25 June, 2026

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २५ : ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२६-२७ या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा व राज्यस्तरावरील योजनेचे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे ३१ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व पंचायत समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींकडून शासन निर्णयानुसार विविध विकासकामांपैकी आर्थिक मर्यादेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून हे प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रस्तावासोबत तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांचे आदिवासी लोकसंख्या व क्षेत्र प्रमाणपत्र, कामांचा पाच वर्षांचा प्राधान्यक्रम आराखडा, अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचा बहुमताने मंजूर ठराव, नाहरकत प्रमाणपत्र, स्थळदर्शक नकाशा, जिओ-टॅग केलेले छायाचित्र, संबंधित काम इतर कोणत्याही योजनेतून मंजूर नसल्याचे प्रमाणपत्र, देखभाल-दुरुस्तीचे प्रमाणपत्र, जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचा पुरावा, ग्रामसेवकांचा अहवाल, कार्यान्वयीन यंत्रणेचे प्रमाणपत्र, जादा खर्चाचे हमीपत्र तसेच कामाच्या जागेबाबत कोणताही वाद नसल्याचे हमीपत्र आणि तांत्रिक मान्यतेसह अंदाजपत्रक आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

सर्व संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ते वेळेत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.

******

No comments: