31 March, 2026

विविध कृषी पुरस्काराचे अर्ज सादरीकरणास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि.31 : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात येतो.

यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो.

यापूर्वी हे पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र, प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेत होणारा विलंब तसेच शेतकऱ्यांना होणारा खर्च लक्षात घेता ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध करण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत.

प्रणालीद्वारे अर्ज सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून यामुळे कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढणार आहे.

सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीचे हे पहिले वर्ष असल्याने तसेच अर्जासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने काही अर्ज प्रलंबित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त मागण्यांचा विचार करून कृषी विभागाने अर्ज सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार, सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता दि. 15 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

*******

थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी ७ एप्रिल रोजी लॉटरी प्रक्रिया

 


हिंगोली (जिमाका), दि. 31: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय हिंगोली यांना सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेअंतर्गत ३० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

या योजनेअंतर्गत एकूण १११ अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी ७२ अर्ज पात्र तर ३९ अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र अर्जदारांमधून लाभार्थी निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) करण्यात येणार आहे.

यासाठी अपर जिल्हाधिकारी, हिंगोली तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

या लॉटरी प्रक्रियेदरम्यान संबंधित पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.

********

हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची ‘डिजिटल शेतीशाळा’ : 1 एप्रिल रोजी पहिले सत्र

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा हा अभिनव व तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे पहिले सत्र दि. 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती व मार्गदर्शन मोबाईलद्वारे थेट घरापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या गावातच मोबाईलच्या माध्यमातून या शेतीशाळेत सहभागी होऊ शकणार आहेत.

 

सत्र 1 चा विषय : पेरणीपूर्व तंत्रज्ञान

या पहिल्या सत्रात हवामान अनुकूल पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून  यामध्ये बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया आदी विषयांचा समावेश असणार आहे.

ही डिजिटल शेतीशाळा युट्यूब (YouTube) माध्यमातून थेट (LIVE) प्रक्षेपित केली जाणार असून शेतकरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग,  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा),  पाणी फाऊंडेशन,  उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान या अधिकृत चॅनेलवरून सहभागी होऊ शकतात.

राज्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, कृषीताई, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं सहाय्यता गट तसेच ग्रामीण महिला बचत गट यांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधितांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

 

*****

एप्रिलमध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ : सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली असून उत्पादन खर्चही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येत आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे व प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी यंत्रणांचा सक्रिय सहभाग आहे. या अभियानांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येत आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल 2026 महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून विविध पिक पद्धतींसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शेती शाळांमध्ये कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांमार्फत ज्ञानाचे आदान-प्रदान होणार आहे.

 

शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय पुढीलप्रमाणे :

* शेतीशाळा 1 (1 एप्रिल 2026) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे, बेडवर टोकण, शून्य/कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया.

* शेतीशाळा 2 (8 एप्रिल 2026) : जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे.

* शेतीशाळा 3 (15 एप्रिल 2026) : एकात्मिक कीड व्यवस्थापन – सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन, लिंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर.

* शेतीशाळा 4 (22 एप्रिल 2026) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र – थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत व यांत्रिकी लागवड पद्धती.

सर्व शेतीशाळा नमूद तारखांना सायंकाळी 7.30  वाजता सुरू होणार असून कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन व उमेद यांच्या युट्यूब (YouTube) चॅनेलवरून थेट प्रक्षेपण (LIVE) करण्यात येणार आहे.

शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बीज उत्पादक, तसेच फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी गट व वनपट्टाधारक यांनी मोठ्या संख्येने या डिजिटल शेती शाळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभाग व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे.

*******

30 March, 2026

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा

 

रोजगार निर्मितीत हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, स्थानिक रोजगार निर्मिती, आजारी उद्योग पुनर्वसन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत डीएलटीपीसी सभा तसेच निर्यात प्रचालन सभा आदींचा समावेश होता.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी तसेच उद्योजक संघटनेचे श्री. मामडे, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रवीण सोनी, अतुल बेरळीकर, नितीन काबरा, केशव काबरा आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सहकारी औद्योगिक वसाहती तसेच एमआयडीसीमधील पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1000 प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 838 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून या कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच जिल्हा उद्योग केंद्राला देण्यात आलेले 600 प्रकल्पांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांनी विविध योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. शेवटी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*******





मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सर्व विभागाकडून सत्कार.

 


हिंगोली (दि. 30 ) महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी '१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम' अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात आला असून, हिंगोली जिल्ह्याने यामध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद येथील सभागृहातील आयोजित एका बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार सर्व विभाग प्रमुखा मार्फत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) विजय बोराटे, उपशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के प्राथमिक शिक्षण अधिकारी आशावरी काळे आदी अधिकारी उपस्थित होते

******

बालमृत्यू रोखण्याला आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रतिपादन

 



​हिंगोली (दि. ३०): "जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचा जीव वाचविणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने आणि सूक्ष्म नियोजनाने काम करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

​हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित 'बालमृत्यू अन्वेषण'संदर्भात विशेष बैठकीत ते बोलत होते.

​सामाजिक व संस्था स्तरावरील मृत्यूंचे सखोल अन्वेषण

​जिल्ह्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ८८ बालमृत्यूंपैकी, सामाजिक स्तर आणि संस्था स्तरावरील ६ बालमृत्यूंच्या प्रकरणांचे सविस्तर अन्वेषण या बैठकीत करण्यात आले. त्यापैकी सामाजिक स्तरावरील ३ विशेष प्रकरणांवर बालमृत्यू समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली.

​यावेळी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक प्रकरणाचा तांत्रिक आणि सामाजिक आढावा घेतला. बालक दगावण्यामागील नेमकी कारणे, उपचारांतील उणीव, किंवा कुटुंबियांना वेळेत मार्गदर्शन मिळाल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

​भविष्यात असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात यावा 

​वेळेत उपचार: जोखमीच्या मातांची वेळेत ओळख पटवून त्यांना तातडीने योग्य संदर्भ सेवा देण्यात यावी.

​प्रत्येक मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून त्या-त्या भागात विशेष प्रतिबंधात्मक  उपाययोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने 'जीव वाचविण्याचे' आपले मूळ उद्दिष्ट समोर ठेवून काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. दि

दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलेजा कुप्पास्वामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, मनिषा वडकुते कार्यक्रम सहाय्यक मुनाफ शेख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका व आरोग्य सेविका उपस्थित होते.

**