15 May, 2026

उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली (जिमाका), दि. 15 : राज्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण होत असलेल्या उष्मालाट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

वातावरणीय बदलामुळे उन्हाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून राज्यातील काही भागांमध्ये उष्मालाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मानव, पशुपक्षी तसेच इतर घटकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महसूल, कृषी, पशुसंवर्धन तसेच इतर संबंधित विभागांना उष्मालाट प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः शासकीय कार्यालये व कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सुविधा, विश्रांतीसाठी जागा तसेच मजुरांसाठी आवश्यक त्या मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच बांधकाम कामगार, शेतमजूर, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व आजारी व्यक्ती यांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे व हलक्या रंगाचे सूती कपडे वापरावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने उष्माघाताच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुपालकांनीही जनावरांना सावली, स्वच्छ पाणी व योग्य काळजी उपलब्ध करून द्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व विभागांनी उष्मालाटीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

****

No comments: