01 August, 2026

विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोलीच अव्वल

 


* मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात ८९.९७ टक्के काम पूर्ण



हिंगोली (जिमाका), दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात ८९.९७ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता वसमत मतदारसंघात ९०.२८ टक्के, कळमनुरी मतदारसंघात ९०.४४ टक्के आणि हिंगोली मतदारसंघात ८९.२२ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. या कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.

विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत मतदारांच्या नोंदींची पडताळणी करून त्यासंदर्भातील अर्जांचे संगणकीकरण करण्याचे काम जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. तहसील प्रशासन, निवडणूक शाखा, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

या प्रक्रियेत जिल्ह्यातील मतदारांनी दिलेल्या सहकार्याचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अर्जांच्या संगणकीकरणाचे काम वेगाने पूर्ण होत असून हिंगोली जिल्ह्याने राज्यातील आपली आघाडी कायम राखली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या मतदारांचे अभिनंदन केले आहे. उर्वरित कामही अचूकता, गुणवत्तेला प्राधान्य देत निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

*******

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन

 




हिंगोली (जिमाका), दि. 01 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

31 July, 2026

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 


साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानातून युवकांनी प्रेरणा घ्यावी – पंडित अवचार


  

हिंगोली (जिमाका), दि. 31 : जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, शंभोनाथ दुभळकर, डिगंबर झुंजारे तसेच ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ग्रंथ प्रदर्शनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठी भाषेतील विविध विषयांवरील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले आहे.

नागरिक, विद्यार्थी, युवक, साहित्यप्रेमी तसेच वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

 

*******

कळमनुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात * 7 हजार 513 विविध योजनांच्या लाभांचे वितरण

 





हिंगोली (जिमाका), दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंदाजे 4 हजार 500 लाभार्थी उपस्थित होते.

या शिबिरास आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिवंत सातबारा उतारे 1 हजार 151, वाटणीपत्रावरील नोंदणी फीमध्ये सवलत/लाभ 131, पाणंद रस्ते 19, अतिक्रमण नियमानुकूल अर्ज 386, घरकुल लाभार्थी 73, राज्यस्तरीय योजनांचे लाभ 5 हजार 608, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचे लाभ 20 आणि बसच्या मोफत पासचे वाटप 125 असे एकूण 7 हजार 513 लाभांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विविध विभागांच्या स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली.

यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 104 मिमी पाऊस

 

हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद


  हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

******

जिल्हा वार्षिक योजनेच्या विकास कामांचे प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी  प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रत्येक कामाचे यूआयडी क्रमांकासह प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. यामध्ये शाळा वर्गखोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम तसेच दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, जलसंधारण, शाळा क्रीडांगण विकास यासह विविध कामांचा समावेश आहे.

या सर्व कामांचे अंदाजपत्रक यूआयडी क्रमांकासह तयार करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. तसेच दायित्वाच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.


अमृत वृक्ष योजनेत हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट 11 लाख


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली वृक्ष लागवड तसेच आगामी काळात करावयाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला.

हिंगोली जिल्ह्यासाठी यापूर्वी 7 लाख 98 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अमृत वृक्ष योजनेंतर्गत हे उद्दिष्ट वाढवून 11 लाख करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

उर्वरित उद्दिष्टानुसार संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड पूर्ण करावी तसेच लागवड केलेल्या वृक्षांची माहिती ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अद्ययावत करावी. वृक्ष लागवड मोहिमेत हिंगोली जिल्ह्याला आघाडीवर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

****** 



माजी सैनिक व वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 181 पदांची भरती

 


हिंगोली (जिमाका), दि. 31 : सशस्त्र दलातील  भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील किमान 20 वर्षे सेवा केलेल्या भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 181 रिक्त पदे उपलब्ध असून, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

या भरती मेळाव्याचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय येथे दि. 1 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून, तर दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर येथील एआरओ प्रांगणात दि. 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे.

भरतीमध्ये जेसीओची 4 पदे, सोल्जर (जीडी)ची 162 पदे आणि ट्रेड्समनची 15 पदे आहेत. सोल्जर (जीडी) पदांसाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवार पात्र असतील. ट्रेड्समन पदांमध्ये सोल क्लार्क (जीडी)-7, हेअर ड्रेसर-1, मेस कीपर-1, स्टिवर्ड-1, हाऊस कीपर-1, शेफ कम्युनिटी-2 आणि वॉशरमन-2 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार पात्र आहेत.


पात्रता व सेवा अटी


उमेदवार हा सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक (निवृत्तिवेतनधारक) किंवा वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची किमान अट नाही. मात्र, सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.

उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शेष-1 आणि चारित्र्य अनुकरणीय अथवा अतिशय चांगले असावे. उमेदवार कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभागी नसावा. निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागणार आहे.


शारीरिक पात्रता


भूतपूर्व सैनिकांसाठी उंची 160 सेंमी, तर गोरखा, गढवाली व आसामी उमेदवारांसाठी 152 सेंमी उंची आवश्यक आहे. वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उंची 150 सेंमी आवश्यक आहे.

वजन माजी सैनिकांसाठी किमान 50 किलो, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी किमान 42 किलो असावे. माजी सैनिकांसाठी छाती 82 सेंमी व किमान 5 सेंमी विस्तार आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांची छाती किमान 5 सेंमी विस्तारण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.


निवड प्रक्रिया


सैनिकांसाठी प्रारंभिक कागदपत्र तपासणी, 1 मैल धाव, 9 फूट खंदक, पुलअप्स, बॅलन्स बीम, बीओओमार्फत मुलाखत व वैद्यकीय तपासणी अशी प्रक्रिया राहणार आहे. वने व हवामान बदल मंत्रालय व राज्य वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रारंभिक कागदपत्रे तपासणी, बीओओमार्फत मुलाखत, संबंधित कामातील प्रावीण्य चाचणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.


आवश्यक कागदपत्रे


उमेदवारांनी मूळ निवृत्तिवेतन आदेश (पीपीओ), मूळ डिस्चार्ज बुक व स्वयं-साक्षांकित प्रत, मूळ अधिवास प्रमाणपत्र, सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड व स्वयं-साक्षांकित प्रत, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची 10 छायाचित्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

ही भरती गुणवत्ता व रिक्त पदांच्या आधारे केली जाणार आहे. इको टीए मधील सेवा निवृत्तिवेतनास पात्र नसलेली आहे. उमेदवाराची सुरुवातीला दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येईल. कामगिरीच्या आधारे एक वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. सैनिक जेसीओंना वयाच्या 55 वर्षांपर्यंत, तर भूतपूर्व सैनिक शिपायांना 50 वर्षांपर्यंत सेवा करता येईल. सैनिकांचे सध्याचे निवृत्तिवेतन अबाधित राहणार आहे.


महत्त्वाच्या सूचना


या भरती मेळाव्यादरम्यान मोबाईल फोनला परवानगी राहणार नाही. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य व निष्पक्ष असून उमेदवारांनी कोणालाही लाच देऊ नये तसेच दलालांपासून सावध राहावे. खोटी अथवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

भरतीबाबत चौकशी अथवा स्पष्टीकरणासाठी 9168168136 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

******

30 July, 2026

तृतीयपंथीयांना रोजगार, प्रमाणपत्र व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्य शासनाने तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी 2026 च्या सुधारणा अधिनियमाची अंमलबजावणी केली असून, तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याची संधी देण्यात येणार असून, यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तरुणांनी तृतीयपंथीयांचा इतिहास जाणून घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक न्याय विभाग आणि सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तृतीयपंथीय संवेदनशीलता जनजागृती कार्यशाळे' मध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, पोलीस उपअधीक्षक डी. जी. केंद्रे, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सहउपाध्यक्षा डॉ. सान्वी जेटवाणी, रेखाताई देवकते, विनय खरटमोल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयात दिव्यांगांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तृतीयपंथीयांना स्वावलंबी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज असून, समाजातील त्यांच्याविषयीची मानसिकता बदलण्यासाठी आरोग्य विभागामार्फत व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना डॉ. सान्वी जेटवाणी यांनी तृतीयपंथीयांचा इतिहास, त्यांच्यासमोरील सामाजिक व आर्थिक समस्या, स्मशानभूमी व घरकुलासारखे मूलभूत प्रश्न यावर प्रकाश टाकला. तसेच तृतीयपंथीयांसाठी शासनाने लागू केलेल्या अधिनियमातील तरतुदींची माहिती देत समाजाची विचारधारा आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी कार्यशाळेची भूमिका विशद केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, तृतीयपंथीय व्यक्ती, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******  








पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू


पहिल्या टप्प्यात 16.96 लाख कर्जखात्यांची यादी प्रसिद्ध; 3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण


हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, योजनेअंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक आहेत.

योजनेअंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा, तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचा समावेश आहे. दि. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पात्र कर्जबाकी कर्जमाफीसाठी विचारात घेण्यात आली आहे.


दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी


योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील रक्कम दि. 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा केल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.


प्रोत्साहनपर लाभासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान


सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची उचल करून त्याची विहित मुदतीत परतफेड केलेल्या तसेच सन 2025-26 मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.


31.17 लाख कर्जखात्यांची माहिती प्रणालीवर सादर


योजनेच्या संगणकीय प्रणालीवर बँकांनी एकूण 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील 10.01 लाख आणि व्यापारी बँकांकडील 21.16 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे.

शासनाने दि. 9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना अनुत्पादित वर्गवारीतील कर्जखात्यांना निर्देशित प्रमाणात सवलत (Haircut) देण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच दि. 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना दि. 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत.


16.96 लाख कर्जखात्यांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध


महा-आयटीमार्फत बँकांनी सादर केलेल्या कर्जखात्यांचे योजना निकषानुसार संगणकीय संस्करण करण्यात आले आहे. त्यानंतर दि. 25 जुलै 2026 रोजी एकूण 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील 7.03 लाख आणि व्यापारी बँकांकडील 9.93 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचा समावेश आहे. उर्वरित कर्जखाती तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जबाकी असलेली कर्जखाती त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.


शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे


आधार प्रमाणीकरणाच्या वेळी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, कर्जखाते क्रमांक तसेच कर्जाच्या रकमेची अचूकता तपासून त्याबाबत मान्यता द्यावी. आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध केलेली यादी योजनेच्या प्रणालीवर, संबंधित बँक शाखेत तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच गावस्तरावर बँक शाखा, विकास संस्था, ग्रामपंचायत व चावडीवरही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गावस्तरावर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये दिसणारी रक्कम आणि आधार प्रमाणीकरणाच्या वेळी प्रणालीवर दिसणारी रक्कम यामध्ये फरक असू शकतो. गावस्तरावरील यादीमध्ये अनुत्पादित कर्जखात्यांना शासनाच्या निर्देशानुसार देण्यात आलेली सवलत (Haircut) लागू केल्यानंतरची तडजोड रक्कम दर्शविण्यात आली आहे.

दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनामार्फत माफ

दि. 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर बँकांकडून व्याज आकारणी करण्यात येणार नाही. त्यामुळे दि. 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील दोन लाख रुपयांपर्यंतची पात्र रक्कम शासनामार्फत माफ करण्यात येणार असून, या रकमेपोटी शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही रक्कम जमा करावी लागणार नाही.


3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण


दि. 28 जुलै 2026 पर्यंत 3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून ही प्रक्रिया सुरू आहे. आधार प्रमाणीकरणानंतर प्रत्येक पात्र शेतकऱ्यास देय कर्जमाफीची रक्कम निश्चित करण्यात येईल. त्यानंतर ही रक्कम थेट लाभ वितरण (डीबीटी) पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करून कर्जखाते निरंक करण्यात येणार आहे.

कर्जखाते निरंक झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील आपले नाव तपासून विहित प्रक्रियेनुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

खरीप पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी आज शेवटची संधी

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद या पिकांसाठी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीकविमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे एग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत कापूस पिकासाठी प्रति हेक्टर 69 हजार रुपये, सोयाबीनसाठी 62 हजार 500 रुपये, तुरीसाठी 47 हजार रुपये, मुगासाठी 30 हजार रुपये आणि उडदासाठी 27 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित बँक, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) किंवा राष्ट्रीय पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून विहित मुदतीत अर्ज करावा. शेतकऱ्यांनी पीकविमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. सीएससी चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज 40 रुपये मानधन देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रावर संबंधित पिकाची लागवड केलेली असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत, तर बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँक अथवा सीएससीच्या माध्यमातून योजनेत सहभागी व्हावे.

पीकविमा योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांसाठी 14447 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता दि. 31 जुलै 2026 पूर्वी पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

******

दाटेगावला ‘बालस्नेही गाव’ बनविण्यासाठी गाव बाल संरक्षण समितीचे सक्षमीकरण

 

* बालकांचे हक्क, संरक्षण व सर्वांगीण विकासासाठी विशेष बैठक


हिंगोली (जिमाका), दि. 29 : बालकांचे हक्क, संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी गावपातळीवर सुरक्षित व बालस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मिरॅकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दाटेगाव (ता. हिंगोली) ग्रामपंचायतीत विशेष बैठक घेण्यात आली.

‘गाव बाल संरक्षण समिती’चे सक्षमीकरण करून दाटेगावला आदर्श ‘बालस्नेही गाव’ बनविण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शासकीय अधिकारी व मिरॅकल फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी ग्रामपंचायतीला भेट देऊन गाव परिसरातील बालकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीदरम्यान ग्रामस्थ, गाव बाल संरक्षण समितीचे सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी निर्मूलन तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर चर्चा झाली.


गाव बाल संरक्षण समिती अधिक सक्षम करण्याचा संकल्प


गावपातळीवर कार्यरत असलेल्या बाल संरक्षण समितीला अधिक सक्रिय व सक्षम करणे, बालकांच्या सुरक्षिततेबाबत पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी निश्चित करणे, तसेच गावात बालविवाह, बालमजुरी व शाळाबाह्य मुलांची समस्या निर्माण होणार नाही यासाठी सातत्याने दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

“प्रत्येक बालकाला सुरक्षित, भयमुक्त आणि स्नेही वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. दाटेगावला बालस्नेही गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे यावेळी मिरॅकल फाउंडेशन इंडियाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

या बैठकीस जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती सोनाली तिवाटणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सरपंच सौ. कन्हैयाकुमारी माने, पोलीस पाटील हनुमान प्रकाश माने, मुख्याध्यापक मोहन शहू, आशा सेविका वनिता भिसे, अंगणवाडी सेविका गोदावरी भिसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकिशन माने, पदाधिकारी, बाल संरक्षण समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत दाटेगावला आदर्श ‘बालस्नेही गाव’ बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.

****** 



*हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट* * नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


हिंगोली, (जिमाका) दि. ३०: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज गुरुवारी जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनीही सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलांवर दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून पायी अथवा वाहनाने जाण्याचे धाडस करू नये. तसेच नदीकाठावरील पर्यटनस्थळांवर निर्धारित सुरक्षित मर्यादेपलीकडे जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींवर पोलिस विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचना व इशारे यांच्यावरच विश्वास ठेवावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

*******

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 20 मिमी पाऊस

 

  हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  20.1  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कळमनुरी तालुक्यात सर्वात जास्त 32.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 8.8 मि.मी. पाऊस पडला आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 15.7 (363.3), कळमनुरी 32.7 (346.5),  वसमत 20.8 (269.1), औंढा नागनाथ 24.4 (289.9) आणि सेनगाव तालुक्यात 8.8 (246.2) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 30 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  304.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 38.3 अशी आहे. 

******

29 July, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

§ पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन


मुंबई, दि. २९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेल्या यादीत नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.


सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आतापर्यंत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ७.०३ लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे, तर ९.९३ लाख शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांचे असून, एकूण ₹१३,३३६ कोटींच्या कर्जमुक्तीचा समावेश आहे.


योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. राज्यभरातील ३२ हजार 'आपले सरकार सेवा केद्र कार्यान्वित करण्यात आली असून' त्या मार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, योजनेच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत ६ लाख कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.


 ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२२-४९१५०८०२ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.


कर्जमुक्ती योजनेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण


● गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आणि योजनेच्या पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रक्कमेत फरक असल्यास, योजनेच्या पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी.


● योजनेच्या पोर्टलवर दिसणारी शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. शासनाने दि. १ जुलै २०२६ रोजीच्या पत्रान्वये सर्व बँकांना दि. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आकारू नये, अशा सूचना दिल्या असून सर्व बँकांनी त्या मान्य असल्याचे लेखी कळविले आहे. त्यामुळे पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे.


● आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणीकरण यशस्वी झाल्याची पावती मिळेल. या पावतीमध्ये कर्जमुक्तीअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची माहिती उपलब्ध असेल.


● आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जबाकीच्या अनुषंगाने मंजूर झालेली लाभाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल.


● कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांच्या शाखा तसेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील.


● कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.


● योजनेच्या पोर्टलवरील रक्कम अथवा कर्जासंदर्भातील इतर कोणताही तपशील शेतकऱ्यांना अमान्य असल्यास त्यांनी पोर्टलवर तक्रार नोंदवावी. संबंधित तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.


● हेअरकट संदर्भातील स्पष्टीकरण


शासनाने ९ जून २०२६ रोजीच्या पत्रान्वये बँकांना विशिष्ट प्रमाणात सवलत देऊन एनपीए तारखेवरील देय रकमेस तडजोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


*तडजोडीची रक्कम पुढील प्रमाणे आहे.* त्यानुसार सवलतीचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे


अनुत्पादित कर्जाचा दिनांक ३० सप्टेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी असल्यास तडजोडीची रक्कम अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या ३५ टक्के, १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ४५ टक्के, १ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत ५५ टक्के, १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत ७० टक्के, दि. १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या ८५ टक्के असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. पात्र शेतकऱ्यांना २ लाखापर्यत कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.


0000

कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. २९ -  राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. कोणताही पात्र कर्जदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. या योजनेत प्रामुख्याने कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ अशा तीन घटकांचा समावेश आहे. यातून राज्यातील सुमारे ३२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, तर नियमित कर्ज भरणाऱ्या २४ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.


या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १७ लाख (१६.९६ लाख) कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांची ७.०३ लाख तर व्यापारी बँकांची ९.९३ लाख कर्जखाती आहेत. तर दुसरी यादीही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.


गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये व्यापारी बँकांमधील एनपीए (NPA) खातेदार शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेली थकबाकी रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवरील रक्कम यात काही ठिकाणी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना प्रधान सचिव प्रवीण दराडे म्हणाले, अशी तफावत असल्यास योजनेच्या 'पोर्टलवरील' ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकीची रक्कम ग्राह्य धरण्यात यावी. तसेच, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज न आकारण्याच्या शासनाच्या सूचनांना सर्व बँकांनी लेखी संमती दिली आहे.


कर्जमुक्तीची प्रक्रिया


पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यावर त्यांना कर्जमुक्तीच्या रकमेची माहिती असलेली पावती मिळेल. त्यानंतर ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जबाकीच्या लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यास 'कर्ज बेबाकी प्रमाणपत्र' देण्यात येईल. यानंतर या सर्व शेतकऱ्यांना बँकेमार्फत आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाची उपलब्धता होईल. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांच्या शाखा आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावल्या जातील.


तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती


जर एखाद्या शेतकऱ्याला पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाबाबतचा इतर कोणताही तपशील अमान्य असेल, तर तो पोर्टलवरच आपली तक्रार नोंदवू शकतो. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती काम पाहणार आहे.


विशेष सवलत (हेअर कट)


शेतकऱ्यांचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले असल्यास, बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत (हेअर कट) दिली जाणार आहे. त्याची तडजोड रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. अनुत्पादक कर्जाचा दिनांक व तडजोडीची रक्कम अनुक्रमे -  ३०/०९/२०२१ किंवा त्यापूर्वी - कर्जबाकीच्या ३५ टक्के,  ०१/१०/२०२१ ते ३०/०९/२०२२ - कर्जबाकीच्या ४५ टक्के, दि. ०१/१०/२०२२ ते ३०/०९/२०२३ - कर्जबाकीच्या ५५ टक्के, ०१/१०/२०२३ ते ३०/०९/२०२४ - कर्जबाकीच्या ७० टक्के आणि  ०१/१०/२०२४ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत कर्जबाकीच्या ८५ टक्के.


00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र रकमेबाबत सहकार आयुक्तांचे स्पष्टीकरण


गावपातळीवर प्रसिद्ध यादी व पोर्टलवरील रकमेतील तफावतीबाबत शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये


हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 जाहीर केली आहे. या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना व प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे.

या योजनेतंर्गत कर्जमाफी व एकवेळ समझोता घटकाकरिता योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली आहे. बँकेमार्फत सादर केलेल्या कर्जखात्यांचे 'महा-आयटी'मार्फत योजना निकषानुसार संगणकीय संस्करण करुन दि. 25 जुलै 2026 रोजी एकूण 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 7.03 लाख कर्जखाती व व्यापारी बँकांकडील 9.93 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे. या योजनेतील गावपातळीवर प्रसिध्द झालेल्या याद्यामध्ये व्यापारी बँकांमधील एनपीए खातेदार शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या थकबाकी रक्कम तसेच योजनेच्या पोर्टलवरील रकमेत फरक असल्याचे निदर्शनास आले आहे.

या अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026 अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यापारी बँकांच्या यादीतील एनपीए खातेदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पात्र रकमेबाबत राज्याचे सहकारी संस्थेचे सहकार आयुक्त तथा निबंधक दिपक तावरे यांनी स्पष्टीकरण जारी केले आहे.

राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समजोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. योजनेअंतर्गत बँकांकडून प्राप्त झालेल्या कर्जखात्यांच्या माहितीच्या आधारे गावनिहाय पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

काही ठिकाणी गावपातळीवरील यादीतील रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवर दर्शविलेल्या थकबाकीच्या रकमेमध्ये फरक असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत योजनेच्या पोर्टलवर दर्शविलेली थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी. पोर्टलवर दिसणारी थकबाकी ही 31 मार्च 2026 रोजीची असून, शासनाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारलेले नसल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी पोर्टलवरील माहिती मान्य असल्यास आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर त्याची पावती उपलब्ध होईल. या पावतीमध्ये कर्जमुक्ती होणाऱ्या रकमेची माहितीही नमूद असेल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल. कर्जमुक्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित बँकेमार्फत कर्ज बेबाकी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत पुढील खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जासंदर्भातील इतर कोणतीही माहिती चुकीची वाटल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर तक्रार नोंदवावी. अशा तक्रारींचे निराकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

****** 



जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन

 

* हक्क संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत 30 जुलै रोजी कार्यशाळा


हिंगोली (जिमाका), दि. 29 : समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन उद्या गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती, रोजगाराच्या संधी तसेच स्वावलंबनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय सहभागींसाठी विशेष आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी व्यक्ती तसेच तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्ती व विद्यार्थ्यांनी या उपयुक्त कार्यक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

****

'पराक्रम दिना'निमित्त राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

 

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त 1 ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध स्पर्धा


हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 'पराक्रम दिन' साजरा करण्यासाठी अमृत संस्थेमार्फत 'पराक्रम दिन समिती' स्थापन करण्यात आली असून, समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर व श्रीमती कौमुदी परांजपे या इतिहास अभ्यासकांचा समावेश आहे.

या स्पर्धांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि रिल्स या तीन प्रकारांचा समावेश असून निबंध व वक्तृत्व स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी, तर रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.

निबंध स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा निबंध टंकलिखीत (टाईप) करून त्याची पीडीएफ स्वरूपातील प्रवेशिका सादर करावी लागणार आहे. वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी स्वतःच्या भाषणाचा जास्तीत जास्त सात मिनिटांचा दर्जेदार व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक असून, त्यामध्ये कोणतेही व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार केलेल्या प्रतिमांचा वापर करता येणार नाही. रिल्स स्पर्धेसाठीही प्रवेशिका 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत.

स्पर्धांचे विषय, नियमावली, बक्षिसांची माहिती, सहभाग नोंदणीची प्रक्रिया तसेच संदर्भ साहित्य https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्यावरील निवडक संदर्भ पुस्तके तसेच ई-बुकही या संकेतस्थळावर उपलब्ध असून, स्पर्धेतील विषय आणि प्रश्नावली याच संदर्भ साहित्याच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

******

जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज !

 


         निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' राबवण्यास सुरुवात केली आहे. 25 जुलै रोजी या योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीबाबत सविस्तर सांगितले आहे. या योजनेत केवळ कर्जमाफीच नाही, तर शेतकऱ्याला तत्काळ पुन्हा उभे करण्याची मोठी ताकद आहे. पहिल्या टप्प्यातील यादीत मराठवाडा विभागातील जवळपास  सहा लाखांहून अधिक शेतकरी पात्र झाले आहेत.


योजनेची सर्वात जमेची बाजू : अवघ्या एका दिवसात नवीन कर्ज!

         एरवी कोणतीही कर्जमाफी झाली, तरी नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांचा 'कुलिंग ऑफ पिरियड' (Cooling-off Period) असतो. यासाठी बँका अनेक महिने किंवा चक्क एक वर्ष वाट पाहायला लावतात. पण या योजनेत शासनाने एक 'मास्टरस्ट्रोक' लगावला आहे. सहकार आयुक्तांनी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत, की या कर्जमाफीनंतर हा 'कुलिंग ऑफ पिरियड' फक्त एका दिवसाचा असेल. म्हणजेच शेतकऱ्याने आज 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन स्वतःचे आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. त्याची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली, की त्याला अवघ्या एका दिवसात नवीन पीक कर्ज मिळू शकेल. आगामी हंगामासाठी बी-बियाणे आणि खते घेण्यासाठी शेतकऱ्याला कोणाकडेही हात पसरावे लागणार नाहीत. ही या संपूर्ण योजनेची सर्वात मोठी आणि क्रांतीकारी जमेची बाजू आहे.


पहिल्या टप्प्यात मराठवाड्याला सर्वाधिक लाभ

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16 लाख 96 हजार (सुमारे १७ लाख) शेतकरी कर्जमुक्त होत आहेत. या माध्यमातून 13 हजार 600 कोटी रुपयांची थेट कर्जमाफी दिली जात आहे. विशेष म्हणजे, या पहिल्या यादीत मराठवाड्याचा वाटा सर्वात मोठा आहे. जवळपास सहा लाख 37 हजार 935 मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. 

राज्यातील सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. एकट्या जालना जिल्ह्यात एक लाख सात हजार 505, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये  एक लाख पाच हजार 128 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर विभागातील परभणीमध्ये 79 हजार 855, हिंगोलीमध्ये 44 हजार 213 पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. 

सहकार विभागाच्या लातूर विभागांतर्गत बीडमध्ये सर्वाधिक 99 हजार 631, त्यापाठोपाठ नांदेड 99 हजार 54, लातूर 54 हजार 663 आणि धाराशिवमध्ये 47886 शेतकरी या योजनेतून पहिल्या टप्प्यात कर्जमुक्त होत असल्याचे लातूर विभागाच्या सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले. यासह योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देखील केले.


शेतकऱ्यांनी आता नेमके काय करायचे आहे?

नवीन पीक कर्जाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी खालील सोपी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. सेवा केंद्रात जा : यादीत नाव आल्यास आपले आधार कार्ड घ्या आणि त्वरित जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' (CSC) जा.

२. ॲग्रीस्टॅक आयडी: या प्रक्रियेसाठी 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे तो नसेल, तर केंद्रावरच तत्काळ काढून मिळेल.

३. रक्कम तपासा: स्क्रीनवर तुमची 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीची मुद्दल दिसेल. ती अचूक असल्यास बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) देऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करा.

४. बेबाकी प्रमाणपत्र: प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला बेबाकी प्रमाणपत्र (No Dues Certificate) मिळेल आणि नवीन कर्जाचा मार्ग खुला होईल.


दोन लाखांवरील कर्जासाठी 'एकवेळ समझोता' (OTS)

            ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यांच्यासाठी 'एकवेळ समझोता' योजना आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) धोरणानुसार, तुमचे खाते 'एनपीए' (NPA) झाल्यानंतरचे सर्व व्याज माफ केले जाईल. तसेच मुदलातही मोठी सवलत मिळेल. सवलतीनंतर उरलेली दोन लाखांवरची रक्कम तुम्ही भरल्यास, शासनाकडून तुमचे दोन लाख रुपये माफ केले जातील.


थोडक्यात सांगायचं तर...

              ही केवळ एक कर्जमाफी नाही. शेतकऱ्याला पुन्हा आत्मसन्मानाने उभे करण्याची एक सुसज्ज यंत्रणा आहे. जुने कर्ज माफ आणि लगेच दुसऱ्या दिवशी नवीन कर्ज, हा निर्णय कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकरी बांधवांनी अजिबात वेळ न दवडता त्वरित आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. विकासाच्या या नव्या प्रवाहात सामील व्हावे !


- डॉ. श्याम टरके ,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, लातूर

28 July, 2026

कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

अडचणींसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय हेल्पलाईन उपलब्ध



हिंगोली (जिमाका), दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील 44 हजार 213 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाच्या flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुजीत झोडगे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक अचूकपणे जोडलेला असल्याची खात्री करून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झाल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरणावेळी रकमेत तफावत, कर्ज खात्याशी आधार क्रमांक जुळत नसणे किंवा इतर तांत्रिक अडचणी आल्यास flrs.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून, जिल्हास्तरीय समितीमार्फत त्याचे तातडीने निराकरण करण्यात येत आहे.  

ते पुढे म्हणाले की, शासनाच्या निकषानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या पात्र थकीत कर्जासाठी कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी संबंधित बँकांमार्फत वन टाइम सेटलमेंट (OTS) प्रक्रियेद्वारे कार्यवाही करण्यात येईल. कर्जमाफीच्या यादीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका, तक्रार किंवा तांत्रिक अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी  विजय गीते, सहकार अधिकारी श्रेणी-1 (7038969535), उमाकांत चौव्हाणकर, सहाय्यक सहकार अधिकारी (9890049482), राजेश बांडे, प्रमुख लिपिक (7507486880), उद्धव सूर्यवंशी, सहकार अधिकारी श्रेणी-1 (9921807635), ज्ञानदेव डुकरे, सहकार अधिकारी श्रेणी-2 (9284787552) यांच्याशी नमूद हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. 


तालुकानिहाय संपर्क अधिकारी

सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी  ए. डी. गुंडे, सहाय्यक निबंधक (7020475834), हिंगोली  व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी  एम. यू. यादव, सहाय्यक निबंधक (9420433838), वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी के. एम. कलेतवाड, सहाय्यक निबंधक (8975943111) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कोणताही संभ्रम न बाळगता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी  पत्रकार परिषदेत केले. 

***

शासकीय योजनांतील कर्जवाटपाला गती द्या; कर्जमाफी तक्रारींचे तातडीने निराकरण करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे बँकांना निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी शासकीय योजनांअंतर्गत कर्जवाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्य करावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेशी संबंधित तक्रारी जिल्हा अग्रणी बँकेच्या निदर्शनास आणून त्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या शासकीय योजनांअंतर्गत कर्जवाटप, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सुजीत झोडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जासाठी आवश्यक प्रशिक्षणाची व्यवस्था स्थानिक स्तरावर पुरेशा संख्येअभावी पर्यायी स्वरूपात नांदेड येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्याच्या सूचना दिल्या.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणाबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी संबंधित विमा कंपनीने समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रत्येक बँकेने किमान पाच शेतकऱ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गटांना कर्जपुरवठा, कृषी कर्जमाफी तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत बँकांनी निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कृषी, उद्योग व स्वयंरोजगार क्षेत्राला चालना देण्यासाठी पीक कर्ज, उद्योग कर्ज तसेच महिला बचत गटांच्या कर्ज प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्वरित कर्जवाटप करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील तक्रारींसाठी हेल्पलाईन व ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार

 


 

·         ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य; शुल्क आकारल्यास तक्रार करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, काही प्रकरणांमध्ये कर्जमाफीच्या रकमेबाबत तफावत आढळून येत आहे. अशा प्रकरणांतील शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, संबंधितांनी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

तसेच शासनाने www.flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी या संकेतस्थळावरूनही आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

सध्या योजनेअंतर्गत माहिती अद्ययावत (डेटा अपडेटेशन) करण्याचे काम सुरू असल्यामुळे सर्व्हरवर तांत्रिक ताण निर्माण झाला असून, काही वेळा सर्व्हर डाऊन होत आहे. सर्व्हर पूर्ववत सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच सेवा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, या प्रक्रियेसाठी आपले सरकार सेवा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास मनाई आहे. कोणत्याही सेवा केंद्राकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारण्यात आल्यास संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माध्यमांचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी व आवश्यक असल्यास हेल्पलाईन किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

*******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारू नये– सहकार आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

* ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः मोफत


हिंगोली (जिमाका), दि. २८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, या प्रक्रियेसाठी आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्राम स्तरीय उद्योजक (व्हीएलई) यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत असून, त्यासाठी आधार ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. ही प्रक्रिया राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत राबविण्यात येत असून, प्रत्येक ई-केवायसीसाठी शासनाकडून निश्चित मानधन संबंधित ग्रामस्तरीय उद्येजकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, संबंधित विभागीय अधिकारी तसेच आपले सरकार सेवा केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सेवा केंद्राच्या दर्शनी भागात "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे" असा फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तसेच कोणत्याही व्हीएलई किंवा सेवा केंद्राकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसे आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवून शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असल्याने कोणालाही कोणतेही शुल्क देऊ नये. तसेच कोणत्याही सेवा केंद्राकडून शुल्काची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

********

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश




हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धतीत सुधारणा करून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा तसेच राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, संबंधित अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक पायाभूत सुविधा, दुरुस्ती व सुधारणा ही जिल्हा वार्षिक योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजनांतील उपलब्ध निधी तसेच इतर उपलब्ध निधीच्या माध्यमातून तातडीने पूर्ण कराव्यात. यासाठी आवश्यक मंजुरी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रुग्णालयांतील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीत बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजना, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वेळेत अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
या कामात हलगर्जीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
******


27 July, 2026

सेनगाव तालुक्यातील युवक-युवतींसाठी आरी वर्क व फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण

 

* ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २७ : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली यांच्या वतीने सेनगाव तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतींसाठी आरी वर्क व फॅशन डिझाईनिंग या विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) व बँक पासबुकची प्रत यांसह अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी.

नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून, इच्छुकांनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ (मो. ८४१२०८९२७२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली येथेही संपर्क साधता येईल.

या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए. एस. कदम तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.

******

औंढा नागनाथ तालुक्यातील युवक-युवतींसाठी फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण


* ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २७ : जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतींसाठी फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) आणि बँक पासबुकची प्रत या आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी.

प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक किसन धाबे (मो. ९३७०६३१४६९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली व जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली येथेही संपर्क साधता येईल.

या प्रशिक्षणाचा लाभ पात्र युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक ए. एस. कदम तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.

*****

बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींचा आढावा




हिंगोली (जिमाका), दि. 27 : शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या बियाणे तक्रारींचे तातडीने व पारदर्शक पद्धतीने निवारण करावे. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे तक्रारींच्या अनुषंगाने बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे तसेच विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात प्राप्त झालेल्या बियाणे तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित बियाणे कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्राप्त तक्रारींवर कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

***

खरीप हंगाम पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 


अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे


हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादकतेत वाढ आणि प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम 2026 पासून स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर स्पर्धा होणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांमधून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित जमीन शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्यास एकाच वेळी एका पिकासाठीच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान 40 गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे आवश्यक आहे. 

अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र तसेच बँक खाते किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जोडणे आवश्यक आहे. मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये ठेवण्यात आले आहे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्यास अनुक्रमे 5 हजार, 10 हजार व 50 हजार रुपये तर द्वितीय येणाऱ्यास 3 हजार, 7 हजार व 40 हजार रुपये तर तृतीय येणाऱ्यास 2 हजार, 5 हजार आणि 30 हजार रुपये याप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील "पीक स्पर्धा नोंदणी" टॅबद्वारे ऑनलाइन अर्ज करून या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

***

अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाने लिगो इंडिया प्रकल्पाबाबत जिल्हा यंत्रणेचा घेतला आढावा

 






हिंगोलीतील उद्योग व पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा

अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांची हिंगोली भेट


हिंगोली (जिमाका), दि. 27 : औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या दि. 1 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकास निर्बंधांचा आढावा घेण्यासाठी अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी आज हिंगोली जिल्ह्यास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी आश्विनकुमार माने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, सहाय्यक संचालक (नगर रचना विभाग) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय लिंबाळा एमआयडीसी उद्योग समूह संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, प्रविण सोनी, नितीन राठोड, रमेश पंडित तसेच जिल्ह्यातील स्टोन क्रशर उद्योजकही बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून 5, 15, 30 आणि 60 किलोमीटर परिसरात लागू असलेल्या विविध निर्बंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्टोन क्रशर, खाणकाम, ब्लास्टिंगवर आधारित उद्योग, 20 अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग क्रियाकलाप, नवीन वीज प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग तसेच पवनचक्की उभारणीवरील निर्बंधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, यासाठी लिगो इंडिया प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित निर्बंध शिथिल करण्यात यावेत तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासन व उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली.

यावर संचालक नितीन जावळे यांनी जिल्हा प्रशासन व उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर लिगो इंडिया एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या दौऱ्यादरम्यान नितीन जावळे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासमवेत लिंबाळा एमआयडीसी परिसरातील कीर्ती गोल्ड, शिवपार्वती ऑईल मिल तसेच पंचतत्त्व उद्योगांना भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, बाटली निर्मिती व पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथील प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्प स्थळालाही भेट देऊन तेथील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

**** 


 वसमत तालुक्यातील विकासकामांना गती द्या; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला विविध विकासकामांचा आढावा


हिंगोली (जिमाका), दि. 27 : वसमत तालुक्यातील विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे वसमत तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त  गणेश गांजरे, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथील गोदाम व क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा घेत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच ट्रॉमा सेंटरसाठी आवश्यक जागा आरक्षित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.

पारडी येथील एमआयडीसीसाठी हस्तांतरीत केलेल्या जमिनीवरील अतिक्रमणधारकांना नियमानुसार नोटिसा देऊन अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करावी. खांडेगाव येथील गायरान जमीन नगर परिषद वसमत यांना घनकचरा व्यवस्थापनासाठी द्यावयाची आहे. त्यासाठी मागणी प्रस्ताव अ,ब,क,ड मध्ये भरुन तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. तसेच टाकळगव्हाण (खोपा) येथील 132 केव्ही वीज उपकेंद्रासाठी रस्ता तयार करणे आणि सतीपांगरा येथील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

*** 



नैसर्गिक शेतीचा स्वीकार काळाची गरज आत्मा योजनेअंतर्गत कंजारा येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे कंजारा येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. या शेती शाळेत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञान, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर तसेच जैविक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के. एस. घुगे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ मार्गदर्शक डी. एन. गुंठे उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य सुधारते, पर्यावरणाचे संवर्धन होते आणि सुरक्षित अन्न उत्पादनास चालना मिळते, असे सांगितले. तसेच जैविक निविष्ठा स्वतः तयार करून त्यांचा प्रभावी वापर करण्याचे आणि रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमासाठी आयोजक शेतकरी शंकरराव कल्याणकर, गजाननराव कल्याणकर, रामराव कल्याणकर तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीबाबत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

आत्मा योजनेअंतर्गत अशा प्रकारच्या नैसर्गिक शेती शाळांमुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार होऊन पर्यावरणपूरक व खर्चात बचत करणाऱ्या शेतीला चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

***

कारगील वीरांचे बलिदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

कारगील विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली; वीर पत्नी व वीर मातांचा सत्कार


हिंगोली (जिमाका), दि. 27 : कारगील युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कारगील युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी कारगील युद्धातील शहीद जवानांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रत्येक भारतीयाला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित माजी सैनिकांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावाचा गौरव केला.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी कारगील विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले. तसेच माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, सुभेदार मेजर पुंडगे भीमराव, बाबूराव जांबुतकर, पंडित हाके, आर. के. मांडगे, के. एम. जाधव, बाबूराव गाडे, भगवान चव्हाण यांच्यासह कारगील व इतर युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर मातांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुकाडे, खराटे संघपाल, कडुजी टापरे, सिताराम फुपाटे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

******