02 May, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची औंढा नागनाथ येथे विकास कामांची पाहणी; हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा व आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचे उद्घाटन

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हिंगोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. कामाची प्रगती, दर्जा आणि नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सेवांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याच दिवशी हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवनशैली व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

*******


01 May, 2026

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा; तुटवडा होऊ देऊ नका – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

खरिप हंगाम 2026, पाणीपुरवठा, कृषी नियोजन व शासन योजनांचा पालकमंत्र्यांकडून सर्वंकष आढावा

 


हिंगोली, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये. खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा, वितरण व उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. तसेच जिल्ह्यात पाणीटंचाई, चारा टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्या उन्हाचा पारा जास्त असून उन्हापासून संरक्षण करावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगाम 2026 पूर्वतयारी, पाणीटंचाई निवारण, कृषी निविष्ठा उपलब्धता तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरिप हंगाम 2025 तालुकानिहाय नुकसानभरपाई वाटप, रब्बी हंगामाचा आढावा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण, बियाण्यांची गरज, महाबीजमार्फत उपलब्धता, कापूस बियाण्यांच्या विशिष्ट वाणांची मागणी व पुरवठा, तसेच रासायनिक खतांचा साठा, मागणी व विक्री याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. मंजूर आवंटनापैकी सुमारे 77 टक्के खतसाठा उपलब्ध झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यास डीएपी खताची दररोज सुमारे 52 मेट्रिक टन गरज असून सद्यस्थितीत सुमारे 3 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. तसेच युरियाचा शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लागणारा साठा मुबलक उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा दाखविणे बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने विक्रेत्यांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

खरिप 2026 करिता निश्चित करण्यात आलेल्या कृषी मोहिमांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्येक कृषि सहाय्यकाने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात 20 जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव परिसरात खड्डे निर्माण केले जाणार आहेत. महाविस्तार मोबाईल अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवार फेऱ्यांचे नियोजन, पोकरा योजनेअंतर्गत कामांची गती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फलोत्पादन वाढ, तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत क्षेत्रवाढीचे नियोजन यावरही सविस्तर चर्चा झाली. प्रधानमंत्री नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत यासंदर्भातील कामांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कृषि विभागाच्या दोन घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. जून, जुलै व ऑगस्टपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी विहीर अधिग्रहण, जलजीवन मिशनअंतर्गत कामे, तसेच टँकर नियोजनाची प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जात असून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, लेखन फाउंडेशन, व्हिजन समिती व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 70 शाळांनी सहभाग घेऊन पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. यामध्ये विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये शिक्षण, कृषी व मूलभूत सुविधा या तिन्ही क्षेत्रांचा समन्वित विकास करण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आरोग्य संपन्न गावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज-पालकमंत्री

 

जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि आपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृद्ध बनविण्यासाठी हातभार लावा. आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न केल्यास आपल्या जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात एक आदर्श स्थान मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी याप्रसंगी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेले "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" हे अभियान म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तन घडविणारे पाऊल आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या तरच आपण खऱ्या अर्थाने निरोगी समाज घडवू शकतो. "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" ही केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे, जी प्रत्येक ग्रामस्थाच्या सहभागातून यशस्वी होणार आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना "आरोग्यसंपन्न गाव" म्हणून गौरविण्यात येणार आहे. यावेळी 'मी निश्चय मित्र' लोगोचे यावेळी विमोचन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची माहिती दिली.

यावेळी  जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांच्या विशेष प्रयत्नाने  हिंगोलीचे 'यलो गोल्ड' म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या हळदीचे बॉक्स पालकमंत्री नरहरी झिरवाळ व मान्यवरांना भेट देण्यात आले.

****** 










कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन

  

हिंगोली, दि. 1 (जिमाका) : हिंगोली शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीच्या स्वच्छता, संवर्धन व सुशोभीकरणासाठी जिल्हा प्रशासन व नगरपरिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. नदी परिसरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत मोहिमेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कयाधू नदी पात्राची पाहणी करून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. यानंतर नदीपात्रातील गाळ, प्लास्टिक कचरा, निर्माल्य, झुडपे व अन्य घनकचरा हटविण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत यंत्रसामग्रीबरोबरच मानवी श्रमदानालाही प्राधान्य देण्यात आले असून विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात येत आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, कयाधू नदी ही केवळ हिंगोली शहराची नैसर्गिक जलवाहिनी नसून शहराच्या पर्यावरणीय समतोलाची प्रमुख आधाररेषा आहे. वाढते शहरीकरण, अनियंत्रित कचरा टाकणे आणि नदीपात्रातील अतिक्रमण यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. नदी स्वच्छ आणि प्रवाही ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. कयाधू नदी स्वच्छता मोहीम ही केवळ एकदिवसीय उपक्रम नसून नदी संवर्धनाचे लोकआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

******* 





पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

  

हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते .

******* 






आजपासून ऑनलाईन स्वगणनेला सुरुवात; नागरिकांनी सहभागी होऊन विकास प्रक्रियेला बळ द्यावे – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 

हिंगोली जिल्ह्यात कृषी, महसूल, आरोग्य, रोजगार व सेवा हक्क क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती

* हिंगोली येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण




हिंगोली, दि. 1 (जिमाका) : भारताच्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ होत असून ऑनलाईन स्वगणनेची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक घर, कुटुंब व मूलभूत सुविधा अशी एकूण 34 प्रकारची अचूक नोंद या प्रक्रियेतून होणार असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभागी होत विकास प्रक्रियेला बळ द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आज हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते.

            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

देशामध्ये 1872 पासून जनगणना केली जात आहे. आता ही 16वी जणगणना सुरु असून, स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ती दोन टप्प्यांत होणार असून, या जणगणनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात घरांची व मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. प्रथमच ऑनलाईन स्वगणना सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना स्वतः माहिती नोंदविण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात भेट देणारे प्रगणक व पर्यवेक्षक हे शासकीय ओळखपत्रासह येणार असल्याने नागरिकांनी त्यांना योग्य ते सहकार्य करावे, तर तोतया व्यक्तींपासून सावध राहण्याचेही आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामापूर्वी कृषी विभागामार्फत खतसाठ्याचे नियोजन केले असून शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे यासाठी कंपन्या व विक्रेत्यांशी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. साठेबाजी, जादा दर आकारणी, खत-बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारींसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 761 शेतकऱ्यांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून कृषी यांत्रिकीकरण व फळबाग लागवड योजनांमधूनही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत 26 महसूल मंडळांमध्ये शिबिरे घेऊन जवळपास 10 हजार प्रमाणपत्रे व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. ‘राजस्व अभियान’ अंतर्गत पोट हिस्सा मोजणीचे काम सुरू असून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत.


जिल्ह्यात एलपीजी गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून आवश्यक मागणी पूर्ण केली जात आहे. केंद्र शासनाच्या साधना सप्ताहात हिंगोली जिल्हा परिषदेतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत द्वितीय क्रमांक मिळविल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर 311 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. बालविवाह निर्मूलन मोहिमेत वर्षभरात 52 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाद्वारे ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांनी “निरोगी गाव-सशक्त गाव-समृद्ध गाव” या ध्येयाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.


उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वित प्रयत्नांतून हिंगोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. 


यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार सचिन जोशी, महसूल सहायक रामेश्वर नांदणकर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एनआरसी, डिजिटल आयुष्यमान भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. नितीन तडस, डॉ. गोपाळ कदम, मुख कर्करोग उपचार व निदानमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉ. फैसल खान यांचा, बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या समासेविकांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आले. 

आदर्श तलाठी पुरस्कार, एसपीसीचे विद्यार्थी यांचा सन्मान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकारी, जिल्हा व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत खून प्रकरणातील पीडित व्यक्तींच्या वारसास नियुक्तीपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘ॲनिमिया मुक्त हिंगोली’ उपक्रमाच्या चित्ररथाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****







महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

 





 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते  आज ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

******

30 April, 2026

मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम


‘युआयडीएआय’चे निर्देश



हिंगोली (जिमाका), दि. 30: आधार कार्डमधील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत.

महाराष्ट्र दिनी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबद्दल रहिवाशांना माहिती देण्यासाठी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून जिल्हाधिकारी कार्यालयांना 'डिस्प्ले स्टँडी' वितरित करण्यात येत आहेत. विशेषतः 1 मे रोजीच्या ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यात विशेष 'एमबीयू' शिबिरे आयोजित केली जाणार असून, या ठिकाणी स्टँडीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल.

शाळा आणि शासकीय कार्यालयांत ही केवळ 1 मे पुरती निरंतर जनजागृती मर्यादित न राहता, ही मोहीम निरंतर राबवण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर या माहितीपर स्टँडीजचा वापर स्थानिक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी केला जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

मुलांचे आधार बायोमेट्रिक वेळेत अपडेट न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. ही अडचण टाळण्यासाठी जिल्ह्यांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 5 आणि 15 वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*****

स्वाधार ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी मंगळवारपर्यंत मुदत

 



हिंगोली (जिमाका), दि. 30: शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर केलेल्या ऑनलाईन अर्जांची नुकतीच तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 147 अर्ज विद्यार्थी लॉगिनवर त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. अर्जांची ऑनलाईन त्रुटी पूर्तता करण्यासाठी रविवार, दि.5 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असल्याचे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधा अभावी पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.


संबंधित विद्यार्थ्यांनी 05 मे 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्तता करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

****

आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

 


• तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध


हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४२३ रिक्त केंद्रे अशा एकूण ४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत दि.०२ जानेवारी २०२६ अखेर एकूण ३ हजार १०१ अर्ज प्राप्त झाले.

प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १ हजार ८६१ उमेदवारांच्या दि.३ ते दि.१२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर दि.०१ मार्च २०२६ रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या अंतरिम गुणवत्ता यादीवर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी दि.११ ते दि.१३ मार्च २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली होती.

या कालावधीत १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. त्यानुसार पात्र गुणदान करण्यात आले. तसेच तात्पुरत्या निवड यादीवरील ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्तेच्या आधारे न्यायनिर्णय करण्यात आला. यानंतर काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात बदल होऊन दि.१७ एप्रिल रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम गुणवत्ता यादीवर पुन्हा उमेदवारांकडून दि.२० ते दि.२२ एप्रिल या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत प्राप्त झालेल्या २५ हरकतींची सुनावणी करून त्यावरील निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात आला. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीत काही अंशतः बदल करण्यात आले असून सुधारित अंतिम गुणवत्ता यादी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.

तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी खालील वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

कागदपत्र पडताळणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उमेदवारांनी ४ मे २०२६ रोजी, वसमत तालुका दि.०५ मे रोजी,  

हिंगोली (शहरी व ग्रामीण) दि.०६ मे रोजी, *सेनगाव दि.०७ मे रोजी आणि  कळमनुरी तालुक्यातील उमेदवारांनी दि.०८ मे २०२६ रोजी* पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची छायांकित व स्वसाक्षांकित दोन प्रती, अलीकडील तीन रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्रे तसेच आपले सरकार सेवा केंद्र स्वीकारण्याबाबतचे संमतीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

तात्पुरत्या स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसार अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. यानंतर शासनाकडे युजरनेम व पासवर्ड मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक साक्षांकन नमुना व अग्रिम रक्कम भरण्याबाबत संबंधितांना यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

*****

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता





हिंगोली (जिमाका), दि.30: जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अतिवृष्टी, महापूर आदी आपत्तींचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देत आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.   

या  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, नगर परिषद, अग्निशमन विभाग, जलसंधारण विभागासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गुप्ता म्हणाले की, महसूल व पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या संपर्क क्रमांकांची अद्ययावत माहिती तयार ठेवावी. कृषि विभागाने संभाव्य महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा सज्ज ठेवावी. होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आकडेवारीत एकवाक्यता ठेवावी, जेणेकरून नुकसानीचा अचूक अंदाज येईल. जिल्ह्यातील कालवे, साठवण तलाव, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधकामे तसेच नद्यांवरील केटीवेअर यांच्या दुरुस्तीबाबतची माहिती तात्काळ सादर करून कालवे व तलाव दुरुस्तीची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुपता यांनी दिले. 

पूरप्रवण 70 गावांतील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याच्या सूचना देत, पावसाळ्यात महापुराचा धोका असलेल्या गावांमध्ये दवंडीव्दारे नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. गावांना पाण्याचा वेढा पडल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती उपलब्ध ठेवावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांक असलेली दिनदर्शिका तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावेत. कुशल जलतरणपटूंची संपर्क यादी तयार ठेवावी. आरोग्य विभागाने डॉक्टरांची उपलब्धता, संपर्क क्रमांक व प्रथमोपचार पेट्यांची तयारी ठेवावी. गटविकास अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.

रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने तात्काळ देखभाल व दुरुस्ती करून आठवड्याभरात अहवाल सादर करावा. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नद्या व नाल्यांचे खोलीकरण आवश्यक असलेल्या ठिकाणांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, त्यानंतर जिल्हा प्रशासन त्यास मान्यता देईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना व प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महापुरात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तयार ठेवावी तसेच नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. राज्य राखीव पोलीस दलाने सतर्क राहावे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपत्ती काळात आवश्यक उपकरणे व वाहनांची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. 

*****

29 April, 2026

पालकमंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

 


हिंगोली (जिमाका), दि. २९ : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे. 

शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. 


***

पालकमंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर




हिंगोली (जिमाका), दि. २९ : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे. 

शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. 


*******

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट

 

·         वसतिगृह, भोजनालयाची पाहणी ; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांनी आज वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवास, आहार व शिक्षणाच्या दर्जाबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या निवास सुविधांची माहिती जाणून घेतली. स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यानंतर त्यांनी  विद्यालयातील भोजनालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. भोजनाची  गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि वेळापत्रकानुसार भोजन  पुरवठा याबाबत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. स्वयंपाकगृहाची  पाहणी  करताना अन्नधान्य साठवण, स्वच्छता व्यवस्था तसेच स्वयंपाक प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती घेतली.

जिल्हाधिकारी  श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विद्यालयातील सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण संवादामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल, विविध स्पर्धांमधील सहभाग तसेच ॲकॅडमिक परफॉर्मन्सचा आढावा घेत जिल्हाधिकारी  श्री. गुप्ता यांनी  विद्यालयाच्या एकूण कामकाजाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मारोती घोणसेटवाड, वरिष्ठ शिक्षक किशन गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

******* 







जिल्हा परिषदेत सकाळी 7.15 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण



हिंगोली (जिमाका), दि. 29: महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक 01 मे 2026 रोजी जिल्हा परिषद, हिंगोली येथे सकाळी 7.15 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृध्दी दिवाणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या या गौरवपूर्ण प्रसंगी राष्ट्रीय पोशाख परिधान करून देशभक्तीची भावना व्यक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

*****

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.05 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार (दि.01) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.05 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात येणार असून, राष्ट्रगीताच्या सन्मानासह कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, तसेच स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

*****

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 


महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन समारंभ



हिंगोली (जिमाका), दि.29 : महाराष्ट्र राज्याची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली आहे. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 01 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 67 वा समारंभ हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

67 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न न औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे शुक्रवार, दि. 01 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.

सकाळी 8.25 ते 8.30 या वेळेत पोलीस परेड संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 8.30 ते 8.35 या वेळेत पालकमंत्री श्री. झिरवाळ हे स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत. त्यानंतर विविध पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमापूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये वा आस्थापनांतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करावा.

सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

*******

कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य * शेतकऱ्यांनी 20 मेपूर्वी नोंदणी पूर्ण करावी

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यात दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, दिनांक 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकरी बांधव-भगिनींनी तात्काळ ओळखपत्राची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात एकूण 1 कोटी 71 लाख खातेदार संख्या असून, त्यापैकी 1 कोटी 32 लाख शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विलंब न करता आपला तो तयार करून घ्यावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

या नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात. तसेच शेतकरी स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे आदी प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींनी 20 मेपूर्वी फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विभागनिहाय हेल्पडेस्कशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी श्रीमती शीतल कौदरे (मो. 9172319637) यांच्याशी संपर्क साधावा.

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*****

28 April, 2026

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज – मुख्य सचिव राजेश अग्रवाल • वेळेत सेवा देण्यात हिंगोली जिल्हा राज्यात दुसरा

 


मुंबई,दि. २८: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि राज्यसेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, पासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईल, अशी प्रणाली विकसित केली जात आहे.


एआय आधारित यंत्रणेकडे वाटचाल करण्याची गरज –


जी2जी, जी2सी आणि जी2बी सेवा अधिक सुलभ करण्यावरही भर दिला असुन पारंपरिक एजंट प्रणालीत बदल करून डिजिटल आणि एआय आधारित यंत्रणेकडे वाटचाल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डिजी लॉकर आणि “गोल्डन  डाटा” यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा प्रोफाइल तयार करून त्याला आवश्यक शासकीय योजना आणि सेवा आपोआप उपलब्ध करून देण्याची संकल्पना त्यांनी मांडली.


एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून प्रक्रिया पूर्ण करणार –


मुख्य सचिवांनी पुढे सांगितले की, भविष्यात नागरिकांना वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज भासणार नाही. एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निकाल देणार आहेत. या दृष्टीने शासन विविध कंपन्यांसोबत काम करत असून, येत्या काही महिन्यांत ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


एका जिल्ह्यात यशस्वी ठरलेले उपक्रम संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त – मुख्य आयुक्त मनूकुमार श्रीवास्तव


राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी सेवा हक्क दिनानिमित्त बोलताना शासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संस्थात्मक रूपांतर करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, विविध अधिकाऱ्यांनी राबवलेले उपक्रम केवळ व्यक्तिनिष्ठ न राहता संपूर्ण यंत्रणेचा भाग व्हावेत, यासाठी त्यांचे योग्य दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपक्रम इतर जिल्ह्यांमध्येही प्रभावीपणे राबवता येतील.


यावेळी त्यांनी सांगितले की, एका जिल्ह्यात यशस्वी ठरलेले उपक्रम संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी संबंधित विभागांच्या सहकार्याने या उपक्रमांची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या उपक्रमांचे सविस्तर अहवाल तयार करून आयोगाकडे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.


मुख्य आयुक्तांनी कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, या कार्यक्रमासाठी व्यस्त वेळापत्रकातून उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव यांचे विशेष आभार मानले. आपल्या मनोगताचा शेवट करताना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी सातत्याने सुरू ठेवावी, असे आवाहन केले.


गुणवत्तेनुसार सेवा देणाऱ्या जिल्ह्यांचा अधिकाऱ्यांसह गौरव –


प्रथम क्रमांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने पटकावला असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) व निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विनय गोडा यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 91.41 टक्के सेवा निर्धारित कालावधीत देण्यात आल्या. *द्वितीय क्रमांक हिंगोली जिल्ह्याला मिळाला असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 90.60 टक्के सेवा वेळेत प्रदान करण्यात आल्या.* तृतीय क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्याने मिळवला असून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली 90.50 टक्के सेवा वेळेत देण्यात आल्या. बीड जिल्ह्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली 90.13 टक्के सेवा निर्धारित कालावधीत देत उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत नागरिकांना अधिक सुलभ व जलद सेवा देण्यात मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या कार्याचा कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.


नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव


राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश भागवत देशमुख यांनी “डिजिटल ई-लॉक” व नवीन ऑनलाइन सेवा सुरू करून सेवा प्रक्रियेला गती दिली. भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे व सहायक, योगेश नवल यांनी जीआयएस आधारित ई-मोजणी, एआय आधारित नकाशा प्रक्रिया यांसारख्या उपक्रमांद्वारे तांत्रिक सुधारणा केल्या. तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी पीएमसी केअर ॲप, व्हाट्सॲप चॅटबॉट व नागरिक सुविधा केंद्र यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारले, तर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व सहकारी रणजित यादव यांनी उत्कृष्ट सेवा केंद्राची संकल्पना राबवली. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व प्रविण देवरे यांनी डिजिटल प्रणाली विकसित केली. नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना, जालना जिल्हाधिकारी आरिमा मित्तल तसेच अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांदक यांनीही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा वितरण अधिक सक्षम केले. या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्याचे या कार्यक्रमात विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुक्त किरण जाधव यांनी मांडले. समग्र संस्थेच्या वतीने करण्यात आलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण यावेळेस करण्यात आले.

००००

खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात खताचे नियोजन पूर्ण शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही- कृषी विभाग

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27 सुरू होण्यापूर्वी कृषी विभागामार्फत खत उपलब्धतेचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खतटंचाई भासू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक गायकवाड तसेच लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.

कृषी  विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप  हंगामासाठी  हिंगोली  जिल्ह्यास  एकूण 98 हजार 300 मेट्रिक टन खताचे मंजूर आवंटन प्राप्त झाले आहे. याशिवाय संरक्षित साठा म्हणून 1 हजार 950 मेट्रिक टन युरिया व 700 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी खत कंपन्या, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच खत साठ्याचे नियमित निरीक्षण करून वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, पावती घ्यावी तसेच अनावश्यक साठेबाजी किंवा जादा दर आकारणीबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्यक खत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कृषी विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नियोजन केले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी दिली आहे.

 

*******

नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध - अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब, विनासायास तसेच ऑनलाईन पद्धतीने विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून, अधिसूचित सेवा शहरांपासून गावखेड्यांपर्यंत वेळेत नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी  प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले.

जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासनाने दि. 1 एप्रिल 2015 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले की, शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलात आणून नागरिकांना नियत कालमर्यादेत लोकसेवा मिळण्याचा हक्क प्रदान केला आहे. या अधिनियमाच्या कलम 4 नुसार शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

हा अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्यभावनेतून जनतेची सेवा करण्यास प्रेरित करणारा असून, शासनाने आयोगाच्या शिफारशीनुसार नागरिकांना अधिसूचित सेवा निश्चित कालमर्यादेत देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा सेवाभाव हीच कर्मयोगाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य शासनाने नागरिकांना विविध सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सेवा दिल्या जात आहेत. या सेवा अधिक प्रभावीपणे व घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी  प्रास्ताविकातून सेवा हक्क दिन साजरा करण्यामागील भूमिका व त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच सर्व विभागांनी अधिकाधिक अधिसूचित सेवा सकारात्मक पद्धतीने विहित मुदतीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवून हिंगोली जिल्ह्याचे नाव लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बाबतीत उज्वल करावेत, असे आवाहन याप्रसंगी केले.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, पोलीस अधिकारी  जमीर अब्दुल गनी नाईक, सरकारी  कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड यांचा अपर जिल्हाधिकारी  महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवादूत पोर्टलच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान लोकसेवा हक्क दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. त्याचे दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपणही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना लोकसेवेची  शपथ देण्यात आली. महाआयटीचे प्रकल्प समन्वयक गंगाधर लोंढे यांनी आभार मानले.

******* 






अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल, मोबाईल अॅपद्वारे लाभार्थ्यांना थेट सेवा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप (Annasaheb Patil Mahamandal App) हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून, महामंडळाच्या योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता लाभार्थ्यांना थेट मोबाईलवरून करता येणार आहे.

महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून, योजनांची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत होता किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्याने लाभार्थ्यांना वेळ, खर्च व अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर महामंडळाने दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांशी करार करून योजनांच्या सेवा प्रति सेवा 85 रुपये दराने उपलब्ध करून दिल्या होत्या. आता त्यापुढील टप्पा म्हणून मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी त्यांच्या अँड्राइड मोबाईलवर हे अॅप डाउनलोड करून वापर सुरू करावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेल नोंदवून ओटीपीद्वारे नोंदणी पूर्ण करावी. पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे.

महामंडळाच्या योजनांमध्ये  एलओआय, सँक्शन, आणि क्लेम असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे तसेच पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे.

सध्या क्लेम सादर करणाऱ्या तसेच नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, त्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल व पारदर्शकता वाढेल.

यामध्ये जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, गुगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाईल. तसेच ही माहिती महामंडळाच्या इएचआरएमएस (EHRMS) प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अॅप डाउनलोड करून वापर करावा व या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

*******

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे अपूर्ण कागदपत्रांअभावी रद्द स्थितीत असलेली  प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. या प्रकरणांतील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार असल्याने कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित  प्रकरण छाननी स्तरावर दिसेल. या टप्प्यावर महामंडळामार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी सबमिट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल.

तसेच, व्याज परताव्यासाठी  क्लेम  सादर करताना कागदपत्रांतील तुटींमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरणेही लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसून येतील. अशा प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता संबंधित जिल्हा समन्वयकांमार्फत करून घ्यावी. प्राथमिक तपासणीनंतर विभागीय समन्वयकांमार्फत ही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. लाभार्थ्यांनी 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रकरण नियमित करून घ्यावे.

भविष्यात होल्ड प्रकरणांसाठी कागदपत्रे थेट लाभार्थ्यांच्या लॉगिनमधून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुटी  नसलेल्या क्लेम प्रकरणांमध्ये पूर्वी व्याज परताव्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम सादर  करण्यास  परवानगी  होती. मात्र, सुधारित प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचा क्लेम सेंट फॉर कॅफो या स्तरावर पोहोचताच पुढील उर्वरित क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र, बँक मंजुरी व व्याज परताव्यासाठी पात्र असलेली काही प्रकरणे तपासणीअंती एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशील किंवा कागदपत्रांमधील विसंगतीमुळे ब्लॉक करण्यात आली आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटमार्फत झालेल्या गैरव्यवहारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही करण्यात आली होती. या संदर्भात फौजदारी कार्यवाही सुरू आहे.

ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे ब्लॉक झाली आहेत त्यांनी संपर्क क्रमांक, बँक तपशील दुरुस्त करून तसेच मूळ कागदपत्रांसह संबंधित अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. पडताळणीनंतर अशा प्रकरणांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

सर्व लाभार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर जाऊन होल्ड किंवा ब्लॉक होण्याची कारणे तपासून त्वरित आवश्यक कागदपत्रांची  पूर्तता  करावी. काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. सर्व संपर्क यादी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महामंडळ नियमानुसार योजना राबवत असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे. 

******

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण व व्यवसाय वर्धन उपक्रम

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य पुरविण्यापुरते काम मर्यादित न ठेवता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम तसेच मार्केटींग टॅब सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.

महामंडळाने स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन (बिजनेस प्रोमोशन)  मार्केटींग टॅब विकसित केला आहे. हा उपक्रम फ्ल्‍िापकार्ट, ॲमेझान आणि इंडियामार्ट यांसारख्या  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता ऑनलाईन अपलोड करता येतो.

सध्या या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका यानुसार शोध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जवळील लाभार्थी उद्योजकांची माहिती सहज मिळू शकते व त्यांच्या उत्पादनांचा तसेच सेवांचा लाभ घेता येतो.

या माध्यमातून लोकल ते ग्लोबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, लघुउद्योजकांनाही मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याशिवाय, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ भांडवल नव्हे तर योग्य ज्ञान, कौशल्ये व बाजारपेठेची समज आवश्यक असल्याने महामंडळाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. वेबिनार, युट्यूब आणि पॉडकॉस्ट यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय विस्तार, उत्पादन गुणवत्ता, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहकांशी संवाद, विक्री कौशल्ये, आर्थिक नियोजन व नफा वाढविण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तांत्रिक माहितीही उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाच्या अधिकृत YouTube व Facebook चॅनेलवर प्रशिक्षण व्हिडिओ उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना सोयीच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

महामंडळाने  डिजीलॉकर  सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली असून त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. भविष्यात महा-आयडी तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्याशी समन्वय साधून आणखी डिजिटल सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

********