसके शाखांमध्ये, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, कळमनुरी, पोतरा व वारंगा फाटा शाखांमध्ये, सेनगाव तालुक्यातील आजेगाव, गोरेगाव, केंन्द्रा बुद्रुक, पानकनेरगाव, साखरा व सेनगाव शाखांमध्ये, हिंगोली तालुक्यातील हिंगोली, खानापूर चित्ता, फाळेगाव, नरसी सिरसम बु. शाखांमध्ये तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, जवळा बाजार, लाख, शिरड शहापूर व येहळेगाव सोळंके शाखांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

********

पी.एम. किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याचे शनिवारी वितरण

 


* 'पी.एम. किसान उत्सव दिवस' निमित्त राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ

हिंगोली, दि.१६ (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीसाठीचा २३ वा हप्ता शनिवार, (दि.२०) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने दि. २० जून हा दिवस देशभर ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये, असे एकूण सहा हजार रुपये थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात.

राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी २२ हप्त्यांद्वारे सुमारे ४१ हजार ८३ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना अंदाजे १,८१७ कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.

पी.एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच प्राथमिक कृषी पतसंस्था येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

कृषी, महसूल व वन तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा उत्सव साजरा करण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in⁠ या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******

शासकीय कार्यालयांतील तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्यांवर कारवाई

 


* १४ जणांकडून २७०० रुपयांचा दंड वसूल



हिंगोली(जिमाका), दि. १६ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत विशेष दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आज मंगळवारी (दि. १६ जून) जिल्हा कचेरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ जवळ बाळगणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कोटपा-२००३ (COTPA) कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कारवाईदरम्यान १४ व्यक्तींकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा कचेरीतील १२ तर सार्वजनिक बांधकाम विभागातील २ कर्मचारी व इतर व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने सर्व शासकीय कर्मचारी तसेच विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असताना अथवा कार्यालयीन परिसरात तंबाखू, गुटखा किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये तसेच असे पदार्थ सोबत बाळगू नयेत, असे आवाहन केले आहे.

ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर आणि मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे यांनीही मोहिमेत सहभाग घेतला. प्रशासनाने तंबाखूमुक्त कार्यालयीन वातावरण निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

***

विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षणाची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 







हिंगोली(जिमाका), दि. 16 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करून हिंगोली जिल्ह्याचा राज्यातील अग्रक्रम कायम राखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड यांच्यासह जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पूर्व विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच धर्तीवर सध्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची कामेही गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे योग्य नियोजन करावे. यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांनी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, मतदार यादीची अचूकता, सुसंगतता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी मतदार केंद्रांचे मॅपिंग, ब्लर फोटो हटविणे आणि विविध तांत्रिक पडताळण्या करण्यात येणार आहेत. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व पूर्वतयारी, घरोघरी पडताळणी मोहीम, मसुदा मतदार यादी प्रसिद्धी, दावे व हरकती स्वीकारणे, नोटीस वाटप, दावे-हरकतींचा निपटारा आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्धी अशी सहा टप्प्यांतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रगणक (इन्युमरेशन) अर्जाचे शंभर टक्के वितरण करण्याची जबाबदारी पार पाडावी. हे वितरण पाच दिवसांत पूर्ण करून त्यानंतर त्याचे संकलन, नागरिकांना मार्गदर्शन आणि माहितीचे अचूक डिजिटायझेशन करून वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत मतदार तसेच अर्ज सादर न करणाऱ्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून आवश्यक कार्यवाही करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी पडताळणी मोहिमेची माहिती देत प्रगणक अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

दरम्यान, पूर्व विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे आणि विकास माने यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

******

15 June, 2026

अमृतच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : समाजातील सर्व घटकांची उन्नती करणे हे शासनाचे कर्तव्य असून कोणताही वर्ग विकासापासून वंचित राहिल्यास संपूर्ण समाज दुर्बल होतो. समाजाच्या उन्नतीबरोबरच चारित्र्यनिर्माणालाही तितकेच महत्त्व आहे. व्यक्तीनिर्माणातून चारित्र्यनिर्माण आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती घडते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेने कार्य करताना स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमृतचे प्रतिनिधी म्हणून कर्मचारी नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून काम केल्यास व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय साध्य होईल, असे सांगून कामातून माणसे जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्याची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेची स्थापना, आतापर्यंतचा संघर्षमय प्रवास आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यभरातील अनेक संस्थांकडून अमृतच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रशिक्षण शिबिरांमधून नवीन कौशल्ये, उपक्रम आणि कल्पना आत्मसात करून अधिक जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. औंध येथील अमृतच्या मुख्यालयात आयोजित या निवासी प्रशिक्षण शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यांतील अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि अमृत सखी सहभागी झाले आहेत. हे शिबिर दि. १४ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

*******

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान; ४६६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 


हिंगोली, दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.


मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.


सदर निवडणुकीमध्ये एकूण ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी २५३ स्त्री मतदार तर २१३ पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य,  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे.


मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 


तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५८ मतदार आहेत. 


तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे २३ मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तर परभणी जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व  शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे १२८ मतदार मतदान करणार आहेत. 


तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ५९ मतदार मतदान करतील.


उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 


तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ७४ मतदार मतदान करतील.


दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी दि. २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे. 


********

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावेत

 



हिंगोली(जिमाका), दि. 15 : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. यांची उपकंपनी) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज व अनुदान योजनांकरिता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळाकडे अनुदान योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, बीज भांडवल योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, थेट कर्ज योजनेअंतर्गत ०४ कर्ज प्रकरणे, एनएसएफडीसी योजनेअंतर्गत ०१ कर्ज प्रकरण, एनएसएफडीसी सूक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत ०१ प्रकरण तसेच एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ०१ प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

हिंदू खाटीक समाजातील इच्छुक व पात्र अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.

अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच व्यवसायाचे परवाना (लायसन्स) इत्यादी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. 

हिंदू खाटीक समाजातील पात्र नागरिकांनी उपलब्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

***