![]() |
हिंगोली (जिमाका), दि. 13 : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले असून, ३० हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर याबाबत माहिती दिली जाते. तसेच मालमत्ता व कौटुंबिक वाद, कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७ संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
याशिवाय मानसिक ताण, चिंता, नैराश्य, एकटेपणा यांसारख्या समस्यांवर समुपदेशन करून भावनिक आधार दिला जातो. बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांना मदत व पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद साधणे, तसेच पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाते.
एल्डर लाईन १४५६७ ही केवळ हेल्पलाईन नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार ठरत आहे. या सेवेद्वारे वृद्धांच्या गरजा समजून घेत त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील प्रत्येकाने या सेवेबाबत जागरूकता निर्माण करून गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तिचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या हेल्पलाईनवर अनेक व्यथा, वेदना आणि तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक एल्डर लाईन १४५६७ हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत असून, या माध्यमातून त्यांना आवश्यक मदत व आधार मिळत आहे.
******

No comments:
Post a Comment