·
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नोंदणी अनिवार्य
हिंगोली (जिमाका),
दि. 30 : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना आर्थिकदृष्ट्या
सक्षम करण्याच्या उद्देशाने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती
योजना" जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेचे जवळपास एक हजार शेतकरी पात्र आहेत. तसेच राष्ट्रीयकृत व इतर बँकातील पात्र शेतकऱ्यांची यादी
अद्ययावत करण्याचे काम राज्य स्तरावर वेगाने सुरु असून, जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर
शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी
करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार,जिल्ह्यातील
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पात्र शेतकऱ्यांपैकी 170 शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक
नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांची यादी संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली
असून, संबंधितांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी
न झाल्यास पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी विलंब न करता आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन
आवश्यक कागदपत्रांसह ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल
गुप्ता यांनी केले आहे.
तसेच, ज्या प्रकरणांमध्ये
खातेदार शेतकरी मयत झाले आहेत, अशा ठिकाणी त्यांच्या वारसांच्या नावाची सातबाऱ्यावर
आवश्यक नोंद (फेरफार) करून घेणे अत्यावश्यक आहे. वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच
संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार असल्याने ही प्रक्रिया देखील तातडीने
पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी
योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी महसूल, कृषी व संबंधित
यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून, पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून
या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment