हिंगोली (जिमाका), दि. 03 : यंदाच्या खरीप हंगामात एल-निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पुरेसा पाऊस (किमान 100 मिमी) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.
कमी पाऊस अथवा पावसातील खंड यांचा विचार करून शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे व खते वाया जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच खतांच्या वापराबाबत केवळ डी.ए.पी. (18:46:0) खतावर अवलंबून न राहता स्फुरदयुक्त पर्यायी खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
बाजारात डी.ए.पी.ला पर्याय म्हणून विविध स्फुरदयुक्त खते उपलब्ध असून त्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार व मृदा परीक्षणाच्या शिफारशीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असलेल्या खतांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होईल.
डी.ए.पी.ला पर्याय म्हणून टी.एस.पी. + युरिया तसेच एस.एस.पी. + युरिया यांचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय 12:32:16 व 20:20:0:13 ही एन.पी.के. युक्त खतेही पर्यायी स्वरूपात उपलब्ध आहेत.
शेतकरी बांधवांनी उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा व खरीप हंगामाची यशस्वी तयारी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment