22 May, 2026

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी ३० मेपर्यंत अर्ज करा

 


हिंगोली(जिमाका), दि. २२ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी अंमलबजावणीसाठी नवीन कार्यकारी सूचना उपलब्ध झाल्या असून, या अभियानाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सदर अभियानांतर्गत सोयाबीन व करडई पिकांसाठी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

या अभियानामध्ये पिकनिहाय मूल्य साखळी समूह निवडणे, मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी निवडणे, तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून कृषि विज्ञान केंद्राची निवड, मूलभूत बियाणे खरेदी, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा, माती परीक्षण, सीड हब, ब्लॉक प्रात्यक्षिके, काढणीनंतर सुविधा सहाय्य तसेच कृषि संप्रेषण पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती भरणे आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

सन 2026-27 या वर्षात मूल्य साखळी भागीदारामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांसाठी खालील पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत.


पात्रता निकष :

कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक.

हिंगोली जिल्ह्यात समूह तयार झालेल्या क्षेत्रात किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान 200 शेतकरी नोंदणीकृत असावेत.

सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांशी संबंधित कामकाज नमूद असणे आवश्यक.

मागील 3 वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल 9 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी.

शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रुपयांचा समभाग असावा.

कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.

शासनाकडून अनुदान प्राप्त केलेल्या शेतकरी उत्पादक संघांना प्राधान्य दिले जाईल.

रु.10,000 शेतकरी उत्पादक संघ योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या तसेच नाफेड, एनएससी-ओएस इत्यादी सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबिया संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांना पात्रता निकषांच्या अधीन राहून प्राधान्य देण्यात येईल.

हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दि. 30 मे 2026 पूर्वी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर करावेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

******

No comments: