29 June, 2026

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर 1 जुलैपासून कारवाई

 


 

·         30 जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना दिलासा

·         नागरिकांनी तातडीने एचएसआरपी बसविण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. दि. 1 जुलै 2026 पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, दि. 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या दि. 18 मे 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय, एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनधारकांच्या वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे आदी कामांवर यापूर्वीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, यापुढे एचएसआरपी नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळता) करण्यात येणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी तात्काळ आपल्या वाहनांना एचएसआरपी बसवून घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: