01 June, 2026

हिंगोली आगारात ई-शिवाई बस सेवेला प्रारंभ

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मिळणार आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवास




हिंगोली (जिमाका), दि. १ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक धोरणांतर्गत हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई-शिवाई बसपैकी पहिल्या टप्प्यात चार बस आगारात दाखल झाल्या असून त्यांचे उद्घाटन व लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. या बसमुळे हिंगोलीकरांना अधिक आरामदायी, गतिमान व प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ई-शिवाई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध आगारांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने बसांचा पुरवठा करण्यात येत आहे. हिंगोली आगारातून संचलित होणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी २१ ई-शिवाई बसांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार बस आगारात दाखल झाल्या आहेत.

या बसांच्या लोकार्पण कार्यक्रमास हिंगोली शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, आगार व्यवस्थापक किशोर महाजन, स्थानकप्रमुख सुनिता गोरे, वाहतूक निरीक्षक फिरोज शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

आगार व्यवस्थापक किशोर महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, ई-शिवाई बस केवळ दीड तासात शंभर टक्के चार्ज होतात व एका चार्जिंगमध्ये सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

या ई-शिवाई बस हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर, हिंगोली ते नांदेड, हिंगोली ते अकोला, हिंगोली ते परळी तसेच हिंगोली ते रिसोड या मार्गांवर धावणार आहेत. आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त बसांच्या आधारे आणखी फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी तसेच आगार व वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********

No comments: