• हिंगोली जिल्ह्यात कृषी, महसूल, आरोग्य, रोजगार व सेवा हक्क क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती
हिंगोली, दि. 1 (जिमाका) : भारताच्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ होत असून ऑनलाईन स्वगणनेची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक घर, कुटुंब व मूलभूत सुविधा अशी एकूण 34 प्रकारची अचूक नोंद या प्रक्रियेतून होणार असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभागी होत विकास प्रक्रियेला बळ द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आज हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
देशामध्ये 1872 पासून जनगणना केली जात आहे. आता ही 16वी जणगणना सुरु असून, स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ती दोन टप्प्यांत होणार असून, या जणगणनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात घरांची व मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. प्रथमच ऑनलाईन स्वगणना सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना स्वतः माहिती नोंदविण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात भेट देणारे प्रगणक व पर्यवेक्षक हे शासकीय ओळखपत्रासह येणार असल्याने नागरिकांनी त्यांना योग्य ते सहकार्य करावे, तर तोतया व्यक्तींपासून सावध राहण्याचेही आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामापूर्वी कृषी विभागामार्फत खतसाठ्याचे नियोजन केले असून शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे यासाठी कंपन्या व विक्रेत्यांशी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. साठेबाजी, जादा दर आकारणी, खत-बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारींसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 761 शेतकऱ्यांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून कृषी यांत्रिकीकरण व फळबाग लागवड योजनांमधूनही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत 26 महसूल मंडळांमध्ये शिबिरे घेऊन जवळपास 10 हजार प्रमाणपत्रे व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. ‘राजस्व अभियान’ अंतर्गत पोट हिस्सा मोजणीचे काम सुरू असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्ह्यात एलपीजी गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून आवश्यक मागणी पूर्ण केली जात आहे. केंद्र शासनाच्या साधना सप्ताहात हिंगोली जिल्हा परिषदेतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत द्वितीय क्रमांक मिळविल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर 311 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. बालविवाह निर्मूलन मोहिमेत वर्षभरात 52 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाद्वारे ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांनी “निरोगी गाव-सशक्त गाव-समृद्ध गाव” या ध्येयाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वित प्रयत्नांतून हिंगोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार सचिन जोशी, महसूल सहायक रामेश्वर नांदणकर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एनआरसी, डिजिटल आयुष्यमान भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. नितीन तडस, डॉ. गोपाळ कदम, मुख कर्करोग उपचार व निदानमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. फैसल खान यांचा, बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या समासेविकांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आले.
आदर्श तलाठी पुरस्कार, एसपीसीचे विद्यार्थी यांचा सन्मान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकारी, जिल्हा व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत खून प्रकरणातील पीडित व्यक्तींच्या वारसास नियुक्तीपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘ॲनिमिया मुक्त हिंगोली’ उपक्रमाच्या चित्ररथाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****









