हिंगोली (जिमाका), दि. 02 : दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्यासाठी राज्य शासनाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
यापूर्वी एचएसआरपी बसविण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, राज्यातील एचएसआरपी बसविण्यात आलेल्या जुन्या वाहनांचा आढावा घेतला असता सुमारे 50 टक्के वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी शासनाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. 01 जुलै 2026 पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत तसेच संबंधित यंत्रणांद्वारे मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहन मालकांवर विविध सेवांबाबत आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे अथवा उतरविणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे. याशिवाय पुढील काळात एचएसआरपी नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनामध्ये बदल करण्यास मंजुरी, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) बंद करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी शासनाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवून घ्यावी व भविष्यातील कायदेशीर कारवाई तसेच प्रशासकीय अडचणी टाळाव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
********
No comments:
Post a Comment