हिंगोली(जिमाका), दि. २६ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून आज हिंगोली येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथील सुमारे २०० ते २५० विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
या प्रभात फेरीस समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय केंद्रे, पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस निरीक्षक संदीप मोघे, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, विशेष अधिकारी अमोल घुगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी बबन मोरे, गृहपाल सुलोचना ढोणे, धनश्री अवचार, विजयकुमार सोनटक्के, आरती वांझोळकर, प्रशांतकुमार बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रभात फेरीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, महाराज अग्रसेन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना तसेच संविधान कॉर्नर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नशामुक्ती अभियान व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणविषयक विचारांवर आधारित घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
प्रभात फेरीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे झाला. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व कर्मचारी यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******





No comments:
Post a Comment