15 June, 2026

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अंतुलेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत








हिंगोली(जिमाका), दि. १५ : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी हिंगोली शहरातील अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन तसेच विविध स्वागतपर उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्येही शाळेबाबत उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व इतर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शासनाच्या विविध विद्यार्थी हिताच्या योजना आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडणाऱ्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नव्या शैक्षणिक वर्षात मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, डिजिटल शिक्षण, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अभ्यासक्रम, शालेय उपक्रम तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आनंदाने शाळेत प्रवेश घेत नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या स्वागत कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांसह करण्यात आली. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

****

No comments: