07 May, 2026

बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी महाविद्यालयांना भेटी द्याव्यात - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



* रोजगार, उद्योगवाढ व स्टार्टअपला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत सूचना



हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती द्यावी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कौशल्य विकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. व्ही. बोथीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे, बहिर्जी विद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा उद्योग केंद्राचे मेंढे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले की, राज्यातील नामांकित एमआयडीसी, शासकीय आयटीआय व खाजगी आयटीआय संस्थांना जिल्हास्तरीय पथकांनी भेटी देऊन तेथील उद्योगांचे कामकाज व कंपन्यांच्या मनुष्यबळ आवश्यकतांचा अभ्यास करावा. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी प्रयत्न करून कंपन्यांच्या गरजेनुसार स्थानिक एमआयडीसीमध्ये उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे. आवश्यक कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातच उपलब्ध करून देता येईल, असे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात स्टार्टअप व पेटंट निर्मितीसाठी तरुणांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता असून, जिल्ह्यात झालेल्या संशोधनाची नोंदणी होणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कौशल्य विकास विभागामार्फत सन 2024-25 मध्ये 600 युवक-युवतींना तर सन 2025-26 मध्ये 1050 युवक-युवतींना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थींमधून किती उमेदवारांना रोजगार मिळाला तसेच किती जणांनी स्वतःचे उद्योग सुरू केले याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सन 2024-25 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचा मेळावा आयोजित करावा, त्यामुळे किती उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला याची माहिती मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नाविण्यता सोसायटीमार्फत तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. तसेच सन 2024 मध्ये 10 जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत प्रत्येक दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड स्कील कौन्सिल स्पर्धा, जिल्ह्यातील सहा आयटीआयमधील विविध ट्रेड तसेच टेक्निकल हायस्कूलचा आढावा घेण्यात आला. सन 2025-26 मध्ये शासकीय आयटीआयमधून 644 तर खाजगी आयटीआयमधून 372 विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, यापैकी किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच आयटीआयचा समावेश असून या संस्थांमध्ये सोलार, इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारख्या आधुनिक विषयांवरील प्रशिक्षण दिले जात आहे. याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

यावेळी शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन योजना, उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना, प्रशिक्षण देण्याची दुहेरी प्रणाली, दक्ष योजना, व्यवसाय शिक्षण विद्यावेतन योजना तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी विविध योजनांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

******

हिंगोली येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 


* विविध प्रकारच्या प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्हा न्यायालय हिंगोली अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयांमध्ये तालुका विधी सेवा समिती व वकील संघ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत जिल्हा न्यायालय परिसर, हिंगोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक वाद प्रकरणे, परक्राम्य लिखत अधिनियम कलम 138 अंतर्गत प्रकरणे, नगर परिषद, महावितरण कंपनी, बँका व पतसंस्था यांच्याशी संबंधित वादपूर्व प्रकरणे आदी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत.

लोकअदालतीच्या माध्यमातून परस्पर सामंजस्याने व तडजोडीद्वारे प्रकरणांचा जलद निपटारा होणार असून पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रमाची बचत होणार आहे. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टी. एस. अकाली तसेच वकील संघाचे अध्यक्ष श्रीधर घुगे यांनी केले आहे.

*******

जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव जून अखेरपर्यंत सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

* विविध विभागांच्या कामांचा आढावा; आकांक्षित जिल्ह्याच्या निर्देशांकानुसार प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना




हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षातील कामांचे प्रस्ताव जून अखेरपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले की, सन 2025-26 मधील दायित्वाच्या कामांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव पाठविताना जीओ-टॅग केलेले छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. तसेच सन 2025-26 मधील पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील कामांचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्र व काम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे तात्काळ सादर करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

सन 2026-27 च्या निधी मागणी प्रस्तावांसोबत युआयडी देणे बंधनकारक असून, काम सुरू करण्यापूर्वीचे जीओ-टॅग छायाचित्र अपलोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाने आपल्या विभागातील कामे इतर एजन्सीकडे न देता स्वतः प्रस्तावित करावीत तसेच चालू वर्षातील तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीची कामे प्राधान्याने प्रस्तावित करावीत. शिक्षण विभागाने आदर्श शाळा योजनेसाठी पात्र शाळांची यादी तयार करून शाळांमध्ये स्वच्छतागृहांची कामे प्रस्तावित करावीत. सर्व शाळांमध्ये 100 टक्के स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे. स्वच्छतागृह प्रस्ताव सादर करताना कामांची द्विरुक्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

क्रीडा विभागाने व्यायामशाळा व क्रीडांगण विकासाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत तर नागरी भागातील कामे संबंधित मुख्याधिकाऱ्यांमार्फत करावीत. कौशल्य विकास विभागाने कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने औषध खरेदी करताना उपलब्ध शिल्लक साठा, वापर व आवश्यकतेचा आढावा घेऊन सविस्तर प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून सादर करावा. जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत कामे तसेच एनक्यूएएस प्रमाणित आरोग्य संस्था तयार करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, मत्स्यविकास, ग्रामविकास आदी विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा नियमित आढावा घेऊन शासनाने निश्चित केलेल्या निर्देशांकानुसार प्रभावी कामे करावीत. संबंधित माहिती गुगलशीटवर अपलोड करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा साधना सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

******

06 May, 2026

इस्रायलमध्ये ३५०० होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

 

* महाराष्ट्र इंटरनॅशनल पोर्टलवर नोंदणीचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. ६ : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी ३५०० उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोग्य व सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून इच्छुकांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल https://maharashtrainternational.com⁠ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेत ९० टक्के महिला व १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्जदाराचे वय २५ ते ४५ वर्षे दरम्यान असावे तसेच किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर व वजन किमान ४५ किलो असणे गरजेचे आहे. यासोबतच इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील ज्ञान आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये किमान ९९० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट अथवा मिडवायफरी यापैकी मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ६४४३.८५ इस्रायली न्यू शेकेल म्हणजे अंदाजे रुपये १.९९ लाख इतके वेतन मिळणार आहे. याशिवाय नियोक्त्याकडून राहण्याची सोय, भोजन व वैद्यकीय विमा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन प्रक्रिया व व्हिडिओ मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, पालक किंवा मुले) सध्या इस्रायलमध्ये कार्यरत नसावेत. निवड प्रक्रियेसाठी पोलीस पडताळणी प्रमाणपत्र व वैद्यकीय तपासणी अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी इच्छुकांनी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-३, दुसरा मजला, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे.


*******

05 May, 2026

वनपट्टे धारक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी नोंदणीला गती देण्याचे निर्देश

 



हिंगोली (जिमाका), दि. ५ : राज्यात अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत वनपट्टे धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्याचे काम सुरू असून या प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्ह्यांनी या मोहिमेला प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वनपट्टे धारक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालये, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) तसेच कृषी विभाग यांच्या समन्वयातून काम सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू असून दिनांक ४ मे २०२६ पर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण २,८०५ शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.

मात्र, काही जिल्ह्यांमध्ये नोंदणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात जनजागृती करून वनपट्टे धारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.

नजीकच्या सुविधा केंद्रांमार्फत नोंदणी प्रक्रिया सुलभ करून वनपट्टे धारक शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

***

02 May, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची औंढा नागनाथ येथे विकास कामांची पाहणी; हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा व आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचे उद्घाटन

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हिंगोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. कामाची प्रगती, दर्जा आणि नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याच दिवशी हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवनशैली व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

*******







01 May, 2026

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा; तुटवडा होऊ देऊ नका – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

खरिप हंगाम 2026, पाणीपुरवठा, कृषी नियोजन व शासन योजनांचा पालकमंत्र्यांकडून सर्वंकष आढावा

 


हिंगोली, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये. खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा, वितरण व उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. तसेच जिल्ह्यात पाणीटंचाई, चारा टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या उन्हाचा पारा जास्त असून उन्हापासून संरक्षण करावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगाम 2026 पूर्वतयारी, पाणीटंचाई निवारण, कृषी निविष्ठा उपलब्धता तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरिप हंगाम 2025 तालुकानिहाय नुकसानभरपाई वाटप, रब्बी हंगामाचा आढावा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण, बियाण्यांची गरज, महाबीजमार्फत उपलब्धता, कापूस बियाण्यांच्या विशिष्ट वाणांची मागणी व पुरवठा, तसेच रासायनिक खतांचा साठा, मागणी व विक्री याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. मंजूर आवंटनापैकी सुमारे 77 टक्के खतसाठा उपलब्ध झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यास डीएपी खताची दररोज सुमारे 52 मेट्रिक टन गरज असून सद्यस्थितीत सुमारे 3 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. तसेच युरियाचा शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लागणारा साठा मुबलक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा दाखविणे बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने विक्रेत्यांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

खरिप 2026 करिता निश्चित करण्यात आलेल्या कृषी मोहिमांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्येक कृषि सहाय्यकाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात 20 जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव परिसरात खड्डे निर्माण केले जाणार आहेत. महाविस्तार मोबाईल अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवार फेऱ्यांचे नियोजन, पोकरा योजनेअंतर्गत कामांची गती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फलोत्पादन वाढ, तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत क्षेत्रवाढीचे नियोजन यावरही सविस्तर चर्चा झाली. प्रधानमंत्री नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत यासंदर्भातील कामांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कृषि विभागाच्या दोन घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. जून, जुलै व ऑगस्टपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी विहीर अधिग्रहण, जलजीवन मिशनअंतर्गत कामे, तसेच टँकर नियोजनाची प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जात असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, लेखन फाउंडेशन, व्हिजन समिती व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 70 शाळांनी सहभाग घेऊन पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. यामध्ये विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये शिक्षण, कृषी व मूलभूत सुविधा या तिन्ही क्षेत्रांचा समन्वित विकास करण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आरोग्य संपन्न गावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज-पालकमंत्री

 

जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि आपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृद्ध बनविण्यासाठी हातभार लावा. आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न केल्यास आपल्या जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात एक आदर्श स्थान मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी याप्रसंगी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेले "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" हे अभियान म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तन घडविणारे पाऊल आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या तरच आपण खऱ्या अर्थाने निरोगी समाज घडवू शकतो. "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" ही केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे, जी प्रत्येक ग्रामस्थाच्या सहभागातून यशस्वी होणार आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना "आरोग्यसंपन्न गाव" म्हणून गौरविण्यात येणार आहे. यावेळी 'मी निश्चय मित्र' लोगोचे यावेळी विमोचन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती दिली.

यावेळी  जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांच्या विशेष प्रयत्नाने  हिंगोलीचे 'यलो गोल्ड' म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या हळदीचे बॉक्स पालकमंत्री नरहरी झिरवाळ व मान्यवरांना भेट देण्यात आले.

******