09 March, 2026

आपले सरकार सेवा केंद्र मुलाखतीचा अंतिम निकाल जाहीर

  

·         जिल्ह्यातील 430 आपले सरकार सेवा केंद्रासाठी कागदपत्र पडताळणी 12 ते 18 मार्चदरम्यान

·         निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 430 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि. 3 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या.  या मुलाखत  प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. 9 मार्च 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hingoli.nic.in/ येथे जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीत तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. 12 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 11 वाजता तालुकानिहाय आयोजित केला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी दि. 12 मार्च 2026, वसमत तालुका  दि. 13 मार्च 2026, हिंगोली (शहरी व ग्रामीण) तालुका दि. 16 मार्च 2026, सेनगाव तालुका दि. 17 मार्च 2026 आणि कळमनुरी तालुक्यातील मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. 18 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे.

या कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वरील नमूद दिनांकास सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 22 डिसेंबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली शहरातील 7 केंद्रे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील 423 रिक्त केंद्रे अशा एकूण 430 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी दि. 2 जानेवारी 2026 अखेर एकूण 3101 अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या 1861 उमेदवारांच्या दि. 3 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

या मुलाखत प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. 9 मार्च 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hingoli.nic.in/ येथे जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीत तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. 12 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 11 वाजता तालुकानिहाय आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केले आहे.

********

08 March, 2026

'सीएमआरसी' व्यवसायनिहाय क्लस्टर उभारल्यास बचत गटांना मोठी संधी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


• 'माविम'चा ५१ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ उत्साहात


हिंगोली, दि. ८ (जिमाका): महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्यरत सर्व महिला बचत गटांनी उद्योग-व्यवसाय उभारून नवनवीन उत्पादने तयार करावीत. तसेच लोक संचालित साधन केंद्रनिहाय विविध उद्योगांचे क्लस्टर उभारल्यास महिलांना व्यवसायवृद्धीस मोठी संधी मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. 

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे आज रविवार (दि. ८) रोजी ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे उपस्थित होते.

हिंगोली जिल्हा देशातील हळद उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलत असून महिलांनी हळदीपासून केवळ पावडर नव्हे तर इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यावर भर देण्याचे आवाहन करून बचत गटांना आवश्यकतेनुसार प्रशासनाकडून सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगितले. संविधानामुळे महिलांना विविध अधिकार प्राप्त झाले असून शिक्षणामुळे महिलांचे व कुटुंबाचे सशक्तीकरण होते, असेही त्यांनी नमूद केले.

 जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकसंचलित साधन केंद्रांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास सांगितला. जिल्ह्यातील १५४१ बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करण्यात आले असून चालू आर्थिक वर्षात सीएमआरसीच्या माध्यमातून आतापर्यंत ३० कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तर वैयक्तिक महिलांना सुमारे ३९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील बचत गटांची कर्ज परतफेडीची सरासरी ९९ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते अधिक कर्ज मिळालेल्या बचत गटांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजक महिलांचाही सन्मान करण्यात आला.

अधिक कर्ज मिळालेल्या गटांमध्ये भगवान महावीर, भक्ती कवठा, तनिष्का जवळाबाजार, कल्पतरू चोंडी स्टेशन, लक्ष्मी वसमत, अंजनी असोला, महाकाली माता औंढा, ज्योती हिंगोली व स्वामी नरेंद्र हिंगोली या स्वयंसहायता महिला बचत गटांचा समावेश होता. उत्कृष्ट उद्योजक महिलांमध्ये प्रभावती प्रकाश काचगुंडे (अंजनवाडा), स्वाती प्रकाश चोंडेकर (औंढा नागनाथ), उषा प्रकाश खडसे (हिंगोली), संगीता सिताराम दुधाने (साखर कारखाना), साधना गोविंद कदम (अकोली), विजया धोंडीबा कटारे (जवळा बाजार) व अरुणा दलित खंदारे (वाई) यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात महिलांनी मनोगत व्यक्त करत महिला आर्थिक विकास महामंडळामुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी अनुभव सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेखाधिकारी मुकुंद जहागीरदार, जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, एमआयएस अधिकारी गजानन इंगळे, लिपिक तथा सहाय्यक संतोष ठाकूर, तसेच लोकसंचलित साधन केंद्रातील व्यवस्थापक व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केले तर आभार विलास पंडित यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्रांमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

****** 






कुटुंबाचे पाठबळ मिळाल्यास कर्तृत्ववान महिला अधिक सक्षमपणे प्रगती साधतात – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

 


• जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला पुरस्कार वितरण सोहळा 

• वर्षभरात लाखभर लखपती दिदी करण्याचा संकल्प 


हिंगोली, दि. ८ (जिमाका) : महिलांना त्यांच्या कुटुंबातून पाठबळ मिळाल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे पुढे प्रगती साधतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

येथील षटकोणी सभागृहात महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे, जिल्हा कृषि अधिकारी अतुल वायसे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व्यासपीठावर उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यात १,०७२ अंगणवाड्या कार्यरत असून, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले की, जिल्ह्यात सुमारे १०,६०० बचत गट कार्यरत असून ८४ हजार लखपती दीदी तयार झाल्या आहेत. पुढील वर्षात हा आकडा एक लाख लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. बचत गटांनी व्यवसायाकडे वळत यावर्षी सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल केली असून, अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचाही सन्मान व्हायला हवा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले. 

 राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून ते आजपर्यंत महिलांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे ज्या-ज्या क्षेत्रात महिला काम करतात, त्या सर्वांचे योगदान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात घेऊन गावांनी १०० टक्के गुण मिळवून पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच माझे गाव – आरोग्य संपन्न गाव या अभियानात महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन गावांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबतही त्यांनी माहिती दिली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी ही मोहीम महत्त्वाची असून १४ वर्षे पूर्ण व १५ वा वाढदिवस न साजरा केलेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्याचे पालकांनी सुनिश्चित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी तसेच ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ही कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनात काम करताना शासनाने दिलेल्या जबाबदाऱ्यांबरोबरच आपल्या मुलींची व कुटुंबाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला आई, पत्नी, बहीण, मैत्रीण अशा विविध भूमिकांतून समाज घडवितात, असे सांगून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.

प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी स्त्रीशक्तीचा जागर म्हणून जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. नवनिर्मितीची शक्ती महिलांमध्ये असून आईकडून शिकलेली भाषा हीच मातृभाषा असते, असे सांगत, इतिहासापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत महिलांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले असल्याचे प्रकल्प संचालक श्री. केंद्रे यांनी सांगितले.

समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे यांनीही आपल्या मनोगतातून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.

 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे यांनी प्रास्ताविकातून महिला घर सांभाळून समाजातील विविध जबाबदाऱ्या पार पाडतात. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्या कुटुंबासाठी तसेच राष्ट्रहितासाठी प्रेरणादायी कार्य करत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

************* 





07 March, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून जिल्ह्यात प्रारंभ

 


हिंगोली, दि. 7 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आज जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सुरु झाले आहे.  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रतीक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली व  तहसीलदार जीवककुमार कांबळे, हरिष गाडे, सखाराम मांडवगडे, विनोद डोणगावकर यांच्या उपस्थितीत संबंधित तालुक्यात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, डिजिटल सातबारा वैधता, महसूल सेवा सुलभ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या समाधान शिबिरात औंढा नागनाथ तालुक्यातील 45 पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच 75 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली व सातबारा दुरुस्तीचे 4 अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच 199 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांचे पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत जन्म-मृत्यू दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच सातबारा व गाव नमुना 8-अ ची प्रत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली.

शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सुधारणांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. 

 या कार्यक्रमास मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी, शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जी. पाटील यांनी केले तर आभार तलाठी एस. एल. सोनटक्के यांनी मानले.


 *गिरगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन*

या अभियानांतर्गत वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  नायब तहसीलदार पांडुरंग हांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 यावेळी प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, डिजिटल सातबारा वैधता तसेच महसूल विभागाच्या विविध सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या समाधान शिबिरात वसमत तालुक्यातील ४५ पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच १८८ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली व सातबारा दुरुस्तीचे ५ अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच ३१८ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांचे पत्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत जन्म-मृत्यू दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच सातबारा व गाव नमुना ८-अ चे वितरण करण्यात आले.

या शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सुधारणा व सेवा नागरिकांना समजावून सांगण्यात आल्या. यावेळी मंडळ अधिकारी वंदना मजगे, मोनाली ढगे, सागर भालेराव, नामदेव हाके तसेच तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी, शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांनी केली. सूत्रसंचालन रामेश्वर गिरी यांनी केले तर आभार प्रियंका खडसे यांनी मानले. 

यावेळी हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्यातही या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

******







जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून खरबी वळण बंधारा व बोगदा कामाची पाहणी


हिंगोली, दि.०७ (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कयाधू नदीवरील खरबी येथे सुरू असलेल्या उच्च पातळी बंधारा कामाची तसेच पैनगंगा प्रकल्पातील पाणी तूट भरून काढण्यासाठी प्रगतीपथावर असलेल्या पाणी वहन प्रणालीच्या बोगद्याची आज प्रत्यक्ष जावून पाहणी केली.

खरबी उच्च पातळी बंधारा व पाणी वहन प्रणालीचे काम पूर्ण झाल्यानंतर या बंधाऱ्यात सुमारे दोन दलघमी पाणीसाठा निर्माण होणार असून, अंदाजे ३०० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उच्च पातळी बंधाऱ्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी यावेळी दिली.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत पैनगंगा नदीवर इसापूर धरण व कयाधू नदीवर सापळी धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सापळा धरण रद्द करण्यात आला. त्यामुळे पैनगंगा प्रकल्पामध्ये सुमारे १९९ दलघमी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी खरबी उच्च पातळी बंधाऱ्यातून पावसाळ्यात इसापूर धरणाकडे पाणी वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कयाधू नदीचा कमाल पुराचा विसर्ग ३०९९.९१ घनमीटर प्रति सेकंद इतका असून, त्यापैकी सुमारे ६० घनमीटर प्रति सेकंद पाणी इसापूर धरणाकडे वळविण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती झाली असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी शेनोडी–रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचाही आढावा घेण्यात आला. या योजनेद्वारे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

***** 







06 March, 2026

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील वरुड, जवळा पांचाळ, सिंगी, वाघी, केलसुला, वाढोणा, जयपूर, साखरा, वेलतुरा, वटकळी, वरुड चक्रपान, पानकनेरगाव आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 






जिल्ह्यातील 343 पदासाठी पोलीस पाटील पदभरती, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्रे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. 06 : हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटलाची 647 पदे मंजूर असून, 343 पदे रिक्त होती. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण  करण्याची  कार्यवाही  जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राबविण्यात आली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यातील काहींना प्रातिनिधीक स्वरुपात छत्रपती  शिवाजी  महाराज महाराजस्व  समाधान शिबिरामध्ये नियुक्ती आदेश वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर तात्पुरत्या निवडीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोमवार, दि. 02 रोजी www.Hingolipp.recruitonline.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. दि. 4 व 5 फेब्रुवारी, 2025 रोजी निवड झालेल्या उमेदवारांच्या विविध पथकामार्फत कागदपत्राची पडताळणी करुन त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील 343 रिक्त पदांमध्ये हिंगोली तालुक्यातील 76, सेनगाव 65, कळमनुरी 89, वसमत 57 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 56 पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस पाटील पदासाठी गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी दि. 1 ते 5 जानेवारी, 2026 दरम्यान जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. या आरक्षणावर 6 ते 7 जानेवारी, 2026 या दोन दिवसात आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानंतर दि. 8 ते 10 जानेवारी, 2026 या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करुन दि. 12 ते 26 जानेवारी, 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दि. 27 ते 30 जानेवारी, 2026 या दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी करुन अर्जदारांना प्रवेशपत्रे वाटप करण्यात आले होते.

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पदांसाठीची लेखी परीक्षा 21 केंद्रांवर दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी शांततेत व शिस्तबद्धरित्या घेण्यात आली. या परीक्षेसाठी 4 हजार 639 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 4 हजार 472 अर्ज पात्र ठरले होते. दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी झालेल्या परीक्षेसाठी 4 हजार 379 उमेदवार उपस्थित राहिले, तर 93 उमेदवार गैरहजर होते.

प्रथम उत्तरतालिका दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिकेबाबत लेखी आक्षेप व हरकती सादर करण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. अंतिम उत्तरतालिका दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येऊन त्याच दिवशी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती  दि. 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध पॅनलच्या माध्यमातून पार पडल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******