* प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 14 : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांना गती देऊन प्राधान्यक्रमानुसार प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), सर्व उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. आतापर्यंत पूर्ण झालेली कामे, अपूर्ण रस्ते, प्रगतीपथावरील कामे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची माहिती त्यांनी तपासली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की, अद्याप सादर न करण्यात आलेल्या रस्ते कामांचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवून तातडीने सादर करावेत. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पडताळणी करूनच प्रस्ताव पाठविण्यात यावेत. तसेच कामांची द्विरुक्ती होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
रस्त्यांची कामे करताना काम सुरू होण्यापूर्वीचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जीओ-टॅगिंग फोटो तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केलेले व्हिडिओ सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योजनेंतर्गत दर्जेदार व पारदर्शक कामे करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा
यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सन 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी तयार करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पंचवार्षिक बृहत आराखड्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
******

No comments:
Post a Comment