01 June, 2026

अमृतपेठ थेट बाजारपेठेचे 5 व 6 जून रोजी हिंगोलीत आयोजन * स्थानिक उद्योजक, महिला बचत गट व स्वदेशी उत्पादनांना मिळणार प्रोत्साहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 01 : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने "अमृतपेठ थेट बाजारपेठ" या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. 5 व 6 जून 2026 रोजी शेतकरी भवन, मंगळवार बाजार, हिंगोली येथे करण्यात आले आहे. हा उपक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

स्थानिक उत्पादक, महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहेत. अहिल्यानगर येथे आयोजित अमृतपेठेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हिंगोलीमध्येही या विशेष बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमृतपेठेमध्ये खाद्यपदार्थ व गृहउद्योग उत्पादने, नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू, चकली, बाकरवडी, लोणचे, मसाले, पापड, शेव, खाकरा, थालपीठ, ढोकळा प्रीमिक्स यांसारख्या उत्पादनांसह महिला व हस्तकला वस्तू, मोती ज्वेलरी, अमेरिकन डायमंड दागिने, हॅन्डमेड नथ, माहेश्वरी साड्या, कुर्तीज, जेन्ट्स ड्रेसेस, बॅग, साडी कव्हर, ब्लाऊज तसेच खणापासून तयार करण्यात आलेली विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

याशिवाय आयुर्वेदिक साबण, फेसवॉश, स्किन व हेयर केअर उत्पादने, परफ्यूम, अगरबत्ती तसेच सोलर पॅनल, वॉटरप्रूफिंग, आर्ट अँड क्राफ्ट, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी आणि देवगड हापूस, पायरी व विविध प्रकारच्या आंब्यांचे विशेष स्टॉल नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष मार्गदर्शन केंद्रही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

"दर्जेदार खरेदीची खात्री – अमृतपेठ तुमच्यासाठी" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजक, महिला बचत गट व स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली (मो. 7391065471) येथे संपर्क साधावा, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

*******

हिंगोली येथे अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ कार्यालय कार्यरत * सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : जलसंपदा मंत्री डॉ . राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाचे कामकाज गतिमान, लोकाभिमुख व कार्यसुसंगत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी दि. 27 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड हे कार्यालय हिंगोली येथे स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड हे कार्यालय दि. 01 जून 2026 पासून हिंगोली येथील जुनी पोदार शाळा परिसरात कार्यरत करण्यात आले आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता, मंडळांतर्गत सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे कार्यालय हिंगोली येथे कार्यरत झाल्यामुळे जिल्ह्यातील तसेच परिसरातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना अधिक गती मिळणार आहे. तसेच सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण अधिक प्रभावीपणे व तातडीने होण्यास मदत होणार आहे. शेतकरी व लाभधारकांना प्रशासनाशी समन्वय साधणे सुलभ होणार असून जलसंपदा विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतही यामुळे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे कार्यालय हिंगोली येथे सुरू झाल्याने सिंचन विकासाला चालना मिळून परिसरातील कृषी क्षेत्राच्या विकासासही मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

****** 




हिंगोली आगारात ई-शिवाई बस सेवेला प्रारंभ

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मिळणार आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवास




हिंगोली (जिमाका), दि. १ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक धोरणांतर्गत हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई-शिवाई बसपैकी पहिल्या टप्प्यात चार बस आगारात दाखल झाल्या असून त्यांचे उद्घाटन व लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. या बसमुळे हिंगोलीकरांना अधिक आरामदायी, गतिमान व प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ई-शिवाई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध आगारांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने बसांचा पुरवठा करण्यात येत आहे. हिंगोली आगारातून संचलित होणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी २१ ई-शिवाई बसांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार बस आगारात दाखल झाल्या आहेत.

या बसांच्या लोकार्पण कार्यक्रमास हिंगोली शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, आगार व्यवस्थापक किशोर महाजन, स्थानकप्रमुख सुनिता गोरे, वाहतूक निरीक्षक फिरोज शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

आगार व्यवस्थापक किशोर महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, ई-शिवाई बस केवळ दीड तासात शंभर टक्के चार्ज होतात व एका चार्जिंगमध्ये सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

या ई-शिवाई बस हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर, हिंगोली ते नांदेड, हिंगोली ते अकोला, हिंगोली ते परळी तसेच हिंगोली ते रिसोड या मार्गांवर धावणार आहेत. आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त बसांच्या आधारे आणखी फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी तसेच आगार व वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********